मंगळवार, जून 17, 2025
Home Blog Page 591

रिध्दपूरच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील  

अमरावती, दि. 04 : महानुभाव पंथाची काशी म्हणून रिध्दपूर सर्वदूर प्रसिध्द आहे. तसेच जगातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ या ठिकाणी स्थापित होत आहे. या पार्श्वभूमीवर येथे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस चौकी स्थापित होवून त्याचे लोकार्पण आज होत आहे, ही अतिशय आनंदाची व अभिनंदनाची बाब आहे. रिध्दपूरच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देत सीएसआर फंड व अन्य योजनांतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिध्दपूर येथे उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अमरावती ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, महापालिका आयुक्त सचिन कलंत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अन्य विभागप्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.

  पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळख असणाऱ्या रिध्दपूर हे मराठी वाड्मयाची सुध्दा काशी आहे. या पावन भूमीत मराठीतील लिळाचरित्र आद्यग्रंथ लिहीला गेला आहे. मराठी भाषेचा उगम याठिकाणी झाला असून जगातील पहिले मराठी भाषेचे विद्यापीठ येथे निर्माण होत आहे. जगभरातील संशोधक व अनुयायी मराठी भाषेच्या संशोधनासाठी याठिकाणी भेट देतील. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस चौकी स्थापन करणे हा शासनाचा मानस होता. त्यानुसार आज याठिकाणी भाड्याच्या ईमारतीत पोलीस चौकी स्थापित होऊन त्याचे लोकार्पण आज होत आहे, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.

ते पुढे म्हणाले की, यापुढेही रिध्दपूरच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी शासनाकडून निधी पुरविण्यात येईल. अद्ययावत पोलीस स्टेशन हे लोकांच्या संरक्षण व सुविधेची हमी असते. त्यानुषंगाने पोलीस चौकीच्या निर्मितीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने येथील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे. रिध्दपूर येथे आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनास सादर करावा, त्यानुषंगाने निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

रिध्दपूर येथे पोलीस चौकी उभारण्यासंबंधी मागणी व त्यानुषंगाने पोलीस विभागाकडून करण्यात आलेली कार्यवाही याबाबत पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी प्रास्ताविकातून माहिती यावेळी दिली.

000

कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षण घ्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ४: आगामी काळात उद्योगजगताला असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाऐवजी कौशल्य शिक्षण घ्यावे, याकरीता आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील डिजिटल सी. एन. सी. सिम्युलेशन लॅबच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहसंचालक रमाकांत भावसार, प्राचार्य  अवधूत जाधवर, भारत फोर्जच्या पुणे प्रमुख डॉ. लीना देशपांडे, बारामतीचे प्रमुख संजय अग्रवाल, सिम्युशॉफ्ट टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चौरे आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने  कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. जागतिक पातळीवर कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आगामी काळात युवकांना परदेशात नोकरी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे. या वर्षी रोजगार निर्मितीकरीता विविध करार करण्यात आले आहेत.

समाजातील सर्व घटकांना शिक्षण व प्रशिक्षणाचे महत्व समजून सांगण्याची आपली जबाबदारी असून या संधीपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये. प्रत्येकाला दर्जेदार प्रकारचे ज्ञान मिळाले पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून कौशल्यधिष्ठित मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या प्रशिक्षण पूर्ण करावे.या कार्यशाळेत नवनवीन गोष्टी शिकत राहा,  शिकतांना होणाऱ्या चुका दुरुस्त करुन पुढे जा, प्रचंड मेहनत करा, जीवनातील आवाहने पेलण्यास तयार राहा आणि जीवनात यशस्वी व्हा, असे श्री.पवार म्हणाले.

उद्योगांनी सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा

भारत फोर्जने जिल्ह्यात यापूर्वी खेड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मदत केली असून आता माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिजिटल सी. एन. सी. सिम्युलेशन लॅबच्या स्वरूपात मदत केली आहे. या लॅबमुळे  अतिशय अत्याधुनिक मशीनवर काम करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. मशीनवर काम करण्याची भीती कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील प्रगतीच्या वाटचालीत निश्चित लाभ होईल.

भारत फोर्ज कंपनीने देशात रोजगार निर्मिती करुन नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन दिले. ही संस्था उद्योगबरोबरच सामाजिक क्षेत्रातही फार मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत, याचा मराठी माणसाला अभिमान आहे. भारत फोर्जप्रमाणे इतरही उद्योगांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

डॉ. देशपांडे यांनी भारत फोर्जच्या कंपनीच्या कामकाजाविषयी माहिती दिली. श्री. चौरे यांनी डिजिटल सी. एन. सी. सिम्युलेशन लॅबची माहिती दिली.

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा – पालकमंत्री चंद्रकांत (दादा ) पाटील

अमरावती, दि. 04 (जिमाका): जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये 79 कोटींची (20 टक्के) वाढ करुन सर्वसाधारण योजनेत 474 कोटी निधी, अनुसूचित जाती उपयोजना 102 कोटी व आदिवासी उपयोजनासाठी  103 कोटी 59 लाख असे एकूण 679 कोटी 59 लाख निधी मंजूर आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत निविदा प्रक्रिया राबवून विकास कामांचे कार्यारंभ आदेश दिले गेले पाहिजेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार बळवंत वानखडे, दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, आमदार यशोमती ठाकूर, आमदार प्रताप अडसड, आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, महापालिका आयुक्त सचिन कलंत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, सहायक जिल्हाधिकारी पि. मिनू, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की,  जिल्हा वार्षिक योजनांचे नियोजन करताना शाश्वत विकासाचे ध्येय, जिल्ह्याचे व्हिजन, पायाभूत सुविधांमध्ये भर देण्यावर प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच विहित कालावधीमध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी समन्वयाने कामे करावी. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामाचे प्रस्ताव दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडे सादर करावेत. महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता आगामी काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी मंजूर केलेल्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत त्या कामांचे कार्यारंभ आदेश .देण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत कृषी व संलग्न सेवा क्षेत्र 46.96 कोटी, ग्राम विकास 31.37 कोटी, नागरी क्षेत्राचा विकास 88.84 कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रण 17.32  कोटी, ऊर्जा विकास 35 कोटी,  रस्ते विकास 38 कोटी, सामान्य शिक्षण 21.30 कोटी, आरोग्य क्षेत्र 58 कोटी, तीर्थक्षेत्र पर्यटन व गड किल्ले 27.18 कोटी, महिला व बाल विकास 14.19 कोटी, व्यायामशाळा व क्रीडांगण विकास 7.68 कोटी अशा महत्त्वाच्या क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असल्याची माहिती पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमास अमरावती जिल्ह्यातील चिखलदारा व धारणी हे दोन आकांक्षित तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.  यासाठी दहा कोटीचा निधी ठेवण्यात आलेला आहे. तसेच ज्या यंत्रणांनी अद्याप सन 2023-24 मधील मंजूर कामासाठी आवश्यक दायित्वाच्या निधीची मागणी केली नाही ती मागणी लवकरात लवकर करावी. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाहीत, त्यांनी ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निर्देशित केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’, ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ व ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ संदर्भातील सादरीकरण केले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत जिल्ह्यात 4 लाखापेक्षा जास्त महिलांची नोंदणी झाली असून त्यापैकी 1 लाख 35 हजारापेक्षा जास्त प्रकरणांची पडताळणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पडताळणी झालेल्या 10 लाडक्या बहिणींना पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या 30 प्रशिक्षणार्थींना  पालकमंत्र्याच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर श्री. कटियार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील विविध विषयाची माहिती सादर केली. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चा माहे मार्च 2024 अखेर सर्वसाधारण योजना 395 कोटी अनुसूचित जाती उपायोजना 102 कोटी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 103.59 कोटी असा एकूण मंजूर निधीच्या 600.59 कोटीच्या अंतर्गत 600.56 कोटी खर्च झाल्याची माहिती देऊन खर्चाची टक्केवारी 99.99% इतके असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजनातील कामे करताना सर्व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करताना कामांची निकड , लोकप्रतिनीधींनी दिलेल्या शिफारशी, सूचना तसेच सामान्य जनतेच्या मागण्यांना महत्त्व देऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन प्रस्ताव सादर करावे. आगामी काळातील आचारसंहिता विचारात घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन निधी खर्ची पडेल, असे नियोजन करण्याच्या यंत्रणांना सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना मुलभूत सुविधा, पावसाळात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगासाठी स्वतंत्र वार्ड, औषधे व मनुष्यबळासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिल्या जाईल. यासाठी आवश्यक बाबीचा प्रस्ताव तातडीने सादर करुन निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी देण्यात आले.

अतिवृष्टीमुळे नाल्यांना पूरस्थिती निर्माण होऊन नाल्याकाठी असलेल्या घरांना नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे नाल्याना संरक्षण भिंत उभारणे आवश्यक असून यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव तयार करावा. तसेच अतिवृष्टीच्या काळात ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने विशेष दक्षता बाळगावी. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी आवश्यक जागा निश्चित करुन धर्मशाळेची निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. पाटील यांनी संबंधितांना दिले.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के यांनी सर्व लोकप्रतिनिधी व सर्व समिती सदस्यांचे स्वागत केले. नियोजन समितीच्या बैठकीतील विविध विषयांची माहिती त्यांनी सादर केली.

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील एकूण निधी पैकी 100 कोटीचा पहिला हप्ता आजच मंजूर
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज भक्तनिवास वास्तुशिल्प कामाचे भूमिपूजन संपन्न

सोलापूर, दिनांक 4(जिमाका) :- संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेले श्री क्षेत्र अरण चा तीर्थक्षेत्र म्हणून पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. परंतु या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार केला जात आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. परंतु या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यातील 100 कोटीचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्रीक्षेत्र अरण तालुका माढा येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा व भक्तनिवास वास्तुशिल्प भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार सर्वश्री राम शिंदे, जयकुमार गोरे, राम सातपुते, योगेश टिळेकर, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम कांडगे, बळीराम शिरस्कर, संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी, महामंडलेश्वर मनीषानंद महाराज यांच्यासह सावता महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडवणीस पुढे म्हणाले की, संत सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती मार्गावर चालण्याचा एक वेगळा विचार दिला तसेच समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्य केले. आपल्या कर्मात मग्न असलेल्या सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूर येथून विठूरायाची पालखी अरण येथे येते ही ही घटना खूप महत्त्वाची आहे व 1295 मध्ये अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. शेकडो वर्षापूर्वी सावता महाराजांनी मांडलेले विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

आजच्या समाजाला ही संतांच्या विचारांची नितांत गरज आहे. आपल्या राज्यातील समाज जाती-जातीमध्ये विखंडित होत आहे. मताच्या राज कारणामुळे समाजामध्ये दरी निर्माण होत आहे. सर्वांना सोबत घेऊन एकसंघ समाज निर्माण करण्याचे जी संतपरंपरेची विचारसरणी होती ती विचारसरणी  अंगीकरणाची गरज आहे त्यातूनच एक सुदृढ समाज निर्माण होऊ शकेल, असे मत उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देण्यासाठी संत शिरोमणी सावता महाराजांचे  मराठीत लिहिलेले अभंग महत्वपूर्ण पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे येथील भिडे वाडा केस राज्य शासनाने जिंकलेली असून या वाड्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील कामाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल असे माहिती श्री फडणवीस यांनी दिली. राज्य शासनाने विविध शासकीय योजना महिला व मुलीसाठी सुरू केलेल्या आहेत. उच्च शिक्षणात क्रांतिकारी निर्णय घेतला असून मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे. तसेच इतर मागासवर्ग विभागाला भरघोस निधी उपलब्ध करून देऊन या अंतर्गत येणाऱ्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडला. आपलं कर्तव्य व कर्म करत रहावे ही शिकवण सावता महाराजांनी दिली . अशी माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगून संत शिरोमणी सावता महाराज वास्तुशिल्प आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अरण तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. लवकरच या भागाचा विकास होऊन भक्तांना येथे चांगल्या सुविधा उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयात भिडे वाड्याचा निकाल राज्य शासनाच्या बाजूने लागला असून 15 ऑगस्ट 2024 नंतर 200 कोटीच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन प्रधान मंत्री महोदय यांच्या हस्ते करण्याचा मानस श्री भुजबळ यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा हक्क उपलब्ध करून दिलेला आहे शासनाचा हा निर्णय म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेच काम शासन नेटाने पुढे नेत असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य शासन लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीला मोफत वीज, मागेल त्याला सौर पंप, तीन सिलेंडर मोफत योजना, मुख्यमंत्री तीर्थटन योजना अशा योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून अरण हे संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असून या भूमीच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे गृहनिर्माण व इतर मागास विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. अरण इथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास चार कोटीचे विविध विकासात्मक कामे झालेली आहेत हे ब वर्गाचे तीर्थक्षेत्र असून राज्यातील इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे जलद गतीने विकास होण्यासाठी अरण ला ‘अ’वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे केली. तसेच इतर मागास विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी 7 हजार 800 कोटीचा निधी मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, आमदार योगेश टिळेकर व आमदार राम शिंदे यांनी ही मनोगत व्यक्त केले.

पुस्तक प्रकाशन-

संत शिरोमणी सावता महाराज यांच्यावर आधारित असलेले “संत सावता माळी अभंग व विचार” या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते यावेळी झाले. या पुस्तिकेच्या लेखिका प्रो. सुवर्णा चव्हाण गुंड या आहेत.

संत सावता महाराज भक्तनिवास वास्तु शिल्प कामाचे भूमिपूजन-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत सावता महाराज भक्त परिवार मेळावा कार्यक्रमाचा शुभारंभ व विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रभू महाराज माळी यांनी ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र अरण येथे भाविक, वारकरी यांच्यासाठी देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. राज्यातील इतर तीर्थक्षेत्राच्या मानाने पारं तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने उपेक्षित असल्याचे सांगून या तीर्थक्षेत्र विकासासाठी भरून निधी शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या कार्यक्रमास सावता महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने सर्व मान्यवरांचे शेवटी आभार व्यक्त करण्यात आले.

                                             0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बोरकरवाडी येथील पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन

बारामती, दि.४:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून बोरकरवाडी तलावात बंदिस्त पाईपलाईनद्वारे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जलसंपदा यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश भोसले, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डूबल, नितीन जैस्वाल, शाहेद काझी, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे उपअभियंता पी.डी. धुमाळ, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पुरूषोत्तम जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणजित तावरे,  कृषी उत्पन्न बाजार समितीचेसंचालक अरूण सकट, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

पाणी पुरवठा योजनेचे काम टी. सी.एस. फाऊंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यात येणार आहे. जानाई शिरसाई उपसा सिंचन पाणी पुरवठा योजनेतून बोरकरवाडी तलावात ९०० मिमी व्यास पाईपलाईनद्वारे  ३३.२१ क्यूसेक पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तलावाची पाणी क्षमता ४३ दस लक्ष घन फुट असून पाईपलाईनची लांबी २.५ किमी आहे. या पद्धतीने तलाव भरण्यास १४ दिवस लागणार आहे. या तलावामुळे कुतवळवाडी-बोरकरवाडी परिसराला लाभ होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सांगवी येथील आरोग्य कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

बारामती, दि.४:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगवी येथील कर्मचारी निवासस्थानाकरीता मंजूर करण्यात आलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे पुणे मंडळाचे कार्यकारी अभियंता मंदार कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणजित तावरे, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात नव्याने करण्यात येणाऱ्या निवासस्थान इमारतीचे काम गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ पद्धतीचे करावे. त्याकरीता उत्तमप्रतीचे साहित्य वापरावे. या इमारतीमुळे आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था होणार असून अप्रत्यक्षपणे येथील रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांना देखील याचा लाभ होणार आहे. एकूणच सांगवीच्या वैभवात भर पाडणारी  इमारत उभी राहील असे काम करावे, असे  आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, बारामती तालुक्यात नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळण्याकरीता पुढील ५० वर्षाचा विचार करुन इमारती बांधण्यात येत आहेत. याकरीता निधीही उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  यापूर्वी देखील बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय, बारामती बसस्थानक, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान अशा प्रशस्त, सुंदर, भव्य, सोईयुक्त, आकर्षक आणि दर्जेदार इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन लोकार्पण करण्यात आले आहे.

राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, सन २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय देण्यासाठी शेती, उद्योग, रोजगार शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.  समाजातील सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्याकरीता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अशा विविध विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. आरोग्य व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

इमारतीसाठी साडे तीन कोटीचा निधी
सांगवी येथील एकूण १२ निवासस्थानाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत ३ कोटी ६५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एका निवासस्थानाचे क्षेत्रफळ ७८४ चौरस फुट असून प्रमाणे एकूण १२ निवासस्थानाचे बांधकाम क्षेत्रफळ ९ हजार ४०८ चौरस फुट आहे.

 

 

पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

पुणे दि. ४- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

श्री.पवार यांनी विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त , जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थितीबाबत माहिती घेतली. खडकवासला धरणातील विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्यावेळी पाऊस झाल्यास नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार नाही. महापालिकेने ध्वनिक्षेपक आणि समाज माध्यमाद्वारे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, त्यांना वेळोवेळी पुरपरिस्थितीची माहिती द्यावी.

नदीकाठच्या सखल भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात. आपत्तीच्या परिस्तिथीत प्रशासनाच्या मदत व बचाव यंत्रणेने गतिमान पद्धतीने प्रतिसाद द्यावा. सर्व यंत्रणांनी परस्पर संपर्कात राहून समन्वयाने काम करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठा, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, पावसाचे प्रमाण, हवामानाचा अंदाज, पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर याविषयीदेखील श्री.पवार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

जिल्हा प्रशासन सतर्क असून सर्व यंत्रणा क्षमतेने मदत आणि बचाव कार्यात कार्यरत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आपत्ती व्यवस्थापनात प्रशासनाला सहकार्य करावे. हवामान विभागाने आजच्या दिवसासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर, मुळशी अशा विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.

नागरिकांनी नदीकाठच्या धोकादायक भागातून सुरक्षित स्थळी किंवा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या शिबिरात स्थलांतरित व्हावे. प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी कार्यरत असून नदीपात्रापासून दूर रहात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकता नगर परिसराला भेट
विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी एकता नगर परिसराला भेट दिली. तेथील मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून त्याचा आढावाही अधिकाऱ्यांनी घेतला. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान भारतीय लष्कराची एक तुकडी मदतकार्यासाठी दाखल झाली आहे. या तुकडीत १०५ जवान आहेत. आवश्यकता असल्यास आणखी एक तुकडी राखीव म्हणून तयार ठेवण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती, दि. ४: शहरातील तीन हत्ती चौक परिसरात प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करुन वाहतूक कोंडी सोडवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

श्री.पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन विभाग, बिरोबा मंदीर परिसर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ग्रंथालय इमारत, उपजिल्हा कारागृह इमारत आणि श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसरातील सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते

श्री. पवार म्हणाले, तीन हत्ती चौकात वाहतूक सोडवण्यासाठी नागरिकासाठी दिशादर्शक फलक लावावेत, चौकात पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, वाहतुकीला अडथळे निर्माण करणाऱ्या बाबी त्वरित हलविण्यात याव्या, परिसरात अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी.

बारामती परिसरातील सुरू असलेली विविध सार्वजनिक विकासकामे कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करावीत; यापूर्वी पूर्ण झालेल्या शासकीय इमारती स्वच्छ राहतील व परिसरात अतिक्रमण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

कन्हेरी वनविभागात हवामानारुप वाढणाऱ्या व सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा आणि ती झाडे जगली पाहिजेत, याबाबत दक्षता घ्यावी.  तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतार करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी.

काटेवाडी येथील बिरोबा मंदिराच्या भिंतीबाहेर तिन्ही बाजूस नागरिकांना बसण्यासाठी ओटा करावा. वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना ओट्यावर चढ-उतार करण्यासाठी पायऱ्या कराव्यात. बाजरी घडई असणाऱ्या फरश्या बसवाव्यात.परिसरात दोन लाख लिटर पाण्याची टाकी बांधावी. यात्रेदरम्यान येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात शौचालये आणि वाहनतळ उभारावे. परिसरात पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होईल, आदी बाबींचा विचार करून आराखडा तयार करा.

प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसर विकसित करा; कामे  करतांना वाड्याचे मूळ रूप जतन झाले पाहिजे. वास्तू पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळाची अनुभूती आली पाहिजे. खोलीत स्वच्छ सूर्यप्रकाश राहील तसेच नागरिकांच्या स्पष्ट दिसेल असे विजेचे दिवे लावावेत. दिवे लावतांना नागरिकांच्या सुरक्षितेतचाही विचार करावा. भिंती, फरश्यामधील फटी राहता कामा नये. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत ग्रंथालयाच्या इमारतीच्या सभोवतालची संरक्षण भिंत १० फूट उंच बांधावी. उपजिल्हा कारागृहाच्या इमारतीची उंची परिसरात असलेल्या रोडपेक्षा तीन फुट उंच ठेवावी जेणेकरुन भविष्यात परिसरात होणाऱ्या इमारतीमुळे कारागृह इमारतीच्या उंचीवर परिणाम होणार नाही. या सार्वजनिक कामांसाठी अत्याधुनिक दर्जाच्या साहित्याचा वापर करावा. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशा ग्वाही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार , जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे,  गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

पाहणी दौऱ्यानंतर येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकरीता हायप्रेशर वॉटर मिस्ट असलेल्या चार अग्निशमन बुलेट दुचाकी वाहनांचे सहयोग सोसायटी येथे लोकार्पण करण्यात आले. सदरची वाहने मदत व पुनर्वसन विभागाकडून प्राप्त झाली आहेत.

000

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

  • एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घेण्यात यावी

  • बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी

मुंबई, दि. 4 : भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, आरोग्य सुविधा इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.

पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी सर्व सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सर्व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेऊन त्याची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

000

नागपूर येथे म्हाळगीनगर चौक व मानेवाडा चौक उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन

नागपूर, दि. 3- मानेवाडा चौक, म्हाळगीनगर येथील उड्डाणपुलामुळे नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे. उड्डाणपुलामुळे रिंगरोड आता अधिक परिपूर्ण होईल. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  म्हाळगीनगर चौक व मानेवाडा चौक उड्डाणपूल बांधकामाच्या भूमिपूजन समारंभाचे उदयनगर चौक, रिंगरोड  येथे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

गत दहा वर्षात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरात चांगले रस्ते, उड्डाणपूल निर्मितीतून जागतिक पातळीवरचा बहुमान नागपूरला दिला. चांगल्या रस्त्यांबरोबरच आरोग्य सुविधांवरही लक्ष देण्यात आले आहे. नागपुरातील सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये निधी आपण दिला आहे. यातून वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा आपण नव्याने उपलब्ध करून देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, गेल्या अनेक काळापासून या  भागात वाहतुकीची समस्या होती. उड्डाणपुलामुळे वाहतुकीची ही समस्या सुटेल. अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची उड्डाणपुलाची मागणी होती. आता उड्डाणपूलाचे भूमिपूजन झाल्यावर लवकरच हा उड्डाणपूल पूर्णत्वास येणार आहे.  या भागातील दळणवळणाची सुविधा या माध्यमातून सुकर होणार असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला आमदार मोहन मते यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

उत्तम शैक्षणिक सुविधा, चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी –  पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना उपस्थिती  जि.प.शाळा बामणोली, मनपा शाळा क्र. ७ शाळेत उत्साह  विद्यार्थ्यांना पुष्प देऊन केले स्वागत सांगली, दि. १६, (जिमाका): शैक्षणिक वर्षारंभापासूनच विद्यार्थ्यांमध्ये...

पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत

0
छत्रपती संभाजीनगर, दि.१६ (जिमाका): शाळेत पडणारे पहिले पाऊल हे ज्ञानाकडे पडते. ज्ञानाकडे पडलेल्या पहिल्या पावलाचे आज जिल्हाभरात मोठ्या उत्साहात स्वागत झाले. हे स्वागत करण्यासाठी...

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा

0
सातारा दि. १६: चालू शैक्षणिक वर्ष  शाळा प्रवेशोत्सवच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंधळी ता. माण येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे...

शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवतील – मंत्री मकरंद जाधव...

0
सातारा, दि. १६:  शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत....

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी सर्व यंत्रणांनी कामे प्रस्तावित करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
वर्गखोल्या बांधकामे, दुरूस्ती प्राधान्याने करण्याचे निर्देश प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्रासाठी राज्य स्तरावर बैठक घेणार सांगली, दि. १६ (जिमाका): जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी...