गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 706

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उद्या नवी दिल्लीत ‘शिवजागर’ सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई दि. ८ :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त  सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नवी दिल्ली येथे ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात तब्बल २०० कलाकार आपल्या सादरीकरणातून छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास मांडणार आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम  होत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून विवेक व्यासपीठाने कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. या कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, सामूहिक नृत्य, पोवाडा व लोककला सादरीकरण, चित्रकला, रांगोळी, शिवकालीन साहसी क्रीडाप्रकारांचे सादरीकरण अशा विविध प्रकारचे कलात्मक सादरीकरणाचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोप पावत चाललेल्या अनेक लोककलांचे दर्शन ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या भागातून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा इतिहास ‘शिवपर्व’ या भागातून मांडला जाणार आहे.

या कार्यक्रमाबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा जागर देशाच्या राजधानीत होत आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शासनाने राज्यात, देशातच नव्हे तर जगभर विविध कार्यक्रम केले आहेत. या ‘शिवजागर’ कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक, पराक्रमी वारसा उपस्थितांना अनुभवता येणार आहे.

नवी दिल्ली येथील कार्यक्रमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास उलगडला जाणार असल्याने अधिकाधिक शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिन विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

०००

 

नागपूरच्या विकासासह दुर्बल घटकांनाही मुख्य प्रवाहात घेऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. ८: विकास कामात आघाडीवर असलेले महानगर म्हणून नागपुरकडे पाहिले जाते. भविष्यातील सर्व बाबींच्या गरजा लक्षात घेऊन  आपण पायाभूत सुविधांच्या विकासापासून नियोजन केले आहे. विकासाचा  हा टप्पा मेट्रोच्या जाळ्यापर्यंत आपण पुढे आणला आहे. या महानगरात काम करणाऱ्या कष्टकरी, दुर्बल घटकातील लोकांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटीबद्ध आहोत. मनपाच्या जागेवरील भाडेपट्टा पंजीबध्द झालेल्या झोपडीधारकांना पट्टे वाटप करुन आता स्वत:च्या घराचे त्यांचे स्वप्न साकार करुन दाखवू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राजे छत्रपती संभाजी चौक (नागोबा मंदिर चौक) आय.टी. पार्क, मेन रोड येथे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येथील सिमेंट काँक्रीट रस्ते, सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण व ई-बसेसचे तसेच विविध आयुष्मान आरोग्य मंदिर लोकार्पण व भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी  केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आमदार सर्वश्री प्रविण दटके, विकास ठाकरे, माजी मंत्री श्रीमती सुलेखा कुंभारे, माजी आमदार नाना शामकुले, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरात गोरगरीबांना आपल्या घराचे स्वप्न साकार होणे सोपे नसते. शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या जागेची मालकी/पट्टा त्यांच्या नावावर असणे आवश्यक असते. या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने कायद्याच्या चौकटीत हजारो लोकांना पट्टे देऊन आता त्यांचे स्वप्न साकार होण्यास मोलाची मदत केल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेंतर्गत नागपुरात हजारो घरे वंचितांना मिळतील असे उपमुख्यमंत्री  श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. ग्रीन सिटी असणाऱ्या नागपूर शहरात डिझेल आणि पेट्रोल सारख्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराऐवजी ई-बसेस सारख्या वाहनांचा सर्वाधिक वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरात सुरु असलेल्या इतर बसेस हळूहळू कमी करुन ई-बसेस व अपारंपरिक स्त्रोत व ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या बसेसची संख्या वाढवून नागपूर शहराचा देशात नावलौकिक वाढवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असून शिक्षणापासून रोजगारापर्यंत, रोजगारापासून आरोग्यापर्यंत शासनाने विचार करुन नियोजन केले आहे. शासनाने नवीन जाहीर केलेल्या महिला धारेणात आता प्रत्येकाला वडीलांसमवेत आपल्या आईचे नावही लिहावे लागेल असे सांगून त्यांनी मातृशक्तीला वंदन केले. मी देखील आता देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असे नाव लावणार असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

नागपूर शहर बदलत आहे. शहराचा चौफेर विकास होत असून, सर्वांगिण विकासासाठी नागपूरला देशातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जावे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. महानगरातील वाढत्या सुविधा समवेत ड्रेनेज सुविधा वाढव्यात यासाठी आपण विशेष लक्ष देऊन नियोजन केले आहे. प्रत्येक भागाला पुरेसे पाणी मिळेल याकडे आपण लक्ष दिले आहे. येत्या काही दिवसात 24 तास पाणी राहील असे सांगून नाग नदी महानगराच्या सौंदर्याचा एक भाग असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावर्षी मागील 25 वर्षातील अतिवृष्टीचा रेकॉर्ड ब्रेक झाला. यामुळे नाग नदीवर असलेले पूल मोठे करावे लागले. लवकरच ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केले जातील. शहराच्या विकासाचा मार्ग चांगल्या रस्त्यातून स्वच्छतेतून, स्वच्छतेतून क्रीडांगणापर्यंत व क्रीडांगणापासून आरोग्यापर्यंत भक्कम होत जात असतो. यासाठीच प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष आपण देत आहोत. रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना स्वतंत्र फुड मॉल विकसीत करुन त्यांना तिथे अधिक चांगल्या सुविधा दिल्या जातील असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले. दक्षिण-पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण ५५२ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सिमेंट रस्ते, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पातील वाणिज्य आणि रहिवासी संकुल, गोरेवाडा व प्रतापनगर  जलकुंभ, सार्वजनिक स्मार्ट टॉयलेट, व्हर्टिकल गार्डन  , ई- बसेस, आरोग्य मंदिर, ग्लो गार्डन,, अहिल्याबाई होळकर सभागृह, छत्रपती शाहू महाराज रिसर्च इन्स्टिट्यूट, पंडित दीनदयाल उपाध्याय व राष्ट्रमात कस्तुरबा ग्रंथालयांचे  लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. नागपुरातील महिलांसाठी मान्यवरांच्या हस्ते हॅलो यशस्विनी 9545759966 हेल्पलाईनचे लोकार्पण करण्यात आले. महिलांसाठी शिक्षण आरोग्य रोजगार न्याय आणि कायदा याकरिता ही हेल्पलाईन मदत करेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी यांनी मानले.

०००

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत

मुंबई, दि. ८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त’ भारतीय वन सेवेतील महिला अधिकारी आणि कांदळवन कक्ष, मुंबईच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिनानिमित्त भारतीय वन सेवेतील कांदळवन कक्ष, मुंबईच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आणि वन सेवेत कांदळवन कक्षामध्ये काम करत असतांना कांदळवनांचे पर्यावरणीयदृष्ट्या महत्व तसेच कांदळवनांच्या जतन व संवर्धनासाठीचे प्रयत्न याबाबत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्रीमती पाटील यांची मुलाखत शनिवार दि. 9 आणि सोमवार दि. 11 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 9 मार्च 2024  रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

डेन्मार्क संसदेच्या तीन उपाध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट 

मुंबई, दि. ८: डेन्मार्क संसदेचे तीन उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन, जेप्पे सो व करीना ऍड्सबोल यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

भारत – डेन्मार्क राजनैतिक संबंध स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमध्ये संसदीय सहकार्य, व्यापार, हरित ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या उद्देशाने भेटीचे आयोजन केले असल्याचे उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन यांनी राज्यपालांना सांगितले.

डेन्मार्कची लोकसंख्या अतिशय कमी असून आपल्या देशाला भारताकडून कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात भारताशी स्थलांतर करार देखील केला असल्याचे त्यांनी सांगितले.

डेन्मार्क भारताचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार असून डेन्मार्कच्या लार्सन अँड टुब्रो व मर्स्क कंपन्यांची नावे भारतात सर्वतोमुखी आहेत. डेन्मार्कने भारताला कौशल्य विकास, दुग्ध क्रांती, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य क्षेत्रात सहकार्य केल्यास त्याचे स्वागतच होईल असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने राज्य तसेच डेन्मार्क मधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी, शिक्षक व सत्र देवाणघेवाण झाल्यास त्याचा उभयपक्षी विद्यार्थ्यांना फायदा होईल असे राज्यपालांनी सांगितले. बैठकीला डेन्मार्क संसदेचे वरिष्ठ अधिकारी व डेन्मार्कचे मुंबईतील उप वाणिज्यदूत हेन्री करकाडा प्रामुख्याने उपस्थित होते.

 

समृद्धी पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. ८:  समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर येथून मुंबई येथे पोहोचणे कमालीचे सुखद आणि जलद झाले आहे. समृद्धीने संभाजीनगरला अवघ्या चार तासात जाता येते मात्र छत्रपती संभाजीनगर येथून पुणे येथे पोहोचणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतूकीच्या कोंडीला टाळण्यासाठी नव्या महामार्गाची नितांत गरज होती. ही गरज ओळखून आता पूणे ते छत्रपती संभाजीनगर या 230 किलोमिटर सहा पदरी ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे ची निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करार होत आहे याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॉटेल रेडिसन ब्ल्यु येथे आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ते छत्रपती संभाजी नगर या दोन महानगरादरम्यान नवीन एक्सप्रेस वे निर्मितीबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासमवेत या एक्सप्रेसवे बाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मुख्य अभियंता  डी. एन. नंदनवार, उपसचिव मयुर गोवेकर आदी  मान्यवर उपस्थित होते.

हा नवीन एक्सप्रेस वे मराठवाड्यातील दु:ष्काळग्रस्त भाग असलेल्या बीड जिल्ह्यातील काही गावांना जोडून जात आहे. दु:ष्काळग्रस्त भागाला विकासाच्या नवीन वाटा याद्वारे मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. हा महामार्ग पुणे येथील रिंग रोडला मिळेल. पुणे येथील ज्या ठिकाणी रिंग रोडला हा रस्ता मिळणार आहे त्या रिंग रोडसाठी भूसंपादन प्रक्रीया पूर्णत्वास आली आहे. पुण्यातील रिंग रोड रस्ताही एक्सप्रेस वे चे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णत: तयार असेल असे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्ग आता आपण गोंदिया, चंद्रपूर पर्यंत जात आहे. नागपूर-गोवा महामार्गाला आता गती दिली असून या कामासंदर्भात आवश्यक त्या नोटीस काढल्या आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक भाग महामार्गाच्या जाळ्याशी जोडला गेला पाहिजे ही आमची भूमिका असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भक्कम साथ असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  काढले.

दक्षिण ते उत्तर दिशांना जोडणारे महामार्ग मराठवाड्याला कवेत घेऊन पुढे जातील – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर या सध्या असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ ही अनेक पटीने वाढली आहे. काही दिवसापूर्वी मी स्वत: नगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील ही कोंडी अनुभवली. या दोन्ही महानगरांना जलद गतीने जोडणाऱ्या एक्सप्रेस वे ची नितांत गरज होती. त्या दृष्टीनेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची निर्मिती आपण केली. सध्या असलेल्या मार्गालाही चांगले करण्याची गरज असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल  असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत व पूर्व पश्चिम भागांनाही जोडणारे महामार्गाचे जाळे आपण निर्माण केले आहेत. हा नवीन एक्सप्रेस वे मराठवाड्यातील काही भागाला कवेत घेऊन दक्षिण ते उत्तर दिशाशी जोडला जाईल असे त्यांनी सांगितले. सुरतपासून नाशिक मार्गे येणाऱ्या या एक्सप्रेसवेवरुन सोलापूर महामार्ग व पुढे कर्नूलमार्गे कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास जलद होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

०००

शासनाच्या लोकोपयोगी धोरणांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सांगली दि. ८ (जिमाका) : शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे असून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. राज्यात सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने विविध लाभ देण्यात आले. म्हणूनच हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन इस्लामपूर हायस्कूल मैदानावर करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अण्णा डांगे, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी जोमाने कामाला लागले. त्याचाच परिणाम म्हणून सांगली जिल्ह्यात 35 लाख 65 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस, गरजू, वंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. राज्य शासनाला केंद्र सरकारचे सहकार्य मिळत असल्याने राज्याचा विकास चौफेर होतोय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे. दुष्काळी भागासाठी वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत 500 निर्णय घेतले. आतापर्यंत 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम सरकारने केले. सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. तसेच 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. तर उद्योग व्यवसाय वाढीसाठी सरकारने पाच लाख कोटीचे करार केल्याचे सांगून त्याचा चांगला परिणाम लवकरच दिसेल. सांगली जिल्ह्यातील चांदोली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले की, सांगली जिल्ह्याचे नाव काढलं की, डोळ्यासमोर येतो या जिल्ह्याने लढलेला स्वातंत्र्यसंग्राम आणि मोठमोठे उद्योजक. अनेक नामवंत व्यक्तिमत्व, उत्तम प्रशासक, दूरदृष्टी असलेले नेते राजकीय नेते, समाजकारणी या मातीने घडवले. राज्य सरकारच्या भक्कम पाठिंब्यामुळे सांगलीची विकासाकडे जोमाने वाटचाल सुरू आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री श्री. शिंदे तसेच पालकमंत्री डॉ. डॉ. खाडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगली बहु चांगली, कृष्णामृतपुस्तकांचे प्रकाशन

दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘सांगली बहु चांगली’, या कॉफी टेबल बुक व सांगलीची विविध क्षेत्रातील महती व प्रगती सांगणाऱ्या ‘कृष्णामृत’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी या पुस्तकाच्या संपादनासाठी सहाय्य केलेले मंडळ जेष्ठ विधिज्ञ बाबासाहेब मुळीक, जेष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे, अशोक घोरपडे, इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर, तत्कालील जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर व विद्यमान जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान यांचा पुष्प देवून सत्कार करण्यात आला.

सांगली बहु चांगली या कॉफी टेबल बुकमध्ये सांगली जिल्ह्याच्या स्वातंत्र्यचळवळ, शिक्षण, शेती, उद्योग, सहकार आदि विविध क्षेत्रातील इतिहास व प्रगतीचा चित्रमय आढावा आकर्षक पद्धतीने घेण्यात आला आहे. तसेच कृष्णामृत या पुस्तकात सांगली जिल्ह्याची स्वातंत्र्य चळवळ, राजकीय, शिक्षण, कृषि, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक, खाद्य क्षेत्रातील परंपरा विविध तज्ज्ञांच्या लेखणीतून कागदावर उतरली आहे. या माध्यमातून जिल्ह्याचा विविध क्षेत्रातील देदीप्यमान, वैभवशाली व अभिमानास्पद वारसा व प्रगती दस्तावेजबद्ध करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय व संपादकीय मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.

क्षणचित्रे –

  • मुख्यमंत्र्यांनी महाशिवरात्रीच्या आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
  • मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उपस्थितांकडून मोबाईल टॉर्च दाखवून प्रतिसाद.
  • शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत विविध विभागाकडून 22 स्टॉलची उभारणी.
  • योग्य नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्त यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक.
  • जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुक व कृष्णामृत सांगलीची गौरवगाथा या पुस्तकांचे मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांकडून कौतुक
  • या मेळाव्यासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती.

०००

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी १९९ कोटींची निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

कोल्हापूर दि. (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडनमधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे, त्याचीच प्रतिकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक माणगाव परिषद येथेच झाली होती. या दोघांचे संयुक्त स्मारक माणगाव येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी १९९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

माणगाव येथील माणगाव परिषदेच्या १५ ठरावांच्या शिलालेखाचे उद्घाटन, होलाग्राफिक शो व माणगाव येथे साकारलेल्या लंडन हाऊस प्रतिकृती इमारत लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलीक, आमदार राजबाबा आवळे, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के.मंजुलक्षी, माणगावचे सरपंच राजू मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव येथील संयुक्त स्मारकाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मुंबई येथील स्मारकही संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीने करणार असल्याचे सांगितले. राजर्षी शाहू महाराज हे एक महान समाज सुधारक होते. शिक्षण आणि नोकरीत बहुजनांना आरक्षण देणारे व शिक्षणासाठी वसतिगृहाची उभारणी करणारे ते पहिले राजे होते. तर बहिष्कृत समाजाला स्वाभिमानाची आणि स्वत:ची जाणीव करुन त्यांचा उद्धार करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.  डॉ. आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या उपस्थितीत जगातील पहिली बहिष्कृत वर्गाची ऐतिहासिक माणगाव परिषद घेतली त्यामुळे ही पावन भूमी आहे. या भूमीला मी वंदन करतो.

माणगाव येथे साकारण्यात आलेला होलोग्राफिक शो पाहताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष आपल्याशी बोलत आहेत असे दुर्मिळ क्षण आपल्याला पाहावयास मिळत आहे, हे आपल्या सर्वांचे भाग्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचे शब्द लिहीले आहेत की तुम्ही योग्य नेता निवडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती  लोकांच्या मनातील भावना लक्षात घेवून ते हिंदुस्थानचे नेतृत्व करु शकता. त्यांना राजाश्रय देण्याचे काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले होते, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासनही गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक यांना राबवित आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कल्याणकारी योजना सुरु आहेत. यामधून कष्टकरी, कामगार,महिला, तरुण युवा वर्गासह सर्वांनाच विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शासन बार्टी, सारथी, महाज्योती, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था सक्षमपणे समाजाच्या उध्दारासाठी काम करीत आहे. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला दिन व महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीकारी आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

०००

…अन् त्या ‘दुवा’ चा वाढदिवस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला साजरा…

कोल्हापूर, दि. (जिमाका): मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मागील वर्षी वेळेत अर्थसहाय्य झाल्यामुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’ या चिमुकलीचा महिला दिनी पहिला वाढदिवस हातकणंगले येथे झालेल्या ‘शिवराज्य भवन’ कोनशिला अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा वैद्यकीय समन्वयक प्रशांत साळुंखे, साई स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर विजय गावडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या चिमुकलीच्या आईने कोल्हापूर मध्ये 13 जून 2023 मध्ये तपोवन मैदान येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना भेटून आभाराचे पत्र दिले होते. तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने त्यांनी मुलीचे नाव ‘दुवा’ असे ठेवल्याचे तिची आई फरिन मकुबाई यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सांगितले होते.

आज याच ‘दुवा’ चा पहिला वाढदिवस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाल्यामुळे खूप आनंद झाल्याची भावना तिची आई फरिन मकुबाई यांनी व्यक्त केल्या.

०००

हातकणंगले येथील ‘शिवराज्य भवन’ च्या कोनशिलेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

कोल्हापूर दि. (जिमाका) : हातकणंगले नगरपंचायत येथे खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून  4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या ‘शिवराज्य भवन’ या बहुउद्देशीय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच अन्य मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हातकणंगले नगरपंचायत क्षेत्रात 2 हजार 600 चौरस मीटर जागेत उभारण्यात येणाऱ्या या शिवराज्य भवन बहुउद्देशीय सदनाचा वापर परिसंवाद, कार्यशाळा, योग प्रशिक्षण, अभ्यासिका, शिबिर, लग्नसमारंभ, आध्यात्मिक प्रवचने अशा विविध कारणांसाठी करण्यात येणार आहे.

या इमारतीसमोर प्रवेश मार्गासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण होणाऱ्या या इमारतीमध्ये स्वतंत्रपणे नियंत्रित वापरता येईल, अशा गेस्ट रुम, शयनगृहे प्रस्तावित आहेत. या इमारतीच्या वास्तू संकल्पनेतून विविध प्रकारे शिवराज्यामधील पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी सकल मराठा समाज तसेच अन्य संस्था, संघटना व नागरिकांनी दिलेली निवेदने स्वीकारली व अन्य निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयातील जनकल्याण कक्षाकडे स्वीकारण्याच्या सूचना दिल्या.

०००

 

वडगावच्या विकासासंबंधीचे इतर सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर दि. (जिमाका) : वडगाव  नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटीचा निधी देण्यात आला आहे. शिवराज्य भवन बांधकामासाठी १ कोटी ५० लाख निधी दिला आहे. या वास्तूंसाठी आणखी निधी लागणार असून तोही दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे करीत असताना याठिकाणी भव्य वास्तू उभाकरुन त्यामधून सर्वसामान्यांच्या कामांना न्याय देण्याचे काम करा. वडगावच्या विकासासंबंधीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक निधीही दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वडगाव नगरपरिषद नविन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे पहिला टप्पा भूमिपूजन, भूमिनंदन कॉलनी येथे शिवराज्य भवन बांधणे पहिला टप्पा भूमिपूजन व वडगाव सराफ व्यापारी नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना सुवर्ण मुद्रा वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार धैयशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार राजू आवळे, आमदार डॉ. विनय कोरे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पेठवडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पेठवडगाव रिंग रोडचा प्रश्न मार्गी लावला जाईल. वडगावनगरीचा डिपी प्लान नगरपालिकेने केला आहे तो हद्दवाढ झाल्यानंतर पुर्नस्थापित करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेवून, कोणावरही अन्याय होणार नाही असा करण्यात येईल, तोपर्यंत या डिपी प्लॅनला स्थगिती देवू असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला. यामुळे राज्यातील 4 कोटी लोकांना विविध योजनांचा लाभ मिळाला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये एस.टीच्या प्रवासात 50 टक्के सवलत दिली. लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली. शेतकऱ्यांना पुर्वी एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत दिला जात होती. यामध्ये बदल करुन ही मदत दुप्पट केली आहे. दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टर केली आहे. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शासन देत आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकार 6 हजार रुपये देते त्याबरोबर आता राज्य शासनही ६ हजार रुपये देत आहे. त्यामुळे वर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. १ रुपयामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येतो. प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यातील गडकोट किल्ले, मंदिरे यांच्या जतनासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी खासदार धैर्यशील माने यांनीही पेठवडगाव शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती देवून या नगरीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध कामांची मागणी केली.

०००

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...