शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 87

वीज आणि पशुधन : संरक्षणाचे प्रभावी उपाय

राज्यात सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व काळात, विशेषत: शेतीच्या कामांच्या वेळी, वीज पडण्याचा धोका अधिक असतो आणि यामुळे पशुधनाची हानी होण्याची शक्यता वाढते. भारतामध्ये महाराष्ट्रात वीज पडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांमध्ये भौगोलिक रचना, कमी झाडी आणि हवामानातील बदलांमुळे हा धोका अधिक जाणवतो. वीज पडल्याने केवळ पशुधनच नव्हे, तर शेतकरी आणि मालमत्तेचेही मोठे नुकसान होते. जीवितहानी सुध्दा होते. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे वीजेपासून संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. विजेपासून पशुधनाचे संरक्षण कसे करावे तसेच करावयाच्या उपाययोजनाबाबत माहिती देणारा लेख…

वीज पडण्याची कारणे :

वीज पडण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत :

  • विद्युत भार (Electric Charge): ढगांमधील पाण्याच्या थेंबांचे आणि बर्फाच्या कणांचे घर्षण होऊन सकारात्मक आणि नकारात्मक विद्युत भार निर्माण होतो.
  • विद्युत क्षेत्र (Electric Field): ढग आणि जमीन यांच्यातील विद्युत भाराचे अंतर वाढल्याने एक शक्तिशाली विद्युत क्षेत्र तयार होते. जेव्हा हे क्षेत्र हवेच्या प्रतिकारापेक्षा अधिक होते, तेव्हा वीज जमिनीवर कोसळते.
  • तापमान आणि आर्द्रता (Temperature and Humidity): उष्ण आणि दमट हवामान ढगांची जलद निर्मिती करते, ज्यामुळे विद्युत भार लवकर वाढतो.
  • भौगोलिक घटक (Geographical Factors): उंच झाडे, पर्वत किंवा धातूच्या वस्तू वीज आकर्षित करू शकतात.

पशुधनाचे वीजेपासून संरक्षण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना :

पशुपालकांनी आपल्या पशुधनाला वीजेच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी खालील उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे :

  1. सुरक्षित आश्रय (Safe Shelter):
    • जनावरांना कधीही मोकळ्या जागेत बांधू नये.
    • पावसाचे वातावरण आणि विजेचा गडगडाट होत असल्यास शेतातील काम त्वरित थांबवून जनावरांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीमध्ये हलवावे.
    • गोठ्याचे छत आणि भिंती शक्यतो धातूच्या नसाव्यात, कारण धातू वीज आकर्षित करतात. जर धातूचे बांधकाम असेल, तर ते व्यवस्थितरित्या अर्थिंग केलेले असावे.
  2. अचानक आलेल्या वादळात स्वतःचा बचाव (Self-Protection During Sudden Storms) :
    • जर तुमच्या अंगावरचे केस उभे राहत असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्वरित जमिनीवर पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडावेत, त्याभोवती हातांचा विळखा घालावा आणि हनुवटी गुडघ्यावर दाबून धरावी.
    • जनावरांना शक्य असल्यास खाली बसवावे.
    • वातावरण शांत झाल्यावर त्वरित सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
    • अचानक गडगडाट होत असल्यास आणि जवळपास फक्त झाडेच असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर जमिनीवर वाकून बसावे.
    • जनावरे पाण्यात असल्यास त्यांना त्वरित बाहेर काढावे, कारण पाणी विजेचे सुवाहक असते.
  3. वीज सुवाहकांपासून सावधगिरी (Caution with Lightning Conductors):
    • गोठ्यातील लोखंडी पत्रे, वीजवाहक तारा किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करणे टाळावे.
    • गोठ्यातील वीज कनेक्शन आणि विद्युत अर्थिंग योग्य तसेच सुरक्षित असल्याची खात्री करावी. अर्थिंगमुळे वीज जमिनीत सुरक्षितपणे जाते आणि जनावरांना धोका टळतो.
  4. विद्युत उपकरणांचा वापर टाळा (Avoid Electrical Appliances):
    • आकाशात गडद काळे ढग जमून गडगडाट होत असल्यास गोठ्यातील कोणतेही विद्युत उपकरण चालू करू नये.
    • पशुधनाचे गोठे, कडबाकुट्टी यंत्र आणि गोठ्यातील इतर विजेचे साहित्य योग्यरीत्या अर्थिंग केलेले असावे.
  5. धातूच्या वस्तूंपासून दूर राहा (Stay Away from Metal Objects):
    • जनावरांजवळ धातूच्या वस्तू (उदा. लोखंडी साधने) ठेवू नयेत.
    • शेतात काम करणाऱ्या व्यक्तींनी धातूच्या वस्तू जसे की कुऱ्हाड, कोयते, छत्री त्वरित दूर टाकाव्यात.
    • धातूची पाणीपात्रे उंच ठिकाणी किंवा मैदानातील खुल्या जागी ठेवू नयेत, कारण त्या वीज आकर्षित करू शकतात.
  6. स्थानिक हवामानाकडे लक्ष देणे (Pay Attention to Local Weather):
    • हवामान खात्याच्या सूचनांचे नियमितपणे पालन करावे.
    • दामिनी ॲप (Damini App): भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था पुणे (IITM) आणि भारतीय हवामान विभागाने विकसित केलेले ‘दामिनी वीज चेतावणी ॲप’ डाउनलोड करावे. या ॲपच्या माध्यमातून परिसरातील हवामानाचा आणि वीज पडण्याचा अंदाज मिळतो, ज्यामुळे वेळीच सुरक्षितता बाळगता येते.
    • वादळी वारे किंवा वीज पडण्याची शक्यता असल्यास जनावरांना गोठ्यातच ठेवावे.
  7. जनावरांचे व्यवस्थापन (Animal Management):
    • गडगडाटाने जनावरे घाबरण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना प्रेमळ वागणूक देऊन शांत करावे.
    • गोठ्यात योग्य तापमान आणि आर्द्रता राखण्यासाठी पंखे किंवा फॉगरचा वापर करावा.
    • जनावरांना पाणी आणि खनिज मिश्रणासह संतुलित आहार द्यावा, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  8. तांत्रिक उपाय (Technical Measures):
    • गोठ्यांवर वीजरोधक यंत्रणा (लाइटनिंग अरेस्टर) बसवावी. ही यंत्रणा वीजेचा झटका जमिनीत सुरक्षितपणे पोहोचवते.
    • स्वयंचलित तापमान आणि आर्द्रता नियंत्रण प्रणालीचा वापर करावा.
  9. इतर सुरक्षितता उपाय (Other Safety Measures):
    • झाडाखाली आश्रय टाळा: उंच झाडे वीज आकर्षित करतात. त्यामुळे वीज पडण्याचा धोका असताना झाडाखाली स्वतः आणि जनावरांना बांधू नये. पावसामुळे मृत्यू होणार नाही, पण झाडाखाली थांबल्यास धोका निर्माण होऊ शकतो.
    • शेतामध्ये काम करत असताना आपण आणि जनावरे विद्युत तारांपासून किमान ५० फूट अंतरावर राहावे.
    • बैलांना नांगरत असताना तात्काळ लोखंडी जू पासून वेगळे करावे.
  10. आपत्कालीन उपचार (Emergency Treatment):
    • जर एखाद्या जनावरावर वीज पडली, तर त्वरित पशुवैद्यकीय मदत घ्यावी.
  11. जागरूकता (Awareness):
    • पशुपालकांना वीज पडण्याचे धोके आणि त्यावरील बचाव उपायांबाबत माहिती द्यावी.
  12. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी मदत (Assistance for Losses Due to Natural Disasters):
    • नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना केंद्र आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत दिली जाते.
    • वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्यास अल्प व अत्यल्पभूधारक आणि भूमिहीन पशुपालकांना शासनाच्या नियमांनुसार मदत मिळते. यासाठी मृत जनावराचा तलाठी यांचा पंचनामा, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे शवविच्छेदन अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रे महसूल विभागाकडे जमा करावी लागतात.

या सर्व उपायांचे पालन करून पशुपालक त्यांच्या पशुधनाचे वीजेच्या धोक्यापासून संरक्षण करू शकतात. त्यामुळे, सतर्क राहा आणि आपल्या जनावरांची काळजी घ्या!

00000

संकलन :

विजय राऊत, सहा. संचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय, अमरावती

मुंबईत उभारणार अल्पसंख्याक वर्गातील मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय – अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 21 : अल्पसंख्याक वर्गातील मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबईत अणुशक्तीनगर येथे मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मौजे अनिक, चेंबूर, अणुशक्तीनगर येथे अल्पसंख्याक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणे संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सना मलिक, माजी मंत्री नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जैवंशी,  विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. गोविंद संगवई, सह सचिव संतोष खोरगडे, अवर सचिव मिलिंद शेनॉय, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी आदिसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले की, अल्पसंख्याक वर्गातील विशेषत: मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.  शैक्षणिक प्रगतीनेच समाजाची प्रगती साधता येत असल्याने त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विशेषत: मुलींना उच्च शिक्षण मिळावे यासाठी अणुशक्ती नगर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी नियमानुसार प्रस्ताव सादर करावा. यामध्ये इतर समाजाच्या मुलींनाही प्रवेश घेता यावा, साधनसामग्री, सोयी सुविधा उपलब्ध असाव्यात, त्यादृष्टीने सकारात्मक प्रस्ताव सादर करावा, असेही मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

पुरंदर व कोपरगाव येथे बहुउद्देशीय तालुका क्रीडा संकुल उभारावे – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 21 : पुण्यातील पुरंदर व अहमदनगर येथील कोपरगाव येथे सुसज्ज बहुउद्देशीय तालुका क्रीडा संकुल उभारण्यात यावे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

पुरंदर तालुका क्रीडा संकुल, कोपरगाव तालुका क्रीडा संकुल उभारणीसंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, आमदार आशितोष काळे, अपर मुख्य  सचिव अनिल डिग्गीकर, उपसचिव श्री. पांढरे, उपसचिव डॉ. सुनिल निमगांवकर, उपसंचालक प्रसाद कर्डिले, उपसचिव निर्मलकुमार चौधरी उपस्थित होते.

मंत्री भरणे म्हणाले की, पुण्यातील पुरंदर तालुक्यात बहुउद्देशीय सभागृह, योगा हॉल, जिम्नॅस्टीक्स, चेंजिंग रूम, बॅडमिन्टन हॉल यासह स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राचाही समावेश करावा. शासन अनुदान मर्यादेत कामे करावीत व तालुका क्रीडा संकुल समितीने अतिरिक्त निधी स्वबळावर उभारावे.

याचबरोबर कोपरगाव येथे तालुका क्रीडा संकुलात ज्या सुविधा उपलब्ध नाहीत, अशा सुविधांनी परिपूर्ण शहराच्या मध्यभागी असलेल्या क्षेत्रात नव्याने तालुका क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. सद्यस्थितीतील शालेय विद्यार्थ्यांची शहरात संख्या 15 हजारापेक्षा जास्त आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या नव्या क्रीडा संकुलाचा नव क्रीडापट्टू घडविण्यासाठी फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

मुंबई देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचे हब महाराष्ट्र स्टार्टअप्समध्ये संपूर्ण देशात अग्रेसर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २१: स्टार्टअप आणि उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचे मुंबई हब बनले आहे. देशाच्या एकूण स्टार्टअप्सपैकी २४ टक्के महाराष्ट्रात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे सीएसआयआर आणि तीन प्रमुख वैज्ञानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्टअप कॉन्क्लेव २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्र स्टार्टअप्सच्या बाबतीत संपूर्ण देशात क्रमांक एकवर असून २०२५ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात २६ हजार ६८६ स्टार्टअप्स आहेत. जे देशातील एकूण स्टार्टअप्सच्या २४ टक्के आहेत. गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल फंड्सच्या उपलब्धतेमुळे मुंबई स्टार्टअप्ससाठी सर्वात योग्य ठिकाण बनत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’, ‘मुंबई फिनटेक हब’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ तयार केल्या आहेत. त्यामुळे मुंबई हे आर्थिक आणि तांत्रिक इनोव्हेशनचे केंद्र बनले आहे. फिनटेक, ई-कॉमर्स, हेल्थटेक, एडटेक आणि डीप टेक स्टार्टअप्स झपाट्याने विकसित होत असून देशातील सर्वाधिक म्हणजे २७ युनिकॉर्न कंपन्या महाराष्ट्रात असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबई हे देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणारे स्टार्टअप हब आहे. या वर्षी स्टार्टअप्सनी एकूण ३.७ बिलियन डॉलर्सचा निधी प्राप्त केला जो गेल्या वर्षाच्या तुलनेत १५४ टक्के अधिक आहे. पुणे हे माहिती व तंत्रज्ञान, वाहन उद्योग आणि बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. आता नवी मुंबईत ३०० एकरावर देशातील सर्वात आधुनिक ‘इनोव्हेशन सिटी’चे बांधकाम सुरू आहे. जेथे विज्ञान, तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, डेटा सायन्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअप्स विकसीत होतील.

भारतात सध्या दीड लाखांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत असून भविष्यात भारत हे जगातील सर्वोत्तम स्टार्टअप केंद्र बनू शकते. सीएसआयआर- एनसीएल,  सीएसआयआर  निरी आणि सीएसआयआर एनआयओ या संस्थांनी या कॉनक्लेव्हचे आयोजन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.  समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक महासत्ता बनवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आपल्या भाषणाच्या सरुवातीला उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना आदरांजली अर्पण केली.

००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण : विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

नवी दिल्ली, दि. 21 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आल्याची माहिती विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जन्म जयंती साजरी केली जाते. यंदा अहिल्यादेवी होळकर यांची  300 वी जयंती त्यांच्या जन्म गावी अहिल्यानगर येथील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे भव्य स्वरूपात होणार आहे. त्याचे निमंत्रण राष्ट्रपती यांना देण्यासाठी आज श्री. शिंदे आले असून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या भेटीनंतर त्यांनी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  यावेळी सांगली महानगर पालिकेच्या महापौर संगिता खोत, ॲड. वीणा सोनवलकर, डॉ. उज्वला हाके, डॉ. स्मिता काळे, मानिका गहानवर या उपस्थित होत्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान आहे. त्या काळात समाजातील रूढी पंरपरेला झुगारून त्यांनी धर्माचे, संस्कृतीचे रक्षण केले. देशभरातील 12 ज्योर्तिलिंगांचा जीर्णोध्दार त्यांनी केला. काशी विश्वनाथ मंदिराची पुर्नबांधणी, अनेक ऐतिहासीक धार्मिक स्थळांवरील घाटांचे निर्माण, विहीरींचे बांधकाम, रस्त्यांच्या कडेवरील वृक्षारोपण असे अनेक कामे त्यांच्या हातुन घडलीत, अशी माहिती श्री शिंदे यांनी यावेळी सांगितली. चौंडी या त्यांच्या जन्मगावी होणाऱ्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रामात यापुर्वी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, राज्याचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री आल्याचे त्यांनी यावेळी सांग‍ितले.

याच महिन्यात 6 मे 2025  रोजी अहिल्यानगर येथे मंत्रीमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देत श्री शिंदे यांनी सांगितले, या मंत्री मंडळाच्या बैठकीत  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.  चौंडी ते निमगाव डाकू २.७०० किमी लांबीचा रस्ता होणार आहे. राज्य शासनाने ३ कोटी ९४ लक्ष एवढ्या खर्चास मान्यता दिलेली आहे.

00000

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिना’निमित्त शपथ कार्यक्रम

नवी दिल्ली दि. २१ : माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ३४ व्या स्मृतीदिनी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनानिमित्त, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज शपथ घेण्यात आली.

कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा  निवासी आयुक्त आर. विमला यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना,  “आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु”अशी शपथ दिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, स्मिता शेलार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करुन अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनानिमित्त शपथ देण्यात आली.

000

अमरज्योत कौर अरोरा/ वृत्त क्र.114

 

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २१ : अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल करण्यात आलेला नाही. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहचविण्यासाठी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मंत्रालयात विविध शिष्यवृत्तींबाबत व शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्याबाबत आढावा बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल, उपसचिव समीर सावंत, शिक्षण संचालनालयाचे (योजना) संचालक महेश पालकर व संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, सध्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीमध्ये व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीमध्ये घेण्याचा मानस आहे. या बदलामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकेल व त्यांचे पुढील शिक्षण सुलभ होईल. पुढील शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. या कामाला गती देण्यात यावी. जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. यासाठी संबंधित विभागांनी सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य, मार्गदर्शन व विविध प्रकारची मदत दिली जाते. इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही अशीच मदत करण्याबाबत प्रस्ताव संबंधित विभागाने सादर करावा, असेही शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

0000

मोहिनी राणे/ससं/

 

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. २१ : दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची व स्मारकाच्या प्रतिकृतीची पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी,प्रकल्प व्यवस्थापक शशी प्रभु, भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगरपालिका, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, सद्यस्थितीत स्मारक इमारतींचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामासंदर्भात लवकरच दिल्ली येथे प्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्मारकाचे काम वेगाने व दर्जेदार रीतीने पूर्ण व्हावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्मारकात उभारण्यात येणाऱ्या व्याख्यानगृह, ग्रंथालय, सभागृह, विपश्यना केंद्र अशा विविध सभागृहांसंदर्भात नागरिकांसाठी तेथे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. स्मारकामध्ये उभारण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा तसेच तीव्र वादळांपासून स्मारकाचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. तसेच स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

महिला लोकशाही दिनी होणार महिलांच्या तक्रारींचे निवारण

मुंबई, दि. २१ : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनास महिलांनी आवर्जून उपस्थित राहून प्रश्न मांडण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी केले आहे.

मुंबई शहर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता महिला लोकशाही दिन बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. महिला लोकशाही दिन बैठकीत आपल्या तक्रारीचे निवारण करण्याकरिता महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, ११७ बीडीडी चाळ, पहिला मजला, वरळी,मुंबई ४०००१८ येथे अर्ज सादर करावा.

विहित नमुन्यात नसणारी व आवश्यक असणारी कागदपत्रे न जोडलेले अर्ज, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

0000

 

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

 

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. २१ : पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतले आहेत. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे.

पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेनेकाम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एकापाठोपाठ एक असे महत्वाचे निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

विभागातील रिक्त पदांमुळे पशुपालक, शेतकरी यांना सेवा देण्यास येणारी अडचण लक्षात घेऊन विभागातील आवश्यक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी त्यांनी पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आले.

त्यानंतर आता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील सहायक आयुक्त, पशुसंवर्धन ही ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवले. या भरतीची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी श्रीमती मुंडे यांनी पाठपुरावा केला.

एम.पी.एस.सी.ने सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून २० जून २०२५ पर्यंत अर्ज मागविले आहेत.

कामास येणार गती

ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पशुसंवर्धन विभागाला सक्षम आणि नवीन अभ्यासू अधिकारी मिळणार आहेत. त्यातून ग्रामीण भागातीलपशुसंवर्धन विभागाचे काम आणखी वेगाने व पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होणार असून पशुपालकांना चांगल्या दर्जाची सेवा मिळणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...