शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 726

दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा दि.२५ (जिमाका) : तारळी, धोम, बलकवडी, टेंभू, म्हैसाळ, निरा देवधर या प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात 121 कामांना मंजुरी दिली आहे. यातून महाराष्ट्रातील 15 लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जीहे कठापूर )चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहूल कूल, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता पुणे हनुमंत गुनाले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्याधिकारी याशनी नागराजन,पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सातारा सिंचन मंडळ अधिक्षक अभियंता अरुण नाईक, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनेक दशके जी भूमी थेंब थेंब पाण्यासाठी व्याकुळ झाली होती, त्या भूमीत जलपूजन करण्याची संधी आज आपल्याला मिळाली आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या भागात पाणी यावे यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी अथक परिश्रम आणि मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षाला आज चांगले फळ आले आहे. आपण विदर्भातून असल्याने दुष्काळी जनतेला ज्या यातना भोगाव्या लागतात त्याची जाणीव आहे . त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातील दुष्काळ संपविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पाणी योजना गतीने पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार .

माण खटाव तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी गुरुवर्य काही लक्ष्मण रावजी इनामदार उपसा सिंचन (जिहे कठापूर ) योजनेला फेर मान्यता देण्यात आली आहे. त्यातून माण तालुक्यातील 27 गावे व खटाव तालुक्यातील 40 गावी अशी एकूण 67 गावे व त्यातील एक लाख 75 हजार 803 लाभधारकांसाठी या पाण्याचा वापर होणार आहे. यातून 27 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . या योजनेसाठी जवळपास 1331 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दुष्काळी भागापर्यंत कशाप्रकारे पाणी पोहोचू शकते याचे या रूपाने फार मोठे मॉडेल तयार झाले आहे..
जे पाणी वाहून जाते ते वाचविण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देण्यास आपण सुरुवात केलीय त्यामुळे राज्यभरात आठ टीएमसी पाण्याचे फेर वाटप करून दुष्काळी भागाला ते उपलब्ध करून देऊ शकलो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्याच्या समर्पित भावनेने आमदार जयकुमार गोरे यांनी काम केल्याचे सांगितले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवधर, सोळशी धरणांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी विविध पाणी योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. दुष्काळी भागामध्ये उद्योग उभे राहावे यासाठी कॉरिडॉरचा विषय लवकर तडीस न्यावा, असे आवाहन केले.

पुढील सहा महिन्यांनी एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर/अनगर, दिनांक 25(जिमाका):- राज्य व केंद्र शासन सर्वसामान्य नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत आहे. राज्य शासन पुढील सहा महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाइन करणार असल्याने एकाही सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

अgनगर येथे दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री यशवंत माने, बबनदादा शिंदे, राजेंद्र राऊत, माजी आमदार सर्वश्री राजन पाटील, दीपक साळुंखे, अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, अभयसिंह शेळके पाटील, प्रकाश चवरे, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महसूल मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा सुरू केल्याने या योजनेचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. महसूल विभागाने सुरू केलेल्या सलोखा योजनेच्या माध्यमातून शेती विषयक अनेक समस्या सोडवल्या जात आहेत. शेत रस्ते, पाणंद रस्ते निर्माण केले जात आहेत. पशुसंवर्धन विभागाने गोसेवा कायदा आणल्याने देशी गाईंच्या संवर्धनाला प्रोत्साहन मिळत आहे. तसेच लंपी आजार आल्यानंतर राज्यातील सर्व गोवांशिय जनावरांचे लसीकरण मोफत करण्यात आले. देशात मोफत लसीकरण फक्त आपल्या राज्यातच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढील काळात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात मोजणीची प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे त्वरित निकाली निघणार आहेत. अद्यावत तंत्रज्ञाने मोजणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 25 ते 30 रोव्हर उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात रोव्हर कमी पडत आहेत त्या जिल्ह्यांनी नियोजन समितीच्या निधीतून रोव्हर खरेदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिली.

अनगर येथील नागरिकांची मागणी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी 1 येथे निर्माण करण्यात आलेले असून त्या कार्यालयाचे आज उद्घाटन झाल्याची घोषणा महसूल मंत्री विखे पाटील यांनी केली. तर अनगरला अप्पर तहसील कार्यालय ही मंजूर करत असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

प्रारंभी माजी आमदार राजन पाटील यांनी प्रास्ताविक केले. मोहोळ तालुक्यात 104 गावे असून अनगर येथे दुय्यम निबंधक कार्यालय करण्याबाबत लोकांची मागणी होती व ते लोकांसाठी आवश्यक होते असे सांगून हे कार्यालय येथे दिल्याबद्दल त्यांनी शासन व महसूल मंत्री यांचे आभार मानले. यावेळी आमदार यशवंत माने यांनी महसूल भवन इमारतीसाठी पंधरा कोटीच्या निधीची मागणी केली तसेच मोहोळ येथे प्रशासकी इमारतीसाठी 25 कोटीचा निधी उपलब्ध असल्याचेही सांगितले. तर आमदार राजेंद्र राऊत यांनी पशुखाद्य व दुधाच्या दरात खूप मोठी तफावत असून दुधाला जादा दर देण्याची मागणी केली.

दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन-

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनगर येथे नव्याने निर्माण केलेल्या दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाचे उद्घाटन फित कापून व नामफलक अनावरण करून करण्यात आले. यावेळी श्री. विखे पाटील यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाची पाहणी करून या कार्यालयामार्फत सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत गतिमान पद्धतीने सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे निर्देश दिले. यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत चर्चेनंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे

मुंबई, दि. २५ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आज बैठक घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षक संघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी जाहीर केले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यात आयटी आणि इतर शिक्षकांचे समायोजन, १२ आणि २४ वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षानंतर २० टक्क्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे, याचप्रमाणे काही दीर्घकालीन मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. यापैकी वित्त विभागाशी संबंधित असलेल्या मागण्यांचे प्रस्ताव वित्त विभागाकडे दिले जाणार आहेत. तर, दीर्घकालीन मागण्यांबाबत शासन स्तरावर स्थापन समिती निर्णय घेणार आहे. समिती जे निर्णय घेईल ते सर्वांनाच लागू असतील.

आज याबाबत पुन्हा चर्चा झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांचे प्रश्न सुटल्यामुळे त्यांनी आपला पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर केल्याबद्दल मंत्री श्री. केसरकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होत असतो, यामुळे शिक्षकांचे जवळजवळ सर्वच प्रश्न गेल्या वर्ष सव्वा वर्षांमध्ये सोडविण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती, टप्पा अनुदान लागू करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. टप्पा अनुदानाचा सर्वाधिक निधी कनिष्ठ महाविद्यालयाला देण्यात येत आहे.

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना आजपर्यंत कधीही संपावर गेलेली नाही. ज्या ज्या वेळेला ते आपल्या मागण्या घेऊन पुढे येतात त्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आजच्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षक शिक्षणावर अधिक एकाग्रतेने लक्ष देतील आणि शिक्षणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास मंत्री श्री.केसरकर यांनी व्यक्त केला.

सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन बारावीच्या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर होतील, असा विश्वास मंत्री श्री.केसरकर यांनी व्यक्त केला. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे आभार मानले.

 

000

इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे दि.२५ : इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन बांधकाम चांगल्या दर्जाचे करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, इंदापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

नविन बांधकाम ७ हजार ३९२ चौ. फुट जागेत करण्यात येणार आहे. बांधकामाला एकुण अंदाजे खर्च १ कोटी ८३ लाख ४६ हजार ९२६ रूपये येणार आहे.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली श्री मलंगगडावर महाआरती

ठाणेदि.24 (जिमाका) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण जवळील श्री मलंगगडच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीमलंग गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध अधिकारी-पदाधिकारी तसेच मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.

00000

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पहिल्या क्रमांकास रु.५ लाख, दुसऱ्या क्रमांकास रु.३ लाख तर तिसऱ्या क्रमांकास रु. २ लाख

ठाणे, दि.24 (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या रुपये दीड लाख पारितोषिकाची रक्कम आता रुपये पाच लाख, दुसऱ्या क्रमांकाच्या रुपये एक लाख पारितोषिकाची रक्कम रुपये तीन लाख आणि तृतीय क्रमांकाच्या रुपये 75 हजार पारितोषिकाची रक्कम रुपये दोन लाख देण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली अन् ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी खेळाडू -प्रेक्षकांच्या जल्लोषाने आणि टाळ्यांनी दुमदूमून गेला.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) सन 2023-24, ठाणे या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत एकूण सोळा मुलांचे व सोळा मुलींचे संघ सहभागी होणार आहेत

यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनिल हांजे, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के,महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे, मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी या मान्यवरांची उपस्थिती होती.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर जोशी यांना आदरांजली वाहत स्व.मनोहर जोशी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, बुवा साळवी यांचेही यासाठी अमूल्य योगदान होते, या आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले, आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. आपल्या खेळाडूंनी राज्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे, याचा अभिमान आहे. राज्यातील खेळाडू गुणवान आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने त्यांच्या बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशातील खेळाडूंना आणि युवकांना खेलो इंडिया, फिट इंडिया च्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने या स्पर्धेसाठी 75 लाख रुपये तर ठाणे महानगरपालिकेने 1 कोटी 11 लाख रुपये इतका निधी दिला आहे. कबड्डी खेळासाठी ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या या पुढाकाराचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा. मैदानी खेळांना जास्तीत जास्त वाव द्यायला, यासाठी शासनाच्यावतीने मैदानी खेळांसह पारंपारिक “क्रीडा महाकुंभ” भरविण्यात येणार आहे. खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन करुन खेळाच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा नावलौकिक वाढवावा.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. येथील क्रीडांगणास “धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरी” असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, मैदानी खेळ आणि गणेश वंदना हे कलाविष्कार सादर केले.

क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी प्रास्ताविकात या स्पर्धेबाबतची माहिती उपस्थितांना दिली. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राणाप्रताप तिवारी यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण बारटक्के आणि ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी मैदानास श्रीफळ वाढवून व खेळाडूंची भेट घेवून त्यांना शुभेच्छा देत कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ केला.
0000

महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन

महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजळून निघावी : अभिनेता अनासपुरे

बीड, दि.24 (जिमाका) :- तरुण पिढीला स्थानिक लोककलांची, खाद्य संस्कृतीची ओळख होण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी आज महासंस्कृती महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.

       पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

     यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन सुप्रसिध्द सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, पद्मश्री बशीर मामू, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, विकास उपायुक्त सुरेश बेदमूथा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

             महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी महिला स्वयंसहायता बचत गटातर्फे निर्मित विविध वस्तू व खाद्यपदार्थाच्या, कृषी विभागाकडून लावण्यात आलेल्या दालनाला मान्यवरांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी विशेष सत्कार पद्मश्री शब्बीर मामू, यांच्यासह जागतिक स्तरावर खेळातील उत्कृष्ट कामगिरी केलेले ॲथलेटिक्स अविनाश साबळे, क्रिकेटर सचिन संजय धस, तायक्वांदो नयन अविनाश बारगजे व अविनाश पांचाळ आदि खेळाडू, प्रशिक्षक तसेच खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांचा गौरव करण्यात आला. त्तपुर्वी शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथुन शोभायात्रा काढण्यात आली.

श्री. आर्दड पुढे म्हणाले की, आपला सांस्कृतिक वारसा हा येथे सर्व समाजातील या संस्कृतीचा पाया सशक्त असा आहे तो इथल्या खाण्या-पिण्यातून आणि जगण्यातून दिसतो. त्यामुळेच्या आपल्या आधीच्या पिढीतील लोक वागण्या बोलण्यातून संतुलित अशी असायची हीच लोप पावत असलेली सशक्त संस्कृती महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा लोकांसमोर उभी करण्याचा मानस आहे. या महोत्सवात लोक पावलेली खाद्य संस्कृती सोबतच लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच शासनाने उभा करुन दिला आहे. अधिकाधिक लोकांनी या महोत्सवात येवून मनोरंजनासोबत खाद्य संस्कृती आणि लोककलांचा आनंद लुटावा असे आवाहनही त्यांनी केले.

महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजाळून निघावी : अभिनेता अनासपुरे

  महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजाळून निघावी, असे उदघाटनाप्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून लाभलेले सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, स्थानिक उत्पादने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असला पाहिजे, बचत गटाच्या महिलांनी दर्जेदारपणे बनविलेले पिढी जात पदार्थ खरेदी करून त्याचा स्वाद घ्यावा. पूर्वी गावात निर्मित होणारा  माल गावातच विकला जायचा त्यामुळे स्थानिक व्यवसायांना उभारी मिळत असे.  त्यामुळे महासंस्कृती महोत्सवातील विविध स्टॉल वरील पदार्थ केवळ न बघता खरेदी करावीत. असे आवाहनही त्यांनी आवर्जून केले.

 आपला अंशतः सहभाग व्यवसाय उभारणीसाठी महत्त्वाचा आहे भगिनींचे प्रॉडक्ट विकत घेऊन त्यांचा व्यवसाय वाढवावा. तरी महासंस्कृती महोत्सवाचा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे. असेही त्यांनी सांगितले. तसेच स्टॉलवरील स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थाची आवर्जून खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले.  बीड शहरात आगळावेगळा महा संस्कृती महोत्सव पुढील पाच दिवस छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवासस्थानी कलाकारांना मंच तर व्यवसायिकांना स्टॉलची उभारणी करून देण्यात आलेली आहे. स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. महोत्सवात बीड जिल्ह्याचे नाव ज्यांनी उंचावर नेले अशा व्यक्तींचा सत्कार व सन्मान या ठिकाणी केला गेला. महोत्सवात 200 बचत गटांचे स्टॉल, कृषी स्टॉल लावण्यात आले असून शेतकऱ्यांनी व नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवा उपस्थित रहावे, असे आवाहनही  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला  चंपावती विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. तर यावेळी स्थानिक लोक कलावंतांनी यात कन्या भृण हत्या विरोधी  जाकरुकता पसरवणारा जोगवा, गोंधळ, वासूदेव, पोवाडा, आणि जागो हिंदुस्थानी ग्रुप यांचा देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात सादर करण्यात झाला.

०००००

‘शिवगर्जना’महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि.२४: मंचासमोरून जाणारे हत्ती, घोडे, उंट….मोगलांचे आक्रमण आणि चित्तथरारक अंगावर शहारे आणणाऱ्या लढाया…..महाराष्ट्राची वारकरी परंपरा, लोकसंस्कृती, सह्याद्रीचा रांगडेपणा… तळपत्या तलवारी, ढाल, भाले, धनुष्यबाण…. स्वराज्यासाठी जीवनाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप….जणू शिवकालीन इतिहास दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी महाविद्यालयाच्या मैदानावर अवतरला. निमित्त होते ‘शिवगर्जना’ महानाट्याचे…..

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महानाट्याला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार रामभाऊ मोझे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, माजी विशेष पोलीस महनिरीक्षक विठ्ठल जाधव, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवगर्जना महानाट्याच्या आयोजनाबाबत  संदेश यावेळी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणून देशासाठी योगदान देण्याचे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी उदघाटन प्रसंगी केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या  कार्याची माहिती होण्यासोबत त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला  प्रेरणा मिळावी यासाठी शासनाच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या काळात आपण प्रदूषण, रोगराई, दारिद्र्य, बेरोजगारी विरुद्ध लढले पाहिजे, असे आवाहन डॉ. पुलकंडवार यांनी केले.

आमदार टिंगरे म्हणाले, पुणे जिल्हा हा शिवरायांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भूमीत त्यांचा पराक्रम सांगणारे शिवगर्जना महानाट्य होत असून नागरिकांनी याचा लाभ घ्याव, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण यांनी केले.  ते म्हणाले, पुढच्या पिढीच्या मनावर छत्रपतींचा विचार आणि कार्याचा आदर्श बिंबविण्यासाठी सर्वांनी हे महानाट्य अवश्य पहावे आणि हे ऐतिहासिक वर्ष साजरे करण्यात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.

भव्य मंचावर साकारला शिवकालीन इतिहास
देखण्या आणि भव्य मंचावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली. देशप्रेम जगविणारे संवाद, ताकदीचा अभिनय, ऐतिहासिक प्रसंगांना साजेसे नेपथ्य, प्रसंगानुरूप गीत-नृत्य आणि संगीत यामुळे त्यात छत्रपतींच्या पराक्रमासोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सुंदर दर्शनही घडले. स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगातून इतिहास प्रेक्षकांच्या समोर उभा राहिला. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी कलाकारांना टाळ्या वाजवून दाद दिली.

महानाट्याच्यावेळी संपूर्ण परिसर यावेळी जय भवानी… जय शिवाजी.. जय  छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणेने दुमदुमला. नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

‘शिवगर्जना’ महानाट्याचे २६ तारखेपर्यंत भव्य आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशूल्क पाहता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
००००

मुंबई शहर जिल्ह्याच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी मार्शल रॅलीचे आयोजन – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव

मुंबई, दि.24 : मुंबई शहर जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदार नोंदणी करीता व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.मुंबई शहर जिल्हा कार्यालय आणि लाला लजपतराय महाविद्यालयातील राष्ट्रीयसेवा योजनेच्या वतीने मार्शल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

एअर इंडिया बिल्डिंग, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यत ही मार्शल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सामजिक संस्था मार्क युवर प्रेझेन्स (MYP) सोबत मुंबई शहरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजतील विद्यार्थी,प्राध्यापक विविध विद्या शाखेचे विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते. यावेळी स्वीप नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, मुंबई शहर राष्ट्रीय सेवा योजना  जिल्हा समन्वयक  क्रांती इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ही रॅली यशस्वीपणे पार पडली.

मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाही मध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

लोकशाहीला अधिक समृद्ध करण्यात मतदानाचे महत्त्व आणि युवा वर्गाचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुण मतदारांची नोंदणी संख्या वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम, निवडणूक साक्षरता याबाबत मतदारांना ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने मतदान नोंदणी प्रक्रियेची व EVM/VVPAT मशीन व Mock Poll कशा पध्दतीने हाताळावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच नव मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा अधिक सहभाग असेल असे या रॅलीत सहभागी  तरुणांनी आश्वासन दिले.

000

शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या दुष्काळी उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात तसेच विभागातही दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पुढील कालावधीत अधिक तीव्र होत जाणार आहे. या कालावधीत शासनातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. या उपाययोजना राबविताना त्यात मदत पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी रमेश भिसे, एच.पी. देशमुख, धनाजी धोतरकर, पुष्कराज तायडे, रमेश कुटे, मारोती बनसोडे, ज्ञानेश्वर हनवते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शासनाच्या  ऑक्टोबर 2023 च्या निर्णयानुसार दुष्काळी उपाययोजना जसे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करणे, शेतकऱ्यांकडून सक्तिची कर्ज वसुली थांबविणे, शेती कर्जाचे पुनर्गठन करणे, वीज देयकांची वसूली थांबविणे, टँकर तात्काळ सुरू करणे आदी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. शासन करत असलेल्या उपाय योजना बाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी. पुढील हंगामापर्यंत (जून पर्यंत) कर्ज वसूली थांबविण्याची प्रक्रिया सुरु करा, असेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवा. त्याच्या उपलब्धतेबाबतही लोकांना माहिती द्या.  रोजगार हमी योजनेच्या कामांवर येणे शक्य नसलेल्या एकल किंवा विधवा महिलांना मदत दिली जावी. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांची मुलं सांभाळण्यासाठी व्यवस्था व इतर उपाय योजना कराव्यात, असेही निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

तत्पूर्वी  जिल्हाधिकारी स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळाबाबत सविस्तर माहिती डॉ गोऱ्हे यांना दिली. त्यामध्ये जिल्ह्यात दोन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळ सदृश्य परिस्थिती ६ तालुक्यात आहे.  अशा सर्व भागात दुष्काळी उपाययोजना सुरु आहेत. तसेच जिल्ह्यात सध्या ९००५ रोजगार हमी ची कामे सुरू असून त्यावर ७० हजार मजूर काम करीत आहेत. प्रत्येक गावात किमान ५ कामे तरी शेल्फवर असावी,असेही नियोजन करत असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

000

ताज्या बातम्या

समुदाय स्तरावरील उद्दिष्टे, कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन काम करावे – सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक

0
मुंबई, दि.9 : एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात समुदाय स्तरावरील उद्दिष्टे व कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण...

परंपरा आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधणारा ‘टेक वारी’ उपक्रमाचा यशस्वी समारोप

0
मुंबई, दि. ९ : “माऊली... माऊली...” च्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या नादात आणि हरिभक्तीच्या भक्तीरसात न्हालेल्या वातावरणात मंत्रालयात पार पडलेल्या  “टेक वारी : महाराष्ट्र टेक...

८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

0
मुंबई, दि.९ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. ०९ जून, २०२५ पर्यंत देय...

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई, दि. ९ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन २०२५-२६...

शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाची उल्लेखनीय कामगिरी

0
मुंबई,दि.9:  शासनाच्या 100 दिवसीय कार्यक्रमा' अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने उत्कृष्ट गुणवत्ता व कार्यक्षमतेने काम पूर्ण करून राज्यातील...