शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 721

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास १० टक्के आरक्षण

मुंबई, दि. २७ : सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१६ नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी २०२४ पासून अंमलात आला आहे.

या अधिनियमान्वये  ‘सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग’ असा नवीन वर्ग निर्माण करण्यात आला असून, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी यापुढे होणाऱ्या नोकर भरतीप्रक्रियेत आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये २६ फेब्रुवारी २०२४ पासून १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे.

यासाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सुधारीत बिंदुनामावली विहित करण्यात आली आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४. संदर्भात राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट (Caveat) दाखल करण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

मागासवर्गीय वसतिगृहांमधील सोयी सुविधांमध्ये काळानुसार बदल आवश्यक – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. २७ : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना गरजेच्या असून 2011 च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये बदलत्या काळानुसार बदल करणे आवश्यक असल्याने, शासन निर्णयात वेळोवेळी सुधारणा सोडविण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते. माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या ४४३ वसतिगृहात ४१ हजार विद्यार्थी आहेत.  त्यांना शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता २०११ च्या नियमानुसार देण्यात येतात. दर पाच वर्षांनी शासकीय निर्णयात सुधारणा करण्याचा शासन निर्णय असल्याने यामध्ये सुधारणा करून, आधुनिक काळानुसार विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यात याव्यात. तसेच, वसतिगृहांच्या इमारतींची डागडुजी करण्यात यावी. सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी  घेण्यात यावी. कर्मचारी पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तसेच,  या समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सफाई कर्मचारी यांच्यासाठीच्या मालकी हक्काच्या गृह योजनेचा आढावा यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी घेतला.

सौर ऊर्जा निर्मितीतून मोफत वीज देणार

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अंतर्गत महाप्रीतच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन, सौर ऊर्जा, प्रधानमंत्री सुर्योदय योजना, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत या माध्यमातून मागासवर्गीयांना रोजगार निर्मिती व सौर ऊर्जा कनेक्शन केंद्र शासन देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून समाजातील सर्वस्तरातील नागरिकांना सोलार ऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मागासवर्गातील पात्र लाभार्थ्यांना अनुदान माध्यमातून इलेक्ट्रिक दुचाकी व तीन चाकी देण्यात येणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती करण्यास आणि मोफत वीज निर्मिती करण्यास मदत होणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले. ज्या खाजगी कंपन्या इलेक्ट्रिक वाहने तयार करतात. अशा कंपन्यांसोबत करार करून केंद्र सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून राज्यात योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

माटुंगा लेबर कॅम्प परिसरात पंचशील कमान उभारण्यास प्राधान्य द्यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. २७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर आणि दीक्षाभूमी, नागपूर येथील कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. यामुळे या परिसरात पंचशील कमान उभारण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

 

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीला माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अपर पोलीस आयुक्त अनिल बारसकर, मनपाचे उपायुक्त प्रशांत सपकाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, यांच्यासह प्रवीण मोरे, रेल्वे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले की, सामाजिक न्याय, गृह विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत सर्व विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर समन्वय करतात. चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देतात. समन्वय समिती, नागरिकांकडून नव्याने आलेल्या सूचनांचाही सुविधांमध्ये समावेश करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून घ्यावी. पाण्याची, शौचालयाची व्यवस्था चोख करावी. चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथील स्तूपाची रंगरंगोटी, सजावट आणि रोषणाईच्या चांगल्या सुविधा द्याव्यात. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. स्मशानभूमीच्या चिमणीची स्तूपावरील काळवटपणा जाण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या.

अनुयायाच्या मागणीनुसार पाणी, लाडूंची संख्या वाढवावी

देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे येतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच अनुयायींची मागणी असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने लाडूंची संख्याही वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण

दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शन, फेसबुक याशिवाय विविध समाजमाध्यमाद्वारे होण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून घरी असणाऱ्या अनुयायांना डॉ. बाबासाहेबांचे दर्शन घेता येईल. शिवाय राज्यभरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांवर परिसंवाद, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहनही श्री. आठवले यांनी केले. फिरते शौचालय, साफसफाई, सुशोभीकरणावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्थेवर भर द्यावा

लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असल्याने गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून यासाठी रांगेची चोख व्यवस्था करावी. शिवाय वाहतूक व्यवस्था, दिशादर्शक फलक, कायदा सुव्यवस्था चोख ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

माटुंगा येथे पंचशील कमान उभारण्यासाठी संबंधित विभागाकडे परवानगी मागितली असून प्रस्ताव सादर केल्याची माहिती नागसेन कांबळे यांनी दिली.

समन्वय समितीच्या सूचना

वॉटरप्रुफ मंडपाची व्यवस्था, दिवसभर प्रसिद्ध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. इंदू मिल स्मारकाबाबत होर्डिंग्ज, १५ मिनिटांचा लघुपट दाखविण्यात यावे. चेंबूरच्या उद्यानात अखंड भीमज्योत उभारण्यात यावी. जयंती काळात दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करावे, चैत्यभूमी परिसरातील मद्य दुकाने, बियरबार बंद ठेवावे. रेल्वेने मेगा ब्लॉक टाळावा, शिवाय रात्री उशिरापर्यंत लोकल ट्रेन सुरू ठेवावी. समाजभूषण पुरस्कार द्यावेत. विधानभवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अशोक स्तंभ, भीमज्योतींची सजावट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लेजर शो, दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन, उद्यानाचे सुशोभिकरण, 24 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था, दोन स्पीड बोटी, स्वच्छतेसाठी पाच पाळ्यात 290 कर्मचारी, वैद्यकीय सुविधांची माहिती उपायुक्त श्री. सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलेल्या उपाययोजना, कामांची माहिती सादरीकरणातून दिली.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/

विधानपरिषद इतर कामकाज

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली; सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळास मजबूत केलं – मुख्यमंत्री 

मुंबई,दि.२७ : मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत बसणारे आरक्षण दिले आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, ते आरक्षण एकमतानं दिलं आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण दिलं आहे. आज आरक्षण टिकणार नाही असे सांगून अशांतता का निर्माण केली जात आहे. आपण सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळास मजबूत केलं. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले आहे .महाराष्ट्र विधानपरिषद नियम २८९ अन्वये चर्चेला उत्तर देताना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  विधानपरिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, एकमताने मराठा समाजाला आरक्षण दिलं. आता हे आरक्षण टिकणार नाही, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली हे दुर्दैवी आहे, पण याचे कारण कुणी दिले नाही. गेल्या अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता, अनेक आंदोलने झाली ती सर्व शिस्तबद्ध पद्धतीने होती जे ५६ मोर्चे निघाले होते ते मराठा समाज संयमी आहे आणि शिस्तीने वागणारा आहे हे त्यांनी दाखवून दिले होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील कुणबी समाजाला प्रमाणपत्र मिळत नाही ते प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली, या कामासाठी मदत कक्ष राज्यभरात स्थापन केले. दोन-अडीच लाख लोकांनी काम सुरु केले आणि ज्या नोंदी सापडत नव्हत्या, त्या सापडू लागल्या. त्याचा जो कायदा होता, १९६७ पूर्वीच्या नोंदी असतील तर जात प्रमाणपत्र दिले पाहिजे, ते काम आम्ही सुरु केलं. त्यापुढे जाऊन निवृत्त न्या. शिंदे समितीकडे हे काम सोपवलं. समितीने बारकाईने काम केले. त्यांना मुदतवाढ दिली पाहिजे असे मनोज जरांगे पाटील यांनीही सांगितले.  कुणबी प्रमाणपत्रे देणे सुरू झाले. त्यांनी नंतर सरसकट प्रमाणपत्राची मागणी केली पण तसे देता येणार नाही हे त्यांना सांगितले. कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही हे सांगितलं. इतिहासात कधी झाले नाही, ते पहिल्यांदा झालं तीन-तीन निवृत्त न्यायाधीश तिकडे पाठवले. नंतर सगेसोयरेची मागणी पुढे आली. मराठा आरक्षणावर त्यांच्या मागण्या बदलत गेल्या. अपवादात्मक परिस्थितीत राज्य शासन आरक्षण देऊन शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपण जे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण आज दिले आहे, ते आरक्षण टिकणारे आहे. त्याचा मराठा समाजातील दुर्बल, गरिबांना लाभ होणार आहे. इतके वर्षे मराठा समाजाला आरक्षण देण्याची काही लोकांना संधी होती, पण त्यावेळी त्यांनी आरक्षण दिले नाही. मराठा समाज हा मागास आहे हे माहित असून देखील त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवले. त्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, मी जे बोलतो ते करून दाखवतो. हे धाडस मी दाखवले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. आज आरक्षण टिकणार नाही असे सांगून अशांतता का निर्माण केली जात आहे? आपण सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळास मजबूत केलं. अधिसंख्य पदांवर ५ हजार जणांना नोकऱ्या मिळाल्या. हे प्रामाणिकपणे सरकारने केले. मनोज जरांगे यांना मी स्वतः भेटलो. कुठलाही इगो ठेवला नाही. पण राज्य सरकारने जे काही केले ते विसरून मनोज  जरांगे यांनी राजकीय भाषा सुरू केली. जाती -जातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही कुणालाही फसवणार नाही. अधिसूचनेवर वर ६ लाख हरकती  व सूचना आल्या आहेत. त्यांचे विश्लेषण सुरू आहे. दगडफेक झाली त्याचाही पोलिसांकडे अहवाल आहे.  राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये. कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही, असे ते म्हणाले.

०००

बारीपाडा येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर

मुंबई, दि. २७ :  वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वीस लाख रुपये असे आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या पुरस्काराबद्दल मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात ३ मार्च रोजी श्री. पवार यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

राज्य शासनाने या पुरस्कार निवडीचा शासन निर्णय जाहीर करुन श्री. चैत्राम पवार यांच्या नावाची घोषणा केली. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, सक्षमीकरण, स्वावलंबन, वनहक्क कायदा, कृषि विकास आणि शाश्वत विकास या विषयांवर मागील २६ वर्षापासून श्री. पवार हे आदिवासी समाजासोबत काम करीत आहेत. वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार केला आहे. सध्या श्री. पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागासाठी या वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

वनभूषण पुरस्कार निवडीबद्दल मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले असून श्री. पवार यांचे आदिवासी क्षेत्रातील वनजमिनींच्या अनुषंगाने केलेले काम मोलाचे असल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या वन विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्थानिक नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहित करणे, राखीव वनक्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावात वृक्षलागवड आणि वनसंवर्धन आणि पर्यावरणासाठी त्यांचे काम उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरित करणारे आहे, अशा शब्दांत श्री. मुनगंटीवार यांनी कौतुकोद्गार काढले.

चैत्राम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर, मृद व जलसंधारणाची कामे, सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे.

चैत्राम पवार यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविले गेले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी-2003, भारत जैवविविधता पुरस्कार -2014, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, नातू फौंडेशन सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार आदींचा समावेश आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

 

कोयना (शिव सागर) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २७ :  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे  येथे शिव सागर जलाशयामध्ये जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे सामंजस्य करार झाला.

यावेळी  उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी -शर्मा, जलसंपदा विभागाचे उपसचिव अतुल कपोले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ५ हजारपेक्षा अधिक स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल आणि पर्यटनातून १०० कोटीपेक्षा अधिक  आर्थिक उलाढाल होईल. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर

शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. कोयना (शिव सागर), ता. जावळी हा परिसर येथील सह्याद्री डोंगराच्या रांगा, गर्द झाडी, निळेशार पाणी, समृद्ध जैवविविधतेचे आगर असलेला, नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर आहे. नव्याने होणाऱ्या जलपर्यटन केंद्राच्या  माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा, या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने हे जल पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या  प्रकल्पासाठी  ४५ कोटी ३८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्राला मोहक ७२० किमीचा सागरी किनारा तसेच निसर्गसंपन्न छोटी – मोठी जलाशये, धरणे, प्रदूषण मुक्त नद्या यांचे वैभव लाभलेले आहे. या ठिकाणी जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूबा डायव्हिंग प्रकल्पामुळे सिंधुदुर्गात पर्यटक मोठ्या प्रमाणत आकर्षित झाले. नाशिक बोट क्लबचे प्रचलन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ करीत आहे. बोट क्लब पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालेले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे आणि गुजरातमधून नाशिकला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला. हा अनुभव बघता शासनाने महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पामुळे महाबळेश्वर, पाचगणी, वाईला येणारा पर्यटक कोयना जलाशयाच्या अवतीभोवती असलेल्या ग्रामीण भागात वळेल, तसेच पर्यटकांचा साताऱ्यात राहण्याचा काळ आणि खर्च करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वाढीस लागून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात शाश्वत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

देशातील पहिले नाविन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग

या प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी विविध पायाभूत सुविधा आणि जल पर्यटन प्रकार असतील. भव्य पॅव्हेलियन, कॉन्फरन्स हॉल, जलतरण तलाव, भारतातील पहिले नाविन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग, जलसफर मध्ये पर्यटन प्रकल्पात मोठी क्रुझ बोट ज्यामध्ये १०० च्या वर पर्यटक बसून, नाश्ता आणि जेवण याबरोबर कोयना जलाशयाच्या अवतीभोवतीच्या सह्याद्री पर्वत रांगा, हरित जंगले, वन्य जीव याचा आनंद घेऊ शकतात, भारतातील पहिली अत्याधुनिक आणि अलिशान हाउस बोट, सौर उर्जा/बॅटरीवर चालणारी बोट, अत्याधुनिक प्रवासी बोटी, हवेत उडणारी बोट, अत्यंत वेगवान जेट बोट, पॅरासेलिंग बोट, गोड्या पाण्यात पहिल्यांदा सेलिंग यॉट (शिडाची नौका) आणि त्याशिवाय आकर्षक वॉटर स्पोर्टस असतील. अशाप्रकारच्या जल पर्यटनाची आकर्षणे तसेच पायाभूत सुविधा असलेला हा भारतातील पहिला जल पर्यटन प्रकल्प असेल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुढील १० दिवसामध्ये प्राथमिक जल पर्यटन सुरु करण्यात येईल. दुसऱ्या टप्यात (८ महिन्यात) नवीन बोटी आणि इतर जल पर्यटन आकर्षणे यांचा अंतर्भाव करण्यात येईल. तिसरा आणि अंतिम टप्यात (२० महिन्यात) संपूर्ण नवीन भव्य वास्तू, क्रुझ बोट, हाउस बोट यांचा अंतर्भाव करून प्रकल्प पूर्ण केला जाईल.

प्रकल्पात पायाभूत सुविधा आणि विविध जलपर्यटन प्रकार

प्रकल्पातील पायाभूत सुविधांमध्ये नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी भव्य आसन व्यवस्था, विविध प्रकारच्या खाद्य प्रकारांचे उच्च दर्जाचे उपहारगृह, पर्यटकांसाठी विविध सुविधा व प्रशासकीय कार्यालय, जलतरण तलाव, स्कूबा प्रशिक्षण तलाव, कॉन्फरस हॉल, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय, बोटींसाठी आणि पर्यटकांसाठी उतरंडी, तरंगती जेट्टी (मरीना), वाहनतळ,आकर्षक बगीचा असतील.

यामध्ये विविध जल पर्यटन प्रकार जेट स्की, जेटो व्हेटर (पाण्यात उडणे), बम्पर राईड, कयाकिंग, बनाना राईड, सेलिंग, नाविन्यपूर्ण कृत्रिम तलावात गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग, हवेत उडणारी बोट, फ्लाईंग फिश, अतिवेगवान जेट बोट राईड, सौर/विद्युत बोट, पर्यटकांसाठी आरामदायी प्रवाशी बोट, व्हर्ल पूल राईड, पॅरासेलिंग, अलिशान लेक क्रूझिंग प्रवासी बोट, अलिशान वेगवान बोट, मरीना, भारतातील पहिली अत्याधुनिक, अलिशान हाउस बोट असे विविध नाविन्यपूर्ण जलपर्यटन प्रकार असतील.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. २७: राज्यातील विकास कामांसाठी पुढील ४ महिन्यांत लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून केली जाणार असली तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल, हे दर्शविणारा हा अर्थसंकल्प आहे. यात दुर्बल घटक, शेतकरी, महिला, युवा अशा सर्वांचा विचार करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राची १ ट्रीलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पुढे जाणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही ते म्हणाले.

अयोध्या आणि जम्मू कश्मीर येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय आणि त्यासाठी ७७ कोटींची तरतूद ही देखील उत्साह वाढविणारी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून दुष्काळासाठी देखील सवलती देण्यात येत आहेत. जलसंपदा विभागासाठी देखील चांगली तरतूद केल्याने धरणांच्या कामांना गती येईल. पर्यटन, शेती, पायाभूत सुविधा, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी भरीव तरतूद केल्याने राज्यात ही कामे अधिक वेगाने सुरु होतील. राज्यातील रेल्वे मार्गांच्या कामांना देखील यात प्राधान्य दिले आहे. १५ हजार कोटींची तरतूद यापूर्वीच केंद्राने केली आहे. विविध दुर्बल घटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या महामंडळांना निधी दिल्याने त्यांचे कामही परिणामकारक होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विविध स्मारके आणि पर्यटन स्थळांच्या विकास कामांना देखील गती येण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बाहेरच्या राज्यातल्या मराठी मंडळांना विशेष अनुदान देणे, बेळगाव आणि गोवा येथे मराठी भाषा उपकेंद्र उभारण्याचा निर्णय, राज्यातील विविध देवस्थाने, तीर्थस्थळे,गडकोट किल्ले यांचे संवर्धन व विकास हा देखील विशेष प्राधिकरणाच्या माध्यमातून करणे हे महत्त्वाचे निर्णय आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ होणार आहे. कुपोषण कमी करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय देखील महत्वाचा आहे. महिला सशक्तीकरणाचा भाग म्हणून १० मोठ्या शहरातील ५ हजार महिलांना पिंक रिक्षा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे सक्षमीकरण होईल. आशा, अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील सुरु होत आहे. मातंग समाजासाठी आर्टी (अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था) स्थापन करण्याचा निर्णय या समाजासाठी कल्याणकारी आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

०००

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर

  • शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी
  • राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी
  • पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांवर भर

मुंबई, दि. २७:  राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट ९९  हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९  हजार १९३ कोटी रुपये, रोजगार हमी योजनेसाठी २  हजार २०५ कोटी रुपये, मराठी विभागासाठी ७१ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेसाठी १५ हजार ३६० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवार यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले आहे.

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणीही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून केला आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-

 मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय.

 युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी.

 स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत.

 विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी 22 हजार 225 कोटी.

 पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी.

 जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी 2 हजार 886 कोटी रुपये.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला 10 हजार 629 कोटी रुपये.

 सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला 19 हजार 936 कोटी रुपये नियतव्यय.

 महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-2 अंतर्गत 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे.

 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 2 मधील 7 हजार 600 कोटी रुपये खर्चून 7 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती.

 कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु.

 फलटण-पंढरपूर, कांपा-चिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग.

 जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका 3 व 4 या रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग.

 वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा 26 टक्के सहभाग- एकूण किंमत 76 हजार 220 कोटी रुपये.

 सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचे, 229 कोटी 27 लाख रुपये किंमतीचे बांधकाम.

 भगवती बंदर, रत्नागिरी-३०० कोटी रुपये, सागरी दुर्ग जंजिरा, रायगड-१११ कोटी रुपये, एलिफंटा, मुंबई-८८ कोटी रुपये बंदर विकासाची कामे.

 मिरकरवाडा, रत्नागिरी बंदराचे आधुनिकीकरण-२ हजार ७०० मच्छीमारांना फायदा.

 छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांचा निधी.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ग्रामविकास विभागाला 9 हजार 280 कोटी रुपये.

 गृह-परिवहन, बंदरे विभागाला 4 हजार 94 कोटी रुपये.

 उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम धोरण.

 18 लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करुन सुमारे 36 हजार रोजगार निर्मिती.

 ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८’ जाहीर-अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप.

 निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात 450 कोटी.

 निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपये.

 निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्क.

 सामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे 7 हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधी.

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25 हजार उद्योग घटक -30 टक्के महिला उद्योजक -सुमारे 50 हजार नवीन रोजगार.

 थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक व चार हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या 10 अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा- 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 20 हजार रोजगार निर्मिती.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता उद्योग विभागाला 1 हजार 21 कोटी रुपये.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाला 1 हजार 952 कोटी रुपये.

 अमृत 2.0 अभियानांतर्गत 145 शहरांमधील 28 हजार 315 कोटीचे 312 प्रकल्प मंजूर.

 महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन 2030 पर्यंत राबविण्यात येणार.

 महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या 50 ते 95 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला 3 हजार 875 कोटी रुपये नियतव्यय.

 दरवर्षी सुमारे 25 हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड.

 अटल बांबू समृद्धी योजना- १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड

 जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 700 गावांमधील 1 लाख 59 हजार 886 कामांना मंजूरी

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला 245 कोटी रुपये

 वन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये

 मृद व जलसंधारण विभागास ४ हजार २४७ कोटी रुपये

 शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट.

 शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौरकृषी पंप’ ही नवीन योजना- ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप.

 राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येत्या २  वर्षात सौर उर्जीकरण.

 सुमारे 37 हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच.

 डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर उर्जा कुंपणासाठी अनुदान

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ऊर्जा विभागाला 11 हजार 934 कोटी रुपये.

 ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये.

 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या 6 हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता कृषी विभागास 3 हजार 650 कोटी रुपये, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागास 555 कोटी रुपये फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपये नियतव्यय.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता मदत व पुर्नवसन विभागाला 638 कोटी रुपये नियतव्यय.

 39 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करुन 2 लाख 34 हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणार.

 बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखी 16 प्रकल्प पूर्ण होणार.

 कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित 3 हजार 200 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प.

 विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद.

 वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे 3.71 लक्ष हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ.

 सुयोग्य जागेची आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन वीज निर्मितीचे खाजगी सहभागातून उदंचन जलविद्युत प्रकल्प.

 खारभूमी विकास कार्यक्रमांतर्गत 113 कोटी रुपयांची तरतूद.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता जलसंपदा विभागाला 16 हजार 456 कोटी रुपये नियतव्यय.

 मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ.

 राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु.

 कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरु.

 दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा.

 कार्यक्रम खर्चाकरिता महिला व बालविकास विभागास 3 हजार 107 कोटी रुपये.

 वाशिम,जालना,हिंगोली,अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यांतील अंबरनाथ येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय.

 जळगाव, लातूर, बारामती, नंदूरबार, गोंदिया, कोल्हापूर आणि मिरज जिल्हा सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय.

 नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था.

 ऊसतोड कामगारांकरिता अपघात विमा योजना.

 सर्व जिल्ह्यांमध्‍ये 15 खाटांचे अद्ययावत डे- केअर केमोथेरपी सेंटर.

 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत डायलिसीस सेवा केंद्र.

 रुग्ण मृत्यू पावल्यास मृतदेह रुग्णालयातून नेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका.

 कार्यक्रम खर्चाकरिता वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास 2 हजार 574 कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य विभागास 3 हजार 827 कोटी रुपये नियतव्यय.

 स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना, तृतीयपंथी घटकांतील लाभार्थ्यांसाठी बीजभांडवल योजना, मातंग समाजासाठी रमाई आवास योजना इत्यादी योजनांसाठी पुरेसा निधी.

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे ‘लेदर पार्क’, कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र ,प्रत्येक महसुली विभागात ‘उत्कृष्टता केंद्रांची’ स्थापना, गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्रा’ची उभारणी.

 मातंग समाजासाठी ‘अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टी’ची स्थापना.

 कार्यक्रम खर्चाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 18 हजार 816 कोटी रुपये.

 कार्यक्रम खर्चाकरिता आदिवासी उपयोजनेकरिता 15 हजार 360 कोटी रुपये नियतव्यय.

 बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ’.

 मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फतचे मुदत कर्ज, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सुक्ष्म पतपुरवठा योजनेकरिता शासनाची हमी 30 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपये

 दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर -नवीन घरकुल योजना – 34 हजार 400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ.

 श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तही ‘आनंदाचा शिधा’ वाटप करणार.

 कार्यक्रम खर्चाकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि अल्पसंख्याक विकास विभागाला 5 हजार 180 कोटी रुपये, गृहनिर्माण विभागाला 1 हजार 347 कोटी रुपये, कामगार विभागाला 171 कोटी रुपये नियतव्यय.

 ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेअंतर्गत राज्यस्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा.

 नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा.

 कार्यक्रम खर्चाकरिता क्रीडा विभागाला 537 कोटी रुपये नियतव्यय.

 ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ साठी 5 वर्षासाठी 238 कोटी 63 लाख रुपये.

 वरळी, मुंबई येथे ‘आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन’.

 कार्यक्रम खर्चाकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 2 हजार 98 कोटी रुपये, शालेय शिक्षण विभागाला 2 हजार 959 कोटी रुपये नियतव्यय.

 जागतिक बँक सहाय्यित ‘मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्याचा विकास’ (दक्ष) या 2 हजार 307 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजूरी.

 राज्यात नवीन 2 हजार ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे’.

 प्रत्येक महसुली विभागामध्ये ‘आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र’ आणि ‘संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी’.

 कार्यक्रम खर्चाकरिता कौशल्य,नाविन्यता,रोजगार व उद्योजकता विकास विभागाला 807 कोटी रुपये नियतव्यय.

 कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गडकिल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन.

 पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण.

 50 नवीन पर्यटन स्थळांच्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्टस्, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था.

 शिवसागर- कोयना जिल्हा सातारा, गोसीखुर्द जलाशय, जिल्हा भंडारा तसेच वाघुर जलाशय, जिल्हा जळगाव येथे नाविन्यपूर्ण जल पर्यटन प्रकल्प.

 लोणार, जिल्हा बुलढाणा, अजिंठा-वेरुळ, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, कळसुबाई – भंडारदरा, जिल्हा अहमदनगर, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा.

 लोणावळा, जिल्हा पुणे येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प- 333 कोटी 56 लाख किंमत.

 श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन – 77 कोटी रुपयांची तरतूद

 महाविस्टा-मंत्रालय, परिसरातील शासकीय इमारती आणि त्यांच्या परिसराचा अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकास.

 कार्यक्रम खर्चाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाला 1 हजार 186 कोटी रुपये, पर्यटन विभागाला 1 हजार 973 कोटी रुपये नियतव्यय, सार्वजनिक बांधकाम (इमारती) विभागास 1 हजार 367 कोटी रुपये, महसूल विभागास 474 कोटी रुपये.

 कार्यक्रम खर्चाकरिता गृह (पोलिस) विभागाला 2 हजार 237 कोटी रुपये नियतव्यय, गृह (उत्पादन शुल्क) विभागास 153 कोटी रुपये आणि विधी व न्याय विभागास 759 कोटी रुपये नियतव्यय.

 वस्तु व सेवाकर विभागाची पुनर्रचना- कर प्रशिक्षण अकादमीची स्थापना.

 कार्यक्रम खर्चाकरिता वित्त विभागाला 208 कोटी रुपये नियतव्यय.

 स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, ता. हवेली व समाधी स्थळ वढू बुद्रुक तालुका शिरुर, जिल्हा पुणे येथील स्मारक- 270 कोटी रुपये किमतीचा आराखडा, काम सुरु.

 12 ज्योर्तिलिंगापैकी एक औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली,साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री क्षेत्र माहुरगड जिल्हा नांदेड, एकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तृतीय जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम – 20 कोटी रुपये निधी.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरे, बारवांचे जतन व संवर्धन योजनेसाठी 53 कोटी रुपये.

 धाराशीव जिल्ह्यात संत गोरोबाकाका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी.

 प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘वीर जीवा महाला’ यांच्या स्मारकासाठी जागा.

 संगमवाडी, पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक.

 अमळनेर, जिल्हा जळगाव येथे सानेगुरुजींचे स्मारक.

 हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासासाठी 102 कोटी 48 लाख रुपयांचा आराखडा.

 श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड, ता. कळवण स्थळाच्या 81 कोटी 86 लाख रुपयाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता.

 ‘मंगेश पाडगांवकर कवितेचे गाव’ उपक्रम- वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.

 कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास 9 हजार 193 कोटी रुपये, रोहयो प्रभागासाठी 2 हजार 205 कोटी रुपये, मराठी विभागास 71 कोटी रुपये नियतव्यय.

 सन २०२4-२5 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 18 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद.

 वार्षिक योजना एक लाख 92 हजार कोटी रुपये, अनुसुचीत जाती उपयोजना 15 हजार 893 कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजना 15 हजार 360 कोटी रुपये.

 सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटींची तरतूद.

 सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये व महसुली खर्च 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये, महसुली तूट- 9 हजार 734 कोटी रुपये, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपये.

०००

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये सर्वाधिक १७ क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली दखल – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

          मुंबई, दि.27 : श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये एकाचवेळी सर्वाधिक 17 वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने दखल घेतली असून याबाबतचे प्रमाणपत्रही त्यांनी वितरित केले आहे याबद्दल अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

            कौशल्य,रोजगार, उद्योजकता नाविन्यता मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पेनेतून सुरु झालेल्या ‘ श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाची नुकतीच सांगता झाली. 26 जानेवारी 2024 पासून मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी पारंपरिक देशी खेळांची स्पर्धा आयोजित केली गेली होती. मल्लखांब, मल्लयुद्ध,लेझीम, लंगडी, रस्सीखेच, कबड्डी, पंजा लढवणे, रस्सीखेच आणि ढोल ताशा या क्रीडा आणि कला प्रकारांचे अंतिम सामने मालवणी येथील ‘क्रीडा भारती मैदान’ येथे झाले आणि  पुरस्कार वितरणासह स्पर्धेचा नुकताच समारोप झाला.

            कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, मुंबईत प्रथम पारंपरिक क्रीडा स्पर्धा महाकुंभ यशस्वीरित्या पूर्ण झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’  आयोजित केले  होते.या स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली असून याबाबत त्यांनी प्रमाणपत्र ही वितरण केले आहे.

             देशी खेळांच्या माध्यमातून शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेली तरुण पिढी घडवण्यास हातभार लावूया, देशाचे भविष्य घडविण्याची ताकद असलेले तरुण घडवण्यासाठी मदत होईल, असे श्री.लोढा यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी क्रीडा भारती’चे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांसह सर्वांचे सहकार्य मिळाले.

अशी झाली श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा

            छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभात मुंबईकरांना आश्चर्यचकित करणारे, अंगावर रोमांच उभे करणारे आणि प्रेरणा देणारे अनेक क्षण अनुभवायला मिळाले. स्पर्धेच्या प्रत्येक भागात तितकीच चुरस होती. शिवकालीन खेळांचा असा महोत्सव प्रथमच मुंबईकरांना अनुभवायला मिळाला. आजवर या क्रीडा महाकुंभात मध्ये 17 खेळांच्या स्पर्धा झाल्या असून त्यामध्ये दोन ते अडीच लाख खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

            छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, गडकिल्ल्यांच्या सुबक आणि हुबेहूब प्रतिकृतीचे प्रदर्शन, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, ढोल ताशांच्या स्पर्धा अश्या अनेक लक्षवेधक गोष्टी नागरिकांच्या पसंतीस उतरल्या. पावनखिंड दौड या मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी रित्या पूर्ण करण्याचा 81 वर्षाच्या गृहस्थांचा तरुणांना लाजवेल असा उत्साह, शरीर सौष्ठेव स्पर्धेत दिव्यांग स्पर्धकांनी दाखवलेली जिद्द, प्रत्येक टप्प्यावर पुरुषांच्या तोडीस तोड स्पर्धा करणाऱ्या महिला असे अनेक प्रसंग प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण

मुंबई, दि. 27 : पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर 2023 ते मार्च 2024 कालावधीतील 16 वा हप्ता  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, दि 28 फेब्रुवारी, 2024 रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. 4000/ असा एकुण रू. 6000/ चा लाभ दि. 28 फेब्रुवारी, 2024 च्या समारंभात राज्यातील सुमारे 88.00 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने दि. 28 फेब्रुवारी, 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेअंतर्गत दि. 24 फेब्रुवारी, 2024 अखेर राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये रू. 27638 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

समारंभास शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन पदधतीने सहभागी व्हावे – कृषीमंत्री धनंजय मुंडे

हा समारंभ केंद्र शासनाचा कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबविण्याचे नियोजन केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही प्रधानमंत्री यांच्या हस्ते या समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी रक्कम रू. 1943.46 कोटीचा लाभ  राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकुण 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहेराज्यात कृषि विभागामार्फत गावपातळीवर विशेष मोहीमेद्वारे राज्यातील सुमारे 18 लाख लाभार्थींची पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहे. त्यामुळे या लाभार्थींना पी.एम.किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचा दुहेरी लाभ मिळणे शक्य झाले आहे.

राज्यात सन 2023-24 पासून पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेच्या हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांना राज्याच्या या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने पी. एम. किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ अदा झालेल्या राज्यातील 85.60 लाख शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रक्कम रू. 1712 कोटी यापूर्वी अदा केलेला आहे. महाराष्ट्र शासन सन 2023-24 मधील उर्वरीत दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या या समारंभात राज्याच्या योजनेमधून जवळपास रू. 3800 कोटी थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे.

०००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

ताज्या बातम्या

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0
मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते...

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

0
मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन...

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल ...

0
पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी...

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण...

0
नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी...