सोमवार, मे 12, 2025
Home Blog Page 728

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२५ : मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.कायदा कोणीही हातात घेवू नये.कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून यासाठी शासन कटिबद्ध असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित चहापान कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, गृह निर्माण व इतर मागास बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मदत व पुर्नवसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून सर्व सामान्य कामगार, कष्टकरी, महिला, युवा याचा सर्वांगीण विकासाला चालना देणारे निर्णय घेतले जातील. या दिड वर्षात अनेक योजना सुरू केल्या. त्यामध्ये शेतकरी, महिला यांचा आयुष्यात बदल घडवणारे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. अवकाळी, गारपीट, महापूर मध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करत आहे. शेतकऱ्यांसाठी 45 हजार कोटींची मदत केली. तसेच शेतकऱ्यासाठी 1 रुपयात पिक विमा योजना सुरु केली. एस.टी महामंडळाच्या बस प्रवासात महिला सन्मान योजना सवलत देण्यात आली आहे.

राज्यात 8 लाख कोटी रुपयाचे पायाभूत सुविधा, अटल सेतू, समृद्धी महामार्ग असे विविध उपक्रमाला चालना देण्याचे काम सरकार करीत आहे. दावोस येथे 3 लाख 73 हजार कोटी रुपयांचे सामजंस्य करार करण्यात आले. नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतीपथावार आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे याला प्राधान्य देण्यात येत आहे. शासन आपल्या दारी असा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. सरकार गतीमान आहे. सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.स्वच्छाता मोहिम राज्यात राबविण्यात येत असून यामुळे प्रदुषण कमी होत आहे. राज्याला प्रगतीपथावर नेत असतांना सर्व क्षेत्रांना स्पर्श करण्यात येत असल्याचे, श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले,न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने राज्यातील मराठा समाजास कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदींचा डेटा बेस करुन कार्यपद्धती विहित केली, ज्यामुळे जात प्रमाणपत्र मिळणे सुकर झाले. कायद्याच्या चौकटीत टिकणारे व इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याकरीता दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशना विधेयक मंजूर करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्ती योजने अंतर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथीमार्फत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बँक खात्यात डीबीटीद्वारे वितरीत करण्यात येत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ लाख ५४ हजार ४९४ विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी ९ हजार २६२ कोटी मंजूर करण्यात आले. इ. डब्ल्यू. एस. अंतर्गत १० टक्के आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांपैकी ७८ टक्के मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश. तसेच एम. पी. एस. सी. मार्फत शासकीय सेवेत ६५० उमेदवारांपैकी ८५ टक्के मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नियुक्ती करण्यात आले असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा वितरीत करण्यात आला. मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या १ हजार ५५३ उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आली.

एस. ई. बी. सी. मधून इ. डब्ल्यू. एस. व खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय. अशा प्रकारे एकूण ४ हजार ७०० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.⁠मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कार्यरत असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करत आहे – देवेंद्र फडणवीस

यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात विकासाची कामे वेगात सुरू आहेत दुष्काळ, आरोग्य, रोजगार, शिक्षण आदी बाबींवर सरकारचे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्यासाठी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो बोनस घोषित झाला आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार व्यक्त करतो आहे.हे सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करते आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये – अजित पवार

याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल परंतु येत्या चार महिन्यांसाठी चा खर्चास मान्यता घेण्यासाठी अधिवेशनात सादर केले जातील. महानंद प्रकल्प राज्याचा असून गोरेगाव येथे मुख्यालय आहे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ हे देशपातळीवर कार्य करणारी संस्था असून यापूर्वी देखील जळगाव जिल्हा दूध संघाचे त्यांच्याकडे हस्तांतर केले होते परंतु त्या दूध संघाची आर्थिक सुधारणा झाल्याने सुस्थिती आलेला दूध संघ जळगाव जिल्हा कडे हस्तांतरित करण्यात आला. दूध उत्पादकांसाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जात असून त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही.

ते पुढे म्हणाले, ड्रग्जच्या गुन्ह्याचे तपास करताना पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत पंजाब व परदेशापर्यंत धागेदोरे शोधले आहेत या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 25 लाखाचे रोख पारितोषिक देखील जाहीर केले आहे. मराठा आरक्षण बाबत शासनाने मार्ग काढण्याचे धोरण स्वीकारून ते पूर्ण केले आहे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण देण्यासाठी कार्यवाही झाली होती . बिहारचे 50% पेक्षा अधिक आरक्षण मध्ये मर्यादा असून राज्यांमध्ये त्याच धर्तीवर 50% पेक्षा अधिक आरक्षण झाले आहे. ते टिकणारे असून या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था चांगली रहावी हे गरजेचे आहे सर्वसामान्यांसाठी सरकार काम करीत आहे असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले.

