सोमवार, मे 12, 2025
Home Blog Page 714

सर्वसामान्यांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे ही मुख्यमंत्र्यांची अपेक्षा – उपसभापती डॉ. गोऱ्हे

बारामती दि. ०२: सामान्य लोकांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आज मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या दृष्टिकोनातून उद्योजक आणि प्रशिक्षणार्थी तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवकांसोबत कौशल्य, कला, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे संवादाची संधी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध केली जात असल्याचे सांगत विभागाचे अभिनंदन केले. तसेच यापूर्वी देखील विभागाने ठिकठिकाणी असे मेळावे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या कार्यक्रमात नोंदणीकृत उद्योजक ३४७, अधिसूचित केलेली रिक्त पदे ५५ हजार ७२ म्हणजे एवढी रिक्त पदे विविध कंपन्यांमध्ये असून त्यांना योग्य उमेदवारांची अपेक्षा आहे. उमेदवार नोंदणी ३३ हजार १९ आणि स्टार्टअप स्टॉल २६ अस आजच्या कार्यक्रमामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात पेन्शन योजनेच्या संदर्भात सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर रोजगार, कायदा सुव्यवस्था त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे मेळावे आहेत त्याच्यामध्ये शासन आपल्या दारी सारखा उपक्रम असेल महिला सक्षमीकरण योजना आहे या सगळ्या योजनांच्याबद्दल देखील उहापोह झाला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक व युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी पुणे विभागातंर्गत पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींसाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन बारामती येथे करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री मंगल प्रभात लोढा, उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच सुनेत्रा पवार, संजय घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या प्रदान

मुंबई दि. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना केवळ ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

महाराष्ट्र कृषी सेवा गट ब म्हणजेच मंडळ कृषी अधिकारी संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल 2022 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या.या परीक्षांमध्ये आयोगाने पात्र ठरवलेल्या उमेदवारांची यादी जुलै 2023 मध्ये कृषी विभागास प्राप्त झाली. उत्तीर्ण उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशी सर्वसाधारण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया बरीच वेळखाऊ असते.

मात्र याबाबतीत केवळ ७ महिने इतक्या विक्रमी वेळेत नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या बाबींच्या अधीन राहून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.  यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सर्व नवनियुक्त मंडळ कृषी अधिकारी यांचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

हे अधिकारी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देतील तसेच कृषी विभागाचा लौकिक वाढवण्यात योगदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

शासन निर्णय

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/03/202403012327459301.pdf”]

०००

दत्तात्रय कोकरे/वि.सं.अ./

राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस प्रारंभ

नागपूर दि. २ : महाराष्ट्र  राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोन दिवसीय बैठकीस येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे आणि नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या उपस्थितीत आज प्रारंभ झाला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी होते. यावेळी  माहिती संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ.राहुल तिडके, नागपूर विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल, मराठवाडा विभागाचे माहिती संचालक किशोर गांगुर्डे तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

डॉ. इटनकर यांनी प्रशासनातील कारकिर्दीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीं सोबतच्या सौहार्दपूर्ण संवादाचे अनुभव कथन केले. तसेच, येत्या लोकसभा सार्वत्रित निवडणुकीत प्रसारमाध्यमांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

अश्वती दोरजे म्हणाल्या की, पोलीस आणि पत्रकार हे जनतेला न्याय देण्याचे काम करतात. पोलीस गुन्ह्यातील सत्य शोधून काढतात तर पत्रकार हे सत्य जनतेसमोर मांडतात.

राहुल पांडे यांनी सांगितले, पत्रकारांजवळ लेखणीचे शस्त्र असून त्याचा सुयोग्य उपयोग व्हावा. राज्य अधिस्वीकृती समितीने पात्र व योग्य पत्रकारांस अधिस्वीकृती पत्रिका देण्याची व याचा सुयोग्य वापर व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय संबोधनात यदू जोशी म्हणाले, माहितीच्या अधिकाराबाबत यशदा पुणे यांच्या मार्फत राज्यातील पत्रकारांना विभाग निहाय प्रशिक्षण देण्याबाबत पुढाकार घेण्यात येईल. तसेच, अधिस्वीकृती पत्रिका योग्य पत्रकारांना‍ मिळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

संचालक (माहिती/प्रशासन) हेमराज बागुल यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. राहुल तिडके यांनी आभार मानले. नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रमेश कुळकर्णी आणि सदस्यही यावेळी उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाच्यावतीने अधिस्वीकृती समितीच्या चौथ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीचे राज्याच्या विविध विभागातील सदस्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व विभागांचे संचालक, उपसंचालक या बैठकीसाठी उपस्थित असून ३ मार्च २०२४ पर्यंत ही बैठक चालणार आहे.

०००

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

मुंबई, दि.२: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर तर्फे दरवर्षी ग्रंथ महोत्सव साजरा केला जातो. यंदा हा महोत्सव नॅशनल लायब्ररीच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ व ५ मार्च रोजी होणार आहे. ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांची यावेळी उपस्थिती लाभणार आहे.

दि.४ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता आमदार अॅड. आशिष शेलार आणि शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीने महोत्सवाची सुरवात होईल.

दुपारी १२ ते १.०० या वेळेत ज्येष्ठ गिर्यारोहक राजू देसाई यांचे ‘अपरिचित स्वराज्याचा इतिहास’ या विषयावर भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात हास्य कविता आणि आरोग्य या विषयावर सुनील हिंगणे बोलणार आहेत. त्यानंतर  दुपारी ३.४५ नंतर  नव्या ग्रंथातील वाचनीय अर्पण पत्रिकांचे वाचन होणार आहे. यात अनिल हर्डिकर, नंदू परदेशी आणि चित्रा वाघ यांचा सहभाग असणार आहे.

दुसऱ्या दिवशी दि.५ मार्च रोजी पहिल्या सत्रात ‘प्रकाशन व्यवसायातील आव्हाने’ या परिसंवादात डिम्पल प्रकाशनाचे अशोक मुळे, मॅजेस्टिक पब्लिशिंगचे अशोक कोठावळे, जयहिंद प्रकाशनचे हेमंत रायकर, ज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सहभाग असणार आहे.

वाचन संस्कृती, सामाजिक बांधिलकी या विषयावर चेतना महाविद्यालया तर्फे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.अवयव दान काळाची गरज या विषयावर पुरुषोत्तम पवार हे सादरीकरण करणार आहेत.

याशिवाय राकेश तळेगावकर यांची संकल्पना असलेले  मराठी साहित्यातील उत्तम व अभिजात पत्र साहित्यावर आधारित कार्यक्रमात श्रीनिवास नार्वेकर, अस्मिता पांडे, राजश्री पोतदार, आशुतोष घोरपडे, समीर दळवी आणि विनीत मराठे यांचा सहभाग असणार आहे.

समारोप ‘वाचनाची आनंदयात्रा’ या कार्यक्रमाने होईल. यात ज्योती कपिले, विनम्र भाबल, तसेच महिला वाहतूक पोलीस कर्मचारी मेधा तामोरे आणि सुप्रिया रणधीर हे आपले मनोगत व्यक्त करतील. या महोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांचे स्टॉल असणार आहेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम ग्रंथप्रेमी आणि वाचक प्रेमींसाठी विनामूल्य असणार आहेत.दोन दिवस सुरू असणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन प्रेमी, ग्रंथ प्रेमी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई उपनगरचे मुलुंड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी  संजय बनसोड यांनी केले आहे.

०००

संध्या गरवारे/वि.सं.अ./

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जादायी ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि.२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आद्य  क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.

संगमवाडी परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीप्रमाणे आर्टीची स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात गड किल्ले, महापुरुषांच्या स्मारकासाठी तरतूद ठेवली आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्य, बलिदानापासून प्रेरणा मिळावी यासाठी स्मारके उभारण्यात येत आहेत. भिडेवाडा येथे देखील सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होत आहे. लहुजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला शासनाने राज्य शस्त्राचा दर्जा दिला आहे. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासोबत उच्च पदावर जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आद्य  क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतीची ज्योत हजारो मनात पेटवली असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनानंतर छत्रपतींच्या मावळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी शस्त्राने पारंगत वीर तयार करण्यासाठी देशातील शस्त्राचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली म्हणून त्यांना आद्य म्हटले जाते. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य  टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशिक्षण दिले.

समाजातील विषमता दूर करण्याचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरात लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले क्रांतिकारक लढत होते. देह ठेवण्यापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. अशा थोर क्रांतिकाराचे स्मारक रूपाने स्मरण करणे आवश्यक आहे. ही  प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. आता आर्टीची स्थापना करण्यासोबत आरक्षणात होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. येत्या काळात चिरागनगर मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, आद्य  क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बहुजन समाजातून आलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्यांमधून लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य मोठे आहे. लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे पराक्रमी घराणे म्हणून प्रसिद्ध होते. लहुजी वस्ताद साळवे यांनी ही परंपरा राखत इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याचे कार्य केले आणि तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी तरुणांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटवली. अशा थोर पुरुषाचे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभे राहणार आहे. पुढच्या पिढीला अभिमान वाटेल, असे स्मारक उभारण्यात येईल.

