बुधवार, जून 18, 2025
Home Blog Page 589

उच्चाधिकार समितीने बैठक घेऊन आठवडाभरात अहवाल सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ कृती समितीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

मुंबई, दि. ७: राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनांच्या कृती समितीने ९ ऑगस्ट पासून पुकारलेल्या आंदोलन पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नविन बसेस घेण्याबाबत सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कृती समितीचे संदीप शिंदे, हनुमंत ताटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगत या मागण्यांमुळे होणारा वित्तीय भार आणि त्याची कशाप्रकारे सांगड घालायची यासंदर्भात उच्चाधिकार समितीसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठक तातडीने घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात शासनाला सादर करण्याचेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे आदी विविध मागण्यांसदर्भात सविस्तर चर्चा यावेळी झाली.

००००

मंत्रिमंडळ निर्णय

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन

महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला मोठा फायदा होणार आहे.

या प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगेतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल. यासाठी एकूण ४२६.५२ कि.मी.चे जोड कालवे बांधण्यात येतील. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील  १५ तालुक्यांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारणासाठी याचा उपयोग होईल.  रब्बी हंगामात पाण्याचा वापर करता यावा म्हणून ३१ साठवण तलाव देखील बांधण्यात येणार आहेत. राष्ट्रीय जलविकास अभिकरणामार्फत याचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०१८ मध्ये सादर करण्यात आला होता.  केंद्रीय जल आयोगाने देखील यास मान्यता दिली असून राज्य जलपरिषदेच्या बैठकीत हा प्रकल्प एकात्मिक राज्य जल आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे.

—–०—–

९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार

९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल.

यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग राहणार असून ग्रामविकास विभाग हा ग्रामीण भागासाठी तर, नगर विकास विभाग हा शहरी भागांसाठी नोडल विभाग राहील.

या काळात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेला, तिरंगा सेल्फी अशा विविध माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येईल तसेच त्या-त्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतील.  १३, १४ आणि १५ ऑगस्ट असे ३ दिवस घरोघर तिरंगा फडकविण्यात येईल.

—–०—–

प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करण्याच्या धोरणास मान्यता

प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांच्या निर्मितीमध्ये वाढ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

या धोरणानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एमएमआरडीए यांनी पुढील 15 वर्षात पुरेशा प्रमाणात प्रकल्पग्रस्त सदनिका निर्माण होण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करावयाचा आहे. या प्राधिकरणांनी पुढील 3-5 वर्षात किती प्रकल्पग्रस्त सदनिकांची आवश्यकता आहे याचा आढावा घ्यावयाचा आहे.  हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वर्धनक्षम ठरण्यासाठी टीडीआर निर्मिती आणि त्याची उपयोगिता यातील तरतुदीत सुधारणा देखील कराव्या लागतील. बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये निर्माण होणाऱ्या अतिरिक्त सदनिका या प्रकल्पग्रस्त सदनिका म्हणून वापरात आणण्यात येतील.

बृहन्मुंबईमधील प्रकल्प लक्षात घेता समन्वय समितीला प्रकल्पग्रस्त सदनिकांच्या उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रम ठरविण्याचे अधिकार असतील.

शासकीय जमिनी तसेच केंद्राच्या अखत्यारितील मिठागराच्या जागा, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या जागा या प्रकल्पग्रस्त सदनिकांसाठी उपलब्ध करून घेण्याकरिता नगर विकास विभागातर्फे पाठपुरावा करण्यात येईल. याशिवाय विविध नियोजन प्राधिकरणाच्या योजना एकत्र करण्याची मुभा देऊन विकासकाने प्रकल्पग्रस्त सदनिका दिल्यास या विकासकाला विक्रीसाठी दिलेल्या घटकातून अधिमुल्यामध्ये 50 टक्केपर्यंत अधिमुल्य समायोजित करण्याची मुभा देण्यात येईल.

—–०—–

लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार; कर्ज उभारण्यास मान्यता

लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध  करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड मार्फत खुल्या बाजारातून कर्ज घेऊन हा निधी उभारण्यात येईल. महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अशा या योजनेतून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्व हिश्याचा निधी उभारता येईल.  या कर्जासाठी अपात्र ठरणाऱ्या नागरी संस्थांना या योजनेत कर्ज मिळेल.

केंद्राच्या अमृत-2 योजनेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेस मंजूर पाणी पुरवठा प्रकल्पातील स्व हिश्यातील 822 कोटी 23 लाख रक्कम एमयूआयडीसीएल / एमयूआयएफने कर्ज स्वरुपात प्राधान्याने मंजूर करावी आणि आवश्यकता भासल्यास शासन या संस्थांना अग्रिम निधी मंजूर करेल. कर्जाची उभारणी झाल्यानंतर अग्रिम रक्कम एमयूआयडीसीएल / एमयूआयएफने शासनास परत करावी.

या योजनेतल्या कर्जाची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाने परतफेड न केल्यास त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या जीएसटी, वित्त आयोगाचे अनुदान, मुद्रांक शुल्क परतावा यामधून कर्ज व व्याजाच्या हप्त्याची रक्कम परस्पर वळती करण्यात येईल.

—–०—–

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

1 डिसेंबर 2018 अन्वये ही विशेष भरती मोहीम राबविण्यात आली होती.  यातील नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकाना ही मुदत देण्यात येत आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून पुढील काळात त्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येतील. ही मुदतवाढ देण्यापूर्वीच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना पुढील सेवाविषयक लाभ देण्यात येतील. ही मुदतवाढ केवळ एक वेळची बाब म्हणून देण्यात येत आहे. या मुदतवाढी नंतरही जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील.

—–०—–

अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार; आता जात प्रमाणपत्रांचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येईल

अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग  (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम २०००) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

चुकीच्या नोंदीच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दिसून आल्यास अशा प्रकरणात प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करण्याची तरतूद नसल्याने हे प्रमाणपत्र रद्द करण्यात अडचणी येतात.  त्यामुळे वैधता प्रमाणपत्राचे पुनर्विलोकन या समितीमार्फत करण्याची तरतूद करण्यात येईल.  याशिवाय समितीच्या आदेशाविरुद्ध केवळ उच्च न्यायालयात अपिलाची तरतूद आहे. त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहेत.  म्हणून उच्च न्यायालयात प्रकरण जाण्यापूर्वी एक अपिलिय प्राधिकरण देखील गठित करण्यात येईल.

जात प्रमाणपत्र अवैध झाल्यास सध्या २ हजार ते २० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र त्यात वाढ करणे गरजेचे असून आता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एफआयआर देखील दाखल करण्याची तरतूद करण्यात येईल. समिती सदस्यांना न्यायालयामार्फत दंड लावला जातो.  त्यादृष्टीने देखील सदस्यांना संरक्षण मिळण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात येईल.

—–०—–

विनापरवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड

विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड वसूल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  सध्या 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

दंडाशिवाय अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्त्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 मध्ये करण्यात येऊन अध्यादेश मांडण्यात येईल.

—–०—–

महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार; पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार

महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-2024 ला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेऊन तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे राज्यात सुमारे 5 लाख इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. यातून सुमारे 30 हजार 573 कोटी उत्पन्न मिळेल असे अपेक्षित आहे.

सध्याच्या 14-15 टक्के च्या तुलनेत लॉजिस्टिकचा खर्च किमान 4-5 टक्के ने कमी करणे, लॉजिस्टिकसाठी लागणारा वेळ कमी करणे, विविध उपाययोजनांद्वारे हरित उपक्रम राबवून कार्बन उत्सर्जन  कमी करणे, ब्लॉक चेन, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटलीजन्ट लॉजिस्टीक मॅनेजमेंट सिस्टमचा वापर, ग्रीन लॉजिस्टिक पार्कचा प्रसार, शाश्वत डिझाईन,मोडल शिफ्ट या बाबी समाविष्ट आहेत. या क्षेत्रात देशांतर्गत व परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, तसेच महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक हब दर्जा मिळवण्याचा प्रयत्न असेल. हे धोरण तयार करतांना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, जवाहरलाल नेहरु पोर्ट प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट, राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए, सिडको, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांचा सहभाग घेण्यात आला आहे.

या धोरणांतर्गत राज्यात 2029 पर्यंत 10 हजार  एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत  सुविधा विकसित करण्यात येतील. यात आंतरराष्ट्रीय मेगा लॉजिस्टीक हब म्हणून पनवेल येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संलग्न नवी मुंबई-पुणे क्षेत्रात 2 हजार एकरवर इंटरनॅशनल मेगा लॉजिस्टिक हबचा विकसित करण्यात येईल. त्याच्याशी नवी मुंबई ते पुणे हे क्षेत्र तळोजा, पाताळगंगा, रसायने, खोपोली, महाड, रोहा, चाकण, तळेगांव या औद्योगिक वसाहती संलग्न असल्यामुळे हे क्षेत्र आंतराष्ट्रीय स्तरावरील व्यापार व उद्योगांचे प्रमुख केंद्र होईल. या हबच्या विकासासाठी पंधराशे कोटीची तरतूद करण्यात येईल.

नॅशनल मेगा लॉजिस्टीक हब :- नागपूर- वर्धा नॅशनल मेगा लॉजिस्टिक हब हे पंधराशे एकरवर उभारण्यात येईल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडला असून, नागपूर जिल्ह्याचे देशातील वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक केंद्रीय स्थानामुळे लॉजिस्टिक हबच्या विकासासाठी अनुकूल आहे. जिल्ह्यात 4 राष्ट्रीय द्रुतगती मार्ग आणि एक समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर प्रगतीपथावर असून जिल्हा पूर्वीपासून मालवाहतूक करण्याचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखला गेला आहे. या हबसाठी देखील पंधराशे कोटीची तरतूद करण्यात येईल.

राज्य लॉजिस्टीक हब :- छत्रपती संभाजी नगर-जालना, ठाणे-भिवंडी, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, पुणे- पुरंदर व  पालघर- वाढवण या 5 ठिकाणी प्रत्येकी 500 एकरवर राज्य लॉजिस्टीक हब लॉजिस्टीक सुविधा उपलब्ध करतील. या पाच हबसाठी 2 हजार 500 कोटीची तरतूद करण्यात येईल.

प्रादेशिक लॉजिस्टीक हब : नांदेड-देगलूर, अमरावती – बडनेरा , कोल्हापूर-इचलकरंजी नाशिक – सिन्नर व धुळे-शिरपूर या पाच ठिकाणी प्रत्येकी 300 एकर जागेवर प्रादेशिक हब उभारण्यात येईल. या पाच प्रादेशिक लॉजिस्टीक हबच्या विकासासाठी पंधराशे कोटीची तरतूद करण्यात येईल.

जिल्हा लॉजिस्टीक नोडस :- राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची मुलभूत क्षमता, अंतर्भूत उद्योग व्यवसायाच्या संधी व पारंपरिक कौशल्याच्या आधारे निर्माण झालेली आर्थिक विकासाची केंद्रे याच्या समन्वयातून व विश्लेषणातून 25 जिल्हा लॉजिस्टीक नोडस तयार करण्यात येतील. यात प्रत्येक जिल्ह्यात किमान 2 ते 3 ठिकाणी अशी एकूण 100 एकर क्षेत्रावर जिल्ह्याची दोन-तीन प्रमुख उद्योग व्यापार व व्यवसायची ठिकाणे हब आणि स्पोक मॉडेल अंतर्गत जोडली जातील. जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील 15 टक्के क्षेत्र खाजगी क्षेत्रातील लॉजिस्टीक नोडस साठी राखीव ठेवण्यात येतील.

याशिवाय राज्यात लॉजिस्टीक पार्क विकासकासाठी वित्तीय प्रोत्साहन अनुदान ही देण्यात येईल. या धोरणांतर्गत विहित केलेल्या झोन I आणि झोन II मधील वर्गवारीमध्ये स्थापित होणाऱ्या पात्र लॉजिस्टीक पार्क यांना भांडवली अनुदान देण्यात येईल. ते पुढीलप्रमाणे – लघु लॉजिस्टिक पार्क: किमान 5 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या हबसाठी किमान 10 कोटी गुंतवणूक असलेल्या घटकांना 20 टक्के भांडवली अनुदान देण्यात येईल. मोठा लॉजिस्टिक पार्क: किमान 50 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या हबसाठी आणि किमान 100 कोटी गुंतवणूक असलेला घटकांना 15 टक्के भांडवली अनुदान देण्यात येईल. विशाल लॉजिस्टिक पार्क:  किमान 100 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या हबसाठी किमान 200 कोटी गुंतवणूक असलेल्या घटकांना 15 टक्के भांडवली अनुदान देण्यात येईल. अतिविशाल लॉजिस्टिक पार्क: किमान 200 एकरवरील हबसाठी आणि किमान 400 कोटीची गुंतवणूक असलेल्या घटकांना 10 टक्के भांडवली अनुदान देण्यात येईल. तसेच या सर्व लॉजिस्टीक पार्कंना औद्योगिक दराने वीज, निर्णायक औद्योगिक पायाभूत सहाय्य व ग्रीन लॉजिस्टीक सहाय्य दिले जाणार आहे.

झोन I, झोन II व झोन III मधील स्थापित होणाऱ्या लघु, मोठे, विशाल, अतिविशाल व बहुमजली लॉजिस्टीक पार्क यांना लॉजिस्टीक घटकांना उद्योग व पायाभूत क्षेत्र दर्जा, ग्राउंड कव्हरेज मध्ये सवलत, झोन निर्बंधामध्ये शिथिलता, उंचीच्या निर्बंधामध्ये शिथिलता, ऑपरेशन्स 24×7, कौशल्य व उद्योजकता विकासासाठी सहाय्य तसेच एकल खिडकी प्रणाली, व्यवसाय सुलभता अशी बिगर वित्तीय प्रोत्साहने देण्यात येतील.

बहुउद्देशिय लॉजिस्टीक पार्क :- शहरी/निमशहरी भागात किमान 20 हजार चौ.फुट बांधीव क्षेत्र असलेल्या क्षेत्रास “बहुमजली लॉजिस्टीक पार्क” असे संबोधले जाईल व किमान गुंतवणूक 5 कोटी इतकी राहील. ठाणे,मुंबई व पुणे या महानगरांमध्ये खुल्या जागेची उपलब्धतेमध्ये अडचणी असल्याने, जागेचा जास्तीत वापर होण्यासाठी बहुउद्देशीय लॉजिस्टीक पार्क प्रस्तावित करण्यात आले आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील 6 (प्रथम 100 घटकांना) लॉजिस्टीक पार्कच्या आतील तसेच प्रत्येक जिल्ह्यातील 6 (प्रथम 100 घटकांना) लॉजिस्टीक पार्कच्या बाहेरील एमएसएमई – स्टोरेज आणि  कार्गो हाताळणी घटकांना व्याज अनुदानासह मुद्रांक शुल्क सवलत, औद्योगिक दराने वीज, तंत्रज्ञान सुधारणा सहाय्य व व्यवसाय सुलभता असे वित्तीय प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच उद्योग व पायाभूत क्षेत्र दर्जा, ग्राउंड कव्हरेज मध्ये सवलत, झोन निर्बंधामध्ये शिथिलता, उंचीच्या निर्बंधामध्ये शिथिलता, ऑपरेशन्स 24×7,कौशल्य व उद्योजकता विकासासाठी सहाय्य तसेच एकल खिडकी प्रणाली,व्यवसाय सुलभता  असे बिगर वित्तीय प्रोत्साहन देण्यात येईल.

लॉजिस्टीक क्षेत्रातील एमएसएमईना (जमिन किंमत वगळून 50 कोटी गुंतवणूक मर्यादा असणारे घटक) कोणत्याही प्रकारच्या पूर्वपरवानगी पासून सूट देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी राज्य शासन मैत्री कक्षाद्वारे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.

—–०—–

कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय, आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय आणि आजरा तालुक्यातील उत्तूर येथे योग व निसर्गोपचार महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कागल येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय आणि तितक्याच रुग्ण खाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी आवश्यक जागा उपलब्ध करून देतील.  यासाठी एकूण 487 कोटी 10 लाख रुपये खर्च येईल.

उत्तूर येथे 60 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय तसेच तितक्याच खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात येईल.  यासाठी देखील कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नि:शुल्क जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी एकूण 182 कोटी 35 लाख रुपये खर्च येईल.

—–०—–

न्यायमूर्तींना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा

न्यायमूर्तींना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा असे अनुज्ञेय सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य न्यायमूर्ती यांना किंवा मृत्यू पश्चात त्यांच्या पती किंवा पत्नीस लाभ देण्यात येतात.  हे लाभ मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेल्या पण इतर राज्याच्या उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झालेल्या किंवा मृत्यू पश्चात त्यांच्या हयात पती किंवा पत्नीस देण्यास आज मान्यता देण्यात आली.

—–०—–

सेना कल्याण शैक्षणिक संस्था, राधा कल्याणदास दर्यानानी ट्रस्टला मुद्रांक शुल्क माफ

सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौ. कान्हे येथील राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला तसेच आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीला याचा लाभ होईल. आर्मी वेल्फेअर सोसायटी, दक्षिण कमांड मुख्यालय हे आर्मी लॉ कॉलेजच्या विस्तारीकरणासाठी जमीन घेणार आहे.  त्यामुळे लोकहितास्तव हा निर्णय धेण्यात आला.

—–०—–

जुन्नरच्या आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय

औषधी वनस्पती प्रक्रिया आदिवासी सहकारी संस्थांसाठी अर्थसहाय्य योजनेतून जुन्नरच्या श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संस्थेस एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून २ कोटी रुपये देण्यात येतील.  यातून या संस्थेने नाबार्डकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेची परतफेड करावयाची आहे.

—–०—–

अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मान्यता; राज्यातील अल्पसंख्याकांचे मागासलेपण दूर करणार

राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यात येतील. त्याचप्रमाणे या संस्थेच्या वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

राज्यात मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, ज्यु, सिख, पारशी हे अल्पसंख्याक नागरिक आहेत.  त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा या संस्थेमार्फत अभ्यास करण्यात येईल.

—–०—–

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे यांची मुलाखत

मुंबई, दि ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे’ नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे यांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी या विषयावरील मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार ८ व शुक्रवार ९ ऑगस्ट २०२४  रोजी  आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना स्वरूप, उद्दिष्टे, राज्यात या योजनेची करण्यात येणारी अंमलबजावणी, योजनेसाठी आलेले अर्ज, सहभागी संस्था आणि उमेदवारांनी केलेली नोंदणी, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून या योजनेसाठी करण्यात आलेली तयारी याबद्दल  ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चे नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे  यांनी माहिती दिली आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

—-000—

जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेस एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून २ कोटी रुपये मंजूर करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राज्य शासनासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले आभार

मुंबई, दि. ७ :- पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेस आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून २ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल राज्य शासनासह उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आभार मानले आहेत. जुन्नरच्या आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या संस्थेला चालना देण्यासाठी अर्थसहाय्य मंजूर व्हावे यासाठी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता.

कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून हिरडा या वनोत्पादनावर प्रक्रिया करून औषध तयार करण्यात येणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योग करून जुन्नर तालुक्याच्या विकासास हातभार लावण्यासह आदिवासी बांधवांना उद्योजकतेकडे घेऊन जाणाऱ्या, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणाऱ्या सहकारी संस्थेस प्रोत्साहन देणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य मंत्रिमंडळाने आज २ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यास मंजुरी दिल्यामुळे आमदार अतुल बेनके यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. त्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

०००००

राज्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रुपांतर बॅरेजेसमध्ये करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

जलसंपदा विभागाशी संबंधित सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बीड जिल्ह्यांतील प्रलंबित योजनांचा आढावा

मुंबई, दि. ७ :- राज्यातील जनतेला पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी अस्तित्वातील प्रकल्पांची क्षमतावाढ करणे गरजेचे आहे. नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून एका प्रकल्पातील अतिरिक्त पाणी दुसऱ्या प्रकल्पात नेण्याचे नियोजन करावे. त्यातून सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रुपांतर बॅरेजेसमध्ये करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

जलसंपदा विभागाशी संबंधित सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बीड या जिल्ह्यांतील विविध प्रलंबित योजनांसंदर्भातील वित्तीय व अन्य प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस आमदार बबनराव शिंदे, राजेश पाटील, संजय शिंदे, बाळासाहेब आजबे, यशवंत माने, चंद्रकांत नवघरे, माजी आमदार अमरसिंह पंडित, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. दीपक कपूर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते. कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. काही मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते, तर काही प्रकल्पांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी पावसाळ्यात लघु व मध्यम सिंचन प्रकल्प इतर स्त्रोताद्वारे भरून घ्यावेत. नागरिकांना उन्हाळ्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाने वित्त विभागाशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी किटवडे प्रकल्प आंतरराज्य प्रकल्प म्हणून पूर्णत्वास येणे आवश्यक असून यामध्ये साठवण क्षमता वाढविल्यास त्याचा कर्नाटकसह गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागाला फायदा होऊ शकतो. त्यातून या भागातील नागरिकांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळण्यास मदत होईल. याबाबत जलसंपदा विभागाने कर्नाटक शासनाशी पत्रव्यवहार करून जलदगतीने कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली.

सोलापूर जिल्ह्यातील भीमा-सीना नदीवरील जुन्या पद्धतीच्या कोल्हापूर बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या समितीच्या अहवालानुसार अभिप्राय मागविण्यात आले आहेत. प्राथमिक अहवालाचा अभ्यास करून आता त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात यावे. खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजना, सीना नदीवरील बोपले, शिरापूर येथेही नवीन बॅरेजेसच्या कामांना मंजुरी देण्यात येत असून येथील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या कामांना राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करावी. मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेमधून वंचित राहिलेल्या अनगरसह ९ गावांच्या विस्तारित योजनेला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. त्यालाही मान्यता घेऊन गतीने कार्यवाही करावी. सीना नदीवरील आष्टी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या खडकत क्र. १ व २, सांगवी नागापूर व संगमेश्वर, पिंपळसुट्टी तालुक्यातील पिंपरीघुमरी व कर्जत, दिघी, निमगाव डाकू व गांगर्डा आणि जामखेड तालुक्यातील चौंडी अशा १० प्रकल्पांचे बॅरेजेसमध्ये रुपांतर करण्याची पुढील कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

बीड जिल्ह्यातील शिरूर (कासार) येथील ब्रम्हनाथ येळंब आणि निमगाव या बंधाऱ्यांचेही बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आराखडा तयार करून नियोजन आणि वित्त विभागाला सादर करावा. कडा, कडी, मेहकरी प्रकल्पांच्या विशेष दुरूस्तीसाठी प्रशासकीय पातळीवर खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून विभागाच्या सेव्हिंगमधून खर्च करावेत. शिवाय पावसाळ्यात कामे होणे शक्य नसल्याने आराखडा तयार करून नाबार्डच्या प्रकल्पामध्ये खर्चाचे नियोजन करावे. नाबार्डने दिलेल्या १५ हजार कोटी अर्थसंकल्पातून लहान प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करा. त्यासाठी लागणारी वाढीव तरतूद त्यातून मंजूर करण्यात यावी. मात्र, खर्चाचे प्रमाण फार वाढणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

लोकप्रतिनिधींच्या मागण्यांचा विचार करून औंढा तालुक्यातील (जि. हिंगोली) केळी लघु तलावाचे पुनरुज्जीवन करून उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. येलदरी धरणातील मृत साठ्यातील पाणी केवळ पिण्यासाठी सिद्धेश्वर धरणात सोडावे, तेथून केळी तलाव भरून घ्यावा. सिद्धेश्वर धरणात तांत्रिक अडचणी दूर करून नवीन पाणीसाठा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सिंदफणा नदी पात्रातील इटकुर, अंकुट, खुंडरस, नाथापूर आणि बिंदूसरा नदी पात्रात नामलगाव हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस हा कमी प्रमाणात होतो, तसेच तो बेभरवशाचा आहे. ऑक्टोबर महिन्यात गेट टाकून पावसाचे पाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात साठा करणे शक्य नाही. सद्यस्थितीत बंधारे नादुस्त झाल्याने त्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करण्यासाठी सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी बीड जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून घ्यावा. त्याच पद्धतीने सिंदफणा आणि बिंदूसरा नदीपात्रातील कोल्हापूर बंधाऱ्यांचेही निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधितांना दिल्या.

———-०००००——-

राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांना वेग येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; अल्पसंख्याक संस्था संघटनांनी मानले उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार

मुंबई, दि. ७ :- राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी’, ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे यश असल्याचे सांगत राज्यातील अनेक मुस्लिम तसेच अल्पसंख्यांक बांधवांच्या संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.

राज्यातील मुस्लिम तसेच अल्पसंख्याक बांधवांच्या विकास योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच प्रयत्न व पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून  त्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे. अल्पसंख्याक समुदायासाठी ‘टार्टी’, ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ स्थापन करण्याचा निर्णय विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली.

राज्यातील महायुती सरकारमध्ये अल्पसंख्याक बांधवांची बाजू भक्कमपणे मांडण्याची तसेच त्यांच्यासाठी विकासयोजना तयार करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने पार पाडत आले आहेत. त्यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरिता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना २०२४-२५ पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तत्पूर्वी, यावर्षी, ११ मार्च रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय तसेच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ ‘एमआरटीआय’ स्थापन करण्याचा निर्णयही त्यांच्याच पुढाकाराने घेण्यात आला आहे.

अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या संस्थेच्या आस्थापनेवरील पदांचे वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

——-०००००——

ठाणे जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर छापे; १८.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. ०६: ठाणे जिल्ह्यातील अंजुम, अलीमघर व खाडीमध्ये पावसाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण ५ गुन्हे नोंद करण्यात आले असून एकूण  ४८००० लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण १८ लाख १७  हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

खाडीमध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागातील जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.  या प्रशिक्षित जवानांनी ही कारवाई केली.  राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली  हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या  मोहिमेच्या अनुषंगाने विभागीय उप-आयुक्त प्रदीप पवार यांनी कोकण विभाग निरीक्षक यांच्या समन्वयाने छापे टाकण्यात आले.  या कारवाईमध्ये हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर छापे टाकून २५० ड्रम्स रसायन उद्ध्वस्त करण्यात आले. या मोहिमेमध्ये बोटींमधून जाऊन  खाडीतील हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केली.

हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे चालवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कलम ३२८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धडक कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे, असे उप आयुक्त श्री. पवार यांनी कळविले आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ

ऑनलाईन माध्यमातून होणारे बालकांचे लैंगिक शोषण रोखणे सर्वांची जबाबदारी –  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ कार्यक्रमाचे उद्घाटन

मुंबई, दि.६ : लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना इंटरनेटमुळे जगभरातल्या ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. परंतु लहान मुलांविरोधातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यातूनच ऑनलाईन माध्यमातून होणारे  मुलांचे लैंगिक शोषण रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी  केले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ (SAFE WEB FOR CHILDREN) या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त कैलास पगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके,पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, चाइल्ड फंड इंडियाचे राजेश रंजन सिंग आदी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या वापरामुळे आपले आयुष्य जसजसं सोप होत आहे, तशीच आपली प्रायव्हसी त्यामुळे कमी होत आहे. हॅकर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन मार्गांनी फसवणूक करत आहेत. सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा सुरक्षितरित्या वापर करणे आवश्यक आहे. लहान मुलेही इंटरनेट वापरत असल्यामुळे त्यांच्या पालकांपर्यंत पोहचून सायबर क्राईमबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

सध्या लहान मुलांकडे स्वतःचा मोबाईल नसला, तरी मुलांना गप्प बसवण्यासाठी म्हणून पालक स्वतःचा मोबाईल मुलांना देतात. यामुळे मुलांना सोशल मीडियावर सहज प्रवेश मिळतो. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे, असे सांगून  मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की,  राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा हा कार्यक्रम खरोखरच स्तुत्य आहे. महिला व बालविकास विभागातर्फे या उपक्रमाला पाठबळ देण्यात येईल, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती शाह प्रास्ताविकात म्हणाल्या, लहान मुले, महिला आणि पालक यांच्यात वेब सुरक्षा याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुलांनी इंटरनेट चा सुरक्षितरित्या आणि इंटरनेट चा योग्यप्रकारे वापर कसा करावा यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण व गैरवर्तन यापासून संरक्षण करणे या उद्देशाने मुलांसाठी ऑनलाईन सुरक्षिततेचा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार असल्याचे शाहा यांनी सांगितले.

या कार्यक्रमास विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शारीरिक शिक्षण महाविद्यालय अनुदानासंदर्भात शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,दि.6 : शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात शासन  सकारात्मक आहे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयात नागपूर येथील पद्मश्री अजित वाडेकर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या अनुदानासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार प्रकाश गजभिये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, शारीरिक शिक्षण महाविद्यालयामधून मोठ्या प्रमाणात खेळाडू तयार होतील आणि देशामध्ये नाव करतील. अनुदानासंदर्भातचा प्रस्ताव विभागाने तयार करून वित्त विभागाला पाठवावा. त्यानंतर तो प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येईल आणि सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाच्या कामाला गती द्यावी -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 

मुंबई, दि. 6 : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाच्या कामाचे कालबद्ध नियोजन करून या कामाला अधिक प्राधान्य देऊन गती द्यावी, अशा सूचना  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी  दिल्या.

आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विद्यापीठ सद्यस्थितीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे  संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मुख्य प्रशासकीय इमारत, कुलगुरू दालन, निबंधक दालन, आस्थापना बैठक व्यवस्था, थीमपार्क, विद्यार्थी बैठक व्यवस्था, ध्यानकेंद्र, स्वागतकक्ष, वाचनालय, मुले व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती, मोठे बहुउद्देशीय सभागृह आणि विद्यापीठ सुरू करण्यासाठी, कुलगुरुंची निवड, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तसेच आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी अधिक गती द्यावी, असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

 

ताज्या बातम्या

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

0
पुणे, दि. १८: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे,...

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

0
मुंबई, दि. १७: राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून...

‘मनरेगा’शी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री भरत गोगावले

0
मुंबई, दि. १७ : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना,...

स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

0
मुंबई, दि. १७: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील थकीत कमिशन अदा करण्याची कार्यवाही करावी. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्याला द्यावयाचा हिस्सा तातडीने देवून कमीशन...

रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – मंत्री संजय राठोड

0
मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात...