शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 89

‘भारत गौरव टुरीस्ट ट्रेन’च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी ‘भारत गौरव टुरीस्ट ट्रेन’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. पर्यटन आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ या योजनेची ही माहिती.      

भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव टुरीस्ट ट्रेन (भारत गौरव टुरिस्ट ट्रेन) अंतर्गत ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे.

या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे.

भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयआरसीटीसीच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. ५ दिवसांच्या या प्रवासात रेल्वेस्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे. या प्रेरणादायी यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा चालवावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे, अशी अपेक्षा आहे.

सहल तपशील

सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट शुभारंभ दि. ९ जून २०२५ कालावधी: ५ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती) प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक: दादर, ठाणे यात्रेचा प्रवासमार्ग- मुंबई (सीएसएमटी) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

प्रमुख स्थळांची माहिती: रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती. लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले. कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय. शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ. भीमाशंकर ज्योतिर्लिंग–१२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ. प्रतापगड किल्ला–अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण. कोल्हापूर–महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक. पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती) उपरोक्त सहलीसाठी विविध पॅकेजेस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (एसएल), कम्फर्ट (३ एसी), सुपीरियर (२ एसी) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे. या पॅकेजबाबत सविस्तर माहिती (आयआरसीटी) च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

पॅकेजमध्ये समाविष्ट सेवा: भारत गौरव ट्रेनने प्रवास (एसएल/३एसी/२एसी/एसी/नॉन-एसी) हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी), सुरक्षा व्यवस्था.

पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: – साहसी खेळ, बोटिंग इत्यादी. खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल. इतर कोणताही वैयक्तिक खर्च. कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त):– पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे. दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती). तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे. चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर. पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई. सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

आरक्षण व अधिक माहितीसाठी संपर्क: – भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) वेबसाईट: www.irctctourism.com  अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे उपयुक्त ठरेल.

०००

  • विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.

पाटण येथे तिरंगा रॅली संपन्न; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले भारतीय सैन्य दलाचे आभार

सातारा दि. 20 :  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदल उत्तर देवू शकतो हे जगाला दाखवून दिले, असे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भारतीय सैन्यदलाबद्दल आभार व्यक्त केले.

पालकमंत्री श्री. देसाई यांच्या उपस्थितीत पाटण येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक व नागरिक यांनी तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

देशातील जनता ही भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आहे. भारतीय सिमेचे रक्षण आपले सैन्यदल करीत आहे. त्यांच्या शौर्यामुळे आपण सुरक्षीत आहोत, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी तिरंगा रॅली  प्रसंगी सांगितले.

0000

 

विभागीय आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा 

छत्रपती संभाजीनगर, दि. 20: हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे तसेच जीवित व वित्त हानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे; तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षातील यंत्रणांनी सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी. आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारीबाबत विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता व प्रशासक राजू देशमुख, विभागीय कृषी सहायक संचालक पी. आर. देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले, हवामान विभागाने वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तविला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून नियोजन करावे. पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. विज अटकाव यंत्रणा सुस्थितीत असावी. जलसंपदा विभागाने विभागात असणाऱ्या नद्यांवरील पुलावर धोका पातळी चिन्हांकित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

मान्सूनमधील साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी, असे सांगून विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले, पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम भागामध्ये तत्परतेने मदत पोहोचण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान विभागाचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतर्क रहावे, विजेचे संकेत देणाऱ्या दामिनी ॲपचा वापर करण्याबाबत जनजागृती करा, पोलीस पाटील तसेच गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावात पावसाबाबत तसेच आपत्ती कालावधीत सतर्क करण्याबाबत माहिती पोहचवा, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी यंत्रणेला दिल्या.

पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्यावी. महानगरासह नगरपालिका क्षेत्रातील नाल्यांची सफाई कामे तातडीने पूर्ण करावी. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी सीमांकन करावे. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवा. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात. जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट आदी विविध साधने, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, नियंत्रण कक्ष, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात संबंधित जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी दिले.

यावेळी जिल्हानिहाय मान्सूनपुर्व तयारीबाबत सबंधित जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली.

बैठकीला जलसंपदा, नगरप्रशासन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महसूल तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांच्या ठळक सूचना

  • पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे तसेच जीवित व वित्त हानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे
  • आपत्कालीन नियंत्रण कक्षातील यंत्रणांनी सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी
  • आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करा
  • पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी
  • मान्सूनमधील साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी
  • पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे
  • आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान विभागाचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतर्क रहावे

विजेचे संकेत देणाऱ्या दामिनी ॲपचा वापर करण्याबाबत जनजागृती करा

 

000

 कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी

एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर

ठाणे, दि.20(जिमाका):- कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण ६ व्यक्ती जखमी झाल्या असून ६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.

तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार, ही घटना दि. २० मे २०२५ रोजी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास घडली. ही दुर्घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले.

त्याचबरोबर घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला असून, जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

घटनास्थळावरील शोध कार्य पूर्ण झाले असून इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञानमंदिर विद्यालय, कल्याण (पूर्व) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्या सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली आहे.

जखमी व्यक्तींची यादी:

अ.क्र. १: अरुणा रोहिदास गिरनारायण (महिला, ४८ वर्षे) – अमेय हॉस्पिटल

अ.क्र. २: यश जितेंद्र क्षीरसागर (मुलगा, १३ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ३: निखिल खरात (पुरुष, २६ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ४: विनायक मनोज पार्धी (मुलगा, ४.५ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल

अ.क्र.५: श्रावील श्रीकांत शेलार (मुलगा, ४.३ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल

अ.क्र. ६: श्रद्धा साहू (महिला, १४ वर्षे) – बाई रुक्मिणी हॉस्पिटल

मृत व्यक्तींची यादी:

अ.क्र. १: श्रीमती. सुशिला नारायण गुजर (महिला, ७८ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. २: कु.नामस्वी श्रीकांत शेलार (महिला, १.५ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल

अ.क्र. ३: श्री. व्यंकट चव्हाण (पुरुष, ३२ वर्षे) – घटनास्थळी

अ.क्र. ४: श्रीमती सुनिता निरंजन साहू (महिला, ३८ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ५: श्रीमती. प्रमिला कालीचरण साहू (महिला, ५६ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ६: श्रीमती.सुजाता मनोज पाडी (महिला, ३२ वर्षे) – घटनास्थळी

00000000

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित सर्व रस्ते, पुल इमारतीची कामे तात्काळ पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. २० : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते व पुल पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यासाठी दक्षता घेणेबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. मंत्रालयात पावसाळा पूर्व तयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री भोसले बोलत होते.

राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊन रस्ते काही प्रमाणात नादुरुस्त होतात असे यापूर्वी निदर्शनास आले असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, नागरिकाची गैरसोय होऊ नये या साठी खडेमुक्त रस्ते ठेवण्यासाठी विभागाने दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांवरील तसेच खासगीकरणांतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्डे वेळोवेळी भरून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत राहतील याची दक्षता घेण्यात यावी. मुख्य अभियंता यांनी रस्त्यांवरील माहिती फलकांच्या व पादचारी पुलांची तपासणी करावी व खराब झालेल्या फलक आणि पादचारी पूल काढून टाकवेत. सर्वसाधारणपणे या माहिती फलकाचे संकल्पन वायुवेग १८० प्रतितास गृहीत धरुन तपासण्यात यावे. तसेच रस्त्यालगतचे जाहिरात व माहिती फलक तपासण्यात यावेत आणि खराब झालेले जाहिरात व माहिती फलक काढून टाकण्यात यावेत. सर्व घाट रस्त्यांची तपासणी करून ते खड्डेमुक्त तसेच सुरक्षित राहतील याची विशेष खबरदारी घेण्यात यावी. रस्त्यांवरील माहितीफलक वाचण्यायोग्य राहतील, तसेच रस्त्यावरील पट्टे मार्कीग्ज, ब्लिंकर्स वाहन चालकास दिसण्यायोग्य राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या.

मंत्री भोसले म्हणाले की, घाट रस्त्यांची पाहणी करून सैल झालेले दगड काढून घ्यावे. ज्या ठिकाणी दरड कोसळून रस्ता बंद होऊ शकतो अशा ठिकाणी रस्ते वाहतुक सुरळीत करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच पर्यायी रस्तेही सुस्थितीत ठेवावेत. घाटातील धबधब्यावर पर्यटक थांबणार नाहीत याचे नियोजन करावे. त्यासाठी पोलिसांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी दिल्या.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे ) संजय दशपुत्रे, सहसचिव रोहिणी भालेकर, उपसचिव निरंजन तेलंग, संजय देगावकर तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रादेशिक मुख्य अभियंते उपास्थित होते.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 20 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात पाच शासकीय विद्यानिकेतन निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढणे अपेक्षित असल्याचे सांगून विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी शाळांना आवश्यक शिक्षक आणि इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

राज्यातील पाच शासकीय विद्यानिकेतनच्या विविध समस्यांबाबत शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. प्रधान सचिव रणजित सिंह देओल, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, संचालक (योजना) महेश पालकर, उपसचिव समीर सावंत आणि संबंधित शाळांचे प्राचार्य यावेळी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी पाचही शासकीय विद्यानिकेतनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. श्री. भुसे म्हणाले, सुमारे 60 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळांमध्ये इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. येत्या काळात विद्यानिकेतनमध्ये शिक्षक आणि अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येईल. बैठकीदरम्यान शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि धुळे येथील जिल्हाधिकाऱ्यांशी शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली.

दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या निवासी शासकीय विद्यानिकेतनमध्ये दर्जेदार शिक्षक उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरू करावी, त्यासाठी आवश्यकता भासल्यास शिक्षकांच्या भरती नियमांमध्ये सुधारणा करावी, शाळांना भौतिक आणि अन्य सुविधांसाठी कंपन्यांचा सीएसआर फंड उपलब्ध करुन घेण्याचा प्रयत्न करावा, असे आदेशही श्री. भुसे यांनी दिले. शिक्षक आणि सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पटसंख्या वाढविण्यासाठी शाळांनीही एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीस शासकीय विद्यानिकेतन धुळेच्या प्राचार्य मंजुषा क्षीरसागर, शासकीय विद्यानिकेतन छत्रपती संभाजीनगरच्या प्राचार्य सुनीता राठोड, शासकीय विद्यानिकेतन अमरावतीचे प्राचार्य दिनेश सोनोने, शासकीय विद्यानिकेतन पुसेगावचे प्राचार्य विजय गायकवाड आणि शासकीय विद्यानिकेतन केळापूर (जिल्हा यवतमाळ) चे प्राचार्य धम्मरत्न वायवळ उपस्थित होते.
0000

नागपूर, कोराडी येथील माविमअंतर्गत प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. 20 : महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे नागपूर, कोराडी येथे महिलांकरिता आधुनिक गारमेंट सेंटर अंतर्गत महिलांना प्रशिक्षण, विद्यावेतन व रोजगार उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी एकच निविदा प्रक्रिया राबवावी व प्रकल्प सुरू करून अहवाल सादर करावा. कोराडी येथील विविध प्रकल्प कालबद्धतेत सुरू करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी महिलांना नियमित प्रशिक्षण आणि विद्यावेतन अदा करण्यासंदर्भात मागणी केली होती.

माविम अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वस्त्रप्रक्रिया प्रकल्प, निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करणे, प्रदुषणविरहित कलमकारी तथा वस्त्रप्रक्रिया प्रकल्प, सॅनिटरी नॅपकीन निर्मिती प्रकल्प संदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या.

यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागाचे सह सचिव वी. रा. ठाकूर, महाव्यवस्थापक रवींद्र सावंत उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळ काम करीत आहे. महामंडळाअंतर्गत नागपूर येथे बचत गटातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या कोराडी येथील गारमेंट केंद्रात शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी एकच निविदा प्रक्रिया राबवावी व कालमर्यादेत केंद्र सुरू करावे. त्यांना नियमित सहा महिन्याचे प्रशिक्षण देऊन, त्यांना प्रशिक्षणासाठी दिले जाणारे विद्यावेतन वेळेत देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या केंद्राद्वारे जवळपास २०० महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

याचबरोबर महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध जागेत अगरबत्ती निर्मिती युनीट प्रकल्प मंजूर आहे. येथे अगरबत्ती व धूप निर्माण करण्याच्या माध्यमातून जवळपास १०० महिलांना ६ ते ७ हजार रूपये महिन्याला मिळणार आहेत. तसेच प्रदूषणविरहित कलमकारी तथा वस्त्रप्रक्रिया प्रकल्प आणि सॅनिटरी नॅपकीन निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होणार असून, हे प्रकल्प तातडीने सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार पाळण्याबाबतच्या सूचना जारी 

मुंबई, दि. २० : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या मुंबई तसेच राज्यात अन्यत्र दौऱ्यादरम्यान विहीत राजशिष्टाचाराचे पालन होण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य अतिथी नियम-२००४ अनुसार घोषित करण्यात आलेल्या राज्य अतिथींच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या तसेच ज्यांना राज्य अतिथी समजण्यात येत आहे अशा मान्यवरांची विमानतळावर स्वागताची व निरोपाची व्यवस्था राजशिष्टाचार उपविभागाकडून करण्यात येते. तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील राजशिष्टाचार अधिकारी राज्य अतिथीचे स्वागत करण्यासाठी व त्यांना निरोप देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करतात.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना “कायमस्वरुपी राज्य अतिथी” (PERMANENT STATE GUEST) म्हणून घोषित करण्यात येत आहे.

त्यानुसार,  सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे महाराष्ट्र राज्य अतिथी नियम, २००४ नुसार यापुर्वीपासून घोषित राज्य अतिथी असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्याच्या दौ-यादरम्यान अनुज्ञेय राजशिष्टाचारविषयक सुविधा (निवास, वाहन व्यवस्था व सुरक्षा, इ.) पुरवण्यात येतात व अशा सर्व सुविधा त्यांना राज्यात सर्वत्र दौऱ्यादरम्यान अनुज्ञेय राहतील.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे महाराष्ट्र राज्यात मुंबई दौ-यावर असताना मुख्य सचिव अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पोलीस महासंचालक अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि राज्यात अन्यत्र संबंधित जिल्हाधिकारी अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी तसेच पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी यांनी मान्यवरांचे स्वागत करावे.

सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ०७ मार्च २०२२ रोजीच्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र राज्याला भेट देणारे मान्यवर / अतिथी यांच्या भेटीदरम्यान ज्या विभागाच्या कामकाजासंदर्भात भेट देत असतील त्या विभागाने मान्यवरांच्या स्वागतासाठी व समन्वयासाठी संपर्क अधिकारी नेमण्याबाबत विहित केले आहे. त्यानुसार, मान्यवरांच्या मुंबई भेटीदरम्यान विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी तसेच राज्यातील अन्य जिल्हा येथील दौ-यादरम्यान संबंधित न्यायालय यांनी जिल्हाधिकारी यांच्या सहकार्यान गट अ-श्रेणीतील राजपत्रित दर्जाचे संपर्क अधिकारी नेमावेत.

या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

००००

 

कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी कालमर्यादेत सर्वेक्षण करा – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 

मुंबई, दि. 20 : कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेतला. या प्रकल्पाच्या  सर्वेक्षणाची  कामे निविदेत दिलेल्या कालमर्यादेत  करावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्प (एमआरडीपी) मदत व पुनर्वसन विभागाकडून जलसंपदा विभागातील कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे हस्तांतरित करणे आणि पवना धरण पर्यटन सादरीकरण संदर्भात जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, या प्रकल्पातील कामांचेही सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जलदगतीने करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. सर्वेक्षणाचे काम गतीने झाल्यास पुढील  कामांची निविदा प्रक्रिया राबविणे सुलभ व सोयीस्कर होणार आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून अधिकचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.

महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्पातील

कामांचे सर्व्हेक्षण तीन महिन्यात पूर्ण करा

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास (एमआरडीपी) प्रकल्पातील कामांचे सर्वेक्षण गतीने करून ही काम तीन महिन्यात पूर्ण करावीत. यासाठी गरज भासल्यास अतिरिक्त एजन्सी नेमून सर्वेक्षणाचे काम जलदगतीने पूर्ण करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा.

आतापर्यंत या प्रकल्पातील ज्या कामांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे याची माहिती ‘मित्रा’ यांच्याकडे देण्यात यावी. राधानगरी धरणाचे गेट व सांगली कोल्हापूर बंधारा येथे बॅरेज बांधणे या कामांच्या यावेळी आढावा घेण्यात येऊन ही कामे सुरू करण्याबाबत जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

तसेच पवना धरण येते पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सादरीकरण केले. पर्यावरणाचा समतोल राखत प्रदूषणविरहित पर्यटन आराखडा तयार करावा. याबरोबरच धरण परिक्षेत्रातील अतिक्रमणे काढावीत, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

कामगारांच्या गरजेनुसार परिपूर्ण योजना तयार करावी – कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल

Oplus_131072

मुंबई, दि. 20 : कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या गरजेनुसार परिपूर्ण योजना तयार करून त्याचा प्रस्ताव शासनास सादर करावा. या योजनेमध्ये इतर योजनांचा लाभ घेण्यास पात्र होणार नाहीत अशा कामगारांना लाभ मिळेल अशा तरतुदी कराव्यात, अशा सूचना कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या.

प्रभादेवी येथील कामगार व क्रीडा भवन येथे कामगार कल्याण मंडळाची आढावा बैठक झाली. त्यावेळी राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते.

कामगार कल्याण मंडळाच्या सर्व योजनांचे सामाजिक मूल्यांकन करावे अशा सूचना देऊन राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले की, या योजनांचा आतापर्यंत किती कामगारांना लाभ झाला याची माहिती सदर करावी. कामगारांमध्ये मंडळाच्या योजनांची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करावी. त्यासाठी समाजमाध्यमातून याचा प्रसार करावा. अपघाती मृत्यू, दुर्धर आजार, कामगारांच्या मुलांचे शिक्षण व सामाजिक सुरक्षा या बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. कामगारांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र, कला आणि क्रीडा प्रशिक्षण केंद्र अशा सुविधा उभारण्यात याव्यात. मंडळाच्या मालमत्तापासून महसूल उत्पन्न वाढवण्यासाठीचा आराखडा तयार करावा अशा सूचना राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी दिल्या.

बैठकीस कामगार आयुक्त रविराज इळवे, कामगार विभागाच्या उपसचिव रोशनी पाटील – कदम यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपूर उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन

0
नागपूर, दि. २८:  उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते नागपूर येथे पार पडले. उच्च न्यायालय दुसरा...

कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी एफटीआयमार्फत चित्रपट शिक्षणाला सुरुवात होणार

0
मराठी सिनेमासाठी योगदान दिलेल्या कलाकारांची माहिती देणाऱ्या संग्रहालयाची स्थापना चित्रनगरीमधील ४४ कोटींच्या चित्रीकरण स्थळांचे लोकार्पण व भूमिपूजन कोल्हापूर, दि. २८: चित्रपट निर्मितीसमोर कलात्मकता, सृजनशीलता...

संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क एक महत्वाचे पाऊल - सरन्यायाधीश भूषण गवई संविधान उद्देशिका पार्कद्वारे संविधानातील मौलिक विचार जनतेपर्यंत पोहचतील -...

आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान – मंत्री डॉ. अशोक...

0
पुणे, दि. २८: आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

0
भंडारा,दि. २८: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भौंडेकर,अतिरीक्त...