शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 86

पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने पूररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागेचा विकास करावा – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 21 : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या नद्यांची पुररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागा विकासासाठी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने गुजरात राज्याच्या धर्तीवर रिव्हर बंडिंगचा पर्याय अभ्यासून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिकेच्या पूररेषा बाधित क्षेत्रातील नव्या इमारतींचा विकास, जुन्या इमारतींचा पुनर्विकास व पूर्ण क्षमतेने टि. डी. आर वापर अनुज्ञेय करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली.

बैठकीस आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्य अभियंता, संचालक, नगररचना पुणे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २१ : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम करावे. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून 24 तास शनिवार व रविवारीही दक्ष राहून काम करावे. आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयातील परिषद सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

आपत्ती निवारण ही आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा 110 ते 119 टक्के पावसाचा आंदाज आहे. जास्ती पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकांनी विशेष तयारी ठेवावी. राज्यातील सर्वच महानगरपालिकांनी फ्लॅश फ्लड सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. राज्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता मॅपिंगमध्ये नसलेल्या ठिकाणीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरड कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात. यात जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्याने लक्ष घालावे. मुंबईत दरड प्रवण अशी एकूण 249 ठिकाणे आहेत. याबाबत सर्वच संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. आपत्तीकाळात बचावकार्यासाठी पुरवण्यात आलेल्या साहित्याचे मॉकड्रिल घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी  दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून आपण आपत्ती निवारणाचे काम करत आहोत. त्यामुळे त्याच त्या आपत्ती पुन्हा येणार नाहीत यासाठी दक्ष रहावे व तसे नियोजन करावे. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाण्याच्या विसर्गासाठी आंतरराज्य समन्वय ठेवावा. अशा समन्वयातून पुराचा धोका कमी करण्यास मदत होते. तसेच ज्या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पूर यामुळे संपर्क तुटतो अशा ठिकाणी रेशनचा अधिकचा साठा पुरवण्यात यावा. तसेच अशा भागातील गर्भवती महिलांना आपत्ती पुर्वीच सुरक्षित स्थळी अथवा रुग्णालयांमध्ये हलवण्यात यावे. जेणेकरून कोणताही अवनस्थ प्रसंग उद्भवणार नाही. विद्युत विभागाने त्यांची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे, राज्यातील आपत्ती प्रवण भागांचे अद्ययावत नकाशे हवाई दलास द्यावेत, महानगरपालिकेने रस्त्यांची कामे करताना लावलेले आडथळे पावसाळ्यापूर्वी काढून टाकावेत, पश्चिम द्रृतगती मार्गावर ज्याठिकाणी पाणी साठते तेथे दक्षता घेण्यात यावी. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्यासाठी प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे. सर्व महानगरपालिकांनी नाले सफाई करावी. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप बसवावेत, मुंबईत दरड प्रवण भागात डोंगरकड्यांना जाळ्या बसवाव्यात, धोकादायक ठिकाणी फलक लावावेत, पोलिसांनी अशा ठिकाणी जाण्यापासून पर्यटकांना रोखावे अशा सूचना ही त्यांनी केल्या.

बैठकीमध्ये सर्वच विभागांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून तयारीसंदर्भातील माहिती दिली. त्यामध्ये लष्कराच्या 38 तुकड्या तैनात  असणार असल्याची माहिती लष्कराच्या प्रतिनिधींनी दिली. तसेच  चेतक आणि नौदलाचे हलिकॉप्टर सज्ज असणार आहे, नौदल आणि बीएमसी यांची हॉटलाईन असणार आहे, भारतीय हवाई दल सुद्धा सुसज्ज असून कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफ, रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी, ऊर्जा विभाग, मुंबई महापालिका, मुंबई पोलिस यांनीही मान्सूनसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नौदल, वायुलद, सैन्यदल, सागरी सुरक्षा दल, एनडीआरअफ, एसडीआरएफ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आणि सर्व संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, अधिकारी उपस्थित होते.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

आपत्तीकाळात संपर्कासाठी राज्य आपत्ती निवारण विभागाचे संपर्क क्रमांक

मुंबई, दि. २१ : पावसाळ्यात विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असतात. या आपत्ती निवारणासाठी संपर्क करता यावा यासाठी राज्य आपत्ती निवारण संपर्क क्रमांक दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग आज मान्सून पूर्व तयारीची बैठक संपन्न झाली. हे संपर्क क्रमांक आले.

हे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. संचालक – आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9819207435, उप सचिव (एमसीआर) – 8169006195, राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9422560196, लॅन्डलाईन नंबर – 022-220227990, 22794229, 2203 ध्यान (2203023), ९३२१५८७१४३, सॅटेलाईट फोन नंबर – 8991119253 या प्रमाणे आहेत.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 

आरोग्यमंत्र्यांनी घेतला राज्य कामगार विमा योजनेंतर्गत रुग्णसेवा प्रकल्पांचा आढावा

मुंबई, दि. 21 : कामगारांचे आरोग्य आणि कल्याण ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून रुग्णसेवा योजनांचे प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीस आमदार मनीषा कायंदे, मुख्य अभियंता लेफ्टनंट कर्नल शिवशंकर मंडल, रिजनल डायरेक्टर श्रीमती अभिलाषा झा, राज्य कामगार विमा योजना प्रशासनाचे संचालक श्री.वायाळ तसेच केंद्र व राज्य शासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

अंधेरी (पूर्व) औद्योगिक वसाहतीतील कामगार रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी संबंधित अडचणी सोडवण्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर येथील राज्य कामगार विमा रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयामुळे स्थानिक कामगारांना त्वरित आरोग्य सुविधा मिळू शकतील. उल्हासनगर येथील शंभर खाटांचे रुग्णालय एक महिन्याच्या आत सुरू करण्यात यावे.

ग्रंथालय कामगार, रेशन दुकानदार यांसारख्या असंघटित कामगार वर्गालाही राज्य कामगार विमा योजनेचे लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात यावे.

राज्यातील कामगार विमा योजनेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यात येईल.

येत्या १५ दिवसांत अंधेरी येथे स्थानिक आमदार, उद्योग विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी यांचे शिष्टमंडळ रुग्णालय स्थळी भेट देऊन अंमलबजावणीबाबत पुढील निर्णय घेईल.

000

संजय ओरके/विसंअ

 

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि चैतन्य हेल्थ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको-व्हीलेज यांच्यात सामंजस्य करार

VIRENDRA DHURI

मुंबई, दि. 21: नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार राज्यातील विद्यापीठे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त संवर्गातील प्राध्यापक व अध्यापकांच्या प्रशिक्षणास अधिक महत्त्व दिले आहे. भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरेचे मूलभूत मूल्य समजून घेऊन शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेला चालना देण्यासाठीमहाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर यांच्यामधील करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

VIRENDRA DHURI

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र भारुड, व्यवस्थापक (प्रशासन) शंतनु पवार, केंद्र प्रमुख मिथीलेश भाकरे, कार्यकारी सहायक सलीम सय्यद , श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर संस्थेचे नवल जीत कपुर, अनुप गोयल, संजय भोसले उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर ही संस्था भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge System – IKS) आणि नेतृत्व विकास या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. अशा उपक्रमांमुळे अध्यापकांचे ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधिष्ठित शैक्षणिक दृष्टिकोन अधिक सुदृढ होईल.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भात लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्यांसंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. २१ : अलमट्टी धरणाच्या उंची वाढ संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृती समितीने मांडलेल्या मुद्यांचा विचार करता या संदर्भात येत्या १५ दिवसात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सर्वश्री अरुण लाड, इद्रिस नायकवडी डॉ. विनय कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे व उल्हास पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह.वि.गुणाले आणि कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, अलमट्टी धरण संदर्भात महाराष्ट्र शासनाने न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनाही याबाबत विनंती करण्यात आली आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी प्राधान्याने उपाय योजना राबविण्यात येत आहेत. नदीची वहन क्षमता वाढविण्यासाठी नदीतील गाळ काढण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून  ८० ते ८५ टीएमसी पुराचे पाणी वळविले जाईल. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्यात येणार असल्याने पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचेही जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अलमट्टी धरण उंची संदर्भात आपल्या भूमिका तसेच कृती समिती मधील सदस्यांनी सूचना मांडल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

 

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या राजशिष्टाचारात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश

मुबई दि.२१ : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देश-विदेशातील महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यांच्या राजशिष्टाचारविषयक बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये याची खबरदारी राजशिष्टाचार विभागाने घ्यावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचाराबाबत झालेल्या त्रुटी प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाला दिले. राजशिष्टाचार विभागात आवश्यकतेनुसार प्रशिक्षण, प्रबोधन आणि कार्यप्रणालीचे निर्धारण करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार विषयक बाबी मध्ये त्रुटी राहिल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राजशिष्टाचार ही शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य असून महाराष्ट्राचे अवलोकन देश पातळीवर होत असते, त्यामुळे भविष्यात अशी बाब घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मंत्री श्री.रावल यांनी या घटनेची दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर भविष्यात अशी बाब घडू नये यासाठी विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले. व्हीआयपी तसेच व्हीव्हीआयपी व्यक्तींबाबत राजशिष्टाचार विषयक नियम, कायदे, वेळोवेळी निर्गमित झालेले परिपत्रक, केंद्र व राज्य शासनाची या बाबतीत मार्गदर्शक तत्वे हे सर्व एकत्रित संकलित करून त्या बाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे. राज्यात राजशिष्टाचार अधिकाऱ्यांना राजशिष्टाचार विषयक बाबीचे तंतोतंत पालन करण्यासाठी वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. राजशिष्टाचार विषयक नियमांमध्ये काळानुरूप काही बदल करणे आवश्यक आहे का हे तपासण्यात यावे. राजशिष्टाचार विषयात तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभ्यास गट तयार करून प्रमाणित कार्यप्रणाली (standard operating procedure) निश्चित करण्यात यावी. विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. देशातील उत्कृष्ट राजशिष्टाचारविषयक प्रणाली विकसित करण्याकरिता आवश्यकता असल्यास सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल यांनी दिले आहेत.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे परदेश दौऱ्यावर असल्याचे वृत्त काही माध्यमांमधून प्रकाशित झाले होते. मात्र मंत्री श्री. रावल हे परदेश दौऱ्यावर नसून देशातच आहेत. नातेवाईकांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने ते व्यस्त होते. त्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर तातडीने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

 

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

 

शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २१ : राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा आणि खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे आणिखते याचा कुठलाही तुटवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भासणार नाही. साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठले पीक कुठे कमी-अधिक प्रमाणात घेता येईल, याचा विचार करूनच त्‍या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी विभागाच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगाम आढावा बैठकीसंदर्भातआयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव प्रविण दराडे, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते.

बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल

मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्राने केंद्र शासनाच्या ‘साथी’ या पोर्टलवर बियाणे नोंदणी करण्याचा नियम केला आहे. या नोंदणीमुळे हे बियाणे ट्रेसेबल होणार आहे. बोगस बियाणांबाबत कठोर पावले उचलण्यात येत असून यावर्षीपासून सर्व बियाणांची माहिती’साथी’ या पोर्टलवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.‍ आता जवळपास 70 हजार क्विंटल बियाणे पोर्टलवर उपलब्ध असून ते ट्रेसेबल आहे. त्यामुळे यामध्ये काही गैरप्रकार झाला तर ते लक्षात येऊ शकणार आहे. पुढच्या वर्षांपासून 100 टक्के बियाणे ‘साथी’ या पोर्टलवर असेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

खताच्या लिंकिंगबाबत कडक कारवाई

खतांच्या बाबतीत लिंकिंगची तक्रार सातत्याने येत असल्याचे सांगून मुख्यमंत्रीश्री. फडणवीस म्हणाले की, लिंकिंग संदर्भात अतिशय कडक निर्णय घेण्यात आलेला आहे. आता प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर बोर्ड लावून त्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे. त्यामुळे लिंकिंगचा आग्रह झाला तर त्यासंदर्भात त्या नंबरवर फोन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.एखाद्या कृषी केंद्रांनी पुरवठादार कंपन्याच्या सूचनेवरून लिंकिंग केल्याचेनिष्पन्न झाल्यास अत्यावश्यक वस्तू कायदा किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

कीड व्यवस्थापनासाठी डिजिटल शेतीशाळा

कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झाले पाहिजे, या दृष्टीने सगळी काळजी घेण्यात येत आहे. विशेषतः यावर्षी डिजिटल शेतीशाळा या देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून कीड व्यवस्थापनसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शनकरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र – ‘महाविस्तार’ ॲप

कृषी विभागाने एआय बेस्ड ‘महाविस्तार’ हे मोबाईल ॲप लॉन्च केले असून या ॲपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती आणि व्हिडिओज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना शेतीतील लागवड, त्याची पद्धती, कीड व्यवस्थापन, त्याची पद्धती, कोणत्या टप्प्यावर काय वापरले पाहिजे, अशी सगळी माहिती, त्याचे व्हिडिओज त्या ॲपमध्ये आहेत. या ॲपमध्ये मराठी भाषेत चॅटबॉट असून त्यावर कुठलाही प्रश्न विचारला असता त्याला योग्य उत्तर मिळते. असा हा शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून शेतीसंदर्भातील सर्व माहिती मिळवावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले.

सिबिल अट नाही

शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कृषीकर्ज पुरवठा झाला पाहिजे, यासंदर्भात बँकांनाहीनिर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बँकांनी सिबिल स्कोअरची अट ठेवणार नसल्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे एखाद्या बँक शाखेत जर सिबिल स्कोअरची मागणी करण्यात आली, तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा झाला पाहिजे, याकडे आमचे संपूर्ण लक्ष असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

वातावरणातल्या बदलामुळे काही आपत्तीसंदर्भातील सूचना आधीच मिळावी यासाठी ‘आयएमडी’च्या मदतीने पूर्वसूचनेसंदर्भातील व्यवस्था देखील तयार केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

 

 

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक

शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र : महाविस्तार एआयॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. २१ : कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास त्या कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीचे यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणींचा तसेच कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी Whole of the Government approach घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्यातही सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे योजना राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत करणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. यामुळे शेतीमधील शाश्वतता देखील वाढेल. गरजेप्रमाणे शेती कशी करावी, आवश्यक तेवढेच पाणी आणि खतांचा वापर कसा करावा, याबाबत विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. सध्या 10 हजार गावांमध्ये ॲग्री बिझनेस ॲक्टिव्हीटी सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यात डिजिटल शेतीशाळा आयोजित करुन त्यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, असे सांगितले.

यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचा शेती क्षेत्राला कसा लाभ करुन घेता येईल, याबाबत कृषी विभागाने दक्ष राहण्याची सूचना करुन शेतकऱ्यांना बियाणे, खते यांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले. शेतकऱ्यांना सावकाराच्या पाशातून बाहेर काढण्यासाठी बँकांमार्फत पतपुरवठा करण्याबाबत उद्दिष्ट पूर्ण करुन घ्यावे. कंपन्यांकडून अनावश्यक बियाणे आणि खते खरेदी करण्याबाबत जबरदस्ती होत असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. देशाच्या सकल उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 11 टक्के आहे, तथापि यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या 45 टक्के आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शेतीला शाश्वत करण्यासाठी ॲग्रीस्टॅक मधील माहिती उपयुक्त ठरेल, यासाठी यात अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करुन घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

शेतीसाठीच्या शासनाच्या योजनांची एकत्रितपणे अंमलबजावणी गरजेची  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देश आणि महाराष्ट्र हे शेतीप्रधान असून, शेती हा आत्मा आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे. खरीप हंगामाच्या आरंभाच्या निमित्ताने राज्यातील कृषी यंत्रणांनी पूर्ण तयारी केली आहे. हवामान अनुकूल असले तरी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे नियोजन अधिक जबाबदारीचे आहे. आधुनिक आणि सेंद्रीय शेतीवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून शेतकरी समृद्ध होण्यासाठी, त्याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यासाठी गटशेतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कृषीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी विविध कंपन्यांशी करार करण्यात आले आहेत. राज्यात नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जात आहे. जलयुक्त शिवार योजनेद्वारे भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बांबू लागवडीसारख्या पर्यायांमुळे आर्थिक मूल्यवृद्धी होणार असल्याचे सांगून शेतकरी समृद्ध आणि सुखी व्हावा यासाठी शासनाच्या धोरणांची आणि योजनांची संबंधित सर्व विभागांनी एकत्रितपणे अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

शेतकरी समाधानी तर राज्य समाधानी – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सध्याच्या काळात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘फार्म ऑफ द फ्युचर’सारख्या नव्या कल्पनांच्या अंमलबजावणीसाठी शासन कटिबद्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी योजनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येत आहे. महाराष्ट्रात ५० हजार शेतकऱ्यांच्या शेतांवर या नवकल्पनांची अंमलबजावणी होत असून, उत्पादनवाढीसोबत मार्केट इंटेलिजन्स आणि सप्लाय चेनच्या माध्यमातून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवनवीन संशोधनामुळे अधिक उत्पादन, कमी पाणी आणि खताचा वापर शक्य झाला असून, क्रॉपिंग पॅटर्नमध्येही लवचिकता आली आहे. शेतकरी आता विविध पिकांचे चक्र बदलून अधिक उत्पादन मिळवत आहेत. सरकारकडून चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी समाधानी राहिला तर राज्य समाधानी राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन सज्ज – कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले, कृषी उत्पादनात महाराष्ट्राने गतवर्षी विक्रमी वाढ नोंदवली असून, अन्नधान्य उत्पादनात २७ टक्के वाढ झाली आहे. यंदा १५२ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके घेतली जाणार असून, बियाणे आणि खतांची आवश्यकतेपेक्षा अधिक उपलब्धता आहे. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्पांमध्ये हजारो गावांचा समावेश करण्यात आला आहे. कृषी निर्यातीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, द्राक्ष, डाळिंब, आंबा आणि भाजीपाला यांची प्रमुख निर्यात होत आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना’मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत वितरित करण्यात आली आहे. राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी पाच हजार कोटींची गुंतवणूक मंजूर करण्यात आली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन सज्ज असल्याचे श्री. कोकाटे यांनी सांगितले.

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी पाण्याच्या योग्य नियोजनावर भर देण्यात येणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना डीबीटीमध्ये येत असलेल्या समस्यांचा विचार करुन डिजिटल करन्सीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा यासाठी सातबारावर शेतकऱ्यांच्या नोंदी अद्ययावत करुन घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी खरीप हंगाम तयारीबाबतचे सादरीकरण करताना विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची तसेच नव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. ‘साथी’ पोर्टलवर बियाणे उपलब्ध करुन दिले जात असून केंद्र सरकारकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून 6,750 गावांमधील 13 लाख 50 हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी 2025-26 मधील पीक कर्ज वाटपाबाबत माहिती दिली. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रास्ताविकात यावर्षी  एक लाख कोटींच्या कृषी उत्पन्नाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महाविस्तार ॲप, महा डीबीटी योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना, कृषी विभागाची दिशादर्शिका आदी पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. आढावा बैठकीस बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विभागीय आणि जिल्हा स्तरावरील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

बी.बी.एफ. (रुंद वरंबा सरी) तंत्रज्ञान : पर्जन्याधारित शेतीस वरदान

अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असतो. यासाठी बी.बी.एफ. म्हणजेच ‘Broad Bed and Furrow’ (रुंद वरंबा सरी) पद्धत ही शाश्वत उत्पादनाची दिशा दाखवते.

बी.बी.एफ. म्हणजे काय?

‘बी.बी.एफ.’ तंत्रज्ञान म्हणजे रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने जमिनीची मशागत करून बियाण्याची पेरणी करणे. या पद्धतीत शेतात सुमारे ६० सें.मी. रुंद वरंबा आणि ३० सें.मी. सरी अशा रचनेने शेताची रचना केली जाते. ही रचना बी.बी.एफ. यंत्राच्या मदतीने तयार होते.

या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये :

सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, मका, हरभरा आदी पिकांसाठी उपयुक्त.

अवर्षणप्रवण क्षेत्रात प्रभावी उपयोग, कारण जलसंधारण सहज साधता येते.बियाणे, खते यांत २०-२५% बचत, त्यामुळे निविष्ठा खर्च कमी. २५ ते ३०% पर्यंत उत्पादनात वाढ.

तांत्रिक फायदे :

उताराच्या आडवी पेरणीमुळे जलसंधारण सुधारते, माती व पाणी दोन्ही साठते. पावसाचा खंड असला, तरी पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते.जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून वाहून जाते, झाडांना पाणी साचत नाही.पिकाला भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो — रोपे जोमदार वाढतात.आंतरमशागत व फवारणी करणे सोपे — ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्र वापरता येते.मातीची धूप कमी होते आणि तिची भुसभुशीतता व सच्छिद्रता वाढते.

बी.बी.एफ. हे एक शाश्वत, खर्चिक बचत करणारे, उत्पादनवाढीस पोषक आणि पर्जन्याधारित शेतीस पूरक असे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान आहे. योग्य नियोजनाने याचा अवलंब केल्यास शेतकरी बांधवांना हवामान बदलाशी सामना करत उत्तम उत्पादन घेता येईल.

00000

स्रोत : कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

 

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...