रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 69

राष्ट्रपतींच्या हस्ते जळगावच्या सुजाता बागुल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली, दि. ३० : जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका सुजाता अशोक बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या समारंभात राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.

आरोग्य क्षेत्रात गेली 18 वर्षे अत्यंत निष्ठा, कष्ट व समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या सुजाता बागुल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थात्मक प्रसवासाठी गरोदर महिलांना प्रोत्साहन देणे, लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे, आरोग्य शिबिरे, जनजागृती रॅली आणि स्वच्छता मोहिमांमध्ये प्रभावी सहभाग यांसारखे उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले आहे.

कोरोना काळातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना जिल्हास्तरीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’सह विविध पुरस्कारांनी ही सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र आहे.

०००

अमरज्योत कौर अरोरा/

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती

मुंबई, दि. ३०: जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळामार्फत राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम राबविण्यात येत आहे. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करत लोकांना नशा मुक्त जीवन जगण्याचे आवाहन या उपक्रमात करण्यात आले.

याचे उद्घाटन आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. मुंबईतील केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय व सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांना तंबाखू व इतर व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी सखोल माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमात तंबाखू, धूम्रपान, अल्कोहोल व ड्रग्सच्या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. व्यसनमुक्तीसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्रांची स्थापना, ‘मॅजिक जार’ संकल्पना, तसेच सतत तणावाखाली राहणाऱ्यांसाठी समुपदेशन सुविधा यांसारखे उपक्रम यावेळी राबविण्यात आले.

यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की, तंबाखूमुळे केवळ कर्करोग होण्याची शक्यता वाढत नाही तर मेंदूच्या कार्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. त्यातील निकोटीन हे रसायन शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. धूम्रपान करणाऱ्यांचे फुफ्फुस इतरांच्या तुलनेत कमी कार्यक्षम असते, तर अल्कोहोलच्या अतिसेवनाने यकृताचे विकार उद्भवू शकतात.

या उपक्रमात व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, सलाम मुंबई फाउंडेशन यांसारख्या अनेक नशामुक्ती संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विविध सादरीकरणे व खेळांच्या माध्यमातून या संस्थांनी व्यसनमुक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. तंबाखू विक्रीवरील कायदेशीर मर्यादा, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि शाळा, महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.

राज्य नशाबंदी मंडळाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेला हा उपक्रम तंबाखूविरोधी लढ्यास नवे बळ देणारा ठरला असून, नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन स्वतःच्या आरोग्यासाठी तंबाखूला नकार द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/

पुढील बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न सोडवावेत – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

  • सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी काम करावे

मुंबई, दि. ३०: जिल्हा नियोजन समिती ही एक महत्त्वाची समिती असून या समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित केलेले प्रश्न जनतेच्या हिताचे असतात. तसेच शासनाचा निधी जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्याची जबाबदारी कार्यान्वयीन यंत्रणांवर असते. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी 100 टक्के निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनी या बैठकीमध्ये मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच अधिकारी वर्गाने प्रयत्न करावेत, अशा सूचना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिल्या.

बांद्रा येथील चेतना महाविद्यालयामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी या सूचना दिल्या. यावेळी खासदार वर्षा गायकवाड, खासदार रवींद्र वायकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासह मुंबई उपनगर जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी आणि निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

Oplus_131072

आदिवासी उपयोजनेंतर्गत प्राप्त झालेला 100 टक्के निधी खर्च होईल, याची काळजी घ्यावी, असे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्येची गणना करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे हा निधी खर्च करताना अचूक नियोजन करणे शक्य होणार आहे. या निधीमधून आदिवासी पाडे आणि वस्त्यांना सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा करावा. पोलीस, सार्वजनिक बांधकाम आणि महानगरपालिकेतील अधिकारी यांनी लोकप्रतिनिधी मांडत असलेल्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घ्यावे. हे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यवाही करावी. जिल्ह्यातील जुन्या मोडकळीस आलेल्या तसेच धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणे सोपे व्हावे, या हेतूने शासनाने अशा इमारतीतील रहिवाशांना 20 हजार रुपये भाडे देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

Oplus_131072

ज्या भागात दरडी कोसळण्याचा धोका आहे अशा भागात मॅस नेट बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, नऊ मीटरपेक्षा कमी उंचीची भिंत असणाऱ्या ठिकाणी म्हाडा मॅस नेट बसवणार आहे. तर नऊ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या ठिकाणी मॅस नेट बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रश्नांबाबत विभागांनी समाधानकारक उत्तरे देऊन हे प्रश्न 100 टक्के मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अनुपालनाचे उत्तरही योग्य आणि वस्तुस्थितीदर्शक द्यावे. अनुपालनाची प्रत सदस्यांना लवकर उपलब्ध करून द्यावी. सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या 1 हजार 88 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.  तसेच कलिना येथील फोर्स वन प्रशिक्षण केंद्रासही मान्यता देण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्र घोषित झाल्यानंतर अतिरिक्त वन क्षेत्र नव्याने घोषित केलेल्या केतकी पाढा आणि परिसरात असलेल्या 80 हजार लोकवस्ती आजही प्राथमिक सेवा सुविधांपासून वंचित असून त्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन व्हावे, म्हणून हा भाग संरक्षित जंगल मधून वगळण्यात यावा, असा ठराव आमदार प्रविण दरेकर यांनी मांडला. त्याला एकमतांने मंजुरी देण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये सदस्यांनी आमली पदार्थांचा वाढता व्यापार, महिला सुरक्षा, पूल, पदपथ, रस्त्यांची कामे, नाले सफाई, आदिवासी पाडे तसेच वन जमिनीवरील रहिवाशांना सोयी उपलब्ध करणे याविषयावर विविध मुद्दे उपस्थित केले.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांचा मंत्री भरत गोगावले यांच्याकडून आढावा

अलिबाग,दि.३०(जिमाका): आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर आज रोजगार हमी योजना, खारभूमी विकास विभाग मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजना आढावा बैठक  शासकीय विश्रामगृह महाड येथे पार पडली.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल,  मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे,कार्यकारी अभियंता महेश नामदे ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे,  एनडीआरएफ, कोस्ट गार्डचे अधिकारी यांसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी मंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील वीज पुरवठा, सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, पूल दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, कृषी बागायतदारांना नुकसान भरपाई, आरोग्य, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी उपयोगी पडणारी तात्पुरती निवारागृहे, धोकादायक ठिकाणे व तेथील उपाययोजना, पोलीस व स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण कक्ष, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आदी विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला.

नैसर्गिक आपत्तीत सर्व यंत्रणांनी सतर्क व सुसज्ज राहावे, आपापसात योग्य तो समन्वय साधावा, जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून काम करावे, नागरिकांच्या आरोग्याची आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

०००

‘न्यू एज’ अभ्यासक्रमांना चालना द्यावी – मंत्री मंगल प्रभात लोढा

नाशिक, दि. ३०: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी काळानुरुप बदल स्वीकारत नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित ‘न्यू एज’ अभ्यासक्रमांना चालना द्यावी. त्याविषयी विद्यार्थ्यांना अवगत करावे, अशा सूचना राज्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नावीण्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.

संत मीराबाई शासकीय मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज सकाळी मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक अनिल गावित, प्राचार्य दीपक बाविस्कार आदी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात बदल होत आहेत. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी न्यू एजवर आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता करावी. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. याबरोबरच अहिल्यानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १ ऑगस्टपासून अभ्यासक्रम सुरू होतील, असे नियोजन करावे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ज्या व्यक्तीचे नाव दिले आहे, अशा व्यक्तीच्या जयंतीसह विशेष दिनी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री लोढा यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण, इमारत बांधकाम, जिल्हा वार्षिक योजना आदींचा सविस्तर आढावा घेतला. सहसंचालक गावित यांनी विभागाची सविस्तर माहिती दिली.

०००

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ३० : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कंपनीचे के. व्ही प्रदीप आदी उपस्थित होते.

बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे सूचित करीत मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. कंपनीने आतापर्यंत 220 बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले, भाडेतत्वावर कंपनीने 5150 ईलेक्ट्रीक बसेस पुरवठा करण्याचा करार आहे. त्यापैकी 220 बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये 12 मीटर व 9 मीटर लांबीच्या बसेस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार 60 कोटी रूपये कंपनीला देण्यात आले आहे. उर्वरित 40 कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाला 12 मीटर बस चालविताना प्रति किलोमीटर 12 रूपये आणि 9 मीटर बस चालविताना 16 रूपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात 3191 कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.

यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

‘जय महाराष्ट्र’ मध्ये पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची ३ जून रोजी विशेष मुलाखत

मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात पिंपरी -चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शंभर दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमातील अंतिम मूल्यमापन आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेली सर्वोत्तम कामगिरी या विषयावर ही मुलाखत मंगळवार, 3 जून 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत पाहता येणार आहे. ज्येष्ठ निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

प्रशासनात सुलभता, लोकाभिमुखता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कर संकलनात वाढ आणि नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी या बाबींमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तंत्रज्ञानाचा कामकाजात प्रभावी वापर करणे तसेच कर संकलन वाढीसाठी राबविलेल्या नवनवीन उपक्रम राबविणे, ऑनलाईन सुविधा, मालमत्ता जप्ती लिलाव, जिओ सिक्वेन्सिंग आणि यूपीआयसी आयडी अशा महत्त्वाच्या विषयांवर महापालिकेने भर दिला आहे. या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याविषयी आयुक्त सिंह यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

महासंचालनालयाच्या खालील लिंकवरून ही मुलाखत पाहता येईल.

एक्स (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक: https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब: https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/ससं/

‘दिलखुलास’मध्ये प्रा. डॉ. रेशम पाखमोडे यांची ३१ मे, २ व ३ जून रोजी मुलाखत

मुंबई, दि. ३० : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे’ औचित्य साधून, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’या कार्यक्रमात आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती देणारी विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. जी. टी. रुग्णालय, मुंबई येथील दंत वैद्यक विभागाच्या प्रमुख आणि सहायक प्रा. डॉ. रेशम पाखमोडे यांच्या मार्गदर्शनातून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

ही विशेष मुलाखत शनिवार, 31 मे 2025 तसेच सोमवार, 2 जून आणि मंगळवार, 3 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल ॲपवर ऐकता येणार आहे. सहायक संचालक जयश्री कोल्हे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. यामागील उद्देश तंबाखूच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव जनतेला करून देणे हा आहे. तंबाखूचा वापर अनेक घातक आजारांना आमंत्रण देतो. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर ‘राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम’अंतर्गत राज्यात सातत्याने विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आजार, त्यापासून बचावाचे उपाय, आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत दिलखुलास’कार्यक्रमातून डॉ. पाखमोडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस

मुंबई, दि. ३०: राज्यात मागील २४ तासांमध्ये (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे, तर बीड २४ मिमी, जालना १३.९ मिमी, सोलापूर १२.१ मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज ३० मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :

रायगड ०.३, रत्नागिरी ३.९,  सिंधुदुर्ग ११.२,  पालघर ०.१, नाशिक ०.६, धुळे ०.४,  जळगाव ०.१, अहिल्यानगर ०.५, सोलापूर १२.१,  सातारा १,  सांगली ०.९,  कोल्हापूर ०.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना १३.९, बीड २४, लातूर ५.१,  धाराशिव ४२.२, नांदेड ९.३,  परभणी ३,  हिंगोली ०.२, बुलढाणा २.२, अकोला ०.१, वाशिम ०.२, अमरावती ३.४, यवतमाळ ६.५,  वर्धा ८.७, नागपूर १.४, भंडारा ०.७, गोंदिया ३.९, चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली २.५.

धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले. मात्र, पावसामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

आंबोली घाट मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू

सिधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात रस्त्यावर दरड कोसळली राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने रस्त्यावरील कोसळलेली दरड हटवली असून या मार्गावर वाहतूक सुरळीतपणे चालू आहे.

इंडो अमाईन्स कंपनीतील वायू गळती बंद

महाड येथील इंडो अमाईन्स या कंपनीमध्ये वायू गळतीमुळे एक कामगार जखमी झाला आहे. सध्या वायू गळती बंद असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.

दिनांक २९ मे २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यात रस्ता अपघातात एक व्यक्ती, नांदेड जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्ती मृत पावल्या आहेत, तर सोलापूर जिल्ह्यात भिंत पडून चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूरपरिस्थिती उद्भवलेली नाही. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र सर्व जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात २९ ते ३० मे २०२५ दुपारी ४ वाजेपर्यंत भिंत कोसळणे, झाड पडणे, वीज कोसळणे, पाण्यात बुडणे, आगीत जळणे, पुराचे पाण्यामुळे, रस्ते अपघात या घटनेत तीन व्यक्ती व तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक आणि नांदेड जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. तसेच सात व्यक्ती जखमी झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती– एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन!

भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्याबाई होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा घेण्याचे निमित्त आहे!
प्रशासन आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर

अहिल्याबाईंचे नेतृत्व केवळ राज्यकारभारापुरते मर्यादित नव्हते, तर त्यात धर्म, न्याय, लोकसेवा आणि नीतीमूल्यांचे सखोल अधिष्ठान होते. त्यांनी महेश्वरला आपली राजधानी बनवली. ही राजधानी एक आदर्श प्रशासनाचे प्रमाण होते. येथे अहिल्याबाईंनी एक पारदर्शक, न्यायपूर्ण आणि लोकाभिमुख राज्यकारभार चालवला. तेव्हाच्या काळात एकराज्यकर्त्या महाराणी प्रत्यक्षपणे जनतेच्या तक्रारी ऐकून त्यावर तत्काळ निर्णय घेते, अशी कल्पनाही करवत नाही. पण अहिल्याबाई दररोज प्रजेसोबत संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेत आणि न्याय देत. हे त्यांचे कार्य आजच्या लोकशाही व्यवस्थेलाही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन आणि समाजकल्याण यासाठी वाहिले. काशी विश्वनाथ, गंगाघाट, रामेश्वरम, सोमनाथ, द्वारका अशा अनेक प्राचीन आणि पवित्र स्थळांचे जीर्णोद्धार करून त्यांनी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे धागे पुन्हा मजबूत केले. याशिवाय देशभर त्यांनी शेकडो धर्मशाळा, घाट, कुंड, विहिरी, अन्नछत्रे आणि विश्रामगृहे उभारली. हे कार्य कोणत्याही जाती-धर्माचा भेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी केले गेले. त्यांच्या या पुढाकारामुळे हजारो लोकांना निवारा, अन्न आणि आधार मिळाला.त्यांचे हे सामाजिक कार्य आजही संपूर्ण भारतात “लोककल्याणकारी राज्यशासनाचा” आदर्श नमुना मानले जाते. प्रशासन आणि समाजकारण यांचा असा सुरेख मिलाफ क्वचितच इतिहासात पाहायला मिळतो—आणि त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर!

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – स्त्री सक्षमीकरणाचे आदर्श!
अठराव्या शतकातील भारतात स्त्रियांना घराच्या चार भिंतींपलीकडे जाण्याची मुभा नव्हती. पण अशा काळातही अहिल्याबाई यांनी स्त्रिया आत्मनिर्भर बनाव्या यासाठी पुढाकार घेतला. त्या काळात त्यांनी सुरू केलेला महेश्वरी साडी उद्योग केवळ व्यवसाय नव्हता तर तो एक सामाजिक क्रांतीचा भाग होता. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी काशी आणि इतर ठिकाणांहून कुशल विणकरांना महेश्वरला बोलावले. त्यांनी स्थानिक महिलांना हातमाग प्रशिक्षण दिले, आणि महिलांना घरोघरी बसून उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण केली. या उद्योगाने हजारो महिलांना केवळ रोजगारचं दिला नाही, तर स्वाभिमान, ओळख आणि आत्मसन्मानही दिला. आजही महेश्वर व आसपासच्या भागात महेश्वरी साड्या विणणाऱ्या हजारो महिला आपल्याला पहायला मिळतात. या साड्या केवळ पारंपरिक पोशाख नाहीत, तर त्या अहिल्याबाईंच्या द्रष्ट्या धोरणांचा आणि स्त्रीसन्मानाच्या तत्त्वांचा वस्त्ररूप अविष्कार आहेत. त्यांनी कोणत्याही जाती, धर्म, वर्ग यांचा भेद न करता सर्वांसाठी कार्य केले. १३ ऑगस्ट १७९५ रोजी या महान राणीने देहत्याग केला. धर्मशाळा, भजनमंडळे, सार्वजनिक पाणवठे आणि शिक्षणाच्या सुविधा त्यांनी महिलांसाठी खुल्या केल्या. त्या काळात जेव्हा स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते, तेव्हा त्यांनी महिलांना धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची मुभा दिली. अहिल्याबाईंच्या या कार्यामुळेच त्यांना ‘पुण्यश्लोक, ‘लोकमाता’ आणि ‘राजमाता’ अशा सन्मानार्थ उपाधी प्राप्त झाल्या. भारत सरकारने त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. इ.स. १७६७ साली त्यांनी महेश्वर येथे हातमाग उद्योग सुरू करून एक स्थायिक, गुणवत्ताधिष्ठित आणि बाजारपेठेचा विचार करणारा स्थानिक उद्योग उभारला. यामागील हेतू होता तो स्त्रियांना उपजीविकेचा मार्ग उपलब्ध करून देणे आणि महेश्वरला धार्मिक व पारंपरिक वस्त्रकलेचे केंद्र बनवणे. महेश्वरी साडी आणि अहिल्याबाई यांचे नाते केवळ वस्त्रनिर्मितीपुरते मर्यादित नाही, तर ते महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक उद्योगाचा उत्कर्ष यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
महेश्वरी साड्यांची क्रेझ आजही कायम !
· महेश्वरी साड्या हलक्या आणि देखण्या
· सूती किंवा सिल्क-कॉटन मिश्र धाग्यांपासून तयार होतात, त्यामुळे साडी नेसण्यास हलकी
· साड्यांची किनारी (पट्टा) (झरी पट्टा) अतिशय आकर्षक आणि पारंपरिक नक्षीकामाने सजलेली
· “रिर्व्हसिबल बॉर्डर” म्हणजेच दोन्ही बाजूंनी वापरता येणारी साडी ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट
· भारतातच नाही तर विदेशात ही प्रसिद्ध
· हस्तकला आणि महिला उपयोजनता याचे प्रतीक
· पारंपारिक पण मोहक रंगसंगती गडद जांभळा, हिरवा, पिवळा, राखाडी यांसारखे रंग
अहिल्याबाईंनी त्याकाळी फक्त उद्योग उभारला नाही, तर महिलांना कामात समाविष्ट करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवले. आजही महेश्वर येथील अनेक महिलांचे कुटुंब महेश्वरी साड्या विणण्यावर अवलंबून आहेत. महेश्वरी साडी म्हणजे केवळ एक पारंपरिक वस्त्र नाही, तर ती आहे अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीची, सामाजिक जाणिवेची आणि स्त्री सन्मानाच्या विचारांची एक जिवंत आठवण म्हणता येईल.
अहिल्याबाईंची दूरदृष्टी – आजच्या ‘स्टार्टअप’ महिला उद्योजिकांसाठी प्रेरणास्रोत!
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशतकी जन्माेत‌्सव साजरा करताना त्यांच्या दूरदृष्टीने घडवलेल्या उपक्रमांचा आजच्या काळातही प्रभाव दिसतो. महेश्वरी साडी उद्योग हे त्याचे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी स्थापलेला हा स्थानिक उद्योग आजही महिला सक्षमीकरणाचा आदर्श मॉडेल मानला जातो. त्यांच्या विचारांतून निर्माण झालेल्या या व्यवसायाचे स्वरूप केवळ आर्थिक नव्हते, तर ते सामाजिक समावेश, कौशल्यविकास आणि स्वावलंबनाच्या मूल्यांवर आधारित होते.आज अनेक स्वयंसेवी संस्था आणि शासनाच्या योजनांद्वारे महेश्वरी साडी उद्योगातून ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. अहिल्याबाईंच्या कार्यातून मिळणारा मूलभूत धडा म्हणजे – कोणताही व्यवसाय फक्त नफा मिळवण्यासाठी नसावा, तर तो समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्याचे साधन असावे. त्यांची ही दूरदृष्टी आजच्या स्टार्टअप महिला उद्योजिकांसाठी मार्गदर्शक ठरते.
महिला उद्योजिकांनी सामाजिक संवेदना, स्थानिक कौशल्यांचा विकास आणि सांस्कृतिक मूल्यांचा समावेश करताना, व्यवसाय कसा दीर्घकालीन आणि समर्पित बनवावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्याबाईंचा साडी उद्योग.
आज महेश्वरी साडी जगभरात प्रसिद्ध आहे, पण तिच्या प्रत्येक धाग्यामागे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे स्वप्न, दूरदृष्टी आणि स्त्रीच्या सन्मानासाठी दिलेले योगदान विणलेले आहे.
या ऐतिहासिक वारशाला आदरांजली वाहत, राज्य सरकारने ७ मे २०२५ रोजी अहिल्याबाईंच्या जन्मस्थळी – चौंडी (जि. अहमदनगर) – पार पडलेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानाचा उद्देश म्हणजे महिलांना आरोग्य, पोषण, शिक्षण, आर्थिक सबलीकरण, सामाजिक सहभाग आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून सशक्त करणे आहे. तसेच बालमृत्यू व मातामृत्यू कमी करणे, महिलांचा पंचायतराजमध्ये सहभाग वाढवणे, बालविवाह व कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध करणे, अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबी यामध्ये समाविष्ट आहेत.
ग्रामपातळीपासून राज्यस्तरापर्यंत विशेष समित्या स्थापन करून त्यांचे वार्षिक मूल्यमापन केले जाईल. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांना “आदिशक्ती पुरस्कार” देण्यात येणार असून, हे पुरस्कार दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित होतील. या उपक्रमासाठी दरवर्षी अंदाजे १०.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या अभियानाचे मूळ बीज पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या विचारांमध्येच आहे – स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून, ती समाजाच्या पुनर्बांधणीची शक्ती आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवले जाणारे ‘आदिशक्ती अभियान’ हे स्त्रीसन्मान, स्त्रीसशक्तीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचे आधुनिक रूप आहे.
०००
– वर्षा फडके-आंधळे, उपसंचालक (वृत्त)

ताज्या बातम्या

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे...

0
पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी...