शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 939

दौंड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १०: दौंड येथील स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. दौंड तालुक्यातील मागण्यांवर विचार करून तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी उद्घाटनानंतर झालेल्या  शेतकरी मेळाव्यात केले.

प्रांत कार्यालय उद्घाटन, तालुका क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन, दौंड – गोपाळवाडी रस्त्याचे भूमिपूजन मंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार ॲड. राहुल कुल, जयकुमार गोरे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार  अरुण शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया आदी उपस्थित होते.

श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाची अर्थव्यवस्था वेगाने विकास करत आहे. सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात असून त्याबाबत सुरू असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला आवर्जून भेट देऊन नागरिकांनी योजनांची माहिती घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

ॲड. कुल यांच्या पाठपुराव्यामुळे दौंड प्रांताधिकारी कार्यालय शासनाने मंजूर केले. भविष्यातही तालुक्याच्या मागण्यांवर कार्यवाही केली जाईल. तालुका क्रीडा संकुलामुळे खेळाडू मुलांचा फायदा होणार असून येथील मुलांनी ऑलिम्पिक स्तरापर्यंत यश मिळवावे. क्रीडा संकुल प्रकल्प उत्कृष्ट प्रकारे पूर्ण करावा, असेही महसूल मंत्री म्हणाले.

आमदार ॲड. कुल म्हणाले, स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरू झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना इतरत्र जाण्याचा त्रास, खर्च, वेळ वाचणार आहे. तालुक्यात विविध विकासकामे सुरू आहेत. तालुका क्रीडा संकुलाचेही उत्कृष्ट काम केले जाईल. जिल्हा न्यायालयाला जावे लागायचे आता वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर झाल्यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे. अष्टविनायक मार्ग, रेल्वेमुळे दौंडचे दळणवळण गतिमान झाले आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी खासदार श्री. नाईक निंबाळकर, आमदार श्री. गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रांत कार्यालय तालुका प्रशासकीय इमारतीत सुरू करण्यात आले आहे. तालुका क्रीडा संकुलाचा एकूण प्रस्ताव ८ कोटी ५० लाख रुपयांचा असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३ कोटी रुपये निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहेत.

कार्यक्रमात विविध शासकीय योजना, सेवांचा लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्र, दाखले, लाभाचे धनादेश आदी प्रदान करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत, दौंड कार्यालयाचे निरीक्षक विजय रोकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष जालिंदर आवारी आदींसह नागरिक उपस्थित होते.

0000

राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे उदगीरमध्ये शानदार उद्घाटन

विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलाच्या निधीमध्ये केली भरीव वाढ

लातूर दि.10 ( जिमाका ) राज्यात खेळ संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आशियायी स्पर्धेतील विजेत्या सुवर्ण पदक विजेत्याला 1 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 75 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय झाला असून आता आशियायी खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही 10 लाख रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

उदगीर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर( तालुका क्रीडा संकुल )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव डॉ. हनुमंत लुंगे, जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश साकोळकर, उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, यांच्यासह विविध स्पर्धा असोसिएशनचे पदाधिकारी, आठ प्रादेशिक विभागाचे खेळाडू, प्रशिक्षक यांच्यासह क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

राज्याचा क्रीडामंत्री होऊन चार महिने झाले आहेत, या काळात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने अनेक महत्वाचे निर्णय घेतले असल्याचे सांगून त्यात विभागीय क्रीडा संकुलासाठी 75 कोटी रुपये, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 50 कोटी रुपये, तालुका स्तरावरील क्रीडा संकुलासाठी 10 कोटी तर ग्रामपंचायत स्तरावर पूर्वी 7 लाख होते ते आता 14 लाख रुपये केल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

उदगीर मध्ये रुजवायची आहे खेळ संस्कृती

उदगीर, जळकोट भागात खेळ संस्कृती रुजविण्यासाठी मोठे क्रीडा संकुल उभी करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या पटांगणावर ( तालुका क्रीडा संकुल ) 9 कोटी रुपये एवढ्या निधीतून मिनी स्टेडियम उभं करत आहोत. येत्या काळात अनेक राज्यस्तरीय खेळाचे आयोजन उदगीर मध्ये केले जाणार आहे. अधिकाधिक शाळा, महाविद्यालयातील युवक, युवतीनीं खेळात प्राविण्य मिळवावे. खेळात करियर करून या भागाचे क्रीडा नैपुण्य वाढवावे असे आवाहन करून क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडुंचे, प्रशिक्षकांचे उदगीर नगरीत स्वागत केले.

या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील मुंबई,  पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर अशा एकुण ८ विभागातून १७/१९ वर्षाआतील मुले १६० व मुली १६० असे एकुण ३२०, खेळाडू आणि ३२ क्रीडा मार्गदर्शक / संघ व्यवस्थापक सहभागी झाले आहेत. तसेच राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणी करीता प्रत्येक विभागामधून ५ खेळाडू निवड चाचणी करीता असे एकूण ५१२ खेळाडू सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जनन्नाथ लकडे यांनी केले. राज्य डॉसबॉल असोसिएशनचे महासचिव प्राचार्य हनुमंत लुंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाने झाले स्पर्धेचे उदघाटन

डॉसबॉल स्पर्धेचे उदघाटन लेझिमच्या तालावर    वंदन करून झाले. अत्यंत आकर्षक डॉसबॉल नृत्यही युवक युवतींने केले. त्याचबरोबर सर्व प्रकारचे खेळ, धाडसी खेळ याचे प्रात्यक्षिक नृत्यातून सादर केले. हा सोहळा अत्यंत स्पर्धेचा उत्साह वाढविणारा ठरला.

००००००

नमो महारोजगार मेळाव्यातील नोंदणीकृत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • नमो महारोजगार मेळाव्यात ११०९७ उमेदवारांना नियुक्तीपत्रे

  • दोन दिवसांत ६३७८ उमेदवारांची नोंदणी ; ३२८३१ मुलाखती

  • महाराष्ट्रात अन्य ठिकाणीसुध्दा नमो महारोजगार मेळावे

नागपूर, दि.१० : आजपर्यंत देशात अनेक राज्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळावा हा देशात अभुतपूर्व ठरला आहे. दोन दिवसीय या मेळाव्यात ६७ हजार ३७८ उमेदवारांनी नोंदणी केली असून यापैकी ११०९७ उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नोंदणी झालेल्या उर्वरीत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन परिसरात आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर  कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दटके, विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे संचालक दिगांबर दळवी, शिवानी दाणी आदी उपस्थित होते.

नागपूर येथील नमो महारोजगार मेळाव्यात उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाह नोंदवून एक विक्रम केला आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात सर्वाधिक रोजगार देणारा हा मेळावा ठरला आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाने विशेष पुढाकार घेतला असून सर्वांच्या मेहनतीने आणि समन्वयातून हा मेळावा यशस्वी ठरला आहे. मुलाखतीच्या माध्यमातून काही लोकांना प्रतिवर्ष 10 लक्ष रुपयांचे पॅकेज मिळाले असून ही नमो महारोजगार मेळाव्याची फार मोठी उपलब्धी आहे. विशेष म्हणजे विविध कंपन्यामध्ये रोजगार मिळालेल्या 11097 उमेदवारांना नाविन्यपूर्ण कल्पनेतून एकाच क्लिकद्वारे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

पुढे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आजही उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे  उद्योग कंपन्यांना मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी शासन दुवा म्हणून काम करेल. दोन दिवसीय या मेळाव्यात कॉऊंटर बंद झाल्यावरसुध्दा नोंदणी सुरूच होती. या नोंदणीच्या माध्यमातून कंपन्यांकडे उमेदवारांचा बायोडाटा जमा झाला आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना बायोडाटाच्या आधारावर कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पाठपुरावा करावा. ज्यांना आज नियुक्तीपत्र मिळाले आहे, त्यांनी आपली गुणवत्ता सिध्द करून प्रमोशन घ्यावे, तर ज्यांना आजच्या मेळाव्यात नोकरी मिळाली नाही, अशा उमेदवारांसाठी शासनातर्फे आस्थापनांकडे पाठपुरावा सुरूच राहील, असेही श्री. फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी रिलायन्स, टाटा व अन्य काही आस्थापनांच्या सहभागासाठी सन्मान केला. नागपूरमध्ये मोठ्या संख्येने कंपन्या आल्याबद्दल आभार मानले.

दोन दिवसांत इतिहास घडला : मंत्री श्री. लोढा

नागपूर येथील नमो महारोजगार मेळावा हा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला असून मेळाव्यामध्ये सहभागी कंपन्या आणि मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता दोन दिवसांत एक नवीन इतिहास नागपूरने घडविला, असे गौरवोद्गार कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले.

माझ्या पाच मुलांचा पगारच पाच कोटीपेक्षा अधिक !

नमो रोजगार मेळाव्याच्या खर्चासंदर्भात काहींना प्रश्न पडला आहे. म्हणे, पाच कोटीपेक्षा अधिक खर्च लागला. आज या ठिकाणी आम्ही पाच उमेदवारांना सहा ते दहा लाखांपेक्षा अधिक पॅकेजचे नियुक्ती पत्र दिले. या माझ्या मुलांचा पगारच ५ वर्षात ५ कोटींपेक्षा अधिक होईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नागपूरचा हा नमो रोजगार मेळाव्याचा प्रयोग यशस्वी झाला असून अन्य विभागात व जिल्ह्यातही हे मेळावे घेण्यात येईल.

आस्थापना व बेरोजगारांसाठी मेळावे शासकीय प्लॅटफॉर्म

शासकीय नोकऱ्या शासन देण्याचा प्रयत्न करते.त्याबद्दलची माहिती शासनाकडे असते. मात्र,खाजगी आस्थापना कंपन्यांकडे असणाऱ्या जागांची माहिती घेऊन बेरोजगारांना माहिती देणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी यापुढे रोजगार मेळावे होतील.कौशल्य विकास विभाग हा यासाठीचा प्लॅटफॉर्म बनून काम करेल , असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपीटल : स्टार्टअप सुरू करण्यात महाराष्ट्र अन्य राज्यांपेक्षा पुढे आहे. आऊटलूक कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात सुरू झाले असून महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपीटल आहे. विशेषत: ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण, मार्केट लिंकेज देणारे स्टार्टअप देखील सुरू झाले आहे.

दोन दिवसात 32831 मुलाखती : नमो महारोजगार मेळाव्यात एकूण 67378 उमेदवारांची नोंदणी झाली. यात देशातील नामांकित 552 कंपन्यांनी सहभाग नोंदविला तर 38511 युवक-युवतींनी सहभाग घेतला. दोन दिवसात विविध कंपन्यांनी 32831 मुलाखती घेतल्या असून यापैकी 11097 उमेदवारांनी रोजगार उपलब्ध झाला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले. संचालन प्रांजली बारसकर यांनी तर आभार दिगांबर दळवी यांनी मानले.

००००००

 

विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करणारे ‘मिशन ई सुरक्षा’; राज्य महिला आयोग आणि मेटा यांचा संयुक्त उपक्रम

नागपूर, दि.10 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यभरातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी ‘मिशन ई सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला असून नागपुरातील वनामती सभागृहात गुरुवार (दि 14) रोजी दुपारी 2 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध महाविद्यालयातील ५०० विद्यार्थी सहभागी होणार असून मेटाचे तज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सध्या इंटरनेट हे दुधारी अस्त्र झाले आहे. त्याचे अनेक फायदे असताना, काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर मुली, महिलांना सायबर माध्यमातून आर्थिक फसवणूक, छळ, ट्रोलिंग, सेक्सटॉर्शन याला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार टाळण्याकरिता तसेच भविष्यात सायबर सुरक्षित होण्याकरिता याचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींनी सायबर सुरक्षित होण्याकरिता घ्यावयाची काळजी, कायद्यातील तरतूदी, यंत्रणांची मदत याबाबत  मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमाबाबत बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, महाविद्यालयीन मुली सायबर फसवणुकीला बळी पडल्याच्या अनेक तक्रारी माझ्यासमोर राज्यभरातून येत असतात. अशावेळी काय करावे हे मुलींना कळत नाही, कुठे दाद मागावी हे न कळल्याने मुली सहन करत राहतात. अनेकदा आपल्याकडूनच अधिकची माहिती सोशल मीडियात गेल्याने ही फसवणूक होण्याचे प्रकार होत असतात. अशावेळी घ्यावयाची काळजी, चुकीची घटना घडल्यास मदत मिळण्यासाठी असलेल्या यंत्रणा यांची माहिती राज्यातल्या प्रत्येक मुलींपर्यंत पोहोचावी यासाठी आयोगाने मेटाच्या सहकार्याने मिशन ई सुरक्षा उपक्रम हाती घेतला आहे.

00000

 

रोजगाराच्या नवक्षितिजांना तरुणांची साद

नागपूर, दि.१० : तरूणांचा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. तरूणांची ऊर्जा देशसेवेसाठी लागण्यासोबतच त्यांच्या हाताला काम देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘नमो महारोजगार मेळाव्या’तून झाले. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नागपूरात आयोजित या मेळाव्यात हजारो तरूण-तरूणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्योग, आस्थापना व विविध क्षेत्रातील संधीमुळे तरूणांच्या भविष्याचे योग्य नियोजनाचे काम या माध्यमातून शासनाने केले आहे. या मेळाव्यात काहींना रोजगार तर काहींना त्यासाठी प्रशिक्षण मिळाले.

नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देवून त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी शासनाने आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला. येथे तरुणाईला रोजगारासह त्यांच्या क्षेत्रातील नवसंधी आणि भविष्यकालीन रोजगाराच्या व्याप्तीबाबतही  माहिती  मिळाली.

नमो रोजगार मेळावा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करण्यात आला. राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत तरुणांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली. येथे प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार देणारे, रोजगार घेणारे आणि या दोघांचा मेळ करुन देणारे आयोजक असा त्रिवेणी संगम नमो महारोजगाराच्या माध्यमातून निर्माण झाला आहे. हाऊस किपिंगपासून ते आयआयटी सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रातील रोजगार येथे उमेदवारांना प्राप्त झाला आहे.  मेळावा संपल्यानंतरही प्रत्येक उमेदवाराला रोजगाराची संधी मिळेपर्यंत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नमो रोजगार मेळाव्यामध्ये सुमारे पन्नास हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. आतापर्यंत साठ हजाराच्यावर तरुणांनी येथे नोंदणी केली आहे. या मेळाव्यासाठी विदर्भातून तरुण रोजगाराच्या संधीसाठी आले होते. तरूणांना रोजगाराच्या नवीन क्षेत्राबाबत माहिती व्हावी आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्वतंत्र भव्य तीन डोम या परिसरात स्थापन करण्यात आले होते. ऑनलाइन नोंदणी , बायोडाटा सादर करणे, कॉल लेटर मिळविणे ते भविष्यकाळात  त्यांच्या संबंधित क्षेत्रात कोठे भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, याबाबतही युवकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी येथे तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे डोळ्यात नवीन आशा घेवून फिरत होते. आता आपण आत्मनिर्भर होणार, हा आनंद आणि समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. खऱ्या अर्थाने नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ५० हजार बेरोजगार युवकांना शासनाने आपल्या पंखाखाली घेतले आहे.

या मेळाव्यात आपल्या आशा आकांक्षा पूर्ण झालेल्या काजलची प्रतिक्रियाच या मेळाव्याची यशस्वीता सांगून जाते. इयत्ता आठवी पास असलेल्या काजल पुसनाके, या 31 वर्षीय महिलेला येथे हाऊसकीपिंगचे काम मिळाले. आता पैशासाठी कोणासमोर हात पसरावे लागणार नाही, हे समाधान श्रीमती काजल यांच्या चेहऱ्यावर यावेळी जाणवत होते.

रोजगार प्राप्तीतून आत्मनिर्भर होण्याची चाहुल लागण्याचे समाधान काय असते याची प्रचिती आल्याची बोलकी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी शहारे या युवतीने दिली आहे. तिच्यासारख्या असंख्य तरुण-तरुणींचा आनंद हेच या महारोजगार मेळाव्याचे यश म्हणावे लागेल. ज्ञानेश्वरी बीएच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. कला शाखेला रोजगाराच्या संधी कमी असतात, असे बरेचदा बोलल्या जाते. परंतु ज्ञानेश्वरीला नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ‘यशस्वी अकॅडमी फोर स्किल’ येथे नोकरी मिळाली आहे. आई घरकाम करते तर वडील हातमजुरीचे काम. ज्ञानेश्वरीसाठी  या रोजगार मेळाव्यात मिळालेले ‘कॉल लेटर’ म्हणजे तिच्या आजवरच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे जाणवले.

00000

रेशीम संचालनालयाची गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रिया रद्द

मुंबई दि.१० : रेशीम संचालनालयाने जाहिरात क्रमांक ०१/२०२० नुसार दि. १३ मार्च २०२० अन्वये गट-क व गट-ड संवर्गातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील वरिष्ठ तांत्रिक सहायक-२ व प्रयोगशाळा परिचर-१ सरळसेवेची पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याकरीता दि. १३ मार्च  २०२० रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.  ही भरती प्रक्रिया कोवीड २०१९ व प्रशासकीय कारणामुळे राबविण्यात आली नाही. रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील १२४ रिक्त असलेली पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. या रिक्त पदांमध्ये वरील जाहिराती मधील अनुसूचित जमाती प्रवर्गाची पदे समाविष्ठ असल्याने जाहिरात क्रमांक ०१/२०२० दि. १३ मार्च २०२० अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे असे नागपूर येथील रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

पुणे, दि.10: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे  भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच या स्मारकाचे दृश्य स्वरूप हे सावित्रीबाईंच्या काळाप्रमाणे असावे, त्यासाठी जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. स्मारकासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक राजेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश सूळ, महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा’ अशी वाटली पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदाकडून वेगवेगळे आराखडे तयार करुन घ्यावेत. आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, फर्निचर,  क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्यापद्धतीचे दर्शनी भाग आदी बाबींचा विचार व्हावा. जागेचा विचार करता शाळेच्या इमारतीत उद्वाहकाची  व्यवस्था करावी.

या परिसरात वाहनतळाची इतरत्र व्यवस्था करण्याच्यादृष्टीने चाचपणी करावी. स्पर्धात्मक युगाचा विचार करता या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्यादृष्टीने शाळेची रचना व आधुनिक अभ्यासक्रमाबाबत महानगरपालिकेने चाचपणी करावी. समितीने आराखडा अंतिम केल्यानंतर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे. स्मारक पूर्ण झाल्यानंतर अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे श्री. भुजबळ म्हणाले.

महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा यांना जोडणाऱ्या मार्गाचे आरक्षण नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. आरक्षण निश्चितीनंतर पुणे महानगरपालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करावी. यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी. नागरिकांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असेही श्री. भुजबळ म्हणाले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. ढाकणे आणि संचालक श्री. पाटील यांनी कामाच्या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.

०००००

 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत अवघ्या १७ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य; १९ हजाराहूंन अधिक रुग्णांचे वाचले प्राण

मुंबई दि. 10 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १७ महिन्यात १९ हजार पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण १५६ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली.ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाख, एप्रिल मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, जुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख, ऑगस्ट मध्ये १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाख, तर सप्टेंबर मध्ये विक्रमी १४०८ रुग्णांना ११ कोटी ७७ लक्ष रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे.यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी ,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया , केमोथेरपी,  डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया,रस्ते अपघात ,विद्युत अपघात ,भाजलेले रुग्ण ,जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

000

‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तक प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर पुरस्कार वितरण सोहळ्याचे राजभवन नागपूर येथे १२ डिसेंबरला आयोजन :  मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई,दि.10 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे नागपूर येथे 12 डिसेंबर रोजी सायंकाळी  5.00 वाजता राजभवन नागपूर येथे  आयोजन केले आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महाराष्ट्र हा आपल्या महापुरुषांच्या कर्तृत्वाने, प्रेरणेने आणि विचारान  समृध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतीराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर या महापुरुषांच्या कौशल्य विषयक अप्रतिम ध्येय धोरणाची ओळख व महात्म्य आजच्या विशेषत: कौशल्य शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीला होणे गरजेचे आहे.या महापुरुषांनी आपल्या काळात समाज जीवनामध्ये कौशल्य विकासाचे तत्त्व यशस्वीपणे अंगिकारले होते.”महापुरुषांचे कौशल्य विचार” या पुस्तकात महापुरुषांच्या कौशल्य विषयक कार्याचा, धोरणाचा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये समावेश केल्यामुळे व्यवसाय शिक्षण अधिक समृद्ध होऊन विद्यार्थ्याचे कौशल्य  वाढण्यासही मदत होणार आहे. आयटीआयच्या सद्यस्थितीतील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त “महापुरुषांचे कौशल्य विचार” हा विषय विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय स्तरावर गठीत समितीने तयार केलेल्या या माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार  आहे असेही मंत्री श्री. लोढा म्हणाले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बहुआयामी व्यक्तीमत्व स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर यांच्या नावाने  शैक्षणिक, सामाजिक आणि कौशल्य विकास क्षेत्रात भरीव योगदान देणा-या व्यक्तींना स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान  पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर,कौशल्य विकास,  रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबईचे उप आयुक्त दि.दे.पवार यासह आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००००

देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

मुंबई, दि. ९:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला धोकादायक समुद्र किनारा परिसरात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. समुद्र किनारी धोकादायक परिस्थिती असेल तर स्थानिकांकडून दिली जाणारी माहिती व प्रशासनाकडून दिला जाणारा इशारा याकडे पर्यटनासाठी गेलेल्यांनी दुर्लक्ष करू नये असे आवाहनही केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.
000

ताज्या बातम्या

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

0
रायगड दि. ७ जून : रोहा-अष्टमी नगर परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणाऱ्या ‘शिवसृष्टी’ या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री ...

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

0
सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश...

व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ६ :- भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि. ६ :  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक...

“पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जळगाव, दि. ६ – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या...