रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 68

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल तालुक्यातील पाणंद रस्त्याची केली प्रत्यक्ष पाहणी

नागपूर,दि. 30 :  शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादने वेळेत बाजारपेठेपर्यंत पोहचविता यावीत यासाठी त्यांच्या शेतापासून रस्त्याची नितांत आवश्यकता प्रत्येक भागात असते. शेतकऱ्यांची ही अडचण दूर व्हावी याउद्देशाने या योजनेअंतर्गत आपण जिल्ह्यात सर्व तेरा तालुक्यात एकूण 649 कामांना मंजूरी दिली असून यापैकी 491 कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. जी कामे हाती घेतली आहेत ती  गुणवत्तेची निकष लक्षात घेऊन पूर्ण करावीत, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

काटोल तालुक्यातील नायगाव ते खाणगाव या एक किलोमीटर पाणंद रस्त्याची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: पाहणी केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान कच्चा रस्ता देण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले असल्याचे सांगितले. यात शेतकरी कोणताही वाद न आणता स्वत: पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत भिवापूर तालुक्यात 30, हिंगणा तालुक्यात 31, कळमेश्वर तालुक्यात 27, कामठी तालुक्यात 55, काटोल तालुक्यात 58, कुही तालुक्यात 73, मौदा तालुक्यात 77, नागपूर तालुक्यात 43, नरखेड तालुक्यात 57, पारशिवनी तालुक्यात 23, रामटेक तालुक्यात 32, सावनेर तालुक्यात 92, उमरेड तालुक्यात 51 अशी जिल्ह्यात एकूण 649 पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथे महाराजस्व शिबीराला भेट 

नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सुरु असलेल्या शिबीरात भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत  उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे, तहसीलदार उमेश खोडके, गटविकास अधिकारी निलेश वानखेडे व इतर अधिकारी उपस्थित होते. या ग्रामस्तरीय शिबीरात 161 नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

******

आदर्श राजमाता : पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर 

आदर्श राजा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप डोळ्यासमोर येतं, तर आदर्श राज्यकर्त्या म्हटलं की, पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव पुढं येतं. आदर्श कन्या, सुशील भार्या, सर्वगुणसंपन्न माता अन् प्रजाहितदक्ष शासक अशा वैविध्यपूर्ण भूमिकेतून त्यांनी आजीवन जनसेवा केली. इतकेच नव्हे तर, सर्वधर्मियांना विश्वासात घेऊन उत्तम राज्यकारभार केला. महत्वाचे म्हणजे हिंदू-मुस्लिम हे अहिल्यादेवी यांच्या कारकिर्दीत गुण्यागोविंदाने नांदलेत. राजकारणातून समाजकारण करून धर्मपरायणात सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या अहिल्यादेवींना हिंदू संस्कृतीतील पुण्यश्र्लोक ही उपाधी बहाल करण्यात आली. ही गोष्ट मराठी जनमानसाच्या दृष्टीने मोठ्या अभिमानाची आहे.

अहिल्यादेवी होळकर ह्या अहमदनगर जिल्ह्यामधील चौंडी गावातल्या धनगर समाजाचे माणकोजी शिंदे-पाटील यांच्या कन्या. वयाच्या बाराव्या वर्षी अहिल्यादेवी यांचा विवाह पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. परंतू काळाने घात केला अन् दुर्दैवाने 1766 साली खंडेरावांचे आकस्मिक निधन झाले. तथापि स्वतःला मोठ्या धैर्याने सावरून, मल्हारराव होळकर या पित्यासमान सासऱ्यांची आज्ञा शिरसावंद्य मानत अहिल्यादेवींनी आपले उर्वरित आयुष्य लोकसेवेत व्यतित केले.

स्वकर्तृत्वाच्या बळावर या राजमातेने होळकरांच्या राज्याची धुरा समर्थपणे सांभाळून सर्व जाती-धर्मातील लोकांना समान न्याय दिला. वैधव्याच्या दुःखानं अन् पुत्रशोकानं व्यथित झालेल्या या कर्तृत्ववान व धाडसी मातेनं धिरोदत्तपणे पुनश्च खंबीरपणे उभं राहून होळकर साम्राज्याचा क्रांतीसूर्य तळपत ठेवला. अहिल्यादेवींनी “मरावे परी कीर्तीरूपे उरावे” ही उक्ती आदर्श राज्यकारभार करून खरी करून दाखविली.

अहिल्यादेवींनी आपल्या कारकीर्दीत हिंदू देवळांच्या व तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धाररासाठी ठोस उपाययोजना करताना मशिदी, दर्गे यांचा विसर पडू दिला नाही. त्यांच्यासाठी देखील राजकोषात आर्थिक तरतूद केली. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार तसेच बद्रीकेश्वरपासून रामेश्वरपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून सोमनाथपर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून त्यांनी खऱ्या अर्थानं दातृत्वाची भूमिका बजावली. नर्मदा, गंगा, गोदावरी या नद्यांवर घाट बांधल्याने, त्या कालखंडापासून पुढच्या काळातही नद्यांवर घाट बांधण्याचा पायंडा अखंडपणे चालत राहिला आहे. राज्यातल्या गोरगरीब लोकांना राजमाता ह्या नित्यनेमाने अन्नदान, वस्त्रदान अन् सणासुदीला दानधर्मही करीत असत. चारित्र्यसंपन्नता अन् स्त्रीत्वाचे वैभव जतन करून प्रपंच व परमार्थाची सांगड घालत या महान मातेनं गतकाळातील दुःखद घटनांना पाठीमागे टाकत, आपल्या जीवनाची सुव्यवस्थित घडी बसवली. या पार्श्वभूमीवरच अहिल्यादेवी होळकर यांचा रयतेत आदर्श राजमाता म्हणून नावलौकिक होता अन् आजही आहे.

पुरोगामी विचारसरणी असलेल्या अहिल्यादेवींनी कालबाह्य झालेल्या पूर्वीच्या कायद्यांमध्ये काळानुरूप सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. विधवांचे धन जप्त करून ते राजकोषात जमा करण्याची जुलमी प्रथा त्यांनी बंद केली. विधवेला मुल दत्तक घेण्याची इच्छा असल्यास तिला तशी कायद्याने मुभा देण्यात आली. न्यायप्रक्रियेत आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याचे अहिल्यादेवींनी फर्मान काढले होते. त्या उत्तम लढवय्या होत्या. त्या राजकारणाबरोबर अर्थकारणातही पारंगत होत्या. गावोगावी लोकांसाठी जागीच न्यायनिवाडा व्हावा, यासाठी त्यांनी पंचाधिकारी नेमले होते. भिल, गोंड जमातीतील लोकांकडून पडीक जमिनीवर लागवड करून घेतली. त्याद्वारे अहिल्यादेवींनी मल्हाररावांच्या काळापेक्षा अनेक पटीने राजकोषात वृद्धी केली. प्रजेकडून कररूपात प्राप्त झालेल्या धनराशीतून जनहिताचे विविध उपक्रम राबवून प्रजेला सुखी व आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. जनसामान्यांबद्दल त्यांच्या अंत:करणात अपार करुणा होती.

उल्लेखनीय बाब म्हणजे अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात शिक्षणावर अधिक भर दिला. होळकरांची राजधानी महेश्वर हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. मराठी, हिंदी पाठशाळेतून संस्कृत भाषेचेही शिक्षण दिले जायचे. याशिवाय वेद-पुराण, शास्त्रे, वेदांत, व्याकरणाचे शिक्षण हे विद्वान-पंडितांमार्फत देण्याची व्यवस्था अहिल्यादेवींच्या कारकीर्दीत करण्यात आली होती. त्यांच्या राजदरबारात शिल्पकार, साहित्यिक, कलाकार, विद्वान-पंडित यांना विशेष मानसन्मान मिळत असे. कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी यांना सरकार दरबारी मानाचे स्थान होते. अहिल्यादेवींनी सैनिकी शिक्षणही घेतले होते. त्या जाबांज लढवय्या होत्या. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य टिकवून त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने त्या आपल्या सैन्यदलाला वेळोवेळी भेटी देत असत. विशेष म्हणजे अहिल्यादेवींनी आपल्या सैन्यदलात महिलांची विशेष तुकडी तयार केली होती.

अभिमानाची गोष्ट म्हणजे मोगल, टिपू, निजाम, पेशवे यांच्यावर अहिल्यादेवीच्या कर्तबगारीची मोठी छाप होती. परधर्माविषयी त्यांच्या मनात नितांत आदर व सहिष्णुता होती. “राजा हा विश्वस्तासारखा असावा अन् प्रजेचे कल्याण चिंतणारा असावा”, हा आदर्श त्यांनी आपल्या राज्यकारभारात घालून दिला होता. त्यामुळेच त्यांना एक आदर्श शासनकर्त्या म्हणून रयतेकडून सन्मान मिळायचा. अहिल्यादेवी ह्या प्रजाहितदक्ष राजमाता म्हणून साऱ्या राज्यात किर्तीमान होत्या.

आदर्श राजमाता पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पावलावर पाऊल टाकत, त्यांचासारखा राज्यकारभार या पार्श्वभूमीवर शासन जनसामन्यांसाठी लोकहिताचे निर्णय घेत आहे. पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्याचाच एक भाग म्हणून महिलांना एस.टी. प्रवासात सरसकट 50 टक्के सूट देण्यात आली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत गोरगरीब महिलांना माहे 1500 रुपये आर्थिक मदत राज्य शासनातर्फे देण्यात येत आहे. राज्यातील कोट्यवधी माता-भगिनींना या योजनेमुळे आर्थिक आधार मिळून त्याद्वारे त्या छोटेखानी उद्योग करून कुटुंबाला हातभार लावत आहेत. विशेष म्हणजे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहताहेत. याशिवाय वयोश्री योजनेंतर्गत वयोवृद्ध महिला-पुरुषांना मोफत वैद्यकीय सुविधा व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या विशेष मोहिमेत महिलांना आरोग्य तपासणी, हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका, औषधं उपलब्ध करून देणे, यासाठी दोन कोटींचा निधी निर्धारित केला आहे.

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अशी ही बैठक महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनची पहिलीच बैठक होय. या बैठकीत चौंडीच्या सर्वंकष विकासाचा आराखडा तयार करून त्यासाठी 681 कोटी 32 लाखाची तरतूद करून तिला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टींचे येथे जाणाऱ्या नागरिकांना दर्शन होईल. इतकेच नव्हे तर गत होळकर साम्राज्याची अन् अहिल्यादेवींच्या आदर्श राज्यकारभाराची जाणीव होईल. अन् त्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल. खरंतर महायुती सरकारने पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अर्पण केलेली हीच खरी आदरांजली होय.

बंधू भगिनींनो, अल्पवयात विधवा झालेल्या एका स्त्रीनं सर्वधर्मसमभावाची कास धरून सन 1765 ते 1795 अशी तब्बल 30 वर्षे इंदूर संस्थानावर अधिराज्य करून भारतीय इतिहासात जणू एक विक्रमच नोंदविला. राजमातेचा मानवतावादी दृष्टिकोन सर्वधर्मीयांना प्रिय होता. मुस्लिम समाजाचे लोक तर अहिल्यादेवींच्या इंदूर संस्थानच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मशिदीत नमाज अदा करून दुवा मागत असत. म्हणूनच सकल जनमानसात पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी असे सन्मानाने म्हटले जात असे. अहिल्यादेवी म्हणजे मानवी जीवनातला अज्ञान, अध:कार, दुःख दूर करून त्यास प्रकाशमान करणारी दिव्यज्योत होती. राज्यातील सर्वधर्मीय जनतेच्या वतीने पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली अन् त्रिवार वंदन!

00000

लेखक: रणवीर राजपूत, ठाणे

निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी

 

महिलांच्या तक्रारींना पोलीस विभागाने तात्काळ प्रतिसाद द्यावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.३०  : मानसिक त्रासाच्या, छेडछाडीच्या तसेच हुंड्याबाबतच्या पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या महिलांच्या प्रत्येक तक्रारीला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद द्यावा व दोषींवर कडक कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोलीस विभागाच्या शिवतेज सभागृहात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा घेतला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

महिला पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, महिलांच्या येणाऱ्या तक्रारी संवदेनशिलपणे हातळाव्यात. जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने पर्यटक कास पुष्प पठार, ओझर्डे, सडावाघापूरी धबधब्याकडे येत आहेत. या पर्यटकांना हुल्लडबाजांकडून त्रास होणार नाही यासाठी पोलीस तैनात करावेत.

पोलीस विभागाला जीथे जीथे मदतीची आवश्यकता असेल त्या त्या वेळेस पालकमंत्री म्हणून संपूर्ण सहकार्य केले जाईल. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था आणखी चांगल्या पद्धतीने राखावी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस विभागाने कामांची उंची वाढवावी, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

0000

औद्योगिक आस्थापनांच्या माध्यमातून कुशल मुनष्यबळाची निर्मिती व्हावी : मंत्री मंगलप्रभात लोढा

नाशिक, दि. 30 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :  औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्यातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणे व संस्थांचा दर्जावाढ करून विकास करणे हे धोरण शासनाने निश्चित केले आहे. औद्योगिक आस्थापनांनी खाजगी भागीदारी धोरणाद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना दत्तक घेवून कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन कौशल्य विकास, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
आज शहरातील निमा हाऊस, सातपूर येथे आयोजित ‘इंडस्ट्रीयल मिट’मध्ये मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार डॉ.शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे,  निमाचे अध्यक्ष आशिष नहार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य चे सचंलालक सतीश सूर्यवंशी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल गावित,  निमा सचिव राजेंद्र अहिरे, कौशल्य विकासचे प्र. उपायुक्त श्री. रिसे, उपसंचालक आर एस मुंडासे यांच्यासह औद्योगिक आस्थापनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार औद्योगिक संघटना, उद्योग व त्यांचे ट्रस्ट, केंद्र किंवा राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम व स्वयंसेवी संस्था यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेण्याचा अधिकार आहे. दत्तक घेण्याच्या 10 वर्षे कालावधीसाठी आर्थिक सहभाग किमान 10 कोटी व 20 वर्षे कालावधीसाठी आर्थिक सहभाग 20 कोटी रूपयांचा असणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) धोरणात्मक भागीदार म्हणून काम करणार असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना त्यांचे स्थान, मूल्यांकन आणि संभाव्यतेच्या आधारे तीन याद्यांमध्ये विभागले जाणार असून त्यांच्या जागेची  व इमारतीची मालकी शासनाकडे राहील. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांबाबत शासनाची धोरणे कायम राहणार आहेत. प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक पर्यवेक्षण समिती (आयएमसी) असेल जिथे नवीन येणार भागीदार अध्यक्ष असेल तर सचिव आय.टी.आय.चे प्राचार्य/ उपप्राचार्य अथवा शासनाने नियुक्त केलेली व्यक्ती असेल. या संदर्भात कोणताही वाद मिटविण्यासाठी राज्यस्तरीय संचलन समिती असणार आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी उपस्थित औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

जनसुनावणी संपन्न
मंत्री श्री. लोढा यांच्या उपस्थितीत आज दुपारी भोसला मिलिटरी स्कूलमधील सभागृहात कौशल्य, रोजगार, उद्योजकता नावीण्यता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जनसुनावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार सीमा हिरे, संचालक श्री. सूर्यवंशी, सहसंचालक अनिल गावित आदी उपस्थित होते. मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले की, विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा नावलौकिक उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.
०००००

प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषिमंत्र्यांनी साधला संवाद

छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका) – शेती हा व्यवसाय अधिकाधिक किफायतशीर व्हावा. कृषी विभागाचे सर्व निर्णय हे शेतकऱ्यांना मदत करणारे व हिताचे व्हावे. यादृष्टीने शेतकऱ्यांच्या सुचना ऐकून त्यास शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज येथे केले.

कृषी विभागाच्या वतीने प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आयोजीत करण्यात आला होता.  जालना रोडवरील शिवनेरी लॉन येथे हा कार्यक्रम पार पडला.  छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकरी या परिसंवादात सहभागी झाले होते.विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर व लातूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री ॲड. कोकाटे हे होते. आ. अनुराधा चव्हाण, कृषी आयुक्त सुरज मांढरे, स्मार्टचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, संचालक आत्मा अशोक किरनळ्ळी , विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख तसेच सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिसंवादात कापुस, मका, सोयाबीन,फळबाग , संरक्षित शेती, मसाला शेती, शेतकरी गट-उत्पादक कंपनी, अन्न प्रक्रिया उद्योग, शेती पुरक व्यवसाय, नैसर्गिक शेती  करणाऱ्या शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले होते. त्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गटामार्फत मांडलेल्या सुचना कृषीमंत्र्यांनी ऐकल्या. या सुचनांची नोंद घेण्यात आली.

ॲड. कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती करतांना आलेले अनुभव, विद्यापीठांनी केलेल्या शिफारसी, बाजारपेठ इ. सर्व बाबींचा एकत्रित अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रशासनाचे कृषी शास्त्रज्ञ व विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांचे पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांना माती परिक्षण सुविधा अधिक जवळ उपलब्ध व्हावे यासाठीही शासन प्रयत्नशील असून फिरत्या प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या सेंद्रीय शेती मालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र मॉल शासनाच्या जागेवर बांधण्यात येणार आहेत,असेही ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

डॉ. हेमंत वसेकर यांनी सांगितले की, लातूर येथे १० हजार मे. टन शेती उत्पादन साठवता येतील असे सायलो  तयार करण्यात येत आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना  शेतमाल साठवणुकीची सुविधा उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अटीशर्तीतील बदल, पिकांसाठीच्या वाणांची उपलब्धता, यंत्रांची अनुदानावर उपलब्धता अशा विविध सुचना मांडल्या. शेतातील मजूरीचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा, प्रामुख्याने फळबागांसाठी  अस्तरीकरणासह शेततळी, निर्यात सुविधा केंद्र उभारणी, हळद, अद्रक अशा पिकांची आधारभूत किंमत निश्चित करणे, मक्याचे वाण विकसित करणे, संरक्षित शेतीसाठी विमा योजना, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना एमआयडीसीत जागा मिळण्यात आरक्षण, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अनुदानात ३५ टक्क्यांवरुन ६० टक्क्यांपर्यंत वाढ, शेती प्रक्रिया उद्योग, सेंद्रीय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा विक्रीची सुविधा, शेतमाल वाहतुकीसाठी वाहन खरेदीसाठी अनुदान अशा विविध मागण्या मांडल्या.

०००००

शेतकऱ्यांनी विकसित कृषी संकल्प अभियानाचा लाभ व्हावा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.३० (जिमाका) : भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्यावतीने जिल्ह्यात दि.२९ मे ते १२ जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कृषी शास्त्रज्ञ थेट गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते दिग्रस येथे जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ मयूर ढोले, कृषी उपसंचालक राहुल चव्हाण, कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.नंदकिशोर हिरवे, श्री.चांदुरकर, पुसदचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, दारव्हाचे उपविभागीय कृषी अधिकारी संध्या सावंत, दिग्रसचे तालुका कृषी अधिकारी श्री.राजपूत, इफकोचे जिल्हा प्रतिनिधी संतोष फलटणकर उपस्थित होते.

कृषी विभागाच्या सर्व यंत्रणांनी गावे, वाड्या- वस्त्या येथे जाऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करावे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर शास्त्रज्ञांनी उपाययोजना सूचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री.राठोड यांनी केले. सोबतच चित्ररथाद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांचा सहभाग जास्तीत जास्त वाढवावा, असे सांगितले.

कृषी तंत्रज्ञानाच्या गावोगावी जनजागृतीसाठी विकसित कृषी संकल्प अभियान कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन- अफ्रो व ईफ्को यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

अभियान जिल्ह्यातील २०० गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान चर्चा सत्राद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे करिता कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, दोन्ही कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी होणार असून शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, तालुक्यात काम करणारे प्रगतीशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचा सुद्धा सहभाग असणार आहे.

000

 

राज्य, धर्म व भाषेपेक्षा मातृभूमीचा अधिक अभिमान बाळगावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

  • उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल राज्यपालांकडून स्वारातीमच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप

मुंबई, दि. ३०: गोवा राज्याच्या मूळ लोकसंस्कृतीचे संगीत व लोककलेच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने आपल्या राज्याचा, धर्माचा व आपल्या भाषेचा अभिमान अवश्य बाळगावा परंतु, सर्वाधिक अभिमान मातृभूमीचा बाळगला पाहिजे, असे सांगितले.

राजभवन येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत गोवा राज्य स्थापना दिवस (30 मे) तसेच तेलंगणा राज्य स्थापना दिवस (2 जून) संयुक्तरित्या साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

दोन्ही राज्यांचे राज्य स्थापना दिवस हे भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून साजरे करण्यात आले. गोवा राज्य स्थापना दिनाचे आयोजन महाराष्ट्र राजभवनाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (स्वारातीम) यांच्या सहकार्याने केले होते, तर तेलंगणा राज्य स्थापना दिनाचे आयोजन मुंबई आंध्र महासभा व जिमखाना या संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले.

गोवा म्हटले की लोकांना पाश्चात्य संस्कृती आठवते. परंतु स्वारातीमच्या विद्यार्थ्यांनी गोव्याचे ढालो नृत्य व दिवली नृत्य सादर करून तेथील मूळ भारतीय संस्कृतीची आठवण करून दिली. हे सादरीकरण अपूर्व होते या शब्दात राज्यपालांनी  स्वारातीमच्या विद्यार्थ्यांना तसेच सांस्कृतिक चमूला कौतुकाची थाप दिली.

प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना नादिया हिने ‘नटराज नाट्यहेला’ शास्त्रीय नृत्य  सादर करून मंत्रमुग्ध केले या शब्दात राज्यपालांनी तिचे कौतुक केले.

युरोपमधील देशांमध्ये भाषिक विविधता आहे. तेथील देशांनी सामायिक हितासाठी युरोपियन युनियन तयार केली. भारतात अनेक राज्ये व अनेक भाषा आहेत. या सर्व राज्यांमधील सांस्कृतिक एकता हे आपले बलस्थान आहे. या एकतेमुळेच भारताचे आज जगात महत्त्व आहे, असे सांगून जगाशी स्पर्धा करण्यासाठी ही एकता टिकवली पाहिजे.

सन २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. मात्र, जगावर राज्य न गाजवता भारत आपल्या शक्तीचा वापर मानवतेची सेवा करण्यास करील, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्वारातीमचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांचा तसेच मुंबई आंध्र महासभेचे अध्यक्ष एम. कोंडा रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले तर कक्ष अधिकारी जयेश ठाकूर यांनी आभार मानले. यावेळी मुंबईतील तेलंगणाच्या महिलांनी तेलंगणाचे बथकम्मा नृत्य सादर केले.

या कार्यक्रमात दोन्ही राज्यांचा इतिहास आणि वारसा दर्शविणारे लघुपट दाखवण्यात आले.

स्वारातीमचे प्रकुलगुरु डॉ. अशोक महाजन, मुंबई आंध्र महासभा आणि जिमखान्याचे सरचिटणीस यापुरम वेकटेश्वर, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, स्वारातीम विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व विद्यार्थी आणि मुंबईत राहणारे मूळचे तेलंगणा राज्याचे गणमान्य नागरिक उपस्थित होते.

०००

पापडाच्या चवीतून आत्मनिर्भरतेची चव!

दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महागाई आणि सततच्या संकटांमुळे शेती करणारा माणूस दिवसेंदिवस हतबल होत चालला असताना, जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामीण महिलेनं या संकटांवर मात करत स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. शेतीसह अन्नप्रक्रिया उद्योगाचा हातभार लावून तिनं फक्त स्वतःलाच नव्हे तर इतर ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे. ही यशोगाथा आहे सौ. ज्योती प्रकाश पाटील यांची!

शेतातून उद्योगाचं बीज…

देवगाव-देवळी ता. अमळनेर येथील ज्योती पाटील या पारंपरिक शेतकरी कुटुंबातील. सततच्या निसर्गाच्या लहरींना सामोरं जात, शेतीतून फारसा फायदा होत नसल्याने, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत काही तरी वेगळं करून मदतीचा हात द्यायचा हे त्यांनी मनोमन ठरवलं.

घरात उडदाची, नागलीची आणि आंब्याची शेती असल्याने त्यांनी अन्नप्रक्रिया उद्योगात संधी शोधली. पापड, लोणचं, आवळा सरबत वगैरे तयार करण्यासाठी कच्चा माल घरचाच, त्यामुळे त्यांचं गणित सुचत गेलं.

शासन योजनांचं सक्षम पाठबळ…

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून आर्थिक मदत, मशीनरी खरेदीसाठी अनुदान आणि मार्गदर्शन मिळालं. एकूण 10 लाख रुपयांचा प्रकल्प उभारण्यात आला, त्यातील 7 लाख रुपयांची पापड निर्मिती यंत्रणा शासनाच्या 30% अनुदानासह साकारण्यात आली.

घराच्या धब्यावर उभारलेल्या शेडमध्ये “कुलस्वामिनी पापड उद्योग” या नावाने ज्योतीताईंनी त्यांचे पती प्रकाश पाटील यांच्या मदतीने 2020-21 पासून हा उद्योग सुरु केला.

रोजगारी व उत्पादन क्षमता…

प्रारंभी लहान प्रमाणात सुरू झालेला हा उद्योग आता दरमहा 70 हजार रुपयांपर्यंतचे उत्पादन देत आहे. विशेष म्हणजे, हे उत्पादन संपूर्ण सेंद्रीय व रसायनमुक्त असल्यामुळे ग्राहकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पाच प्रकारचे पापड, विविध प्रकारचं लोणचं, आवळा कँडी, मुरब्बा आणि सरबत अशा उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते.

ज्योतीताईंचा माल आज इंदोर, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, सुरत या शहरांमध्ये जातो. स्थानिक बाजारपेठ आणि वैयक्तिक जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी मजबूत ग्राहकवर्ग उभा केला आहे.

ग्रामीण महिलांसाठी प्रेरणास्त्रोत…

या उद्योगामुळे आज ३ ते ४ महिलांना स्थायी रोजगार मिळाला आहे. गावातील अनेक महिलांनी त्यांचा प्रकल्प प्रत्यक्ष पाहून प्रेरणा घेतली आहे. ‘उमेद’ योजनेतून काही महिलांनी मसाला उद्योग, शेवया बनवणे इ. व्यवसाय सुरू केले आहेत. म्हणजेच ज्योतीताईंनी फक्त स्वतःचा विकास केला नाही, तर इतरांना विकासाची दिशाही दिली आहे.

आत्मनिर्भर महिला…

कोणतीही मोठी शैक्षणिक पदवी नसताना, ग्रामीण भागात राहूनही, पारंपरिक जीवनशैलीतून बाहेर पडत ज्योतीताईंनी दाखवून दिलं आहे की – संकटं आली तरी संधी शोधता येते. त्यांच्या या यशस्वी वाटचालीत कौटुंबिक पाठिंबा, शासनाची मदत, आणि स्वतःचा धैर्यशील दृष्टिकोन यांचा फार मोठा वाटा आहे.

आज “कुलस्वामिनी पापड उद्योग” फक्त एक व्यवसाय राहिलेला नाही, तर ग्रामीण भागातील महिलांसाठी तो एक दीपस्तंभ बनलेला आहे – स्वावलंबनाचा, जिद्दीचा आणि आत्मनिर्भरतेचा!

०००

– जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यात एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्याना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्‍यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

या बाबत नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येऊन या बाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर सादर करावा, याचा निधी प्राप्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. बाधितांना तातडीने नुकसान भरपाई व्हावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांना व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळामुळे जिल्ह्यातील 1 हजार 174 बाधित गावामधील 794  हेक्टर केळी, संत्रा, पपई, कांदा आणि गहू शेतीचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे 2 कोटी 83 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मे मध्ये 325  गावामधील 13  हजार 639 हेक्टर मूग, तिळ, केळी, संत्रा, पपई, कांदा, ज्वारी, लिंबू पिकांचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे.

मे मध्ये वीज पडून 3 मनुष्य जीवित हानी झाली आहे, तर घरांच्या नुकसानीत एप्रिल मध्ये अंशतः 18 आणि 1 घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. मे मध्ये 741 घरांची पडझड झाली असून 14 घरांचे पूर्णत: पडझड झाली आहे. 12 गोठे आणि झोपडीचे नुकसान झाले आहे. मे मध्ये 29 लहान जनावरे आणि 12 मोठे पशूधन मृत झाले आहे. मृत व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान आणि मृत जनावरांच्या मालकांना पशुधन सहाय्य अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन, पंचनामे आणि मदत कार्याला गती दिली असून  बाधित शेतकऱ्यांना आणि नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रशासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून निर्देश देण्यात आले आहे .

00000

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ‘खासदार परिचय पुस्तिका’ प्रकाशित

नवी दिल्ली, दि. ३०  : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्र निर्मित ‘खासदार परिचय पुस्तिका’चे प्रकाशन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आयुष भवन, नवी दिल्ली येथे आज पार पडले. यावेळी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, मंत्री महोदयाचे अपर खासगी सचिव राहुल साळुंखे उपस्थित होते.

प्रतापराव जाधव म्हणाले की, महाराष्ट्र परिचय केंद्राने अतिशय उपयुक्त आणि जनसामान्यांसाठी प्रभावी असा उपक्रम हाती घेतला आहे. लोकप्रतिनिधींची माहिती एकाच ठिकाणी मिळणे ही काळाची गरज असून, ही पुस्तिका माहितीच्या पारदर्शकतेस हातभार लावेल. अशा उपक्रमांमुळे जनसंपर्क अधिक प्रभावी होत असून शासनाच्या प्रयत्नांना दिशा मिळते.

या पुस्तिकेत  महाराष्ट्रातील  लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची तपशीलवार माहिती समाविष्ट करण्यात आली असून, त्यामध्ये खासदारांचे नाव, जन्मतारीख, नवी दिल्ली व मतदार संघातील निवासी पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ता, स्वीय सहायकांचे संपर्क क्रमांक तसेच सोशल मीडिया हँडल्स यांचा समावेश आहे. ही माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देत जनता आणि लोकप्रतिनिधींसोबत यांच्यातील संवाद अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याचा उद्देश या उपक्रमाने साध्य होत आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राने यापूर्वीही अनेक उपयुक्त उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. दिल्ली डिरेक्टरीसह 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित करण्यात आलेली ‘लोकसभा पूर्वपिठीका’ ही पुस्तिका याच केंद्राची कल्पकता आणि गुणवत्ता अधोरेखित करणारी ठरली होती. त्या यशाची परंपरा ‘खासदार परिचय पुस्तिका’ ने ही समर्थपणे नेण्याचे प्रामाणिक प्रयत्न कार्यालयाकडून  करण्यात येत आहेत.

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी उपसंचालकअमरज्योत कौर अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल रामेश्वर बर्डे, सहायक ग्रंथपाल निलेश देशमुख आणि दीपक देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली.

ही पुस्तिका शासकीय विभाग, माध्यम प्रतिनिधी, संशोधक आणि जनतेसाठी एक विश्वासार्ह संदर्भस्रोत म्हणून कार्य करणार असून, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उदाहरण ठरेल.

०००

अमरज्योत कौर अरोरा/

ताज्या बातम्या

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे...

0
पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी...