मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 729

विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली

मुंबई, दि. 26 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला.

दिवंगत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर गजानन जोशी, तसेच माजी विधानपरिषद सदस्य राजेंद्र सुखानंद पाटणी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिवंगत सदस्यांच्या कार्याला उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उजाळा दिला. यावेळी सर्व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास वंदे मातरम् व राज्य गीताने सुरुवात      

मुंबई, दि. २६ : राज्य विधिमंडळाच्या सन २०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या  कामकाजास विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सुरुवात झाली.

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्री आणि विधानपरिषदेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

००००

 

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 26 : मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते विजय वडेटि्टवार यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होते. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ.

विधानसभेमध्ये ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

मुंबई, दि. 26 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

पहिल्या दिवशी तीन विधेयके सादर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 मांडले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2024 आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ.

 

विधानसभेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली

मुंबई, दि. 26 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला.

दिवंगत विधानसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर गजानन जोशी , तसेच  विधानसभा सदस्य राजेंद्र सुखानंद पाटणी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिवंगत सदस्यांच्या कार्याला अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी उजाळा दिला. यावेळी सर्व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.

००००

वंदना थोरात/विसंअ

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास वंदे मातरम् व राज्य गीताने सुरुवात      

मुंबई, दि. २६ : राज्य विधिमंडळाच्या सन २०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सुरुवात झाली.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्री आणि विधानसभेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

०००

वंदना थोरात/विसंअ

पुण्यात आयोजित ‘डिफेन्स एक्स्पो’ला विद्यार्थी आणि उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद

पुणे, दि.२५ : इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर मोशी येथे सुरू असलेल्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’मध्ये प्रदर्शित संरक्षण तंत्रज्ञान आणि सामुग्री पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी, नागरिक तसेच उद्योजकांनी गर्दी केली. दुपारपर्यंत एक लाख २० हजारापेक्षा अधिक नोंदणी झाली असून संरक्षण विषयक आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यात तरुणाईने विशेष रस दाखविला आहे.

राज्याचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. देशातील संरक्षण उत्पादन क्षेत्रातील शासकीय संस्थांसह अनेक मोठ्या खाजगी संस्था आणि एमएसएमईंनी यात सहभाग घेतला असल्याने प्रदर्शन विशेष ठरले आहे. देशाच्या संरक्षण सज्जतेच्याच्यादृष्टीने अलौकीक कार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी प्रदर्शनामध्ये पन्हाळा, सिंधुदुर्ग, शिवनेरी व रायगड किल्ल्यांच्या नावाने चार भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. प्रत्येक मंडपामध्ये सुमारे १०० ते १५० दालने आहेत. संपूर्ण परिसरात महाराजांच्या गड-किल्ल्यांची संकल्पना चित्रीत करण्यात आली आहे.

देशाची संरक्षण सिद्धता पाहण्याचा रोमांचित करणारा अनुभव
प्रदर्शनात एमएसमएईंची ४१८ लहान आणि ३३ मोठी दालने आहेत. भारतीय लष्कराच्या तीन्ही दलांनी प्रदर्शनात सहभाग घेतला असून अत्याधुनिक संरक्षण सामुग्री प्रदर्शित केली आहे. युद्धात उपयोगता येणारी प्रक्षेपणास्त्रे, रणगाडे, हेलिकॉप्टर, विविध प्रकारच्या गन्स जवळून पाहण्याचा रोमांचित करणारा अनुभव नागरिकांना घेता येत असल्याने आबालवृद्धांमध्ये उत्साह दिसत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तज्ज्ञांना प्रश्न विचारून माहिती जाणून घेत आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योजक, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांचा सहभाग असलेली चर्चासत्रेदेखील अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि एमएसएमईंना उपयुक्त ठरत आहेत. या चर्चासत्रांनाही चांगली उपस्थिती लाभली आहे.

युवकांना संरक्षण क्षेत्रातीली संधींची माहिती
राज्यात प्रथमच होत असलेल्या या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरीलही महाविद्यालयांचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आहेत. तरुणांना भारतीय वायुसेनेत सहभागी होण्यासाठी आकर्षित करण्यासाठी हवाई दलाने या ठिकाणी माहिती देणारा कक्ष उभारला आहे. वायुसेनेच्या विविध कामांची आणि हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी या ठिकाणी इंडक्शन पब्लिसिटी अॅण्ड एक्झिबिशन व्हेईकल (आयपीईव्ही) ठेवण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या सेवेत अधिकारी म्हणून तसेच अग्निवीरवायू (पुरुष आणि महिला) म्हणून रुजू होण्याचे फायदे काय आहेत, तसेच रुजू होण्यासाठी नियमांबद्दल माहिती देण्यात येत आहे.

आत्मनिर्भर भारताचे दर्शन
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळा, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन संस्था (डीपीएसयु) आणि खासगी क्षेत्रातील संरक्षण साहित्य निर्मात्या कंपन्या प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून त्यांनी प्रदर्शित केलेल्या उत्पादनांद्वारे संरक्षण क्षेत्रात देशाने ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने केलेल्या प्रगतीचे दर्शन होत आहे. भारताने सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांद्वारे सशस्त्र दलांच्या गरजा, संशोधन आणि विकास आणि संरक्षण उत्पादन याची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.

प्रदर्शनात मांडण्यात आलेले आकाश आणि समर क्षेपणास्त्र प्रणाली, याशिवाय नवीन पिढीचे कमी वजनाचे प्रगत हेलिकॉप्टर एमके-IV आणि लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, बोफोर्स गन, वज्र टॅंक, भिष्म टँक, इन्फँन्ट्री कॉम्बॅट व्हेईकल, धनुष, एलएसव्ही, रुद्र, समर-२, जमीनीवरून हवेत मारा करणारे प्रक्षेपास्त्र, पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली, अँटी सबमरिन क्षेपणास्त्रे, विविध युद्धनौका, पानबुड्यांच्या प्रतिकृती अशी उन्नत आयुधे खास आकर्षण ठरत आहे. या आुयधांसोबत सेल्फी घेण्याचा आनंदही नागरिक घेत आहेत.

डिआरडीओनेदेखील आपले उन्नत तंत्रज्ञान येथे प्रदर्शित केले आहे. त्यात पिनाका मिसाईल, रॉकेट, रॉकेट लाँचर, अभ्यास, रॉकेट लाँचींग सिस्टीमचा समावेश आहे. दक्ष डिफ्युजरसारखे उन्नत रोबोटीक्स तंत्रज्ञानही येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. खाजगी संस्थांनीदेखील विविध तंत्रज्ञानांनी सज्ज वाहने, टँक, शस्त्रास्त्रे येथे प्रदर्शित केलेली आहेत. भारतीय वायुदलाने ‘नाविन्यतेच्या माध्यमातून आत्मनिर्भरता’ ही संकल्पना स्पष्ट करणारी विविध उत्पादने येथे प्रदर्शित केली आहेत.

संपूर्ण परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच ऑनलाइन नोंदणीची सुविधा असल्याने करणे सुलभ आहे. प्रवेशद्वारापासूनच्या मार्गावर दुतर्फा राज्यातील गड-किल्ल्यांची लावण्यात आलेली छायाचित्रे शालेय विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. उद्या (सोमवार) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून अधिकाधिक उद्योजकांनी प्रदर्शाला भेट द्यावी,असे आवाहन उद्योग विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रीतेश गोळे, अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी- डिफेन्स एक्स्पो पाहून उत्साह वाढला. अशा प्रकारच्या प्रदर्शनाचा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना लाभ होईल. विविध प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली.

ताथवडे येथील विद्यार्थी- एकाच ठिकाणी बऱ्याच उद्योगस्ंस्थांनी तंत्रज्ञान प्रदर्शित केल्याने हे पाहून भविष्यात करिअर निश्चित करताना खूप फायदा होईल. सैन्यदलाची क्षमताही जवळून पाहता आली.

000

सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान अन् आनंदाचे दिवस येत राहोत ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.25 (जिमाका) :- श्री श्रीनिवास महोत्सवाच्यानिमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान अन् आनंदाचे दिवस येत राहोत, अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवली येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान, श्रीनिवास महोत्सवासाठी प्रीमिअर मैदान,डोंबिवली (पूर्व) येथे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे , कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आज येथे आयोजित केलेल्या श्री श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन,पवित्र, मंगलमय झाला आहे. तिरुपती बालाजी सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी-समाधान- आनंद आणतात. मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकतात, त्याला दुःखातून सुखात आणतात.


आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख निघून जावो,या सदिच्छा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, मागील वर्षी जून महिन्यामध्ये नवी मुंबई येथे तिरुपती बालाजी मंदिराचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. लवकरच मंदिराचे काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्या सर्वांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. आज या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजीचे दर्शन झाले. त्यांना येथील पूजेत सहभागी होता आले, प्रसादाचा लाभ घेता आला.

या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून श्री.शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी अयोध्या येथे राम मंदिर निर्माण झाले. त्यांच्या हस्ते अबूधाबीतही मंदिराचे लोकार्पण झाले. देशातील राममय वातावरणामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की, श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून साक्षात भगवान तिरुपती बालाजीचे दर्शन झाले व प्रसादाचाही लाभ घेता आला. यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष धन्यवाद. तिरुपती बालाजी त्यांच्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात हा सर्वानुभव आहे, त्यामुळे हा महोत्सव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो, या सदिच्छा. या महोत्सवासाठी तिरूपती बालाजी देवस्थानाचे पदाधिकारी, विविध मान्यवरांसह हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे भूमीपूजन संपन्न

नंदुरबार,दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ (जिमाका वृत्त)  :- नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे  व रुग्णालयाचे भूमीपूजन आज ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.

शहरातील टोकरतलाव रोड येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेत सायंकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यपाल रमेश बैस यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री अनिल पाटील, तर तर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, वैद्यकीय शिक्षण व आयुष चे आयुक्त राजीव निवतकर, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महमुनी, अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे हे उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय निवासस्थानांचेही भूमीपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे.

दृष्टिक्षेपात वैद्यकीय महाविद्यालय

  • या नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकुण मंजूर खर्च ( केंद्र प्रयोजित वैद्यकीय महाविद्यालय – Phase III) 325 कोटी रुपये आहे. त्यापैकी 195 कोटी (60%) केंद्र सरकारचा वाटा आहे आणि 130 कोटी (40%) राज्य  सरकारचा वाटा आहे.
  • 500 खाटा आणि 100 एम.बी.बी.एस. प्रवेश क्षमतेच्या या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाची एकूण प्रशासकीय मान्यता47 कोटी रुपये ऐवढी आहे.
  • नवीन इमारतीची 46 एकर जागा मौजा टोकरतलाव, नंदुरबार येथे प्रस्तावित केली आहे.
  • 500 खाटांच्या क्षमतेसह, या रूग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग,अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा , रक्तपेढी ,एक्स-रे, सोनोग्राफी , सीटी स्कॅन, डायलिसिस, मोठ्या आणि लहान शस्त्रक्रियांसाठी ऑपरेशन थिएटर या सारख्या विविध आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
  • MBBS च्या पहिल्या बॅचची सुरुवात 2020 मध्ये झाली.
  • महाविद्यालयाची प्रवेश क्षमता प्रति वर्ष 100 MBBS विद्यार्थी असुन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्या 4 बॅचेस (400 विद्यार्थी ) शिकत आहेत.
  • पहिली बॅच अंतीम MBBS पास होऊन मे 2025 पासून त्यांची इंटर्नशिप सुरू होईल.
  • राज्य वैद्यकीय विद्यापीठात आजपर्यंत MBBS चा सरासरी उत्तीर्ण दर सुमारे 92 टक्के आहे.
  • DNB पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 5 प्रमुख विषयांमध्ये या महाविद्यालयाचे मूल्यांकन पूर्ण झाले असुन लवकर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होतील.

 

000

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२५ : मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.कायदा कोणीही हातात घेवू नये.कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून यासाठी शासन कटिबद्ध असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित चहापान कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, गृह निर्माण व इतर मागास बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मदत व पुर्नवसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून सर्व सामान्य कामगार, कष्टकरी, महिला, युवा याचा सर्वांगीण विकासाला चालना देणारे निर्णय घेतले जातील. या दिड वर्षात अनेक योजना सुरू केल्या. त्यामध्ये शेतकरी, महिला यांचा आयुष्यात बदल घडवणारे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. अवकाळी, गारपीट, महापूर मध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करत आहे. शेतकऱ्यांसाठी 45 हजार कोटींची मदत केली. तसेच शेतकऱ्यासाठी 1 रुपयात पिक विमा योजना सुरु केली. एस.टी महामंडळाच्या बस प्रवासात महिला सन्मान योजना सवलत देण्यात आली आहे.

राज्यात 8 लाख कोटी रुपयाचे पायाभूत सुविधा, अटल सेतू, समृद्धी महामार्ग असे विविध उपक्रमाला चालना देण्याचे काम सरकार करीत आहे. दावोस येथे 3 लाख 73 हजार कोटी रुपयांचे सामजंस्य करार करण्यात आले. नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतीपथावार आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे याला प्राधान्य देण्यात येत आहे. शासन आपल्या दारी असा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. सरकार गतीमान आहे. सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.स्वच्छाता मोहिम राज्यात राबविण्यात येत असून यामुळे प्रदुषण कमी होत आहे. राज्याला प्रगतीपथावर नेत असतांना सर्व क्षेत्रांना स्पर्श करण्यात येत असल्याचे, श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले,न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने राज्यातील मराठा समाजास कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदींचा डेटा बेस करुन कार्यपद्धती विहित केली, ज्यामुळे जात प्रमाणपत्र मिळणे सुकर झाले. कायद्याच्या चौकटीत टिकणारे व इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याकरीता दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशना विधेयक मंजूर करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्ती योजने अंतर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथीमार्फत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बँक खात्यात डीबीटीद्वारे वितरीत करण्यात येत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ लाख ५४ हजार ४९४ विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी ९ हजार २६२ कोटी मंजूर करण्यात आले. इ. डब्ल्यू. एस. अंतर्गत १० टक्के आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांपैकी ७८ टक्के मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश. तसेच एम. पी. एस. सी. मार्फत शासकीय सेवेत ६५० उमेदवारांपैकी ८५ टक्के मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नियुक्ती करण्यात आले असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा वितरीत करण्यात आला. मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या १ हजार ५५३ उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आली.

एस. ई. बी. सी. मधून इ. डब्ल्यू. एस. व खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय. अशा प्रकारे एकूण ४ हजार ७०० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.⁠मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कार्यरत असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करत आहे – देवेंद्र फडणवीस

यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात विकासाची कामे वेगात सुरू आहेत दुष्काळ, आरोग्य, रोजगार, शिक्षण आदी बाबींवर सरकारचे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्यासाठी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो बोनस घोषित झाला आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार व्यक्त करतो आहे.हे सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करते आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये – अजित पवार

याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल परंतु येत्या चार महिन्यांसाठी चा खर्चास मान्यता घेण्यासाठी अधिवेशनात सादर केले जातील. महानंद प्रकल्प राज्याचा असून गोरेगाव येथे मुख्यालय आहे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ हे देशपातळीवर कार्य करणारी संस्था असून यापूर्वी देखील जळगाव जिल्हा दूध संघाचे त्यांच्याकडे हस्तांतर केले होते परंतु त्या दूध संघाची आर्थिक सुधारणा झाल्याने सुस्थिती आलेला दूध संघ जळगाव जिल्हा कडे हस्तांतरित करण्यात आला. दूध उत्पादकांसाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जात असून त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही.

ते पुढे म्हणाले, ड्रग्जच्या गुन्ह्याचे तपास करताना पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत पंजाब व परदेशापर्यंत धागेदोरे शोधले आहेत या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 25 लाखाचे रोख पारितोषिक देखील जाहीर केले आहे. मराठा आरक्षण बाबत शासनाने मार्ग काढण्याचे धोरण स्वीकारून ते पूर्ण केले आहे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण देण्यासाठी कार्यवाही झाली होती . बिहारचे 50% पेक्षा अधिक आरक्षण मध्ये मर्यादा असून राज्यांमध्ये त्याच धर्तीवर 50% पेक्षा अधिक आरक्षण झाले आहे. ते टिकणारे असून या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था चांगली रहावी हे गरजेचे आहे सर्वसामान्यांसाठी सरकार काम करीत आहे असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले.

सन 2024 चे राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची दिनांक 23 फेब्रुवारी 2024 पर्यंतची यादी

1. सयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयक-06

2. प्रस्तावित विधेयके-05

ताज्या बातम्या

आश्रमशाळांमधील शिक्षकांना वेतनश्रेणी देण्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री संजय शिरसाट

0
मुंबई, दि. १३: राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी व अनिवासी आश्रमशाळांना नियमानुसार अनुदान देण्याची कार्यवाही सुरू आहे. या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमित...

औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत स्वहिस्सा खर्चास परवानगी – मंत्री संजय शिरसाट

0
मुंबई, दि. १३: अनुसूचित जातीच्या युवकांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याच्या हेतूने सहकारी संस्थांना दिल्या जात असलेल्या अर्थसहाय्य योजनेंतर्गत संस्थांना पाच टक्के स्वहिस्सा उभारावा लागतो, तर...

पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता समुपदेशनाने

0
मुंबई, दि. १३: मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा व बदल्यांची...

मंत्रिमंडळ निर्णय

0
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना; समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास...

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली

0
मुंबई, दि. १३ : नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबई, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी कुलाबा व मोटार अपघात दावा प्राधिकरण,...