शनिवार, ऑगस्ट 2, 2025
Home Blog

महसूल दिनानिमित्त बेळी येथे २३ घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश

जळगाव, दि. १ (जिमाका ): महसूल सप्ताहाचे औचित्य साधून बेळी (ता. जळगाव) गावात घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश  पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या माध्यमातून एकूण २३ लाभार्थ्यांना घरकुल उभारण्यासाठी शासकीय जागेच्या तुकड्यांचे अधिकृतपणे हस्तांतर करण्यात आले आहे.

सदर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण) अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून, त्यांच्याकडे स्वतःची मालकीची किंवा घरकुल उभारणीसाठी पात्र जागा उपलब्ध नव्हती. हे सर्व लाभार्थी अनेक वर्षांपासून गावातील शासकीय जागांवर अतिक्रमित स्वरूपात वास्तव्यास होते. शासनाच्या संबंधित धोरणांनुसार आणि सामाजिक न्याय लक्षात घेता, अशा लाभार्थ्यांना नियमबद्धपणे शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात आली.

ग्रामविकास विभागाच्या दिनांक 16 फेब्रुवारी 2018  रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘शक्ती प्रदत्त समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारसीनुसार प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आज अधिकृत आदेश लाभार्थ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना अधिकृत घरकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध झाली असून, त्यांच्या निवासाच्या स्थैर्याचा मार्ग सुकर झाला आहे. हा निर्णय म्हणजे शासनाच्या गोरगरिबांप्रती असलेल्या बांधिलकीचा उत्तम उदाहरण ठरला आहे.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत, सरपंच तुषार दिगंबर चौधरी, उपसरपंच जयश्री तुषार चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक – मंत्री आदिती तटकरे

रायगड दि. ०१ (जिमाका): महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.  जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन हॉल येथे आयोजित महसूल दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री तटकरे म्हणाल्या की, महसूल विभाग हा शासनचा कणा असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका कणखरपणे मांडून लोकाभिमुख काम करुन लोकांच्या जवळ जाणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाचे नवनवीन उपक्रम येत असून हे उपक्रम योग्यरितीने राबविण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य व जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे. महसूल विभाग जनसामान्यांशी संबंधित विभाग आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा गौरव करणे यासाठी महसूल दिन साजरा केला जातो. कर्मचाऱ्यांच्या ज्या हक्काच्या गोष्टी आहेत ते त्यांना देणे व काही अडी अडचणी सोडविल्या जातील असेही त्या यावेळी म्हणाल्या.  शासनाने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी शासन आपल्या दारी, महाराजस्व अभियान असे अनेक उपक्रम राबविले आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे अभियान राबविले जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणा जिल्ह्यात सक्षम झाली पाहिजे याकरिता प्रत्येक कार्यालयात आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली पाहिले, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

मंत्री भरत गोगावले म्हणाले की, शासन हे गोरगरीब जनतेचे आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला ज्या बाबी आवश्यक आहे ते देणे आपले कर्तव्य आहे ही भावना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनाशी ठेवून काम केले पाहिजे. याकरिता सर्वांनी लोकांच्या हितासाठी काम करावे, अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. महसूल विभागाने हाती घेतलेली कामे अशीच पुढे सुरु ठेवावीत.  नागरिकांना आवश्यक असलेले दाखले, इतर दाखले देण्याचे काम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेत करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, महसूल विभागामार्फत दि. 1 ऑगस्ट पासून ते दि.7 ऑगस्ट पर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.  या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच  विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहेत.  महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी महसूल दिनाबरोबरच दि.1 ऑगस्ट पासून ते दि.7 ऑगस्टपर्यंत या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

