शुक्रवार, जून 6, 2025
Home Blog Page 968

सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दि.२२: राज्य व केंद्र सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरिता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

६५ एकर परिसर येथे कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.

आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

श्री. फडणवीस म्हणाले, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याकरीता ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. १४ वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व्यवस्था करीत आहोत. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत राज्यातील दोन ते अडीच लाख गृहभेटी देऊन महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. महिलांना आजार होऊच नये याकरीता प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

सामान्य नागरिकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांवर ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर राज्यातही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करुन, कुठलीही अट न ठेवता राज्यातील नागरिकांनाही ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य विभागाच्यावतीने ‘आरोग्याचा अधिकार’ (राईट टू हेल्थ) कायदा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा कायदा तयार झाल्यानंतर सामान्य नागरिकाला कायदेशीररित्या आरोग्य सेवा देणे बंधनकारक होईल.

महाआरोग्य शिबिराचा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक येत असतात. त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांनी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सदरचे महाशिबीर पार पडल्यानंतर एक ‘महारेकॉर्ड’ तयार झाला. त्यामध्ये सुमारे ११ लाख रुग्णांनी विविध तपासण्या करत उपचार प्राप्त करुन घेतले. ज्या रुग्णांना पुढचे उपचार आवश्यक होते, त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित या महाशिबिरात आजपर्यंत सुमारे ४२ हजार रुग्णांनी लाभ घेतला. गरजू रुग्णांवर उपचार देण्यासाठी ही व्यवस्था उभारण्यात आली असून याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे  सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त येणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी अतिशय कमी कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  आषाढी एकादशी यात्रेनिमित आयोजित महाआरोग्य शिबिरात ११ लाख ५० हजार रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. या ठिकाणी तपासणीअंती गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर पुढील योग्य ते उपचार राज्य शासनाच्या दवाखान्यात  मोफत करण्यात येत आहेत.

या महाशिबिरात अतिदक्षता विभाग, आपला दवाखाना तीनची निर्मिती, परिसरात १२ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६० सुसज्ज रुगणवाहिका, २ हजार ९०० कर्मचारी, रुग्णाचे नियोजन करण्यासाठी वार रुम कार्यान्वित करण्यात आली आहे.  वारकऱ्यांना महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या सेवा एकाच छताखाली मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी २२, २३ व २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक वारकऱ्यांनी या शिबीराचे लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २२ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मोफत उपचार संकल्पनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यांनी बाह्य  व अंतर्रुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढला आहे.

देशाचे प्रधानमंत्री यांनी देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला असून त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन  डॉलरवर नेण्याकरिता राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ असले पाहिजे. त्यादृष्टीने येत्या अधिवेशनात ‘राईट टू हेल्थ’ विधेयक मांडण्याच्या मानस केला आहे. येत्या काळात राज्याचे आरोग्य खाते देशात क्रमांक एकवर नेऊ, असा संकल्प डॉ. सावंत यांनी केला.

दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध निर्णय

शासकीय नोकऱ्यांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली

स्वाधारच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करणार

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. 22 : राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स आरक्षित ठेवण्यासह स्वाधार योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करावी आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खऱ्या दिव्यांगांना  संधी मिळावी यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची प्रणाली सुरु करावी, असे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.  सर्वच शासकीय विभागांनी दिव्यांगांचे विषय गांभीर्याने घेऊन त्यांच्यासाठी असलेल्या योजना, कार्यक्रम गरजूंपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्यावा, यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत राज्यातील दिव्यांगांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगांच्या दारी अभियान राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचेसह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शासकीय नोकऱ्यांमधील दिव्यांगांच्या आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देतानाच विभागनिहाय अनुशेषाची आकडेवारी सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मूकबधीर दिव्यांग व्यक्तींना वाहन परवाने देण्यासाठी नियमात दुरुस्ती आवश्यक असून त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची कार्यवाही करावी. दिव्यांगांच्या विविध प्रकारातील पदवीधरांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

कंत्राटी पदभरतीत दिव्यांगांना आरक्षण; सर्व विभागांनी अंमलबजावणी करावी

शासकीय विभागांमध्ये मानधनावरील कंत्राटी पदे भरताना दिव्यांगांना त्यात आरक्षण देण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. दहावी-बारावीमधील दिव्यांग विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये प्रवेश आहे त्याच ठिकाणी परीक्षा केंद्र देण्याच्या नियमाची अंमलबजावणी करावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच जिल्हा, तालुका, मोठ्या शहरांमध्ये रहदारीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी गटई कामगारांप्रमाणे दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल्स देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिकासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन द्यावे

अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेत लेखनिकाचा पर्याय दिला जातो, लेखनिक मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुयोग्य पर्याय उपलब्ध करुन देण्याची गरज आहे, त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने अशी प्रणाली तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. सर्व शासकीय, निमशासकीय विभागाची संकेतस्थळे, मोबाईल ॲप आणि डिजिटल कागदपत्रे हे दिव्यांगांसाठीच्या मानकांप्रमाणे सुलभ होतील, याकडे विभागांनी लक्ष देण्याच्या सूचनाही  मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

दिव्यांगांना देण्यात येणारे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे आणि पोस्टल बॅंकेद्वारे देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असून यामुळे हे अर्थसहाय्य लवकर, वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. गाव पातळीपर्यंत दिव्यांगांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी विशेष अभियान घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

अपंगत्व निर्माण होणार नाही यासाठी आणि असलेले अपंगत्वाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच दिव्यांगांचे पुनर्वसनाचे काम करणे आवश्यक असून यासाठी इतर देशांमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

महा आवास अभियानाचा उद्या २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई दि. 22 : राष्ट्रीय आवास दिनानिमित्त  31 मार्च 2024 पर्यंत “महा आवास अभियान 2023-24” राज्यभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महा आवास अभियान पुरस्कार वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत 23 नोव्हेंबर, 2023 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.

राज्यात राबविण्यात येणाऱ्या  “महा आवास अभियान 2023-24” या अभियानामुळे 10 लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

“सर्वांसाठी घरे-2024” या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढविणे हा या अभियानाचा हेतू आहे.

या अभियान कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरित करणे,  सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, बहुमजली इमारती, गृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे, डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम (Innovations / Best Practices) राबविणे, इ. 10 उपक्रम राबविण्यात येत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी केले.

विविध विभागाचे मंत्री, सचिव  व राज्यस्तरीय वरीष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

०००

श्री. राजू धोत्रे/विसंअ/

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई दि. 22 : महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. या अनुयायांना प्रशासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

विभागीय आयुक्त श्री. कल्याणकर यांनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, अनुयायांकरीता पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सुविधा, परिसर स्वच्छता, सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था, भोजन व्यवस्था, अतिरिक्त एसटी बस व्यवस्था याबाबत आढावा घेतला. आरोग्य विभागातर्फे देखील आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत श्री.कल्याणकर यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, कोकण विभागीय महसूल उपायुक्त विवेक गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्यावतीने श्री. कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या.

******

शैलजा पाटील/विसंअ/

 

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू-व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

            मुंबईदि. 22 (रानिआ) : राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावाअसे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

            राज्यातील 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिकतसेच थेट सरपंचपदाच्या 130 रिक्त जागा व 2 हजार 950 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त/ दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. या खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू व्होटर ॲपद्वारेच सादर करणे बंधनकारक आहेपरंतु, पोटनिवडणुकांत बिनविरोध विजयी झालेल्यांसह सर्व उमेदवारांना खर्चाचा हिशेब पारंपरिक पद्धतीने सादर करता येईलअसेही आयोगाच्या  प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

०-०-०

(Jagdish More, SEC)

सहकार महर्षी सुधाकर पंत परिचारक यांच्या सहकार क्षेत्रातील भरीव योगदानामुळे सर्वसामान्यांची प्रगती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

पंढरपूर दिनांक 22:- सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांनी तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी काम केलेले होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानामुळेच या भागातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक प्रगती झालेली आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना च्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत ,समाधान आवताडे, राम सातपुते, सचिन कल्याण शेट्टी, माजी मंत्री विजय देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, सहकार महर्षी सुधाकर पंत परिचारक यांनी सहकार उद्योग मोठा केला असून त्यांच्याकडे समाजाभिमुख नेतृत्व होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे आमचं भाग्य आहे असे  गौरवउद्गारही त्यांनी काढले. त्यांनी या भागात सहकार क्षेत्रातून केलेल्या कामामुळे अनेक लोकांची आर्थिक प्रगती झालेली आहे. सर्व सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी सहकार क्षेत्राचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर केला असे त्यांनी सांगितले.

पांडुरंग सहकारी साखर कारखाना वाखरी पासून 30 किलोमीटर  अंतरावर आहे. सभासदांची गैरसोय लक्षात घेता सभासदांना कारखान्याच्या सुविधा मेळाव्यात यासाठी वाखरी येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते फीत कापून कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

0000

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम महत्त्वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दिनांक 22:- वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा नाश होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अतिवृष्टी, अवेळी पडणारा पाऊस त्यातून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्याप्रमाणेच शहरी भागातही पाणी साचत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या वतीने आषाढी व कार्तिकी वारीमध्ये पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात येतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण विभागाच्या वतीने आयोजित कार्तिकी वारी पंढरीच्या दारी शिक्षणाचे धडे देईल घरोघरी या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की पर्यावरण विभागाच्या वतीने आषाढी व कार्तिकी वारीमध्ये पर्यावरण जनजागृतीचा अत्यंत चांगला उपक्रम राबविला जात असून यातून तरुण वर्ग, विद्यार्थी व समाजातील अनेक घटकापर्यंत पर्यावरण जनजागृतीचा संदेश पोहोचवला जात आहे. आपल्या संतांनी ही  पर्यावरणाचे महत्त्व विशद केलेले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पासून ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजापर्यंत सर्वांनी व्यक्ती सोबतच निसर्गाचा व पर्यावरणाचा विचार मांडलेले आहेत. निसर्गाचा घडलेला समतोल व्यवस्थित होण्यासाठी पर्यावरण जागृती सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. तसेच पर्यावरण संवर्धनाचे शिक्षण शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

प्रारंभी पर्यावरणाच्या दिंडीने हरिनामाचा गजर करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील , आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरला. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक व  पालकमंत्री यांच्या सोबत फडणवीस यांनीही फुगडी खेळली. आणि ज्ञानोबा तुकाराम , जय जय राम कृष्ण हरी असा गजर करत वारकरी भक्तांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले.

यावेळी  ह.भ.प पुर्वा काणे , संगीत नाटक अकादमी विजेत्या भारुडकार चंदाताई तिवाडी, झी मराठी फेम शाहिर देवानंद माळी हे लोककलावंत त्यांच्या पथकासह सहभागी झाले होते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, आयोजित ”कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी”या उपक्रमाची संकल्पना

 पंढरपूरच्या वारीला शतकानुशतके भागवत संप्रदायाची परंपरा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी साजरी होणारी आषाढ वारी आणि कार्तिक महिन्याच्या एकादशीला साजरी होणारी कार्तिकी वारी ही वारकरी संप्रदायासाठी आनंदाची पर्वणी असते. संपूर्ण विश्वात सातशे वर्षाहूनही अधिक काळ वारकरी संप्रदायाची ही वारी दिवसेंदिवस लोकाभिमुख चळवळ म्हणून वृध्दींगत होत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी या उपक्रमाचे आयोजन कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात किर्तन, प्रवचन, भारुड, पोवाडा अशा लोककला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.  या उपक्रमात प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळा,  विजेची बचत (सिएफएल बल्बचा वापर करा) पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन करा, प्लास्टीकचा वापर टाळा, वृक्षतोड टाळा, सेंद्रिय खताचा वापर करुन शेती करा, घरातील प्रत्येक माणसाने वर्षभरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेतीपंप चालवावा, ओला कचरा सुका कचरा  वेगळा करुन ओल्या कचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी अशा विविध संदेशांची पखरण लोक कलांच्या माध्यमातून केली जात असते.  वारीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला  लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृतीचे नविन साधन समोर आले आहे व ते यशस्वी होत आहे.

000

जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाद्वारे नागरिकांच्या कामांना मिळाली गती

मुंबई, दि. 22 : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील जनतेशी सुसंवाद कार्यक्रमात विनंती केली आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार शिक्षक भरतीच्या अंतिम निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकले आहेत. या उमेदवारांनी मंत्री श्री.केसरकर यांचे पत्र पाठवून आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या ‘शासन आपल्या दारी- जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात याबाबतची माहिती देण्यात आली. धाराशीव जिल्ह्यातील नळदुर्गच्या शुभांगी कदम यांनी मंत्री श्री.केसरकर यांना याअनुषंगाने अर्ज दिला होता. आजच्या सुसंवाद कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आजच्या कार्यक्रमात सात अर्जदारांनी आपले अर्ज सादर केले. तर 14 व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी योजनेतून निवृत्तीवेतन मंजुरीचे प्रमाणपत्र, गौण खनिज उत्खनन परवाने, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. नवीन अर्ज सादर केलेल्यांपैकी एका पालकाची मुलगी तायक्वांदो खेळ प्रकारात राष्ट्रीय पातळीवर खेळली आहे, तथापि, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना खर्च भागविणे शक्य होत नसल्याने त्यांना शासकीय योजनेतून लाभ देण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली. तर दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. एका नागरिकाच्या पुणे जिल्ह्यातील मालमत्तेच्या प्रलंबित असलेल्या मूल्यांकनाबाबत स्वत: मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी प्रश्न तातडीने मार्गी लावला. मंत्री श्री.केसरकर यांनी अन्य अर्जांवर देखील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यात ६०० संस्था होणार ‘सुमन’ संस्था – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 22 : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची ‘सुमन’ संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत. यामध्ये 538 आरोग्य संस्थांची सुमन बेसिक म्हणून, 47 आरोग्य संस्थांची बेसिक इमर्जन्सी ऑब्सेट्रीक ॲण्ड न्यू बॉर्न केअर व 15 आरोग्य संस्थांची कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर या प्रकारात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यातील आरोगय संस्थांची  सुमन संस्था म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा मानस आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुमन संस्थांची संकल्पना मूर्तरुपात आणण्यात येत आहे.  आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. राज्यात 600 संस्था सुमन संस्था म्हणून निवड करण्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमाचे (सुमन) ध्येय हे,  टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होणारे माता व बालमृत्यू, आजार संपुष्टात आणून प्रसूतीचा सकारात्मक अनुभव प्राप्त करणे आहे.  सुमन अंतर्गत सर्व लाभार्थींना उच्च दर्जाच्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, संदर्भ सेवा देणे, लाभार्थ्यांना उपलब्ध सोयी सुविधांची नियमित माहिती देण्यासाठी आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणारी प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे, स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता गट, लोकप्रतिनिधी यांची 100 टक्के माता मृत्यूच्या नोंदणीसाठी मदत घेणे व त्या मृत्यूच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे ज्ञान, कौशल्य बळकटीकरण करून त्यांच्यामध्ये लाभार्थींच्या हक्काबाबत जागृती निर्माण करणे, लाभार्थ्यांना गुणात्मक सेवा देण्यासाठी प्रवृत्त करणे, आंतरविभागीय समन्वय साधण्यासाठी कृती योजना तयार करणे ही सुमन कार्यक्रमाची वैशिष्ट्य आहे.

या कार्यक्रमांतर्गंत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गर्भवती महिला, नवजात बालकांना आवश्यक आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध संसाधनांच्या आणि सेवांच्या आधारे सेवा हमी पॅकेजनुसार सुमन बेसिक, सुमन बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर आणि सुमन कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच सुमन कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर यामध्ये जिल्हा, स्त्री रूग्णालये व संदर्भ सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. सुमन बेसिक इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर यामध्ये प्रथम संदर्भ सेवा केंद्र नसलेल्या काही उपजिल्हा रूग्णालये व ग्रामीण रूग्णालये यांचा समावेश आहे. तसेच सुमन बेसिकमध्ये राज्यस्तरावरील संस्थांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे, या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे निश्चितच राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी व्यक्त केला आहे.

 

००००

नीलेश तायडे/विसंअ/

 

पंढरपुरची वारी आपली संस्कृती, कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २२: – पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन मनापासून काम करत आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिक एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठीच्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी बांधवाच्या सोयी-सुविधांसाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

उद्या गुरूवारी (दि. २३) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कार्तिक एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथून दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून कार्तिक एकादशीच्या तयारीचा आढावा घेतला. या संवादात मंदिर समितीचे गहिनीनाथ अवसेकर महाराज यांच्यासह, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभाग तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंढरीची वारी हा आपल्या सगळ्यांच्याच आस्थेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या आपल्या वारकरी बांधवाच्या सोयी-सुविधांसाठी सर्वच यंत्रणांनी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. कार्तिक एकादशी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी विविध घटकांनी समंजसपणे पुढाकार घेतला आहे. ही चांगली बाब आहे. पंढरपूरची वारीही आपली संस्कृती आहे. ती आपण सगळ्यांनी मिळून जतन केली पाहिजे.  आपण राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बस प्रवास आणि महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे या वारीसाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी येतील. त्यांना विठुरायाचे दर्शन घेता येईल. ही एक प्रकारे सेवाच आहे. त्यामुळे आमचे प्रशासन देखील वारकऱ्यांच्या सेवेसाठी मनापासून प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. यासाठी पोलीस प्रशासनासह, विविध यंत्रणांचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी पंढरपुरातील स्वच्छता या घटकाविषयी विशेष काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, तसेच चार विश्रांती कक्षांची उभारणी, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, नदी किनाऱ्याची स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, आरोग्य शिबीरांचे आयोजन याविषयीही त्यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वारकरी आणि पंढरपूर वारीबद्दल आस्थेने पुर्वतयारीचा आढावा घेतल्याबद्दल श्री. अवसेकर महाराज यांनी आभार मानले.

००००

ताज्या बातम्या

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

0
मुंबई, दि.5 :- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या...

श्री जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस...

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल – मुख्यमंत्री...

0
ठाणे,दि.05 (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि...

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि.5 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश...

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर

0
मुंबई, दि. ५ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहोचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची...