बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 713

वंचितांनी उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रींवर भर द्या – राज्यपाल रमेश बैस

पुणे दि. ४ : देशाची आर्थिक आणि सामाजिक विकासाची मजबूत पायाभरणी करण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्व असून त्यासाठी विद्यापीठांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचविणे, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

हॉटेल ग्रॅण्ड शेरेटन येथे ‘भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात उच्च शिक्षणाची भूमिका-भारत@2047’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाला एज्युकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. एम.आर.जयरामण, डॉ.जी.विश्वनाथन, प्रा.मंगेश कराड, डॉ. प्रशांत भल्ला, डॉ. एच.चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, शाश्वत आर्थिक विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास विकसित भारताचे उद्दीष्ट गाठता येईल. शिक्षणाच्या क्षेत्रात आपण कुठे आहोत याचे चिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारतातील विद्यार्थी विकसित राष्ट्रातील विद्यापीठांमध्ये का प्रवेश घेतात याचाही विचार करणे गरजेचे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या काळात शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल पहायला मिळतील. अशा परिस्थितीत विद्यार्थी, प्राध्यापक आणि अभ्यासक्रमाचे आदान-प्रदान करण्यासाठी जगातील उत्तम विद्यापीठांसोबत आपल्याला जोडून घ्यावे लागेल. देशातील विद्यापीठात संशोधनाकडे दुर्लक्ष होत असून संशोधनावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरणात 2035 पर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 50 टक्क्यापर्यंत नेण्याचे महत्वाकांक्षी उद्द‍िष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी विद्यापीठांना समजातील वंचित, सामाजिक आणि आर्थिकदृष्टया मागास, दिव्यांग, एलजीबीटीक्यू आदी घटकांपर्यंत पोहोचावे लागेल. आर्थिक अडचणींमुळे कोणीही उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणारे, गृहिणी, बंदिजन, शिक्षणापासून दूर झालेल्या व्यक्तींपर्यंत मुक्त शिक्षण पोहोचवावे लागेल, असे राज्यपाल म्हणाले.

आज बरेच विद्यार्थी रोजगार मिळावा यासाठी शिक्षण घेतांना दिसतात. आपला पारंपरिक अभ्यासक्रम रोजगारासाठी कौशल्य उपलब्ध करून देण्यास पुरेसा नसल्याने त्यात बदल करून कौशल्य शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. 12 वी नंतर कौशल्य शिक्षण हेच खरे उच्च शिक्षण असून विद्यापीठांनी अशा अभ्यासक्रमांची रचना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे सहकार्य घ्यावे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समावेशक, न्यायसंगत आणि परिवर्तनकारी अभ्यासक्रमाची रचना विद्यापीठांनी करावी, असे आवाहन श्री.बैस यांनी केले. विद्यार्थी  नवोन्मेषक, उद्योजक आणि नोकरी निर्माण करणारे व्हावेत यादृष्टीने नवी शिक्षण पद्धती विकसित करण्यावर शिक्षणतज्ज्ञ, नीति निर्धारण करणारे आणि शिक्षण प्रवर्तकांनी भर द्यावा, अशी अपेक्षाही राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. जयरामन, श्री. विश्वनाथन, श्री.चतुर्वेदी आणि प्रा.कराड यांनीही विचार व्यक्त केले.

****

 

कवियत्री शांता शेळके सभागृहाच्या उर्वरित कामांसाठी ३ कोटी रुपये देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.४:  अवसरी खुर्द येथील कवियत्री शांता शेळके सभागृहाच्या उर्वरित कामांसाठी लागणारे ३ कोटी रुपये मंजूर करण्यात येईल. तसेच शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथील ‘कवियत्री शांता शेळके’ सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख, माजी आमदार पोपटराव गावडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील, तहसीलदार संजय नागटिळक,  तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, मराठी साहित्य क्षेत्रात मनाचा तुरा रोवणाऱ्या कवियत्री शांता शेळके यांचा जन्म इंदापूर तालुक्यात झाला. त्यांचे बालपण जिल्ह्यासह मंचर परिसरात गेले. तालुक्याच्या याठिकाणी  ज्ञान, गुण, कौशल्यवृद्धीसाठी चर्चा, ज्ञान, संवाद, परिसंवाद, व्याख्यान, परिषद अशा प्रकारच्या सांस्कृतिक केंद्राची गरज लक्षात घेऊन शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन परिसरात  ‘कवियत्री शांता शेळके’ यांच्या नावाला साजेसे अत्याधुनिक आणि अतिशय सुंदर असे १ हजार आसन क्षमतेचे सभागृह उभारण्यात आले आहे. सभागृहाचे उद्घाटन आपल्या जीवनात आनंदाचा, अभिमानाचा आणि कर्तव्यापूर्तीचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

सभागृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळेल. त्यांना चांगल्या व्यक्तींचे विचार ऐकता येईल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे. कवियत्री शांता शेळके यांच्या नावाला साजेसे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करावेत. तसेच सभागृह व परिसर स्वच्छ महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांने काळजी घ्यावी,असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

आंबेगाव परिसराचा विकास करण्यासोबत सर्व जाती धर्मात जातीय सलोखा राखण्यासाठी सहकार मंत्री श्री. वळसे पाटील गेली अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. परिसरात विविध विकासकामे चालू असून याचा येथील नागरिकांना लाभ होईल, असेही उमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, अवसरी खुर्द परिसरात अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या रूपात वैभव उभे आहे. आज हे एकमेव महाविद्यालय गावाच्या ठिकाणी उभे आहे. आज या ठिकाणी वेगवेगळे संशोधन होत आहे.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सभागृहाची आवश्यकता लक्षात घेता हे सभागृह उभारण्यात आले आहे.

काळाच्या ओघात दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय टिकले असून ते चांगले दर्जेदार  विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. या महाविद्यातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी देश विदेशात नोकरी करत आहे. आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह केला पाहिजे, असे श्री. वळसे पाटील म्हणाले.

पुणे म्हाडाचे अध्यक्ष श्री. आढळराव पाटील, सह संचालक श्री.जाधव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. पानगव्हाणे यांनी विचार व्यक्त केले.

0000

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन

पुणे, दि.४: राज्यातील पोलीस दल सक्षम करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस दलाला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,  असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

आंबेगाव तालुक्यात मंचर येथील पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान, घोडेगाव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान, जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख, माजी आमदार पोपटराव गावडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले, तहसीलदार संजय नागटिळक, गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील, तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था राखत असतांना पोलीस दल विविध सण, उत्सव आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्यावेळी ऊन, थंडी, पाऊस, सुट्टीची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या सोबत त्यांचा परिवारांदेखील विविध अडीअडचणीना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा देणे गरजेचे असून त्याादृष्टीने शासन प्रयत्नशील आहे.

पोलीस दलासाठी अत्याधुनिक पोलीस ठाणे, सुसज्ज निवासी वसाहती उभे करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस दलाला वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.  पर्यावरणाचा समतोल साधतांना शासकीय इमारती आणि वसाहतीच्या ठिकाणी चांगल्याप्रकारे जागेचे सपाटीकरण करुन अधिकाधिक वृक्षारोपण करावे, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

मंचर येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीकरीता ११ कोटी ५१ लाख रुपये, पोलीस अधिकारी व अंमलदार निवासस्थान इमारत १४ कोटी ८१ लाख रुपये, घोडेगाव येथे पोलीस अधिकारी आणि अंमलदार निवासस्थान इमारत १४ कोटी रुपये  आणि जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीकरीता २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करुन  आंबेगाव परिसराच्या वैभवात भर घालणाऱ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत.

घोडेगाव येथील ४० खाटाचे ग्रामीण रुग्णालय व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान इमारतीचे बांधकाम करण्यासाठी २७ कोटी २३ लाख रुपये, बस स्थानक इमारत  पूर्णबांधणी करिता २ कोटी रुपये, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीचे तसेच गोहे, आहुपे आणि तेरूगंण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतरित करण्याचा प्रत्येकी ७ कोटी रुपये अशा सुमारे १२३ कोटी रुपये खर्च होणार आहे. यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील.

शासनाच्यावतीनेबेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहे. शेतकरीवर्गासोबत सर्व घटकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी श्री.पवार यांच्या हस्ते घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान आणि बस स्थानक इमारत, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीचे तसेच गोहे, आहुपे आणि तेरूगंण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतरित करण्याचा कामांचे ई-भूमीपूजन करण्यात आले.

000

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जानेवारीत काढलेल्या लॉटरीच्या मासिक सोडतीचे निकाल जाहिर

मुंबई, दि. ४ :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जात असून जानेवारी-२०२४ महिन्यातील  मासिक सोडतीचे निकाल जाहिर करण्यात आले आहेत. १३ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, दि. १७ जानेवारी  रोजी महाराष्ट्र गौरव, दि. २० जानेवारी  रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी न्यू इयर, दि. २४ जानेवारी  रोजी महाराष्ट्र तेजस्व‍िनी व दि. २८  जानेवारी रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत.

त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ८६९ तिकीटांना एकूण ७ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गौरव मालिका तिकीट क्रमांक G-38/3627 या मे. प्रिन्स एजन्सी, काळबादेवी, मुंबई कडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम ३५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ६ हजार २४१ तिकीटांना एकूण रू.४३ लाख ८ हजार रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी न्यू इयर विक्री झालेले एकूण १ हजार ७०५ तिकीटांना एकूण ८ लाख ८७ हजार रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी मालिका तिकीट क्रमांक TJ-02/3241 या महाराजा लॉटरी सेंटर, इचलकरंजीकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम  २५ लाख रुपये किंमतीचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ९१२ तिकीटांना एकूण ३१ लाख ७१ हजार ८०० रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गजराज विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ६६० तिकीटांना एकूण २ लाख ९८ हजार ३५० रुपये किमतीचे बक्षीस जाहीर झाले आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून १० हजार  रुपये वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी या कार्यालयाकडे सादर करावी.  रूपये १०, हजाराच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

 

 

 

महाराष्ट्र राज्य लॉटरी; फेब्रुवारीमधील सोडतींचा निकाल जाहीर

मुंबई, दि. ४ :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जात असून फेब्रुवारी-२०२४ मधील मासिक सोडती काढण्यात आलेल्या सोडतींचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  यामध्ये ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सहयाद्री,  १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती, २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गौरव आणि २४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडतींचा समावेश आहे.

त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या विक्री झालेल्या तिकीटांमधून  ३ हजार ३० तिकीटांना एकूण  ७ लाख ५८ हजार ५० रुपये किंमतीची  बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती या सोडतीच्या विक्री झालेल्या  १ हजार ६८६ तिकीटांना  ८ लाख ७० हजार ५०० रुपये किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या  ९३२ तिकीटांना  ६ लाख १५ हजार ७०० रुपये  किंमतीची  बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गौरव या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून  ६ हजार ९८१ तिकीटांना  ९ लाख २७ हजार किंमतीची  बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गजराज या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून  २ हजार ५३३ तिकीटांना  २ लाख ८९ हजार ४०० रुपये किंमतीची  बक्षिसे जाहीर झाली आहेत.

लॉटरी तिकीट खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली प्रक्रिया पूर्ण करून रुपये  १० हजारवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेख) महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी कार्यालयाकडे सादर करावी. तर १० हजाराच्या आतील बक्षीस रकमेची मागणी  विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे  उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

 

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षागृह

मुंबई, दि. ४ : मुंबई उपनगर जिल्ह्यात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे सुरक्षा गृह पुरवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.नागरगोजे यांनी दिली.

सुरुवातीला एक महिन्यासाठी नाममात्र शुल्कावर सुरक्षागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जास्तीत – जास्त एका वर्षापर्यंत सुरक्षागृह उपलब्ध करून देण्यात येईल. या सुरक्षागृहाची व्यवस्था समाज कल्याण विभागामार्फत पुरवण्यात येणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

तरी ऑनर किलींग प्रकरणात त्रस्त असणाऱ्या जोडप्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ./

 

 

शेतकऱ्यांनी शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. 4 : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – वैयक्तिक शेततळे (मागेल त्याला शेततळे) घटकाकरिता सन 2023-24 मध्ये शासनाकडून 80 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून आतापर्यंत 7 हजार 316 शेततळ्यांकरिता शेतकऱ्यांना 50.81 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. तसेच 1 हजार 665 शेतकऱ्यांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

या योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळेकरिता शासनाकडून आणखी 20 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे खोदकामासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. तसेच शेततळ्यास प्लॅस्टीक अस्तरीकरण करण्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत वेगळे अनुदान देण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी महा डीबीटी पोर्टलवरुन करण्यात येते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

 

ठाणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारावे – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. ४ : ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात यावे. हेलिपॅडचे काम दर्जेदार असावे. अत्यावश्यक काळात या हेलिपॅडचा उपयोग सहजरित्या करता आला पाहिजे. हेलिपॅडला संरक्षण भिंत निर्माण करुन हेलिपॅडसाठी उच्च प्रतीच्या पेव्हर ब्लॉकचा उपयोग करण्यात यावा. तसेच आजुबाजूला डांबरीकरण करावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे हेलिपॅड निर्मितीबाबत बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. या बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.

हेलिपॅडसाठी शासकीय जमीन शोधून त्याच ठिकाणी काम सुरू करावे. ज्या तालुक्यात गायरान जमीन उपलब्ध आहे, अशा ठिकाणी पुढील एक महिन्यात हेलिपॅडचे काम सुरू करावे. ज्या तालुक्यात हेलिपॅड उभारणी होणार नाही, संबंधित तालुक्याच्या प्रांताधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

0000

निलेश तायडे/विसंअ/

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. ४ : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुढील एक महिना संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. मोहीम कालावधीत ग्रामीण भागात असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. महामार्गांच्या आजुबाजूला असलेला कचरा उचलून रस्ते स्वच्छ करावे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्वच्छता अभियान बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता) व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत हद्दीतील कचरा उचलून त्याचे निर्मूलन करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. देसाई म्हणाले, पुढील आठ दिवसात संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट करावी. कचऱ्यातून प्लॅस्टीक वेगळे काढून अन्य कचऱ्यावर कंपोस्ट खताची प्रक्रिया करावी. महानगरपालिका व नगरपालिका यांनी त्यांच्या हद्दी लगतच्या भागातील कचरा उचलावा. पुढील एक महिना प्रभावीपणे ही मोहीम राबवावी. रस्त्यांच्या आजुबाजूला असलेला मागील कचरा जोपर्यंत उचलला जाणार नाही, तोपर्यंत रस्ते स्वच्छ होणार नाहीत.

याबाबत सर्व गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

****

निलेश तायडे/विसंअ/

वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

वाशिम दि. ४ : मुंबई येथे आयोजित सेंद्रिय उत्पादनांच्या विक्री स्टॅालसाठी वाशिम येथील कृषी विभागाचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सेंद्रिय रथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

‘आत्मा’च्या बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान हा सेंद्रिय रथ रवाना करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील त्रिमूर्ती प्रांगण येथे सेंद्रिय उत्पादनांचे विक्री स्टॉल उभारण्यात येत आहे. त्यासाठी वाशिमचा सेंद्रिय रथ रवाना करण्यात आला आहे.

०००

 

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...