सन 2024 चे राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची दिनांक 23 फेब्रुवारी 2024 पर्यंतची यादी

1. सयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयक-06

2. प्रस्तावित विधेयके-05

मंत्रिमंडळ निर्णय

धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम

धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यामुळे खरीप हंगामासाठी 1600 कोटी रुपये खर्च येईल.

धनगर विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण विद्यार्थी संख्या वाढविली

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवास शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सध्या 5500 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते.  ही संख्या वाढवून आता दरवर्षी 10 हजारापर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येईल. यासाठी येणाऱ्या 114 कोटी 45 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

राधानगरीचा सह्याद्री साखर कारखाना बीओटी तत्त्वावर

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील धामोड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर 25 वर्षांकरिता चालविण्यास देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या संदर्भात निविदा काढण्यात येऊन अटी व शर्तींच्या आधारे कंपनीची निवड करण्यात येईल.

जुने वीज टान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी निरंतर वीज योजना

जुने टान्सफॉर्मर्स (रोहित्रे) बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यासाठी 1600 कोटी रुपये खर्च लागणार असून त्यापैकी 2023-24 मध्ये 200 कोटी, 2024-25 मध्ये 480 कोटी आणि 2025-2026 मध्ये 480 कोटी अशा खर्चास मंजुरी देण्यात आली.  टान्सफॉर्मर्सचे ऑईल बदलण्यासाठी देखील 340 कोटीस मान्यता देण्यात आली.

निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये ठोक वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (कनिष्ठ आणि वरिष्ठ)  विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 1 मार्च 2024 पासून महागाई भत्त्यासह प्रति महिना 10 हजार रुपये वाढ करण्यात येईल.

हिरडा शेतमालाच्या नुकसानीसाठी मदत

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या 7 हजार 66 क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यासाठी 15 कोटी 48 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू

राज्य शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार दिव्यांग जिल्हा समन्वयक, विशेष तज्ज्ञ शिक्षक व विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
याचा लाभ 6 दिव्यांग जिल्हा समन्वयक, 52 विशेष तज्ज्ञ व 158 विशेष शिक्षक अशा 216 कर्मचाऱ्यांना मिळेल.

नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल बालेवाडीप्रमाणे उभारणार

नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल पुण्याच्या बालेवाडी प्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या क्रीडा संकुलासाठी यापूर्वी 51 कोटी 20 लाख निधी देण्यात आला असून 683 कोटी 79 लाखाचे सुधारित अंदाजपत्रक विचारात घेऊन 746 कोटी 99 लाखाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली.

अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोर्ट फी मधून सूट

अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या कोर्ट फी मधून कायम सूट देण्याचा निर्णय  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ

राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ  बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
हा लाभ कर्मचा-यांना 1 एप्रिल,2022 पासून ते त्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय  होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी देण्यात येईल. हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30एप्रिल 2014 मध्ये नमूद  केलेल्या सुत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत लाभ देण्यास व याकरिता  येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

वस्त्रोद्योग धोरणामध्ये वीज, सौर ऊर्जा अुनदानासाठी सुधारणा

राज्यात यापुर्वी जाहीर केलेल्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, 2023-28 मधील वीज अनुदान व सौर ऊर्जा अनुदानाबाबतच्या तरतूदीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. सर्व वस्त्रोद्योग घटकांना (विद्यमान व नवीन) एकात्मिक  व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 च्या धोरण कालावधीकरीता वीज अनुदान प्रदान केले जाईल. संपूर्ण धोरण कालावधीत वीज अनुदानासाठी कोणतीही कमाल मर्यादा नसेल. वस्त्रोद्योग घटकांना (विद्यमान व नवीन) सौर ऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेसाठी प्रकल्प किंमतीच्या  20 टक्के किंवा  4.80 कोटी रुपयांपैकी जे कमी असेल तेवढे भांडवली अनुदान दिले जाणार आहे.

विभागांमध्ये लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करणार

राज्यात लघु-वस्त्रोद्योग संकुल (Mini Textile Park) स्थापन करण्याकरीता अनुदान देण्याच्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या योजनेनुसार राज्यात नवीन खाजगी वस्त्रोद्योग व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन देऊन महाराष्ट्र राज्य तसेच इतर राज्यातील खाजगी संस्थांकडून 1 हजार 800 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. या योजनेतर्गत राज्यात सुमारे 36 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याच्या प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी 3 याप्रमाणे 6 महसूल विभागात एकूण 18  लघु वस्त्रोद्योग संकुले खाजगी संस्थांमार्फत उभारण्यात येणार आहेत. या 18 संकुलांपैकी प्रत्येक महसूल विभागात 1 याप्रमाणे एकुण  6 संकुले निर्यातभिमुख असणार आहे. हे प्रकल्प महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये 10 एकर जागेमध्ये उभारण्यात येणार आहेत. लघु-वस्त्रोद्योग संकुल स्थापन करताना संस्थांना 100 ते 125 कोटी पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. योजनेत संस्थांना एकूण प्रकल्प किंमतीवर (जमीन, बांधकाम, यंत्रसामग्री, सौर ऊर्जेच्या खर्चासह) होणाऱ्या 40% खर्चाची रक्कम किंवा 30 कोटी रुपये
यापैकी जे कमी असेल तेवढे भांडवली अनुदान मिळेल. संकुलामध्ये 50% पेक्षा जास्त महिला कामगार असल्यास एकूण प्रकल्प खर्चावर अतिरिक्त 5% भांडवली अनुदान रु. 35 कोटी पर्यत मिळणार आहे. एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ETP), झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) व स्टीम जनरेशन प्लांट स्थापन करणेकरीता एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 मधील तरतूदीनुसार अनुज्ञेय अनुदान देय असेल. लघु-वस्त्रोद्योग संकुल खाजगी संस्थांमार्फत कार्यान्वित केल्यावर, निकषांनुसार  पात्र रकमेच्या पहिल्या हप्त्यापोटी 60% रक्कम वितरीत केली जाईल. तद्नंतर 12 महिन्यांच्या कालावधीसाठी लघु-वस्त्रोद्योग संकुलामध्ये सर्व घटकांचे व्यवसाय यशस्वीरित्या सुरु झाल्यानंतर, पात्र रकमेपैकी उर्वरित 40% अनुदानाचा दुसरा हप्ता दिला जाईल.

राज्यातील 23 महानगरपालिकामंध्ये पीएम ई-बस सेवा

राज्यात केंद्र पुरस्कृत “पीएम ई-बस सेवा” (PM e-Bus Sewa) योजनेची अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
देशातील परिवहन सेवेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने व हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सक्षम व पर्यावरणपूरक शाश्वत उपाय योजनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिनांक 16 ऑगस्ट, 2023 रोजी “पीएम ई-बस सेवा” (PM-eBus Sewa) ही योजना मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमार्फत 10,000 ई-बसेस देश भरात चालविण्याचे केंद्र शासनाचे उदिष्ट आहे.
ही योजना केंद्र शासनाने देशातील 169 शहरामध्ये लागू केली असून यात FAME योजनेंतर्गत समाविष्ट असलेली मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे वगळून राज्यातील 23 महानगरपालिकांचा समावेश आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चॅलेंज पध्दतीने राज्यातील 19 शहरांची निवड करण्यात आलेली आहे. योजनेची निविदा प्रक्रिया ही केंद्र शासनाकडून राबवून यासाठी खाजगी सेवापुरवठादाराची निवड करण्यात येणार आहे. योजना अखंडीत सुरू रहावी यासाठी सेवा पुरवठादाराने दिलेल्या सेवेच्या देयकांची हमी देणारी प्रणाली केंद्र शासनाकडून विकसित करण्यात आलेली PSM (Payment Security Mechanism) प्रणाली राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शहरांच्या मागणीनुसार केंद्र शासन 3 प्रकारच्या ( स्टँडर्ड, मिडी व मिनी) ई-बस पुरविणार आहे. योजनेत शासनाकडून बस प्रकार निहाय प्रति किलोमीटर ठराविक अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरित खर्च हा शहरांनी बस तिकीटे व इतर महसुली उत्पन्नातून भागावावयाचा आहे. या योजनेंतर्गत मीटरच्या मागे ऊर्जेच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी शहरांना 100 टक्के केंद्रीय अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नागपूर विदर्भ साहित्य संघाला १० कोटी

नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 10 कोटी रुपये इतका निधी विदर्भ साहित्य संघास एक वेळची विशेष बाब म्हणून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेस मान्यता

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील जामशेत लघु पाटबंधारे योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
गिरणा नदीच्या खोऱ्यात जामशेत नाल्यावर ही योजना असून प्रस्तावित धरण स्थळ कळवण पासून 20 कि.मी. अंतरावर आहे.  या योजनेत 1 हजार 30 सघमी पाणी साठा व 227 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली

राज्य मंत्रिमंडळाने आज माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष स्व.मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली.  यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शोक प्रस्ताव वाचून दाखविला. नंतर सर्व मंत्र्यांनी 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.

राज्यातील १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

मुंबई, दि.२५ :- सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासना तर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात आले असून, या२२३ कोटी रुपये खर्चाच्या आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथून दुरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते.


सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दादा भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आदिवासी विकास मंत्री डॉ.राजेंद्र गावित , शिक्षण मंत्री दीपक केसरकर , जल व मृदुसंधारण मंत्री संजय राठोड , क्रीडा मंत्री संजय बनसोड , मुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचीव, विकास खारगे, प्रधान सचिव भूषण गगराणी , प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, अपर मुख्य सचिव आरोग्य सेवा मिलिंद म्हैसकर , आरोग्य सेवा सचिव नवीन सोना, संचालक आरोग्य सेवा आरोग्य अभियान नवी दिल्ली डॉ. सरोज कुमार डॉ. अतिरिक्त संचालक डॉ. स्वप्नील लाळे ,सहसंचालक डॉ.सुनिता गोलाईत अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर व आरोग्य विभागातील अधिकारी ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच राज्यातील सर्व आरोग्य संस्था या कार्यक्रमासाठी दूर दूरदृश प्रणाली द्वारे उपस्थित होत्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्प इन्फ्रास्ट्रक्चर मिशन” (पीएम-अभिम ) अंतर्गत खालील आरोग्य संस्थांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

  • पीएम-अभिम अंतर्गत १३५.०५ कोटी रुपये खर्चाच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक कामाचे भूमिपूजन झाले .
  • यामध्ये जिल्हा रुग्णालय, जि. पुणे – १०० खाटा,
  • जिल्हा रुग्णालय, जि. अहमदनगर ५० खाटा,
  • जिल्हा रुग्णालय, जि. बुलढाणा – ५० खाटा,
  • जिल्हा रुग्णालय, जि. बीड – ५० खाटा,
  •  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जि. नंदुरबार – ५० खाटा समावेश आहे.

तसेच पीएम-अभिम अंतर्गत. १.२५ कोटी रुपये खर्चाच्या इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅब जिल्हा रुग्णालय, जि. अमरावती भूमिपूजन झाले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण ७७.९४ कोटी रुपये खर्चाच्या खालील आरोग्य सुविधांचे लोकार्पण झाले.

– मुख्य इमारत आणि १४ स्टाफ क्वार्टर – प्रा. आ. केंद्र, करजगाव ता. चांदूरबाजार जि. अमरावती
– मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, जैताने ता. साक्री जि. धुळे
– मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा. आ. केंद्र, शिराळा ता. अमरावती जि. अमरावती
– जिल्हा वेअरहाऊस, मिटींग, डीपीएमए ऑफिस, जि. चंद्रपूर
– स्टाफ क्वार्टर – प्रा.आ.केंद्र, ताडली ता. चंद्रपूर जि. चंद्रपूर
– मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा.आ. केंद्र, गव्हाळी, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार
– मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, सावदा ता. रावेर जि. जळगाव
– मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, किनगाव ता. यावल जि. जळगाव

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत एकूण ८.९९ कोटी रुपये खर्चाच्या पुणे येथील नवीन आयुष रुग्णालय इमारतीचे लोकार्पण झाले.

०००

मुंबई येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदुष्य प्रणालीद्वारे उद्घाटन

मुंबई. दि 25 – सुरक्षा मानक प्राधिकरण नवी दिल्ली व अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य करारअंतर्गत मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणाली द्वारे उद्घाटन करण्यात आले. देशातील अन्न चाचणी प्रणाली बळकट करण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत.नवीन मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा सुरु झाल्यानंतर अन्न चाचणीमध्ये महाराष्ट्र राज्य सक्षम तर होईलच त्याबरोबर महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षेच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलेल असा विश्वास यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम बाबा यांनी व्यक्त केला.

यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या समारंभा वेळी औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार पूनम महाजन, आयुक्त (अन्न) अभिमन्यू काळे उपस्थित होते.

यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, अन्न चाचणी मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत अन्नसुरक्षा समिती करण्यासाठी कर्मचारी वर्ग इतर अनुषंगिक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच लॉजिकल विश्लेषण करण्यासाठी कर्मचारी वर्ग नियुक्त केले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या राज्यामध्ये तीन प्रयोगशाळा असून आता त्या पाच ठिकाणी उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मायक्रोबायोलॉजी प्रयोग शाळेसाठी प्रत्येकी 450 कोटीचा निधी केंद्र सरकारने दिलेला आहे. सदर निधी हा प्रयोगशाळा उभारण्यासाठी आणि उपकरणांसाठी तसेच तीन वर्ष तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या खर्चासाठी दिलेला आहे. सध्या संभाजीनगर येथील प्रयोगशाळेचे काम पूर्ण होत आलेले आहे. महाराष्ट्र शासन या प्रयोगशाळा उभारणीचे कामकाज अचूक व जलद गतीने करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकर संभाजीनगर येथील प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार पूनम महाजन म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीत अग्रणी आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या अन्न निर्यातीमध्ये 15 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून देशात आणि देशाबाहेर अन्न पुरवले जाते. अन्नावर प्रक्रिया करुन ते देशात-परदेशात निर्यात करणे ही शेतकऱ्याची ताकद आहे. सामान्य व्यक्तीला प्रथिनेयुक्त व भेसळविरहित अन्न देण्यासाठी एफडीआय चे अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. यानिनमित्ताने त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

या प्रयोगशाळा उद्गाटन समारंभास मान्यवर पदाधिकारी, विभागातील कर्मचारी अधिकारी तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले.

000

युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २५ – युरोपियन देशाच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून या अनुषंगाने महाराष्ट्र शासन आणि जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग राज्यादरम्यान सामंजस्य करार करून सुरुवात झाली आहे. या करारामुळे दोन्ही राज्यांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

युरोपियन देशांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याच्या उपक्रमाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने पहिले पाऊल म्हणून शासनस्तरावर शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, वैद्यकीय शिक्षण, उद्योग व कामगार, कौशल्य विकास आणि उद्योजकता या विभागाचे मंत्री आणि सचिव यांचा कृती गट स्थापन करण्यात आला आहे. या कृती गटाच्या निर्णयानुसार जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या औद्योगिकदृष्ट्या अतिप्रगत राज्याशी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कामगार मंत्री सुरेश खाडे, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच जर्मनीचे मिनिस्टर ऑफ स्टेट डॉ. फ्लोरियन स्टेगमन, शालेय शिक्षण, युवक आणि क्रीडा मंत्री थेरेसा स्कॉपर यांच्यासह जर्मनीचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी जर्मनीतील शिष्टमंडळाचे जर्मन भाषेत स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, भारत आणि जर्मनीचे अनेक दशकांपासून परस्पर संबंध आहेत. जर्मनीला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून महाराष्ट्र ही गरज पूर्ण करण्यास समर्थ आहे. त्यादृष्टीने आज झालेला करार या संबंधांना अधिक बळकटी देणारा ठरणार आहे. या करारामुळे एका नवीन युगाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळासह पायाभूत सुविधा, उत्कृष्ट दळणवळण सुविधा तसेच नवनवीन प्रकल्पांसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य केंद्र सुरू करण्यात आले असून त्या माध्यमातून अधिकाधिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

यावेळी मंत्री सर्वश्री दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, सुरेश खाडे यांनी संबंधित विभागांमार्फत कुशल मनुष्यबळाची निर्मिती आणि जर्मनीची गरज भागविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्यांमधील परस्पर संबंध

अधिक दृढ होतील – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी महाराष्ट्र आणि जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग राज्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे दोन्ही राज्यांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सामंजस्य करार झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री.केसरकर यांनी कराराबाबत माहिती दिली.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, या सामंजस्य करारान्वये विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, उर्जा व पर्यावरण, आरोग्य, हॉटेल व्यवस्थापन अशा प्रमुख क्षेत्रावर लक्ष देण्यात आले आहे. बाडेन बुटेनबर्ग या राज्याने नोंदविलेल्या मागणीच्या आधारे राज्यात त्या-त्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळास आवश्यकतेनुसार अधिकचे प्रशिक्षण तसेच जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी पाठविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शैक्षणिक विभागात किमान एक यानुसार सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे. असे केंद्र कार्यान्वित होईपर्यंतच्या कालावधीसाठी सध्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, युरोपीयन देशांना त्यांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्याचा उपक्रमाच्या अनुषंगाने दीर्घकालीन प्रयत्न आवश्यक असल्याने शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळेच या सामंजस्य करारात पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यवसाय शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर विचार करण्यात आला आहे. व्यावसायिक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश व तज्ञांकडून अध्यापन यासाठी दोन्ही पक्षामार्फत कार्यवाही केली जाणार आहे. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवसाय / उद्योग / रोजगार या दृष्टीने किमान एक कौशल्य धारण केले असले पाहिजे अशी तरतुद नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. या उद्दीष्ट पूर्तीसाठी तसेच राज्यातील बेरोजगारी कमी करुन सन्मानजनक उदरनिर्वाहासाठी हा सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

000

१०० टक्के आदिवासी बांधवांना दोन वर्षात घरकुल देणार – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत

चंद्रपूर, दि. 25 :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावापर्यंत रस्ते तसेच गावातील प्रत्येक घरापर्यंत वीज आणि पाणी देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्य शासन आणि आदिवासी विकास विभागही यासाठी प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षात 100 टक्के आदिवासी बांधवांना घरकुलचा लाभ देण्यात येईल. घरकुलापासून एकही आदिवासी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली.

चंद्रपूर येथील नियोजन सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित अनुसूचित जमातीच्या विविध योजनांचा लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, नागपूर येथील आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त जी.एस. कुळमेथे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, हरीश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, श्री. इंगळे, श्री. मडावी, रामपालसिंग, सयाराम गोटे आदी उपस्थित होते.

आदिवासी जनतेचे प्रश्न समजून ते सोडविण्यासाठी व हा समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून मंत्री श्री. गावित म्हणाले, घरकुलापासून कोण वंचित आहे, ‘ड’ यादीत नाव नाही आणि जो पात्र आहे, अशा सर्वांना घरकुल देण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील एकही आदिवासी बांधव घरापासून वंचित राहणार नाही. ज्यांच्या जवळ घरकुलसाठी जमीन नाही, त्यांच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी अधिकारी – कर्मचारी आदिवासी समाजापर्यंत पोहचत नाही तर काही ठिकाणी दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नाही. त्यामुळे आदिवासी वस्ती, गावे, पोडे पोहचण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ता योजना सुरु केली आहे.

पुढे ते म्हणाले, आदिवासी विकास विभागाने रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तसेच इतर उर्वरीत ठिकाणच्या रस्त्यासाठी व पुलासाठी आणखी निधी दिला जाईल. विजेचा प्रश्न सोडविण्यासाठीसुध्दा निधी दिला जाईल. रस्ता, वीज, पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पुढे मंत्री गावित म्हणाले, दरवर्षी एक ते दीड हजार आदिवासी बांधवांना व्यवसाय करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी फक्त प्रशिक्षण देण्यात येत होते. आदिवासी बांधवांनी आता समोर येणे आवश्यक आहे, आदिवासींच्या कल्याणासाठी हा विभाग मदत करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी आदिवासी विकास मंत्री श्री. गावित यांच्या  हस्ते आदिवासी विकास विभागाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी प्रास्ताविकातून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी आदिवासी विकास विभागाचे सादरीकरण केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा आणि शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थसंकल्प योजनेंतर्गत 24 लाभार्थी, ठक्करबाप्पा योजनेंतर्गत 7 गावांचे मंजुरी आदेश, घरकुल योजनेंतर्गत 30 लाभार्थी, बचत गटाचे लाभार्थी यांना लाभ देण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन उमेश कडू आणि सपना पिंपळकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी व आदिवासी बांधव उपस्थित होते.

000

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी स्थापन व्हावा वाचकांचा क्लब – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

चंद्रपूर, दि. 25 :  ज्या देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्मिक, वैचारिक योगदान देताना वाचन संस्कृतीचे, पुस्तकांचे महत्त्व सांगितले. आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये मात्र दुर्दैवाने वाचन संस्कृती लोप पावत आहे. ही वाचन संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला वाचकांचे क्लब स्थापन करावे लागतील, अशी सूचनावजा अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

 शनिवारी (दि.24) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद सालफळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नरक्षित शेंडे, रत्नाकर नलावडे, अनिल बोरगमवार, नामदेव राऊत, प्रा. श्याम मोहरकर, सुदर्शन बारापात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. मानसिक भूक भागविण्यासाठी वाचकांचा क्लब स्थापन करण्याचा विचार करावा. उद्या या सभागृहातील ग्रंथोत्सव चांदा क्लब ग्राऊंडवर होईल, तेव्हा मला अधिक आनंद होईल.’ ज्याने फेसबुकला जन्म दिला तो मार्क झुकेरबर्ग छान झाडाखाली बसून पुस्तके वाचतोय आणि आपले भारतीय विद्यार्थी फेसबुकवर व्यस्त आहेत, असे मी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सएपवर वाचले होते. ही खरे तर आपल्यासाठी विडंबनात्मक स्थिती आहे, असेही ते म्हणाले.

मी आमदार झालो तेव्हा वाचनालय सुरू करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाचनालये सुरू केली. आणखी नवीन वाचनालये सुरू करणार आहे. 2015 मध्ये माझ्या विभागातर्फे जीआर काढून कार्यक्रमांमध्ये ‘बुके नव्हे बुक द्या’ असा नियम केला. आता जागा अपुरी पडत आहे, इतकी पुस्तके झाली आहेत. हजारो पुस्तके माझ्याकडे आहेत. मी निवृत्त होईल तेव्हा ही पुस्तकेच माझ्यासाठी धावून येतील,’ असेही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

ग्रंथालयांमध्ये एकसूत्रता यावी

ग्रंथालयांच्या अंतर्गत सर्व व्यवस्थांमध्ये एकसूत्रता आणण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालये एका सॉफ्टवेअरने जोडली तर अधिक सोयीचे होईल. एखाद्या ग्रंथालयात एखादे पुस्तक नसेल तर महाराष्ट्रातील कोणत्या ग्रंथालयात ते उपलब्ध आहे, हे कळू शकले पाहिजे. त्यावर पुस्तकांना रेटिंग देण्याची सोय असावी. अमेझॉनच्या धरतीवर हे काम करणे शक्य आहे, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या. जिल्हाभरात जनजागृतीसाठी स्पर्धा घेता येतील का, याचाही विचार करावा, असेही ते म्हणाले.

०००

आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयस्तरावर तातडीची बैठक घेणार – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 25 फेब्रुवारी, 2024 : लाँग मार्च करणाऱ्या शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात माजी आमदार जे. पी. गावित व शिष्टमंडळसमवेत शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले की, आदिवासी शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्यात आता वाढ करून ३०० रुपयांऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान शेतकरी बांधवांना देण्यात आले आहे.  तसेच शेतकरी लाँग मार्चमधील मागण्या ह्या देश, राज्य व स्थानिक पातळीवरील आहेत. स्थानिक पातळीवरील निर्णय तातडीने घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. परंतु, राज्य पातळीवरील विविध मागण्यांबाबत तातडीने मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. शेतकरी लाँगमार्च मधील काही मागण्या गेल्यावेळी मान्य झालेल्या आहेत. शासनाने दिलेला शब्द पाळला असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले. अंगणवाडी सेविकांचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. तसेच वनपट्टे काही शेतकऱ्यांच्या नावावर 2 किंवा 3 गुंठे जमीन आहे, त्यांचे स्वतंत्र 7/12 व्हावा यासह कांदा प्रश्नी निर्णय घेण्याच्या मागणीबाबतही लवकरच मंत्रालय स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

श्री. भुसे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य आदिवासी बांधव भगिनींच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित असलेल्या मागण्या म्हणजे आदिवासी बंधू- भगिनी जी जमीन कसतात, त्यांच्या ताब्यात असलेली चार हेक्टर पर्यंतची वन जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करून 7/12 वर नाव लावणे, देवस्थान आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, ज्या गायरान जमिनीवर घर आहे ती घरे देखील नियमित करावीत, वनहक्क जमिनींचे प्रलंबित दावे, शासकीय योजनांचा लाभ या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी सर्व संबंधित मंत्र्यांची समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये माजी आमदार जे.पी.गावित यांना सदस्य करण्यात आले आहे. वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून सदर अतिक्रमणास प्रतिबंध करण्यास अपयशी ठरणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

हे सरकार शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील असून शेतकरी लाँग मार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहनही श्री. भुसे यांनी यावेळी केले.

या आहेत शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या:

 शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान दोन हजार रुपये हमी भाव द्यावा, कायमची निर्यात बंदी उठवावी
 कसणाऱ्या व कब्जात असलेली ४ हेक्टरपर्यंतची वन जमीन नावे करून ७/१२ उताऱ्यावर नाव लावावे. सर्व जमीन कसण्यालायक आहे, असा शेरा मारावा. अपात्र दावे मंजूर करावेत.
 शेतकऱ्यांच्या शेतीला २४ तास वीज द्यावी, शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे, थकीत वीज बिले माफ करावीत व सलग 24 तास वीज द्यावी.
 ज्येष्ठ नागरिकांना व इतरांना लागू असलेली वृध्दापकाळ पेन्शन योजनेची रक्कम १५०० रूपयावरून ४००० रूपयापर्यंत वाढवावी.
 रेशन कार्डवरील दरमहा मिळणारे मोफत धान्यसह विकतचे धान्य पुन्हा सुरु करावे .
 २००५ नंतर भरती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
कंत्राटी नोकरभरती बंद करा व सर्व रिक्त पदावर सरळ सेवाभरती पूर्वी प्रमाणे करावी.
 आदिवासी दलित त्यांची सर्व रिक्त पदावर त्वरित भरती करा.
 गरीब शेतकरी, शेतमजूर, कामगार, झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजनांचे अनुदान 1 लाख 40 हजारावरुन 5 लाख करावे व वंचित गरीब लाभार्थ्यांचा नवीन सर्वेकरून त्यांची नावे ‘ड’ च्या प्रतिक्षा यादीत समाविष्ट करावीत
 अंगणवाडी कार्यकर्ती/मिनी अंगणवाडी/मदतनीस, आशा  वर्कर, आशा सुपवायझर, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर आदींच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्यात.
 दमन-वाघ-पिंजाळ व नार-पार-तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्प रद्द करुन सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांना छोटे मोठे सिमेंट काँक्रीटचे बंधारे, पाझर तलाव, लघुपाटबंधारे या सारख्या योजना घेऊन प्रथम पुरेसे पाणी स्थानिकांना देऊन उर्वरित पाणी बोगद्याद्वारे गिरणा व गोदावरी  नदीत सोडून कळवण, देवळा, मालेगांव, चांदवड, नांदगाव, येवला, खानदेश आणि मराठवाड्या सारख्या महाराष्ट्रातील दुष्काळी विभागाला द्यावे.

000

दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा दि.२५ (जिमाका) : तारळी, धोम, बलकवडी, टेंभू, म्हैसाळ, निरा देवधर या प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात 121 कामांना मंजुरी दिली आहे. यातून महाराष्ट्रातील 15 लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जीहे कठापूर )चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहूल कूल, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता पुणे हनुमंत गुनाले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्याधिकारी याशनी नागराजन,पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सातारा सिंचन मंडळ अधिक्षक अभियंता अरुण नाईक, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनेक दशके जी भूमी थेंब थेंब पाण्यासाठी व्याकुळ झाली होती, त्या भूमीत जलपूजन करण्याची संधी आज आपल्याला मिळाली आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या भागात पाणी यावे यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी अथक परिश्रम आणि मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षाला आज चांगले फळ आले आहे. आपण विदर्भातून असल्याने दुष्काळी जनतेला ज्या यातना भोगाव्या लागतात त्याची जाणीव आहे . त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातील दुष्काळ संपविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पाणी योजना गतीने पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार .

माण खटाव तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी गुरुवर्य काही लक्ष्मण रावजी इनामदार उपसा सिंचन (जिहे कठापूर ) योजनेला फेर मान्यता देण्यात आली आहे. त्यातून माण तालुक्यातील 27 गावे व खटाव तालुक्यातील 40 गावी अशी एकूण 67 गावे व त्यातील एक लाख 75 हजार 803 लाभधारकांसाठी या पाण्याचा वापर होणार आहे. यातून 27 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . या योजनेसाठी जवळपास 1331 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दुष्काळी भागापर्यंत कशाप्रकारे पाणी पोहोचू शकते याचे या रूपाने फार मोठे मॉडेल तयार झाले आहे..
जे पाणी वाहून जाते ते वाचविण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देण्यास आपण सुरुवात केलीय त्यामुळे राज्यभरात आठ टीएमसी पाण्याचे फेर वाटप करून दुष्काळी भागाला ते उपलब्ध करून देऊ शकलो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्याच्या समर्पित भावनेने आमदार जयकुमार गोरे यांनी काम केल्याचे सांगितले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवधर, सोळशी धरणांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी विविध पाणी योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. दुष्काळी भागामध्ये उद्योग उभे राहावे यासाठी कॉरिडॉरचा विषय लवकर तडीस न्यावा, असे आवाहन केले.

पुढील सहा महिन्यांनी एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर/अनगर, दिनांक 25(जिमाका):- राज्य व केंद्र शासन सर्वसामान्य नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत आहे. राज्य शासन पुढील सहा महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाइन करणार असल्याने एकाही सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

अgनगर येथे दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री यशवंत माने, बबनदादा शिंदे, राजेंद्र राऊत, माजी आमदार सर्वश्री राजन पाटील, दीपक साळुंखे, अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, अभयसिंह शेळके पाटील, प्रकाश चवरे, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महसूल मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा सुरू केल्याने या योजनेचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. महसूल विभागाने सुरू केलेल्या सलोखा योजनेच्या माध्यमातून शेती विषयक अनेक समस्या सोडवल्या जात आहेत. शेत रस्ते, पाणंद रस्ते निर्माण केले जात आहेत. पशुसंवर्धन विभागाने गोसेवा कायदा आणल्याने देशी गाईंच्या संवर्धनाला प्रोत्साहन मिळत आहे. तसेच लंपी आजार आल्यानंतर राज्यातील सर्व गोवांशिय जनावरांचे लसीकरण मोफत करण्यात आले. देशात मोफत लसीकरण फक्त आपल्या राज्यातच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढील काळात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात मोजणीची प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे त्वरित निकाली निघणार आहेत. अद्यावत तंत्रज्ञाने मोजणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 25 ते 30 रोव्हर उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात रोव्हर कमी पडत आहेत त्या जिल्ह्यांनी नियोजन समितीच्या निधीतून रोव्हर खरेदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिली.

अनगर येथील नागरिकांची मागणी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी 1 येथे निर्माण करण्यात आलेले असून त्या कार्यालयाचे आज उद्घाटन झाल्याची घोषणा महसूल मंत्री विखे पाटील यांनी केली. तर अनगरला अप्पर तहसील कार्यालय ही मंजूर करत असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

प्रारंभी माजी आमदार राजन पाटील यांनी प्रास्ताविक केले. मोहोळ तालुक्यात 104 गावे असून अनगर येथे दुय्यम निबंधक कार्यालय करण्याबाबत लोकांची मागणी होती व ते लोकांसाठी आवश्यक होते असे सांगून हे कार्यालय येथे दिल्याबद्दल त्यांनी शासन व महसूल मंत्री यांचे आभार मानले. यावेळी आमदार यशवंत माने यांनी महसूल भवन इमारतीसाठी पंधरा कोटीच्या निधीची मागणी केली तसेच मोहोळ येथे प्रशासकी इमारतीसाठी 25 कोटीचा निधी उपलब्ध असल्याचेही सांगितले. तर आमदार राजेंद्र राऊत यांनी पशुखाद्य व दुधाच्या दरात खूप मोठी तफावत असून दुधाला जादा दर देण्याची मागणी केली.

दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन-

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनगर येथे नव्याने निर्माण केलेल्या दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाचे उद्घाटन फित कापून व नामफलक अनावरण करून करण्यात आले. यावेळी श्री. विखे पाटील यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाची पाहणी करून या कार्यालयामार्फत सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत गतिमान पद्धतीने सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे निर्देश दिले. यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...