या महसूल पंधरवडानिमित्त जिल्ह्यात या कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. 2 ऑगस्ट: अतिक्रमण नियमानुकूल करणार 31 डिसेंबर 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार आहेत.  दि.3 ऑगस्ट: शेत रस्त्यांचे वाद मिटवणार ‘पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत पाणंद आणि शिवपांदण रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर दोन अपीलनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता मिळेल आणि त्यांना क्रमांक दिले जातील. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण होईल, आणि झाडे तोडल्यास वनविभागाच्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. दि.4 ऑगस्ट: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन होऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. आधार कार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, अधिवास, जात, उत्पन्न आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप होईल. वर्षातून चार वेळा अशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. दि.5 ऑगस्ट: डिबिटी अडचणी दूर करणार, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत डिबिटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तलाठी घरोघरी भेटी देतील आणि आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. दि.6 ऑगस्ट: शर्तभंग जमिनी परत घेणार-शासकीय जमिनींच्या शर्तभंग प्रकरणांचे सर्वेक्षण होऊन अतिक्रमण किंवा शर्तभंग आढळल्यास त्या जमिनी शासनाकडे परत घेतल्या जाणार आहेत. दि.7 ऑगस्ट: एम सँड धोरण आणि सांगता समारंभ होणार आहे.

यावेळी स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची सनद वाटप, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड, उत्कृष्ट कर्मचारी, महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

आभार अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महसूल विभागातील सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळअधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूल विभाग शासनाचा आधारस्तंभ – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

  • महसूल दिनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर
  • उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
  • लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व अनुदानाचे वाटप

बुलढाणा, दि. १ (जिमाका): महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचा गौरव करत, जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी महसूल दिनानिमित्त विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढवले. महसूल विभाग हा शासनाचा कणा असून, जनतेला पारदर्शक व तत्पर सेवा देण्यासाठी या विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले.

महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे समस्या जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश, पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित महसूल दिन कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर तांबे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, डॉ. जयश्री ठाकरे, समाधान गायकवाड, उपमुख कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल व विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना महसूल विभागाच्या कार्याची सखोल प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, “शासन आणि जनतेच्या दरम्यान विश्वासाचे सेतू बांधण्याचे काम महसूल विभाग करत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे हक्क, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत, विविध शासकीय योजना आणि नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित निर्णय या विभागाच्या माध्यमातून घेतले जातात. त्यामुळे शासकीय कामामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक परिणामकारक बनवण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. पालकमंत्र्यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचे कौतुक करत, पारदर्शकता, जबाबदारी आणि तत्परता या गुणांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच शासकीय कामकाज करताना पालकमंत्री म्हणून मी, सदैव अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले की, महसूल विभाग विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असून शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवले जात आहेत. दि. ४ ते ६ ऑगस्ट या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ उपाय केले जातील, असे त्यांनी सांगितले. नागरिकांचे, शेतकऱ्यांचे कामे प्राधान्याने, पारदर्शक व गतिमानतेने करा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी महसूल दिनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘ई महसूल प्रणाली माहिती पुस्तिका’चे ऑनलाईन प्रकाशन पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.  यावेळी वनहक्क पट्टे, नझूल भूखंड वाटप, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत लाभार्थ्यांना सातबारा वितरण आदींचे वाटप करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी प्रास्ताविकात महसूल दिन व सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसिलदार वृषाली केसकर यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी केले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसिलदार भुषण पाटील, तहसिलदार वृषाली केसकर, नायब तहसिलदार एस.एस.वट्टे, सहा.म.अधिकारी दिपक भाष्कर, महसूल सहायक जे.एन.वाघ, मंडळ अधिकारी संजय दिनकर जोशी, मंडळ अधिकारी शिवाजी भरगडे,ग्राम महसुल अधिकारी अमोल हिरालाल राठोड, वाहन चालक अशोक देवकर,शिपाई रामेश्वर शिंदे,महसूल सेवक तौफिकखान अब्दुलखान पठाण,पोलीस पाटील योगेश मधुकर पाटील, तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी म्हणून तहसिलदार संतोष काकडे, सहा.म.अधिकारी पल्लवी राठोड, मंडळ अधिकारी किशोर पाटील, महसूल सेवक आर.एन.अडकणे यांचासह भूमी अभिलेख विभाग, सह निंबधक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे  सत्कार करण्यात आला.

०००

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या – मंत्री मकरंद जाधव पाटील

बुलढाणा,दि. ०१ (जिमाका) : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि मेहकरसह इतर तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे, विहिरींचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज अतिवृष्टीग्रस्त गावांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासोबत आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, तहसीलदार भूषण पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री जाधव पाटील यांनी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुडपाळ, सिंदखेडराजा तालुक्यातील बिंबिखेळ आणि मेहकर तालुक्यातील वडगाव तेजन, डोणगांव या गावांना भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीबाबतची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामे करून स्थानिक स्तरावर मदत देण्याचे आणि शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळेल, यांची दक्षता प्रशासनाने घ्यावी.

