गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 707

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाने २ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात माविम अंतर्गत १० हजार ५०० गावात लाख ६५ हजार बचत गटांमार्फत २० लाख महिला जोडल्या

कोल्हापूर जिल्ह्यासाठी हजार ५० कोटी रूपयांच्या विविध विकास कामांची घोषणा

कोल्हापूर, दि. ८ : राज्यात माविम अंतर्गत १० हजार ५०० गावात, २९५ शहरात एकूण १ लाख ६५ हजार बचत गटांमार्फत २० लाख महिला जोडल्या असून राज्य शासनाने सुरू केलेले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान २ कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांतीकारी बदल घडवणारे अभियान ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कोरोची (ता. हातकणंगले) येथील महिला मेळाव्यात ते बोलत होते.  सुमारे ३५ हजारांहून अधिक महिला या मेळाव्यास उपस्थित होत्या. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील (यड्रावकर),  माजी आमदार सुरेश हाळवणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे,  कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह ६०० महिला सरपंच व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराणी छत्रपती ताराबाई यांनी आपल्या अतुलनीय शौर्यातून माताभगिनींचे रक्षण केले. जनसेवेत आदर्श निर्माण करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपला ठसा उमटवला तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आपण त्यांचेच वारसदार आहोत याचा सार्थ अभिमान आहे. आता सर्वच क्षेत्रात महिला भक्कमपणे उभ्या आहेत. आता शासनाने महिला धोरणही जाहीर केले आहे. राज्यातील महिला अधिक सक्षम होत असून महिला बचतगट १०० टक्के कर्जांची परतफेड करणाऱ्या महिलांचा गट आहे. म्हणूनच महिला बचत गटांचे खेळते भांडवल दुप्पट केले. सीआरपींचे मानधनही दुप्प्पट केले. अंगणवाडी व मदतनीसांची रिक्त पदे भरली जात आहेत. त्यांच्या मानधन वाढीसह अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला जात आहे. आशा सेविकांना शासन निराश करणार नसून त्यांना लवकरच न्याय मिळेल. महिला व बालविकास विभागाला ३ हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याचे सांगून महिलांसाठी एसटी प्रवासासाठी ५० टक्के सूट देणारे आपले पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला धोरणातून महिलांना प्रशासकीय व अर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला शेतकरी, शेतमजूर, उत्पादक संस्थांची स्थापना करून उत्पादक ते ग्राहक अशी एक मूल्य साखळी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाला महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी उत्पादन, ब्रँडींग, विक्रीसाठी मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी देऊन महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व पीडीतांसाठी समुपदेशन करण्याबाबत निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 4 कोटी महिलांच्या सर्व आरोग्य तपासण्या केल्या. महिलांना समानतेच्या वाटेवर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनातून महिलांना सक्षम केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून 35 टक्के अनुदानाच्या योजनेतून जास्तीत महिलांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांना 50 टक्के बसमधे सवलत, आनंदाचा शिधा, लेक लाडकी योजना, येत असलेली मोफत शिक्षणाची योजना यातून शासन महिलांसाठी चांगले कार्य करीत असल्याचे सांगितले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिलांमधे संघर्षाचे संस्कार केले. त्यातूनच अन्यायाविरूद्ध एक वचक निर्माण झाली. आता महाराष्ट्रात महिला सुरक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,  मागील काही वर्षांपासून महिलांच्या राहणीमानात बदल झाला असून आता त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करीत आहेत. पाश्चिमात्य देशाप्रमाणे भारतीय महिलाही कुठे कमी नाहीत. भारताला महासत्ता बनविण्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री तसेच राज्यात मुख्यमंत्री यांनी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या असल्याचे सांगितले.

खासदार धैर्यशील माने यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात कोल्हापूर जिल्हयातील महिलांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी हजार ५० कोटी रूपयांच्या विविध विकास कामांची घोषणा

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पंचगंगा पूर नियंत्रणासाठी 3200 कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यातील निधीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी 750 कोटी रूपयांचा प्रकल्प आराखडा सादर झाल्याचे त्यांनी सांगितले. नगरोत्थानमधून इचलकरंजी शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रूपये देण्याची घोषणा त्यांनी केली. इचलकरंजी मधील साध्या यंत्रमागांसाठी 1 रूपया व ऑटोलूमसाठी 75 पैसे वीजबिलात सूट देण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी घोषित केला. तर कोल्हापूरमधील शेतकऱ्यांसाठी केलेल्या 200 पट पाणीपट्टीच्या वाढीला त्यांनी स्थगिती दिली. कोल्हापूर खंडपीठही लवकरच सुरू करणार असून त्यासाठी उच्चस्तरावर बोलणी सुरू असल्याचे सांगितले. मागणी केल्यानुसार कोल्हापूरमधील उर्वरीत एसटी वाहतूकीतही महिलांसाठी 50 टक्के सवलतीची घोषणा त्यांनी केली. कार्यक्रमात हातकणंगले येथे जाहिर झालेल्या एमआयडीसीचा परवाना मुख्यमंत्री श्री. शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंज यांनी खासदार धैर्यशील माने यांचेकडे सुपूर्द केला. अशा प्रकारे कोल्हापूर मधील 4050 कोटी रूपयांच्या विकास कामांची घोषणा त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे हस्ते विविध महिला लाभार्थींना साहित्याचे व अनुदानाचे वाटप करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण पार पडले.

राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन व महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

१५ कोटी रूपयांच्या विकास कामांचे महिला मेळाव्यात ई-लोकार्पण

कोल्हापूर जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी (MH-51) या कार्यालयाचा ई- शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. तसेच एकूण 13.50 कोटी रूपयांच्या इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे ई -उद्घाटन झाले. एकूण रू. 1.44 कोटी किंमतीच्या जिल्ह्यातील महसूल विभागातील उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांना 14 वाहनांचे वाटप करण्यात आले. तसेच श्री. भैरवनाथ शिक्षण व सेवाभावी संस्था संचालित येथील नवीन इमारत व मोफत उपचार योजनेचे ई- उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

०००

केंद्र आणि राज्य शासनाद्वारे महिला विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित बनविण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी देशातील ५० टक्के महिलांना मानव संसाधन क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचा संदेश दिला आहे. याच दिशेने केंद्र आणि राज्य सरकार महिला विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जुना सुभेदार लेआऊट परिसरातील नागपूर महापालिकेच्या दुर्गानगर हायस्कुलमध्ये आरबीएल बँकेच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विद्यार्थीनींना सायकल आणि स्कूल किटचे वितरण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, आरबीएल बँकेच्या सीएसआयआर फंड विभागाचे प्रमुख बालीकृष्ण नटराजन आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे समाजातील शक्तिस्वरूप घटकासाठी संकल्पबद्ध होण्याचा शुभ दिन होय. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी विविध क्षेत्रात महिलांच्या सहभागावर भर दिला आहे. तसेच, महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शासनासोबतच खाजगी क्षेत्रानेही या कामात आघाडी घेतली आहे. आरबीएल बँकेने मनपाच्या समन्वयाने व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल व स्कूल किट देण्याचा सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाद्वारे मुलींना शाळेत येण्यासाठी अडचण दूर होऊन त्यांचा मार्ग सुकर होणार असल्याचा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

बालीकृष्ण नटराजन यांनी प्रास्ताविक केले तर साधना सयाम यांनी आभार मानले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते रेहमाली फातिमा, अश्मल सतफ, आरोही चिपेल आणि माही बोडगे या विद्यार्थीनींना प्रातिनिधीकरित्या सायकल व स्कूल किटचे वितरण करण्यात आले.

०००

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलची नवीन इमारत उभारण्यास सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गोरगरीबांच्या सेवेचा दिलेला संदेश शिरोधार्य मानत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल गेल्या 50 वर्षापासून सेवारत आहे. अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. या हॉस्पिटलची 250 बेड क्षमतेची प्रस्तावित नवीन इमारत उभारण्यास शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

कॅन्सर रिलिफ सोसायटी संचलित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ‘स्वर्गीय श्रीमती मीनाताई सिताराम जवादे’ यांच्या स्मृती प्रित्यर्थ उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते 10 बेडच्या मॉड्यूलर अतिदक्षता विभागाचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ.कांचन वानरे, कॅन्सर रिलिफ सोसायटीचे सचिव डॉ. अनिल मालवीय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कॅन्सरचा उपचार बराच काळ चालतो व तो खर्चिक असतो. तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. गेल्या 50 वर्षांपासून रुग्ण सेवेचा हा प्रवास गौरवास्पद आहे. याठिकाणी अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्ण सेवेचे हे व्रत अधिक सक्षमरित्या पार पाडता येणार आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता या हॉस्पिटलची 250 बेड क्षमतेची नवीन इमारत उभारण्याचे प्रस्तावित आहे. या कामासही सुरुवात झाली आहे. नवीन इमारतीची स्थिती बघून जिल्हाधिकारी यांनी रोड मॅप तयार करावा, अशी सूचना करत ही इमारत उभारण्यास राज्य, केंद्र सरकारच्या योजना व उपक्रमाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. डॉ. अनिल मालवीय यांनी  स्वागतपर भाषण केले.

तत्पूर्वी श्री. फडणवीस यांनी अतिदक्षता विभागाची पाहणी केली. अँटीमायक्रोबियल वॉल, सेंट्रलाइज मेडिकल गॅस पाईप लाईन, एअर फिल्टरिंग अँड कुलिंग सिस्टीम, बेडेड पॅनल आदी सुविधांनी हा अतिदक्षता विभाग सज्ज झाला आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून (सिएसआयआर फंड) आणि राहुल सिताराम जवादे यांच्या सहकार्यातून स्व. श्रीमती मीनाताई सिताराम जवादे यांच्या नावाने हा 10 बेडचा अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे.

०००

चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ८: यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्राने राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवे बळ दिले आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे. महिलांचे आरोग्य, महिलांना पोषक आहार, महिलांचे शिक्षण व कौशल्यवृद्धी, महिलांची सुरक्षा, महिलांसाठी रोजगारनिर्मिती, निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग, महिला खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग वाढविण्यासारख्या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी केली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचे स्वागत केले असून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर केल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, त्यानंतर महिला व बाल विकासमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वेगळी समिती, जिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. या समित्यांच्या संपर्क, संवाद, समन्वयातून महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी प्रभावी होईल, महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे.

राज्याच्या चौथ्या महिला धोरणामुळे महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी, शासन-प्रशासनात योग्य स्थान, अर्थसंकल्पात योग्य तरतूद, रोजगार-स्वयंरोजगारात समान संधी, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, संपत्तीत समान वाटा, उद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन व बाजारपेठ, आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे.  निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांनीही मातृत्व आणि पितृत्व रजा द्यावी, असा प्रस्ताव आहे. सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस धोरणात करण्यात आली आहे. राज्याचे चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची आगळीवेगळी भेट असून ही भेट कायम स्मरणात राहिल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे.

०००

शेतकऱ्यांना त्रास होईल असा प्रकल्प  जिल्ह्यात येणार नाही – पालकमंत्री उदय सामंत 

रायगड जिमाका दि 7–रायगड जिल्ह्याचा औद्योगिक दृष्टीने तसेच सर्वांगीण विकास करतांना शेतकऱ्यांना त्रास होईल असा कुठलाही प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार नाही, असे आश्वासन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
पनवेल औद्योगिक वसाहत येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत पायाभूत सुविधा विकास योजनेंतर्गत रस्ते, गटारे, ड्रेनेज आणि पाणी पुरवठा व्यवस्था या सुविधांच्या विकास कामाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर खा. श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, पनवेल वसाहतीचे चेअरमन विजय लोखंडे, उपाध्यक्ष सुषमा पुरोहित यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री सामंत म्हणाले  महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणीत उद्योजकांचा महत्वाचा वाटा आहे. राज्यात गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून यावर्षी 1 लाख कोटींची स्थानिक गुंतवणूक  झाली आहे. राज्य शासनाने उद्योजकांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे.  त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाने अलीकडे केलेल्या कायद्याचा उद्योजकांना निश्चित फायदा होईल. माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
पनवेल ची ही सर्वाधिक जुनी औद्योगिक वसाहत आहे. येथील सोयी सुविधासाठी, विकास कामांसाठी 15 कोटी मंजूर केले आहेत. या वसाहतीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच  बैठक घेण्यात येईल असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आ प्रशांत ठाकूर यांनी या परिसरातील प्रश्न मांडले. पनवेल वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी प्रास्तविक केले.

मनोरंजन विश्वाच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ७ : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसमोर काही आव्हाने असली तरी मनोरंजन विश्वाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. मुंबईतील चित्रनगरीचे मेकओव्हर राज्य शासन करणार आहे, जगाला हेवा वाटेल अशी चित्रनगरी आपण करू. चित्रपट ही मोठी इंडस्ट्री आहे, महाराष्ट्रातील कलाकार संस्कृती पुढे नेण्याचं काम करीत असल्याने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने ‘मटा सन्मान २०२४’ पुरस्कार प्रदान सोहळा विले पार्ले येथील मुकेश पटेल सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र टाइम्सचे समूह संपादक पराग करंदीकर यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मटा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांना, वसुंधरा साथी सन्मान पुरस्कार बीजमाता राहीबाई पोपेरे यांना आणि युथ आयकॉन सन्मान शास्त्रीय गायक महेश काळे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र टाइम्स सतत २४ वर्षे उत्कृष्ट कलाकृतींचा आणि गुणवंत कलावंतांचा गौरव करत आहे. ही अभिनंदनीय गोष्ट आहे. पत्रकारितेमध्ये ६-७ दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या मटाने मराठी वाचकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. विविध उपक्रमातून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीत म.टा. ने महत्त्वाचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

या सोहळ्यात सुमनताईंना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचे भाग्य आम्हा दोघांना लाभले, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सुमनताईंच्या आवाजात आपण अनेक सुमधुर गाणी ऐकली. त्यांची गाणी आणखी हजारे वर्षे अशीच ताजीतवानी वाटणार आहेत. तसेच तरुण पिढीपर्यंत भारतीय शास्त्रीय संगीत पोहोचवण्यात महेश काळे यांचे मोठे योगदान आहे.       केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही ते शास्त्रीय संगीताचा प्रसार करून खऱ्या अर्थाने  कला संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे दूत बनले आहेत, अशा शब्दात त्यांनी महेश काळे यांचा गौरव केला.

ते म्हणाले, राहीबाई पोपेरे यांना ‘वसुंधरा साथी सन्मान’ दिला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे दिला जातो. पर्यावरण जागृतीसाठी व्यासपीठ म.टा.ने उपलब्ध करून दिले. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई यांचं कर्तृत्व मोठं आहे. त्यांनी हायब्रिडविरुद्ध लढा उभारला आणि देशी बियाण्यांचा प्रसार केला. कोणतीही शैक्षणिक पदवी नसली तरी त्या सगळ्यांना डिग्री देणाऱ्या ठरल्या आहात, अशा शब्दात त्यांनी राहीबाईंचे कौतुक केले.

राहीबाई यांनी विषमुक्त शेतीसाठी जे काम सुरू केले आहे त्यासाठी शासन त्यांच्याबरोबर आहे. राज्य सरकारने १२१ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. १५ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

विष मुक्त शेती अभियान राज्यात सुरु सुरांच्या दोन पिढ्यांचा आज सन्मान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मटा सन्मान पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित झालो ही भावना मनामध्ये आहे. बीजमाता राहीबाई यांचे काम ही सर्वात मोठी सेवा आहे. आपण सध्या जल वायू प्रदूषणामुळे आरोग्य विषयक प्रश्नांना सामोरे जात आहोत. कॅन्सर रुग्ण वाढत आहेत. विषयुक्त अन्न हे याचे मूळ कारण आहे. ते दूर करण्यासाठी राहीबाई प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जनजागृतीचे काम त्या करत आहेत.

राज्य शासनाने विषमुक्त शेती मिशन सुरू केले आहे. राज्यातील २५ लाख हेक्टर शेती विषमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य आपण ठेवले आहे. यासाठी काम सुरू झाले असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

आजच्या मटा सन्मान सोहळ्यात सुरांच्या दोन पिढ्यांचा सन्मान आज केला  गेला आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सुमनताई यांची गाणी अजरामर आहेत. त्यांनी १३ विविध भाषेत गाणी गायली. देवघरात तेवणारा दिवा त्याप्रमाणे सुमनताईंचे गाणे असल्याचे ते म्हणाले. महेश काळे यांनी अभिजात संगीताच्या माध्यमातून  नवीन पिढीला शास्त्रीय संगीताचे वेड लावले. जगातील वेगवेगळ्या देशात हे संगीत नेले, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

यावेळी पुरस्कारार्थीनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सुमन कल्याणपूर यांनी कृतार्थतेची भावना व्यक्त केली. गेली सत्तर दशके गायन करताना प्रत्येक वेळी रसिकांचे प्रेम मिळाले. राहीबाई यांनीही आपण निसर्गाच्या शाळेत शिकलो आणि विषमुक्त अन्नासाठी आपण काम करत आहोत. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तर, महेश काळे यांनी, अभिजात संगीत जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशात नेऊन त्याच्या प्रसाराचे काम करण्यास या पुरस्काराने आणखी बळ मिळेल, असे सांगितले.

यावेळी नाट्य चित्र क्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

०००

दीपक चव्हाण/विसंअ

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवीत असते. सध्या महामंडळ रिसॉर्ट्स, उपहारगृह, जल पर्यटन, अजिंठा व वेरूळ अभ्यागत केंद्र, कलाग्राम,जबाबदार पर्यटन (Responsible Tourism) समुदाय आधारित पर्यटन (Community Based Tourism) हे यशस्वीरित्या राबवीत आहे.

पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण अंतर्गत महिलांसाठी विविध उपक्रम पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महामंडळ राबवीत आहे. एमटीडीसी हे भारतातील एकमेव पर्यटन महामंडळ आहे की जे ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण प्रथम अंमलात आणुन महिलांचे पर्यटनात योगदान वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे.

‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणांतर्गत महिलांसाठी महामंडळामार्फत पोषक वातावरण पर्यटन सचिव, जयश्री भोज व  व्यवस्थापकीय संचालक, मपविम, श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आखले जात आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी येणाऱ्या जगभरातील महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एमटीडीसीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

‘आई’ धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवस 50% सूट देण्यात आली होती, या कालावधीत महिला पर्यटकानी प्रचंड प्रतिसाद देत 1500 हून अधिक महिला पर्यटकांनी भेट दिली आहे, तसेच 8 मार्च रोजी सुट्टी तसेच लॉंग वीकेंड असल्या कारणाने अधिक 200-300 पर्यटकांनी भेट देण्याची शक्यता आहे, असे मत एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

या धोरणांतर्गत महामंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे व महामंडळास भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. महामंडळाद्वारे 3 पर्यटक निवास संपूर्णपणे महिला संचलीत  आहेत. महामंडळाद्वारे नागपूर, छत्रपती संभाजी नगर व खारघर, नवी मुंबई येथील पर्यटक निवास, उपहारगृहे आणि कार्यालयीन कर्मचारी हे सर्व महिलांद्वारे संचलीत करण्यात आले आहे. या ठिकाणी रिसॉर्ट मॅनेजर पासून ते हाऊस किपींग, फ्रंट ऑफीस, फुड ॲन्ड बेवरीजेस, लेखा सहाय्यक, शिपाई, मदतनीस, चौकीदार, टॅक्सी चालक इ. सर्व अर्हता प्राप्त महिला असुन संपूर्णपणे महिला संचलीत करण्यात आले आहे. यानुषंगाने 40 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

पर्यटक निवसांमध्ये महिलांसाठी 50% इतकी सूट

‘आई’ धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवस, आणि 1 ते 6 जून 2024, 1 ते 5 ऑगस्ट 2024 व 1 ते 5 ऑक्टोबर 2024 असे वर्षातील इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस महिलांकरिता महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50% इतकी सूट देण्यात आली आहे.

एक दिवसीय सहल, शहरी सहल आयोजन, साहसी सहल आणि ट्रेकिंग टूर इ. चे आयोजन

याअंतर्गत हेरीटेज वॅाक, अनुभवात्मक पर्यटन (Experiential Tourism), शैक्षणिक सहल, 1 व 2 दिवसीय टुर्ससाठी महिलांना पर्यटक मार्गदर्शक (Tour guide) म्हणून मपविमद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचप्रमाणे जल पर्यटनासाठी महिला प्रशिक्षक देखील उपलब्ध आहे. पर्यटनाच्या क्षेत्रात सर्व टुर्स हे प्रशिक्षित महिलांमार्फत राबवित आहे. या टुर्समध्ये क्युरेर्टस, गाईड महिला असणार आहे.एमटीडीसी मालमत्तेच्या ठिकाणी महिला बचत गटांना विविध स्टॉल्ससाठी जागा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य आहे.विशेष खेळ व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन पाच वर्षांपर्यंतची मुले असलेल्या महिला पर्यटकांसाठी पाळणाघर, या आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सर्व उपक्रम महिलांना पर्वणी ठरतील. या उपक्रमामुळे एकट्या महिला प्रवासी (solo women traveller) व महिला ग्रुप टूर यांना पर्यटनासाठी वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नोंदवला जाईल आणि महिला पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.महिलांना त्यानुषंगाने महिला चालवत असलेले उपक्रम, महिला पर्यटक व महिला उद्योजक असा सर्वांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

पायाभूत विकासासह महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ७:  शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, सिंचन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आदी प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वास व्यक्त करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत २०४७’ साठी जो  रोडमॅप तयार केला आहे, त्यामध्ये महाराष्ट्र निश्चितच आपले योगदान देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित ‘महाराष्ट्राच्या विकासवाटा’ या दै. लोकसत्ताच्या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरिश कुबेर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यपस्थाकिय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राची विकास वाट कायम प्रकाशमान आणि तेजस्वीच राहील, असा विश्वास आहे. उद्याच्या समृद्ध महाराष्ट्राची चर्चा त्याचेच प्रतिक आहे. विकासाचा वेध घेतला जातोय. त्यामुळेच लोकसत्तेने ‘महाराष्ट्राच्या विकासवाटा’ सारखं कॉ़फीटेबल बुक लोकांसमोर ठेवलंय. खऱ्या अर्थाने हे कॉफी टेबल बुक आमच्या सरकारच्या कामगिरीचं प्रगती पुस्तक आहे.

विकास वाटेचे रुपांतर महामार्गात होण्यास सुरवात 

राज्यात सुरु असलेल्या विकास कामांची व्याप्ती ही वाढत असून अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड यांसारखे प्रकल्प हे गेमचेंजर आहेत. समृद्धी महामार्गालगत विविध नोड विकसित करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळे राज्याचा विकासरथ चौफेर घौडदौड करतोय. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचा  प्रधानमंत्री यांचा निर्धार असून महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे १ ट्रिलियन डॉलर्सचा वाटा महाराष्ट्र निश्चितच पूर्ण करेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निती आयोगानेही हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एमएमआर रिजनवर लक्ष केंद्रीत केलं आहे. २०३० पर्यंत एमएमआर रिजनचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्स करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे. त्यांनी एक ब्लू-प्रिंट तयार केली असून त्यात कृषी, अर्थ, राजकीय, सामाजिक, महिला अशा अनेक घटकांचा यात विचार केला गेला आहे. महाराष्ट्राची भौगोलिक रचना, शेती-माती-सिंचन आणि पिक पद्धतीचा विचार करून त्यानुसार रोडमॅप तयार केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात असेलली क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादनं, पिकं, औद्योगिक विकास याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्याच्या विकासाला नवी दिशा आणि चालना  त्यातून मिळणार आहे.

गतिमान वाहतूकीला प्राधान्य

मुंबईतून नवी मुंबई, तिसरी मुंबई आणि आता राज्य महामुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. एमएमआरमध्ये रस्ते, मेट्रो, रिंग रोड आणि सागरी सेतूंचे जाळे तयार करण्यात येत आहे. येत्या तीन-चार वर्षांत एमएमआरमधील जवळपास २०० किमी लांबीची मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल. त्यामुळे रस्त्यावरील ५० ते ६० लाख वाहने कमी होतील आणि लोक मेट्रोतून आरामदायी प्रवास करतील. कालच कल्याण – तळोजा या मेट्रोचे भूमिपूजन झाले असून लवकरच मेट्रो तीन सुरू होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरणावर भर दिला जात आहे. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरीपर्यंतचा आणखी एक टप्पा खुला झाला असून, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लींकही खुली करण्यात येणार आहे, बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पाही लवकरच सुरू होत आहे. कल्याण – डोंबिवली, भिवंडी येथील वाहतूक कोंडी दूर करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, केंद्र सरकारचा राज्याला भक्कम पाठिंबा मिळत आहे. आज राज्यात १ लाख कोटींपेक्षा जास्त रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. अमृत रेल्वे स्थानक योजनेत राज्यातील ४४ तर मुंबईतील १४ स्टेशन्स आहेत.  सात वंदे भारत ट्रेन्स महाराष्ट्राला मिळाल्यात. रेल्वेचे बळकटीकरणही वेगात सुरू आहे. या सर्व प्रकल्पांचा फायदा या राज्यातील जनतेला होणार आहे. एअर, रेल्वे, वॉटर, रोड अशा चौफेर कनेक्टिव्हिटीवर भर दिल्या जात आहे.

एमएमआर हे नवे ग्रोथ इंजिन ठरणार

आजवर मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन समजलं जायचं. पण आता  एमएमआर हे नवं ग्रोथ इंजिन ठरणार आहे. नागपूर – गोवा शक्तीपीठ, ग्रीनफिल्ड आदी  महामार्गाचं काम सुरू होत असून ५ हजार किमी लांबीचे अॅक्सेस कंट्रोल रस्ते बांधले जाणार आहेत. विरार अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरचे काम ही केल्या जाणार असून मुंबई दिल्ली फ्रेट कॉरिडोर सुरू झालाय. बुलेट ट्रेनच्या मार्गातले अडथळेही दूर झाले असून नवी मुंबईचं एअरपोर्ट ही लवकरच सुरू होणार असल्याचे सांगून  मुख्यंमंत्री म्हणाले, विकासाकामात पर्यारणपूरक कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. अटल सेतूचे काम करताना खूप दक्षता घेतली, फ्लेमिंगो संख्या कमी होऊ नये म्हणून विविध तंत्रज्ञानाचा वापर केला.

उद्योगवृद्धीवर भर

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम आणि ठणठणीत असून महाराष्ट्रात अनेक उद्योजक गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. विदेशातील महाराष्ट्र मंडळांनी सुद्धा यासाठी चांगला पुढाकार घेतला आहे. दोन वर्षात दावोसमध्ये पाच लाख कोटींचे गुंतवणूक करार केले आहेत. गेल्या वर्षभरात आपल्या राज्याचं ग्रॉस स्टेट डोमेस्टीक प्रॉडक्च (स्थूल उत्पन्न) दहा टक्क्यांनी वाढलं आहे. राज्याचे जीएसटी कर संकलन देशात पहिल्या क्रमांकाचे आहे. पोलाद, आयटी, ग्रीन एनर्जी, कृषी, लॉजिस्टिक, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात मोठी गुंतवणूक महाराष्ट्राने आकर्षित केली आहे.  ग्रीन हायड्रोजनचा प्रकल्प उभारणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. 2 लाख कोटींची गुंतवणूक होत आहे, त्यातून जवळपास दोन लाख रोजगार निर्माण होणार असून संलग्न सेवांच्या माध्यमातून आणखी काही लाख लोकांच्या हाताला काम मिळणार आहे.

विविध क्षेत्रात राज्याची आघाडी

स्वच्छतेत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्याच आठवड्याच डीपीआयआयटीने अहवाल प्रसिद्ध केला असून महाराष्ट्रात १ लाख कोटींपेक्षा जास्त एफडीआय आल्याचे त्यातून स्पष्ट होते. एफडीआयमध्येही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

शेतकऱ्यांचे आयुष्य सुखी आणि आनंदी करण्यासाठी सरकार झटत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून राज्यातील ८८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आजवर ३५ हजार कोटींचे वाटप केलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात ३८ हजार रुपये टप्याटप्याने जमा केले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५ हजार कोटींची मदत दिली आहे.  एक रुपयांतील पिक विम्यामुळे ३ हजार ४९ कोटींची भरपाई मिळाली आहे. १२१ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे. १५ लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली येईल. ‘शासन आपल्या दारी’ योजनेतून ३ कोटी ८० लाख लोकांना थेट लाभ दिला आहे. नमो महारोजगार मेळावे, मुख्यमंत्री नारी शक्ती असे जनसामान्यांच्या आयुष्यात थेट बदल घडवणाऱ्या योजना शासन राबवत असून त्यातून राज्यात चांगले परिवर्तन होत आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्डमध्ये झाली आहे.

आरोग्य क्षेत्रातही भरीव काम सरकार करत आहे. दीड लाखांच्या आरोग्य विम्याची मर्यादा ५ लाख केली. अटी शर्ती काढून टाकल्या असून साडेबारा कोटी जनतेला त्याचा लाभ मिळणार आहे.  मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून १८० कोटींपेक्षा अधिक निधी गरजू रुग्णांना वाटप केले आहे. शेती असो किंवा उद्योग, पायाभूत सुविधा असो की सिंचनाचे प्रकल्प, महिला सक्षमीकरण असो किंवा आरोग्य व्यवस्था, शिक्षण असो किंवा पर्यटन प्रत्येक क्षेत्रात आपला महाराष्ट्र अग्रेसर होते,  आजही आहे आणि पुढेही राहील, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.

०००

वंदना थोरात/विसंअ

नवीन वाहनांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगलीदि. 7, (जि. मा. का.) : जिल्हा नियोजन समितीतून सांगली पोलीस दलाला एकूण नवीन २२ वाहने प्राप्त झाली आहेत. यामुळे पोलीस विभाग अधिक सक्षम होईल. या वाहनांमुळे कायद्या व सुव्यवस्था राखण्यास निश्चित मदत होईल. असा आशावाद पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्‍त केला.

        जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सांगली जिल्हा पोलीस दलास प्राप्त वाहनाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटीलआमदार अरुण लाडआमदार सुधीर गाडगीळआमदार सुमनताई पाटीलआमदार मानसिंगराव नाईकजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीपोलीस अधिक्षक संदीप घुगे,

         जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस दलासाठी एकूण 22 वाहने तर पोलीस महासंचालक कार्यालय यांच्याकडून 10 दुचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटीलसत्यजित देशमुख यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

वाघांच्या भूमीत संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे सौभाग्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण

चंद्रपूर, दि.7 : जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. अशा या वाघांच्या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘छावा’ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करणे, हे माझे सौभाग्य आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रियदर्शनी सभागृह येथे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील टपाल तिकिट, छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे, मराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड – 1, ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि महाराष्ट्र : गोंड समुदाय या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मंचावर नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, गॅझेटिअर विभागाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर, पुराभिलेख विभागाचे संचालक सुजित उगले, प्रा. अशोक जिवतोडे, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 12 महान व्यक्तिरेखा आणि 12 ऐतिहासिक प्रसंगावर आधारीत पोस्ट तिकिट काढण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आज मात्र चंद्रपूर या वाघाच्या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आहे. आपल्याला जेव्हा आयुष्य समजायला सुरुवात होते, त्या केवळ 32 वर्षाच्या वयात छत्रपती संभाजी महाराज 120 लढाया लढले आणि जिंकलेही. छत्रपती संभाजी महाराजांची विरता, पराक्रम आणि शौय शब्दबध्द करता येत नाही. जगात अनेक राजे होऊन गेले, त्या सर्वांनी आपले साम्राज्य वाढविण्यावर भर दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची ख-या अर्थाने रयतेचे राज्य चालविले. सुर्याच्या पोटी सुर्यच जन्मतो, त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी तत्वासाठी आपले जीवन समर्पित केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रमाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. संभाजी महाराजांवरचे टपाल तिकीट हा केवळ एक कागदाचा तुकडा नाही, तर आपला शक्तीशाली वारसा आहे.

 पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सुर्याची उर्जा देणारा स्त्रोत होय. आग्र्याच्या ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेथेच गत दोन वर्षांपासून राज्य शासनाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे नियोजन आहे.  4 मे ला वाघ नखं भारतात येत आहे. ही वाघनखं पाच ठिकाणी जाणार आहे. दिल्लीच्या जे.एन.यु. विद्यापीठात सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी विभागाचे संचालक विभीषण चवरे, गॅझेटिअर विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर यांचे विशेष कौतुक केले.

चंद्रपूर सतत प्रगतीच्या मार्गावर जात राहावा. राज्यातच नव्हे तर देशातील इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा अभ्यास करावा, या जिल्ह्याचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्र महान करायचे असेल ‘जय महाराष्ट्र’ आणि महाराष्ट्र श्रेष्ठ करायचा असेल चंद्रपूर मोठे करणे आवश्यक आहे, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

प्रास्ताविकात संचालक विभीषण चवरे म्हणाले, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. अनेक वर्षाचे काम केवळ दोन वर्षात करून सांस्कृतिक कार्य विभागाने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात एक वेगळा ठसा उमटविला आहे. पूर्वी वर्षात एखादा कार्यक्रम होत होता. आता विभागाच्या वतीने 400 च्या वर कार्यक्रम करण्यात आले आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविले असून महासंस्कृती महोत्सव, महानाट्य ‘जाणता राजा’ चे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. यावेळी पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.

अंध बांधवांसाठी ब्रेललिपीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा

आपल्या राज्यात नोंदणीकृत अंध असलेल्या नागरिकांची संख्या 5 लक्ष आहे. या लोकांपर्यंतसुध्दा शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास पोहचविण्यासाठी ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ पोहचिवण्याचा निर्णय घेतला. अंध बांधवांपर्यंत शिवाजी महाराज पोहचवू शकलो, याचा आनंद आहे. सर्व दिव्यांग शाळांमध्ये हा ग्रंथ पोहचविण्याचा सुचना विभागाला दिल्या आहेत.

महाराष्ट्र : गोंड समुदाय पुस्तकाचे विमोचन

गोंड समाजाच्या वीरतेचा इतिहास सर्वदूर पोहचविण्याच्या दृष्टीने प्रा. श्याम पोरेटे यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्र : गोंड समुदाय’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी आपल्या अर्थमंत्री पदाच्या काळात 200 एकर जागा उपलब्ध करून दिली. तसेच विद्यापीठासाठी 800 कोटी रुपये मंजूर केल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचे कॉफीटेबल बुक

पुराभिलेख विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे उपलब्ध असून ही पत्रे सामान्य जनेतपर्यंत पोहचावित, या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळपत्रांचे कॉफीटेबल बुक तयार करण्यात आले आहे. तसेच पुराभिलेख संचालनालयामध्ये उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांवर आधारीत मराठेकालीन टाकसाळी संबंधाची मोडी कागदपत्रे, खंड – 1 हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.

 विभागाच्या वतीने आतापर्यंत विविध टपाल तिकिटे प्रकाशित

सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने शहाजी महाराज, 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण, 6 जून रोजी राजभवन येथे शिवराज्याभिषेक तिकीटाचे अनावरण करण्यात आले असून केवळ 6 दिवसांत टपाल तिकीट काढण्याचा विक्रम देशात सर्वप्रथम झाला आहे. संत जगनाडे महाराज, बाबा आमटे, शहीद बाबुराव शेडमाके, अण्णाभाऊ साठे या महान व्यक्तिंवरसुध्दा टपाल तिकीट काढण्यात आले आहे.

000000

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...