सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 712

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. 19 : महिला बचत गटांना रोजगार निर्मिती व  उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली  आढावा बैठक झाली.

मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीला माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, महिला  व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, मविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ग्राम विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहाय्याने एकाच छताखाली आणण्याबाबत विविध विभागांशी समन्वय करून निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

नागपूरमधील आरोग्य सुविधांसाठी ५०७ कोटी

मुंबई, दि. 19 : नागपूरमधील मेडिकल, मेयो आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी 639 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील काही निधी दिला आहे, तर उर्वरित 507 कोटी रुपयांचा निधी तात्काळ देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेताना दिले.

नागपुरातील 615 खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे भूमिपूजन लवकरच होणार असून, वाठोडा येथील हॉस्पीटलचे काम सुद्धा तात्काळ सुरु करावे, असेही निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामासाठी 60 कोटी रुपये तात्काळ देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्याच्या बाबतीत निधीची तरतूद करावी, यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथिगृह येथे नागपूरमधील विविध विकास प्रकल्पांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी प्रशासनाने प्रकल्प पूर्ण करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे कर्करोग उपचाराच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीसंवर्धन अंतर्गत बांधकाम प्रगतीपथावर असून ते तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर वाठोडा, खसरा येथे तीनशे खाटाच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे बांधकामही गतीने पूर्ण करण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाच्या विकास कामाची, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती या संस्थेची खसरा, सिताबर्डी येथे रिसर्च सेंटर, तसेच प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत मौजा भरतवाडा, पुनापूर येथील विटभट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या. नासुप्रच्या 716 कोटींच्या मलजल प्रकल्पाच्या निविदा सुद्धा तत्काळ जारी करा, असे त्यांनी सांगितले.

इंदोरा येथील जागेवर सिंधू आर्ट गॅलरीचे बांधकामही तातडीने सुरु करुन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचित केले.  याशिवाय, अजनीतील ओबीसी भवन, संत सावतामाळी भवन, शिवसृष्टी, बख्त बुलंदशाह स्मारक सौंदर्यीकरण, टेकडी गणपती तीर्थक्षेत्र विकास, या प्रस्तावित प्रकल्पांचाही आढावा त्यांनी घेतला. विसर्जन कुंड, नंदग्राम प्रकल्प, पोहरा नदी शुद्धीकरण, नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, देवडिया रुग्णालय, प्रभाकरराव दटके रुग्णालय, रामझुला, अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागाची दुरुस्ती अशा सर्व कामांचा त्यांनी आढावा घेतला. नागपूर शहरातील क्रीडांगणे, खेळाची मैदाने विकसित करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.

बैठकीस वित्त विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरीक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, नागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, तसेच इतर संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

वंदना थोरात/विसंअ/

शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या समाधानानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

मुबंई, दि. १९ : राज्यातील पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी जि. सिंधुदुर्ग या दरम्यान ८०२ कि.मी. लांबीचा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत होणार आहे. या महामार्गासाठी भूसंपादन करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तसेच प्रत्येकांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्याशिवाय संबंधित भूसंपादन प्रक्रिया केली जाणार नाही. आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसमवेत बैठकांचे आयोजन करण्यात येईल. बागायत/जिरायत क्षेत्र, अल्पभूधारक शेतकरी, सदर महामार्गादरम्यान इतर रस्त्याची परिस्थिती काय आहे, या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करुन व संबंधित शेतकऱ्यांचे समाधान केल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात येणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जात असून पुढे गोवा राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. १२ जिल्ह्यांमधील विविध देवस्थाने (संताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबाजोगाईस्थित मुकुंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच औंढा नागनाथ व परळी वैद्यनाथ येथील २ ज्योर्तिलिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही जोडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे कारंजा (लाड), माहूर, अक्कलकोट, गाणगापुर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळे) जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल व इतर सर्व दळण-वळण कमी वेळेत होईल, वेळेची तसेच इंधनाची बचत होईल व महामार्ग परिसराचा विकास होण्यास मदत होणार आहे.

सद्य:स्थितीमध्ये महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गासाठी प्रारंभिक अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली असून संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचेमार्फत भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत आहे. प्रस्तुत भूसंपादन प्रक्रियेबाबत खासदार अशोक चव्हाण व इतर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन प्राप्त झाले आहे. सर्व बाबींचा सखोल अभ्यास करुन व संबंधित शेतकऱ्यांचे समाधान केल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात येणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी सांगितले.

*****

वंदना थोरात/विसंअ/

लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाच्या परीक्षांकरिता टंकलेखन कौशल्य चाचणीचे आयोजन

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक १ जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांक, चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील त्यांच्या प्रवेश प्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येणार आहे.

प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरील Candidates Information >Instructions>General Instructions येथे ‘Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे, असे आयोगाने कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

शालेय गणवेशाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप

मुंबई, दि. 19 : महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि आर्थिक लाभ मिळावा यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येणारे शालेय गणवेशाचे शिलाईकाम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) बचत गटांकडून करून घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मविम बचत गटांकडून शिवणकाम केलेल्या शालेय गणवेशाचे वाटप महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते (ऑनलाइन) करण्यात आले.

मंत्री कु.तटकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात प्रातिनिधीक स्वरूपात काही शाळांमध्ये मुलांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, मविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे (ऑनलाइन) सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही बचतगट आणि शाळेतील विद्यार्थी शिक्षक (ऑनलाइन) उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले, यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.

यावर्षी ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेनुसार राज्यभरात एकाच रंगाचे गणवेश वाटप करण्यात येत आहेत. त्यामुळे एकसमानता पाहायला मिळते.

यापुढे गणवेश शिवणकाम करताना शालेय शिक्षण विभागाचे आणि मविमच्या तेजस्विनी या नावाचे स्टिकर लावता येतील का, याचाही विचार करावा, अशा सूचना करून बचत गटांच्या महिलांना रोजगार निर्मितीची संधी दिल्याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.
महिलांना गणवेश शिवणकाम देण्यापूर्वी गावाचे स्कोप मापिंग करण्यात आले. महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती ड्रेस शिवतात, याची संख्या काढण्यात आली आहे त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे. आता शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात गणवेशाचे वाटपही सुरू झाले आहे. या निर्णयामुळे मुलांना गणवेश वेळेत मिळण्यास मदत होत आहे आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असल्याचे मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/

‘मिशन धाराऊ’ लोकचळवळ म्हणून राबवावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 19 : राज्यातील कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, स्तनपान व शिशुपोषण याबाबत शास्त्रोक्त ज्ञानाद्वारे आनंदी मातृत्वाची संकल्पना समाजामध्ये रूजवण्याच्या उद्देशाने विविध शासकीय व अशासकीय घटकांच्या समन्वयातून सातारा जिल्ह्यामध्ये ‘मिशन धाराऊ माता- दुग्धामृतम्’ ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. ही योजना  शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयातून सामाजिक  लोकचळवळ म्हणून राज्यभर राबविण्यासाठी नियोजन करावे,असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांनी सातारा जिल्ह्यातील मिशन धाराऊ अभियानाचा आढावा घेतला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त कैलास पगारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते. परंतु, आजही समाजात याबाबत गैरसमजुती पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. अशा प्रकारचे मार्गदर्शन सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा आरोग्य कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, युनिसेफ, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशन, बीपीएनआय (महाराष्ट्र) ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, स्थानिक अशासकीय संस्था यांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ म्हणून जनजागृती केली पाहिजे, असे सांगून मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मिशन धाराऊ’ तसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली.

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मदर सपोर्ट ग्रुपची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये  प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, प्राथमिक शिक्षिका, ग्रामसेविका, महिला लोकप्रतिनिधी व इतर तज्ज्ञ स्थानिक महिला यांचा समावेश मदर सपोर्ट ग्रुपमध्ये करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येऊ न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, तुषार महाजन, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता देण्यात यावा. वाहतूक भत्ता न मिळालेल्या दोन शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. टाटा सामाजिक संस्थेने प्रती विद्यार्थ्यांमागील शिक्षक व दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देण्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षकांच्या अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.

00000

निलेश  तायडे/विसंअ/

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून ‘निर्मलवारी’ पूर्वतयारीचा आढावा

पुणे, दि. १९: पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासह स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी बारकाईने नियोजन करा, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मलवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त समीक्षा चंद्राकार,  वर्षा लड्डा-उंटवाल, विजय मुळीक, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तसेच सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, यावर्षी पालखी सोहळ्यासाठी  गतवर्षीपेक्षा अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. पालखी सोहळ्यासाठीची कामे पारदर्शकता ठेऊन वेळेत पूर्ण करावीत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पंढरपूर येथे पालखी तळावर पुरेशा प्रमाणात आणि मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या ठेवाव्यात.

निर्मलवारीच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवक, सेवाभावी संस्था, एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याबाबत आवाहन करावे. पंढरपूर शहरातील वीज पुरवठा अखंडित राहील याची दक्षता घ्यावी.  पिण्याच्या पाण्याचा स्रोतांच्या ठिकाणी आवश्यक असल्यास जनरेटरची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. पावसाच्या पार्श्वभूमीवर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था होईल याकडे लक्ष द्यावे.

टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी. पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरणही निटपणे होईल याकडे लक्ष देण्यासोबत त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी. जळगाव जिल्हा परिषदेने संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासोबत दोन पिण्याच्या पाण्याचे टँकर पंढरपूरपर्यंत उपलब्ध करुन द्यावेत. पालखी मार्गावरील रेस्टॉरंट, हॉटेल्स यांची स्वच्छता व अन्न शुद्धतेची खात्री करावी. तसेच पंढरपूर शहरातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी वाढीव मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील श्री.महाजन यांनी दिली.

प्रधान सचिव डवले यांनी निधी उपलब्धतेबाबत माहिती दिली. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचे कार्यादेश तातडीने देऊन कामे सुरू करावीत. पालखी सोहळ्यासंबंधातील कामे वेळेवर पूर्ण होतील यादृष्टीने नियोजन करावे, असे ते म्हणाले.

विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने वाढवण्यात आले आहेत. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, प्रथमोपचार पेट्या, निवारा केंद्र, हिरकणी कक्ष आदी सुविधांसोबत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

प्रत्येक शासकीय विभागाने नियोजन समितीच्या निधीमधून केलेल्या चांगल्या कामांची यादी तयार ठेवावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर, दि. 19(जिमाका):- प्रत्येक शासकीय विभागाला त्यांच्या विभागाअंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रत्येक विभागाने केलेल्या चांगल्या दहा कामांची यादी तयार करून ठेवावी. या सर्व कामांना आपण प्रत्यक्ष भेट मंजुरीप्रमाणे कामे पूर्ण झाली आहेत का तसेच कामांचा दर्जाही तपासणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सर्व विभागप्रमुख, पाणीटंचाई व अन्य विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या सह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत माहे मार्च 2024 अखेरपर्यंत सर्व संबंधित शासकीय विभागाने त्यांच्याकडील मंजूर निधी जवळपास शंभर टक्के खर्च केलेला दिसून येत आहे. तर सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 702 कोटीचा आराखडा मंजूर असून त्यातील 233.81 कोटी प्राप्त झालेले आहेत. तरी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी विधानसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहित धरून माहे ऑगस्ट 2024 पर्यंत जास्तीत जास्त कामे निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देऊन ते सुरू करण्याबाबतची कार्यवाही अधिक गतिमान करावी. शिक्षण विभागाने प्राथमिक शाळा दुरुस्तीवर अधिक खर्च करून सर्व शाळा व्यवस्थित कराव्यात.  तसेच सर्व नगरपालिकांना देण्यात आलेला निधी मंजूर कामावर व्यवस्थित खर्च होत आहे का याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका यांनी प्रत्येक आठवड्याला ऑनलाइन बैठक घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यात पावसाने समाधानकारक सुरुवात केलेली असून दिनांक 1 जून 2024 ते आज पर्यंत उजनी धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत 7 टीएमसी पाण्याची भर पडली आहे. सद्यस्थितीत वजा 46.71 टक्के पाणी उजनी धरणात उपलब्ध आहे. तर प्रखर टंचाई कालावधीत 214 टँकर जिल्ह्यात सुरू होते ते चांगल्या पावसामुळे 127 टँकर पर्यंत कमी झालेले आहेत. पुढील काळातही चांगला पाऊस होऊन टँकरची संख्या शून्यावर येईल. तरीही जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. त्याबरोबरच 74 कोटी 35 लाख 38 हजाराच्या टंचाई कृती आराखड्यास त्यांनी मान्यता प्रदान केली.

सोलापूर महापालिकेने दुहेरी पाईपलाईनचे उर्वरित 20 टक्के काम माहे नोव्हेंबर 2024 अखेर पूर्ण करून सोलापूर शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. पाणी वितरण व्यवस्था तसेच नगरोउत्थान अंतर्गत घेण्यात आलेल्या कामासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगून सोलापूर महापालिका व वीज वितरण कंपनीने परस्परात योग्य समन्वय ठेवून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.

यावर्षी पावसाने समाधानकारक सुरुवात केली असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना बी बियाणे व पुरेसा खत पुरवठा करणे आवश्यक आहे. नियमित डीएपी खत पुरेसे उपलब्ध होत नसेल तर लिक्विड डीएपी खत वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. मागील वर्षीच्या दुष्काळातील पीक विम्याचे 25 टक्के आग्रीम रक्कम 113 कोटी शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मिळालेले आहेत, तरी उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना लागू केल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन पीक विमा भरून पिक नुकसानी पासून सुरक्षित केलेली होती. सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख आठ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी पिक विमा भरण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले.

वीज वितरण कंपनीने दुरुस्ती तसेच फ्युज पोल पडणे, लाईन खाली पडणे, तुटणे या बाबीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना राबवून सर्व नागरिक व शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी. दुरुस्तीची कामे करत असताना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आवश्यक निधीची मागणी नियोजन समितीकडे तात्काळ करावी, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयास अद्यवतीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल त्यासाठी तंत्रनिकेतने प्रस्ताव करून पाठवावा. तसेच तंत्रनिकेतनचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करून शासनाला सादर करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी उजनी पाणी उपलब्धता, पाऊस, खते बी बियाणे, पिक विमा, पी एम किसान योजना, वीजपुरवठा सुरळीत असणे, सोलापूर शहर दुहेरी पाईप लाईन, वितरण व्यवस्था, ड्रेनेज सिस्टीम सह  नागरिकांच्या विकासाबाबतचे प्रश्न व सूचना मांडल्या.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित विभागाकडून कामे वेळेत पूर्ण करून घेण्यात येतील असे सांगितले. तसेच ज्या विभागांना नियोजन समिती मधून निधी आवश्यक आहे त्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत असेही सूचित केले. तर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका विना पवार, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. शिंदे यांनी आपल्या विभागाच्या वतीने सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची खात्री दिली.

विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर दि.19(जिमाका):- शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन  उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर  शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, करिअर विषयक मार्गदर्शक सुनील चोरे,नितीन शेळके, श्रीकांत घाडगे, दाजी ओबांसे, डॉ. संदीप तापकीर, राम सुतार तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, शासनाने कौशल्य विकास विभागाअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध कोर्स आहेत.  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबरोबर कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आलेला आहे. शासनाकडून तरूणांना उद्योग सुरू करण्यासाठी विविध सवलतीच्या कर्ज योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या कर्ज योजनेचा फायदा घेऊन उद्योग उभारून नोकरी देणारे बनावे. तसेच भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना शिक्षणासोबत रोजगार प्राप्त होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकास केल्यास त्यांना परदेशात मोठ्या पगाराची संधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटनाच्या उद्योग व्यवसायासाठी शासनाच्या विविध व्याज परताव्याच्या योजना आहेत. तरुणांनी नोकरी न करता उद्योग उभारून नोकरी देणारे बनावे तसेच पर्यटन क्षेत्रात करिअर करावे. उद्योग उभारून रोजगार मागण्या पेक्षा रोजगार देणारे व्हावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या शिबिरास एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना नामवंत शिक्षण तज्ञांकडून भविष्यातील शिक्षण व करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...