लहुजी वस्तादांच्या कार्याची आठवण ठेवत तरुणांनी त्यांचा विचारा स्विकारावा, स्मारक विचाराचे केंद्र असतात. तरुणांनी महापुरुषांपासून चांगला विचार घ्यायला हवा. व्यायाम, शिस्त, सचोटी आणि शिक्षणाने मेंदू बळकट करीत अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी. क्रांतीवीर लहुजी वस्तादांसारख्यांच्या कार्यातून महाराष्ट्र उभा राहीला आहे. स्मारकाच्या रूपाने त्यांच्या कार्याचा ठेवा जपला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील.  मातंग समाजाच्या कल्याणासाठी आर्टीसाठी तातडीने पाऊले उचलले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. उरळी देवाची नगर रचना परियोजनेद्वारे ५-६ एकरात गरिबांसाठी घरे मिळतील,असेही ते म्हणाले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, आद्य  क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक असावे, याची २० वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. येत्या दोन वर्षात निधीची कोणतीही कमतरता पडू न देता स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. स्मारक पूर्ण झाल्यावर लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य लक्षात घेऊन उपक्रम राबवावे. नुकतेच अंदाजपत्रकात आर्टीची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे मातंग समाजाच्या प्रगतीला गती मिळेल. समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सुनील कांबळे आणि स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रास्ताविक केले. साडेपाच एकर जागा आरक्षित करण्यात आली असून स्मारकाच्या कामावर ११५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात म्युझिअम, आर्ट गॅलरी, वसतिगृह, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असतील. परिसरात आद्य  क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. नगर नियोजन योजने अंतर्गत उरळी देवाची येथे विकासकामे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ,  सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे,  विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार,क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख,  जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

०००

छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. २: स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधीस्थळ व तुळापूर येथील बलिदानस्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत, यासाठी ही दोन्ही स्मारकस्थळे छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी असावीत, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

तुळापूर येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ विकास भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सर्वश्री राहुल कुल, महेश लांडगे, अशोक पवार, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी, पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्तांशी अखंड संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या पायाभरणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी कळस चढविला. मराठा साम्राज्यापेक्षा १५ पट मोठे असणाऱ्या मोगल साम्राज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरीस आणले. त्यांनी अनेक लढाया केल्या. संपूर्ण जीवनात ते एकही लढाई हरले नाहीत.

छत्रपती संभाजी महाराज प्रखर धर्माभिमानी होते. धर्मकारण, अर्थकारण यात निर्विवाद वर्चस्व गाजवणारे तसेच राजकारणात निपुण होते. त्याचबरोबर ते अत्यंत कुशल संघटकही होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या खुणा आणि त्यांचा इतिहास जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर महाराष्ट्राची प्रगती, विकास आणि राज्यकारभार करीत आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य, त्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे कार्य, बळीराजाच्या पाठीशी ठाम राहण्याचे कार्य आज महाराष्ट्र शासन करत आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गुलामीची बंधने झुगारून परकीय आक्रमणाला कणखर उत्तर देणारे धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजा होणे नाही, असे सांगून त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या भूमीत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

चंद्र, सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा राहील- देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या बलिदानाने मराठी माणसात जागृती निर्माण झाली, ज्यांनी मोघलांना सळो की पळो करून सोडले, अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ व बलिदान स्थळाला भव्य स्वरूप देण्यासाठी आज विविध विकासकामांचे भूमिपूजन होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. जोपर्यंत चंद्र व सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य सर्वांनाच प्रेरणा देत राहील.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्य घशात घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात बांधावी लागली हे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे शूरवीर मावळे यांच्या कर्तृत्वाचे यश आहे, असे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, ज्या काळात देशातील अनेक राजे रजवाडे औरंगजेबाला आणि मोगल सत्तेला शरण जात होते, त्यांचे मांडलिक होत होते त्या काळात प्राणाचे बलिदान देऊन छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी लढत राहिले. धर्म, संस्कृती, राजकारण, राज्यकारभार, अर्थकारण, समाज व्यवस्था यावर छत्रपती संभाजी महाराजांची मते अत्यंत परखड होती. राजाने नेमके काय काम केले पाहिजे हे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज होते, त्यांचाच आदर्श घेऊन केंद्र व राज्य शासन काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासाठी २६९ कोटींचा विकास आराखडा-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की,  छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला साजेसे स्मारक शासनाच्या वतीने साकारण्याचा अनेक दिवसांचा संकल्प होता. स्मारक विकासाठी २६९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तुळापूर येथे स्मारकासाठी आठ एकर जागा उपलब्ध झाली आहे. तर वढु बु. येथे दोन एकर जागा उपलब्ध झाली असून केईएम हॉस्पिटला देण्यात आलेली आणखी दोन एकर जागा ताब्यात घेऊन एकूण चार एकर जागेत छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ आणि परिसराची विकास कामे करण्यात येतील. या कामांतर्गत संग्रहालय, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकिय कक्ष, सभागृह, स्मरणिका दुकाने,  छत्रपती संभाजी महाराज यांचे ६० ते ६५ फुट उंच धातूचे प्रतिकात्मक शिल्प, अडीचशे मीटर लांबीचा वॉकींग प्लाझा, जीएफआरसी  तंत्रज्ञानावर आधारित संभाजी महाराजांच्या जीवनपटाची, विचारधारांची व साहित्याची माहिती दर्शविणारे भित्तीचित्रे, भिमा नदीच्या घाटाचा विकास, बोटीचे फलाट विकसीत करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

श्री.पवार म्हणाले की, येत्या ३० महिन्यात हे काम पूर्ण होईल. समाजासमोर आदर्श ठेवणारे जे महापुरुष होऊन गेले त्यांचे शौर्य, इतिहास नवीन पिढीला समजावा यासाठी ही स्मारक स्थळे सदैव प्रेरणादायी ठरतील. हे स्मारक दर्जेदार आणि अभिमानास्पद व्हावे, यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभे करत असताना शासन कुठेही कमी पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमपूर्वी मान्यवरांच्या हस्ते वढु बु.येथील छत्रपती संभाजी महाराज समधीस्थळ विकास आणि तुळापूर येथील बलिदानस्थळ विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

०००

भारतीय डाळिंब समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना

मुंबई दि. २ : निर्यातबंदी उठल्यानंतर प्रथमच भारतातून अमेरिकेला समुद्रमार्गे डाळिंब निघाली आहेत. वाशी येथील पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावरुन एकूण ४ हजार २५८ पेट्यांमधून १४ मे. टन डाळिंब भरलेला कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट टस्ट्र न्हावा-शेवा येथून समुद्रमार्गे अमेरिकेच्या नेवार्क बंदराकडे रवाना करण्यात आल्याची माहिती पणन विभागाने दिली आहे.

सन 2017-2018 मध्ये डाळिंबाच्या दाण्यात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिकेने भारतातून डाळिंब आयातीस बंदी घातली होती.  त्यामुळे गेली 5-6 वर्षे अमेरिकेस डाळिंब निर्यात होऊ शकली नाही. ही निर्यातबंदी उठविण्याबाबत अपेडा व एन.पी.पी.ओ. भारत सरकार यांनी संयुक्तरीत्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार सन 2022 पासून अमेरिकेने घातलेली निर्यात बंदी उठवली, मात्र त्यासाठी काही नियम व अटी घालण्यात आल्या. त्यामध्ये माईट वॉश, सोडियम हायपोक्लोराईड प्रक्रिया, वॉशिंग-ड्राईंग इ. प्रक्रिया करुन त्यांनी निश्चित केलेल्या मानकांनुसारच्या बॉक्समध्ये पॅकिंग करुन डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव आहे. त्यानुसार अपेडा, भारत सरकार, एन.पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व यु-लिंक अॅग्रीटेक (आय.एन.आय.) एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेस डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार जुलै 2023 मध्ये प्रायोगिक तत्वावर डाळिंबाची पहिली शिपमेंट विमानमार्गे कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन रवाना करण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम व सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाने डाळिंबाची आणखी एक शिपमेंट विमानमार्गे अमेरिकेला पाठवण्यात आली.

अमेरिकेचे निरीक्षक डॉ. लुईस हे कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रावर डाळींब तपासणीसाठी जानेवारी ते मार्च 2024 या हंगामासाठी कार्यरत आहेत. पहिल्या समुद्रमार्गे डाळिंब कंटेनरसाठी प्रथम यु-लिंक अॅग्रीटेक (आय.एन.आय.) यांच्या पॅकहाऊस येथे डाळिंबाची प्रतवारी करुन त्यावर निश्चित केलेल्या प्रणालीनुसार प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सदर डाळिंब 4 किलोच्या बॉक्समध्ये भरुन त्यावर विकिरण सुविधा केंद्रात अमेरिकन इन्‍स्पेक्टर आणि एन.पी.पी.ओ. यांच्या अधिकाऱ्यांच्या तपासणी अंती व मान्यतेनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. एकूण 4 हजार 258 बॉक्सेसमधून 14 मे. टन डाळिंबाचा कंटेनर दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी नाव्हा शेवा येथील जे.एन.पी.टी. वरुन समुद्रमार्गे अमेरिकेच्या नेवार्क या पोर्टसाठी रवाना करण्यात आला.

भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी डाळिंबाच्या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, अपेडाच्या महाप्रबंधक विनीता सुधांशु, अपेडा मुंबईचे उपमहाप्रबंधक प्रशांत वाघमारे, एन.पी.पी.ओ.चे अधिकारी डॉ. ब्रिजेश मिश्रा; अमेरिका दुतावासाचे मायकेल श्रुडर आणि एल्म्स रायनॉन, अमेरिकन निरीक्षक डॉ. लुईस फेलीसियानो, कृषि पणन मंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक तथा विभाग प्रमुख सतिश वाघमोडे, व्यवस्थापक-निर्यात सतिश वराडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल, एन.पी.पी.ओ., अपेडा व पणन मंडळाचे इतर अधिकारी व कर्मचारी सदरचे कंटेनर रवाना होतेवेळी उपस्थित होते. या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास श्री. अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सीडंट आहेत. त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी असणाऱ्या मार्गदर्शक डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेत डाळिंबाला मोठी मागणी आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. अमेरिकन मार्केटमध्ये भारतीय डाळिंबाचा बाजार हिस्सा वाढवण्यासाठी अपेडा, एन.पी.पी.ओ., कृषि पणन मंडळ आणि निर्यातदार यांच्यामार्फत यु.एस.डी.ए. – अफिस यांच्या सहकार्याने महत्वाची पावले उचलत आहेत. अमेरिकेस भारतातून पहिल्यांदाच समुद्रमार्गे डाळिंबाचा कंटेनर निर्यात करण्यात आल्याने ही एक महत्वाची मुहुर्तमेढ रोवली गेली असून भारतीय डाळिंबांनी अत्यंत शाश्वत व मोठी अशी अमेरिकन बाजारपेठ काबीज केली जाणार असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कदम यांनी सांगितले. तसेच या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ निर्यादारांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

०००

बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

बारामती, दि.२: बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे नव्याने निर्मित पोलीस उपमुख्यालयाचे तसेच अन्य विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

बारामतीचा विकासाचा ‘पॅटर्न’ केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात पोहोचविण्यासारखे असे भव्य पोलीस उपमुख्यालय उभारण्यात आले आहे. बऱ्हाणपूर या गावाच्या हद्दीत ६५ एकराच्या प्रशस्त परिसरात हे उपमुख्यालय बांधण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १५ हजार ६५९ चौ. मी.च्या जोत्यावर ३२ हजार ७८५ चौ. मीटरमध्ये प्रशासकीय इमारत, पोलीस अधीक्षक निवासस्थान, उपअधीक्षक निवासस्थान, सायबर पोलीस ठाणे, विश्रामगृह, आर.पी.आय. इमारत, प्रशिक्षण केंद्र, बहुद्देशीय सभागृह, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीची निवासस्थाने, पोलीस मोटार ट्रान्सपोर्ट कार्यशाळा या इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

याशिवाय दुसऱ्या टप्प्यात ४ हजार ८०२ चौ. मीटर बांधकाम क्षेत्रावरील कामे प्रगतीपथावर असून यात क्लब हाऊस, जलतरण तलाव, इन डोअर शूटिंग रेंज, उपहारगृह, शॉपिंग सेंटर, खेळाच्या मैदानात बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस लॉन, फुटबॉल मैदान, रनिंग ट्रॅक अशा सर्व मूलभूत आणि आधुनिक गरजेच्या सोई-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या एकूण प्रकल्पाचा खर्च १४२ कोटी ६२ लाख रुपये आहे.

वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले बारामती बसस्थानक

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते बारामती येथील बसस्थानकाचेही उद्घाटन करण्यात आले.  बसस्थानक, आगार व निवासस्थानाची पुनर्बांधणी करण्यात आली असून बसस्थानकाचा संपूर्ण परिसर सुंदर आणि कल्पकतेने उभारला आहे. जागेचे एकूण क्षेत्रफळ २४ हजार ७४८ चौ.मी. आहे. यामध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर बस स्थानक कार्यालय, तळमजल्यावर आगार  आणि पार्सल कक्ष असे बांधकाम करण्यात आलेले आहे. बसेस उभे राहण्यासाठी २२ फलाट उभारण्यात आले असून तळमजल्यावर २२ दुकाने आणि पहिल्या मजल्यावर २१ कार्यालये, १२३ आसनी परिसंवाद कक्ष, ३६ आसनी बैठक व्यवस्था आणि ३२ आसनी शयनकक्ष आहेत.

या बसस्थानकात ६५ बस, ४७ चारचाकी, ४० ॲटोरिक्षा आणि ११७ दुचाकी वाहनाकरीता वाहनतळाची निर्मिती करण्यात येत आहे. परिसराचे बाह्य सुशोभिकरण,फर्निचर तसेच प्रवाशांकरीता सूचना व दिशादर्शक फलक बसविण्यात येत आहे. बारामती शहराच्या वैभवात या बसस्थानकामुळे भर पडली आहे.

बारामती अपर अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन

बारामती येथे अपर अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटनदेखील यावेळी करण्यात आले.  वाहतूक शाखा आणि शहर पोलीस ठाणे यांच्याकरीता नवीन प्रशासकीय इमारतीचे एकूण १४ हजार ६२ चौ.मी. क्षेत्रफळात बांधकाम करण्यात आले आले. या कामाकरीता आतापर्यंत २७ कोटी ७७ लाख रुपये खर्च आला आहे.

बारामतीच्या सौंदर्यात भर घालणारी पोलीस वसाहत

बारामती येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १०० वर्षापूर्वीच्या जुन्या बैठ्या दगडी ७५ निवासी खोल्या होत्या. त्या मोडखळीस आल्यामुळे तेथे ७ मजली ७ इमारती मूलभुत सोयीसुविधांसह बांधण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा १९६ पोलीस कुटुंबियांना होणार आहे. ही निवासस्थाने बैठकीची खोली, स्वयंपाकघर, दोन शयनगृहे आदी सुविधांसह आहेत.

याशिवाय इंदापूर तालुक्यात वालचंदनगर येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गात पोलीस ठाण्याची इमारत गेल्यामुळे तेथे नव्याने पोलीस ठाण्याची सुसज्ज इमारत आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी ४ अधिकारी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. या सर्व कामावर ७५ कोटी ४४ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या वसाहतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा ग्रामीण पोलीस दलासाठीच्या वाहनांचे लोकार्पण

गृह विभागाच्या विवक्षित प्रयोजनासाठी योजना अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकरीता ३१ बोलेरो, ७ स्कॉर्पिओ,१ मराझो अशी एकूण ३९ वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ‘डायल ११२’ प्रकल्पासाठी,  नवीन पोलीस ठाण्यांसाठी एस्कॉर्ट, पायलट वाहन तसेच जुनी वाहने निर्लेखित करुन त्याबदल्यात नवीन वाहने अशी ही ३९ वाहने घेण्यात आली असून त्यांचेही लोकार्पण आज करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाचा शुभारंभदेखील यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस शिपाई श्रीकांत गोसावी, पोलीस हवालदार विश्वास मोरे तसेच जयश्री गवळी यांना सदनिकेचे वाटप करण्यात आले. पोलीस विभागाला चारचाकी आणि दुचाकी वाहनाचे पोलीस निरीक्षक प्रेमदिन माने यांना प्रातिनिधिक स्वरूपात या वाहनांची चावी देऊन वाटप करण्यात आले.

तसेच प्रातिनिधिक स्वरूपात पुणे वन विभागातील संदीप सोनवणे, स्नेहल म्हेत्रे, संतोष रणशिंग यांना वनरक्षक पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. याशिवाय आज झालेल्या उद्घाटन प्रकल्पांच्या बांधकामात योगदान दिलेले अधिकारी, कर्मचारी, वास्तुविशारद, कंत्राटदार आदींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोज कुसेकर, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे,विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

०००

बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बारामती, दि. २: नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडविण्याची एक मोठी संधी मिळाली आहे, असे सांगत बारामती येथील या मेळाव्यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आयोजित पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बारामतीतील विविध विकास कामांतर्गत बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक, अपर पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखा, बारामती पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतींचे उद्घाटन पोलीस वाहनांचे लोकार्पणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

 

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

मेळाव्यात तरुणाईला मार्गदर्शन मिळेल आणि रोजगारही उपलब्ध होईल. यापूर्वी नागपूर, लातूर, अहमदनगर येथे मेळावे झाले असून बारामती येथील हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

बारामती शहर विकासाचे मॉडेल

बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे. शहराच्या विकासात शरद पवार, अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. विकासकामे करताना सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांच्या दर्जात कुठेही तडजोड झाली नाही हे दिसून येते.

१ लाख ६० हजार रोजगार दिले

राज्यात यापूर्वी नोकरभरती बंद होती. या शासनाने ७५ हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्या तुलनेत १ लाख ६० हजार रोजगार दिले आहेत. विविध नोकर भरती सुरू असून २२ हजार पोलिसांची भरती, ३० हजारावर शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलेलेही समाविष्ट आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शासन आपल्या दारीमध्ये २ कोटी ६० लोकांना लाभ

‘शासन आपल्या दारी’हा देखील राज्य शासनाचा लोकाभिमुख उपक्रम असून विविध योजना, शासन निर्णय असताना तसेच लाभार्थी असतानाही शासकीय कार्यालयात जाण्याची कटकट नको म्हणून लाभ सोडून देणाऱ्या नागरिकांना लाभ देण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. यात एकच छताखाली गरिबांना घरांचा, महिला बचत गट, शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, हार्वेस्टर आदी अनेक लाभ दिले. या कार्यक्रमातून २ कोटी ६० लाख लोकांना विविध लाभ देण्यात आले.

प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमात राज्याचे पूर्ण योगदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला थेट नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रमांतर्गत जवळपास १० लाख युवकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्य शासनही यात कुठेही कमी पडणार नाही. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत १ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन शिक्षण धोरणामधील अभ्यासक्रमातही कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून रोजगार देणारे हात निर्माण करण्याचाही शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात दाओस येथे जवळपास ५ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून यातून ४ ते ५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

बारामती विकासाचे मॉडेल

पोलीस हा कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असताना सणवार, उत्सव, आंदोलने आदी कालावधीत ऊन, पाऊस वाऱ्यामध्ये रस्त्यावर उभा असतो. म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांना दर्जेदार सुविधाही दिल्या पाहिजेत. त्या बारामतीतील या पोलीस वसाहतीत दिल्या आहेत.  राज्यातील सर्व बसस्थानके सर्व सोई सुविधायुक्त अशी सुसज्ज ‘बसपोर्ट’ करून प्रवाशांना सर्व सोई सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून बारामतीमध्ये राज्यातील पहिले मॉडेल बसस्थानक झाले आहे.

राज्यातील शासकीय इमारती बांधताना बारामतीच्या इमारती समोर ठेवणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बारामतीचे बस स्थानक एखाद्या विमानतळासारखे वाटावे असे आहे, तसेच येथील पोलीस ठाणे, पोलीस उपमुख्यालय, पोलीसाकरीता इमारती या सरकारी बांधकामासारखे न दिसता या एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयासारखे वाटते. अतिशय सुंदर इमारती झाल्या असून बारामतीच्या  वैभवात भर घालणाऱ्या वास्तूचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. राज्यात इमारती बांधण्यासाठी या इमारतीचा आधार घेण्यात येईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  बारामतीतील विकासकामांचे कौतुक केले.

शासकीय कार्यालये चांगली असली पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे. अशा कार्यालयात अधिकारी व कर्मचारी चांगले काम करुन नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचे काम करतील, अशी विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, एकीकडे उद्योगांना मनुष्यबळाची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज लक्षात घेऊन ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे आयोजन निर्णय घेण्यात आला आहे. मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार असून त्यांच्या हाताला काम देण्याचा हा उपक्रम आहे. रोजगार मेळाव्यात रोजगार मिळालेल्या उमेदवारांनी चांगले काम करावे.

नागपूर येथे आयोजित पहिल्या नमो महारोजगार मेळाव्यात ११ हजार तरुणाला रोजगार मिळाला असून त्यापैकी काहींना ५० लाखापर्यंत पॅकेज मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणात उच्च वेतनाच्या नोकरीपासून ते दहावी शिक्षण घेतलेल्या तरुणाला रोजगार मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्राचा नमो महारोजगार मेळावा बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ५५ हजारापेक्षा अधिक पदे अधिसूचित करण्यात आली असून ३६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्यापर्यंत आणखीन अर्ज येतील. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरुन ५ व्या स्थानी आणली गेली असून येत्या तीन ते चार वर्षात काळात जगातील तिसऱ्या  अर्थव्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याकरीता प्रशिक्षित मनुष्यबळाचे महत्व लक्षात घेऊन अर्थसंकल्पात राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र उघडण्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून तरूणांना कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतले आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

बारामती तालुका राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या चार सुंदर इमारतींचे आज लोकार्पण करण्यात आले. पोलीस उपमुख्यालयाच्या इमारतीसाठी १३२ कोटी रुपये, पोलीस वसाहतीसाठी ७५ कोटी रुपयांचा खर्च आला. बारामतीचे नूतन बस स्थानक महाराष्ट्रातील क्रमांक एकचे बस स्थानक आहे. खूप चांगल्या दर्जाची कामे झाली आहेत. विविध विकास कामांसाठी निधीची देखील कमतरता कमी पडू दिली जाणार नाही.

पोलीस विभागाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आज ३९ वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यात १४ महिला वाहन चालक आहेत. महिलांना देखील संधी प्राप्त करून दिली जात आहे. महाराष्ट्रात बारामती हा क्रमांक एकचा तालुका येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याने जर्मनीबरोबर एक करार केला असून त्यांना ५ लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी मनुष्यबळ कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक उमेदवारांना रोजगार मिळवा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषीमूल शिक्षण संस्था आयटीआय तसेच मालेगाव येथील शासकीय आयटीआय येथे विविध १५ ते ३० दिवसांचे कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यातून रोजगार मिळू शकणार आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध- मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्रात प्रथम नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या रोजगार मेळाव्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बारामती येथील रोजगार मेळाव्यात  उद्योजकांनी ५५ हजार ५५७ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. याठिकाणी २५४ उद्योजकांनी सहभाग घेतला असून ३८ हजार ७४४ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. याव्यतिरिक्त ऑनलाईन नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात कौशल्य विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. त्याच्या माध्यमातून राज्यातील १ हजार  महाविद्यालयात नोकरीच्या दृष्टीने ३ महिन्याचे कौशल्य विकासाचे कोर्स सुरू करण्यात येतील. राज्यातील बेरोजगार तरुणांना जो पर्यंत रोजगार मिळत नाही तो पर्यंत कौशल्य विभाग विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी म्हणाल्या, विभागाच्यावतीने युवक युवतींच्या पंखांना बळ देण्याचे काम करतो. २ हजार ठिकाणी प्रमोद महाराज कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असून सहा ठिकाणी आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करत आहोत. पहिला नमो महारोजगर मेळावा १० डिसेंबर का नागपूर केला होता त्याची फलश्रुती पाहून ३ महसुली विभागात आयोजित मेळाव्यात ४० हजार मुलांना रोजगार देण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्येष्ठ नेते खासदार श्री. पवार म्हणाले की, विद्यार्थ्यां रोजगाराची गरज लक्षात घेऊन राज्यात नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्य शासन प्रयत्न करीत आहे. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही गेल्या ३ वर्षात सुमारे २ हजार ५०० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोज कुसेकर, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

००००

कष्टकरी, शेतकऱ्यांना सुखी, संपन्न करण्याचे आई भराडी देवी चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

सिंधुदुर्गनगरी, दि ०२ (जिमाका) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणांहून भाविक येतात. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कष्टकरी आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे, त्यांच्या जीवनात समृध्दी येऊ दे, त्यांना सुखी आणि संपन्‍न कर, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी आई भराडी देवी चरणी घातले.

आंगणेवाडी येथील यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित होते.यावेळी श्री भराडी देवी यात्रोत्सव समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले की, आंगणे कुटुंबियांचा मंदिर विकासामध्ये असणारा सहभाग कौतुकास्पद असून इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा. आई भराडी देवीच्या आर्शिवादाने मला मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची आणि जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. दीड वर्षामध्ये शासनाने अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. सिंचनाचे प्रकल्प वाढवून कोकणातील अनुशेष भरुन काढण्यासंदर्भात अधिवेशनात नुकतीच चर्चा झाली. कोकणात शक्य तितके बंधारे, लघु व मध्यम सिंचन प्रकल्प निर्माण करुन वाहून जाणारे पाणी अडविणे आवश्यक आहे. आरोग्य, दळण-वळण अशा अनेक क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबई-सिंधुदुर्ग हा ग्रीनफिल्ड रस्ता बनविण्यात येणार आहे. यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होऊन रोजगारासह पर्यटन व्यवसाय वाढीस लागणार आहे. कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून देखील शेतकरी आणि नागरिकांना अनेक सुविधा पुरविण्यात येणार असून कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

०००

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...