मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 5

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचासुध्दा सन्मान केला.

नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, उपसंचालक आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, श्री. लाटकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. श्री. उईके म्हणाले, आदिम जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.एम. जनमन आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत विविध शासकीय विभागामार्फत आदिवासींना एकत्रितपणे योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यात घरकुल, वनपट्टे, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड, विद्युत जोडणी, जात प्रमाणपत्र, जॉब कार्ड, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, सातबारा, पीएम किसान, उत्पन्न दाखला, जनधन खाते आदींचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 18 टक्के लोकसंख्या आदिवासींची असून दोन प्रकल्प कार्यालय आहेत. जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरची टीम मन लावून काम करीत आहे. धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून 17 विभागाच्या 25 सेवा देण्यात येत आहे. धरती आबा अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहचले पाहिजे. यापुढेही आदिवासी समाजाला काय अपेक्षित आहे, त्यानुसारच योजना राबविली जाईल. आदिवासींना लाभ खरच मिळाला की नाही, याची प्रकल्प अधिका-यांनी शहानिशा करावी. योजनेमध्ये गैरप्रकार होऊ देऊ नका, गरजवंतांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुक्ष्म नियेाजन करावे.

प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत 12360 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या अभियानात जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश असून चंद्रपूर प्रकल्प कार्यालय अंतर्गत 115 गावे तर चिमूर प्रकल्प कार्यालयअंतर्गत 52 गावांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 87 गावांमध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचे शिबीर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिका-यांचा सन्मान

राज्य शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कार्य करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करणारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच नागपूर विभागात जिल्ह्यातील 19 शासकीय कार्यालयांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संबंधित अधिका-यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, सा.बां. उपअभियंता (मूल) राजेश चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी (नागभीड) प्रफुल गव्हारे, तहसीलदार (नागभीड) प्रताप वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी (नागभीड) डॉ. विनोद मडावी, पशुधन विकास अधिकारी (वरोरा) डॉ. सतिश अघडते.

द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख भुषण मोहिते, उपविभागीय अधिकारी (ब्रम्हपूरी) पर्वणी पाटील, महावितरण उपअभियंता (मुल) चंदन चौरसिया, उपजिल्हा रुग्णालय (ब्रम्हपूरी) डॉ. प्रितम खंडाळे, तालुका कृषी अधिकारी (कोरपना) गोविंद ठाकूर, बालसंरक्षण अधिकारी (मूल) आर्यन लोणारे, नगर परिषद मुख्याधिकारी (नागभीड) राहुल कंकाळ यांचा समावेश होता.

०००

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले.

यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

०००

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत

मुंबई, दि.  : – ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत. या सर्वांनी आपल्या ज्ञानाने, त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडविले. त्याला जपणे, वाढवणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरण रंजन नाही. तो आपला नैतिक मार्गदर्शक. आपण कोण आहोत, हे समजून घेऊन, आपल्याला काय घडवायचे आहे, ते ठरविणे, हाच महाराष्ट्रधर्म आहे,’ अशी मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. ही मुलाखत सुप्रसिद्ध विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक – लेखक आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा टि.व्ही. शो केला होता. आता नवमाध्यमात लोकप्रिय अशा पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत.

पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ ‘महाराष्ट्रधर्म : पायाभरणी आणि उभारणी’ या विषयापासून झाला. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रधर्म’ या विशेष पॉडकास्ट मालिकेचे हे पहिले चरण होते. यात रामायणापासून ते महाभारतापर्यंत, जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांपासून ते भक्ती संप्रदायाच्या संतांपर्यंत आणि महाराष्ट्राची अध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणी या विषयांवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समाज माध्यमावरून हे पॉडकास्ट करण्यात येत आहे.

या पहिल्याच पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या श्रोत्यांचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आभार मानले आहेत. तसेच यापुढेही महाराष्ट्राच्या इतिहासात, संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये देवभूमी, संतभूमी, वीरभूमी म्हणून विचार आहे. या सर्वांचा धांडोळा घेतानाच, महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही म्हटले आहे.

आजच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणीच्या अनुषंगाने मांडणी केली.  ‘महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती आहे, एक जीवंत मुल्य संहिता. ती सांगते विवेकाने विचार करा. सेवाभावाने वागा, आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहिली,’ अशा मांडणीमुळे पॉडकास्टचा प्रारंभ अभ्यासपूर्ण आणि उत्कंठावर्धक झाला. त्याला मोठा प्रतिसादही लाभला.

महाराष्ट्राची कहाणी सुरु होते देवांच्या पावलांनी…

महाराष्ट्राची कहाणी सुरु होते, ते देवांच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे. राम वनवासात होते. त्यावेळी ज्या दंडकारण्याचा उल्लेख येतो. ते दंडकारण्य विदर्भ ते नाशिक-पंचवटी पर्यंत विस्तारले आहे. महाभारतात सुद्धा महाराष्ट्राची भूमी आहे. विदर्भात दमयंतीची गोष्ट घडली. कोकणातील गुहांमध्ये अर्जून धान्यस्थ बसले होते, असे लोककथांमध्ये सांगितले जाते. महाभारतातल्या रमणीय कथेचा भाग घडतो, तोही विदर्भातच. रुक्मिणीचे कौंडीण्यपूर आणि तिथून तिची भगवान श्रीकृष्णांनी केलेली सूटका, त्यासाठीचे युद्ध देखील या विदर्भाच्याच भूमित घडले. पांडव अज्ञातवासात राहीले, ते चिखलदऱ्यात. किचकाची जुलमी राजवट पांडवानी उधळून लावली. सत्याने असत्यावर मिळवलेल्या विजयाची ही रोमहर्षक कहाणी आहे. महाराष्ट्राची भूमी पुराणांमध्येही आहे. भगवान गौतम बुद्ध हे महाराष्ट्राच्या भूमीत शांततेचा संदेशाच्या रुपाने इथे पोहोचले. त्यांचे शब्द संदेश लोकांनी शांतपणे आत्मसात केले. ते शब्द जपले. अजिंठ्याच्या शांत डोंगररांगामध्ये भिक्खुंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या. जगाला दुःखातून मुक्त होण्याचा ज्यांनी मार्ग दाखवला त्या भगवान गौतम बुद्धांचे शब्द महाराष्ट्राने फक्त ऐकले नाहीत. त्यांना गुफांमध्ये, स्मृतीमध्ये आणि आत्म्यातही जपले. महाराष्ट्रातील दैवी ऊर्जेमुळे इथे सत्याचा, विश्वाचा शोध घेणारे साधक, संत, विचारवंत इथे आले आणि रमले. शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांनी त्यांचे एक महत्वाचे पीठ करवीर पीठाच्या रुपाने स्थापन केले. इथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे. महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दूवा आहे.

पंढरीची वारी चालती-बोलती संस्कृती

इथल्या मातीनेच बोलायला सुरुवात केली, ती संतांच्या रुपाने. तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभव पंथ जाती-पातींना नाकारणारा आहे. त्यांनी साध्या-सोप्या भाषेत शिकवण दिली. नंतरच्या काळात नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली. जगात क्वचितच अशी यात्रा असेल. जी सामाजिक समतेचा झरा बनली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिली. पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना आहे. निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची सुरुवात केली. मुक्ताईंच्या ओव्या तर मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. संत नामदेवांच्या विचारांना गुरू ग्रंथसाहिबमध्येही स्थान आहे. पंजाबमध्ये आपण घुमान येथे साहित्य संमेलन घेतले. पंजाबमध्ये संत नामदेव यांच्याविषयी मोठा आदर, भक्तीभाव पाहायला मिळाला. संत एकनाथ, संत चोखोबा, त्यांच्या पत्नी सोयराबाई असे सर्व संत हे केवळ उपदेशक नव्हते, ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे, शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते. आपली वारीची परंपरा ही चालती-बोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहे, जी महाराष्ट्राचे आत्मभिमान जपते आहे. हजारो वर्षांपूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता, जिझिया कराचा जाच न बाळगता चालत राहीली. वारी न इस्लामी राजवटीत थांबली, न इंग्रजी आक्रमणात. हजारो दिंड्या या वारीत सहभागी होतात. यंदाही या वारीत देश-विदेशातून लोक सहभागी झाले आहेत. यावर्षी काहींनी या वारीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर सुरु केला आहे. हा पंढरीचा महिमा थक्क करणारा आहे.

..मराठा तलवार यमुनेपर्यंत पोहाेचली

छत्रपती शिवाजी महाराज हे ध्येयाकरिता लढले. ते सत्तेकरिता लढले नाहीत. ते देव-देश आणि धर्माकरिता लढले. या वीर योद्ध्यांची तलवार धर्माच्या मार्गावरच चालणारी होती. त्यांचे युद्ध हे जिंकण्यासाठी नव्हते. ते चरित्र जपण्यासाठी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य राजवाड्यातील जड-जवाहिरातून नव्हे, तर आईच्या गोष्टींतून साकारले. राजमाता जिजाऊंच्या स्वप्नांनी त्यांचे मन घडवले. छत्रपती शहाजीराजेची स्वराज्य संकल्पना त्यांनी साकारली. त्यांचा राज्यकारभार नैतिकतेवर आधारलेला होता. सर्व धर्मांबद्दल आदर, मंदिर-मशिद तोडण्यास बंदी, स्त्रियांचा हे सगळे त्याकाळाच्या पुढे होते. जगात असा राजा कुठे झालेला नाही. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनीही कवी, योद्धा आणि विद्वान म्हणून स्वराज्य आणि धर्माचे रक्षण केले. प्रसंगी त्यासाठी बलिदान दिले. त्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांनीही असाच पराक्रम गाजवला. त्यांना घोड्यावरून येणारे वादळ म्हटले जायचे. आयुष्यात ते एकही लढाई हरले नाहीत. बाजीराव हे छत्रपतींचे सेनापती नव्हते, ते संस्कृतीचे द्रष्टे शिल्पकार होते. त्यानंतर योद्धे म्हणून महादजी शिंदे यांनी राखेतून मराठी साम्राज्य उभे केले. त्यांनी दिल्ली पुन्हा मराठ्यांच्या हातात दिली. शिंदे, होळकर, भोसले या मराठी माणसांनी संपूर्ण भारताचा कारभार हाती घेतला. ब्रिटीश, अफगाणांशी मुत्सद्दीपणे त्यांनी वाटाघाटी केल्या. मराठी अस्मिता जपली. राजकारणात मुत्सद्देगिरी जपली, त्याचे अधिष्ठान होते, संस्कृतीचा अभिमान. त्यांच्यामुळेच मराठा तलवार यमुनेपर्यंत पोहचली, आणि भारताच्या केंद्रस्थानी मराठा साम्राज्य पुन्हा प्रस्थापित झाले.

धैर्यशाली नारिशक्ती..

इथल्या धैर्यशाली स्त्रियांनाही विसरून चालणार नाही. जेव्हा साम्राज्य संकटात होते, त्यावेळी राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाईं तलवार घेऊन उभ्या राहिल्या. त्यांनी औरंगजेबाला वर्षानुवर्षे थोपवून धरले. संताजी जाधव-धनाजी घोरपडेंच्या काळात इथे गवतालाही पाते फुटले. पहिल्या सेनापती उमाबाई दाभाडे यांनी नेतृत्व केले. रणनिती आखली. त्याकाळात स्त्रियांना बोलण्याची संधी नसायची, अशा काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी या भारतीय संस्कृतीतील नारीशक्तीच्या प्रतिक ठरल्या.

महाराष्ट्र धर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटलीच नाही…!

महाराष्ट्राने केवळ योद्धे निर्माण केले नाहीत, तर त्यांनी घडवले धर्माचे रक्षक, राष्ट्राच्या संकल्पनेचे उद्गाते आणि नव्या भारताचे शिल्पकार. महाराष्ट्र धर्म कधी थांबलाच नाही. पण तो बदलत गेला. काळानुसार त्यांनी स्वरूप बदलले पण आत्मा कधीच बदलला नाही. महात्मा जोतिबा फुले यांनी जात, पितृसत्ता आणि अंधश्रद्धा यांना थेट आव्हान दिले. धर्माच्या नावाने होणाऱ्या विषमतेला उघडपणे विरोध केला. त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणासाठी सोसलेल्या धैर्याची परिभाषाच घालून दिली. लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्राला राजकीय गर्जना दिली. त्यांनी गणेशोत्सव, वृत्तपत्रे या मार्गानी त्यांनी परंपरेलाच प्रतिकारचे हत्यार बनविले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही केवळ घोषणा नव्हती, ती होती एक जनचळवळ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोध, अपमान, भेदभाव यावर बुद्धी आणि अभ्यासाने विजय मिळविला. कोलंबियामधून शिक्षण घेऊन आलेले डॉ. बाबासाहेब भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले. महाड सत्याग्रह, शिक्षणाचा आग्रह आणि जात व्यवस्थेच्या निर्मुलनाचा निर्धार हे सगळे संघर्ष नव्हते, तर नव्या भारताचे नैतिक बांधणी. याच मालिकेत पंडिता रमाबाईंनी विधवा महिलांकरिता शिक्षण आणि अधिकारांची चळवळ उभी केली. गोपाळ गणेश आगरकर यांनी रुढी आणि कर्मकांड यांना थेट प्रश्न विचारले. संत गाडगेबाबा सामाजिक स्वच्छता आणि अंतःकरणातील शुद्धतेचे सुंदर नाते जगासमोर आणले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता वसतीगृह, शाळा उभ्या केल्या. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला उभे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महाराष्ट्राला जीवन शिकवले. म्हणूनच महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती आहे, एक जीवंत मुल्य संहिता. ती सांगते विवेकाने विचार करा.सेवाभावाने वागा, आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहीली.

रिद्धपूर हे चक्रधर स्वामींच्या गुरूंचे गोविंदप्रभूंचे क्षेत्र. महाराष्ट्र शासनाने येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले आहे. याच रिद्धपूरमध्ये मराठी भाषेतील अनेक ग्रंथ तयार झाले. काही दिवसांपूर्वी या विद्यापीठाने आपले कामकाज देखील सुरु केले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

000

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ कॉलद्वारे केले.

आषाढी एकादशीनिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असताना, अरिहंत शाळेने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक अभिनव पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले तंत्रज्ञानाधारित प्रकल्प ‘टेक वारी’ या नावाने सादर करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून प्रकल्पांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी एआय वापरून तयार केलेल्या उपकरणांचा वापर दैनंदिन जीवनात आणि विशेषतः पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा करता येईल, यावरही चर्चा झाली.

स्वयंचलित वर्ग, खोल्या स्मार्ट हजेरी, ऊर्जा कार्यक्षम यंत्रणा वगैरे प्रकल्पांचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.  यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना हे प्रकल्प ग्रामीण भागातील शाळांमध्ये कसे राबवता येतील या संदर्भात अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी होते. यावेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक आणि प्रकल्पात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना सरन्यायाधीश श्री. गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार, चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, सचिव डॉ. गुरूनाथ पंडित, मुख्याध्यापिका संचिता गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या विशेष प्रसंगी बोलताना सरन्यायाधीश श्री. गवई म्हणाले, आज मी ज्या उंचीवर पोहोचलो आहे, त्यामागे माझ्या शिक्षकांचे आणि शाळेचे फार मोठे योगदान आहे. याच शाळेतील शिक्षण आणि संस्कारामुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. माझ्या वक्तृत्वाची सुरुवातीची पावलं याच व्यासपीठावर पडली असल्याची आठवण सांगत, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मला आत्मविश्वास मिळाला. त्या संधींमुळेच मी घडलो, असेही नमूद केले. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते. शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात, हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

शाळेतील वर्गखोल्या, वाचनालय, चित्रकला विभाग आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शालेय जीवनात त्यांच्या सोबत शिकलेल्या मित्रांशी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती शाळेसाठी अत्यंत गौरवाची व प्रेरणादायी ठरली.

०००

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले.

आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे.  इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असे त्यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करतांना नवी ऊर्जा मिळते. वारीने खऱ्या अर्थाने  भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगला आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित, पर्यावरण पूरक वारीदेखील झाली. खऱ्या अर्थाने आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो या वारीमध्ये  प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.  राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्तावित केले. यामध्ये यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये शासन व जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी वर्ग समाधानी असून वारकऱ्यांची संख्या वाढली आहे व त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी मु.पो. जातेगांव ता. नांदगांव जि. नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापुजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक – श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा. द्वितीय क्रमांक – श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक १९, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. तृतीय क्रमांक – श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक २३, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.

000

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

मुंबई, दि. ५ : “आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची सशक्त चळवळ आहे. गेली अनेक शतके पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाला दिशा देण्याचे, समृद्ध करण्याचे काम केले आहे. आजही लाखो वारकरी ‘हरिनामा’च्या गजरात पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या दिशेनं चालताना आपल्या कृतीतून एकतेचा, समतेचा, बंधुत्वाचा संदेश देत आहेत. ही महाराष्ट्राची आध्यात्मिक सांस्कृतिक एकजुटीची ताकद आहे. ती टिकवणे, वाढवणे ही आपली जबाबदारी आहे,” असे  सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी साष्टांग दंडवत घालत वारकरी बांधवांना, राज्यातील शेतकरी, कष्टकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणतात की, “आषाढीवारीच्या रूपाने महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, सांस्कृतिक चळवळ जपत, वाढवत पुढे नेत असताना मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवणे, मराठीचा आवाज आसमंतात दुमदुमत, महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा सदैव फडकत राहिला पाहिजे, त्यासाठी कष्ट करण्याचे बळ आम्हाला दे. राज्यात यंदाही चांगला पाऊस होवो. शेतकऱ्याच्या शिवारात पिकांची, घरात धनधान्याची सुबत्ता येवो. राज्यातल्या घराघरात सुख, शांती, समाधान, समृद्धी नांदो,” असं साकडंही उपमुख्यमंत्री पवार यांनी पांडुरंगाच्या चरणी घातलं आहे.

वारीतील शिस्त, स्वच्छता, सेवाभाव, परस्पर सहकार्य, सामाजिक बंधिलकी याबद्दलही उपमुख्यमंत्री पवार यांनी गौरवोद्गार काढत, “वारीनं आपल्याला सामाजिक ऐक्य, समर्पणाची भावना आणि माणुसकीचा खरा अर्थ शिकवला आहे. हीच ऊर्जा आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरली पाहिजे,” असं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना केलं आहे.

०००

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश
  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण

पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा उपक्रम १६ वर्षापासून अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. या माध्यमातून आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी प्रबोधन केले जात आहे. आपल्या सर्व संतांनी पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धन करून जग वाचवण्याचा संदेश दिला. हा संदेश अनुसरत सर्व विठ्ठल भक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’  या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, रणजीतसिंह मोहिते पाटील, अभिजीत पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रदूषण मंडळाचे प्रभारी सचिव रवींद्र आंधळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, वातावरणातील बदलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास  होत असून जल, वायू व वनराईचे महत्त्व समजून न घेतल्यास जग विनाशाकडे जाईल. त्यामुळे पर्यावरणाच्या जागर हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी हिरवी वनराई फुलवण्याचे आवाहन केले तर जगद्गुरु संत तुकाराम यांच्या  ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. हा संदेश घरोघरी पोहोचवीत आपल्याला वनराई वाढवायची आहे, प्रदूषण कमी करायचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनातील आपली जबाबदारी ओळखून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, अमृता फडणवीस, सोनिया गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आदी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरत ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा गजर करत वारकरी यांच्या समवेत भक्तीरसात दंग होऊन गेले.

यावेळी महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, चंदाबाई तिवाडी, शाहीर पृथ्वीराज माळी, सत्यपाल महाराजांचे सप्त खंजिरी भजन, शैलाताई घाडगे यांच्यासह अन्य कलाकारांनी किर्तन, भारुड, पोवाडा यांच्या माध्यमातून टाळ मृदुंगात हरिनामाचा गजर करत पर्यावरणाचे संवर्धन व समतोल राखण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदूषण विभागाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कटे यांनी केले.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक सनियंत्रण कक्ष, हरित वारीच्या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, गृह राज्यमंत्री  डॉ. पंकज भोयर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

आषाढी वारी मार्ग, नदीपात्र, वाळवंट, वाखरी पालखी तळ, 65 एकर परिसर, पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर या ठिकाणी ड्रोन कॅमेरे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अहोरात्र गर्दीचे संनियंत्रण केले जात आहे. कोठे काही घटना घडल्यास तत्काळ नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर दिसत असल्याने त्या ठिकाणी गतीने पोहोचून स्थिती नियंत्रणात आणता येत आहे असे,  पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.

या एकात्मिक सनियंत्रण कक्षाद्वारे प्राप्त चित्रीकरणाच्या विश्लेषणातून आषाढी वारीसाठी कालपर्यंत पंढरपूर शहरात सुमारे 14 लाख वारकरी दाखल झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत ‘हरित वारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याच्या संनियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत दीड लाखावर वृक्षांची लागवड सोलापूर ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक झाडाला स्वतंत्र क्यूआर कोड दिला जाणार आहे. ह्या माध्यमातून प्रत्येक झाडाची जात, त्या झाडाचे जिओ लोकेशन आणि त्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती उपलब्ध असणार आहे. ॲपचा वापर करण्याचे प्रशिक्षण ठाणे अंमलदारांना  देण्यात आले आहे. हे ॲप ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने वृक्षारोपण मोहिमेतील विश्वासार्हता, पारदर्शकता आणि डिजिटल ट्रॅकिंग शक्य होणार आहे, असे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्य सहकारी बँकेच्यावतीने देवस्थान समितीला इलेक्ट्रिक वाहन प्रदान

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने विठ्ठल रुख्मिणी देवस्थान समितीला भक्तांच्या सेवेसाठी इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले.

यावेळी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कार, मुख्य सरव्यवस्थापक डॉ. अशोक माने, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कलशेट्टी, डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

०००

 

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून वारकरी करतात, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पंढरपूर पंचायत समिती आवारात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्यावतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ‘निर्मल दिंडी’ तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रम आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कलशेट्टी, डॉ.बाबासाहेब देशमुख, देवेंद्र कोठे, विक्रम पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस लाऊन पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा विचार करुन २०१८ वर्षीपासून निर्मलवारीची सुरुवात केली. याअंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. सर्व दिंडीमधील वारकऱ्यांनी या संकल्पनेचा स्वीकार केला, त्यामुळे पालखी तळावर घाणीचे साम्राज्य दिसत नाही. महिलांची मोठ्या प्रमाणात सोय झाल्यामुळे वारीमध्ये त्यांची संख्या वाढलेली आहे. आपली वारी निर्मल, स्वच्छ झाली आहे.

ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने  निर्मलवारी संकल्पना यशस्वीरित्या राबविली, त्याचबरोबर निर्मल दिंडीच्या माध्यमातून लोककलावंत लोकजागर करुन स्वच्छतेबाबतचा संदेश घरोघरी पोहचविण्याचे काम करीत असतात.  विठुरायाच्या दर्शनाची आस लाऊन चालणाऱ्या पावलांची सेवा करून विठुरायांच्या चरणाची सेवा केल्याचे प्रत्यंतर यावे, या सेवाभावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाद्वारे ‘चरणसेवा’ उपक्रम राबवून वारकऱ्यांचे सेवा केली. त्यांचे आरोग्य आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम केले.

वारीच्या दरम्यान महिलांना येणाऱ्या मासिक पाळीसह इतर अडचणीचा विचार करता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाच्या माध्यमातून महिला वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याकरीता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन अतिशय सुंदर नियोजन केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुणे, सातारा आणि सोलापूर प्रशासनाने वारकऱ्यांना अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध केल्याबद्दल तसेच निर्मल दिंडी, चरणसेवा, आरोग्यवारी यशस्वी केल्याबद्दल प्रशासन, सेवाभावी संस्था आदींचे त्यांनी अभिनंदन केले.

वारकऱ्यांची सेवा ही मोठी संधी असून वारीचे चांगल्या प्रकारचे नियोजन करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन वारीचे अतिशय उत्तम नियोजन केले. वारकऱ्यांना जर्मन हँगरच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्था, महिलांकरीता स्वच्छतागृहासह स्नानगृह, पायाचे मसाज अशा आवश्यक त्या सर्व सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला, नवीन उंची गाठत एक उच्चांक निर्माण केला आहे. त्यामुळे यावर्षीच्या वारीचे वेगळेपण पहायला मिळत आहे. सेवा कधीच संपत नसते, सेवेचे नवीन उच्चांक गाठायचे असतात. याकरिता प्रयत्नपूर्वक वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न-ग्रामविकास मंत्री गोरे

मंत्री गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वारी सर्वोत्तम व्हावी, वारकऱ्यांना त्रास होता कामा नये, याकरिता त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत विविध सेवाभावी संस्था, विश्वस्त आदी घटकांनी अहोरात्र कामे करत मनोभावे सेवा करीत आहे. वारकऱ्यांकरिता पालखीतळावर सुविधा देण्याच्यादृष्टीने जर्मन हँगरसह, वैद्यकीय सुविधा, महिलांकरिता शौचालय, स्वच्छतागृहे, मसाज मशीन आदी सर्वोत्तम सुविधा वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. वारी दरम्यान प्रशासनाच्यावतीने केलेल्या व्यवस्थेबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे मंत्री गोरे म्हणाले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, त्र्यंबकेश्वर यांसह विविध भागातून महिला वारकरी वारीत सहभागी होतात. अशा या सहभागी महिलांच्या मासिक पाळी आदी आरोग्य आणि स्वच्छताविषयक बाबींचा विचार करुन महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ४ वर्षापासून ‘आरोग्य वारी’ प्रशासनाच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांकरिता हिरकणी कक्ष, ३७५ ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वितरण, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरण सेवेचे महत्त्व लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पालखी सोहळ्यात कक्षाच्यावतीने प्रथमच ‘चरणसेवा’ उपक्रम राबविण्यात आला. २ कोटी ७५ हजार वारकऱ्यांची  चरणसेवा करण्यात आली. लोकसहभातून एकूण २ कोटी रुपयाहून अधिक निधी उपलब्ध झाला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ९ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सेवा केली,  चरणसेवा सेवा उपक्रमाबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे नाईक म्हणाले.

श्री. जंगम म्हणाले, ‘निर्मल दिंडी’ उपक्रमाअंतर्गत सुमारे ११ हजार शौचालय, १५५ हिरकणी कक्ष, स्तनदा माताकरिता हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन, लहान बालकांकरिता खेळणी वस्तू आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. स्वच्छतेच्या कामाकरिता सुमारे १ हजार २३६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, तसेच निर्मल दिंडी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने पालखी सोहळ्यात राबविण्यात आलेल्या ‘चरण सेवा’ उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता काम केलेल्या अधिकारी, सेवाभावी संस्था, कार्यकर्त्याचा तसेच आरोग्यवारी उपक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या संस्थांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पंढरपूरचे उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, विकास अधिकारी सुशील संसारे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात ‘निर्मल दिंडी’, ‘चरणसेवा’ आणि  ‘आरोग्यवारी’ उपक्रमाबाबत माहितीपट दाखविण्यात आले.

०००

ताज्या बातम्या

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ : विद्यार्थी हितासाठी निर्णय

0
मुंबई, दि. 8 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ आणि...

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई, दि. ८ : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून भारतीय राज्यघटना अद्वितीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या...

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

0
मुंबई, दि. ८ : फनेल झोनमध्ये उड्डाण मर्यादा आणि विविध तांत्रिक कारणांमुळे या भागातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. मुंबईतील विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या आणि...

बीड जिल्ह्यात परळी येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

0
मुंबई, दि. 8 : बीड जिल्ह्यातील परळी येथे सध्या अस्तित्वात असलेल्या औष्णिक वीज केंद्रात आणखी वीज निर्मिती संच वाढविण्याची बाब तपासली असता ती व्यवहार्य नसल्याचे निदर्शनास आले...