दरम्यान, पालकमंत्र्यांनी लोणार सरोवराचीही पाहणी करून पर्यटकांसाठी सुविधा वाढवण्यासंबंधी सूचना दिल्या आणि पर्यटनविकासासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.

०००

नैसर्गिक आपत्तीसंदर्भात तत्काळ मदत करा – मंत्री मकरंद जाधव पाटील

बुलढाणा, दि. १ (जिमाका): जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या  नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पोहोचवण्याचे व पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

पालकमंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले, “नैसर्गिक आपत्ती ही अनपेक्षित असली, तरी नागरिकांवर त्याचे परिणाम गंभीर असतात. अशावेळी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने प्रतिसाद द्यावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना कुठलाही अडथळा न होता शासकीय मदत तातडीने पोहोचली पाहिजे. नुकसानीचे वर्गीकरण करुन पंचनाम्याचे काम झपाट्याने पूर्ण करा. जिल्हाधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रातील नुकसानीचे मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावावी. तसेच शासन स्तरावरील प्रस्ताव सादर करावा, जेणेकरून अनुदान व भरपाई तत्काळ मंजूर होऊ शकेल.

बैठकीत पूरस्थितीग्रस्त, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली शेती, घरांचे नुकसान, रस्ते वाहतूक तसेच वीज आणि पाणी पुरवठा या बाबींची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच एप्रिल ते जून 2025 या कालावधीत अवेळी पाऊस, गारपीठ व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे मदत येत्या आठ दिवसात लाभार्थ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री जाधव पाटील यांनी यावेळी दिले.

०००

‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली, दि. ०१ : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 ची घोषणा केली. यामध्ये सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, आशिष बेंडे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आत्मपॅम्फलेट’ तसेच ‘नाळ २’ चित्रपटाला स्वर्ण कमळ पुरस्कार घोषित झाला आहे.

सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जिप्सी या चित्रपटातील बाल कलाकार कबीर खंदारे तर त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना संयुक्तपणे नाळ २ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

यावेळी ४० फीचर चित्रपट पुरस्कार, १५ नॉन-फीचर पुरस्कार आणि १ चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. फीचर चित्रपट पुरस्कार निवडीच्या ज्युरीचे नेतृत्व आशुतोष गोवारीकर, नॉन-फीचर ज्युरीचे नेतृत्व पी. शेषाद्री आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन ज्युरीचे नेतृत्व गोपाळकृष्ण पै यांनी केले. २०२३ वर्षामधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फीचर, नॉन फीचर आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन अशा तीन विभागांमध्ये जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार लवकरच प्रदान केले जाणार आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार

हिंदी चित्रपट १२ वी फेलला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ’१२ वी फेल’साठी विक्रांत मेस्सी यांना संयुक्तपणे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार जाहीर झाला. राणी मुखर्जीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.

‘आत्मपॅम्फलेटसाठी आशिष भेंडे यांना पुरस्कार

दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा चित्रपट पुरस्कार दिग्दर्शक आशिष भेंडे यांना आत्मपॅम्फलेट या मराठी चित्रपटासाठी जाहीर करण्यात आला.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – कटहल- अ जॅकफ्रुट मिसरी, सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुदिप्तो सेन, द केरला स्टोरी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी, उलोझुक्कु, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजयराघवन आणि मुथुपेट्टई सोमू भास्कर, राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट – सॅम बहादुर या चित्रपटास पुरस्कार घोषित करण्यात आला.

०००

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ०१: कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र, पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यमातून तयार होणारा विकास आरखडा महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे प्रमुख पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’ला गती देण्याचे काम नीती आयोग करणार आहे. याबाबतचा आराखडा महाराष्ट्र शासन पीएमआरडीए करणार असून त्याला पुणे इंटरनॅशनल सेंटर मदत करणार आहे. नियोजित पद्धतीने विकास केल्यास जीवनशैलीतील सुलभताही साध्य करता येऊ शकते. आज ६५ टक्के जीडीपी शहरांच्या आजूबाजूच्या परिसरातून येतो. योग्य नियोजनातून ही वाढ गतिमान करता येऊ शकते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तयार केल्याने चांगली परिसंस्था निर्माण झाली. मात्र यापेक्षाही चांगल्या प्रकारची औद्योगिक विकासाची परिसंस्था तयार केल्यास त्याचा अधिक मोठा परिणाम होईल. आर्थिक वाढीतूनच चांगले सामाजिक वातावरण निर्माण होऊ शकते, असेही मत त्यांनी मांडले.

उद्योगांसाठी मनुष्यबळ विकसीत करण्यावर भर

केंद्र सरकारने विदेशातील विद्यापीठांना त्यांचे भारतात कॅम्पस उभे करण्यासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ घेत राज्य शासनाने संघटित पद्धतीने नवी मुंबईत ‘एड्युसिटी’ तयार करण्याचा निर्णय घेतला. येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यशासनाने युनिकॉर्न स्टार्टअपला संधी दिली. आता या ठिकाणी जगातील 5 नामांकित विद्यापीठांनी आपल्यासोबत सामंजस्य करार केला असून १० विद्यापीठे येथे येतील. पुढील 4-5 वर्षात किमान ५० हजार विद्यार्थी येथे शिकतील. त्यातून केवळ जीएसटीचे 2 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. त्याहून महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात उद्योगांसाठीचे मनुष्यबळ निर्माण होईल. या विद्यापीठांमुळे एआयवर आधारित नवी क्रांती येईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी जागतिक उद्योग या ठिकाणी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

ग्रोथ हबच्या माध्यमातून पुण्याचे चित्र बदलणार

पुणे हे उत्पादन केंद्र आहे, त्यासोबत हे शहर पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून गणले जाते. उत्कृष्ट शैक्षणिक संस्था असल्याने इथे चांगले मनुष्यबळ तयार होते. कुशल मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी मोठी गुंतवणूक होते. एआयवर आधारित प्रगती साधण्यासाठी हे मनुष्यबळ महत्त्वाचे आहे. आज एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात बदल घडवत आहे. त्याचा लाभ घेऊन जीडीपीच्या वाढीला अधिक गती देता येऊ शकते. पुण्यात ज्या क्षेत्रांची क्षमता आहे त्या क्षेत्रांचे बदलते स्वरुप लक्षात घेवून नियोजन केले तर इथले दरडोई उत्पन्न वाढविता येईल. या प्रत्येक क्षेत्रासाठी आवश्यक धोरण, धोरणातील बदल, महत्वाचे क्षेत्र, त्यासाठीचा दृष्टीकोन, महत्वाच्या बाबी, पायाभूत सुविधा आदींचा विचार ग्रोथ हबच्या माध्यमातून होणार आहे. या माध्यमातून शहरासाठी महत्वाचा दस्तावेज तयार करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे जिल्ह्यात होणाऱ्या नवीन विमानतळ आणि रिंग रोड या केवळ दोन बाबींमुळे ३ लाख कोटी रुपयांचा सकारात्मक परिणाम पुण्याच्या अर्थव्यवस्थेवर पहायला मिळेल. आता आपल्याला केवळ इतर शहरांशी नव्हे तर जगाशी स्पर्धा करून ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करावी लागणार आहे. असे करताना शासन यंत्रणेतील अवरोध दूर करणे आवश्यक असून त्यावर भर देण्यात येत आहे.  त्यासाठी शासन यंत्रणेतील सर्व विभागांना आपला सहभाग द्यावा लागणार असून धोरणे, धोरणांची अंमलबजावणी करण्याची मानसिकता बदलावी लागणार आहे. औद्योगिक क्षेत्रात त्रास देणारे घटक औद्योगिक क्षेत्राला, गुंतवणूकदारांना स्पर्धात्मक होऊ देत नाहीत या बाबीचाही आपल्याला विचार करावा लागेल.

शहराच्या विकासासाठी योग्य नियोजन आवश्यक- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरासाठी हा दिवस विकासाचे नवे पर्व घेऊन येणारा असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. परंपरा, पर्यावरण, प्रगती आणि पुणे हे चारही शब्द समानार्थी राहतील अशी पुण्याची वाटचाल राहील. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू आहे. आर्थिक विकास करताना काटेकोर नियोजन देखील आवश्यक असून शहराच्या विकासाचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी नीती आयोग राज्य शासनाला सहकार्य करीत आहे. या नियोजनाद्वारे शहरातील क्षमतांचा विकासासाठी उपयोग करून घेण्यात येणार आहे. ग्रोथ हब ही संकल्पना त्यासाठीच आहे. केंद्र सरकारने १४ ग्रोथ हबची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. यात मुंबईसोबत पुण्याचाही समावेश होत आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, पुणे तंत्रज्ञान, उद्योग, उत्पादन, शिक्षण, आरोग्य सुविधा या क्षेत्रात आघाडीवर असून याबरोबरच पर्यटन क्षेत्रातही प्रचंड क्षमता आहे. म्हणून महानगर क्षेत्रात ग्रोथ हबची संकल्पना निश्चितपणे यशस्वी होईल. शहरांसोबत ग्रामीण भागाचा विकासाही होणे गरजेचे आहे. ग्रोथ हबच्या माध्यमातून शहराच्या विकासाचा लाभ ग्रामीण भागालाही होईल. विकासासाठी रस्त्यांची जोडणी आणि पायाभूत सुविधा निर्मिती महत्त्वाची आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मुळे ही दोन्ही शहरे आता जवळपास जोडशहरे झाली आहेत. पुण्यात माहिती तंत्रज्ञान, ईव्ही, सेमीकंडक्टर, एआय उद्योग आहेत. तसेच येथील शैक्षणिक सुविधांमुळे भारताचे कुशल मनुष्यबळ पुरवणारे केंद्र करण्याची क्षमता पुण्यात आहे आहे. पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब हे पुणे परिसराला आंतरराष्ट्रीय शहर बनू शकेल असा विश्वासही, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

सुब्रह्मण्यम यांनी सादरीकरणाद्वारे ग्रोथ हबची माहिती दिली. देशाची अर्थव्यवस्था सध्याच्या ३ ट्रिलियन डॉलर वरुन ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी शहराच्या सुनियोजित विकासाची गरज आहे. ग्रोथ हबची सुरुवात मुंबई महानगरासह ४ शहरापासून झाली. ग्रोथ हबच्या माध्यमातून शहराच्या परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबत तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येतो. भविष्यातील विकासाच्या क्षेत्रातील संधीचा अभ्यास करून भविष्यातील नियोजन करण्यात येते. त्यासाठी आवश्यक सुविधा निर्मितीवर भर देण्यात येतो, यासाठी सुयोग्य आराखडा तयार करण्यात येतो.

ग्रोथ हबच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सध्याच्या 140 अब्ज डॉलरवरून येत्या पाच वर्षात दुप्पट म्हणजेच 300 अब्ज डॉलरची करण्याचे नियोजन आहे. पुण्याचीही सध्याची 58 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था दुप्पट करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने पुढील ४-५ महिन्यात असा आराखडा तयार करण्यात येईल. पुण्यात उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी संशोधन, शैक्षणिक सुविधा, कृषी आधारित उद्योग, छोटे आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्र अशी पुण्याची शक्तीस्थळे आहेत. पुण्याच्या आर्थिक वाढीचा दर १० टक्क्यापर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. हे शहर जागतिक शहर बनावे यादृष्टीने चांगल्या आराखड्याद्वारे इथली अर्थव्यवस्था 600 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य असले पाहिजे. भविष्यात पुणे जगातील अग्रणी शहर बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देवरा यांनी प्रस्ताविकात सांगितले, एमएमआर ग्रोथ हबनंतर पुणे महानगर क्षेत्र ग्रोथ हबची सुरुवात करण्यात येत आहे. अशाच प्रकारे नंतरच्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे ग्रोथ हबची सुरुवात करण्यात येणार आहे. राज्यात असे एकूण पाच ग्रोथ हब उभारण्यात येतील. पुण्यात मोठ्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून कुशल मनुष्यबळाच्या आधारे निर्यात वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. स्थानिक संस्था, उद्योग आणि संघटनांनाही आराखडा बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरशी सामंजस्य करार करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र शासन नीती आयोग आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्यात पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हबच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, राहूल कुल, सिद्धार्थ शिरोळे, शंकर जगताप, बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदींसह उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर, पीएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

‘डेव्हलपिंग सिटी रिजन्स ॲज ग्रोथ हब’ उपक्रमाविषयी:

नागरी प्रदेश हे गतिमान विकासाचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने नीती आयोगाने २०२३ मध्ये ‘डेव्हलपिंग सिटी रिजन्स ॲज ग्रोथ हब’ हा उपक्रम हाती घेतला. प्रायोगिक स्वरूपात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (एमएमआर), सुरत वाराणसी आणि विशाखापट्टणम मध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आता पुणे महानगर प्रदेश क्षेत्राचाही (पीएमआर) यात समावेश करण्यात आला आहे.

आर्थिक गतिमानता, जीवन शैलीतील सुधारणा, आणि शाश्वत कार्यपद्धतींना प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिक विकास आराखड्याचा (इकॉनॉमिक मास्टर प्लॅन) इंडिया@२०४७ शी समन्वय साधून एकात्मिक, भविष्यवेधी नागरी आराखड्याच्या दिशेने पाऊल टाकणारा हा देशातील पहिला महानगर प्रदेश आराखडा असणार आहे.

०००

राज्यातील शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर

मुंबई, दि. ०१ : राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेमधील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. या मध्यान्ह भोजनातून होणाऱ्या अन्न विषबाधेच्या घटनांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सविस्तर मानक कार्यपद्धती जारी केली आहे.

या योजनेत विद्यार्थ्यांना पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळावा यासाठी धान्य साठवण, स्वयंपाक, आहार वितरण आणि स्वच्छतेबाबत काटेकोर नियमावली निश्चित करण्यात आली आहे. धान्य व इतर घटकांची गुणवत्ता तपासणी, स्वयंपाकघराची स्वच्छता, आहाराची चव चाखणे, नोंदी ठेवणे, पाण्याची शुद्धता सुनिश्चित करणे, तसेच आहार नमुना २४ तास जतन करणे यांसारख्या उपाययोजना अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

मानक कार्यपद्धतीमध्ये शाळा व्यवस्थापन समित्या, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, शिक्षणाधिकारी, आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासन यांच्या जबाबदाऱ्यांचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. अन्न विषबाधेची घटना घडल्यास त्वरित वैद्यकीय मदत, नमुना तपासणी आणि दोषींवर कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.

ही कार्यपद्धती तत्काळ अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आले असून, उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

राजधानीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन

नवी दिल्ली, दि. १ : “संघर्ष हा माझा धर्म आहे” या विचारांचे प्रतिक, समाजक्रांतीचे प्रणेते आणि थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी अण्णा भाऊ साठे विनम्र अभिवादन केले.

महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलप्ते यांनी यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि श्रमिकांसाठी केलेल्या योगदानाचा परिचय करून दिला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

स्वातंत्र्यदिनासंदर्भात  संकल्पना  पाठविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली दि. ०१ :  स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या एक्स पोस्टवरील  संदेशात पंतप्रधान यांनी म्हटले आहे की, या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे!

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या आवडतील यासाठी नागरिकांनी MyGov आणि NaMo App वरील खुल्या मंचावर आपले विचार व्यक्त करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी https://www.mygov.in/group-issue/let-your-ideas-and-suggestions-be-part-pm-modis-independence-day-speech-2025/ या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

०००

ताज्या बातम्या

महसूल दिनानिमित्त बेळी येथे २३ घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश

0
जळगाव, दि. १ (जिमाका ): महसूल सप्ताहाचे औचित्य साधून बेळी (ता. जळगाव) गावात घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश  पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक – मंत्री आदिती तटकरे

0
रायगड दि. ०१ (जिमाका): महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री...

महसूल विभाग शासनाचा आधारस्तंभ – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

0
महसूल दिनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व अनुदानाचे वाटप बुलढाणा, दि. १ (जिमाका): महसूल विभागाच्या...

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या – मंत्री मकरंद जाधव पाटील

0
बुलढाणा,दि. ०१ (जिमाका) : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि मेहकरसह इतर तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे,...

नैसर्गिक आपत्तीसंदर्भात तत्काळ मदत करा – मंत्री मकरंद जाधव पाटील

0
बुलढाणा, दि. १ (जिमाका): जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज...