बुधवार, मे 7, 2025
Home Blog Page 9

डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक – डॉली सिंग

मुंबई, दि. ०३ : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिता, विषयांची प्रभावी मांडणी, व्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक असते, असे मत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर डॉली सिंग यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत “Connecting Creators, Connecting Countries” या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी देश-विदेशातील नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते.

डिजिटल माध्यमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी करण्यासाठी प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. यामध्ये नाविन्यता आणि नियमित  दर्जेदार मजकूर अपलोड  करणे गरजेचे असते,असे सिंग यांनी यावेळी सांगितले.

सोशल मीडियावरील पोस्टसाठी आवश्यक व्हिडिओ, मजकूर,विषय मांडण्याची पद्धत, संपादनाची शैली आणि सादरीकरणाची पद्धत हे सर्व घटक वेगळेपण सिद्ध करतात. तसेच कोणतीही प्रसिद्धी करण्यापूर्वी सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ, टीझर किंवा ट्रेलर प्रसिद्ध करणे आवश्यक असते तरच त्या इव्हेंटबाबत उत्सुकता निर्माण होते आणि प्रेक्षक जोडले जातात असे सांगून डॉली सिंग यांनी स्वतःच्या अनुभवातून कंटेंट निर्मितीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रीत

मुंबई, दि. ०३ : डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा राहिलेला नाही. विश्वासार्हता, पारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी माध्यम संस्थांना आता नव्या रणनीतीची गरज आहे, असे मत वरिष्ठ पत्रकार आणि संपादकांनी परिसंवादात व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये ‘इव्होल्यूशन ऑफ डिजिटल न्यूज : स्टेइंग रिलीव्हेंट इन द एज ऑफ इन्फॉर्मेशन ओवरलोड’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी बिझनेस टुडेचे संपादक सिद्धार्थ झराबी यांच्या सूत्रसंचालन केले. या चर्चेत मनीकंट्रोलचे कार्यकारी संपादक नलिन मेहता, द इंडियन एक्सप्रेस डिजिटलचे सीईओ संजय सिंधवानी, आरटी इंडियाचे कार्यकारी संपादक अशोक बजरिया यांनी सहभाग घेतला.

झराबी यांनी सांगितले की, डिजिटल युगात वितरणाची साखळी आता केवळ काही मोजक्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या हातात आहे, त्यामुळे कधी कधी त्या विशिष्ट ग्राहकांपर्यंत पोहोचतात, त्यांचे डेटा आणि अल्गोरिदम त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पारंपरिक माध्यम संस्थांची भूमिका आणि त्यांचे अस्तित्व याबाबत बदलणाऱ्या संदर्भात विचार करण्याची गरज भासू शकते. डिजिटल माध्यमांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात क्रांती केली असली, तरी या बदलासोबत अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.

सिंधवानी यांनी सांगितले की, डिजिटल युगात बातमी पोहोचवणाऱ्या पारंपरिक यंत्रणा मागे पडल्या आहेत. पूर्वी माध्यम संस्थांकडे कंटेंटपासून वितरणापर्यंत सर्व नियंत्रण होते. पण आता सर्च इंजिन्स, सोशल मीडिया आणि ‘एआय’ या तंत्रज्ञान कंपन्यांकडे ग्राहकांचे लक्ष आहे, त्यांच्याकडे डेटा आहे, आणि त्यांचे अल्गोरिदम्स निर्णायक ठरत आहेत.

मेहता यांनी सांगितले की, आजचे युग हे ‘न्यूज’ची व्याख्या पुन्हा लिहित आहे. पूर्वी संपादक ठरवत असत की जनतेने काय वाचावे. पण आजचा डिजिटल वापरकर्ता आपल्या गरजांनुसार कंटेंट शोधतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बनवलेली बातमी आता अप्रासंगिक ठरू शकते. आता पत्रकारांना ग्राहक शोधावा लागतो. ‘जर्नालिझम बाय डिफॉल्ट’ चं युग संपलंय,” असे त्यांनी स्पष्ट केले. बातमी ही आता एकटी उभी राहत नाही. तिच्याभोवती सखोल माहिती आणि विश्लेषण हवे असते, असे बजरिया यांनी सांगितले.

वापरकर्त्यांकडे आज इतकी माहिती आहे की कोणती बातमी खरी, अचूक आणि विश्वासार्ह याबाबत आव्हानात्मक परिस्थिती येवू शकते. सर्वच गोष्टी ‘फॉरवर्ड’ स्वरूपात फिरत आहेत. माहितीचा अतिप्रवाह आहे. डिजिटल माध्यमांवर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. ‘एआय’मुळे बातमी संकलनाचे स्वरूप बदलत चालले आहे. अनेक पूर्वनियोजित, डेटा-आधारित गोष्टी ‘एआय’ करू शकतो. पण दृष्टीकोन, मुलाखती, विश्लेषण हे मानवी मन आणि बुद्धीचेच काम आहे. त्यामुळे पत्रकारांनी आता अधिक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे, असे सूर चर्चेत उमटला.

०००

गजानन पाटील/ससं/

 

जळगावातील शासकीय आरोग्यसेवा हायटेक; संपूर्ण सुविधा असलेले राज्यातील पहिले केंद्र– पालकमंत्री गुलाबराव पाटील

मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होणारे रुग्णालय; राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये– जलसंपदामंत्री गिरीश महाजन

जळगाव, दि. ०३ (जिमाका): जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून, आज अद्ययावत एमआरआय मशीनचे लोकार्पण झाल्यामुळे एवढ्या सुविधा असलेले हे राज्यातील पहिले केंद्र ठरले, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होतील, असे सांगून राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.

केंद्र व राज्य शासनाच्या ईडब्ल्यूएस योजनेंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक थ्री टी एमआरआय मशीन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते, तर जलसंपदा मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यान्वित करण्यात आले.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजू भोळे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शेकडो नवजात बालकांना जीवनदान देणारी मिल्क बँक, मुतखड्यांसारख्या वेदनादायक आजारांवर मात करणारी लेझर मशीन यांसह अनेक अद्ययावत साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आज एमआरआय मशीन कार्यान्वित झाले असून, लवकरच सीटी स्कॅन मशीनही बसवण्यात येईल. अशी सर्व सुविधा असलेले हे शासकीय रुग्णालय राज्यातील पहिलेच आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

तर वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय असे सर्व समाविष्ट असलेले देशातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री महाजन यांनी दिली.

मंत्र्यांकडून एमआरआय मशीनची पाहणी

हे मशीन कसे कार्य करते, त्यातील नव्या तंत्रज्ञानाचे स्वरूप काय आहे, दररोज किती रुग्ण तपासले जातील, यासारखी माहिती मंत्री पाटील व मंत्री महाजन यांनी जाणून घेतली.

थ्री टी एमआरआय मशीनची वैशिष्ट्ये

ही यंत्रणा मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानावर आधारित असून ती शरीरातील अंतर्गत अवयवांची अति सुस्पष्ट प्रतिमा निर्माण करते. मेंदू, मज्जासंस्था, हृदय, सांधे, कर्करोग निदान, पचनसंस्था आणि प्रजननसंस्थेतील तपासण्यांसाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरते. किरणोत्सर्ग न होत असल्याने ही चाचणी सुरक्षित आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

रुग्णांनी घ्यावयाची काळजी :

एमआरआय करताना धातुरहित कॉटनचे कपडे परिधान करावेत. कोणतीही धातूची वस्तू अंगावर न ठेवावी. पूर्वीच्या सर्व तपासणी अहवालांची फाईल सोबत आणावी. पेसमेकर, कॉक्लीअर इम्प्लांट, धातूचे इम्प्लांट असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचे लिखित प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. ही तपासणी पूर्वनियोजित वेळेनुसार होणार असून, शासन निर्धारित शुल्क आकारले जाईल.

आजपासून ही सेवा कार्यान्वित झाल्यामुळे जळगाव व परिसरातील नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. गिरीष ठाकूर यांनी केले आहे.

०००

जागतिक माध्यम संवाद २०२५ : सदस्य राष्ट्रांद्वारे वेव्हज जाहीरनाम्याचा स्वीकार

‘एआय’च्या युगात सर्जनशीलतेला प्रोत्साहन देताना परंपरा आणि वारशाला अभिव्यक्ती देण्यासाठी दर्शवली सहमती

पक्षपात कमी करत, सामग्रीचे लोकशाहीकरण करून आणि नीतिमत्तेला प्राधान्य देताना उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापराद्वारे डिजिटल दरी भरून काढण्याचा वेव्हज जाहीरनाम्याचा प्रयत्न

वेव्हज जाहीरनामा लोकांना एकत्र करण्यासाठी, सामायिक सांस्कृतिक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी, जागतिक स्तरावर परस्परसंबंधित बाजारपेठांमध्ये नावीन्यपूर्णता आणि लवचिकता वाढवण्यासाठी माध्यम आणि मनोरंजनाच्या सामर्थ्यास देतो दुजोरा

संबंधित कौशल्य विकासाद्वारे सर्जनशील सहकार्याच्या युगासाठी तरुण प्रतिभावंत तयार करणे महत्त्वाचे आहे : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

सह-निर्मिती करार, संयुक्त निधी आणि संकल्पनांच्या द्रुतगती मार्गावर सर्जनशीलतेचा जागतिक पुलाचा विस्तार करण्यासाठी जाहीरनाम्यावर भर द्या : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई, २ :-“सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे.” सध्या सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान (वेव्हज २०२५) मुंबईत झालेल्या जागतिक माध्यम संवादाच्या अनेक निष्कर्षांपैकी हा एक निष्कर्ष होता. डिजिटल दरी कमी करण्याच्या मार्गावर आपण सर्वजण वाटचाल करत असताना देशांमध्ये सर्जनशील जागा वाढवणे ही आपल्या सामूहिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, याची अनुभूती संवादात सहभागी झालेल्या राष्ट्रांनी घेतली. वाढत्या जागतिकीकरण झालेल्या माध्यम वातावरणात जागतिक शांतता आणि सौहार्द वाढविण्यासाठी सरकारांच्या भूमिकेवर हा संवाद केंद्रित होता, ज्याची सांगता सदस्य राष्ट्रांनी वेव्हज जाहीरनामा स्वीकारून झाली.

जगभरातील संस्कृतींचे चित्रण करणारे चित्रपट लोकांमधील जिव्हाळा वाढवण्याची प्रचंड क्षमता बाळगतात या भावनेला जागतिक माध्यम संवादाने प्रतिध्वनीत केले आणि सहभागी राष्ट्रांनी या संदर्भात भारतीय चित्रपटांच्या भूमिकेची प्रशंसा केली. कथाकथनाचे एक मनोरंजक स्वरूप म्हणून, चित्रपट परस्परांशी सहयोग करण्यासाठी बलशाली ठरतात. कथाकथनाच्या कलेत तंत्रज्ञानाचा संगम मनोरंजन जगाला पुन्हा परिभाषित करत असताना, सर्जकांच्या अर्थव्यवस्थेत बलशाली म्हणून वैयक्तिक कथा देखील वेगाने उदयास येत आहेत. काही सदस्य राष्ट्रांनी “जबाबदार पत्रकारितेला” प्रोत्साहन देण्याच्या गरजेबद्दल चिंता व्यक्त केली. वेव्हज च्या मंचावर परस्पर सहकार्याने यावर तोडगा निघेल असे त्यांना वाटले.
वेव्हज २०२५ ला जागतिक समुदायाचे सूक्ष्म जग म्हणून संबोधित करताना, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, ही शिखर परिषद माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी भविष्यातील रूपरेषा ठरवण्यासाठी सर्जक, धोरणकर्ते, अभिनेते, लेखक, निर्माते आणि पडद्यावरील कलाकारांना एका समान मंचावर एकत्र आणते.

जागतिक माध्यम संवाद, २०२५ मधील आपल्या भाषणादरम्यान डॉ. जयशंकर यांनी विचाराधीन असलेल्या व्यापक रूपरेषांवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की जागतिक व्यवस्था, ज्याला एक मजबूत सांस्कृतिक आयाम आहे, आज परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे. “आपल्या परंपरा, वारसा, कल्पना, पद्धती आणि सृजनशीलतेला आवाज देणे आवश्यक आहे”, असे ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की तंत्रज्ञान आणि परंपरा यांनी हातात हात घालून चालले पाहिजे, कारण तंत्रज्ञान आपल्या विशाल वारशाबद्दलची जागरूकता आणि त्याबद्दलच्या जाणीवेची सघनता वाढवू शकते, विशेषतः तरुण पिढ्यांसाठी. “संबंधित कौशल्य विकासाद्वारे तरुण प्रतिभेला सर्जनशील सहकार्याच्या युगासाठी सज्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विकसित भारत उभारण्याच्या दृष्टीने झेप घेण्यासाठी नवोन्मेष ही गुरुकिल्ली आहे”, असे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. जयशंकर म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयोन्मुख युगात शक्यता या कल्पनेच्याही पलीकडे आहेत, तरीही पक्षपात कमी करून, सामग्रीचे लोकशाहीकरण करून तसेच त्याच्या नीतिमत्तेला प्राधान्य देऊन उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर करण्याची आवश्यकता आहे. “जागतिक कार्यस्थळ आणि जागतिक कार्यबलासाठी मानसिकता, चौकट, धोरणे आणि पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहेत”, अशा शब्दांत त्यांनी जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासमोरील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करताना वेव्हजवर विश्वास असल्याचा पुनरुच्चार‌ केला.

आपल्या स्वागतपर भाषणात संवादाचा सूर निश्चित करत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरणा देते, जी सीमा ओलांडून लोकांना जोडते. त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानामुळे आपल्या कथाकथनाच्या पद्धतीत बदल होत असल्याने सामग्री निर्मिती आणि वापरही वेगाने बदलत आहेत. आपण अशा वळणावर आहोत जिथे आपल्याला स्थानिक सामग्री निर्मितीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
७७ देशांमधील प्रतिनिधींचे स्वप्ननगरी मुंबईत स्वागत करताना वैष्णव यांनी सहकार्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. सामायिक यशासाठी आपण सर्वांनी सह निर्मिती विषयक करार, संयुक्त निधी आणि घोषणापत्र यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानातील तफावत दूर होईल, बंधुभाव, जागतिक शांतता आणि सौहार्द्र वाढीस लागेल असे ते म्हणाले. अशाप्रकारे आपल्याला सर्जनशीलतेचा वैश्विक सेतू नवकल्पनांच्या महामार्गापर्यंत विस्ताराला पाहिजे, असे वैष्णव यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चासत्रात, मंत्रीस्तरीय वरिष्ठ प्रतिनिधींनी आपली मते मांडली. वेव्हज परिषदेच्या पहिल्या हंगामात क्रिएट इन इंडिया चॅलेंज उपक्रमाअंतर्गत झालेल्या ३२ स्पर्धांमधून जगभरातील ७०० अव्वल आशयकर्ते जगासमोर आले आहेत, अशी माहिती भारताने सहभागी देशांना दिली. तसेच पुढील हंगामापासून हे चॅलेंज २५ जागतिक भाषांमध्ये घेतले जाईल ज्यामुळे जगभरातील विविध भाषांमधील सर्जनशील प्रतिभा ओळखता येईल, यामुळे त्यांना वेव्हजच्या मंचावर त्यांच्या सर्जनशील आशयाचे सादरीकरण करता येईल, असेही भारताने सांगितले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि भारत सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.
0000
सागरकुमार कांबळे/ससं/

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ – विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यूकेशन सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् २०२५ परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी सिडको आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ.अन्बलगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२५ मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वेव्हज परिषदेत हा करार करण्यात आला. हे विद्यापीठ नवी मुंबई येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणाऱ्या ‘एज्युसिटी’ प्रकल्पामध्ये आपले कॅंपस उभारून जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र निर्माण करणार आहे. यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने १५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

या करारावर सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर यांनी स्वाक्षरी केली.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/

अखिल भारतीय सिनेमा दंतकथा नाही; चित्रपट उद्योगातील दिग्गजांचा भारतीय चित्रपटातील एकतेवर भर

  • कोविडनंतर चित्रपट पाहण्यातील बदलते कल अनुपम खेर यांनी केले अधोरेखित
  • ज्यावेळी आपली परस्पर सामायिक संस्कृती, गाणी, कथा, माती याचा आदर करता, त्यावेळी तो चित्रपट बनतो ‘भारतीय’: खुशबू सुंदर

मुंबई, दि. ०२ : मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे सुरू असलेल्या सुरू असलेल्या  जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत (WAVES 2025)  आज अखिल भारतीय चित्रपट : दंतकथा  आथवा चालना असलेले वास्तव (Pan-Indian Cinema: Myth or Momentum) या विषयावर निमंत्रितांचे प्रेरणादायी चर्चासत्र झाले. नमन रामचंद्रन यांनी या सत्राचे सूत्रसंचालक म्हणून भूमिका पार पाडली. यासोबतच  नागार्जुन, अनुपम खेर,  कार्ती  आणि  खुशबू सुंदर  असे  भारतीय चित्रपट उद्योग क्षेत्रातील चार मान्यवर  या चर्चासत्रात सहभागी झाले.  या सर्वांनी उपस्थितांना गुंतवून  ठेवणारा संवाद साधला.

चित्रपटाची ताकद ही त्यातल्या भावनिक संदर्भांशी जोडलेली असते याचे स्मरण खुशबू सुंदर यांनी श्रोत्यांना करून दिले. भारतातील चित्रपट हे सर्व भारतीयांना आपलेसे वाटावेत,  अशा उद्देशानेच तयार केले जातात, त्यामुळेच बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपट उद्योगक्षेत्रात कोणताही भेदभाव केला जाऊ नये,  ही  बाब त्यांनी ठामपणे अधोरेखित केली.  ज्‍यावेळी  तुम्ही आपल्या परस्पर सामायिक संस्कृती, आपली गाणी, आपल्या कथा, आपल्या मातीचा आदर करतात, त्यावेळी तो चित्रपट प्रादेशिक किंवा राष्ट्रीय न राहता ‘भारतीय’ चित्रपट बनतो. यातूनच सर्व गोष्टींचे मूळ एकाच ठिकाणी असल्याचीही जाणिव आपल्याला होते,  असे निरीक्षणही त्यांनी मांडले.

नागार्जुन यांनीही अशीच  भावना व्यक्त केली. त्यांनी आपल्या मनोगत आणि विचारांतून भारतातील चित्रपट निर्मितीच्या परंपरांना एकत्र जोडणाऱ्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा गौरव केला. कथात्मक मांडणीच्या क्षेत्रातील कलाकारांना प्रेरणा देणाऱ्या असंख्य भाषा, चालीरीती आणि भूप्रदेशांबद्दलची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. आपल्या मूळ जे आहे, त्‍याचा  अभिमान बाळगल्याने सर्जनशीलतेला कुठेही मर्यादा येत नाहीत, तर त्याउलट यामुळे सर्जनशीलता अधिक मुक्त होत असते, याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. हेच भारतीय चित्रपटांचे खरे सार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

अनुपम खेर यांनी कोविड-19  साथीमुळे सिनेमा पाहण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलाबद्दल सांगितले. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी वेगवेगळे स्रोत वापरू लागले, विविध प्रदेशांमधील नव्हे, तर केवळ भारतातील चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढल्याचे ते म्हणाले. आपल्या कलेच्या सादरीकरणात प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला. ‘तुम्ही एखाद्या पौराणिक कथेचे मोठ्या पडद्यावर प्रसारण करत असाल किंवा एखादे नाटक दाखवत असाल, तरी कथाकथनातील प्रामाणिकपणाची  कधीच तुम्ही  साथ सोडता कामा नाही. प्रेक्षकांना नाट्यमयता आवडते, तरीही कथाकथनातील सच्चेपणाला ते नेहमीच दाद देतात  आणि चित्रपटात हीच गोष्ट सर्वात प्रभावी ठरते,’ असे  ते म्हणाले.

याच मुद्द्यावर कार्ती म्हणाले की, प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभवाचे नेहमीच आकर्षण असते. प्रेक्षकांना आज वैविध्यपूर्ण आशय  सहज उपलब्ध असूनही, गाणी, नृत्याची जादू, आणि शौर्यगाथा पाहण्यासाठी ते आजही चित्रपटगृहात गर्दी करतात.

या चर्चासत्रात सहभागी झालेल्या वक्त्यांनी  ‘प्रादेशिक’ चित्रपटांच्या कल्पने पलीकडे जाऊन ‘भारतीय चित्रपट’ ही संकल्पना आत्मसात करण्याचे महत्त्व विषद केले. भावना आणि प्रामाणिकपणाचे महत्व अधोरेखित करून, भारतीय सिनेमाची खरी ताकद विभाजनात नसून, आपल्या मातीत रुजलेल्या एकतेत आहे, आणि हाच वेग भारतीय सिनेमाला पुढे घेऊन जाईल, असे अधोरेखित केले.

‘वेव्हज्’ने मांडली जागतिक स्ट्रीमिंग आणि चित्रपट अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका

“आशयाने खऱ्या अर्थाने सीमा ओलांडून प्रवास करावा यासाठी भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे” – शिबाशिष सरकार

सर्जनशीलतेत जोखीम घेणे आवश्यक असले तरी, आशय संग्रह संतुलित आणि संरचित असला पाहिजे – एकता कपूर

मुंबई, २ :-आज मुंबईत आयोजित “जागतिक चित्रपट आणि प्रदर्शन अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका” या विषयावरील मुख्य सत्रात मीडिया आणि कंटेंटचे भविष्य घडवणारे प्रमुख एकत्र आले होते. यात इरॉस नाऊ (एक्सफिनाइट ग्लोबल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम तन्ना; प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशिष सरकार; बालाजी टेलिफिल्म्सच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक एकता आर. कपूर; तसेच गुगलच्या अँड्रॉइड टीव्हीच्या उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शालिनी गोविल पै यांचा समावेश होता.

भारताच्या कथात्मक मांडणीच्या खोलवर रुजलेल्या परंपरेवर प्रकाश टाकताना, शिबाशिष सरकार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या एक शतक जुन्या प्रवाहापासून आजच्या गतिमान स्ट्रीमिंग व्यासपीठापर्यंतच्या उत्क्रांतीबद्दल माहिती दिली. स्ट्रीमिंग व्यासपीठामुळे भारतीय कथांना जागतिक प्रेक्षक मिळू शकले आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र, आशयाचा सीमेपलीकडे खऱ्या अर्थाने प्रवास घडण्यासाठी, भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. संस्थात्मक भांडवल सहयोगासाठी केंद्रित, संपूर्ण भारत या दृष्टिकोनाचे आवाहन त्यांनी केले.

आकर्षक कथात्मक मांडणीहे जागतिक यशाच्या केंद्रस्थानी आहे हे अधोरेखित करताना एकता आर. कपूर यांनी कथा जितकी अधिक हृदयाशी जवळ आणि भावनिकदृष्ट्या प्रगल्भ असेल तितकीच ती आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांशी जोडली जाण्याची शक्यता जास्त असते यावर भर दिला. वेदना, उत्कटता आणि आशा यासारख्या भावना सार्वत्रिक असतात, असेही त्यांनी सांगितले. सर्जनशीलतेत जोखीम घेणे आवश्यक असले तरी, गुंतवणूक जोखीम कमी करण्यासाठी आणि स्पर्धात्मक परिसंस्थेत दीर्घकालीन व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी आशय संग्रह संतुलित आणि संरचित असला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

जागतिकीकरण हा आजच्या आशयनिर्मितीतील सर्वात परिवर्तनकारी प्रवाह आहे, असे शालिनी गोविल पै यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे वितरणातील अडथळे दूर झाले असून कथात्मक मांडणीचा जागतिक स्तरावरील प्रसार सुलभ झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे निर्मितीची प्रक्रिया वेगवान, प्रभावशाली व माहिती आधारित झाली असून आशयनिर्मितीमध्ये क्रांतिकारक बदल घडवत आहे. भारतीय आशय निर्मात्यांनी पारंपरिक पद्धतीच्या पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे जागतिक स्तरावर सर्वांना भावतील अशा आशयघन कथांचे सादरीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले. आधुनिक काळात कंटेंट डिस्कव्हरी महत्त्वपूर्ण होत आहे आणि यशाची पुढील लाट स्मार्ट नेव्हिगेशन, डिस्कव्हरेबिलिटी आणि तंत्रज्ञानाधारित कथाकथनावर अवलंबून असेल, असे त्या म्हणाल्या.

भारताचा डिजिटल संस्कृतीला सरावलेल्या प्रेक्षकवर्गासाठी आता कथाकथनाच्या रचनेत बदल करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण विक्रम टन्ना यांनी नोंदवले. प्रेक्षकांचा लक्ष केंद्रित राहण्याचा कालावधी कमी होत असून मोबाईलचा वापर वाढत चालला आहे, त्यामुळे नवीन आशयातील आवाज, मतप्रवाह व लक्ष वेधून घेण्याची क्षमता महत्वाची ठरेल, असे ते म्हणाले. यशासाठी तीन महत्वाच्या प्रवाहांचा त्यांनी उल्लेख केला: तंत्रज्ञानाची नवीन परिभाषा, अनुभवाधारित कथाकथन व निष्ठावंत चाहत्यांना आकर्षित करणारे आयपी तयार करणे. जेन ए आय ही आशयनिर्माते व व्यासपीठांसाठी क्रांतिकारक संधी असून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे, उत्पन्न मिळवणे व आवडीनुसार सर्वांना काहीतरी आशय मिळवून देणे यासाठी नवनवीन मार्ग प्रदान करते.

भारत जागतिक स्तरावर कंटेंट पॉवरहाऊस अर्थात आशयनिर्मितीची गंगोत्री बनण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. पायाभूत सुविधांमध्ये योजनाबद्ध गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर व मौलिक तसेच गुणवत्तापूर्ण कथा सादरीकरणाप्रती वचनबद्धता असल्यास जागतिक माध्यमांच्या नवोन्मेषात भारत सहज नेतृत्व करू शकतो , असा निष्कर्ष या सत्राच्या शेवटी समोर आला.

जगाचे आशय निर्मिती केंद्र बनण्याकरिता भारतासाठी उत्तम काळ  – अभिनेत्री श्रद्धा कपूर

  • भारत आशय निर्मितीत अभूतपूर्व वाढ अनुभवत आहे –  इंस्टाग्राम प्रमुख अॅडम मोसेरी
  • वेव्हज्‌ २०२५ मध्ये अनौपचारिक संभाषणात कल आणि व्हायरल होणे यावर विचारमंथन

मुंबई, दि. ०२ : इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म वर सामग्रीचे लोकशाहीकरण अधोरेखित करताना “आज, स्मार्टफोन असलेला कोणीही सर्जक आणि निर्माता असू शकतो”, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांवर विश्वासार्ह उपस्थितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रद्धा यांनी भारताच्या कथाकथनाच्या खोलवर रुजलेल्या वारशावर भर दिला. “आपण कथा ऐकत मोठे झालो – आपण आज जे आहोत याचा एक भाग आहेत कथा,” असे त्यांनी उद्धृत केले.

भारतीय सर्जकांसाठी सध्याचा काळ सुवर्णकाळ आहे असे नमूद करताना डिजिटल तंत्रज्ञान, परवडणारा डेटा आणि उत्साही युवा लोकसंख्येच्या एकत्रीकरणाकडे त्यांनी लक्ष वेधले आणि “भारतासाठी जगाचे आशय निर्मिती केंद्र बनण्याचा हा एक उत्तम  काळ आहे,” असे मत व्यक्त केले. समाज माध्यमावरील यशोगाथा सांगताना, श्रद्धा यांनी आशय मांडणीतील विश्वासार्हतेच्या शक्तीवर आणखी भर दिला. “जेव्हा आशयनिर्मिती अंतःकरणातून होते तेव्हा ती साहजिकच लोकांना भावते. मी नेहमीच धोरणात्मक होण्याऐवजी विश्वासार्ह आशय पोस्ट करण्याचा प्रयत्न करते,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.

श्रद्धा यांनी भारताच्या मीम संस्कृतीच्या वाढत्या प्रभावावर आणि इंस्टाग्रामसारखे प्लॅटफॉर्म, त्यांच्या ट्रेंडिंग ऑडिओ आणि हॅशटॅगसह, जनरेशन झेड प्रेक्षकांना आकर्षित करण्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावतात यावरही प्रकाश टाकला. प्रत्येक पिढी आपला अनोखा आवाज शोधते असे  सांगून   ट्रेंड किती लवकर तयार होतो आणि विकसित होतो हे पाहणे लक्षणीय आहे असे त्या म्हणाल्या.

इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी भारतातील डिजिटल आशय निर्मितीत अत्यंत वेगाने होत असलेल्या परिवर्तनाबद्दल आपले विचार सामायिक करताना मेटाचा जागतिक दृष्टीकोन विशद केला. डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये क्रांती झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले, डेटाची कमी होत असलेली किंमत आणि हाय-स्पीड इंटरनेटची व्यापक उपलब्धता यामुळे सामग्री निर्मात्यांसाठी नवीन दरवाजे खुले झाल्याचे नमूद  केले. भारतीय डिजिटल जगाशी जोडले जाण्यात तंत्रज्ञानाने कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे” याचा उल्लेख करत भारतात आशय निर्मितीमध्ये अभूतपूर्व वाढ दिसून येत आहे,” असे मोसेरी म्हणाले,.

इंस्टाग्रामवर अभिव्यक्तीचा प्रमुख प्रकार बनलेल्या व्हिज्युअल आशयाचा, विशेषत: रील्सच्या वर्चस्वाचा त्यांनी ऊहापोह केला. “व्हिज्युअल आशय मूलतःच अधिक आकर्षक आणि प्रभावी असतो. रील्सनी प्रत्येक व्यक्तीला तिच्या गोष्टी थोडक्या स्वरुपात आणि अधिक प्रभावी पद्धतीने सांगण्यास सक्षम बनविले आहे, जागतिक प्रेक्षकांशी जोडले जाण्यासाठी एक सृजनशील व्यासपीठ प्रदान केले आहे,” मोसेरी यांनी स्पष्ट केले.

“सृजनशील अभिव्यक्ती सक्षम करणे : जेन झी आशयाचा वापर कसा करते ” या विषयावरील परिसंवादात  केवळ संभाषणच नव्हते; तर भारताच्या अमर्याद सृजनशील क्षमतेचा गौरव होता त्याचबरोबर डिजिटल कथनकारांच्या पुढच्या पिढीला सशक्त बनवण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका कशी बदलत आहे याचाही समावेश होता. डिजिटल प्लॅटफॉर्मने आशय निर्मितीच्या लोकशाहीकरणाचे काम सुरू ठेवल्यामुळे, संस्कृती, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा संगम जेन झी साठी आशय वापराच्या भविष्याला कसा आकार देत आहे, हे देखील या सत्रातून स्पष्ट केले गेले.

0000

भारतीय सर्जनशीलतेला भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था सारख्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी वचनबद्ध – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

• वेव्हज 2025 मध्ये भारतात निर्मिती करण्याच्या आव्हानांतर्गत 32 सर्जनशील आव्हानांच्या विजेत्यांचा सन्मान
• 60 हून अधिक देशांमधील 750 हून अधिक अंतिम स्पर्धक नाविन्य आणि प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र
• “तरुण मने सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांचे सुंदर संमिश्रण कसे करतात याचे हे व्यासपीठ एक उत्कृष्ट उदाहरण :” राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

मुंबई, २ :-जगभरातील सर्जकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारतात निर्मिती आव्हानाच्या (सीआयसी) पहिल्या सत्राचा समारोप वेव्हज 2025 मध्ये एका भव्य समारंभात झाला, ज्याने भारताच्या सर्जनशील परिदृश्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा चिन्हांकित केला. या ऐतिहासिक कार्यक्रमात माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या ३२ विविध आव्हानांच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला, त्यात अॅनिमेशन, गेमिंग, चित्रपट निर्मिती, कृत्रिम प्रज्ञा, संगीत आणि डिजिटल कला यांचा समावेश होता.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तरुण सर्जक आणि दूरदृष्टी असलेल्यांना संबोधित करताना हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले. “प्रथमच, केवळ सर्जनशीलतेसाठी पुरस्कार दिला जात आहे. हा प्रवास आता सुरू झाला आहे. या उपक्रमाद्वारे तुम्ही नवीन संधींच्या विश्वात पाऊल ठेवत आहात. आम्ही भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (आयआयसीटी) सुरू करत आहोत, ती आयआयटी सारखी आहे, पण त्यात सर्जनशीलतेसंबंधी प्रशिक्षण दिले जाईल, त्यामुळे नाविन्य आणि अभिव्यक्तीसाठी मजबूत पाया तयार होईल.”

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सहभागींचे अभिनंदन करताना तरुणांच्या गतिमान ऊर्जा आणि तंत्रज्ञान कौशल्यावर प्रकाश टाकला. “सर्वांना शुभेच्छा. हे व्यासपीठ तरुण मनं सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांचे सुंदर संमिश्रण कसे करतात याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे नारी शक्तीची ताकद आणि भारतीय आशय-सामग्री निर्मितीच्या भविष्याचेही प्रतिबिंब आहे,” असे ते म्हणाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सीआयसी च्या उत्क्रांतीवर आपले विचार मांडले. “आम्ही ऑगस्टमध्ये सुरुवात केली तेव्हा माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात 25 आव्हाने होती. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ मध्ये सीआयसी बद्दल बोलल्यानंतर सहभाग प्रचंड वाढला. आव्हानांची संख्या 32 पर्यंत वाढली. आम्हाला जवळपास एक लाख नोंदण्या मिळाल्या. आज इथे 750 अंतिम स्पर्धक आहेत आणि त्यापैकी प्रत्येकजण विजेता आहे,” असे जाजू म्हणाले.

उदयोन्मुख प्रतिभेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रतिभाशाली तरुणांना सर्जनशीलतेचे प्रदर्शन करता यावे यासाठी क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) सुरू करण्यात आले. या अंतर्गत देण्यात आलेली आव्हाने विविध श्रेणींमध्ये विस्तारलेले होते, ज्यामुळे निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये सर्जनशीलतेचा शोध घेण्याची आणि सीमा अधिक व्यापक करण्याची संधी मिळाली.

अ‍ॅनिमे चॅलेंजपासून ते एआय फिल्म मेकिंग स्पर्धा, एक्सआर क्रिएटर हॅकेथॉनपर्यंत, प्रत्येक श्रेणीने नाविन्यपूर्ण अभिव्यक्तीला प्रोत्साहन दिले आणि जगभरातील निर्माते, तंत्रज्ञ आणि कथाकारांना एकत्र आणले.

सीआयसीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्याप्रमाणात लक्षवेधी ठरले आहे. 60 हून अधिक देशांमधून प्रवेशिका आल्या आहेत, ज्यामध्ये 1,100हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश आहे, त्यामुळे सीआयसीने जागतिक स्तरावर यश मिळविल्याचे दिसून येते. या प्रतिसादातून सर्जनशील तंत्रज्ञानाशी संलग्न होण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण आणि प्रभावशाली अशा नवीन माध्यमांच्या निर्मितीसाठी संधींची वाढती मागणी अधोरेखित झाली आहे.

आमिर खान, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, अक्किनेनी नागार्जुन, विक्रांत मॅसी, प्रसून जोशी आणि अरुण पुरी यांच्यासह इतर मान्यवर आणि अधिकाऱ्यांसह उद्योगातील दिग्गजांनी हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले.

32 आव्‍हाने आघाडीच्या उद्योग संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती, ज्यामुळे सीआयसीला विविध सर्जनशील विषय, तंत्रज्ञान-चालित प्रकल्प आणि भविष्यासाठी तयार सामग्री एकत्र आणून त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचता आले. जागतिक मनोरंजन आणि तंत्रज्ञान परिसंस्थेत भारताचे स्थान पुन्हा परिभाषित करणाऱ्या पुढील पिढीच्या निर्मात्यांसाठी हा उपक्रम एक लाँचपॅड म्हणून काम करत आहे. विविध माध्यम स्वरूपांमध्ये स्थानिक प्रतिभेला चालना देणे आणि नाविन्यपूर्ण सामग्री निर्मितीचा उत्सव साजरा करणे किती महत्त्वाचे आहे याचा हा एक पुरावा आहे.
0000
सागरकुमार कांबळे/ससं/

वेव्हज्‌ २०२५ मध्ये माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रवेश सुलभतेबद्दल संवाद

  • भारत केवळ पुढे मार्गक्रमण करत नाही तर; अनेक मार्गांनी समावेशक रचनेबाबत चर्चेचे करीत आहोत नेतृत्व : ब्रिज कोठारी
  • प्रवेशसुलभतेकडे केवळ अनुपालनासाठी घटक म्हणून पाहण्‍याऐवजी सर्जनशील, नैतिक आणि धोरणात्मक अत्यावश्यकता घ्‍यावी जाणून
  • प्रवेशसुलभता लागू करण्यासाठी पद्धतशीर बदलांचा पाया आपण रचत आहोत : गुगलमधील ‘अ‍ॅक्सेसिबिलिटी- डिसेबिलिटी इन्क्लुजन’ चे प्रमुख क्रिस्टोफर पॅटनो यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. ०२ : वेव्हज 2025 मध्ये “माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रवेशसुलभतेबाबतची मानके या विषयावर विचारप्रवर्तक समूह चर्चेचा कार्यक्रम आज  केंद्रस्थानी होता.  या चर्चासत्रामुळे शैक्षणिक, तांत्रिक, धोरण, विधी आणि पत्रकारिता क्षेत्रातील अग्रणी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमामध्‍ये  आशय निर्मिती आणि वितरण क्षेत्रातील प्रवेशसुलभता कशाप्रकारे उदयाला येत आहे आणि भारताच्या परिवर्तनाच्या प्रवासात याला प्राधान्य देणे का महत्त्वाचे आहे याविषयावर विचारमंथन झाले.

या सत्राची सुरुवात करताना, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक ब्रिज कोठारी यांनी प्रवेशसुलभतेची पुनर्व्याख्या करण्यातील भारताच्या नेतृत्वावर भर दिला.  भारत केवळ पुढे मार्गक्रमण करत नाही तर ; अनेक प्रकारे, आपण समावेशक रचनेवरच्या चर्चेचे नेतृत्व करत आहोत. व्याप्ती, वैविध्य आणि प्रवेशसुलभता हे आता केवळ दृष्टिहीन किंवा श्रवणदोष असलेल्यांसाठीचे उपाय राहिलेले नाहीत – हे एक सार्वत्रिक डिझाइन तत्वज्ञान आहे जे 1.4 अब्जाहून अधिक नागरिकांना लाभदायक आहे, असे ते म्हणाले.

गुगलमधील ईएमईएचे अ‍ॅक्सेसिबिलिटी अँड डिसॅबिलिटी इन्क्लुजन विभागाचे  प्रमुख क्रिस्टोफर पॅटनो यांनी यासंदर्भात जागतिक दृष्टिकोन मांडताना सांगितले की, अमेरिकेसारख्या काही देशांमध्ये कायदे सक्षम असले तरी अनेकदा त्यांच्या अंमलबजावणीत त्रुटी राहतात. प्रवेशसुलभतेसंदर्भात युरोपियन अ‍ॅक्सेसिबिलिटी कायदा आश्वासक असून आगामी दशक परिवर्तनाचे असेल, प्रवेशसुलभतेच्या अंमलबजावणीकरता पद्धतशीर बदल करण्यासाठी आम्ही पाया रचत आहोत, असे ते म्हणाले.

माध्यम क्षेत्रातील सर्जनशील प्रवेशसुलभतेच्या विविध पैलूंवर ‘किंटेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशय विनय सहस्रबुद्धे यांनी आपले विचार मांडले. “आशय त्याच्या निर्मात्याच्या अद्वितीय दृष्टिकोनातून आकाराला येतो, विशेषतः चित्रपटात हे प्रामुख्याने जाणवते. आशय खरोखरच सुलभ करण्यासाठी, आपण तो सर्जनशील दृष्टिकोन जपला पाहिजे –  सरधोपट मार्गाने किंवा स्वयंचलित उपायांनी त्याचे महत्त्व कमी करू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व वर्गांतील प्रेक्षकांसाठी, विशेषतः दिव्यांग प्रेक्षकांसाठी दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाच्या अर्थपूर्ण भाषांतरावर त्यांनी अधिक भर दिला.  तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना कशा पद्धतीने वेग देत आहे यावर पत्रकार प्रीती सालियन यांनी प्रकाश टाकला. “आम्ही सांकेतिक भाषा संबंधित दुभाषी अवताराचा समावेश असलेली तसेच श्राव्य वर्णनात प्रगत असलेली कृत्रिम प्रज्ञा  तंत्रज्ञानावर आधारलेली वाहिनी सुरु केली असून जे काम करायला एकेकाळी अनेक आठवडे लागायचे ते आता फक्त 30 तासांमध्ये होते,” असे त्यांनी सांगितले. भारतात मनोरंजन क्षेत्र अधिकाधिक लोकांना उपलब्ध होण्यासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नसून सरकारचे अधिकाधिक पाठबळ, सरकारी-खासगी भागीदारी आणि निविदा यंत्रणा यांची देखील आवश्यकता आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.

वकील आणि रंगमंच, ओटीटी तसेच दूरचित्रवाणी यांसारख्या मंचांवरील सर्वसमावेशक कार्यक्रमांचे सल्लागार राहुल बजाज यांनी बोलताना, अधिक सशक्त कायदेशीर चौकटी तसेच औद्योगिक सहयोग यांच्या गरजेवर अधिक भर दिला. रेडिओ उडानचे संस्थापक दानिश महाजन यांनी यावेळी बोलताना विद्यमान धोरणांच्या अधिक कठोर अंमलबजावणीसह धोरणनिर्मिती प्रक्रिया आणि नियामकीय संस्थांमध्ये दिव्यांग व्यक्तींना वाढीव प्रतिनिधित्व मिळावे , असे  आवाहन केले. “प्रतिनिधित्व हे सुनिश्चित करते की, उपलब्धता ही पश्चातबुध्दी नसून प्रणालीत समाविष्ट झालेला घटक आहे,” ते म्हणाले.

एकूण , या गटाने कृतीसाठीच्या सामुहिक आवाहनावर अधिक भर दिला: उपलब्धतेकडे एक अनुपालन तपासणी म्हणून नव्हे तर एक सर्जनशील, नैतिक आणि धोरणात्मक अत्यावश्यकता म्हणून पाहिले गेले पाहिजे. भारत सध्या आशय क्रांतीच्या निर्णायक वळणावर उभा असताना प्रत्येक नागरिकाकरिता त्यातील संपूर्ण क्षमता खुली करण्यासाठी उपलब्धता हीच गुरुकिल्ली ठरेल.

ताज्या बातम्या

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन

0
मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी...

शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ‘ब्लॉकचेन प्रणाली’ प्रभावी – बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ...

0
मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

0
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नवी दिल्ली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

0
अहिल्यानगर, दि. ६ : - चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू...

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते...