बुधवार, जून 18, 2025
Home Blog Page 587

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४; एकीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.25.06.2024 पासून राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे,  आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेच, अस्पष्ट/ अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दुर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना १-८ तयार करणे, दि. ०१ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकीकृत प्रारूप यादी तयार करणे. इत्यादी पुनरिक्षण – पूर्व उपक्रम आत्तापर्यंत राज्यात राबवण्यात आलेले आहे.

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाची एकिकृत प्रारुप मतदार यादी दि.06 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या प्रारुप यादीमध्ये यापूर्वी झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील राज्यातील एकूण मतदारांची संख्या, एकूण मतदान केंद्रे, उतुंग इमारती व समूह सहकारी गृह निर्माण सोसायटींमधील मतदान केंद्रांची संख्या यांमध्ये खालीलप्रमाणे वाढ झालेली दिसून येत आहे.

 

अ.क्र.       बाब लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 एकीकृत प्रारुप मतदार यादीतील
1 मतदार यादीतील एकुण मतदार संख्या 9,29,43,890 9,36,75,934
2 राज्यातील एकुण मतदान केंद्रांची संख्या 98,140 1,00,186
3 उतुंग इमारती व समूह सहकारी गृह निर्माण सोसायटींमधील मतदान केंद्रांची संख्या 150 1,165

 

दि. ०६ ऑगस्ट २०२४ रोजी एकीकृत प्रारूप मतदार यादी प्रकाशित झालेली आहे. यामध्ये सर्व मतदारांची अद्ययावत माहिती समाविष्ट आहे. ही मतदार यादी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यादी भागासहीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही यादी डाऊनलोड करून तसेच www.voters.eci.gov.in  या संकेतस्थळावरून अथवा Voter Helpline हे मोबाइल अॅपचा वापर करून मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव आहे की नाही, तसेच नाव असेल तर त्यासोबतच वैयक्तिक माहिती आणि पत्ता हे तपशील तपासून पाहता येईल.  ही यादी पाहण्यासाठी मतदार आपल्या जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला देखील भेट देऊ शकतील.

दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी :

दि.०६ ऑगस्ट २०२४ (मंगळवार) ते २० ऑगस्ट २०२४ (मंगळवार) ह्या कालावधीत नागरिकांना नविन मतदार नोंदणी करणे, मतदारांची नावे, पत्ते, आणि अन्य तपशील दुरुस्त्या व बदल, तसेच मतदार यादीतील नोंदींना आक्षेप करण्यासाठी खालील प्रकारचे अर्ज भरता येतील. यासोबतच, मृत्यू /कायमचे स्थलांतर या आणि अशा योग्य कारणांसाठी मतदार यादीतून नाव वगळण्याचा अर्जही भरता येईल.

अर्ज क्रमांक ६ – नव मतदार नोंदणीसाठी.

अर्ज क्रमांक ८ – मतदार यादीतील वैयक्तिक तपशीलात बदल/दुरुस्त्या- अद्ययावतीकरण, पत्त्यातील बदल/स्थलांतर, दिव्यांगत्वाचे चिन्हांकन, मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी हे तपशील जोडणे, मतदार ओळखपत्र पुन्हा मिळावे यासाठी विनंती करणे.

 

अर्ज क्रमांक ७ – योग्य कारणासाठी मतदार यादीतून नाव वगळण्याच्या विनंतीसाठी.

अर्ज क्रमांक ६ब – मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्यासाठी.

हे सर्व अर्ज www.voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline हे मोबाइल अॅप वापरून ऑनलाईन भरता येतील. यासोबतच जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट देऊन, तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्ये ऑफलाईन पद्धतीनेही भरता येतील.

प्रत्येक अर्जासोबत गरजेनुसार आपले छायाचित्र, पत्ता तसेच वयाच्या पराव्याचा दस्तऐवज, वा पुरावा म्हणून आवश्यक असलेल्या इतर दस्तऐवजाची स्व-स्वाक्षरीकृत प्रत जोडणे अनिवार्य असणार आहे.

 

विशेष शिबिरे :

या कार्यक्रमाच्या काळात दि.10, 11 ऑगस्ट व दि.17, 18 ऑगस्ट, 2024 या तारखांना शनिवार आणि रविवार या दिवशी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणिकरीता विशेष शिबिरे आयोजित केली जातील.

 

दावे आणि हरकती निकालात काढण्याचा कालावधी :

कार्यक्रमाच्या कालावधीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर अर्थात दावे आणि हरकतींवर नियमांनुसार कार्यवाही करून ते दि. २९ ऑगस्ट २०२४ (गुरूवार) पर्यंत निकाली काढले जातील.

 

अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी :

दावे आणि हरकती नियमांनुसार निकाली काढल्यानंतर दि. ३० ऑगस्ट २०२४ (शुक्रवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल. यात या कार्यक्रमादरम्यान दावे आणि हरकतीसाठी उपलब्ध करून दिलेल्या कालावधीत आलेल्या अर्जांवरील कार्यवाहीनुसार नव्या तसेच बदल आणि दुरुस्ती केलेल्या मतदारांच्या नावासहीतची अंतिम यादी समाविष्ट असेल.

 

मतदार नोंदणीसाठी महत्वाचे :

दि. १ ऑक्टोबर २०२४ किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेले भारतीय नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र असतील.

 

मतदार यादीत नाव तपासण्यासाठी :

मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:

  • ceo.maharashtra.gov.in आणि www.voters.eci.gov.in ही संकेतस्थळे.
  • Voter Helpline हे मोबाइल अॅप.
  • मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय.

मदत क्रमांक :

नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास मतदार मदत (Helpline) क्रमांक १९५० किंवा १८००२२१९५० वर संपर्क साधावा.

 

००००

अभियांत्रिकी प्रवेशासाठी एमएचटी सीईटी व जेईईच्या स्कोअरवर नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध

राज्य सामाईक प्रवेश कक्ष यांच्याकडून खुलासा

मुंबई, दि. ७ राज्य  सामाईक प्रवेश कक्ष यांच्याकडून  एमएचटी- सीईटी व जेईईच्या स्कोअरवर नोंदणी (रजिस्ट्रेशन) केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी राज्य सामाईक प्रवेश कक्षाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे,  असा खुलासा राज्य सामाईक प्रवेश कक्ष (सीईटी सेल) कडून करण्यात आला आहे.

‘अभियांत्रिकी प्रवेशात सीट ब्लॉकिंग होण्याशी शक्यता,’ असे वृत्त प्रसिद्ध झाले यामध्ये तथ्य नाही असे राज्य सामाईक प्रवेश कक्ष यांच्याकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

उमेदवाराचे शैक्षणिक हित लक्षात घेता, जे उमेदवार जेईई ही सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली असेल तर तो अखिल भारतीय कोटाकरीता  भारतातील विविध राज्यात प्रवेशास पात्र असतो. जर उमेदवारांनी एमएचटी-सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा दिली असेल तर उमेदवाराला महाराष्ट्रातील विविध राज्यामध्ये एकाधिक संस्थांची निवड करु शकतो. वरील दोन्ही परीक्षा दिली असेल तर भारतातील विविध संस्थामध्ये प्रवेश घेण्यास  व संबंधित राज्याच्या परीक्षा दिली असेल तर राज्यातील संस्थामध्ये प्रवेश घेण्यास पात्र असतो.

प्रवेश प्रकियेकरीता ऑनलाईन नोंदणी अर्ज कराताना सर्वप्रथम उमेदवारांची प्राथमिक माहिती भरुन घेतली जाते. उदा. बारावीच्या प्रमाणपत्रामध्ये नाव नमूद तसेच नाव नोंदणी करणे, ई-मेल आयडी, मोबाईल आणि पासवर्ड तयार करणे इ.

सदरील प्राथमिक माहिती भरुन झाल्यानंतर सत्यापन करण्यासाठी उमेदवारांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर सत्यापन कोड देण्यात येतो. त्यानंतर सदरील ऑनलाईन नोंदणी अर्ज सत्यापन होतो. त्यानंतर उमेदवारांचे कागदपत्राची छाननी करण्याकरीता उमेदवाराला ई-पडताळणी केंद्र आणि उमेदवार प्रत्यक्षात सुविधा केंद्रावर जाऊन पडताळणी करुन घेणे अनिवार्य असते. त्यानंतर सदरील उमेदवाराचे नाव गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यात येऊन गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरीता एकाधिक संस्थांची निवड करण्यासाठी विकल्प अर्ज करण्यात येतो. त्यानंतर गुणवत्ता क्रमांक नुसार प्रवेश करण्यात येतो.

००००

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,दि.७ : रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण  मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या विविध विषयाबाबत आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

रसायन तंत्रज्ञान संस्थेचे मराठवाडा येथे सन २०१८ मध्ये उपकेंद्र सुरु करण्यात आले. उपकेंद्राचे बांधकाम सुरु झाले असून ते पूर्ण करण्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल .तसेच जालना येथील उपकेंद्राच्या पदनिर्मितीस मान्यता आणि  मूल्यनिर्धारण अहवालानुसार संस्थेस देय असलेली वेतन अनुदानाची रक्कम देण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ

अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस (MRTI) मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई दि .7 :  राज्यातील अल्पसंख्याकांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यात येतील. त्याचप्रमाणे या संस्थेच्या वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

राज्यातील अल्पसंख्याक समाजांचा  सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा या संस्थेमार्फत अभ्यास करण्यात येईल.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

सर्वांच्या सहभागातून ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे

मुंबई, दि. ७:  महाराष्ट्रात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान दि. ९ ते १५  ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिन आपला राष्ट्रीय सण असून त्याच उत्साहवर्धकतेने हे अभियान सर्वांच्या उत्स्फूर्त  सहभागातून यशस्वीरीत्या राबवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

राज्यात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यासंदर्भात सर्व  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे  मंत्रालयात श्री.खारगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  झाली.  यावेळी त्यांनी संबंधितांना सूचित केले.  यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सांस्कृतिक विभागाचे अधिकारी तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांच्यासह सर्व  विभागीय आयुक्त, तसेच संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

श्री.खारगे यांनी सांगितले की, महाराष्ट्राने स्वातंत्र्यलढ्यात भरीव योगदान दिलेले असून देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे अनन्यसाधारण स्थान आहे. या पार्श्वभूमीवर घरोघरी तिरंगा अभियानही संपूर्ण उत्साहात व्यापक प्रमाणात आपणा सर्वांना साजरे करायचे आहे. सर्व जिल्हा, तालुका आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनासह राबवायचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्या विभागातील, जिल्ह्यातील ध्वजाची मागणी आणि त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात ध्वजाची उपलब्धता ठेवावी. त्याचसोबत सर्व ध्वजाचा सन्मान ठेवला जाईल, याची खबरदारी सर्वांनी घ्यायची आहे. सर्व नागरिकांना आपल्या घरांवर त्यासोबतच, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय या सर्वांना या अभियानात सक्रिय सहभागी होत दि.१३ ते १५ या कालावधीत तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावे. या अभियानानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत करावे, जेणेकरून या अभियानात सक्रिय सहभागी होण्याची प्रेरणा नागरिकांना मिळेल.

केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा) अभियान सुरु केले. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष असून  या वर्षी देशभरात  13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’  अभियान राबविले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर घरोघरी तिरंगा अभियान राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत साजरे केले जाणार आहे. मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबवून आघाडी घेतली. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात यावे, असे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी यावेळी सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ

आर्मी वेल्फेअर सोसायटीच्या आर्मी लॉ कॉलेजसाठी मुद्रांक शुल्क माफी;  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई, दि.7 : आर्मी वेल्फेअर सोसायटीकडून आर्मी लॉ कॉलेज जुलै 2018 मध्ये स्थापण्यात आले असून यासाठी सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

पुण्यात लष्करी कायदा महाविद्यालयासाठी जमीन आणि इमारती ट्रस्टने मोफत उपलब्ध करून दिली आहे. यासाठी मंत्रालय येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

आर्मी वेल्फेअर सोसायटीच्या आर्मी लॉ कॉलेज विस्तारीकरणासाठी जमीन उपलब्ध करून घेण्यात आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीला याचा लाभ होईल. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कान्हे येथील राधा कालियानदास दर्यानी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना 15 ऑक्टोबर 1982 रोजी करण्यात आली. राधा कालियानदास दर्यानी चॅरिटेबल ट्रस्ट सशस्त्र संरक्षण दलाप्रती सेवा भावनेतून काम करत असून ट्रस्टने ही जमीन दिली आहे. राष्ट्राच्या प्रति सेवाभावातून तसेच लोककल्याणासाठी, गरीब आणि ग्रामीण समाजातील वंचिताना सक्षम करण्यासाठी एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पाद्वारे संस्था काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

—–०—–

किरण वाघ/विसंअ

आपत्ती व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. 7 :-  कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.  आपत्ती बाबतच्या पूर्वसूचना नागरिकांना जलद व वेळेत मिळाल्या पाहिजेत, यासाठी आपत्ती व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित ‘दक्ष’ आपत्ती व्यवस्थापन परिषद 2024 चा आरंभ आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी संजय यादव, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक लहुराज माळी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्ती आपण टाळू शकत नाही.  मात्र आपत्तीमध्ये होणारे नुकसान कमीत कमी होईल याची दक्षता घेऊ शकतो. भूस्खलन, पूर, वीज पडणे, चक्रीवादळ, गारपीट, उष्णतेच्या लाटा यासारख्या आपत्तीच्या सूचना नागरिकांना आपत्तीपूर्वी मिळणे महत्त्वाचे असून यासाठी सॅटेलाइटचा वापर होणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान, सुरक्षित जीवनाचे वरदान असल्याचे सांगून आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचे हे ज्ञान  सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.

आपत्तीमध्ये मदत व बचाव कार्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कार्यात एनडीआरएफ, आपदा मित्र, पोलीस, याबरोबरच  सर्व  विभागांचे मोठे योगदान असते. आपत्ती व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या या परिषदेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन बाबत करावयाच्या उपाययोजनावर चर्चा होऊन पुढील रणनीती ठरविण्यास ही परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्री.पाटील यांनी व्यक्त केला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर म्हणाले, वातावरणीय बदल झपाट्याने होत आहेत. नैसर्गिक आपत्ती ही टाळता येत नसून नैसर्गिक आपत्ती नंतरची स्थिती फार भयावह असते. यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करणे महत्त्वाचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनामध्ये  उल्लेखनीय काम केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे निवृत्त उपायुक्त अनिल लाड यांनी आपत्ती प्रतिसादाकरिता आवश्यक सज्जता, आपत्ती परिस्थितीत नागरिकांची जबाबदारी आणि प्रसिद्धी माध्यमांची आवश्यक भूमिका याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

चर्चासत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर, भारतीय हवामान विभागाचे सुनील कांबळे एनडीआरएफ चे सारंग कुर्वे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे राज्य प्रकल्प अधिकारी श्रीदत्त कामत, कल्याण डोंबिवली महापालिकेचे निवृत्त उपायुक्त अनिल लाड आणि रोटरी इंटरनॅशनल चे दिनेश मेहता यांनी सहभाग घेतला.

कार्यशाळेस आपदा मित्र,आपदा सखी व एनएसएसचे विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

रेल्वेला हस्तांतरित बेहरामपाडा येथील अतिरिक्त जमिनीच्या ताब्यासाठी महसूलमंत्र्यांशी चर्चा करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ७ :- मुंबईतील बेहरामपाडा, गरीबनगर यासह वांद्रे पूर्वेकडील परिसरातील रेल्वे विभागाला देण्यात आलेली अतिरिक्त जमीन राज्य शासनाच्या ताब्यात घेऊन त्यावर झोपडपट्टी पुनर्वसनासारख्या योजना राबविण्याच्या स्थानिक नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या जमिनीवरील राज्य शासनाच्या मालकीसंदर्भातील निर्णयासाठी महसूलमंत्र्याशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मुंबईच्या बेहरामपाडा येथील जमिनीच्या मालकीसंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस आमदार झिशान सिद्धीकी, माजी आमदार बाबा सिद्दीकी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह रेल्वे, महसूल, नगर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे विभागाच्या मागणीनुसार वर्ष २००८ मध्ये मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाची जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरित केली. जास्तीची हस्तांतरित जमीन राज्य शासनाने परत घेऊन त्याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनासारखे प्रकल्प उभारण्याची स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा, गरीबनगर, खेरवाडी परिसरातील 67 एकर आणि वांद्रे पश्चिमेकडील 10 एकर जमिनीवरील राज्य शासनाच्या मालकीसंदर्भात महसूलमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

——०००—–

योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयामुळे योग व निसर्गोपचार शिक्षणास मिळणार चालना

मुंबई, दि.७ : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्न ६० रुग्णखाटांच्या रुग्णालयास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे योग व निसर्गोपचार शिक्षणास चालना मिळणार आहे.

नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयासाठी एकूण रु. 182.35 कोटी  इतका खर्च अपेक्षित असून आवश्यक निधी उपलब्ध करुन घेण्यास व त्याप्रमाणे खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पाचव्या वर्षानंतर पुढील प्रत्येक वर्षी आवश्यक आवर्ती खर्चासाठी प्रति वर्ष सुमारे रु. 19.67 कोटी इतका निधी उपलब्ध करुन देऊन खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत राज्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी बॅचलर ऑफ योगा ॲण्ड नॅचरोपॅथी (बी.एन.वाय.एस.) साठी विहीत केलेला पदवी अभ्यासक्रम कोणत्याही संस्थेमार्फत सुरु नाही. यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

त्याप्रमाणे प्रस्तावित केल्यानुसार आवश्यक पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नत ६० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली .

00000

राजू धोत्रे/विसंअ

शेतकऱ्यांना कृषी पूरक साहित्याचे वितरण ताबडतोब करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबई, दि 7  :महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले पॉवर स्प्रे पंप शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तसेच राज्यातील पूरबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत नुसानभरपाई देण्याच्या अनुषंगाने नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्यात यावे. तसेच विविध योजनांसाठी वितरित करण्यात आलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यात ताबडतोब वर्ग करण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषिमंत्री श्री.मुंडे बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प संचालक  परिमल सिंह, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी विकास प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, कृषी संचालक विनयकुमार आवटे, सर्व विभागीय कृषी सहसंचालक, सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा व इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना कृषिमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, यांनी राज्यात 99 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असल्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा माध्यमातून डीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाचे कृषी पूरक उपकरणे, निविष्ठा यांचे वितरण त्वरित करण्यात यावे. नॅनो युरिया, डीएपी, पावर स्प्रे पंप, स्टोरेज बॅग, मेटल दिहाईड आदी साहित्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावे, यावेळी विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भासणाऱ्या अडचणींच्या बाबत आढावा घेण्यात आला.

००००

ताज्या बातम्या

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

0
पुणे, दि. १८: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे,...

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

0
मुंबई, दि. १७: राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून...

‘मनरेगा’शी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री भरत गोगावले

0
मुंबई, दि. १७ : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना,...

स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

0
मुंबई, दि. १७: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील थकीत कमिशन अदा करण्याची कार्यवाही करावी. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्याला द्यावयाचा हिस्सा तातडीने देवून कमीशन...

रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – मंत्री संजय राठोड

0
मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात...