सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 961

गडचिरोली जिल्ह्याची दारुबंदी उठवली जाणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ,दि.6 : जिल्हा दारुमुक्ती  संघटनेच्या वतीने जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मोहफुलापासुन दारु निर्मितीचा कारखाना होणार नाही असे आश्वासन दिल्याबद्दल आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गडचिरोली जिल्ह्याची दारुबंदी उठवली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिली.

यावेळी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग, मेंढा येथील ग्राम स्वराज्याचे  प्रमुख आदिवासी नेते देवाजी तोफा, माजी आमदार हिरामण वरखेडे, कुरखेडा  येथील शुभदा देशमुख, डॉ.सतीश गुगलवार, वडसा येथील सुर्यप्रकाश गभणे, मुक्तीपदचे संतोष सावळकर, विजय वरखडे, सुबोध दादा तसेच बारा तालुक्यातील दारुमुक्ती संदर्भातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यावळी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यात ३० वर्षांपासून दारुबंदी आहे. राज्य टास्क फोर्स अंतर्गत दारु व तंबाखू मुक्तीसाठी ‘मुक्तीपथ’ हा जिल्हाव्यापी प्रकल्प सुरु झाला आहे. याअंतर्गत दारु व तंबाखू बंदीचे प्रमाण बरेच कमी झाले आहेत. या कारखान्याचा आदेश रद्द करावा यासाठी जिल्हयातील 842 गाव , 12 शहरातील 117 वार्ड, 10 आदिवासी इलाका सभा व तालुका महासंघ तसेच 53 महाविद्यालयातील युवा अशा एकूण 57 हजार 896 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले 1 हजार  31 प्रस्ताव या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी संजय मीना उपस्थित होते. जिल्हा दारुमुक्ती संघटनेच्या वतीने डॉ.अभय बंग, उपाध्यक्ष देवाजी तोफा यांनी दारुबंदी संदर्भात मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

०००

अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,दि.६ : देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) चे १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या अटल सेतूची ठिकठिकाणी थांबून पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय.एस. चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (एमएमआरडीए) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे,  नवी मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अटल सेतू नवी मुंबई, रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येणार आहेत. त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे. हा मार्ग शिवडी येथून सुरु होवून समुद्रमार्गे चिर्ले येथील न्हावा शेवा येथ इतर मार्गांना जोडला जातो. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवीमुंबईत अवघ्या 20 मिनिटात जाता येणार आहे. प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत. हा सेतू मार्ग मुंबई- गोवा महामार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचाही विकास होणार आहे. युवकांच्या रोजगारासाठी ५०० स्किल कौशल्य विकास केंद्रे सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत, आणखी विकासात्मक निर्णय घेत आहे.

परिसर सुशोभिकरण, वृक्षारोपणाच्या सूचना

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिवडी ते चिर्ले या अटल सेतू पुलाची पाहणी करतानाच ठिकठिकाणी उतरुन तेथील सुविधांची माहिती घेत त्याअनुषंगांने विविध सूचना एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिल्या. अटल सेतूची नियमित स्वच्छता राखण्याबरोबरच परिसर सुशोभिकरण आणि वृक्षारोपण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सेतूवरील वाहतूक नियंत्रण केंद्राला मुख्यमंत्र्यांची भेट

चिर्ले टोल प्लाझाजवळील वाहतूक नियंत्रण केंद्राला (कमांड सेंटर) मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. अटल सेतूवरील वाहतुकीचे नियंत्रण आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे कार्य आदींचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासह एमएमआरडीए अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अटल सेतूची पाहणी केल्यानंतर चिर्ले येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

अटल सेतूविषयी थोडक्यात

➡️ मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) हा अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना

➡️५०० बोइंग विमाने व १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर.

➡️शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू एकूण २२ किमी लांबीचा असून त्यातील १६.५० किमी भाग समुद्रामध्ये तर उर्वरित ५.५० किमी भाग जमिनीवर.

➡️भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील 12 व्या क्रमांकाचा सागरी सेतू. सागरी सेतूसाठी 18 हजार कोटी रुपयांचा खर्च.

➡️सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा.

➡️मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाले.

➡️महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला.

०००

मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध-मुख्यमंत्री

पुणे, दि.६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, ज्येष्ठ नेते तथा नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, देशात नाट्य कलेला २ हजार वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकाने झाल्यानंतर मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत. अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली.

नाटक रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आशय, विषय, सादरीकरण, नेपथ्य, संगीत याची चाकोरी मोडण्याची गरज असते, मराठी रंगभूमीने ते केल्याने या रंगभूमीचा उत्कर्ष होत आहे. आज समाजमाध्यमांच्या काळातही प्रेक्षक नाटकांना गर्दी करतात. व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हजारो कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांनी यासाठी योगदान दिले आहे. गेल्या १०० वर्षात सुवर्णकाळ अनुभवताना अनेक अडचणींवर मात करीत रंगभूमी पुढे जात आहे. म्हणूनच या रंगभूमीचा आनंद सोहळा दिमाखात साजरा होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न

मराठी रंगभूमीच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, १०० वे नाट्य संमेलन असल्याने नाट्य संमेलनासाठी ९ कोटी ८३ लाख आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी देण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृहे उभारण्यात येणार आहेत, मात्र हे करताना नाट्य कलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल.

मराठी नाट्य परिषदेसाठी मुंबईत भूखंड देण्याबाबत सहकार्य करण्यात येईल. पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या नाट्यगृहात पूर्वीप्रमाणे विजेचा खर्च आकारला जाईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराबाबतही शासन सकारात्मक आहे. नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करताना मराठी रंगभूमीसाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

मराठी नाटकाने मनोरंजन आणि प्रबोधनाचे कार्य केले- खासदार शरद पवार

चिंचवडच्या पावन भूमीत नाट्य संमेलन होत असल्याबाबत आनंद व्यक्त करून ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले की, सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम आहे. नाट्याचा मुख्य उद्देश मनोरंजन असल्याचे भरतमुनी यांनी म्हटले आहे, मात्र नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन आणि ज्ञानदानाचे कार्य उत्तमरीतीने होते. रंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकप्रबोधनाचे कार्य होत आहे. मराठी नाट्यसृष्टीद्वारे नवे विषय मांडले जात आहेत. नाट्य रसिकांना नाटकांकडे आकर्षित करणारी नाटके रंगभूमीवर यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने नाट्यरसिकांना ही मोठी पर्वणी आहे, असेही श्री.पवार म्हणाले.

उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले की, पिंपरी चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या नाट्य संमेलनानंतर कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी  बैठकीचे आयोजन व्हावे आणि ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी शासनाने निधी द्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासनातर्फे नाट्य संमेलनासाठी प्राप्त निधीचा उपयोग कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांना मानधन आणि आरोग्य विमा काढण्यासाठी करण्यात येईल, असेही श्री. सामंत म्हणाले.

नाट्य प्रशिक्षणाद्वारे रंगभूमीचा विकास-जब्बार पटेल

नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल म्हणाले की, मराठी रंगभूमी प्रगल्भ आणि विविधतेने नटलेली आहे. नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून  रंगभूमीचा अधिक विकास होईल. देशपातळीवरील उत्तम कलाकारांच्या माध्यमातून विद्यापीठातून नाट्यकलेचे प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जगात सुंदरता निर्माण करण्यासाठी कलावंतांनी एकत्रित प्रयत्न करावा, असे मावळते संमेलनाध्यक्ष श्री. गज्वी म्हणाले.

प्रशांत दामले यांनी देखील यावेळी विचार व्यक्त केले. नाट्य संमेलन हे कलावंतांसाठी दिवाळी असून एकत्रित विचार करण्याची उत्तम जागा आहे, असे श्री. दामले म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त अजित भुरे यांनी केले. श्री.भोईर यांनी स्वागतपर भाषणात नाट्य संमेलनाच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले.

