शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 938

शासकीय योजनांची माहिती घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी…

भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.  मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे.

जनजातीय गौरव दिनापासून सुरू झालेली ही यात्रा पहिल्या टप्प्यात लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या देशातील 110 जिल्ह्यात सुरू करण्यात आली. यात आपल्या नाशिक जिल्ह्याचा समावेश होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून उर्वरित सर्व जिल्ह्यात यात्रा सुरू करण्यात आली असून 26 जानेवारीपर्यंत देशातील सर्व भागात पोहोचणार आहे. यात्रेच्या निमित्ताने लाभार्थ्यांशी संवाद देखील साधण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत 15 नोव्हेंबर 2023 रोजी या विकसित संकल्प यात्रेचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे करण्यात आला. तर 21 नोव्हेंबर रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे कार्यक्रम संपन्न झाला. केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याची संधी या यात्रेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेसाठी 14 एलईडी व्हॅन प्राप्त झाल्या आहेत. या प्रत्येक व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील दररोज दोन ग्रामपंचायतींमध्ये याप्रमाणे एकूण 28 गावांमध्ये शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा जागर करण्यात येत आहे. याबाबतचे परिपूर्ण नियोजन या विकसित संकल्प यात्रेच्या नोडल अधिकारी तथा उप कार्यकारी अधिकारी डॉ.  वर्षा फडोळ या करीत आहेत.

ग्रामीण भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टीलायझर या 17 योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.

आदिवासी भागासाठी सिकलसेल ॲनिमिया निर्मुलन कार्यक्रम, एकलव्य निवासी शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, वन धन विकास केंद्र आदींबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. तर शहरी भागात प्रधानमंत्री स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, मुद्रा कर्ज, स्वच्छ भारत अभियान (शहरी), पीएम आवास योजना, पीएम ईबस सेवा, खेलो इंडिया, सौभाग्य योजना, वंदे भारत रेल्वे, उडान आदी विविध योजनांच्या जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

माहिती प्रसाराद्वारे शासकीय योजनांबाबत जागरुकता निर्माण करण्यासोबतच संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीदेखील यात्रेदरम्यान होत असल्याने या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विविध योजनांची माहिती देणारा दृकश्राव्य माध्यमाने सज्ज चित्ररथ या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे नागरिकांशी संवाद साधतांना त्यांना विविध योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रकांचे आणि कॅलेंडरचे वाटपही करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेशही दाखविण्यात येत आहे. यात्रेला भेट देणारे नागरिक शपथ घेऊन  विकसित भारतासाठी संकल्प करीत आहेत.

शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक आणि नैसर्गिक शेती व मृदा आरोग्य पत्रिकेवरील चर्चा ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरत आहे. स्थानिक पातळीवर यश संपादन केलेल्या महिला आणि खेळाडूंचा सत्कार हेदेखील या यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. यात्रेदरम्यान आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि किसान क्रेडीट कार्ड नोंदणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात 15 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत साधारण 379 ग्रामपंचायतींमध्ये ही विकास यात्रा पोहचली असून  या यात्रेच्या माध्यमातून साधारण एक लाख 43 हजार 502 नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे.  या यात्रेदरम्यान प्रत्येक ठिकाणी महसूल, जिल्हा परिषद तसेच महापालिका, नगरपालिका प्रशासनासह इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करीत असून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. या यात्रेला भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी संवाद

नागपूर, दि. १२ :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट दिली व विविध माध्यम प्रतिनिधींसोबत मनमोकळा संवाद साधला.

शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक हेमराज बागुल यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सुयोग येथील व्यवस्थेची पाहणी केली व पत्रकारांशी अनौपचारिक वातावरणात मनमोकळा संवाद साधला.

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असून विविध योजनांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मदतीबाबत माहिती त्यांनी दिली. राज्यातील विविध विषय तसेच प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

कांदा व इथेनॉलबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दूध दराच्या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्रमोद हिंदुराव, संजय खोडके, माहिती संचालक डॉ. राहूल तिडके यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

0000000

 

महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. 12 :- समाजकारण व राजकारणामध्ये महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. राजकीय आरक्षणामुळे महिलांना समाजकारण व राजकारण या क्षेत्रात अधिकची संधी निर्माण होणार आहे. या आरक्षणामुळे  समाजात सकारात्मक बदल दिसू लागतील, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

विधानभवनात आयोजित राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात “संसदीय लोकशाही व महिला धोरण” या विषयावर अभ्यास वर्गासाठी सहभागी झालेल्या विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी विधानमंडळ सचिव विलास आठवले, दैनिक सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे, विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला आज सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांनी आयएएस, आयपीएस, न्यायाधीश यासह  क्रीडा  क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आजच्या समाज माध्यमांच्या क्षेत्रातही त्या उत्कृष्टपणे काम करीत आहेत. या विविध क्षेत्रातील सहभागामुळे समाजात महिलांबद्दल अधिक आदर निर्माण होत आहे.  महाराष्ट्र राज्य हे महिलांना संधी देण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यामुळे राज्यातील महिलांनी शिक्षण,राजकारण, क्रीडा प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी, महिला प्रश्नांचा अजेंडा अधिक समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही  डॉ. गोऱ्हे यांनी केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, 1990 साली तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासोबत महिला आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग तयार करण्यात आला. घटना दुरुस्तीनंतर  स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना आरक्षण लागू झाले. मात्र हे आरक्षण लोकसभा राज्यसभा निवडणुकीत लागू नव्हते. संसदेच्या 2023 च्या पावसाळी अधिवेशनाचे महिला सक्षक्तीकरणाच्यादृष्टीने ऐतिहासिक पर्व म्हणून नोंद झाली आहे. ‘नारी शक्ती वंदन अभियान’ या नावाने सादर केलेल्या 128 व्या घटना दुरूस्ती विधेयकावर संमतीची मोहोर उमटल्याने यापुढे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये किमान 33 टक्के महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात घेतलेला पुढाकार निश्चितच आश्वासक ठरला असल्याचेही डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.

या संसदीय अभ्यास वर्गातील अनमोल मार्गदर्शनामुळे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व निश्चितच विस्तारेल. तसेच महिला सबलीकरण आणि महिलांच्या राजकीय सहभागाबाबत त्यांचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक आणि आश्वासक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी दैनिक सकाळचे संपादक संदीप भारंबे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा परिचय करून दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी शंतनू अहिर यांनी आभार मानले.

0000

श्री. एकनाथ पोवार/ससं/

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

नागपूर, दि. 12 : समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी आज दिली.

नागपूर विधानभवनातील उपमुख्यमंत्री कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भातखळकर, प्रमोद हिंदुराव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, समाजाच्या उन्नतीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना समाजाच्या गरजू लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

0000

श्री. एकनाथ पोवार/ससं/

 

विधानसभा प्रश्नोत्तरे

पिंपरी चिंचवड प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 12 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जाहीर केला. हे प्राणी संग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत.

यासंदर्भात सदस्या श्रीमती अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

या प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी 2017 पासून प्राणी संग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही.

दरम्यान, 2017 ते सन 2023 या कालावधीत एकूण 36 प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. 36 प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगरविकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या वन विकास महामंडळाकडे महापालिकेने हे प्राणी संग्रहालय हस्तांतरीत करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.

—————————————————————————-

रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी

राज्यात १७ ठिकाणी ‘स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर,दि.12 : रस्ते अपघात रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचे दृष्यस्वरूपात बदल दिसून येतील, अशी ग्वाही देतानाच राज्यात 17 ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग, 23 ठिकाणी स्वयंचलित वाहनयोग्यता प्रमाणपत्र केंद्र उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य अशोक चव्हाण यांनी राज्यात होत असलेल्या वाहन अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यत किमान 60 ते 70 लाख वाहनांनी प्रवास केला असून समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक दहा किमी अंतरावर रम्बलर बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

वाहन चालक परवाना स्वयंचलित पद्धतीने देण्यासाठी राज्यात 17 ठिकाणी ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासंदर्भात त्याची कार्यवाही सुरू आहे. ट्रॅकसाठी दोन महिन्यात कार्यादेश देण्यात येईल. 23 ठिकाणी ऑटोमॅटीक फिटनेस सेंटर्सदेखील करण्यात येत असून वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी संबंधितांना पूर्वकल्पना देण्याबाबत यंत्रणा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती वर्षा गायकवाड, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.

——————————————————————————-

भिवंडी निजामपूर मनपातील प्रभारी सहायक आयुक्तांच्या विभागीय चौकशीचा अहवाल १५ दिवसात मागविणार- मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. १२ : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील प्रभारी सहायक आयुक्तांची विभागीय चौकशी सुरू असून त्याचा अहवाल १५ दिवसांच्या आत मागविण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य नीलेश लंके यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मंत्री श्री. सामंत म्हणाले, सोमनाथ सोष्टे यांना प्रभारी सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती क्र.५ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला असताना नाले व गटार सफाई करण्याकरिता मजुरांचे वेतन देण्याकरिता त्यांनी घेतलेल्या अग्रिमाचा ताळमेळ सादर केलेला नाही. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास महानगरपालिकेमार्फत दिलेल्या नोटिसीचा खुलासा प्राप्त न झाल्यामुळे त्यांच्या मासिक वेतनातून दरमहा रक्कम कपात करण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशास अनुसरून कार्यवाही सुरू आहे.

यावेळी सदस्य रईस शेख, प्रशांत बंब, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले.

000

श्री. दीपक चव्हाण/विसंअ/

———————————————————————————

यवतमाळ नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापन निविदाप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालानुसार कारवाई करणार मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. १२ : यवतमाळ नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणाबाबत विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालावर 15 दिवसांत कारवाई करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

यवतमाळ नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापनासाठी गैरपद्धतीने डी एम एंटरप्राइजेस कंपनीस पात्र ठरविल्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणाचा विभागीय आयुक्त  निधी पाण्डेय यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार जे दोषी आढळले असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. विभागीय आयुक्त यांच्या चौकशी अहवालानुसार १५ दिवसांत कारवाई करण्यात येईल.

यावेळी सदस्य यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला.

000

श्री. पवन राठोड/ससं/

 —————————————————————————–

अंबाजोगाई नगरपरिषद कर्मचारी वेतनप्रकरणी अनियमिततेवर चौकशी अहवालानंतर कारवाई- मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. १२ : नगरपरिषद अंबाजोगाई (जि. बीड) येथील कर्मचाऱ्यांचे वेतन अंबाजोगाई पिपल्स नागरी सहकारी बँकेतून अदा करण्याप्रकरणी जिल्हाधिकारी, बीड यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर काही अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य श्रीमती नमिता मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नगरपरिषदेचे सहाय्यक अनुदानासाठी राष्ट्रीयकृत बँकेमधील खाते आहे. या खात्यात अनुदान मिळते. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून देण्याबाबत नियम आहे. हा नियम होण्यापूर्वी अंबाजोगाई पीपल्स नागरी सहकारी बँकेतील खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत होते. मात्र २० मे २०२१ रोजी पुन्हा वेतन खाती सहकारी बँकांमध्ये असल्यास वेतनाची अदायगी त्याच खात्यात करण्याबाबत  निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. शासनाची खाती पुन्हा   सहकारी बँक, पतसंस्था याकडे देण्याबाबत सदर वित्तीय संस्थेची पूर्ण आर्थिक परिस्थिती बघूनच निर्णय घेण्यात येतो.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अशोक चव्हाण यांनी भाग घेतला.

0000

श्री. नीलेश तायडे/विसंअ/

 

 

विधानसभा इतर कामकाज :

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण – मंत्री उदय सामंत

नागपूर, दिनांक १२ – मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे लेखापरीक्षण करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांना उत्तर देताना दिली. नियोजन विभागाचे अपर प्रधान सचिव, नगरविकास -१ चे प्रधान सचिव आणि संचालक (वित्त – लेखापरीक्षण) यांची समिती ही चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, सदस्य योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात येऊन याबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.

याशिवाय, नगरविकास विभागाच्या अनुषंगाने ठाणे शहरातील घनकचरा, पाणीपुरवठा, याबाबतही तक्रारी नसल्याचे सांगून ठाणे शहराला ५८५ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. सूरज परमार गुन्हा प्रकरणी तपास सुरू असून याप्रकरणी अतिजलद तपास करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभेने आज नगरविकास विभागाच्या ५०१५ कोटी ११ लाख ९० हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच महसूल विभागाच्या ६३१ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपयांच्या, तर मदत व पुनर्वसन विभागाच्या ११२ कोटी ८४ लाख १ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच वन विभागाच्या ४२ कोटी ६१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ३०८० कोटी ७३ लाख रुपयांच्या तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ५४ लाख ९६ हजार रुपयांचे पुरवणी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.

00000

दीपक चव्हाण/निलेश तायडे/विसंअ/

देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याला प्राधान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि.11 : कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, पायाभूत सोयीसुविधा आदी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत लोकाभिमुख कारभारातून राज्याला देशात प्रथम क्रमांकाचे बनविण्याला शासनाचे प्राधान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आय बी एन १८ वृत्तवाहिनीच्या ‘अजेंडा सशक्त महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात दिली.
वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलखुलास उत्तरे दिली.


राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयीसुविधा उभारणीवर राज्य शासनाचा भर असून, उद्योग, व्यापारवाढीवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. शासनाने सुरुवातीलाच दावोस येथे जावून १ लाख ३७ हजार कोटीवर विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. भविष्यातही अनेक कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जातील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा ५ लाख रुपयांवर केली असून, कँशलेस सुविधा देणे हा पुढील टप्पा असल्याचे सांगत राज्यातील गरीब जनतेला घराजवळच आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम सुरु केला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून मोठी रक्कम वितरित करून अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात राज्य शासनाचे उत्तम काम सुरु असन, राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयीसुविधांची उभारणी करण्यात येत आहे. देशात सर्वाधिक प्रकल्प राज्यात सुरु असल्याचे सांगून, नागपूर ते मुंबई हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुंबई – पुणे हा बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात साकारला. शिवडी – न्हावा शेवा – चिरले हे अंतर २० मिनिटांवर आले असून, कोस्टल रोड, वर्सोवा – मिरा भाईंदर, वसई -विरार – अलिबाग, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई मेट्रो २ ते ७ आदी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी हे सरकार उभे असून, गेल्या दीड वर्षात विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यामध्ये पूर्वीच्या दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाईसाठी वाढ करण्यात आली आहे. राज्यात नुकताच अवकाळी पाऊस, गारपीट झाल्यामुळे पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तात्काळ पंचनामे करण्यात येत आहेत. केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6 हजार रुपये देणारे देशातील पहिलेच राज्य असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
केंद्र शासनासोबत चांगले संबंध असल्यामुळे राज्याच्या विकासासाठी लागणारा निधी मिळत आहे. शासन आपल्या दारी उपक्रमातून आतापर्यंत 1 कोटी 90 लाख नागरिकांना लाभ वितरित करण्यात आले. महिलांसाठी एस टी बस भाड्यात 50 टक्के सवलत, तसेच लेक लाडकी योजनेतून मुलीला तिच्या जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत ७५ हजार रुपयांच्या निधीची मदत करण्यात येत आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या सबलीकरणाचे धोरण राबविण्यात येत असल्याकडे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लक्ष वेधले.
मराठा समाजाच्या मुलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 50 हजार रुपयांपर्यंत निधी उपलब्घ करून दिला जात आहे. आतापर्यंत 70 हजार मुलांनी याचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य शासनाने कोट्यवधी रुपयाचे व्याज भरले असून, महिलांनाही याचा लाभ होत आहे. ओबीसी समाजातील मुलांना मिळणाऱ्या सवलती सांगताना त्यांनी परदेशी शिष्यवृत्ती योजना, सारथीच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये याची मदत होत असल्याचे ते म्हणाले.
राज्य शासन सर्व समाजाच्या पाठीशी उभे असून, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, यासाठी मागासवर्ग आयोग त्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले. शिवाय मराठा समाजाचे आरक्षण, सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येत असलेले पुरावे, इंपिरीकल डेटा, ‍शिंदे समिती, मराठा आंदोलन आदी विषयांवर त्यांनी उत्तरे दिली. मराठा आंदोलनादरम्यान घडलेल्या अप्रिय घटनांबाबत बोलताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्यामुळे सर्वांनी याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ ‍शिंदे यांनी केले.
मुंबईमध्ये 2-3 वॉर्डातील स्वच्छता कर्मचारी एकत्र आणून काम केल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होते. त्यात लोकसहभाग वाढत आहे. त्यातून स्वच्छतेची चळवळ सुरु होईल, असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. आता ही चळवळ बनली असून, धारावीतील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्याचा कायापालट करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. तसेच विकासाला सर्वांनी सहकार्य करावे. विकास प्रकल्पाला विरोध करू नये, राज्याचा सर्वांगीण विकास होताना सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी एसओपी बनवण्यात यावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर दि. 11 :-  कला केंद्रावर अल्पवयीन मुली असू नयेत यासाठी या कला केंद्रांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. पोलीसमहसूलआरोग्यमहिला व बालकल्याण व कामगार  विभागाच्या सहकार्याने कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) बनवण्यात यावीअसे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

कला केंद्रांबाबत एसओपी तयार करणे संदर्भात विधान भवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे बीडचे पोलीस अधीक्षक  नंदकुमार ठाकूरनाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमपअहमदनगर पोलीस अधीक्षक  राकेश ओलालातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडेकलाताई शिंदेसुनीताताई मोरे उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्याकला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी भरोसा सेलमहिला दक्षता समितीसह पोलीसमहसूलआरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी या केंद्रांना नियमित भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कला केंद्राच्या ठिकाणी महिला राहत असलेल्या ठिकाणीची जागा सुरक्षित आहे का यासह केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडत नसल्याची खात्री करावी. याबरोबरच कला केंद्रांवर कोणतेही अवैध व्यवसाय होत नाही याची खातरजमा करावी. कला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाची मदत घ्यावी सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्याकोविड मध्ये  विधवा महिलांना मदत करण्यासाठी समिती केली होती. त्याच धर्तीवर कला केंद्रातील मुलींसाठी समिती नेमून त्या दृष्टीने त्या मुलींचे पुनर्वसन  करण्यावर भर देता येईल. कला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांच्या अल्पवयीन मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच कला केंद्रांवर काम करणाऱ्या कलाकारांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी त्यांची नोंदणी असणे आवश्यक आहे. यासाठी कामगार विभागामध्ये जशी कामगारांची नोंदणी केली जाते त्याच पद्धतीने कला केंद्रावरील कलाकारांची नोंदणी कामगार विभागाने करावी. यामधे तमाशालोक कलावंतकला केंद्रावरील महिलांचा समावेश करावाअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्यातील कला केंद्राच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागीय पुरस्काराचे वितरण

छत्रपती संभाजीनगर दि. 10: गावशिवाराची स्वच्छता, जलसंधारण, शिक्षण, शाश्वत शेती, आरोग्य आदी सोयींमुळे गावांचे स्वरूप बदलू लागले आहे. स्वच्छ गाव, पाणीदार गाव, वनसंपदेचे गाव, आदर्श गाव अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. गावांचा सर्वांगिण विकास करताना निसर्ग रक्षण, पर्यावरणाला हानी न पोचवता गावशिवाराची जैवविविधता अबाधित ठेवावी लागणार आहे. स्वंयपूर्ण गावांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी केले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय स्तरावरील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन 2020-21 व 2021-22 या वर्षातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता व विशेष पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांच्या हस्ते झाले. यावेळी  विभागीय विकास उपायुक्त सुरेश बेदमुथा, सहाय्यक आयुक्त सिमा जगताप उपस्थित होते.

पुरस्कार वितरण कार्यक्रमात संवाद साधतांना विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले की, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता चळवळ उभी राहिली आणि ती आजही अविरतपणे सुरू आहे. या अभियानाची दखल देशाने घेतली आहे. अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये वैयक्तिक, सार्वजनिक, शालेय स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जात असून मोठ्या प्रमाणात लोकसहभागाच्या माध्यमातून विकास कामे केली जात  आहेत, हे उल्लेखनीय आहे. यापुढेही गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेत स्वंयपूर्ण गावांसाठी प्रत्येकाने यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दिव्यांग बांधवापासून ते वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, गावागावात या योजनांचा लाभ या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत. प्रत्येकाने आपल्या गावात लोकसहभागातून विकास कामे केली तर ही विकासकामे राज्यातील इतर गावांनाही दिशादर्शक ठरतील. आपण नैसर्गिक स्त्रोताचा जबाबदारीने वापर केला पाहिजे, त्याचा विनाश न करता ते पुढच्या पिढीला उपयुक्त ठरतील, त्यासाठीचे प्रयत्न महत्वाचे आहेत. गावांचा विकास करताना निसर्ग जपण्यासोबतच सेंद्रिय शेतीकडेही वळावे. गावाला सुजलाम-सुफलाम करूया, असे आवाहन श्री. अर्दड यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय विकास उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी केले. त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, ग्रामविकासात पथदर्शी कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर या अभियानांतर्गत पुरस्कार दिले जातात. मराठवाडयात या अभियानात विशेष कामगिरी केलेल्या गावात पाण्याचा काटकसरीने वापर, मोठया प्रमाणात वृक्ष लागवड, प्लॅस्टीकमुक्त गाव अशा बदलासह बदलते गाव पहायला मिळते आहे. काही गावांनी अनेक वर्षापासून हे सातत्य कायम ठेवले आहे.

कार्यक्रमाचे आभार सहाय्यक आयुक्त (विकास) सिमा जगताप यांनी मानले. कार्यक्रमात लाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री बागड व हाडोळी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. माधवराव अमृतवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

 

विभागीय पातळीवरील पुरस्कार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम प्रथम पुरस्कार (विभागून) रू.10 लक्ष

जवळगाव, ता. हिमायतनगर जि.नांदेड

हाडोळी, ता.भोकर, जि.नांदेड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम द्वितीय पुरस्कार (विभागून) रू.8 लक्ष

भडंगवाडी, ता.गेवराई, जि.बीड

नळगीर, ता.उदगीर जि.लातूर

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम तृतीय पुरस्कार (विभागून) रू.6 लक्ष

कंडारी, ता.बदनापूर, जि.जालना

ब्राम्हणगाव ता.जि.परभणी

 

विशेष पुरस्कार स्व.वसंतराव नाईक पुरस्कार सांडपाणी व्यवस्थापन

मस्साजोग ता.केज, जि.बीड.

विशेष पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता

उमरा, ता.जि.हिंगोली.

 

विशेष पुरस्कार स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय

लाडगाव, ता.जि.छत्रपती संभाजीनगर

 

******

रेशीम संचालनालयातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया रद्द

नागपूर दि. ११ : रेशीम संचालनालयाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांसाठी १३ मार्च २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कोविड १९ साथ व प्रशासकीय कारणांमुळे भरती होऊ शकली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक,  प्रयोगशाळा परिचर, आदी रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. रेशीम संचालनालयाकडून १२४ रिक्त पदांची भरती प्रस्तावित असून याबाबत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल, असे रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी कळविले आहे.

०००

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...