गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 708

घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन विकसकाचा पर्याय शोधा – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि झिशान सिद्दीकी यांच्या उपस्थितीत बैठक

 १८ वर्षांपासून घरांचा प्रश्न प्रलंबित; शासनाकडे प्रस्ताव देण्याची रहिवाशांना सूचना

मुंबई, दि. ७ : मुंबईतील वांद्रे पूर्वच्या गोळीबार रोडवरील शिवालिक ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये २६ फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी सुरक्षित घरांमध्ये तात्पुरते पूनर्वसन करण्यात यावे. वर्षभरात तेथेच नवीन ट्रान्झिट कॅम्प तयार करुन रहिवाशांच्या निवासाची सोय करावी. शिवालिक विकसकाने गेल्या १८ वर्षांत प्रकल्प पूर्ण न केल्याने त्याच्याऐवजी अन्य नामांकित विकसकांकडून हा प्रकल्प पूर्ण करुन रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

स्थानिक आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांच्या मागणीवरुन मंत्रालयात आज विशेष बैठक झाली. बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदींसह संबंधित अधिकारी आणि शिवालिक ट्रान्झिट कॅम्प रहिवाशी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत, हा प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला विलंब, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणी, ट्रॅन्झिट कॅम्प रहिवाशांच्या समस्या, तेथील महिला, विद्यार्थी वर्गाच्या मागण्यांचा आढावा घेतला. त्यानंतर मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शिवालिक विकसकाकडून प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला विलंब अक्षम्य, रहिवाशांवर अन्याय करणारा आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी संबंधित रहिवाशी आणि गृहनिर्माण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहमतीने अन्य चांगला विकसक शोधण्याच्या पर्यायाचा विचार करावा. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करुन मान्यता घेण्यात यावी. 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबातील विद्यार्थी स्थानिक शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकतात. महिला स्थानिक ठिकाणी घरकाम करतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रहिवाशांचे त्याच ठिकाणी उपलब्ध ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

०००

 

राज्य शासन उद्योजकांच्या सदैव पाठीशी – पालकमंत्री उदय सामंत

रायगड, दि.07(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने मोठ्या उद्योजकांबरोबर च छोट‌्या उद्योजकांना देखील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. उद्योजकांवर कुठलेही संकट येणार नाही याची राज्य शासन काळजी घेईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. यावेळी श्री.सामंत यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी 2600 कोटी रुपयांचे 17 सांमजस्य करार करण्यात आले.

 पनवेल येथे  आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आ प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी. हरळय्या उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. तसेच राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 यांनी सुचविलेल्या सुधारणाचे अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहे. त्याच धर्तीवर निर्यात व विकासाचे केंद्र  म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत  करुन जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी  रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

समुद्र किनारी असलेल्या जिल्ह्यामध्ये उद्योजक गुंतवणूक करत आहेत. स्थानिक स्तरावर 1 लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे. 50 लाखाच्या प्रोजेक्टला देखील रेड कार्पेट  मिळाले आहे. छोटे व स्थानिक उद्योजक शासनाच्या दृष्टीने महत्वाचे  आहेत. अटल सेतूमुळे रायगड जिल्ह्यात पायाभूत सोयी-सुविधांचा विकास होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ,समृध्दी महामार्गामुळे उद्योग वाढीला चालना मिळणार आहे. देशात परकीय गुंतवणूक आणणारे महाराष्ट्र राज्य एक नंबरला आहे असेही श्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोली मध्ये एक हजार एकर जागा लॉइडस कंपनीला दिली असून 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या जिल्ह्यात झाली आहे. गडचिरोली मध्ये जिंदाल, टाटा ने गुंतवणूक केली असल्याने आगामी एका वर्षात उद्योग नगरी म्हणून गडचिरोली ओळखली जाणार आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे 18 ते 19 हजार उद्योजक बनविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. उद्योगाची भरभराट होण्यासाठी उद्योजकांनी उद्योजक तयार करावेत असे केले तर बेरोजगारी दूर होईल.  उद्योजकांवर कुठलेली संकट येणार नाही, याची काळजी शासन घेईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.

000000

जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे १२ मार्चपासून वार्षिक प्रदर्शन

मुंबई, दि. ७ : सर ज.जी. कला महाविद्यालय ही दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य कला संस्था असून २ मार्च रोजी या संस्थेने १६८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेचा वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन ११ मार्च रोजी सायं. ५ वा. होणार आहे.  दि. १२ ते १७ मार्च या कालावधीत सकाळी १०.३० ते सायं. ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्व कलाप्रेमींना विनामूल्य पाहता येईल.

वार्षिक कला प्रदर्शन हा विद्यार्थी व संस्थेसाठी महत्त्वाचा उपक्रम असून यामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्ट कलाकृती निवडून त्या प्रदर्शित केल्या जातात.

सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या मुख्य इमारतीतील तळमजला तसेच पहिला मजला व रे आर्ट वर्कशॉप या इमारतीमध्ये हे संपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व लेखिका डॉ. फिरोजा गोदरेज व संस्थेचे माजी विद्यार्थी व चित्रकार विलास शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. दि. १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅशन शोचे आयोजन, दि.१३ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वा प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रुती सडोलीकर यांच्या हिंदुस्थानी शास्रीय संगीत गायनाच्या कार्यक्रमास सर्वाना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. दि. १६ मार्च रोजी कलावेध चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.

या प्रदर्शनामध्ये चित्रकला विभागातील विद्यार्थ्यांनी वास्तववादी पद्धतीने रंगवलेली व्यक्तिचित्र निसर्ग चित्र, स्थिर चित्र प्रदर्शित केली आहेत त्याच बरोबर प्रिंट मेकिंग व रचनाचित्र या विषयांमध्ये वेगवेगळे सामाजिक विषय तसेच व्यक्तिगत अनुभवावर आधारित विविध पद्धतीने चित्र रंगविलेली आहेत.

शिल्पकला विभागामध्ये व्यक्ती शिल्प व रचना शिल्प ही फायबर, लाकूड, वेगवेगळ्या प्रकारचे दगड व मिश्र माध्यमांचा वापर करून शिल्पाकृती बनविलेल्या आहेत धातू काम विभागातील विद्यार्थ्यांनी तांब्याचा पत्रा, विविध पद्धतीने ठोकून व वेगवेगळे उठाव निर्माण करून विविध कलाकृती तयार केल्या आहेत.

इंटेरियरच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फर्निचर व इंटेरियरची डिझाईन तयार करून त्यांची मॉडेल या प्रदर्शनामध्ये सादर केली आहेत. टेक्स्टाईल या विभागातील विद्यार्थ्यांनी विव्हिंग व प्रिंटिंग पद्धतीने कार्पेट, बेडशीट, पडदे, साडी, ड्रेस इत्यादी वर नावीन्यपूर्ण डिझाईन केलेली पहावयास मिळतील याचबरोबर कलाशिक्षक प्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचीही कामे यात प्रदर्शित करण्यात आली आहेत.

कला रसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे तसेच चित्रकला व डिझाईनच्या क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी योग्य क्षेत्र निवडण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरेल.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

 

खादी ग्रामोद्योगच्या राज्यस्तरीय प्रदर्शनास उद्यापासून बोरीवलीत प्रारंभ – सभापती रवींद्र साठे

मुंबई, दि. ७ : ग्रामीण लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने ८ मार्च ते १७ मार्च या कालावधीत सी.बी.कोरा केंद्र, शिंपोली गाव, बोरीवली येथे राज्यस्तरीय वस्तू प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण लघु उद्योजकांच्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या प्रदर्शनामध्ये खादी ग्रामोद्योग आयोग व राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ग्रामीण उद्योजकांच्या दर्जेदार उत्पादनांचा समावेश केला आहे. तसेच मध केंद्र योजना व मधाचे गाव यासह मधाच्या विक्रीसाठी इच्छुक लघुउद्योजकांना प्रदर्शनामध्ये माहिती देण्यात येणार आहे.

खादी ग्रामोद्योग मंडळ व खादी ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने ग्रामीण भागात शासनाच्या रोजगार निर्मितीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू/उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंडळ कार्यरत आहे. खादी सामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृती मेळाचे सर्व जिल्ह्यात आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनामध्ये ५० स्टॉल लावण्यात येणार असून, सकाळी १० ते रात्री १० या वेळेत खुले राहील. प्रदर्शनामध्ये खादीवस्त्र, हळद, मध, हातकागद उत्पादने, कोल्हापूरी चप्पल, केळीपासून विविध पदार्थ, मसाले, विविध प्रकाची लोणची, पापड, लाकडी खेळणी, शोभेच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती श्री. साठे यांनी दिली.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना कौशल्य प्रशिक्षणासमवेत आर्थिक लाभ देणार मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला

विविध १८ लघु व्यवसायातील कारागीर आणि शिल्पकारांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत १५ हजारापर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यांना पाच दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण आणि भांडवल खरेदीसाठी तीन लाखापर्यंत टप्प्याटप्याने कर्ज प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी दिली.

लहान कामगार आणि कुशल कारागिरांना प्रशिक्षण, कौशल्याबाबत सल्ला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्यात येणार आहे. देशातील गरजू कारागिरांना सक्षम बनविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारातून ही योजना राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले. नोंदणीकृत कारागिरांना मान्यता देण्यात येणार आहे. आजतागायत ३ लाख कारागिरांची नोंदणी झाली असून, १४ हजार कारागिरांना १०० प्रशिक्षण केंद्रामध्ये  कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रदर्शनाची सुरुवात जागतिक महिला दिनानिमित्त होत असल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५० कारागीर महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या विविध योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात येणार आहे.

या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन ग्रामोद्योगी उत्पादने खरेदी करावी, आणि ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन मंडळाचे सभापती रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी ०२२/२२६१७६४१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

 

महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी राजेंद्र मोहिते

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी नेमणूक झाल्याने राजेंद्र मोहिते यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ दिली.

सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या पदग्रहण कार्यक्रम प्रसंगी त्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.

०००

किरण वाघ/विसंअ

शासनाकडून बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे काम निरंतर सुरु राहील – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

ठाणे, दि.7(जिमाका):- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनातर्फे मॉडेला मिल कपाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे पश्चिम-४००६०४ येथे दि.०६ व 7 मार्च २०२४ या दोन दिवसाच्या कालावधीत “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काल ६ मार्च रोजी या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कोकण विभागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार देण्याचे काम निरंतर सुरु राहील, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज येथे दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज या “नमो महारोजगार” मेळाव्याचा सांगता कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार निरंजन डावखरे, कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी, कौशल्य विकास संचालक योगेश पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिगंबर दळवी, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार, कोकण विभागीय उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, ठाणे कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक संध्या साळुंखे, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर आदी मान्यवरांची उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हे बेरोजगार तरुणांसाठी संवेदनशील आहेत. त्यांच्या सहकार्यानेच ठाणे येथे हा दोन दिवसीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करणे शक्य झाले. या दोन दिवसात मोठ्या संख्येने बेरोजगार युवक-युवतींनी आपली नोंदणी केली. या दरम्यान पात्र उमेदवाराची निवड करुन काहींना लगेचच निवडपत्रही दिले. या मेळाव्याच्या आयोजनासाठी सर्वांनीच मोलाचे सहकार्य केले. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विद्याविहार येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे ऑनलाईन लोकार्पण आणि कोपरी येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचालित संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे उदघाटन संपन्न झाले. या अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या दोन्ही कौशल्य विकास प्रबोधिनी देशातील पहिल्या प्रबोधिनी आहेत. जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींना या प्रबोधिनीच्या माध्यमातून विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून पुढे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगारही उपलब्ध करुन दिला जाणार आहे. कौशल्य विकास आणि रोजगार उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे हे काम यापुढेही असेच निरंतर सुरु राहील.

या मेळाव्यासाठी एकूण 66 हजार 226 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या मेळाव्यात दि.०६ मार्च २०२४ रोजी 310 उद्योजकांच्या उपस्थितीत 22 हजार 697 उमेदवारांची मुलाखती झाल्या. यापैकी 8 हजार 985 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून 1 हजार 186 असे मिळून एकूण 10 हजार 171 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. तसेच दि.०7 मार्च २०२४ रोजी 289 उद्योजकांच्या उपस्थितीत 16 हजार 928 उमेदवारांची मुलाखती झाल्या. यापैकी 6 हजार 321 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून 1 हजार 37 असे मिळून एकूण 7 हजार 358 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

अशाप्रकारे या मेळाव्यात एकूण 66 हजार 226 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या मेळाव्यात एकूण 599 उद्योजक कंपन्यांची उपस्थिती होती. यांच्यामार्फत एकूण 72 हजार 13 रिक्त पदे उपलब्ध होती. यापैकी 39 हजार 625 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यापैकी 15 हजार 306 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून 2 हजार 223 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. तसेच प्राथमिक व अंतिम निवड असे मिळून 17 हजार 529 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या उमेदवारांच्या मेळाव्याच्या ठिकाणीच मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर या मेळाव्यात 14 विविध शासकीय महामंडळे सहभागी झाली होती व त्यांच्या माध्यमातून एकूण 2 हजार 620 युवक-युवतींनी स्वयंरोजगाराविषयी माहिती-मार्गदर्शन घेतले, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार यांनी दिली आहे.

समारोप प्रसंगी उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांचा, जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून दिलेल्या कंपन्यांचा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व अन्य मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

00000000

४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ७ : राज्यातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे ९ हजार मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातून ४० हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून हे देकारपत्र आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना प्रारंभ केली होती. त्यानंतरच्या काळात २ हजार मे.वॉट पर्यंत निर्मिती करण्यात आली. आता ९ हजार मे.वॉट सौरऊर्जा तयार करण्यात येणार आहे, त्यामुळे ४० टक्के कृषी फीडर हे सौरऊर्जेवर येतील.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची दिवसा वीजेची सातत्याने मागणी होती. ही मागणी आता पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे कार्यान्वयन शक्य होणार आहे.  सर्वांत आधी सौर ऊर्जेवरील ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राळेगणसिद्धी जि. अहमदनगर येथे साकारण्यात आली. ती कमालीची यशस्वी झाली. आता जागा उपलब्धतेसाठी महसूल यंत्रणेने केलेल्या भरीव कार्यामुळे हे शक्य झाले. विकासकांना यापुढेही सर्व शासकीय यंत्रणा मदत करतील. कुठेही अडचण आल्यास त्या सोडविण्यासाठी शासन कायम पाठीशी असेल.

राज्यात 3600 मेगॅवॉट सौर ऊर्जा क्षमता आतापर्यंत स्थापित आहे. पण, आता अवघ्या 11 महिन्यात 9000 मेगॅवॉटची प्रक्रिया राबवून सरकारने एक नवा विक्रम घडविला आहे. सरकारने कमीत कमी कालावधीत जागा उपलब्ध केल्याने हा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य झाले आहे. या प्रकल्पामुळे शासनावरील विविध वीज सवलतींमुळे पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले. हा प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण करायचा असला तरी सोबत काम केले तर 15 महिन्यातच तो पूर्ण होऊ शकतो. आता हा प्रकल्प सुरू होणार म्हणून अधिकाऱ्यांनी थांबू नये. उर्वरित 50 टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणण्यासाठी नियोजनाच्या तयारीला तत्काळ लागावे. पुढील दोन ते तीन वर्षात 8 लाख सौर ऊर्जा पंपसुद्धा शासनाला द्यावयाचे आहेत, त्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये प्रतिहेक्टर वार्षिक भाडे दिले जाते. यावेळी हुडकोसोबत एक सामजंस्य करार सुद्धा करण्यात आला. यामधून 5 हजार कोटी रूपये प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मिळणार आहेत. रिलायन्ससोबत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी सामजंस्य करारसुद्धा करण्यात आला. या करारामुळे राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात बुस्ट मिळणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते, तर सभागृहात अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक कादंबरी बलकवडे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिक, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी आदींसह विकासक उपस्थित होते.

०००

निलेश तायडे/विसंअ

राजकारणात कार्य करताना विविध विषय, पक्षाची भूमिका आणि विधिमंडळातील आयुधांविषयी जाणून घ्या – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे,दि.७:- राजकारणात येणाऱ्या महिलांची संख्या वाढत असतांना या क्षेत्रात काम करताना महिलांनी विविध विषयांचा अभ्यास, पक्षाची भूमिका आणि विधिमंडळातील आयुधांविषयी जाणून घेणे गरजेचे आहे,  असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महिला दिनाच्या औचित्याने नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात आयोजित ‘महिलांचे राजकीय सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. चर्चासत्रास प्रा. उल्हास बापट, आयएलएस विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा पातूरकर, प्रा. बिंदू रोनाल्ड, ॲड. विजयालक्ष्मी खोपडे, नवलमल विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीता आढाव, ॲड. अशोक पाळंदे उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राजकारणात महिलांचा सहभाग वाढतो आहे. आज केवळ ८ टक्के महिला राजकारणात सक्रीय आहेत. नव्या विधेयकानुसार महिलांचे राजकारणातील प्रमाण वाढणार आहे, त्याला काही कालावधी लागेल. राजकारणात स्वत:ला सिद्ध करतांना महिलांना राजकीय क्षेत्रात सक्रीय होऊन राजकीय विचार मांडावे लागतील. राजकीय क्षेत्रातील महिलांनी विविध अहवालांचा, विचारांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यासासोबत पक्षाची भूमिका ठासून मांडण्याची कला अवगत असावी. विधिमंडळात उपयोगात येणाऱ्या आयुधांचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. योग्य आयुधांचा अचूक वेळेला उपयोग करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

समाजात कुटुंबियांच्या मतानुसार मतदान करणारी स्त्री आता स्वत:चा निर्णय घेऊ लागली आहे. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने ही सकारात्मक बाब आहे. निवडणूक प्रक्रियेत वेगवेगळ्या स्तरावर महिलांचा सहभाग असतो. महिला उमेदवार, महिला अधिकारी, माध्यमांतील महिला अशा विविध स्तरांवर महिला आपली भूमिका बजावत असतात. लोकशाहीत महिला मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महिला मतदारांनी  अधिकारांबाबत जागरूक रहात  आपल्या आकांक्षापूर्ततेसाठी जागरूक राहून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राजकीय क्षेत्रात वावरतांना महिला लोकप्रतिनिधींना अनेक आव्हानांना सामारे जावे लागते, त्यांना संघर्षाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत महिलांनी धैर्याने काम करावे. लोकशाहीत आपली भूमिका इतरांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. यासाठी माध्यमे महत्त्वाचे कार्य करत असल्याने महिलांनी माध्यमातून आपली भूमिका ठामपणे मांडणे गरजेचे आहे. माध्यमाद्वारे जनतेशी जोडले न गेल्यास राजकारणात मागे राहण्याची शक्यता असते.

पक्षासोबत विविध क्षेत्रातील संस्था, संघटना, प्रतिनिधी यांच्याशी सातत्याने होणारा संवाद उपयुक्त ठरतो. जनता आपली मार्गदर्शक आहे हे लक्षात घेऊन काम केले तर राजकीय क्षेत्रात चांगला प्रभाव पाडता येतो. विधानसभेतील महिलांची भूमिका बघत असताना तिथे तुम्ही महिला म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते, असेही डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.

यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी व मतदानाविषयी जागरुकता दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विधी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

000

उल्हासनगरची अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय

मुंबई, दि. ७: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावातील नागरिकांना २०१७ च्या दरानुसार कर भरण्यासंदर्भात दिलासा देतानाच १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे जाहीर करतानाच संत सावळाराम स्मारकासाठी जागा देण्याची कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबईतील १४ गावे यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, डॉ. बालाजी कल्याणकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

या बैठकीत २७ गावे, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पुनर्विकास, १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश, उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करणे, संत सावळाराम स्मारकासाठी जागा आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमध्ये मालमत्ता कराचा विषय प्रलंबित होता. त्यावर मार्ग काढत २०१७ च्या दराप्रमाणे आता कराची आकारणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या गावातील जी अनधिकृत बांधकामे आहेत ती संरक्षीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नवी मुंबई महापालिका हद्दीत १४ गावांचा समावेश करण्याची भूमिपुत्रांची मागणी मान्य केली असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. आता या गावांमध्ये नवी मुंबई महापालिकेप्रमाणे विकास कामे होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याबाबतचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वास्तूविशारद संघटनेची देखील यावेळी बैठक घेण्यात आली. त्यानुसार ठाण्याच्या धर्तीवर इमारतींच्या उंचीबाबतचा नियम कल्याण – डोंबिवली हद्दीत देखील लागू करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टेकडीवर संत सावळराम स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय झाला असून त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

०००

मनरेगाच्या माध्यमातून नागरिकांची समृद्धीकडे वाटचाल – राज्यपाल रमेश बैस

पालघर दि :  आदिवासी भागात ‘प्रत्येक हाताला काम’ देण्याची आवश्यकता आहे. काम करताना सिंचनाची सोय म्हणजेच ‘प्रत्येक शेताला पाणी’ उपलब्ध करून दिले, तर मनरेगामार्फत अधिक चांगले काम होऊ शकते. अनेक गावांत मनरेगाअंतर्गत विविध कामे होत आहेत. मनरेगाच्या माध्यमातून नागरिकांची समृद्धीकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. विक्रमगड तालुक्यातील विकसित गाव खोमारपाडा येथील विकासकामांच्या पाहणीवेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, मनरेगाचे संचालक नंदकुमार,जिल्हाधिकारी गोविंद बोडके पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे तसेच वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, मिशन मनरेगाचे संचालक नंदकुमार यांनी मला सांगितले होते की मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब समृद्ध होऊन करोडपती होऊ शकते.सुरुवातीला माझा विश्वास बसला नाही. पण खोलवर विचार केल्यावर असे लक्षात आले की एकदा सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था केली की ते पाणी शास्त्रोक्त पद्धतीने वापरणे शक्य आहे. अशा प्रकारे गावाचा विकास होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व गावे विकसित झाली तरच ‘विकसित भारत’ होईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे, जी देशातील सर्व गावे व्यापत आहे.

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विकास योजना अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत का पोहोचत नाहीत हे प्रथमच समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जिल्हास्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रेरित करण्यात विकास भारत संकल्प यात्रा यशस्वी होत असून विविध योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले.

गेल्या 10 वर्षात भारत सरकारने शेतकरी सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे,  त्यांना तंत्रज्ञानानुकूल बनवणे, कृषी संशोधन आणि शिक्षणाला चालना देणे आणि शेतीशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करणे इत्यादी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. तंत्रज्ञानापासून पीक विम्यापर्यंत, आधुनिक सिंचन पद्धतींपर्यंत सहज कर्ज उपलब्ध करून देणे, सरकार शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक कृती योजना राबवत आहे. प्रत्येक कुटुंबाला करोडपती बनवण्याची कल्पना अशक्य वाटली. पण खोमारपाडा सारख्या अत्यंत दुर्गम, मागास आणि आदिवासी भागात हे शक्य झाले असेल तर ते कुठेही नक्कीच शक्य होऊ शकते माझ्या माहितीनुसार, देशातील हे पहिले गाव असेल जिथे मनरेगाचा वैयक्तिक लाभ घेऊन बहुतेक नागरिक समृद्धीकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे आता आदर्श उदाहरण म्हणून खोमारपाडा गाव पुढे येत असल्याचे राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले.

प्रत्येक हाताला काम, प्रत्येक शेतात पाणी, प्रत्येक जलस्रोतासाठी सौर पंप, प्रत्येक शेतात ठिबक सिंचन या चार सूत्रांची अंमलबजावणी केल्यास आदिवासी भागातही शेतीचे उत्पन्न केवळ ‘दुप्पट’ नाही तर ‘तिप्पट’ही करणे शक्य आहे.आदिवासी भागात कुपोषण ही मोठी समस्या आहे. महाराष्ट्रातून आणि भारतातून कुपोषणाचे उच्चाटन केले पाहिजे. आजूबाजूच्या सर्व गावांचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. लोकांच्या स्थलांतराच्या कारणांचा अभ्यास करून धोरण आखून समस्या सोडवून स्थानिक भागात रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यघटनेने अनुसूचित क्षेत्राच्या विकासाची विशेष जबाबदारी राज्यपालांवर टाकली असल्याचे राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले.

०००

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...