सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 960

विकसित भारत संकल्प यात्रेमुळे केंद्र पुरस्कृत योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

विकसित भारत संकल्प यात्रेची ग्रामीण स्तरावरील सांगता

सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली. केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे याबाबतचे प्रबोधन जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून 11 व्हॅनव्दारे करण्यात आले. या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.

         कवलापूर येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या ग्रामीण स्तरीय सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खासदार संजय पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कवलापूरच्या सरपंचा उज्ज्वला गुंडे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, भानुदास पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कवलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

         पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्ह्यात दिनांक २४ नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली. तेव्हापासून आजअखेर ११ व्हॅनद्वारे जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींमध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या कालावधीत जवळपास दीड लाख नागरिक या यात्रेत सहभागी झाले. तर जवळपास ३ हजार लाभार्थींना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली गेली, वंचित लाभार्थींची नोंदणी केली गेली व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला गेला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

            या यात्रेंतर्गत जिल्ह्यात आयुष्मान कार्डच्या वाटपामध्ये भरीव कामगिरी झाली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आयुष्मान कार्ड मिळाल्यामुळे 5 लाख रूपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून कवलापूरच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही कवलापूरच्या विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

         खासदार संजय पाटील म्हणाले, सर्व सामान्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचवली गेली. लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला गेला. यामध्ये जवळपास ४ लाख आयुष्मान कार्ड वाटप केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

विविध प्रमाणपत्र वाटप

         यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये अटल बांधकाम कामगार घरकुल योजना, मोदी आवास योजना, माझी कन्या भाग्यश्री, दिव्यांग कल्याण योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्ड, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना आदि योजनांच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची चित्रफीत दाखवण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व रोपट्यास पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

स्टॉलना उत्स्फूर्त प्रतिसाद

         यावेळी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्यासह मान्यवरानी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये आयुष्मान भारत, रोजगार हमी योजना, महा आवास योजना, महसूल विभाग चावडी, पुरवठा विभाग, महिला व बालविकास विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जलजीवन मिशन, पोस्ट विभाग, जिल्हा मध्यवर्ती बँक या शासकीय विभागासह महिला बचत गटांच्या स्टॉलना उपस्थित लाभार्थीनी भेट देऊन माहिती घेतली.

शोभा यात्रा

            मान्यवरांची शोभा यात्रा स्मार्ट पीएचसी ते ग्रामपंचायत कार्यालय पटांगण ते कार्यक्रमस्थळ अशी काढण्यात आली.

         स्वागत सरपंच उज्ज्वला गुंडे यांनी केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले. लाभार्थीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यात्रा कालावधीत सहकार्य केलेल्याप्रती ऋणनिर्देश व्यक्त केले. भानुदास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन

            प्रारंभी आयुष्मान आरोग्य मंदिर (स्मार्ट पीएचसी) कवलापूरचे उद्गाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट पीएचसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कवलापूर येथे अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करणे योजनेंतर्गंत रस्ते कामाचे उद्घाटनही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

00000

पालकमंत्र्यांच्या हस्ते १७९ गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप व ५२ गुणवंतांचा सत्कार; पाच विद्यार्थ्यांना ५ हजारांची आर्थिक मदत

यवतमाळ, दि. ५ (जिमाका) :  पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस तालुक्यातील दहावी व बारावीत शिक्षण घेणाऱ्या १७९ गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप व पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रातील ५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दिग्रस येथील मातोश्री विमालदेवी चिरडे मंगल कार्यालयात या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय बंग तर मार्गदर्शक प्रा. सुधीर पाठक होते. यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, राजकुमार वानखेडे, उत्तम ठवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, गोरगरीब गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करीत आहोत. ही शिष्यवृत्ती देताना पारदर्शकता असावी यासाठी समिती नेमून त्यात पत्रकारांचा समावेश केला. या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या गरजवंत  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.
दिग्रसमध्ये ई- लायब्ररी सुरू करणार
शहरी आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिग्रसमध्ये १२ कोटी खर्चून ई-लायब्ररी सुरू करणार आहोत. लवकरच त्यासाठी स्वतंत्र इमारत बांधून ई-लायब्ररी सुरू होणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गाव तिथे पुस्तके देणार आहोत. गावातील शिक्षित तरुणांना जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी शिक्षकपदी नेमणूक केली जात आहे. दहावी व बारावीत विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र मिळाले नाही तर अप्रिय घटना घडल्याचे उदाहरण आपण पाहिले आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडू द्यावे त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी पालकांना केले.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहायक अभियंता पदी निवड झालेल्या खेकडी येथील सुधीर सुदेश चव्हाण या विद्यार्थ्याचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दिग्रस तालुक्यातील वरंदळी, कळगाव, रोहनादेवी, पेलू येथील पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. त्याचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यावेळी  देण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रा. सुधीर पाठक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केलाच पाहिजेत. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते,असे सांगून पालकमंत्री संजय राठोड यांच्या सामाजिक बांधिलकीची कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र मिश्रा यांनी केले. प्रास्ताविक प्रणित मोरे यांनी तर आभार अभय इंगळे यांनी मानले.

राष्ट्रीय युवा महोत्सव : सर्वांच्या उस्फूर्त सहभागातून उत्साहात साजरा करावा : मंत्री गिरिश महाजन

नाशिक, दिनांक: 5 जानेवारी (जिमाका वृत्तसेवा): नाशिक येथे होणारा 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव जिल्ह्यासाठी अभिमानस्पद बाब असून हा महोत्सव सर्वांच्या उस्फूर्त सहभाग व सहकार्यातून उत्साहात साजरा करावा, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

आज विभागीय क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय युवा महोत्सव नियोजनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन बोलत होते. या बैठकीस पालकमंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड माणिक कोकाटे, दिलीप बनकर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, ॲड राहुल ढिकले, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास धिवसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा,मनपा आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, राष्ट्रीय युवा महोत्सवास परराज्यातून स्पर्धक, खेळाडू, युवक-युवती येणार आहेत. त्यांची निवास, भोजन व्यवस्था व कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. त्याचप्रमाणे परराज्यातून येणाऱ्या या युवांसाठी त्यांच्या खाद्यसंस्कृतीनुसार खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात यावेत. 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  होणार असून 16 जानेवारी 2024 रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवात खेळ, कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा एकत्रित अनुभव नाशिकरांना घेता येणार आहे. नाशिकरांनी हा उद्घाटन सोहळा आपण युवाशक्तीच्या सहभागातून अतभूतपूर्व कसा होईल यादृष्टीने तयारी करावायाची आहे. शहरातही राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या दृष्टीने ठिकठिकाणी सजावट, बॅनर, पोस्टर्स, सामाज माध्यमांद्वारे अधिकाधिक प्रसिद्धी करून नागरिकांची या कार्यक्रमाबाबतची उत्सकता वाढवायची आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपल्या भागातील जास्तीत जास्त नागरिकांना उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत प्रोत्साहित करावयाचे आहे. आपण सर्वांच्या सहभागातून हा कार्यक्रम निश्चितच आकर्षक व स्मरणीय होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

00000

पुढील वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा ७३२ कोटी २९ लाखांचा प्रारुप आराखडा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा  दि. 5: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन 2024-25 च्या 732 कोटी 29 लाख 23 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री  शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितच्यिा बैठकीत मान्यता देण्यात आली.  यावेळी त्यांनी सन 2023-24 साठी असणाऱ्या 542 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यानुसार झालेल्या कामांचा आढावा घेतला.  यावर्षी मार्च अखेर आराखड्यानुसार मंजूर असलेला सर्व निधी उपलब्ध होईल, यंत्रणांनी निधी विहीत मुदतीत खर्च करत असताना कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील यांची सर्वोतपरी दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

 जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  यावेळी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. अरुण लाड, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. दिपक चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजनेचा 732 कोटी 29 लाख 23 हजार रुपयांचा  प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा आराखडा मंजूर करण्याता आला.  यामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 621 कोटी 81 लाख रुपयांचा आराखडा केला असून यामध्ये 185 कोटी 81 लाख रुपयांची वाढीव मागणी समाविष्ट आहे.  अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 108 कोटी 84 लाख 65 हजार रुपयांचा आराखडा करण्यात आला आहे.  तर आदीवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रमासाठी 1 कोटी 63 लाख 58 हजार रुपयांचा आराखडा करण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत 542 कोटी 63 लाख 58 हजार रुपयांची अर्थ संकल्पित तरतूद आहे.  यापैकी 372 कोटी 8 लाख बीडीएसवर प्राप्त आहेत. 372 कोटी 89 लाखांहून अधिक रकमेच्या विविध विभागांकडील विकास कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 233 कोटी 15 लाख रुपये बीडीएस प्रणालीवर खर्च झाले आहेत.  31 डिसेंबर 2023 अखेर प्राप्त झालेल्या तरतूदींच्या तुलनेत 63 टक्के निधी खर्च झाला आहे.  या मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 95 टक्के प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या असून प्राप्त रककमे पैकी 76 टक्के निधी विविध विभागाणा वितरीत केला असून 70 टक्के खर्च झालेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्हा प्रशासकीय मान्यता देण्यात व निधी वितरण तसेच खर्चात सद्यस्थितीत प्रथम करमांकावर आहे.   लोकप्रतिनिधींनी विकास कामांशी संबंधित उपस्थित केलेल्या मुद्यांवर सविस्तर चर्चा होऊन पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, यावर्षी मंजूर असलेल्या आराखड्यासाठी संपूर्ण निधी मार्च पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल.  यंत्रणांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून होणारी कामे गुणवत्तापूर्णच करावी.  निधी 31 मार्चपर्यंत शंभर टक्के खर्च होईल यांची दक्षता घ्यावी.  या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यासाठी व जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल स्कूल करण्यासाठी वाढीव निधी ठेवण्यात येईल.  ज्या शाळा निर्लेखित केलेल्या आहेत, त्यांचे बांधकाम प्राधान्याने करण्यात येईल, असे सांगितले.  शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध असणे आवश्यक असून काही ठिकाणी मधूमेहांवरील औषधांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले असता पुरेश्या औषध साठ्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला आहे.  औषध खरेदीचे अधिकारही जिल्हास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  त्यामुळे वेळेवर औषधे खरेदी करावीत.  कोणत्याही स्थितीत शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.   सार्व बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग यांच्याकडील कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने गुणवत्ता तपासणी संनियंत्रण प्रणाली राबवावी.

जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांचे प्रस्ताव तयार करत असतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन नुकसान होऊ नये यासाठी सौर कुंपण योजनेचा प्रस्ताव संपूर्ण जिल्ह्यासाठी तयार करावा, वन्यप्राण्यांनी केलेल्या शेतीची नुकसानीचीही  भरपाई वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करु, असे त्यांनी यावेळी सागितले.  मागासवर्गीय घटकांना घरे मागणीच्या प्रमाणात देता यावीत, यासाठी घरकूल योजनांचे उद्दीष्ट वाढवून घ्यावे.  विकसीत भारत यात्रेत यंत्रणांनी उत्सुर्तपणे सहभाग घ्यावा.  संगम माहूली येथील विकासकामांचे प्रस्तावाचे पुरातत्व विभागाने तयार करुन सादर करावेत, यासाठी निश्चित पाठपुरावा करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.  दुष्काळ, टंचाई निवारणार्थ आराखडे तयार करत असतांना लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घ्यावे व त्यांना विश्वासात घेऊन आराखडे तयार करावेत.  म्हासूर्णे येथील श्री भैरवनाथ देवस्थानास तीर्थक्षेत्र क वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा मिळण्याच्या प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  या बैठकीत विद्यूत विकास, साकव कार्यक्रम, क वर्ग यात्रा स्थळांचा विकास यासाठी वाढीव निधी ठेवण्यात यावा, अशी मागणीही लोकप्रतिनिधींनी केली.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी गुणवत्तापुर्ण काम संनियंत्रण प्रणाली राबविण्यात येत आहे.  यामुळे जिल्हाभर होत असणाऱ्या विकास कामांची सद्यस्थिती तपासणी शक्य होत आहे.   विविध टप्यांवरील कामांचे व्हिडीओ व छायाचित्रे या प्रणालीवर अपलोड करण्यात येत आहेत.  यावर्षी विकास आराखड्यातील सर्व कामे फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील आणि गुणवत्ता तपासणी नंतरच कामांची देयके आदा होतील, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

000

नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे, दि.५: सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून नाटकाकडे बघताना सर्वांनी नाट्य चळवळीच्या विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ज्येष्ठ कलाकारांमधून एकमताने ठरविला जावा, अशी अपेक्षाही श्री.सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.

गणेश कला क्रीडा संकुल येथे आयोजित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. नाटकाच्या घंटेचे पूजन करून आणि संमेलनाध्यक्षांच्या हस्ते घंटा वाजवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुरेश खरे, दत्ता भगत, गंगाराम गवाणकर, नाट्यपरिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, अशोक हांडे, मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले, अनेक देणगीदारदेखील नाट्य चवळवळीला प्रोत्साहन देत आहेत. शासनाकडून मिळणारा निधी नाट्य चवळवळ पुढे नेण्यासाठी पडद्यामागील कलावंतांच्या मदतीसाठी वापरला जावा असा प्रयत्न आहे. स्व. विक्रम गोखले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी रत्नागिरीचे नाट्य संमेलन होण्यासाठी, वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रमाचे काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हिंदी आणि मराठी रंगभूमीत मोठी तफावत दिसून येते. मराठी माणसाने हिंदीतही पुढे जावे यासाठी त्याच्यामागे पाठबळ उभारण्याची गरज आहे. नाट्य निर्मात्यांनी आणि कलाकारांनी नाट्य संमलेनाचे तीन दिवस आपल्या मातृसंस्थेसाठी आहे हे लक्षात घ्यावे आणि प्रेक्षकांच्या इच्छेचाही विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. गज्वी म्हणाले, कलावंत स्वत: एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो. जब्बार पटेल हे मराठी रंगभूमीवरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल. शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने पाच महिने रंगकर्मी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशांत दामले यावेळी म्हणाले, शासनाने मराठी नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा दिल्या असताना कलाकारांनी उत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करावा. नाट्यकलेसाठी सराव फार गरजेचा असून त्याकडे कलाकारांनी विशेष लक्ष देणे आणि नाट्य रसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे या तीन गोष्टी नाट्यसृष्टीसाठी महत्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने नाट्य संमेलन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त् केला.

श्री.राजेभोसले यांनी प्रास्ताविकात १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाविषयी माहिती दिली. शासनाने ९ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी नाट्य संमेलनासाठी उपलब्ध करून दिला आहे. यातील काही निधी नाट्य कलावंताच्या कल्याणासाठी उपयोगात आणला जाईल. पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतून २० लाखाचा निधी मंजूर केला, असे ते म्हणाले.

यावेळी प्रशांत दामले , ज्येष्ठ कलावंत सरुप कुमार, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी प्रियांका बर्वे, राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांनी ‘नाट्यधारा’ हा नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर केला.
0000

कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटी; मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड, दि. 5 (जिमाका) : कोकणची भरभराट झाली पाहिजे, बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील आहे.  कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी २० हजार कोटींचा नवा उद्योग येत आहे. कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद केली असून माणगाव नगरपरिषद बांधकामासाठी १५ कोटी, पावनखिंडीला जाणाऱ्यांच्या विश्रामधामासाठी १५ कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आत्तापर्यंत २ कोटी १ लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील २६ लाख लाभार्थींना १७०० कोटींचे लाभ दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

 रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कुलगुरु प्रा. डॉ. कारभारी काळे उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले. तळीये दुर्घटनाग्रस्तांना घरांच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आल्या. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचे लोकार्पणही यावेळी झाले. शासन आपल्या दारी कार्यक्रमातर्गत आयोजित आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शन तसेच औद्योगिक कंपनी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य कारभार पुढे नेत आहोत. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा छत्रपती शिवरायांना आणि डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचा एक अत्यंत लोकाभिमुख असा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात खेटा माराव्या लागत नाही. सरकार जनतेच्या दारात येऊन त्यांची कामं करतंय. शासन आपल्या दारी उपक्रमाचा हा 20 वा कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत 2 कोटी 1 लाख 91 हजार 803 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. ‘निर्णय वेगवान गतिमान सरकार’ अशा पध्दतीने कामकाज सुरु असल्याचे सांगून, कोकणच्या विकासासाठी जे आवश्यक आहे, ते करु, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

रायगड सुशासनाची राजधानी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

       उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रायगड  ही सुशासनाची राजधानी आहे. शौर्य, स्थैर्य आणि सामर्थ्य या त्रिसुत्रीचा मूलमंत्र येथे मिळतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी म्हणून रायगडकडे आपण पाहतो. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले, त्याप्रमाणे प्रजेकरिता राजा, प्रजेचा सेवक म्हणून राजा, प्रजेच्या सेवेसाठी प्रशासन हाच भाव ठेवून मुख्यमंत्री काम करीत आहेत. त्याचं निर्धाराने  ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवत आहेत.

कमी कालावधीत जिल्ह्यात 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटींपेक्षा जास्त लाभ लाभार्थ्यांना मिळाला आहे. लाभासाठी एकाही  लाभार्थ्यांला चक्कर मारावी लागली नाही. थेट दारामध्ये लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. पुढची 25 वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र रायगड जिल्हा हा असणार आहे. आधुनिक जगात डेटा सर्वात महत्त्वाचा आहे. डेटाची किंमत तेलापेक्षाही जास्त झाली आहे. डेटाच्या विकासाचा केंद्रबिंदू हा रायगड जिल्हा असणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा होत आहेत. मोठ्या प्रमाणात या भागात गुंतवणूक आलेली पहायला मिळणार आहे. रायगडचे चित्र आपण कामातून बदलतोय. एक रुपयात विमा, नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ६ हजार मदत अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. देशाला पुढे न्यायचे असेल तर महिलांचे सक्षमीकरण व्हायला हवे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात. त्यातूनच नव्या महिला धोरणातून त्यांचे सक्षमीकरण करतोय, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 कोकणाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकणाचा सर्वांगिण विकास थांबणार नाही. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण उपक्रम असलेला ‘शासन आपल्या दारी’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे. आज हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच ज्या भूमीतून मोठमोठे क्रांतिकारक होऊन गेले, अशा ठिकाणी होत आहे. याचा मला अभिमान आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना अनेकदा हेलपाटे माराव्या लागत होते, त्यामुळे शेवटच्या माणसाला मदत होत नसायची, मात्र आता ‘शासन आपल्या दारी’तून घराघरापर्यंत योजना पोहोचत आहेत. सर्वसामान्यांना प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचे, पुढे आणण्याचे, आर्थिक संपन्नता देण्याचे काम शासन आपल्या दारीतून सुरु आहे. या योजनेद्वारे समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोकणातील स्थानिकांना मार्गदर्शन करताना श्री. पवार म्हणाले, रायगड जिल्हा हा निसर्गसमृद्ध जिल्हा आहे. या ठिकाणी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. त्यामुळे स्थनिकांनी आपल्या जमिनी विकू नका, राज्याच्या आणि केंद्राच्या कृषी पर्यटनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह तरुण बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. कोकणाच्या सर्वांगीण विकासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

या भागात तिसरी मुंबई तयार होत आहे. त्यासाठी आवश्यक दळणवळणाची साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोकणाच्या किनारपट्टीवर जेट्टीचे जाळे उभारण्यात येत आहे. रो रो सेवा वाढविण्यात येत आहे. या भागात पिकणाऱ्या फळांना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही श्री. पवार यांनी नमूद केले.

स्वागतपर भाषणात पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले,  इर्शाळवाडी दुर्घटनेतील ग्रामस्थांचे पुनर्वसन 3 महिन्यात करु शकलो, ही गतिमानता शासनाची आहे. अतिशय गतिमान पध्दतीने शासन काम करीत आहे. जनतेला असाच दिलासा दिला जाईल.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

0000

सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

६४८ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी; जिल्ह्यासाठी अजून १००-१५० कोटी वाढीव निधीचे प्रयत्न

जळगाव, ०५ जानेवारी (जिमाका) :- जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांवर सर्व विभागांनी कार्यवाही करुन कामे वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्याचा विकास करतांना शेतकरी केंद्रबिंदू मानून तसेच सामान्य माणसांची बांधिलकी ठेऊन सर्व खातेप्रमुखांनी ताळमेळ ठेवून कार्य करावे, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकामात  गडकिल्ले संवर्धन, सिंचन, शिक्षण, आरोग्य,  दिवसा विजेसाठी  मुख्यमंत्री सौर उर्जा प्रकल्प आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची  बैठक पार पडली. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२४-२५ यासाठी तब्बल ६४७ कोटी ९२ लक्ष रूपयांची तरतूद असणाऱ्या  प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. तर नियोजनच्या राज्यस्तरीय बैठकीत आपण जिल्हा विकासासाठी अजून १०० ते १५० कोटी रूपयांची अतिरिक्त वाढीव मागणी करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिली. सन २०२३-२४ च्या पुर्ननियोजन प्रस्तावास मंजूरी दिली असून या बैठकीत चालू वर्षातील ६९७ कोटी रूपयांच्या खर्चाचा आढावा देखील घेण्यात आला.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच उपस्थित खासदार व आमदार यांचे यांचे स्वागत केले.

बैठकीस खासदार उन्मेष पाटील , खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित,‌ जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, मनपा आयुक्त तथा प्रशासक विद्या गायकवाड , आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, डीसीएफ प्रविण ए , सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, वैद्यकीय महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ.ठाकूर , जिल्हा शल्य चिकीत्सक  डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे – पवार , जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी लोखंडे, सहायक आयुक्त (नगरपालिका शाखा) जनार्दन पवार, महावितरणचे प्रभारी अधीक्षक महाजन, सहायक आयुक्त समाजकल्याणचे योगेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे व सर्व शासकीय विभागाचे प्रमुख यांची उपस्थिती होती.                         

सन २०२४-२५ साठी ६४७ कोटी ९२ लक्षच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी; प्रारूप आराखड्यातील  ठळक कामे

सन २०२४-२५ करिता एकूण जिल्ह्यासाठी रुपये ६४७ कोटी ९२ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून यामध्ये सर्वसाधारण करीता रु. ५१० कोटी, SCP (अनु. जाती ) साठी रूपये ९२ कोटी तर TSP/OTSP साठी ४५ कोटी ९१ लक्ष ७१ हजार इतक्या निधीचा समावेश आहे. शासकीय कार्यान्विन यंत्रणांकडून एकूण मागणी रूपये १२१० कोटी इतकी आहे. प्रारूप आराखड्यातील  ठळक कामे अशी – जिल्हातील गड किल्ले, मंदीरे व महत्वाची संरक्षित स्मारके यांच्या संवर्धन करून  जिल्हा परिषद शाळांमध्ये इंटरनेट वायफाय, प्रयोगशाळा इ. सुविधा निर्माण करुन शाळा डिजिटल करणार तसेच उर्वरीत शाळांना वॉल कंपाउंड बांधकाम , जिल्हातील १०० टक्के अंगणवाड्या बांधकामे पुर्ण होणार असून सर्व अंगणवाड्यांना वीज जोडणी ,  मागेल त्या ग्रामपंचायतींसाठी स्मशानभूमी बांधकाम,  स्मशानभूमी पोहोच रस्ते, ग्रा.पं.कार्यालय बांधकामे हाती घेण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातील महत्वाच्या क वर्ग तीर्थस्थळांचा विकास, महसूल व भूमी अभिलेख कार्यालये कॉर्पोरेट आधुनिक पद्धतीची करण्यात येणार असून  युवकांसाठी मागेल त्या ठिकाणी व्यायामशाळा बांधकाम व साहित्य पुरविण्यावर भर राहणार आहे.  जिल्हा परिषदेच्या शाळांना क्रीडा साहित्य उपलब्ध करुन गावागावात व्यायामशाळा साहित्य पुरविण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी सिंचन बंधारे, ग्रामीण भागातील ३०५४-५०५४ अंतर्गत रस्ते इ. करण्यात येणार असून मोठ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात युवकांसाठी अभ्यासिका बांधकामे व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक शिबीरे आयोजित केले जाणार आहे. शेतक-यांसाठी ट्रान्सफॉर्मर, दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर उर्जा प्रकल्प उभारणे / महानगरपालिका व नगरपालिकांच्या क्षेत्रात रस्ते, गटारी व वीजेच्या सोईसाठी वाढीव तरतूद अशी महत्वाची ठळक कामे करण्यात येणार  असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी जिल्ह्यात कामगार भवन उभारणाचा ठराव करण्यात आला.

सन २०२३ – २४ च्या खर्चाचा आढावा

बैठकीत सन २०२३-२४ मधील जिल्हा वार्षिक योजनांचा ३१ डिसेंबर २०२३ अखेर वार्षिक योजनांस गटनिहाय प्राप्त अनुदान व खर्चाचा आढावा घेण्यात आला. राज्यात प्रशासकीय मान्यता व निधीच्या खर्चाबाबत सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे. जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजनेचा मंजूर नियतव्यय ५१० कोटी, आदिवासी उपयोजना ५५ कोटी ९१ लाख आहे.  अनुसूचित जाती उपयोजनेत ९२ कोटींचा नियतव्यय मंजूर आहे. असा एकूण ६५७ कोटींचा नियतव्यय मंजूर आहे. यातील ५८० कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत ३०२ कोटींचा खर्च ही झाला आहे.

सन २०२३-२४ पुनर्विनियोजनाच्या प्रस्तावाला मिळाली मान्यता

या बैठकीत सन २०२२ – २३ च्या चालू वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजना पुनर्विनियोजन प्रस्तावाला देखील मंजुरी प्रदान करण्यात आली. यात सर्वसाधारण योजनेत यात पुनर्विनियोजनामध्ये आपण जिल्ह्यातील पोलिस चौक्या, महिलांसाठी हिरकणी कक्ष, लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळा खोल्यादुरुस्ती व वीज, पंखे इ. साठी, जिल्हा परिषद शाळांना क्रीडा साहित्य पुरविणे, आरोग्य विभागासाठी रुग्णवाहीका खरेदी व औषधी खरेदीसाठी, अग्नीशमन गाड्या खरेदी, व्यायामशाळा बांधकाम व साहित्य पुरविणे, साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने नागरी भागातील पायाभूत सुविधांसाठी पुनर्विनियोजन करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले निर्देश

फेब्रुवारी – मार्च मध्ये आचारसंहितेची शक्यता असल्याने सर्व यंत्रणांनी मंजुर कामांच्या १०० टक्के वर्क ऑर्डर २६ जानेवारी पर्यंत पूर्ण करुन मार्च २०२४ पर्यंत निधी खर्च करावा.  प्रलंबित असलेली व खासदार / आमदार महोदयांनी नव्याने सुचविलेली कामे मार्गी लावावीत.  जिल्ह्याचा विकास केंद्रबिंदु मानून तसेच सामान्यांशी बांधिलकी ठेवून विविध उपक्रम राबवावेत.या बैठकीत खासदार, आमदार व नियोजन समितीच्या सदस्यांनी या महिन्याच्या अखेरीस पर्यंत कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले. सर्व यंत्रणांनी युध्द पातळीवर प्रयत्न करून निधीचा पूर्ण विनीयोग करण्याचे आवाहन देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. राज्यस्तरीय बैठकीत आम्ही  तिन्ही मंत्री वाढीव १५० कोटी निधीची  मागणी करणार असून जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ही कामे लागली मार्गी

पालकमंत्री गुलाबराव पाटील , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , पुनर्वसन  मंत्री अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार चालू वर्षात वारकरी भवन, महिला व बालविकास भवन, विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा बसविणे , २७ ए.सी. रुग्णवाहिका, रामानंद नगर व पाळधी पोलीस स्टेशन बांधकाम, अजनाड पुनर्वसित संपुर्ण गावास विद्युतीकरण करणे, भूमी अभिलेख कार्यालयासाठी रोवर मशिन युनिट कार्यप्रणाली व टॅब युनिट 15 नग,  70 जिल्हा परिषद शाळांना क्रीडा साहित्य पुरविणे, नवजात बालकांसाठी व्यापक स्तनपान व्यवस्थापन केंद्र मदर मिल्क बॅंक तयार करणे, सखी वन स्टॉप सेंटर बांधकाम, पोलीस दलाचे आधुनिकीकरणसाठी – १ कार, २५ महेंद्रा बोलेरो ,पिकअप व्हॅन ८५ दुचाकी गाड्या वितरण , जळगांव जिल्ह्यातील नदी व जंगल परिसरातील हातभट्टी निर्मिती केंद्रांवर प्रभावी कारवाईसाठी ड्रोन व बोट खरेदी करणे. सिंचन बंधारे, ३०५४-५०५४ अंतर्गत रस्ते , महानगरपालिका व नगरपालिकांच्या क्षेत्रात रस्ते, गटारी, विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. नदीजोड प्रकल्पात बाधित शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून रखडलेला भूसंपादन मोबदला देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या शासकीय यंत्रणांना सूचना

यावेळी  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध लेखशीर्ष निहाय माहितीचा आढावा स्वतःसादर केला. प्रशासकीय विभागांना जिल्हा नियोजन समितीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीची नियोजन करून मार्च २४ अखेर पर्यंत निधीचा खर्च १०० % खर्च करून  निधीचा वापर हा अनुषंगिक कामांसाठी वापरला जाईल तसेच गुणवत्तापूर्वक कामे होतील याकडे विभाग प्रमुखांनी व्यक्तिशः लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद यांनी निर्देश दिले. तसेच बैठकीत उपस्थित आमदार , खासदार व समितीच्या सदस्यांच्या प्रश्नांची अनुषंगिक उत्तरे देऊन सविस्तर माहिती दिली.

महावितरण भरतीत कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पैसे लाटणाऱ्या आऊटसोर्सिंग कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी. अशी‌ मागणी आमदार  किशोर पाटील, संजय सावकारे व चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. यावर पालकमंत्र्यांनी अध्यक्षतेखाली यावेळी जिल्हा नियोजन समितीत सदर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी.‌अशा सूचना यावेळी दिल्या आहेत.

जिल्ह्यात अवैध ड्रग्स व्यवसाय फोफावला आहे. अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढले आहे. अस मुद्दा आमदार मंगेश चव्हाण व आमदार संजय सावकारे यांनी यावेळी उपस्थित केला. अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस विभागाने मोहीम राबवावी. अशा सूचना ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केल्या.

०००००

अनुशेषाची पदे तात्काळ भरण्यात यावीत – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची सूचना

मुंबई, दि. 5 : राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाने मुंबई दौऱ्यामध्ये राज्य शासनाच्या संस्था, राष्ट्रीयकृत बँका आणि विमा कंपन्या यांच्या समवेत आढावा बैठका घतेल्या. सर्व अनुशेषाची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशा सूचना या बैठकांमध्ये केल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी सांगितले.

या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी श्री. हलदर यांनी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, अंजू बाला उपस्थित होते.

श्री. हलदर म्हणाले, अनुसूचित जाती कर्मचाऱ्यांचे आरक्षण रोस्टर अद्ययावत ठेवावे. अनुसूचित जाती उमेदवारांना भरती पूर्व आणि पदोन्नती पूर्व प्रशिक्षण दिले जावे. प्रत्येक संस्थेने एससी सेलची स्थापना करावी, तक्रार निवारण यंत्रणा अंमलात आणावी, अशा शिफारसी देखील आयोगाने केल्याचे त्यांनी सांगितले.

0000

राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवा शक्तीला ‘विकसित भारत’ साकार करण्याची प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ४:- राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’  संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ‘शेकरू’ या शुभंकराचे, बोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून अनावरण करण्यात आले.

या निमित्ताने नाशिक येथे महोत्सव स्थळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. माणिक कोकाटे, डॉ. राहुल आहेर, ॲड राहुल ढिकले, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. वर्षा शासकीय निवासस्थानी आमदार मनिषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

तर केंद्रीय कुटूंब कल्याण व आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बोरसे, केंद्रीय सचिव मीता राजीव लोचन दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा शेकरू हा राज्य प्राणी शुभंकर म्हणून निवडल्याबदद्ल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचा शेकरू हा दिमाखदार राज्याचं वैशिष्ट्ये सर्वांसमोर पहिल्यांदाच अशा स्वरुपात येत आहे. शेकरू हा शांतता, मैत्री, गतीशीलता आणि पर्यावरण प्रेमाचं प्रतिक आहे. त्यातूनही युवकांना प्रेरणा मिळेल.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाच्या बोधचिन्हांचे आणि बोधवाक्य, घोषवाक्यांचेही अनावरण करण्यात आले. ‘युवा के लिए – युवा द्वारा हे बोधवाक्य आहे. तर महाराष्ट्रासाठी ‘सशक्त युवा- समर्थ भारत’ हे घोषवाक्य आहे. या महोत्सवाचे १२ जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राला जी-२० नंतर पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी चालून आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हा राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे. आहे. त्यासाठी मोठ्या वेगाने तयारी सुरु आहे. यातून महाराष्ट्राची संस्कृती व कला परंपरा ही देशभर पोहोचवता येणार आहे. सोळा वर्षांनंतर महाराष्ट्राला या युवा महोत्सवाच्या आय़ोजनाचं यजमानपद मिळालं आहे. यात जास्तीत युवक सहभागी होतील. हा महोत्सव उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत दिमाखदार होईल, असे नियोजन करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

नाशिक शहराला प्रभू श्रीरामचंद्र यांचे पदस्पर्श झाले आहेत. तर तिकडे अयोध्येत श्रीराम मंदिर साकारले जात आहेत, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. म्हणाले, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. त्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. मंदिर पुर्णत्वास जात असतानाच आपल्याला श्रीरामांचे पदस्पर्श झालेल्या नाशिक मध्ये आपण युवा महोत्सवांच्या आयोजनाची चांगली संधी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. अशा या नगरीत देशभरातील युवकांचे उत्स्फूर्त स्वागत केले जाईल. त्यासाठी सर्व यंत्रणांनी पुरेपूर काळजी घ्यावी, काटेकोर नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

क्रीडा मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, देशातील युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी देशात या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही संधी महाराष्ट्राला मिळाली, याचा आनंद आहे. स्वामी विवेकानंद हे समाज सुधारक व ज्यांच्या विचारातून लोकांमध्ये क्रांती घडविण्याचे काम केले आहे. त्यांचे विचार आजही सर्व युवकांना प्रेरणा व प्रोत्साहन देत आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून कला, साहित्य, तंत्रज्ञान, विज्ञान, संस्कृती यांचा अनोखा अनुभव नाशिककरांना घेता येणार असल्याने, जास्तीत जास्त युवक व नागरिकांनी या युवा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.  क्रीडा आय़ुक्त श्री. दिवसे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास नाशिक येथे युवा वर्ग, खेळाडू, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथील तपोवन मैदानावर १२ ते १६ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशामधील ८ हजार युवक सहभागी होणार आहेत.

00000

जळगाव विमानतळाच्या बळकटीकरणाचा उच्च अधिकार‌ समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

नगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विमानतळ सेवेचा आढावा

जळगाव, ५ जानेवारी (जिमाका) – उच्च अधिकार समितीकडे जळगाव विमानतळांच्या‌ बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात विमानसेवेचा शुभारंभ झाला पाहिजे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील नगरपालिकांच्या विविध योजनांचा राज्याचे ग्रामविकास, पर्यटन व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन‌  यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, नगरपालिका प्रशासन अधिकारी जनार्दन पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता गिरीष ठाकूर, प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, अभियंता दीपक झा, अधीक्षक हर्षल वाणी, संगणक अभियंता गोपाल तायडे, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यावेळी उपस्थ‍ित होते.

केंद्र व राज्य शासनाद्वारे प्राप्त विविध निधीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती, नगरोत्थोन योजना, दलित वस्ती, दलित्तेर वस्ती, नगरपालिकाकडील विविध योजना, सर्व प्रकारच्या आवास योजनांची प्रगती, पीएमए योजना, जिल्ह्यातील इतर प्रलंबित विषयाबाबत 19 नगरपालिका व 1 महानगरपालिकेचे यावेळी सादरीकरण झाले. नगरपालिकांमधील अनुकंपा भरतीचा ही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला व दुसरा हप्ता, प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. नव्याने स्थापन नगरपंचायतीना नागरी सुविधांची कामे यामध्ये बोदवड व मुक्ताईनगर मधील कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन निधी अंतर्गत राज्य नगरोत्थान योजना,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजना, अग्नीशमन सेवा बळकटीकरण योजनांचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी महा स्वच्छता अभियान कृती आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन म्हणाले की , जिल्ह्यात  नगरपालिकांचे ११६७ कामांपैकी ३२७ कामे सुरू आहेत. कामांना गती देण्याची गरज आहे. आचारसंहिता पूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांनी त्यांच्या तालुक्यातील नगरपालिकांच्या कामांचा आढावा घ्यावा. शहरातील स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून स्वच्छतेकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. मुक्ताईनगर मधील बायोमेडिकल वेस्टचा प्रश्न‌ही लवकरात लवकर मार्गी लावावा.‌

वैद्यकीय महाविद्यालय बांधकामाचा आढावा

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी शासकीय महाविद्यालयाच्या कामांचा‌ आढावा घेतला.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ७११ कोटी मंजूर आहेत. १९ में २०१९ रोजी प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली‌. बांधकाम प्रगतीपथावर असून ३५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. यासाठी १७३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. अशी माहिती गिरिष‌ ठाकूर यांनी‌‌ यावेळी दिली.

पुढील महिन्यात विमानसेवा सुरू करण्यात यावी

यावेळी जळगाव विमानतळाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. पुढील महिन्यापर्यंत विमान फेऱ्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

०००००

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मुंबईत आगमन

0
मुंबई, दि. 7 : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे विमानाने दुपारी १.३७ वाजता आगमन झाले. विधि व न्याय विभागाचे...

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण

0
मुंबई, दि. 7 : आषाढी वारीसाठी नांदेडहून आलेले वारकरी बालाजी संगेकर (वय 75) यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वारीदरम्यान तब्येत खालावल्याने तातडीने त्यांना...

विधानसभा लक्षवेधी

0
राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच 'मेगा भरती' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ७ : राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या...

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतून १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचा लाभ – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मुंबई, दि. ७ : राज्यात प्राधान्य...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशीनंतर योग्य ती कारवाई - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मुंबई, दि. ७ : जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा आणि...