मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 6

सुकर व गतिमान प्रशासन

बदल हा सृष्टीचा नियम आहे, मग तो स्वभावाचा असो की कामकाजाचा. बदलत्या काळानुसार चालणे आज अत्यावश्यक झाले आहे. पहिले ‘सरकारी काम…अनं सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित होती. आता मात्र ती कालबाह्य ठरली आहे. माहिती आणि तत्रंज्ञान तसेच समाज माध्यमांमुळे प्रशासन लोकाभिमुख होत असल्याची प्रचिती येत आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सरकार सत्तारुढ झाल्याबरोबर प्रशासनातर्फे नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व शासकीय विभागांना 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आखून दिला. मग काय, राज्यातील संपूर्ण प्रशासन झपाट्याने कामाला लागले.

राज्य शासनाच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय विभागांमध्ये एकप्रकारची स्पर्धाच या 100 दिवसांत अनुभवास आली. या स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र दिनी जाहीर झाला आणि संपूर्ण राज्यातून बाजी मारली आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी. सात निकषांवर आधारीत उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत 84.29 गुण घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात सर्वोत्कृष्ट ठरले. ही फलश्रृती आहे जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या नियोजनाची आणि सुकर व गतीमान प्रशासनाची.

संकेतस्थळ : जिल्हा संकेतस्थळ हे वापरण्याकरिता सुलभ असून त्यावर विषयनिहाय माहिती अद्यावत करण्यात आली आहे. कार्यप्रणाली, शासन निर्णय, पर्यटन स्थळाची माहिती, 112 हेल्पलाइन क्रमांक, इत्यादीचे अद्यावतीकरण केले आहे. तसेच राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची /प्रकल्पांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकसेवा हक्क अधिनियम – 2015 अंतर्गत नियम व अधिसूचित 17 सेवा स्वतंत्र टॅबद्वारे मुख्य पृष्ठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाची सुसंवाद : या अंतर्गत केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येतो. पीएम किसान योजनेचे एकूण 2 लक्ष 45 हजार 855 पैकी 2 लक्ष 29 हजार 280 असे 93.25 टक्के लाभार्थ्यांचे ॲग्रीस्टॅक शेतकरी आयडी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेअंतर्गत 100 टक्के निधी पी. एफ. एम. एस. प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला आहे. केंद्रीय योजनांसाठी केंद्राचा हिस्सा प्राप्त करून घेणे तसेच राज्याचा निधी अर्थसंकल्पीत करून घेण्याची कारवाई वेळोवेळी होत आहे.

स्वच्छता : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत अभिलेखांचे निंदनीकरण करून 21,443 नसतींचे अ, ब, क, ड वर्गवारीत वर्गीकरण करण्यात आले आहे. निंदनीकरणानंतर मुदतबाह्य 2858 संचिका नष्ट करण्यात आल्या आहेत. जडवस्तू संग्रह नोंदवही 31 मार्च 2025 पर्यंत अद्ययावत झाल्या आहेत.  जुन्या निर्लेखित व निरुपयोगी 197 वस्तू व साधन सामग्री यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. 10 जुने वाहनांचे निर्लेखन करून 2 लक्ष 55 हजार 218 इतका निधी प्राप्त झाला. सदर निधी शासन जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे

जनतेच्या तक्रारीचे निवारण : ‘आपले सरकार पोर्टल’ व ‘पीजी पोर्टल’ अंतर्गत अंतर्गत 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या 100 टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. अभ्यागतांना भेटीकरिता सोमवार, बुधवार व शुक्रवार हे दिवस सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंतचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. तसे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहे. लोकशाही दिनातील एकूण 17 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

कार्यालयीन सोयी सुविधा : कायमस्वरूपी कर्मचारी व अभ्यागतांकरिता स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ प्रसाधनगृहाची सुविधा करण्यात आली आहे. अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतीक्षालय, बसण्यासाठी सोफा, पंखा, कुलर तसेच वाचनासाठी वर्तमानपत्र व मासिके ठेवण्यात आली आहे. कार्यालयाच्या आतमध्ये झाडांच्या कुंड्याद्वारे सुशोभिकरण तसेच प्रवेशद्वारावर व्हर्टीकल गार्डन व सुसज्ज पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्तनमाता व महिला यांच्याकरिता हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 कामकाजातील सुधारणा : जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय येथे 100 टक्के ई -ऑफिस प्रणालीचा वापर सुरू आहे. या प्रणाली द्वारे 100 टक्के नस्ती निकाली काढण्यात आली आहे. वृत्तपत्रातील शासनाविरुद्ध प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांबाबत जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत संबंधित विभागातर्फे तात्काळ खुलासा मागून स्पष्टीकरण खुलासा नियमित प्रसिद्ध करण्यात येतो.

अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर : नव्याने सेवेत प्रविष्ट झालेले एकूण 106 ग्राम महसूल अधिका-यांना विविध विषयांबाबत प्रशिक्षित करण्यात आले. जिल्ह्यातील शिपाई, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक व सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी महसूल सेवक, वाहन चालक या संवर्गाच्या दिनांक 1 जानेवारी 2025 या अहर्ता दिनांकावर आधारित सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाज अचूक होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चॅटजीपीटी, ग्रोक व इतर ए.आय. ॲप्स विषयी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन : उद्योजकांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्याकरिता इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. 11 एप्रिल 2025 रोजीच्या जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये 17431 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून 14 हजार 100 रोजगार निर्मिती होईल. गतवर्षीच्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल समीटमध्ये झालेल्या 76,410 कोटीचे सामंजस्य करार अंमलबजावणीसाठी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्योगांना आवश्यक परवानगीबाबत मानद कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्यात असून जमिनीचा वापर व हस्तांतरणबाबत आवश्यक शासन निर्णय, आदेश, परिपत्रकासह या कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच मोबाईल चॅटबोटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रम : लोकसेवा हक्क अधिनियम -2015 अंतर्गत अधिसूचित 57 सेवा ऑनलाईन व ऑल-इन-वन मोबाईल ॲपद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, जन्ममृत्यू व विवाह प्रमाणपत्रासह विविध सेवा आणि करभरणा करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने 24 बाय 7 व्हाट्सअप चॅटबोटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शस्त्र परवाना व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत अर्ज करण्यापासून परवाना मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे.

बळीराजा समृद्धी मार्ग /पाणंद रस्ता अंतर्गत जिल्ह्यात 5001 कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. मोरवा (चंद्रपूर) येथे फ्लाईंग क्लब कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गम, आदिवासी विद्यार्थ्यांना सहज शक्य नसलेले वैमानिक प्रशिक्षण कमी खर्चात उपलब्ध झाले असून चांगल्या पगारावर नोकरीची संधी उपलब्ध होईल. ‘महसूल मित्र’ अंतर्गत नागरिकांना महसूल विभागातील 68 सेवांची माहिती तात्काळ उपलब्ध होईल. प्रत्येक सेवेकरिता आवश्यक अर्ज, कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रबाबत माहिती तसेच प्रत्येक प्रमाणपत्रासाठी हायपर लिंक उपलब्ध करून दिल्याने अर्ज करण्यापासून प्रमाणपत्र मिळेपर्यंतची प्रक्रिया सुलभ झाली आहे.

राजेश का. येसनकर

जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

“टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

मुंबई, दि. ४ : प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”  दि. ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे.  कृत्रिम बुद्धिमत्ता(AI), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या

अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक  दि.५ मे २०२५ रोजी  सकाळी ११:०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ९ मे रोजी  दुपारी ३.०० या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

‘टेक वारी’ म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी  होय. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असून ‘टेक वारी’ ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. या ‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम टेक वारीच्या

https://www.youtube.com/@TECH-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80

या यू ट्यूब चॅनलवर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/MahaDGIPR) पाहता येतील.

पहिल्या दिवशी दि. ५ मे रोजी मंत्रालयातील त्रिमुर्ती  येथे ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर श्री.प्रभु गौर गोपाल दास मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान” या विषयावर केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या श्रीमती देबजानी घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील समिती सभागृह (कक्ष ३), ७ वा मजला येथे”शासकीय कामकाज डिजिटल पद्धतीने कसे करावे” या विषयावर मायक्रोसॉफ्ट,नॅसकॉमचे श्री. मंदार कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला “कृत्रिम बुद्धिमत्ता” याविषयी नवी दिल्लीचे  माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग यांचे व्याख्यान होणार आहे.

मंगळवारी दि.६ मे २०२५ सकाळी ११:३० ते १२:३० परिषद सभागृह, ६ वा मजला येथे ‘तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला येथे कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे.  दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “भाषिणी-भाषेचा अडसर दूर करणे” या विषयावर  डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच २:०० ते ३:०० त्रिमुर्ती प्रांगण येथे “प्रवास पाककृतींचा” या विषयावर डिजिटल जगातील महाराष्ट्रीयन पाककृतींची प्रणेती श्रीमती मधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला येथे समिती क्रमांक ३ मध्ये “इंटरनेट ऑफ थींग्ज (Internet of Things)” या विषयावर व्याख्यान होणार आहे.दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी” नेसकॉमचे लौकिक रग्जी यांचे व्याख्यान होणार आहे.

बुधवार दि.७ मे २०२५   तिस-या दिवशी सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे ‘सायबर सुरक्षा: या विषयावर नेस्कॉमचे प्रसाद देवरे आणि सुकृत घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत त्रिमूर्ती प्रांगण मंत्रालय येथे आहार तज्ञ ऋतुजा दिवेकर यांचे ‘आरोग्यदायी जीवनशैली’या विषयावर व्याख्यान होणार आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत ‘फ्रंटियर तंत्रज्ञानाद्वारे प्रशासन नव्याने परिभाषित करणे’ या विषयावर केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांचे व्याख्यान होणार आहे.  दुपारी ३ ते ४ या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला समिती सभागृह क्रमांक तीन येथे ‘स्मार्ट बैठक आयोजित करणे’या विषयावर  झूम नेस्कॉमचे शैलेश रंगारी, मेहेर उल्ली पालेम यांचे व्याख्यान होणार आहे.

गुरुवार दि.८ मे २०२५ – चौथ्या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत “शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर” या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला मंत्रालय विस्तार येथे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त नागपूरच्या विजयालक्ष्मी बिदरी, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम,  पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांचे या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी २ ते ३ या वेळेत त्रिमुर्ती प्रांगण येथे”जीवन संगीत” या विषयावर जीवन संगीत समर्थक संतोष बोराडे यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला, समिती कक्ष क्रमांक ३ येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’या विषयावर नेस्कॉमचे मनीष पोतदार,सरस्वती गोल्लेरकरी यांचे व्याख्यान होणार आहे.  दुपारी ४:०० ते ५:०० परिषद सभागृह सहावा मजला येथे  ‘डब्यासाठीच्या आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती’या विषयावरती केटरिंग टेक्नॉलॉजी न्यूट्रिशन, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अन्वेषा पात्रा यांचे व्याख्यान होणार आहे.

शुक्रवार दि. ९ मे २०२५  पाचव्या दिवशी सकाळी १०:३० ते १:३० समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे वेळेत कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांचे “स्टार्टअप डेमो डे” या विषयी व्याख्यान होणार आहे.सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे नॅसकॉमचे श्रीमती प्राजक्ता तळवेलकर, सुची गुप्ता, राहुल मुलाने यांचे “डिजिटली सजग बना” या विषयी व्याख्यान होणार आहे.महाराष्ट्राच्या  संत परंपरां आणि भक्तिभावाला  उजाळा देणाऱ्या “ज्ञानाची वारी” या सांस्कृतिक कार्यक्रमाने ‘टेक वारीचा’ समारोप होणार आहे   दुपारी १२.३०  ते २.३० या वेळेत हा कार्यक्रम त्रिमूर्ती प्रांगण येथे होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टेक वारी या कार्यक्रमाचा समारोप दुपारी ३.०० वाजता होणार आहे.

‘फूड दॅट हील्स’ या उपक्रमांतर्गत पौष्टिक व पारंपरिक पाककृतींचे दररोज मेनू तयार केले जातील. तसेच  विविध क्षेत्रातील २४ स्टार्टअप्सचे सादरीकरण होणार आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना

विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व वर्गातील लोकांच्या विकासाबरोबरच अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात राहता यावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन विविध सामाजिक आणि शैक्षणिक, आर्थिक योजना राबवितात. भारतात राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायद्याअंतर्गत मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि झोरोस्ट्रियन (पारशी) या सहा धार्मिक समुदाय अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात.

परदेश शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या होतकरू व गुणवत्ताधारक मुलांना व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळवून देण्यासाठी त्यांना परदेश शिष्यवृत्ती योजना प्रदान करण्यात येते.

२०२५ – २६ या आर्थिक वर्षाकरिता १५.१५ कोटी रूपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आणि पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नाही, तसेच एकाच कुटुंबातील किमान दोन विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. ७५ विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची अथवा अन्य संस्थांकडून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.  प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा तसेच अभ्यासक्रमाचा कालावधी कमीत कमी दोन वर्षाचा असावा. एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांत प्रवेशित विद्यार्थी या योजनेस पात्र असणार नाहीत.

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित कायम अथवा विना अनुदानित अथवा विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येतात. सदर योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात  245 शाळांमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे.

अल्पसंख्यांक समाजातील होतकरू व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रम, तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी ५० हजार किंवा शैक्षणिक शुल्क तसेच १२ वी नंतरचे कला, वाणिज्य, विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ५ हजार रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.

राज्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकांना २० लाख, अ वर्ग नगरपालिकांना १५ लाख तर ब व क वर्ग नगरपालिकांना  १० लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते.

राज्यातील अल्पसंख्याकांना शिक्षण, आरोग्य, निवास सुविधा, रोजगार, पतपुरवठा व इतर मुलभूत सुविधाप्राप्त करण्यासाठी सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या विविध प्रश्नांबाबत संशोधन करून त्यावर उपाययोजना करणे. यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी व जैन विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख व्यावसायिक शिक्षण देणे. मुंबईतील मांडवी, उपनगरमधील चांदिवली येथे व राज्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या/तिसऱ्या पाळीत अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. ४४१६ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये दुसऱ्या पाळीत अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण देण्यात येते.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहारासाठी ०.४० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत वसतीगृह, शाळा इमारत, इत्यादी संस्थाद्वारे अल्पसंख्यांक बहुल जिल्ह्यातील लोकांच्या एकंदर राहणीमानाचा दर्जा उंचावणे, मुलभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तरात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी राज्य हिस्सा ८० कोटी, केंद्र हिस्सा १२० कोटीची निधीची तरतूद करण्यात आली आहे.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीसाठी वसतिगृह योजनेअंतर्गत मुलींसाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध करून मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी ३ कोटी निधीची तरतूद करण्यात आली. २५ जिल्ह्यांमधील ४३ शहरे अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रे घोषित केली आहेत. अशा २५ जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी शासकीय सेवा भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग तसेच मराठी भाषा फाउंडेशन वर्ग चालविले जातात. तसेच आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहाय्‍याने अल्पसंख्यांक महिलांचे मागासलेपण दूर करण्यासाठी स्वयंसहाय्यता गटांकरिता अनुदान देण्यात येते.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात १९० पात्र मदरसांना एकूण ११.५५ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला.  १६५ मदरसांमध्ये विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देण्यात येते.

राज्यात उर्दू भाषेची वाड्.मयीन प्रगती, मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत यामध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड्.मयीन विकास व्हावा यासाठी उर्दू घर नांदेड, मालेगाव, सोलापूर येथे कार्यान्वित असून नागपूर येथे काम सुरू आहे.

याचबरोबर अल्पसंख्यांक लोकसमुहाकरीता धर्मक्षेत्र व परिसर विकास आराखडा योजना, महिला बचत गटातील सदस्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, महिला व युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, पोलीस भरती पूर्व परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याकरिता अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने योजना राबविण्यात येतात.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणे ही केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रगतीची बाब नाही तर ती संपूर्ण समाजाच्या विकासाची दिशा आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समूहातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या परदेश शिक्षणाच्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जीवनाला नवी दिशा द्यावी.

 

श्रद्धा मेश्राम

सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे.

साहित्य अकादमीमार्फत १९८९ पासून मान्यताप्राप्त २४ भारतीय भाषांपैकी प्रत्येकी २४ भाषांमध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.

साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दरवर्षी भारतीय अनुवादकांनी आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, उर्दू आणि तेलुगू या भाषांमध्ये अनुवादित केलेल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो.

हे पुरस्कार एका दिमाखदार समारंभात प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे आहे.

साहित्य अकादमी यांनी भारतीय अनुवादकांना, त्यांच्या हितचिंतकांना आणि प्रकाशकांना २०२५ च्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठी मान्यताप्राप्त सर्व २४ भारतीय भाषांमध्ये अनुवादित पुस्तके सादर करण्याचे आमंत्रण दिले आहे. २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये (म्हणजे १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान) प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

प्रत्येक पुस्तकाच्या १ प्रतीसह अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. पुरस्काराची सविस्तर माहिती,  www.sahitya-akademi.gov.in  या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे अकादमीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

००००

अंजू निमसरक,मा.अ/वि.वृ.क्र.100 /दि.03.05.2025

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ‘ क्रिएट इन इंडिया’ या स्पर्धेतील विजेत्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे सकाळी १०  ते सायंकाळी ६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

या परिषदेत मास्टरक्लास सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1.30 पर्यंत क्रीटोस्फीअर स्टेज, दालन क्रमांक 204 ए मध्ये विविध मनोरंजन क्षेत्राविषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेव्ह एक्स या सत्रामध्ये स 10 ते 11.40 दरम्यान दालन क्रमांक 104 बी येथे मनोरंजन क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नवनवीन तंत्रज्ञान यावर चर्चासत्रे होतील.

०००

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस आशय निर्मिती जागतिक स्तरावर  प्रभावशाली  ठरते, असे मत ज्येष्ठ निर्मितीतज्ज्ञ डिबेरा रिचर्ड्स यांनी व्यक्त केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित “वेव्हज २०२५, दृकश्राव्य मनोरंजन समिट”मध्ये टेलिव्हिजन आणि ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील MPA अहवाल या विषयावर आयोजित परिसंवादात रिचर्ड्स बोलत होत्या.  या परिसंवादात केलेय डे, केवीन वज्झ, डिबेरा रिचर्ड्स, केटीलीन यार्नल, जस्टीन वाररोके हे तज्ज्ञ सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन उर्मिला वेणूगोपालन यांनी केले.

मोशन पिक्चर असोसिएशन (MPA) टेलिव्हिजन आणि ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील अहवाल या क्षेत्राच्या नवोपक्रम, रोजगार निर्मिती आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवरच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकतो. या अनुषंगाने या परिसंवादात बदल्यात काळात टेलीव्हीजन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सक्षम ठरणार आहे, यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना कोणत्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित आशय ग्रहण करण्याची इच्छा होते, हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी ग्राहकांचा असणार आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. त्याचवेळी ग्राहकांकडून टेलिव्हिजन,ओटीटी किंवा त्यांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्क्रीनवर ते आपल्या आवडीनुसार आवश्यक तो मजकूर,आशय बघतील, ऐकतील, यामध्ये महत्त्वाची ठरणारी गोष्ट आहे. ती‌ त्या आशयाची गुणवत्ता आणि दर्जा, कारण आशय जितका‌ आकर्षक, उपयुक्त आणि माहितीपूर्ण पद्धतीने मांडला जाईल, त्यानुसार त्याला ग्राहकांची पसंती आणि बाजारपेठेत आपले स्थान बळकट करणे शक्य होईल, त्यामुळे उत्कृष्ट आशय निर्मितीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होणे आणि दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आशयाची संपन्नता सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरणारी बाब आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजा आणि त्यातील आशय निर्मितीचे मूल्य समजून घेणे, आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर जे प्रभावी, लक्षवेधक असते आणि ग्राहकांना भावते ते जागतिक पातळीवरही प्रकर्षाने यशस्वी ठरते. लोकल ते ग्लोबल हे सूत्र आशय निर्मिती करताना मध्यवर्ती असले पाहिजे, असे मत यावेळी परिसंवादात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

०००

वंदना थोरात/विसंअ/

 

‘आयआयसीटी’ची स्थापना भारतासाठी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी समर्पित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) – एक राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहकार्याला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला.

त्यांनी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला आणि सांगितले की, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आयआयटी आणि आयआयएम ज्या प्रकारे मापदंड बनले आहेत त्याचप्रमाणे आयआयसीटी या  क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे.

वेव्हज 2025 च्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आलेल्या घोषणेला मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज शिखर परिषदेदरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी औपचारिक रूप दिले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील व्यावसायिक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठे जागतिक दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी आयआयसीटी भारतातील आयआयटी आणि आयआयएमच्या कार्यपद्धतीचे अनुसरण करेल.

“चित्रपट आणि मनोरंजन विश्वात पूर्णपणे नवीन असा उपक्रम सुरू करणे. हा (उपक्रम) माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनविण्याचा प्रधानमंत्री यांचा दूरदृष्टिकोन असल्याचे वैष्णव म्हणाले. सहकार्य करण्याची तयारी दर्शविणाऱ्या उद्योग भागीदारांचे त्यांनी मनापासून आभार मानले. आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी अभ्यासक्रम विकास, इंटर्नशिप, शिष्यवृत्ती, स्टार्टअपना  निधीपुरवठा  आणि नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी आयआयसीटीसोबत भागीदारी करण्यास सहमती दर्शवल्याचे त्यांनी जाहीर केले.

“या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी करण्याची तयारी दर्शविल्याबद्दल मी सर्व उद्योग भागीदारांचे आणि त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले. ते म्हणाले की, ही संस्था उभी करण्यात आणि दीर्घकालीन वाढ टिकवून ठेवण्यास मदत करतील. मला आशा आहे की, आयआयसीटी  (AVGC-XR) क्षेत्रासाठी एक मोठी शैक्षणिक पायाभूत सुविधा बनेल. आम्ही आमच्या देशातील आयआयटी आणि आयआयएमसाठी तयार केलेल्या निकषांचे पालन करू, जेणेकरून ती जागतिक दर्जाची संस्था बनेल, असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

दीर्घकालीन सहकार्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओ स्टार ,ऍडोब , गुगल आणि यू-ट्यूब , मेटा , वाकॉम, मायक्रोसॉफ्ट  आणि एनव्हीआयडीआयए (NVIDIA) यांचा समावेश आहे.

या समारंभात उपस्थित असलेल्या उद्योजकांमध्ये रिचर्ड केरिस, (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक  मीडिया अँड एंटरटेनमेंट, एनव्हीडिया), संजोग गुप्ता (सीईओ, स्पोर्ट्स अँड लाईव्ह एक्सपिरीयन्सेस, जिओ स्टार), माला शर्मा (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक – एज्युकेशन, अ‍ॅडोब), प्रीती लोबाना (कंट्री हेड आणि उपाध्यक्ष, गुगल इंडिया), राजीव मलिक (वरिष्ठ संचालक, वॅकॉम), संदीप बांदीबेकर (सेल्स प्रमुख, राज्य सरकार आणि आरोग्यसेवा), संदीप बांदीवडेकर (संचालक, मेनस्ट्रीम सर्व्हिसेस पार्टनर्स, मायक्रोसॉफ्ट) आणि सुनील अब्राहम (संचालक, सार्वजनिक धोरण, मेटा) यांचा समावेश होता.

आयआयसीटीचे संचालक मंडळाचे  सदस्य आणि नियामक परिषदेचे  सदस्य आशिष कुलकर्णी, बिरेन घोष, मानवेंद्र शुकुल, मुंजाल श्रॉफ, चैतन्य चिंचलीकर आणि सुभाष सप्रू आज उपस्थित  होते. आयआयसीटीच्या कार्यकारी चमूमध्ये आयआयसीटीचे सीईओ डॉ. विश्वास देवस्कर, आयआयसीटीचे सीईओ  निनाद रायकर आणि आयआयसीटीच्या विपणन प्रमुख श्वेता वर्मा यांचा समावेश आहे.

या सत्रादरम्यान आयआयसीटी आणि आघाडीच्या उद्योग भागीदारांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी इरादा पत्रांचे आदानप्रदान करून भारतातील एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन सहयोगी प्रयत्नांचा शुभारंभ केला. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये जिओस्टार, अ‍ॅडोब, गुगल, यूट्यूब आणि मेटा यासारख्या आघाडीच्या  जागतिक उद्योग कंपन्यांचा समावेश होता.

अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, चित्रपट आणि विस्तारित वास्तवात शिक्षण, संशोधन आणि विकास आणि नवोन्मेषाला  चालना देण्यासाठी या सहकार्याची रचना केली आहे. भविष्यातील वाढीसाठी एक शाश्वत परिसंस्था विकसित करून सृजनशील आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताच्या यशस्वी आयटी मॉडेलची प्रतिकृती तयार करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू; आणि पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा हे करारांच्या आदानप्रदान प्रसंगी उपस्थित होते.

०००

सागरकुमार कांबळे/विसंअ/

 

 

तंत्रज्ञान, कायदा आणि जागरुकतेतून पायरसी विरोधात एकत्रित कारवाईचे तज्ज्ञांचे आवाहन

मुंबई, ०३: वेव्हज्‌ 2025 मध्ये, ‘पायरसी: तंत्रज्ञानाद्वारे आशय सामग्रीचे संरक्षण’ या विषयावरील चर्चेत आयपी हाऊसचे आशिया पॅसिफिक विभागाचे उपाध्यक्ष आणि प्रमुख नील गेन यांनी पायरसी एक चिंता नव्हे तर मुख्य प्रवाहातील धोका असल्याचे मत व्यक्त केले.

मीडिया पार्टनर्स आशियाचे व्यवस्थापकीय आणि कार्यकारी संचालक विवेक कौटो यांनी अनियंत्रित पायरसीमुळे होणारे आर्थिक नुकसान यावर मत मांडले. ऑनलाईन पायरसीमुळे उद्योगाला 2025 ते 2029 दरम्यान 10% पेक्षा जास्त महसूल गमावावा लागेल अशी शक्यता आहे. परंतु पायरसी विरोधी प्रभावी अंमलबजावणी केल्यास कायदेशीर व्हिडिओ सेवा वापरकर्त्यांमध्ये 25% तर आशय सामग्री गुंतवणुकीत 0.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ होऊ शकते, ज्यामुळे 2029 पर्यंत एकूण मूल्य 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढेल. विशेषतः भारताची डिजिटल व्हिडीओ अर्थव्यवस्था वाढत असताना त्यांनी हितधारकांना पायरसी संरक्षणापासून संभाव्यतेपर्यंत सर्व शक्यता पुन्हा मांडण्याचे आवाहन केले.

आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सच्या सहयोगी संचालक डॉ. श्रुती मंत्री यांनी डिजिटल पायरसी आणि सायबर क्राइम यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. पायरसीत अनेकदा ट्रोजन, रॅन्समवेअर आणि स्पायवेअर सारख्या द्वेषयुक्त साधनांचा समावेश असतो. खास करून 18 ते 24 वयोगटातील वापरकर्ते असुरक्षित असतात, असे त्यांनी निदर्शनास आणले. प्रतिबंधाची सुरवात माहितगार ग्राहकांपासून झाली पाहिजे हे नमूद करून त्यांनी व्यापक जनजागृती मोहिमा आणि शैक्षणिक उपक्रमांचे आवाहन केले. त्यांनी 9-10 जुलै रोजी सीबीआय आणि इंटरपोलच्या सहकार्याने आयएसबीद्वारे आयोजित डिजिटल पायरसीविरोधी शिखर परिषदेची घोषणा देखील केली.

डॅझन (DAZN) च्या पायरसीप्रतिबंधक कार्य विभागाचे प्रमुख अनुराग कश्यप म्हणाले की, रणनीती डिटेक्शन, डिस्रप्शन आणि डिटरन्स या  तीन ‘D’ वर म्हणजेच शोध, अडथळा आणि प्रतिबंध या तीन गोष्टीवर आधारित आहे. आम्ही थेट कार्यक्रम होण्यापूर्वीच अंमलबजावणी सुरू करतो. अदृश्य वॉटरमार्किंग लीक शोधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

जिओ हॉटस्टारचे लीगल प्रमुख आणि या कायद्याशी संबंधित बाबींचे तज्ज्ञ अनिल लाळे यांनी कठोर अंमलबजावणीचे महत्त्व स्पष्ट केले. “सर्वात मोठा प्रतिबंधक उपाय म्हणजे म्हणजे पायरसी करणाऱ्यांवर खटला चालवणे. कायद्याच्या अंमलबजावणीत नेमकी फट कुठे आहे हे ओळखणे आवश्यक असून वरवरची कारवाई करणे थांबवले पाहिजे,” ते म्हणाले. प्रतिबंध हा प्रतिक्रियात्मक ऐवजी सक्रियपणे करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

आनंद अँड आनंद असोसिएट्सचे प्रवीण आनंद यांनी, तंत्रज्ञान आणि न्यायिक सुधारणा या दोन्हीमध्ये उपाय त्यावर आहे, यावर मुद्द्यावर भर दिला. “एआय, ब्लॉकचेन आणि वॉटरमार्किंग सारखी साधने महत्त्वपूर्ण आहेत. परंतु मेटल डिटेक्टर सारख्या उपायांसह कॅमकॉर्डिंग करणे कठीण होईल असे देखील करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी वेळीच कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे,” ते म्हणाले.

परिसंवादातील सहभागी वक्त्यांनी. तंत्रज्ञान, कायदे, अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि सार्वजनिक जागरूकता डिजिटल आशयाच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी एकत्र काम करणारी संयुक्त आघाडी तयार करण्याच्या गरजेबाबत सहमती व्यक्त केली. WAVES 2025 मध्ये अशा चर्चांद्वारे, मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील अशा महत्त्वाच्या समस्यांवर करण्याजोग्या उपायांवर प्रकाश टाकला जात आहे.

०००

सागरकुमार कांबळे/विसंअ/

गेमिंग डिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरेल

मुंबई दि. ०३ : गेमिंग हे करमणुकीचे माध्यम आहे. मनोरंजनासोबत, गेमिंग आता केवळ करमणूक नसून डिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरत आल्याचे मत वेव्हज्‌ २०२५ मध्ये आयोजित वेव्हजएक्स या चर्चासत्रात मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज्‌-२०२५ समिटमध्ये वेव्हजएक्समध्ये ‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव्ह ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात या क्षेत्रातील तज्ञ दीपेन पारीख, ओथमान अलहोकैल (othman alhokail), शिवानंद पारे यांनी सहभाग घेतला.

गेमिंग हे आता केवळ करमणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते जगातील सर्वात प्रभावशाली  कंटेंट फॉर्म बनले आहे. भारतातही गेमिंग क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. भारतात सध्या ५० कोटींपेक्षा अधिक मोबाईल गेमर्स आहेत. मजबूत डिजिटल पायाभूत सुविधांमुळे गेमिंगमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे.

UPI मुळे भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचे युग सुरु झाले आहे. डिजिटल परिवर्तनात UPI ने महत्त्वाची भूमिका बजावली असून UPI मुळे डिजिटल व्यवहार सुलभ झाला. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या आता डिजिटल व्यवहारांमध्ये सहभागी होत आहे.

भारत हा गेमिंग उद्योगासाठी एक अतुलनीय संधी आहे. भारतात उच्च कार्यक्षमतेचे स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर हे सर्व घटक उत्कृष्ट गेम डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त ठरत आहेत. स्थानिक बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन तयार होणारे गेम्स जागतिक स्तरावरही लोकप्रिय होतील, असे मत चर्चेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

‘फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज’ स्पर्धेस उदंड प्रतिसाद

मुंबई दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) आणि इमेजनेशन स्ट्रीट आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज’ स्पर्धा पार पडली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

डिजिटल पोस्टर्स स्पर्धेसाठी ५४६ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्वोत्तम ५० पोस्टर्स ‘क्रिएटोस्फेअर्स’मध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. तर हँड-पेंटेड पोस्टर्ससाठी, २ मे रोजी चार संस्थांमधील १० अंतिम स्पर्धकांनी प्रत्यक्ष रंगकाम करत स्पर्धेत सहभाग नोंदवला.

हँड-पेंटेड फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सुवर्ण पदक – दृश्या ए. (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे)

रौप्य पदक – आदिशा ग्रोव्हर (कॉलेज ऑफ आर्ट, दिल्ली विद्यापीठ)

कांस्य पदक – तमन्ना सूरी (चितकारा युनिव्हर्सिटी, पंजाब)

डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सुवर्ण पदक – सुरेश डी. नायर (कोची)

रौप्य पदक – सप्तसिंधु सेनगुप्ता (कोलकाता)

कांस्य पदक – शिवांगिनी सर्मा कश्यप (आसाम)

डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेसाठी छायाचित्रकार आणि म्युसेओकॅमेराचे संस्थापक संचालक आदित्य आर्य, प्रिंटमेकरचे उपप्राचार्य आनंदमॉय बॅनर्जी यांनी तर हँड-पेंटेड पोस्टर्स स्पर्धेसाठी चित्रपट निर्माते आणि व्हिसलिंग वूड्सचे प्राध्यापक शरद राज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

०००

गजानन पाटील/विसंअ/

 

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन पोलीस वसाहतीचे भूमिपूजन

0
अहिल्यानगर, दि. ६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे १०२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या आणि पोलीसांसाठी ३२० नवीन निवासस्थाने...

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा पुढाकार : ‘आदिशक्ती अभियान’ आणि ‘आदिशक्ती पुरस्कार’ यांना मंत्रिमंडळाची मंजुरी

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चोंडी येथे आज पार पडलेल्या विशेष मंत्रिपरिषद बैठकीत राज्यातील महिलांच्या सर्वांगीण...

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल

0
नवी दिल्ली, 6 : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल...

१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा

0
चोंडी, अहिल्यानगर, दि. ६ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे...

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

0
मुंबई, दि. ६ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक सदन येथे...