यावेळी वामन पंडित संपादीत ‘रंगवाचा’ या नियतकालिकाचे आणि १०० मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘नांदी’ या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते, तर प्रेमानंद गज्वी यांचे आत्मकथन ‘रंग निरंतर’चे प्रकाशन ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन आणि घंटेचे पूजन करून १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ नेते तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते रंगमंचाच्या पडद्याचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त, कृष्णकुमार गोयल, पी.डी. पाटील, नाट्य कलावंत आणि नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची; ही मोहीम अखंडितपणे सुरु ठेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६: स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी महास्वच्छता अभियानाला देखील प्रारंभ झाला आहे. शहरांमधील सर्वंकष स्वच्छतेवर भर देण्यासाठी यंत्रणा अहोरात्र काम करत असून ही स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी मागील ३ डिसेंबरपासून शहरात ‘संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग)’ मोहीम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. सलग पाच आठवड्यांपासून मुख्यमंत्री श्री. शिंदे हे स्वत: सुट्टीच्या दिवशी पहाटेपासून स्वच्छता मोहिमेत (डीप क्लिनिंग) सहभागी होवून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवित आहेत.

आज कुलाबा येथील आयएनएस शिक्रा येथून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. याठिकाणी कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मनपाचे आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त संजोग कबरे, डॉ. संगीता हसनाळे, उल्हास महाले, प्रमुख अभियंता मनिशकुमार पटेल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्र्यांनी आयएनएस शिक्रा परिसरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधून रस्त्यावर माती, कचरा राहणार नाही, साचलेल्या कचऱ्याचे विलगीकरण याविषयी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. शिवाय येथील मुंबई पब्लिक स्कूल, कुलाबा इंग्लिशचे विद्यार्थी, शिक्षक यांनाही स्वच्छता अभियानविषयी माहिती देत मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले.

डीप क्लिनिंग ही मोहीम मुंबईपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर करण्यात आली आहे. राज्यातही मोठ्या शहरात स्वच्छता मोहीम नियमित सुरू असल्याने हवेतील प्रदूषण कमी राहाण्यास मदत होणार आहे. यामुळे स्वच्छता करणाऱ्या खऱ्या हिरोंकडे शासनाचे लक्ष राहील, त्यांच्या समस्या, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

पूर्व मुक्त मार्गाच्या (फ्री वे)  सुरूवातीला आणि या मार्गावरील वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीजवळ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याठिकाणीही मुख्यमंत्र्यांनी रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी मार्ग, भिंती पाण्याने साफ केल्या. स्वच्छता करताना पाण्यातून वाहून जाणारी माती, कचऱ्याची साफसफाई स्वच्छता कर्मचारी करीत होते. कधी हातात पाण्याचा पाईप तर कधी झाडू घेवून स्वत: मुख्यमंत्री स्वच्छता करीत असल्याचे पाहून अधिकारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रेरणा मिळत होती.

माध्यम प्रतिनिधींना दिल्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा 6 जानेवारी हा जन्मदिवस, हा  पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकार, कॅमेरामन यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पूर्व द्रूतगती मार्गावरील वाहतूक पोलीस चौकीजवळही मुख्यमंत्री श्री. शिंदे, मंत्री श्री. लोढा यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आमदार यामिनी जाधव यांच्यासह मनपाचे अधिकारी सामील झाले होते.

०००

विकसित भारत संकल्प यात्रेमुळे केंद्र पुरस्कृत योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

विकसित भारत संकल्प यात्रेची ग्रामीण स्तरावरील सांगता

सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली. केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे याबाबतचे प्रबोधन जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून 11 व्हॅनव्दारे करण्यात आले. या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.

         कवलापूर येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या ग्रामीण स्तरीय सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खासदार संजय पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कवलापूरच्या सरपंचा उज्ज्वला गुंडे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, भानुदास पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कवलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

         पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्ह्यात दिनांक २४ नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली. तेव्हापासून आजअखेर ११ व्हॅनद्वारे जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींमध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या कालावधीत जवळपास दीड लाख नागरिक या यात्रेत सहभागी झाले. तर जवळपास ३ हजार लाभार्थींना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली गेली, वंचित लाभार्थींची नोंदणी केली गेली व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला गेला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

            या यात्रेंतर्गत जिल्ह्यात आयुष्मान कार्डच्या वाटपामध्ये भरीव कामगिरी झाली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आयुष्मान कार्ड मिळाल्यामुळे 5 लाख रूपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून कवलापूरच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही कवलापूरच्या विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

         खासदार संजय पाटील म्हणाले, सर्व सामान्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचवली गेली. लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला गेला. यामध्ये जवळपास ४ लाख आयुष्मान कार्ड वाटप केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

विविध प्रमाणपत्र वाटप

         यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये अटल बांधकाम कामगार घरकुल योजना, मोदी आवास योजना, माझी कन्या भाग्यश्री, दिव्यांग कल्याण योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्ड, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना आदि योजनांच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची चित्रफीत दाखवण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व रोपट्यास पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

स्टॉलना उत्स्फूर्त प्रतिसाद

         यावेळी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्यासह मान्यवरानी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये आयुष्मान भारत, रोजगार हमी योजना, महा आवास योजना, महसूल विभाग चावडी, पुरवठा विभाग, महिला व बालविकास विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जलजीवन मिशन, पोस्ट विभाग, जिल्हा मध्यवर्ती बँक या शासकीय विभागासह महिला बचत गटांच्या स्टॉलना उपस्थित लाभार्थीनी भेट देऊन माहिती घेतली.

शोभा यात्रा

            मान्यवरांची शोभा यात्रा स्मार्ट पीएचसी ते ग्रामपंचायत कार्यालय पटांगण ते कार्यक्रमस्थळ अशी काढण्यात आली.

         स्वागत सरपंच उज्ज्वला गुंडे यांनी केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले. लाभार्थीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यात्रा कालावधीत सहकार्य केलेल्याप्रती ऋणनिर्देश व्यक्त केले. भानुदास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन

            प्रारंभी आयुष्मान आरोग्य मंदिर (स्मार्ट पीएचसी) कवलापूरचे उद्गाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट पीएचसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कवलापूर येथे अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करणे योजनेंतर्गंत रस्ते कामाचे उद्घाटनही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

00000

पालकमंत्र्यांच्या हस्ते १७९ गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप व ५२ गुणवंतांचा सत्कार; पाच विद्यार्थ्यांना ५ हजारांची आर्थिक मदत

यवतमाळ, दि. ५ (जिमाका) :  पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस तालुक्यातील दहावी व बारावीत शिक्षण घेणाऱ्या १७९ गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप व पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रातील ५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दिग्रस येथील मातोश्री विमालदेवी चिरडे मंगल कार्यालयात या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय बंग तर मार्गदर्शक प्रा. सुधीर पाठक होते. यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, राजकुमार वानखेडे, उत्तम ठवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, गोरगरीब गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करीत आहोत. ही शिष्यवृत्ती देताना पारदर्शकता असावी यासाठी समिती नेमून त्यात पत्रकारांचा समावेश केला. या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या गरजवंत  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.
दिग्रसमध्ये ई- लायब्ररी सुरू करणार
शहरी आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिग्रसमध्ये १२ कोटी खर्चून ई-लायब्ररी सुरू करणार आहोत. लवकरच त्यासाठी स्वतंत्र इमारत बांधून ई-लायब्ररी सुरू होणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गाव तिथे पुस्तके देणार आहोत. गावातील शिक्षित तरुणांना जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी शिक्षकपदी नेमणूक केली जात आहे. दहावी व बारावीत विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र मिळाले नाही तर अप्रिय घटना घडल्याचे उदाहरण आपण पाहिले आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडू द्यावे त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी पालकांना केले.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहायक अभियंता पदी निवड झालेल्या खेकडी येथील सुधीर सुदेश चव्हाण या विद्यार्थ्याचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दिग्रस तालुक्यातील वरंदळी, कळगाव, रोहनादेवी, पेलू येथील पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. त्याचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यावेळी  देण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रा. सुधीर पाठक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केलाच पाहिजेत. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते,असे सांगून पालकमंत्री संजय राठोड यांच्या सामाजिक बांधिलकीची कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र मिश्रा यांनी केले. प्रास्ताविक प्रणित मोरे यांनी तर आभार अभय इंगळे यांनी मानले.

राष्ट्रीय युवा महोत्सव : सर्वांच्या उस्फूर्त सहभागातून उत्साहात साजरा करावा : मंत्री गिरिश महाजन

नाशिक, दिनांक: 5 जानेवारी (जिमाका वृत्तसेवा): नाशिक येथे होणारा 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव जिल्ह्यासाठी अभिमानस्पद बाब असून हा महोत्सव सर्वांच्या उस्फूर्त सहभाग व सहकार्यातून उत्साहात साजरा करावा, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

आज विभागीय क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय युवा महोत्सव नियोजनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन बोलत होते. या बैठकीस पालकमंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड माणिक कोकाटे, दिलीप बनकर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, ॲड राहुल ढिकले, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास धिवसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा,मनपा आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, राष्ट्रीय युवा महोत्सवास परराज्यातून स्पर्धक, खेळाडू, युवक-युवती येणार आहेत. त्यांची निवास, भोजन व्यवस्था व कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. त्याचप्रमाणे परराज्यातून येणाऱ्या या युवांसाठी त्यांच्या खाद्यसंस्कृतीनुसार खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात यावेत. 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  होणार असून 16 जानेवारी 2024 रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवात खेळ, कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा एकत्रित अनुभव नाशिकरांना घेता येणार आहे. नाशिकरांनी हा उद्घाटन सोहळा आपण युवाशक्तीच्या सहभागातून अतभूतपूर्व कसा होईल यादृष्टीने तयारी करावायाची आहे. शहरातही राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या दृष्टीने ठिकठिकाणी सजावट, बॅनर, पोस्टर्स, सामाज माध्यमांद्वारे अधिकाधिक प्रसिद्धी करून नागरिकांची या कार्यक्रमाबाबतची उत्सकता वाढवायची आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपल्या भागातील जास्तीत जास्त नागरिकांना उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत प्रोत्साहित करावयाचे आहे. आपण सर्वांच्या सहभागातून हा कार्यक्रम निश्चितच आकर्षक व स्मरणीय होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

00000

पुढील वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा ७३२ कोटी २९ लाखांचा प्रारुप आराखडा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा  दि. 5: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन 2024-25 च्या 732 कोटी 29 लाख 23 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री  शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितच्यिा बैठकीत मान्यता देण्यात आली.  यावेळी त्यांनी सन 2023-24 साठी असणाऱ्या 542 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यानुसार झालेल्या कामांचा आढावा घेतला.  यावर्षी मार्च अखेर आराखड्यानुसार मंजूर असलेला सर्व निधी उपलब्ध होईल, यंत्रणांनी निधी विहीत मुदतीत खर्च करत असताना कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील यांची सर्वोतपरी दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

 जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  यावेळी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. अरुण लाड, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. दिपक चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजनेचा 732 कोटी 29 लाख 23 हजार रुपयांचा  प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा आराखडा मंजूर करण्याता आला.  यामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 621 कोटी 81 लाख रुपयांचा आराखडा केला असून यामध्ये 185 कोटी 81 लाख रुपयांची वाढीव मागणी समाविष्ट आहे.  अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 108 कोटी 84 लाख 65 हजार रुपयांचा आराखडा करण्यात आला आहे.  तर आदीवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रमासाठी 1 कोटी 63 लाख 58 हजार रुपयांचा आराखडा करण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत 542 कोटी 63 लाख 58 हजार रुपयांची अर्थ संकल्पित तरतूद आहे.  यापैकी 372 कोटी 8 लाख बीडीएसवर प्राप्त आहेत. 372 कोटी 89 लाखांहून अधिक रकमेच्या विविध विभागांकडील विकास कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 233 कोटी 15 लाख रुपये बीडीएस प्रणालीवर खर्च झाले आहेत.  31 डिसेंबर 2023 अखेर प्राप्त झालेल्या तरतूदींच्या तुलनेत 63 टक्के निधी खर्च झाला आहे.  या मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 95 टक्के प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या असून प्राप्त रककमे पैकी 76 टक्के निधी विविध विभागाणा वितरीत केला असून 70 टक्के खर्च झालेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्हा प्रशासकीय मान्यता देण्यात व निधी वितरण तसेच खर्चात सद्यस्थितीत प्रथम करमांकावर आहे.   लोकप्रतिनिधींनी विकास कामांशी संबंधित उपस्थित केलेल्या मुद्यांवर सविस्तर चर्चा होऊन पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, यावर्षी मंजूर असलेल्या आराखड्यासाठी संपूर्ण निधी मार्च पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल.  यंत्रणांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून होणारी कामे गुणवत्तापूर्णच करावी.  निधी 31 मार्चपर्यंत शंभर टक्के खर्च होईल यांची दक्षता घ्यावी.  या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यासाठी व जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल स्कूल करण्यासाठी वाढीव निधी ठेवण्यात येईल.  ज्या शाळा निर्लेखित केलेल्या आहेत, त्यांचे बांधकाम प्राधान्याने करण्यात येईल, असे सांगितले.  शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध असणे आवश्यक असून काही ठिकाणी मधूमेहांवरील औषधांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले असता पुरेश्या औषध साठ्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला आहे.  औषध खरेदीचे अधिकारही जिल्हास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  त्यामुळे वेळेवर औषधे खरेदी करावीत.  कोणत्याही स्थितीत शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.   सार्व बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग यांच्याकडील कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने गुणवत्ता तपासणी संनियंत्रण प्रणाली राबवावी.

जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांचे प्रस्ताव तयार करत असतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन नुकसान होऊ नये यासाठी सौर कुंपण योजनेचा प्रस्ताव संपूर्ण जिल्ह्यासाठी तयार करावा, वन्यप्राण्यांनी केलेल्या शेतीची नुकसानीचीही  भरपाई वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करु, असे त्यांनी यावेळी सागितले.  मागासवर्गीय घटकांना घरे मागणीच्या प्रमाणात देता यावीत, यासाठी घरकूल योजनांचे उद्दीष्ट वाढवून घ्यावे.  विकसीत भारत यात्रेत यंत्रणांनी उत्सुर्तपणे सहभाग घ्यावा.  संगम माहूली येथील विकासकामांचे प्रस्तावाचे पुरातत्व विभागाने तयार करुन सादर करावेत, यासाठी निश्चित पाठपुरावा करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.  दुष्काळ, टंचाई निवारणार्थ आराखडे तयार करत असतांना लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घ्यावे व त्यांना विश्वासात घेऊन आराखडे तयार करावेत.  म्हासूर्णे येथील श्री भैरवनाथ देवस्थानास तीर्थक्षेत्र क वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा मिळण्याच्या प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  या बैठकीत विद्यूत विकास, साकव कार्यक्रम, क वर्ग यात्रा स्थळांचा विकास यासाठी वाढीव निधी ठेवण्यात यावा, अशी मागणीही लोकप्रतिनिधींनी केली.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी गुणवत्तापुर्ण काम संनियंत्रण प्रणाली राबविण्यात येत आहे.  यामुळे जिल्हाभर होत असणाऱ्या विकास कामांची सद्यस्थिती तपासणी शक्य होत आहे.   विविध टप्यांवरील कामांचे व्हिडीओ व छायाचित्रे या प्रणालीवर अपलोड करण्यात येत आहेत.  यावर्षी विकास आराखड्यातील सर्व कामे फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील आणि गुणवत्ता तपासणी नंतरच कामांची देयके आदा होतील, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

000

नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे, दि.५: सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून नाटकाकडे बघताना सर्वांनी नाट्य चळवळीच्या विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ज्येष्ठ कलाकारांमधून एकमताने ठरविला जावा, अशी अपेक्षाही श्री.सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.

गणेश कला क्रीडा संकुल येथे आयोजित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. नाटकाच्या घंटेचे पूजन करून आणि संमेलनाध्यक्षांच्या हस्ते घंटा वाजवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुरेश खरे, दत्ता भगत, गंगाराम गवाणकर, नाट्यपरिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, अशोक हांडे, मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले, अनेक देणगीदारदेखील नाट्य चवळवळीला प्रोत्साहन देत आहेत. शासनाकडून मिळणारा निधी नाट्य चवळवळ पुढे नेण्यासाठी पडद्यामागील कलावंतांच्या मदतीसाठी वापरला जावा असा प्रयत्न आहे. स्व. विक्रम गोखले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी रत्नागिरीचे नाट्य संमेलन होण्यासाठी, वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रमाचे काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हिंदी आणि मराठी रंगभूमीत मोठी तफावत दिसून येते. मराठी माणसाने हिंदीतही पुढे जावे यासाठी त्याच्यामागे पाठबळ उभारण्याची गरज आहे. नाट्य निर्मात्यांनी आणि कलाकारांनी नाट्य संमलेनाचे तीन दिवस आपल्या मातृसंस्थेसाठी आहे हे लक्षात घ्यावे आणि प्रेक्षकांच्या इच्छेचाही विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. गज्वी म्हणाले, कलावंत स्वत: एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो. जब्बार पटेल हे मराठी रंगभूमीवरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल. शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने पाच महिने रंगकर्मी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशांत दामले यावेळी म्हणाले, शासनाने मराठी नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा दिल्या असताना कलाकारांनी उत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करावा. नाट्यकलेसाठी सराव फार गरजेचा असून त्याकडे कलाकारांनी विशेष लक्ष देणे आणि नाट्य रसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे या तीन गोष्टी नाट्यसृष्टीसाठी महत्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने नाट्य संमेलन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त् केला.

श्री.राजेभोसले यांनी प्रास्ताविकात १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाविषयी माहिती दिली. शासनाने ९ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी नाट्य संमेलनासाठी उपलब्ध करून दिला आहे. यातील काही निधी नाट्य कलावंताच्या कल्याणासाठी उपयोगात आणला जाईल. पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतून २० लाखाचा निधी मंजूर केला, असे ते म्हणाले.

यावेळी प्रशांत दामले , ज्येष्ठ कलावंत सरुप कुमार, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी प्रियांका बर्वे, राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांनी ‘नाट्यधारा’ हा नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर केला.
0000

कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटी; मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड, दि. 5 (जिमाका) : कोकणची भरभराट झाली पाहिजे, बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील आहे.  कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी २० हजार कोटींचा नवा उद्योग येत आहे. कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद केली असून माणगाव नगरपरिषद बांधकामासाठी १५ कोटी, पावनखिंडीला जाणाऱ्यांच्या विश्रामधामासाठी १५ कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आत्तापर्यंत २ कोटी १ लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील २६ लाख लाभार्थींना १७०० कोटींचे लाभ दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

 रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कुलगुरु प्रा. डॉ. कारभारी काळे उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले. तळीये दुर्घटनाग्रस्तांना घरांच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आल्या. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचे लोकार्पणही यावेळी झाले. शासन आपल्या दारी कार्यक्रमातर्गत आयोजित आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शन तसेच औद्योगिक कंपनी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य कारभार पुढे नेत आहोत. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा छत्रपती शिवरायांना आणि डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचा एक अत्यंत लोकाभिमुख असा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात खेटा माराव्या लागत नाही. सरकार जनतेच्या दारात येऊन त्यांची कामं करतंय. शासन आपल्या दारी उपक्रमाचा हा 20 वा कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत 2 कोटी 1 लाख 91 हजार 803 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. ‘निर्णय वेगवान गतिमान सरकार’ अशा पध्दतीने कामकाज सुरु असल्याचे सांगून, कोकणच्या विकासासाठी जे आवश्यक आहे, ते करु, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

रायगड सुशासनाची राजधानी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

       उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रायगड  ही सुशासनाची राजधानी आहे. शौर्य, स्थैर्य आणि सामर्थ्य या त्रिसुत्रीचा मूलमंत्र येथे मिळतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी म्हणून रायगडकडे आपण पाहतो. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले, त्याप्रमाणे प्रजेकरिता राजा, प्रजेचा सेवक म्हणून राजा, प्रजेच्या सेवेसाठी प्रशासन हाच भाव ठेवून मुख्यमंत्री काम करीत आहेत. त्याचं निर्धाराने  ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवत आहेत.

कमी कालावधीत जिल्ह्यात 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटींपेक्षा जास्त लाभ लाभार्थ्यांना मिळाला आहे. लाभासाठी एकाही  लाभार्थ्यांला चक्कर मारावी लागली नाही. थेट दारामध्ये लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. पुढची 25 वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र रायगड जिल्हा हा असणार आहे. आधुनिक जगात डेटा सर्वात महत्त्वाचा आहे. डेटाची किंमत तेलापेक्षाही जास्त झाली आहे. डेटाच्या विकासाचा केंद्रबिंदू हा रायगड जिल्हा असणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा होत आहेत. मोठ्या प्रमाणात या भागात गुंतवणूक आलेली पहायला मिळणार आहे. रायगडचे चित्र आपण कामातून बदलतोय. एक रुपयात विमा, नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ६ हजार मदत अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. देशाला पुढे न्यायचे असेल तर महिलांचे सक्षमीकरण व्हायला हवे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात. त्यातूनच नव्या महिला धोरणातून त्यांचे सक्षमीकरण करतोय, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 कोकणाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकणाचा सर्वांगिण विकास थांबणार नाही. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण उपक्रम असलेला ‘शासन आपल्या दारी’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे. आज हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच ज्या भूमीतून मोठमोठे क्रांतिकारक होऊन गेले, अशा ठिकाणी होत आहे. याचा मला अभिमान आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना अनेकदा हेलपाटे माराव्या लागत होते, त्यामुळे शेवटच्या माणसाला मदत होत नसायची, मात्र आता ‘शासन आपल्या दारी’तून घराघरापर्यंत योजना पोहोचत आहेत. सर्वसामान्यांना प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचे, पुढे आणण्याचे, आर्थिक संपन्नता देण्याचे काम शासन आपल्या दारीतून सुरु आहे. या योजनेद्वारे समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोकणातील स्थानिकांना मार्गदर्शन करताना श्री. पवार म्हणाले, रायगड जिल्हा हा निसर्गसमृद्ध जिल्हा आहे. या ठिकाणी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. त्यामुळे स्थनिकांनी आपल्या जमिनी विकू नका, राज्याच्या आणि केंद्राच्या कृषी पर्यटनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह तरुण बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. कोकणाच्या सर्वांगीण विकासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

या भागात तिसरी मुंबई तयार होत आहे. त्यासाठी आवश्यक दळणवळणाची साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोकणाच्या किनारपट्टीवर जेट्टीचे जाळे उभारण्यात येत आहे. रो रो सेवा वाढविण्यात येत आहे. या भागात पिकणाऱ्या फळांना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही श्री. पवार यांनी नमूद केले.

स्वागतपर भाषणात पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले,  इर्शाळवाडी दुर्घटनेतील ग्रामस्थांचे पुनर्वसन 3 महिन्यात करु शकलो, ही गतिमानता शासनाची आहे. अतिशय गतिमान पध्दतीने शासन काम करीत आहे. जनतेला असाच दिलासा दिला जाईल.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

0000

ताज्या बातम्या

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...

नागपूर व अमरावती जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे गतीने करा – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. ७ : नागपूर व अमरावती जिल्ह्यात उद्योग, निवासी प्रकल्प आणि वाणिज्य क्षेत्रामुळे वीज मागणी झपाट्याने वाढते आहे. नागपूर व अमरावतीमधील वीज क्षेत्रातील...

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियाकरिता बार्टीमार्फत डिजिटल सेवा सुविधा उपलब्ध

0
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेस गती देण्यासाठी शासनाकडून विविध सोईसुविधा उपलब्ध...