शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 771

वागळे इस्टेट येथील चर्चमध्ये स्वीपने केली मतदानाबाबत जनजागृती

ठाणे, दि. १२ (जिमाका): ठाणे  लोकसभा  मतदारसंघातील 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील  वागळे इस्टेट परिसरातील डिसोझावाडी  येथील चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांची प्रार्थना झाल्यावर स्वीप पथकाने उपस्थितांना 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.

मतदान करुन लोकशाही बळकट करा.. मतदानाचा आपला हक्क बजावा.. तुमचे मत खरा लोकशाहीचा आधार..,   असे आवाहन यावेळी ख्रिस्ती बांधव मतदारांमध्ये करण्यात आले. यावेळी उपस्थितांनीही स्वीप पथकाच्या माध्यमातून सुरू असलेल्या मतदान जनजागृतीमध्ये सहभाग घेत आम्ही मतदान करणारंच असा विश्वास दिला.  जे प्रथमच मतदान करणार आहेत, अशा तरुणांमध्ये देखील स्वीपच्या पथकाने मतदान करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी देखील या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी स्विप टिमचे श्री राजेन्द्र परदेशी सर, श्री अनंता सोनावळे, श्री सिताराम परब, श्री नैनेश भालेराव, श्री रोहित चेटोले, श्री. अविनाश सावंत उपस्थित होते.

०००

मासळी विक्रेत्यांमध्येही स्वीप पथकाने केली मतदानाबाबत जनजागृती

ठाणे, दि. १२ (जिमाका): ठाणे लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपच्या माध्यमातून शहरात सर्वत्र मतदान जनजागृती करण्यात येत आहे. 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा अंतर्गत लोकमान्यनगर येथील पडवळ नगर व इंदिरानगर येथील मासळी बाजारातील मासळी विक्रेत्यांमध्ये मतदानाबाबत नुकतीच जनजागृती करण्यात आली.

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. 20 मे 2024 ही मतदानाची तारीख लक्षात ठेवून आपले राष्ट्रीय हक्क बजावा असे आवाहन यावेळी मासळी विक्रेत्यांना करण्यात आले.

पडवळ नगर व इंदिरानगर येथील मासळी बाजारातील विक्रेत्यांनीही मी मतदान करणार अशा घोषणा दिल्या. मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो.. अशी जनजागृती स्वीपच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी स्विप टिमचे सहकारी श्री.राजेंद्र परदेशी श्री.रोहीत चेटोले , श्री.अनंत सोनावळे, श्री.अविनाश सावंत, श्री. सिताराम परब व श्री. नैनेश भालेराव उपस्थित होते.

०००

जळगाव, रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह  अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

जळगाव,दि.१२ (जिमाका ):  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज दि.१३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदान साहित्य , ईव्हीएम मशीन चे वाटप रविवार दि. १२ रोजी करण्यात आले. दुपारनंतर मतदान कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना झाले. आज सोमवार दि. १३ रोजी सकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यात ३८८६ मतदान केंद्र

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर असे दोन्ही मतदारसंघ मिळून ३८८६ मतदार केंद्र आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदार संघात १९८२ मतदार केंद्र आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात १९०४ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात एकूण २१ दिव्यांग मतदार केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तर ३३ महिला मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. जिल्हयात एकूण ११ युवा मतदान केंद्र तर ५५ आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

१७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात मतदान ड्युटी करीता १७ हजार ८२१ पुरुष व महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात  मतदान केन्द्राध्यक्ष पुरुष ४२६७, मतदान केन्द्राध्यक्ष महिला ४६ असे एकूण ४३१३ , प्रथम मतदान  अधिकारी पुरुष ४२६७ प्रथम मतदान  अधिकारी महिला ४६ असे एकूण ४३१४ , इतर मतदान अधिकारी पुरुष ४२३४ , इतर मतदान अधिकारी महिला ७९ असे एकूण ४३१३ ओ पी ओ २ पुरुष ३७५ महिला ४५६१ असे एकूण ४९३६ तर राखीव २२७७ असे एकूण १७ हजार ८२१ कर्मचारी मतदान ड्युटी करीता नियुक्त करण्यात आले आहेत.

१५९३ वाहनांची सोय

मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारी व मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यात १५९३ वाहनांची सोय करण्यात आली होती. सोय करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ३९२ एस टी बसेस ,मिनी बस १२,जीप २३,टेम्पो १४ सीटर ८,टेम्पो २० सीटर ११, क्रुझर ४७५,स्कूल बस ७०, एस ओ जीप ४१६,ईव्हीएम वाहतूक वाहन ६६,आचार संहिता उल्लंघन कक्ष वाहने ६६,राखीव वाहने ६६ असे एकूण १५९३ वाहनांची सोय करण्यात आली होती.

३८८६ मतदान यंत्रे रवाना

मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील ३८८६ मतदान केंद्रावर रविवारी ३८८६ मतदान यंत्रे व व्ही व्ही पॅट मशीन सह वाहनांच्या सहाय्याने  निवडणूक विभागाने निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर पोहचविण्यात आले . त्यासोबतच कोणत्याही तांत्रिक अडचणींचा सामना करण्यासाठी राखीव मतदान यंत्रे देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

जिल्ह्यात ३८ लक्ष १५ हजार ७९६ मतदार

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर असे दोन्ही मतदार संघ मिळून जिल्ह्यात ३८ लक्ष १५ हजार ७९६  मतदार आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदार संघात १९ लक्ष ९४ हजार ४६ इतके मतदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यात १ लक्ष ३७ हजार ३५० पुरुष मतदार तर ९ लक्ष ५६ हजार ६११ महिला मतदार व ८५ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघात १८ लक्ष २१ हजार ७५० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ९ लक्ष ४१ हजार ७३२ पुरुष मतदार तर ८ लक्ष ७९ हजार ९६४ महिला मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तर ५४ तृतीयपंथी मतदार नोंदविण्यात आले आहेत.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात ०१ पोलीस अधीक्षक ,०२ अप्पर पोलीस अधीक्षक,०९ पोलीस उपधीक्षक,३१ पोलीस निरीक्षक,११९ सहाय्य्क /उपनिरीक्षक ,जिल्ह्यातील अंमलदार २५५०, बाहेरील जिल्ह्यातील अंमलदार २३६०,बीएसएफ ०१ कंपनी ,०२ एसआरपीएफ प्लाटून,०२ सीआरपीएफ प्लाटून ,३०८५ होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या शिवाय बाहेरील राज्यातील तीन पोलीस कंपनी देखील जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. यात केरळ येथील २ कंपनी तर कर्नाटक येथील १ कंपनी दाखल झाली आहे.

मतदान केंद्रावर मोबाईल बंदी

जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर दोन्ही मतदार संघात मतदान केंद्रावर मोबाईल फोन,स्मार्ट वॉच ,कार्डलेस फोन, वायरलेस सेट सह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरास , बाळगण्यास निर्बंध आहेत. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल वापरता येणार नाही. त्यामुळे समूहाने मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेरच ठेऊन जावे लागणार आहे. किंवा एकमेकांजवळ सांभाळायला द्यावे लागणार आहे.

सर्व सोयींनी परिपूर्ण असणार मतदान केंद्र

जिल्ह्यात उभारण्यात आलेले ३८८६ मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी मतदान केंद्रावर परिपूर्ण सोयी करण्यात आल्या आहेत. त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड , मतदार सहाय्य्यता केंद्र, आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी निर्भयपणे मतदानाला यावे

जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाकरिता आज दि. १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी  न पडता निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे. प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या सोबतच जिल्ह्यात निर्भय पणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे. मतदारांनी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभावी होऊन आपला हक्क बजवावा व मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जळगाव , रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह अधिकारी ,कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना.

०००

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४; बीड जिल्हा प्रशासन तयार

बीड, दि. १२ (जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या 4 थ्या टप्प्यातील निवडणुक सोमवार दि. 13 मे रोजी आहे. या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघातही निवडणुका होणार आहेत. प्रशासनाच्यावतीने या मतदानासाठी संपूर्ण तयार झाली आहे.

बीड लोकसभा मतदार संघात एकुण 21,42,547 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज सर्व विधानसभा मतदार संघतील  एकुण 2355 मतदान केंद्रावरील मतदान अध्यक्ष व त्यांची टीम त्यांना निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाली.  2355 केंद्रांवर 10,432 अधिकारी कर्मचारी आपले मतदानाचे काम उद्या पार पाडतील . यामध्ये 11 दिव्यांग मतदान केंद्र , 55 महिला मतदान केंद्र, 22 युवा मतदान केंद्र चालक आहेत. याशिवाय 1 पोलिस तथा 1 होमगार्ड  कर्मचारी असणार आहे. बीड विधानसभा मतदार संघात असणाऱ्या मतदान केद्रांच्या केंद्रांध्यक्षांना व चमुला जिल्हा निवडणुक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या  नेतृत्वात प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच निवडणुकीच्या काळात नेमलेले नोडल अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत आहे. बीड लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा मतदार संघ आहे. यामध्ये 6 सहाय्यक निवडणुक अधिकारी असून 228 गेवराई या विधानसभा मतदार संघाचे ओंकार देशमुख, 229 माजलगाव चे गौरव इंगोले, 230 बीडच्या कविता जाधव, 231 आष्टीचे प्रमोद कुदळे, 232 केजचे दिपक वजाळे, 233 परळीचे अरविंद लाटकर हे आहेत. जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन यांना करावे लागत असुन निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदान व मतमोजणी होईपर्यंत सतर्क राहणार आहेत.

मतदानाच्या दिवशी चोख बंदोबस्त

लोकसभा निवडणुक 2024 अनुषंगाने बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्याय दृष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या निर्देशाप्रमाणे मतदानाकरिता बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अपर पोलीस अधीक्षक-02, उपविभागीय पोलीस अधिकारी- 07, पोलीस निरीक्षक -18, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक-220, पोलीस अंमलदार 3373, होमगार्ड -2194, पॅरामिलीटरी फोर्स / केंद्रिय सशस्त्र बल -07 कंपनी, दंगल नियंत्रन पथक 06, जलद प्रतिसाद पथक-02, पोलीस वाहने -273 असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बीड जिल्हयात ठिकठिकाणी नाकाबंदी, चेकपोस्ट नेमण्यात आलेले आहेत. सर्व बंदोबस्तावर पोलीस अधीक्षक बीड हे करडी नजर ठेऊन आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही समाजकंटकांनी मतदान प्रक्रियेमध्ये बाधा आणल्यास कायद्यान्वये कार्यवाही केली जाणार आहे. सदर लोकसभा निवडणुक संदर्भाने सोशल मीडियावर सायबर सेल बीड बारकाईने लक्ष ठेऊन आहे.

मतदानासाठी प्रशासनाकडुन संपुर्ण चोख तयारी करण्यात आली असून आता मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडुन लोकशाहीने दिलेला हक्क बजावावा.

०००

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया….

मुंबई, दि. १२: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व आणि २९- मुंबई उत्तर मध्य या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. २६ -मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघांत १५२- बांरीवली, १५३ – दहिसर, १५४ – मागाठणे, १६० – कांदिवली, १६१ – चारकोप, १६२ – मालाड पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ येतात. तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात १५८- जोगेश्वरी पूर्व, १५९ – दिंडोशी, १६३ – गोरेगांव, १६४ – वर्सोवा, १६५ -अंधेरी पश्चिम, १६६- अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २८ – मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात १५५- मुलुंड, १५६ – विक्रोळी. १५७ -भांडुप पश्चिम, १६९ – घाटकोपर पश्चिम, १७० – घाटकोपर पूर्व, १७१ मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात.  २९ – मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात १६७ – विलेपार्ले, १६८ – चांदिवली, १७४ कुर्ला, १७५ – कलिना, १७६ वांद्रे पूर्व, १७७ – वांद्रे पश्चिम या मतदारसंघाचा समावेश आहे. १७२ – अणूशक्ती नगर आणि १७३ – चेंबूर या  विधानसभा मतदारसंघाचा समावेश मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात होतो.

निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ आली असताना मतदारांना त्यांचे मतदारयादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ॲप्स आणि पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कसे शोधावे मतदार यादीत नाव?

VOTERS’ SERVICES PORTAL (eci.gov.in) या लिंकवर जाऊन अथवा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन आपले मतदान केंद्र, यादी क्रमांक शोधता येणार आहे. किंवा स्वत: बद्दलची संपूर्ण माहिती ऑनलाईन भरून तुम्ही तुमचे मतदान केंद्र शोधू शकता. तसेच तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांकाद्वारेही तुमचे मतदान केंद्र आणि यादी क्रमांक शोधू शकता. तसेच व्होटर हेल्पींग ॲपद्वारेही तुम्ही मतदान केंद्र आणि यादी भाग विषयी माहिती मिळवू शकता.

व्होटर आयडी व्यतिरिक्त इतर १२ ओळखपत्रे मतदानासाठी वैध

मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे २० मे रोजी आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळख पत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, विशिष्ठ दिव्यांगांचे ओळखपत्र, केंद्र सरकार/राज्य सरकार/  सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र,  पासपोर्ट, बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबूक,  राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत  भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड,  वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे,  श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्ड, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र मतदाना दिवशी ओळख पटविण्यासाठी वापरता येणार आहे.

तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराबाबत जाणून घ्या

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदार त्यांच्या लोकसभा मतदार क्षेत्रातील उमेदवाराची माहिती जाणून घेऊ शकतात. Election Commission of India (eci.gov.in) अथवा या लिंकवर तुम्हाला उमेदवाराबाबत माहिती मिळेल अथवा ‘नो युवर कॅन्डीडेट’ (know your candidate) या ॲपवर माहिती मिळेल. २६- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २७ – मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात २१ उमेदवार, २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदरसंघात २० उमेदवार, २९ – उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय, ३०-दक्षिण मध्य मुंबईत १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी

या जिल्ह्यातील सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवर कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी आहे. सुट्टी नसल्यास दोन तासांची सवलत देणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. सुट्टी अथवा सवलत न दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली आहे.

उन्हाळ्यापासून बचावासाठी उपाययोजना

मतदारांना मतदान सहजतेने करता यावे यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, शौचालये, एकाच ठिकाणी अनेक केंद्रे असल्यास मतदान चिठ्ठीवर विविध रंगांचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना मतदान करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रांग असणार आहे. अंध दिव्यांगांसाठी ईव्हीएम मशीनसाठी ब्रेल लिपी आणि वरिष्ठ नागरिकांना व्हिल चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कुठे संपर्क साधाल

सामान्य चौकशीसाठी १९५० क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच, आपल्या क्षेत्रातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फत ही आपण मतदानासंदर्भात असलेल्या समस्यांबाबत माहिती घेऊ शकता. सक्षम ॲप दिव्यांग उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांबाबत आहेत. तसेच, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे आढल्यास सि-व्हीजील ॲपवर (C vigil App)तक्रारी दाखल करता येऊ शकतात.

०००

श्रध्दा मेश्राम (स.सं)

कल्याण मोमीस समूहाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

ठाणे, दि.१२ (जिमाका) : कल्याण पश्चिम मतदारसंघात कल्याण मोमीस समूहातर्फे मतदार जनजागृतीकरिता बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आम्ही नक्की मतदान करणार असा संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला.

सज्ञान झालात.. पण सुजाण झालात का.., वेड मतदान करण्याचे.., 20 मे रोजी नक्की मतदान करा असा संदेश देणारे फलक हातात घेवून मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

अठरावं वरीस मोक्याचं.. असा संदेश देत नवमतदारांनाही मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. वसंत व्हॅली, खडकपाडा सर्कल, साई चौकपर्यत सदर रॅली काढण्यात आली. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.

138 कल्याण मतदार संघातील स्वीप नोडल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅली काढण्यात आली. 20 मे रोजी नक्की मतदान करा.. अशा घोषणा देत या रॅलीत कल्याण मोमीस समूहाचे सदस्य देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

०००

मुंबई शहर जिल्ह्यात २० मे रोजी मतदानासाठी कामगार, अधिकारी- कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी

मुंबई, दि. १२: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात दि. २० मे, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सदर निर्देश देण्यात आले आहेत.

मतदानाच्या दिवशी कार्यरत कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देणे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादींना बंधनकारक आहे. खाजगी कंपन्यांमधील आस्थापना सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी लागू असणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील कामगार, अधिकारी-कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी संस्थेतील अधिकारी- कर्मचारी मतदान करण्यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे निर्देशही श्री. यादव यांनी दिले आहेत.

मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी देण्याबाबतच्या निर्देशाचे, सूचनांचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांच्या मालकांनी व व्यवस्थापनाने योग्य ते पालन करून काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे निर्देश श्री. यादव यांनी दिले आहेत.  मतदानाच्या दिवशी आस्थापना बंद न ठेवता मतदारांना मतदान करणे शक्य न झाल्याबाबत तक्रारी आल्यास संबंधित आस्थापनेवर कारवाई करण्यात येणार आहे.

मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुट्टी देण्यात येते. तसेच काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामध्ये काही मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहू नये, यासाठी हे श्री. यादव यांनी निर्देश दिले आहेत.

०००

शैलजा पाटील/स.सं

मतदान ओळखपत्र नसेल तरीही मतदान करता येणार – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. १२ : मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. या पैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना  मतदान करता येईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या वोटर स्लीप निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

मतदान ओळखपत्र असलेला मतदार मतदान करू शकतो. शिवाय ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही, अशा मतदारांनी ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा, तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाचे दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांनी वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ एनआरआय मतदार

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदान यादीत असल्याने त्यांना मूळ पास पोर्ट असेल तर मतदान करता येईल. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे,अशी माहितीही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी दिली.

०००

शैलजा पाटील/स.सं

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास भेट देऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

             जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महावितरणचे सहा. व्यवस्थापक राहुल गुप्ता,  पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, विविध नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

            बैठकीत जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यात ३०८५ मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदार संघाचा भाग असलेले १०४५ मतदान केंद्र हे ६१८ ठिकाणी आहेत. १९- औरंगाबाद मतदार संघात २०४० मतदान केंद्र ९७६ ठिकाणी आहेत.  जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार७०७ मतदार आहेत. त्यात जालना मतदार संघात १० लाख ६,४८७ तर औरंगाबाद मतदार संघात २० लाख ६१ हजार २२० मतदार आहेत. जिल्ह्याला ६१२० मतदान यंत्रे, २०४० कंट्रोल युनिट, २०४० व्हिव्हिपॅटची आवश्यकता आहे. ते सर्व उपलब्ध असून  सद्यस्थितीत ७३४१ मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. २४४५ कंट्रोल युनिट व २६४९ व्हिव्हिपॅट उपलब्ध आहेत. त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १७ हजार ७४० मनुष्य बळाची गरज असून २० हजार ५२४  कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात आली.

            बैठकीस मार्गदर्शन करतांना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत मतदान हा महत्त्वाचा भाग आहे. मतदानाच्या वेळी मतदारांना कुठल्याही प्रकारे समस्या जाणवू नयेत, यासाठी योग्य नियोजन करावे. सर्व यंत्रणेने दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. वृद्ध, दिव्यांग यांची मतदानाच्या वेळी काळजी घ्यावी, त्यांना विनात्रास मतदान करता यावे, याची दक्षता घ्यावी. सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  तसेच अन्य अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे अहवाल वेळेवर पाठवावेत. मतदान प्रक्रियेत अडथळा आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्या असे निर्देश त्यांनी दिले.

००००००

मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. ११ : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना  मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या वोटर स्लिप निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत,असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ एनआरआय मतदार

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदान यादीत असल्याने त्यांना मूळ पास पोर्ट असेल तर मतदान करता येईल. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे,अशी ही माहिती जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी दिली.

*****

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

0
मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल...