मंगळवार, जून 17, 2025
Home Blog Page 590

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना

विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा

मुंबई, दि. 6 : बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांच्या भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.

बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला असून बांगलादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित कृतीची गरज अधोरेखित केली आहे. प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांची तात्काळ सुरक्षितता सुनिश्चित करणे, आवश्यकता असल्यास बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे, भारतात त्यांच्या सुरक्षित परतीची प्रक्रिया जलद करणे या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चर्चा केली आहे.

बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने सध्या बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित संपर्क साधण्यास आणि मदत उपलब्ध करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे. बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येतील.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांचे मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसमवेत सक्षमपणे उभे आहे.

सिल्लोड तालुक्यातील साखळी बंधारा प्रकल्पाच्या पुनर्रचनेसंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 6 : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावाच्या परिसरातील पाणीटंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी व या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष दुरूस्ती व विस्तार योजनेअंतर्गत पूलवजा बंधारा प्रकल्पच्या पुनर्रचनेसंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी. तापी खोरे विकास महामंडळामार्फत या प्रकल्पाचा समावेश एकात्मिक राज्य जल आराखड्यात करण्यासाठीच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश अल्पसंख्याकमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गतची कामे तसेच सिल्लोड- सोयगाव भागातील विकास कामांचा आढावा मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मंत्रालयात घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, उपसचिव प्रविण कोल्हे, आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी साखळी बंधारा प्रकल्पाची पुनर्रचना गतीने होणे गरजेचे आहे. तसेच सोयगाव तालुक्यातील सोयगाव लघु पाटबंधारे प्रकल्पातून कालव्यामधून बंद नलिकेद्वारे जंगला तांडा लघु पाटबंधारे प्रकल्पात अतिरिक्त पाणी सोडण्याच्या कामासाठीची निविदा काढण्यात यावी. खेळणा मध्यम प्रकल्पाची गोडबोले दरवाजे बसवून उंची वाढवणे, पूर्णा नदीवरील साखळी बंधारे प्रकल्पास स्वनिधीअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करावी. चारूतांडा प्रकल्पांतर्गत पूल बांधकाम करण्यासंदर्भातील निविदा  तातडीने काढण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी दिल्या.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शहादा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन

नंदुरबार, दि. 06 ऑगस्ट (जिमाका वृत्त) : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज शहादा तालुक्यातील वैजाली, नांदर्डे, करणखेडा, कलमाडी, सोनावल, परिवर्धा, सलसाडी व पिंगाणे येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शहादा पंचायत समितीचे सभापती विरसिंग ठाकरे, सरपंच सौ. सुरेखा ठाकरे, उपसरपंच गणेश ठाकरे, संजय मोरे, मनिलाल पाटील, योगेश पाटील, डॉ. जगदीश पाटील, संदिप पाटील, प्रविण पाटील, राकेश पाटील, चुनिलाल पाटील, शशिकांत पाटील, मोजरा पाडवी, जान्हवी गिरासे आदि उपस्थित होते.

भूमीपजन व उद्घाटन यामध्ये रस्त्यांच्या सुधारणा, खडीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, रुंदीकरण, पुलांची निर्मिती, संरक्षण भितींचे बांधकाम, रस्त्याची जलनिस्सारण यासारख्या कामांचा त्यात समावेश आहे. त्यांचा गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे…

या कामांचे झाले भूमिपूजन व उद्घाटन..

वैजाली

वैजाली कलमाडी जावदे रस्त्याची सुधारणा करणे.

तऱ्हावद वैजाली गावात रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.

राष्ट्रीय मार्ग 2 ते वैजाली ते कलमाडी जावदे रस्त्याची सुधारणा करणे.

वैजाली कलमाडी जावदे रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे.

वैजाली ते काथर्दै खु. रस्त्याची सुधारणा करणे.

नांदर्डे

तऱ्हावद वैजाली भादे रस्त्यावरील वाकी नदीवरील लहान पुल बांधकाम.

नांदर्डे शिवार ते तऱ्हावद पुनर्वसन शिव रस्त्याची सुधारणा करणे.

करणखेडा

वैजाली नांदर्डे प्रकाशा व सोनावल ते करणखेडा रस्त्याची सुधारणा करणे.

करणखेडा ते बोरद हद्द जोडणारा रस्त्याची सुधारणा करणे.

करणखेडा ते नांदर्डे रस्त्याची सुधारणा करणे.

कलमाडी

वैजाली कलमाडी रस्त्यावर वर कलमाडी गांवात रस्ता कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे.

वैजाली कलमाडी वेळावद वाडी रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे.

सोनावल

सोनावल ते करणखेडा मार्गाची सुधारणा करणे.

सोनवल ते तऱ्हाडी रस्त्याची सुधारणा करणे.

सोनावल ते ढेंग रस्त्याचे बांधकाम करणे.

परिवर्धा

परिवर्धा ते वाघोदा रस्त्यावर परिवर्धा गांवात रस्ता काँक्रीटीकरण करणे.

परिवर्धा वाघोदा काथर्दा रस्त्याची सुधारणा करणे.

पाडळता ते परिवर्धा रस्त्याची सुधारणा करणे.

कलसाडी

प्रकाशा धुरखेडा भादे अलखेड रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे.

पिंगाणे धुरखेड़ा रस्ता ते जागेश्वर मंदिर रस्त्याची सुधारणा करणे.

पिंगाणे

पिंगाणे धुरखेडा रस्ता ते जागेश्वर मंदिर रस्तालगत संरक्षण भितीचे बांधकाम करणे.

पिंगाणे गावालगत गोमाई नदीजवळ संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.

0000000000

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्पर्धा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन 

मुंबई, दि. 6 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील अधिकाधिक मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

राज्यात गणेशोत्सवास दिनांक 7 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 44 प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली जाणार आहे. वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर 31 ऑगस्टपूर्वी परिपूर्ण अर्ज सादर करावेत.

या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

या स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन संवर्धन, राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय/राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषणरहित वातावरण, पारंपरिक/ देशी खेळांच्या स्पर्धा आणि गणेश भक्तांसाठी देत असलेल्या  प्राथमिक सुविधा आदी बाबींवर गणेशोत्सव मंडळांना गुणांकन दिले जाणार आहेत.

विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हिडिओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. ही समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हिडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.

जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या याद्यांमधून तीन विजेते क्रमांक निवडीसाठी राज्यस्तरावर समिती असेल. या समितीत सर जे. जे. कला विद्यालयाचे अधिष्ठाता, वरिष्ठ प्राध्यापक अध्यक्ष असतील, तर पर्यावरण विभागातील वरिष्ठ गट ‘अ’ मधील अधिकारी सदस्य, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असतील.

गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी मागील सलग 2 वर्षे राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत.

000

दीपक चव्हाण/विसंअ

लिएंडर पेस यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 6 : भारताचे प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये विजय अमृतराज यांच्यासह स्थान प्राप्त केल्याबद्दल लिएंडर पेस यांचे अभिनंदन केले.

Leander Paes meets Governor Radhakrishnan

Mumbai 6 : Ace tennis player and Olympic medalist Leander Paes met Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai.

The Governor complimented Paes for getting inducted into the International Tennis Hall of Fame alongwith Vijay Amritraj.

0000

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

मुंबई दि. ६:  सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी  महाडीबीटी पोर्टलवर दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्जकरण्यासाठी  मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने  राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी  mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000

अर्ज करणेबाबतची कार्यवाही

अर्ज करणे साठी वेबसाईट

https://mahadbt.maharashtra.gov.in

लाभार्थी (शेतकरी ) “युजर आयडी व पासवर्ड” टाकणे

“अर्ज करा” या बाबीवर क्लिक करणे

“कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करणे

“मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे

“तपशील” बाबीवर क्लिक करून –

“मनुष्यचलित औजारे घटक निवड”

“यंत्र / औजारे व उपकरणे – पिक संरक्षण औजारे”

“बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)” बाब निवडणे

जतन करणे

 

पारधी समाजाच्या विविध योजनांसाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, ‍‍दि.६ :  मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रासह  २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सन २०२४-२०२५ करिता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यासाठी अनुदान उपलब्ध झाले आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई कस्तुरबा क्रॉस रोड न. २, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र. 2 सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पूर्व, मुंबई या पत्त्यावर अर्ज करावेत, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

000

शैलजा पाटील / वि.स.अ

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. ५: पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे (क्लस्टर) प्रस्ताव सादर करण्यासह झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी नद्यांची प्रवाहक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासह नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला अवरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत,  आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  प्रत्येक जीव आपल्याकरीता महत्त्वाचा असून तो वाचविणे आपले कर्तव्य आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण झाले पाहिजे, कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांना सेवा-सुविधा दिली पाहिजे. पूरपरिस्थितीमध्ये मनुष्यहानी, वित्तहानी टाळण्याकरीता नदीचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे काम करावे. नद्यांमधील भराव काढणे, बांधकाम आणि इमारत तोडफोडीचा राडारोडा काढणे आदी उपाय तातडीने करावे. याकरीता पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जलसंपदा विभाग, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवावी.

प्रत्येक गावात पावसाचे प्रमाण, प्रवाहात येणारे पाणी समजण्यासाठी स्वयंचलीत हवामान केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावा. पुराने बाधित होणाऱ्या क्षेत्रात तात्काळ सूचना देणारी प्रणाली (अर्ली वॉर्निंग सिस्टीम) तात्काळ कार्यान्वित करावी. या सर्व कामाकरीता निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही ते म्हणाले.

नदी सुधार प्रकल्पाचे काम करताना नदीतील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. आवश्यक तेथे सीमाभिंती बांधताना त्याबाबत तांत्रिक बाबींचा विचार करावा. नद्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’सारखी प्रभावी योजना राबवावी.

पुराचा धोका कायस्वरुपी कमी करण्याकरीता शासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येईल. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे कायम स्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता निळ्या पूररेषेचे सर्वेक्षण करण्यात येईल. सर्वेक्षण झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. पूरबाधित घराचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डीसीआर) तयार करण्यात येईल, घराच्या पुर्नविकासाकरीता आवश्यकतेनुसार कायद्यात व नियमातही बदल करण्यात येईल.

प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रस्तरावर जाऊन काम केल्यास नागरिकांचे अनुभव, प्रश्न, अडचणी समजण्यासह उपाययोजना करणे शक्य होते. नागरिकांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यानुसार कपडे, अंथरुण, पांघरुन, किट, शिधा तातडीने पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी शासनाचा निधी, जिल्हा नियोजन समिती तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधी आदीतून विशेष मदत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री.शिंदे म्हणाले.

पुरामुळे येणाऱ्या पाण्यातून साथीचे रोग पसरतात. साथीचे रोग पसरू नयेत म्हणून आरोग्य विभागाकडून चांगल्या प्रकारे उपाययोजना सुरू आहेत. पुरामुळे वाहनांच्या नुकसानीबाबत विमा कंपन्यांशी बैठक घेऊन वाहनमालकांना नुकसानभरपाई देण्याबाबत सूचना कराव्यात, असेही ते म्हणाले.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, नद्यांच्या पाणी वहनक्षमता, खोली व रुंदी, धरणातील येवा, नियंत्रित व अनियंत्रित पाण्याचा साठा, पाण्याचा विसर्ग, धरण आणि धरणाच्या खालच्या व वरील बाजूस येणारे पाणी आदी बाबींचा विचार करुन नदी खोलीकरण व रुंदीकरण करण्याची गरज आहे. पूरनियंत्रणाकरीता पुढील ५० वर्षाचा विचार करुन एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यावरही नदीच्या पाणी प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, असे नियोजन करावे. याबाबत जिल्हास्तरीय यंत्रणेने विस्तृत माहिती घेवून आराखडा तयार करावा.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पूरग्रस्त भागातील नागरिकांना मान्सूनपूर्व सूचना देणारी प्रणाली तात्काळ अद्ययावत करावी. पुरामुळे नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना विशेष मदत करण्याबाबत विचार व्हावा. त्यांना जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

यावेळी आमदार आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ यांनी विविध सूचना केल्या.

डॉ. पुलकुंडवार यांनी पूरस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यामुळे नुकसानीची तीव्रता कमी झाल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी पुराच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच आगामी काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सज्ज असल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी धरणातून सोडण्यात विसर्ग सोडण्याच्या कार्यपद्धतीची तसेच पूरनियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या आवश्यक त्या उपाययोजनांची माहिती दिली. मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शेखर सिंह यांनी नागरिकांचे तात्पुरत्या शिबीरात स्थलांतर, त्यांना पुरविण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली.

अमितेश कुमार, विनय कुमार चौबे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खड्डे भरणे, वाहतूक नियंत्रण व पूरपरिस्थीतीत नागरिकांचे स्थलांतरण आदीबाबत माहिती दिली.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, सार्वजनिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

०००

ग्रंथालय संचालनालयाचे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कार घोषित

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत सन 2022-23 या वर्षीचे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिले जाणारे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे, यासाठी तसेच ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. याअंतर्गत सन 2022-23  या वर्षासाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.

(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

शहरी विभाग

१)  हिंद नगर वाचनालय व ग्रंथालय, रहिमतपूर ता. कोरेगाव, जि. सातारा ( पुरस्काराची रक्कम रु. १ लाख)

२) विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, नांदुरा, श्री. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, बुलढाणा रोड, नांदुरा जि. बुलढाणा (पुरस्काराची रक्कम रु. ७५ हजार)

ग्रामीण विभाग :

(अ)  १) शहीद भगतसिंग वाचनालय, कुऱ्हा, मु.पो. कुऱ्हा ता. तिवसा जि. अमरावती (पुरस्काराची रक्कम १ लाख रु.)

(आ)     संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, भिडी ता. देवळी जि. वर्धा (७५ हजार रु.)

(इ)       कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालय, बोरी, ता. जिंतूर जि. परभणी (५० हजार रुपये)

(ई)       कै. रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालय, बिरोबा मंदिराजवळ, कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर ( २५ हजार रु.)

(ब) डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. ५० हजार प्रत्येकी)

राज्यस्तरीय पुरस्कार

१) राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)

श्री. विनायक दत्तात्रय गोखले, अनंत आनंद को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आनंद पार्क, ठाणे (प) मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे

२) राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)

श्री. सुरेश बळीराम जोशी, ग्रंथपाल, विजय वाचनालय, ता. तुळजापूर जि. धाराशिव

डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार (पुरस्काराची रक्कम  रु. २५ हजार प्रत्येकी) :

१) अमरावती – श्री. विनोद बाळकृष्ण मुंदे, श्री. सरस्वती सार्वजनिक वाचनालय, राजना पो. काजना ता. नांदगाव खंडे, जि. अमरावती

२) छत्रपती संभाजीनगर – श्री. युवराज मोहनराव जाधव, लोकमान्य सार्वजनिक वाचनालय, शिवणी (खुर्द), पो. शिवणी (बु.). ता.जि. लातूर

३) नागपूर – श्री. धनराज देवीलाल रहांगडाले, श्री. शारदा वाचनालय, गोंदिया जि. गोंदिया

४) नाशिक – श्री. गोपीचंद जगन्नाथ पगारे, मातृभूमी प्रबोधन समिती संचलित महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, जेल रोड, नाशिक जि. नाशिक

५) पुणे – श्रीमती ज्योत्स्ना चंद्रशेखर कोल्हटकर, श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, भवानी पेठ, सातारा जि. सातारा

६) मुंबई – श्री. अनंत आपाजी वैद्य, रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

डॉ. एस. आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार पुरस्कार (पुरस्काराची रक्कम  रु. २५ हजार प्रत्येकी) :

१) अमरावती – श्रीमती ज्योती रामदास सरदार (धबाले), ग्रंथपाल, साने गुरुजी वाचनालय, जठार पेठ, अकोला, जि. अकोला

२) छत्रपती संभाजीनगर – श्री. गणेश रामभाऊ शेंडगे, ग्रंथपाल, ए. एच. वाडिया सार्वजनिक वाचनालय, ता. जि. बीड

३) नागपूर – श्री. नंदू दामोदर बनसोड, ग्रंथपाल, दादासाहेब निकम सार्वजनिक वाचनालय, महाल, ता.जि. नागपूर

४) नाशिक – श्री. अमोल संभाजी इथापे, ग्रंथपाल अहमदनगर जिल्हा वाचनालय, चितळे रोड, अहमदनगर जि. अहमदनगर

५) पुणे – श्री. भगवान पांडुरंग शेवडे, ग्रंथपाल श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मांगले, ता.शिराळा, जि. सांगली

६) मुंबई – श्रीमती मंजिरी अनिल वैद्य, ग्रंथपाल, श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालय, विलेपार्ले (पूर्व) मुंबई.

००००

नंदकुमार वाघमारे/स.सं

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना ३१ ऑगस्टनंतरही सुरू राहणार

चंद्रपूर, दि. : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी 1500/- रुपये याप्रमाणे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे 31 ऑगस्टनंतरही ही योजना सुरू राहणार आहे, त्यानुसार पात्र महिलांना 1500/- रुपये दरमहा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, चंदनसिंग चंदेल, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, श्री. राजूरकर, प्रा. अतुल देशकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात आतापर्यंत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे 2 लक्ष 84 हजार 923 अर्ज आले असून 2 लक्ष 11हजार 326 अर्जाची तपासणी झाली आहे. यापैकी 1 लक्ष 87 हजार 463 अर्ज मंजूर झाले असून त्रुटी पूर्ततेत 23718 अर्ज आहे. पूर्तता झाल्यावर सदर अर्ज मंजूर करण्यात येतील. तसेच दोन दिवसात संपूर्ण अर्जाची तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

०००

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट

0
पुणे, दि. १७: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतली. या...

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी १ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

0
मुंबई, दि. १७ : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक 22 एप्रिल 2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात...

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावा – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, दि. १७ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या...

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन

0
मुंबई, दि. १७ : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे यांच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या...

पालिका शाळांनी विद्यार्थ्यांना परकीय भाषा देखील शिकवाव्यात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. १७: लहान मुले तंत्रज्ञानस्नेही असतात तसेच ते नवनवीन भाषा देखील लवकर शिकतात. बृहन्मुंबई महानगर पालिका देशातील आर्थिकदृष्ट्या संपन्न महानगरपालिका असून पालिकेने आपल्या...