शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 88

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. २१ : दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची व स्मारकाच्या प्रतिकृतीची पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी,प्रकल्प व्यवस्थापक शशी प्रभु, भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगरपालिका, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, सद्यस्थितीत स्मारक इमारतींचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामासंदर्भात लवकरच दिल्ली येथे प्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्मारकाचे काम वेगाने व दर्जेदार रीतीने पूर्ण व्हावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्मारकात उभारण्यात येणाऱ्या व्याख्यानगृह, ग्रंथालय, सभागृह, विपश्यना केंद्र अशा विविध सभागृहांसंदर्भात नागरिकांसाठी तेथे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. स्मारकामध्ये उभारण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा तसेच तीव्र वादळांपासून स्मारकाचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. तसेच स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

महिला लोकशाही दिनी होणार महिलांच्या तक्रारींचे निवारण

मुंबई, दि. २१ : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनास महिलांनी आवर्जून उपस्थित राहून प्रश्न मांडण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी केले आहे.

मुंबई शहर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता महिला लोकशाही दिन बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. महिला लोकशाही दिन बैठकीत आपल्या तक्रारीचे निवारण करण्याकरिता महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, ११७ बीडीडी चाळ, पहिला मजला, वरळी,मुंबई ४०००१८ येथे अर्ज सादर करावा.

विहित नमुन्यात नसणारी व आवश्यक असणारी कागदपत्रे न जोडलेले अर्ज, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

0000

 

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

 

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. २१ : पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतले आहेत. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे.

पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेनेकाम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एकापाठोपाठ एक असे महत्वाचे निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

विभागातील रिक्त पदांमुळे पशुपालक, शेतकरी यांना सेवा देण्यास येणारी अडचण लक्षात घेऊन विभागातील आवश्यक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी त्यांनी पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आले.

त्यानंतर आता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील सहायक आयुक्त, पशुसंवर्धन ही ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवले. या भरतीची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी श्रीमती मुंडे यांनी पाठपुरावा केला.

एम.पी.एस.सी.ने सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून २० जून २०२५ पर्यंत अर्ज मागविले आहेत.

कामास येणार गती

ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पशुसंवर्धन विभागाला सक्षम आणि नवीन अभ्यासू अधिकारी मिळणार आहेत. त्यातून ग्रामीण भागातीलपशुसंवर्धन विभागाचे काम आणखी वेगाने व पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होणार असून पशुपालकांना चांगल्या दर्जाची सेवा मिळणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन

पुणे, दि. २१: जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.

आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) येथे याप्रसंगी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे शहर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी डॉ. नारळीकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी पोलीस दलाने सलामी, शोकशस्त्र तसेच बाजूशस्त्र सलामी दिली. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

०००

मंत्रालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ

VIRENDRA DHURI

मुंबई, दि. २१ : दहशतवाद व हिंसाचार विरोधीदिनानिमित क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली.

VIRENDRA DHURI

यावेळी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव अरुण जोशी, उपसचिव दिनेश चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

VIRENDRA DHURI
VIRENDRA DHURI
VIRENDRA DHURI

०००

श्री.धोंडिराम अर्जुन/ससं/

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई, दि. २१ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येते. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व जवानांनी यावेळी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.

अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

०००

‘भारत गौरव टुरीस्ट ट्रेन’च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी ‘भारत गौरव टुरीस्ट ट्रेन’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. पर्यटन आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ या योजनेची ही माहिती.      

भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव टुरीस्ट ट्रेन (भारत गौरव टुरिस्ट ट्रेन) अंतर्गत ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे.

या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे.

भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयआरसीटीसीच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. ५ दिवसांच्या या प्रवासात रेल्वेस्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे. या प्रेरणादायी यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा चालवावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे, अशी अपेक्षा आहे.

सहल तपशील

सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट शुभारंभ दि. ९ जून २०२५ कालावधी: ५ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती) प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक: दादर, ठाणे यात्रेचा प्रवासमार्ग- मुंबई (सीएसएमटी) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

प्रमुख स्थळांची माहिती: रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती. लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले. कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय. शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ. भीमाशंकर ज्योतिर्लिंग–१२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ. प्रतापगड किल्ला–अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण. कोल्हापूर–महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक. पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती) उपरोक्त सहलीसाठी विविध पॅकेजेस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (एसएल), कम्फर्ट (३ एसी), सुपीरियर (२ एसी) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे. या पॅकेजबाबत सविस्तर माहिती (आयआरसीटी) च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

पॅकेजमध्ये समाविष्ट सेवा: भारत गौरव ट्रेनने प्रवास (एसएल/३एसी/२एसी/एसी/नॉन-एसी) हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी), सुरक्षा व्यवस्था.

पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: – साहसी खेळ, बोटिंग इत्यादी. खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल. इतर कोणताही वैयक्तिक खर्च. कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त):– पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे. दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती). तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे. चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर. पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई. सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

आरक्षण व अधिक माहितीसाठी संपर्क: – भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) वेबसाईट: www.irctctourism.com  अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे उपयुक्त ठरेल.

०००

  • विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.

पाटण येथे तिरंगा रॅली संपन्न; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले भारतीय सैन्य दलाचे आभार

सातारा दि. 20 :  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदल उत्तर देवू शकतो हे जगाला दाखवून दिले, असे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भारतीय सैन्यदलाबद्दल आभार व्यक्त केले.

पालकमंत्री श्री. देसाई यांच्या उपस्थितीत पाटण येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक व नागरिक यांनी तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

देशातील जनता ही भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आहे. भारतीय सिमेचे रक्षण आपले सैन्यदल करीत आहे. त्यांच्या शौर्यामुळे आपण सुरक्षीत आहोत, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी तिरंगा रॅली  प्रसंगी सांगितले.

0000

 

विभागीय आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा 

छत्रपती संभाजीनगर, दि. 20: हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे तसेच जीवित व वित्त हानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे; तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षातील यंत्रणांनी सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी. आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारीबाबत विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता व प्रशासक राजू देशमुख, विभागीय कृषी सहायक संचालक पी. आर. देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले, हवामान विभागाने वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तविला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून नियोजन करावे. पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. विज अटकाव यंत्रणा सुस्थितीत असावी. जलसंपदा विभागाने विभागात असणाऱ्या नद्यांवरील पुलावर धोका पातळी चिन्हांकित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

मान्सूनमधील साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी, असे सांगून विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले, पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम भागामध्ये तत्परतेने मदत पोहोचण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान विभागाचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतर्क रहावे, विजेचे संकेत देणाऱ्या दामिनी ॲपचा वापर करण्याबाबत जनजागृती करा, पोलीस पाटील तसेच गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावात पावसाबाबत तसेच आपत्ती कालावधीत सतर्क करण्याबाबत माहिती पोहचवा, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी यंत्रणेला दिल्या.

पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्यावी. महानगरासह नगरपालिका क्षेत्रातील नाल्यांची सफाई कामे तातडीने पूर्ण करावी. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी सीमांकन करावे. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवा. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात. जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट आदी विविध साधने, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, नियंत्रण कक्ष, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात संबंधित जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी दिले.

यावेळी जिल्हानिहाय मान्सूनपुर्व तयारीबाबत सबंधित जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली.

बैठकीला जलसंपदा, नगरप्रशासन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महसूल तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांच्या ठळक सूचना

  • पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे तसेच जीवित व वित्त हानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे
  • आपत्कालीन नियंत्रण कक्षातील यंत्रणांनी सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी
  • आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करा
  • पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी
  • मान्सूनमधील साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी
  • पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे
  • आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान विभागाचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतर्क रहावे

विजेचे संकेत देणाऱ्या दामिनी ॲपचा वापर करण्याबाबत जनजागृती करा

 

000

 कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी

एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर

ठाणे, दि.20(जिमाका):- कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण ६ व्यक्ती जखमी झाल्या असून ६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.

तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार, ही घटना दि. २० मे २०२५ रोजी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास घडली. ही दुर्घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले.

त्याचबरोबर घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला असून, जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

घटनास्थळावरील शोध कार्य पूर्ण झाले असून इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञानमंदिर विद्यालय, कल्याण (पूर्व) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्या सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली आहे.

जखमी व्यक्तींची यादी:

अ.क्र. १: अरुणा रोहिदास गिरनारायण (महिला, ४८ वर्षे) – अमेय हॉस्पिटल

अ.क्र. २: यश जितेंद्र क्षीरसागर (मुलगा, १३ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ३: निखिल खरात (पुरुष, २६ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ४: विनायक मनोज पार्धी (मुलगा, ४.५ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल

अ.क्र.५: श्रावील श्रीकांत शेलार (मुलगा, ४.३ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल

अ.क्र. ६: श्रद्धा साहू (महिला, १४ वर्षे) – बाई रुक्मिणी हॉस्पिटल

मृत व्यक्तींची यादी:

अ.क्र. १: श्रीमती. सुशिला नारायण गुजर (महिला, ७८ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. २: कु.नामस्वी श्रीकांत शेलार (महिला, १.५ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल

अ.क्र. ३: श्री. व्यंकट चव्हाण (पुरुष, ३२ वर्षे) – घटनास्थळी

अ.क्र. ४: श्रीमती सुनिता निरंजन साहू (महिला, ३८ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ५: श्रीमती. प्रमिला कालीचरण साहू (महिला, ५६ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल

अ.क्र. ६: श्रीमती.सुजाता मनोज पाडी (महिला, ३२ वर्षे) – घटनास्थळी

00000000

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

0
भंडारा,दि. २८: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भौंडेकर,अतिरीक्त...

मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क जेईई, नीट प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. २८: अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) वतीने राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील पात्र उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि...

पाणी संवर्धन कार्यात स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई,दि. २८:  विदर्भात जलसंधारण व जलस्रोत विकासाचे काम होणे आवश्यक आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे या भागातील शेतकरी संकटाच्या छायेखाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर, या भागात पाणी...

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...