बुधवार, जून 18, 2025
Home Blog Page 586

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी २४ कोटी ७४ लाख रुपये वितरित

मुंबई दि.8 : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2024 -25 मध्ये राबविण्याकरिता 24 कोटी 74 लाख 82 हजार रुपये एवढा निधी कृषी आयुक्त यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.

राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करणे करिता शेतकऱ्यांचे सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे,उत्पादित अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, ऊर्जेची बचत व्हावी, यासाठीच्या प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे याउद्दिष्टांसह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी सन 2024 -25 च्या अर्थ संकल्पामध्ये  75 कोटी रुपये एवढ्या रकमेची  तरतूद करण्यात आली आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री शंभूराज देसाई

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. 7 : अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आहेत. या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. हे सर्वसामान्यांचे शासन असून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, असे प्रतिपादन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज केले.

यशवंतराव चव्हाण सभागृह येथे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनाला संबोधित करताना मंत्री श्री. देसाई बोलत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,  आमदार संजय सावकारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, संघटनेचे अनिल कोल्हे, सतिश गोटमुकळे, मारोती कांबळे, श्रीमती मयुरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे मुख्यमंत्री असल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणाले, अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांनी नागपूर अधिवेशनदरम्यान विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मुंबई येथे बैठक घेण्याचे सांगितले. त्यानुसार मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, सकल मातंग समाजाच्या उत्थानासाठी शासनाने ‘आर्टीची’ स्थापना करण्याचा शब्द दिला. त्यानुसार ‘आर्टीची’ स्थापना करून कार्यालयाचे कामकाजही सुरू केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत 1500 रूपये दरमहा बहीणींच्या थेट बँक खात्यात देण्यात येणार आहे. यामुळे महिलांना निश्चितच आर्थिक हातभार मिळणार आहे.

कार्यक्रमादरम्यान आमदार संजय सावकारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संघटनेचे सतिश गोटमुकळे यांनी प्रास्ताविक केले. मारोती कांबळे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमास अनुदानित वसतिगृह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ

धाराशिव येथे टेक्निकल टेक्स्टाईल पार्क प्रकल्पाच्या कामास गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : धाराशिव येथील कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये तांत्रिक वस्त्र निर्मिती पार्क (टेक्निकल टेक्स्टाईल पार्क) उभारण्याच्या कारवाईस गती द्यावी. तसेच या परिसरातील डोंगराळ भागात सोलार  प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

धाराशिव जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी निवेदन सादर केले होते. त्याअनुषंगाने झालेल्या बैठकीस श्री. पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे (दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे) उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशनअंतर्गत धाराशिवमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येत आहे. या पार्कच्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्यावी. यामुळे १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव या संस्थेसाठी जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध नऊ एकर जागा ताब्यात घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पांचे कालबद्ध कृती आराखडे तयार करून प्रकल्प कार्यान्वित करावे, तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकासासाठीची प्रस्तावित कामे तात्काळ सुरू करावीत. तसेच धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन निधीची तरतूद  करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

बुलढाणा येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामांचा निधी तातडीने वितरित करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ :  बुलढाणा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, रमाई घरकुल आणि अल्पसंख्याक घरकुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे बुलढाणा जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी आमदार श्वेता महाले यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक झाली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा चौथ्या हप्त्याचा निधी तातडीने वितरित करावा. चिखली शहरातील मंजूर 457 घरकुल बांधकामांना गती द्यावी. एकतानगरमधील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा. पुनर्विकास करण्यासाठी हाउसिंग कॉम्प्लेक्ससाठी जागा शोधून पुनर्वसन गतीने करावे. चिखली उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांचे करण्यासंदर्भात तसेच रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकाम प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यात यावी.

चिखली नगरपालिका हद्दीतील रोहिदास नगर भूखंडावरील शासकीय आरक्षणाबाबत शंकांचे निरसन करून भूखंड वाटप आणि झोपडपट्टी पुनर्वसनासाठीचा प्रस्ताव सादर करावा. चिखली  एमआयडीसीसाठी जागा दिलेल्या भूखंड मालकांना पीएपी अंतर्गत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वरील पळसखेड येथून चिखली, बुलढाणा व मलकापूर या शहरांना जोडणारा पोच मार्ग व महामार्गाचे काम सुरू करणे, खडक पूर्ण प्रकल्पास सुप्रमा मिळणे, पेरू संशोधन केंद्र व उद्यान विद्यालय सुरू करणे, येळगाव धरणाच्या स्वयंचलित गेट संदर्भात सुरक्षित उपाययोजना करणे, पेनटाकळी प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन कालबद्ध पद्धतीने करणे, कृषिपंप प्रलंबित जोडण्यासाठी निधी वितरित करणेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

केवळ दागिने न घडवता अद्वितीय कलाकृती निर्माण कराव्यात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे रत्न आभूषण उद्योजकांना आवाहन

राज्यपालांच्या हस्ते जगातील दुसऱ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय रत्न आभूषण प्रदर्शनाचे उद्घाटन 

मुंबई, दि. 8 : रत्न व आभूषण उद्योगात भारताला संपन्न वारसा लाभला असून हा उद्योग प्राचीन असला तरीही त्यात नित्य नवीनता आहे. रत्न आभूषण उद्योजकांनी केवळ दागिने न घडवता एकमेव अद्वितीय कलाकृती निर्माण कराव्यात व या क्षेत्रात भारताचा आंतरराष्ट्रीय ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

मुंबईत सुरु झालेल्या पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय रत्न व आभूषण प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बांद्रा कुर्ला संकुल मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन सोहळ्याला कौशल्य उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, रत्न व आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष विपुल शाह, उपाध्यक्ष किरीट भन्साळी, ब्रँड अम्बॅसेडर ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर, ‘डी बिअर्स’ हिरे व्यापार समूहाचे कार्यकारी उपाध्यक्ष पॉल राऊली, निमंत्रक निरव भन्साळी, जॉय अलुक्कास समूहाचे व्यवस्थापक पॉल अलुक्कास तसेच विविध देशांमधून आलेले निर्यातदार, प्रदर्शक व ग्राहक उपस्थित होते.

मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय रत्न व आभूषण प्रदर्शन हे हिरे, सोने, प्लॅटिनम आणि चांदीच्या दागिन्यांचे जगातील दुसरे भव्य प्रदर्शन म्हणून नावारूपास आले असून आगामी काळात ते जगातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे प्रदर्शन होईल.

रत्न आभूषण उद्योगाने धनसंपदा निर्माण करावी, कारण धनसंपदेतूनच गरिबी निर्मूलनाचे कार्य होईल असे सांगून रत्न आभूषण उद्योजकांना काहीही अडचणी आल्यास आपण व्यक्तिशः संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा करू, असे राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी आश्वस्‍त केले.

केवळ दागिना घडविल्यास त्याचे मोल दोन – तीन लाख रुपये मिळेल, परंतु सुंदर एकमेव कलाकृती असलेला दागिना घडविल्यास तसेच त्याला ब्रँड म्हणून ओळख दिल्यास त्याच दागिन्याचे मोल पाच – दहा पटीने अधिक मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.

आज भारताने रत्न आभूषण उद्योगात अनेक स्वदेशी ब्रँड तयार केले आहेत. नवीनता, संशोधन व कलाकारांचे कौशल्य वर्धन यांवर भर देऊन उद्योजकांनी रत्न आभूषण क्षेत्रात भारताचा आंतरराष्ट्रीय ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

राज्यातील 28 विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण रत्न आभूषण निर्यात संवर्धन परिषदेला विद्यापीठांसोबत कार्य करण्याचे आवाहन करीत आहे असे सांगून परिषदेने विद्यार्थ्यांना रत्न आभूषण क्षेत्रात हितधारक बनवावे, असे राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी सांगितले.

रत्न आभूषण उद्योजकांनी कौशल्य विकास कार्यास हातभार लावावा – मंगल प्रभात लोढा

देशातील रत्न आभूषण उद्योजक वार्षिक आंतरराष्ट्रीय रत्न आभूषण प्रदर्शनाला जगातील पहिल्या क्रमांकाचे प्रदर्शन बनवतील, असा विश्वास व्यक्त करून युवा पिढीला कौशल्य प्रशिक्षण देण्यास या क्षेत्रातील उद्योजकांनी हातभार लावावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले.

शेजारील देशांमधील भयावह स्थिती पाहता उद्योजकांनी आपला पैसा समाजासाठी वापरावा. रत्न आभूषण क्षेत्रातील प्रत्येक उद्योजकाने किमान एका युवकाला तरी कौशल्ये प्रदान करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

प्रदर्शनात जगातील ६० देशांमधून ५०,००० व्यापारी व विक्रेते, २१०० प्रदर्शक व ३६०० स्टॉल्स सहभागी होत असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष विपुल शहा यांनी यावेळी दिली.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.

 

Maharashtra Governor inaugurates world’s 2nd largest

 Gem & Jewellery Show in Mumbai

 

Mumbai 8 : Maharashtra Governor C P Radhakrishnan inaugurated the 5 – day India International Jewellery Show (IIJS – 2024) Premiere organised by the Gem & Jewellery Export Promotion Council at the Jio World Convention Centre at BKC Mumbai on Thu (8 Aug).

The India International Jewellery Show is stated to be the 2nd largest Business to Business Jewellery Fair in the world. The Governor released the Pocket Guide to IIJS 2024 on the occasion.

Minister of Skills and Employment Mangal Prabhat Lodha, Chairman of Gem & Jewellery Export Promotion Council Vipul Shah, Vice Chairman Kirit Bhansali, Brand Ambassador of the event Manushi Chhillar, Executive Vice President of Diamond Trading ‘De Beers Group’ Paul Rowley, Convenor Nirav Bhansali, MD of Joyalukkas Group Paul Alukkas, Clients, Retailers, Exporters and Exhibitors from across the world were present.

According to the organizers, India International Jewellery Show has emerged as the 2nd largest Business to Business Jewellery Fair in the world, showcasing Diamond, Gold, Platinum, and Silver Jewellery along with loose Natural Diamonds, Gemstones, and Lab-grown diamonds.

More than 50,000 trade visitors and exporters from 60 countries are participating in the 5 – day Show.

संस्कृती आणि कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी नंदुरबारमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. ८ (जिमाका): आदिवासी समुदायाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असलेली असीम श्रद्धा, निसर्ग संतुलनावरील प्रेम आणि अत्त्युच्च प्रामाणिक, निखळ संस्कृती, परंपरांच्या गुणगौरवासोबत शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम नंदुरबारमध्ये आयोजित केल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित पारंपारिक शोभायात्रेनंतर शहरातील शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री डॉ. गावित बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नतीशा माथूर (तळोदा), चंद्रकांत पवार (नंदुरबार) तसेच राज्यभरातून, जिल्ह्यातून आलेल्या विविध नृत्य पथकांसह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, जागतिक आदिवासी दिवस जगातील समग्र आदिवासी बांधवांसाठी असामितेचा व आत्मसन्मानाचा दिवस असतो. महाराष्ट्रात हा दिवस राज्यातील वेगवेगळ्या आदिवासीबहुल जिल्ह्यात आयोजित केला जातो. यापूर्वी तो नागपूर, नाशिक, पालघर येथे आयोजित करण्यात आला होता. यंदा हे भाग्य नंदुरबार जिल्ह्याला लाभले आहे.

महाराष्ट्रात 47 आदिवासी उपजाती आहेत. आपल्या बोली, पेहराव वेगवेगळे असले तरी आदिवासी बांधव म्हणून आपण एक आहोत. एक रहायला हवे. दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी बांधव व त्याच्या प्रथा, पंरपरा कुणालाही अवगत नव्हत्या परंतु, आदिवासी विकास विभागाचा मंत्री या नात्याने क्रीडा स्पर्धा, जागतिक आदिवासी दिवस, जनजाती दिवस भव्य-दिव्य स्वरूपात आयोजित करून राज्याला या गौरवशाली परंपरांची ओळख करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज आमचा आदिवासी बांधव स्वत:च्या कलेचे स्वत:च ब्रँडिंग करेल. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने योजनांचा प्रचार, प्रसार व्हावा व आदिवासी संस्कृती आणि मुल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी काल, आज आणि उद्या विविध कार्यक्रमांचे  आयोजन येथे करण्यात आले आहे. त्याचबरोबर आदिवासी कलेला चालना मिळावी आणि कलेच्या माध्यमातून सृजनशील कल्पनांचे सादरीकरण व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांसाठी व खुल्या स्वरूपातील रांगोळी स्पर्धा, आदिवासी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  ग्रामसमूह, बचत गट, वन-धन केंद्र आणि इतर आदिवासी बांधवांच्या गटांनी निर्माण केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीची दालने पाहता येणार आहेत, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

शिक्षणातून समृद्ध व्हा : डॉ. सुप्रिया गावित

डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या की, शिक्षणातून समृद्ध होण्याची संधी आदिवासी विद्यार्थ्यांना लाभली आहे, या संधीचे सोने करून आपले, कुटुंबाचे आणि समुदायाचे नाव उंच करण्यासाठी अथक परिश्रम घ्यायला हवेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते विकासासह जलजीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध पेयजलाची योजना हाती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या योजनांच्या लाभातून सर्वांनी जीवन समृद्ध करायला हवे.

आदिवासी बोली आणि संस्कृती टीकवायला हवी-डॉ. हिना गावित

जगभरातल्या बोली भाषा आज अस्तित्वाच्या शेवटच्या घटका मोजताहेत. अशा परिस्थितीत आदिवासी बोली टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मला मी आदिवासी असल्याचा अभिमान आहे. मला आदिवासी बोली बोलता येते याचाही अभिमान असून संसदेतील आदिवासी प्रतिनिधी म्हणून मला युनोमध्येही सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा अभिमान आहे.

दि. ९ रोजी जागतिक आदिवासी दिनाचा मुख्य कार्यक्रम तालुका क्रीडा संकुलात होणार आहे. यावेळी क्रांतिकारी आणि महापुरुषांना अभिवादन करण्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित, खासदार अॅड. गोवाल पाडवी, विधानपरिषद सदस्य अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, आमश्या पाडवी, सत्यजित तांबे, विधानसभा सदस्य अॅड. के सी. पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, माजी खासदार हिना गावित आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

०००

लोकराज्य जून २०२४

लोकराज्य जून २०२४ (भाग-१)

Open Book

 

लोकराज्य जून २०२४ (भाग-२)

Open Book

 

लोकराज्य जून २०२४ (भाग-३)

Open Book

 

लोकराज्य जून २०२४ (भाग-४)

Open Book

 

लोकराज्य जून २०२४ (भाग-५)

Open Book

युवकांना रोजगार संधी देणारी – ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’

विशेष लेख :

भविष्यातील आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देवून, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही राज्य शासनाने सुरू केली आहे.या योजनेची राज्यात करण्यात येणारी अंमलबजावणी तसेच योजनेचे निकष आणि पात्रता यासंदर्भात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे यांची ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित  ‘दिलखुलास’व ‘जय महाराष्ट्र’या कार्यक्रमात मुलाखत घेतली. या मुलाखतील त्यांनी  या योजनेची सविस्तर माहिती दिली.

रोजगार निर्मितीबरोबरच कौशल्य विकसित करण्यावर शासन भर देत आहे याबद्दल काय सांगाल?

ब-याच वेळा आपल्याला दिसून येते की, अनुभव नाही त्यामुळे रोजगार नाही व रोजगार नाही त्यामुळे अनुभव नाही या दुष्टचक्रातून तरुणांना सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि कौशल्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री युवा  कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी सुरू  करण्यात आली आहे. या योजनेतून अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांना अनुभव मिळवण्यासाठी विविध उद्योगातील तसेच सरकारी आस्थापनांमधील इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

केंद्र शासनाने देखील रोजगार निर्मितीवर भर दिला आहे याबद्दल काय सांगाल ?

केंद्रीय अर्थसंकल्पात प्राधान्यक्रमाने नऊ गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले आहे. ४ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी २ लाख कोटी हून अधिक तरतूद करण्यात आली आहे. ठळक योजनांवर नजर टाकल्यास प्रथम नोकरीसाठी दिले जाणारे अनुदान, उत्पादन क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी वाढव्यात यासाठी दिलेले ईपीएफओ अनुदान, कौशल्य विकासाच्या व १००० आयटीआय बळकटीकरणाच्या योजना आहेत. मुख्यमंत्री युवा  कार्य प्रशिक्षण योजनेच्या धर्तीवर प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना या नावीन्यपूर्ण योजनेचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.ज्यामध्ये पुढील ५ वर्षांत १ कोटी हून अधिक विद्यार्थ्याना इंटर्नशिपद्वारे आघाडीच्या कंपन्यांमध्ये रोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ याबद्दल काय सांगाल?

युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्यांचा कौशल्य विकास करणे गरजेचे आहे.आज पाहिले तर भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात युवकांची लोकसंख्या जास्त आहे. त्यापैकी व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले फक्त ४% युवक आहेत.या युवकांना जर रोजगारक्षम बनवायचे असेल तर त्यांच्यातील कौशल्यचा विकास करणे गरजेचे आहे. कौशल्य विकास विभागातर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात त्याचाच हा एक भाग म्हणून इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला तर प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून युवकांची रोजगारक्षमता वाढेल. भविष्यात रोजगाराची संधी मिळेल या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे.

कौशल्य विकसित करणे काळाची गरज आहे याबद्दल काय सांगाल?

या योजनेत यामध्ये १२ वी पास, पदवी, पदव्युत्तर,आयटीआय उत्तीर्ण अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या आस्थापनांचा समावेश आहे त्यामध्ये खासगी संस्था,स्टार्टअप, उद्योग, सामाजिक संस्था यांना जोडून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासोबत विद्यावेतन मिळणार आहे.सहा महिन्यांच्या अनुभवाच्या गाठीवर  आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.

या योजनेसाठी विद्यार्थी थेट नोंदणी करू शकतात का ?

योजनेकरिता उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय,पदविका,पदवी, पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत दरमहा विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना,उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेईल. या ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक (डीबीटी) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल. यासाठी नोंदणी कौशल्य विभागा च्या संकेतस्थळावर https://rojgar.mahaswayam.gov.in  करता येईल.

उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन नोंदणी केल्यानंतर काही छाननी पद्धत अवलंबविण्यात येणार आहे का?

सरकारी आस्थापना, खासगी संस्था, सामाजिक संस्था, सहकारी संस्था या त्यांच्याकडे लागणाऱ्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन करत आहेत. विद्यार्थ्यांना प्रोफाइल बनविल्यावर उपलब्ध संधी दिसतील. संधीसाठी आवेदन करता येणार आहे. त्यानंतर निवडीची प्रक्रिया ही आस्थापना व विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे. प्रक्रिया पार पडल्यानंतर आस्थापना विद्यार्थ्याची इंटर्न म्हणून पुढील सहा महिन्यांसाठी निवड करून इंटर्नशिप सुरू करण्यात येईल. आवेदन केल्यानंतर पुढील प्रक्रिया ऑनलाइन होईल.

रोजगाराच्या तसेच इंटर्नशिपच्या संधी शासनाच्या तसेच खासगी स्तरावर उपलब्ध असणार आहेत का?

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे खासगी सोबत शासकीय आस्थापनांचाही यामध्ये समावेश असणार आहे. सेवा क्षेत्रांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या २०%, इतर उद्योग असलेल्या क्षेत्रामध्ये १०% तसेच सरकारी आस्थपनांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या मंजूर पदांच्या ५% मनुष्यबळ इंटर्न म्हणून घेता येणार आहेत. या योजनेद्वारे सरकारी कार्यालयांमध्ये इंटर्नशिप उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले  राज्य असणार आहे . अशाच प्रकारचा प्रयत्न अमेरिकन सरकारने २०१० मध्ये केला होता. पाथवेज (Pathways) असे त्या इंटर्नशिप कार्यक्रमाचे नाव होते.याचा युवकांना तसेच तिथल्या प्रशासनाला उपयोग झाला होता.या इंटर्नशिप च्या माध्यमातून मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या सोडविण्यास मदत होणार आहे.

खासगी उद्योजक आणि शासकीय यंत्रणा आपली मागणी कशी नोंदवतील ?

कौशल्य विभागाच्या rojgar.mahaswayam.gov.in/संकेतस्थळावर खासगी व शासकीय आस्थापनांना नोंदणी करता येईल.  आस्थापना किंवा उद्योग कमीतकमी तीन वर्षे कार्यरत असावा ,त्यात कमीतकमी २० लोक काम करत असावेत तसेच तो उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा असे नोंदणीकरिता निकष असणार आहेत. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांची पडताळणी होईल. त्यानंतर आस्थापना त्यांना लागणाऱ्या मनुष्यबळाची नोंदणी ऑनलाईन करू शकेल. मागणी नोंदविल्यानंतर आस्थापनांशी जोडले गेल्यानंतर इंटर्नसचे काम सुरू झाल्यानंतर विद्यावेतन शासना मार्फत दिले जाईल. दर महिन्याला इंटर्नला डीबीटी मार्फत त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार अनुक्रमे  निकषानुसार ६००० , ८०००, १०,००० असे विद्यावेतन देण्यात येणार आहे.

खासगी कंपन्यांमध्ये योजनेमार्फत इंटर्नशिप करताना विद्यावेतन शासनाकडून दिले जाणार का?

विद्यावेतनाचा पूर्ण अधिभार शासनाकडे असणार आहे त्यामुळे कुठलाही आर्थिक अधिभार न सोसता उद्योगांना सहजासहजी मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. काही आस्थापनांना जर विद्यावेतनाच्या व्यतिरिक्त जर अतिरिक्त विद्यावेतन द्यायचे असेल तर ते देऊ शकतात पण शासनाने निर्धारित केलेले विद्यावेतन हे डीबीटी मार्फत विद्यार्थ्यांना दर महिन्याला दिले जाणार आहे.

शहराकडील विद्यार्थी त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याविषयी माहिती  व्हावी यासाठी कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत.

शहरांमधील संधी या ग्रामीण भागातील संधीपेक्षा जास्त आहेत. युवकांना सध्याच्या निवासस्थानाच्या जवळ इंटर्नशिप कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सहकारी संस्था ज्यामध्ये सूत गिरण्या, साखर कारखाने यांचा समावेश असेल, तसेच सामाजिक संस्था, सरकारी आस्थापना यांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारी आस्थापनांमध्ये प्रत्येक कार्यालयात एक किंवा एकूण मंजूर मनुष्यबळाच्या ५% अशी तरतूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या योजनेमुळे भविष्यामध्ये उद्योग जगतावर व अर्थव्यवस्थेवर याचे एकूणच कसे सकारात्मक परिणाम दिसून येतील ?

उद्योजकांना यासाठी कोणताही आर्थिक भार न सोसता मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. याचा फायदा स्टार्ट अप्सना होईल. त्याचे सकारात्मक परिणाम म्हणजे उत्पादनक्षमता वाढीस लागणार आहे आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. दरवर्षी १० लाख विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्याच्या उद्दिष्टाने अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.या योजनेमुळे कौशल्य उपलब्ध असलेले विद्यार्थी वाढतील.त्यामुळे नवनवीन उद्योग महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी या योजनेचा नक्कीच फायदा होईल. बऱ्याचशा सेवा संस्था यांना कौशल्यप्रधान युवकांची गरज असते त्याची पूर्तता या योजनेमुळे होणार आहे…

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर त्या संबंधित प्रमाणपत्र देऊन प्रमाणित करण्यात येणार आहे का ?

सहा महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र शासन व संबंधित आस्थपनांतर्फे दिले जाणार आहे. या प्रमाणपत्राचा व अनुभवाचा भविष्यात रोजगार मिळायला नक्कीच उपयोग होणार आहे. याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम दिसून येणार आहेत.ही योजना म्हणजे भविष्यात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी केलेली आजची गुंतवणूक असणार आहे.

खासगी व शासकीय विभाग यांची उपलब्धतेनुसार मागणी कशी आहे ?

मागील दोन आठवड्यांपासून संकेतस्थळांवर ह्या योजनेची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रांकडून येणारी मागणी तेवढीच आहे. आतापर्यंत २५०० पेक्षा अधिक खासगी व सरकारी आस्थापनांनी मागणी नोंदवली आहे. तसेच दिड लाखाहून अधिक इंटर्नशिप साठी मागणी आलेली आहे.या मागणीशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे काम सध्या सुरू आहे.

या योजनेसंबंधी प्रक्रिया पूर्ण करत असताना भविष्यातील रूपरेषा आखल्या आहेत का?

ही योजना अधिकाधिक उद्योगांपर्यंत कशी पोहोचविता येईल, यासाठी विविध सरकारी विभागांची मदत घेण्यात येत आहे. उदा. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापिठे येतात. त्यांच्यामार्फत या शैक्षणिक आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचण्याचे काम होईल. त्याचबरोबर शासनाच्या उद्योग विभाग ज्या अंतर्गत मोठे उद्योग,सूक्ष्म,लघू व मध्यम  उद्योग आहेत, त्यांच्या समावेत विविध उद्योगांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे. उद्योग संचनालयाचा इग्नाईट( Ignite) म्हणून कार्यक्रम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची माहिती उद्योगांपर्यंत पोहोचविण्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू राहणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रमुख इंडस्ट्री क्लस्टर विभागांमध्ये उदा.मुंबई, छत्रपती संभाजीनगर ,पुणे, अमरावती, कोल्हापूर इ विभागवार चर्चासत्रे आयोजित करून ही योजना जास्तीत जास्त उद्योगांपर्यंत कशी पोहोचवली जाईल याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उद्योगांसोबतच सहकार आस्थापनांमध्ये ज्या सूत गिरण्या, साखर कारखाने आहेत त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार आयुक्तालयाची मदत घेण्यात येत आहे. सरकारी आस्थापनांसाठी विभागीय आयुक्तांच्या मार्फत, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारी आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींची नोंदणी ऑनलाईन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी विभागावार, जिल्हावार, तालुकावार इंटर्नशिपचे मेळावे घेण्यात येणार आहेत. शासनस्तरावर या योजनेत युवांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून काय सांगाल?

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याचे  अनेक फायदे कसे अधिकाधिक घेता येतील?

ही योजना युवक व युवतींसाठी  तयार करण्यात आली असल्यामुळे त्यांना कार्य प्रशिक्षणातून हाताला काम आणि त्याचे विद्यावेतन देखील दिले जाणार आहे.त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी रोजगार इच्छुक युवक-युवतींनी संकेतस्थळावर जावून नोंदणी करणे अनिवार्य आहे. जिल्हास्तरीय सरकारी कार्यालयात या योजनेची माहिती घेऊन या योजनेत उपलब्ध असलेल्या संधींना आवेदन करून या योजनेअंतर्गत इंटर्नशिप मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. जास्तीत जास्त युवांनी या योजनेत सहभागी व्हा.

शब्दांकन :– 

ऋतुजा नाकते, 

आंतरवासिता,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

  • अधिकाधिक विशेष विमानांद्वारे देशवासियांना परत आणणार
  • मदतीसाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती

मुंबई, दि. ८: बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सांगितले.

बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तसेच अभियंते आदी बाधित लोकांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चेदरम्यान या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. बांगलादेशातील देशवासीयांना परत आणण्याच्या कार्यवाहीसाठी परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी दिली. बांगलादेशातील भारतीय दूतावासामार्फतही आवश्यक त्या सर्व उपयोजना करण्यात येत आहेत. तिथे अडकलेल्या देशातील कोणत्याही विद्यार्थी, अभियंते किंवा इतर भारतीयास हानी पोहोचणार नाही आणि त्यांना सुरक्षितरीत्या मायदेशात परत आणण्यात येईल. तिथे अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभियंते यांनाही तातडीने सुरक्षितरित्या परत आणण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना संपर्क साधणे, मदत उपलब्ध करून देणे यासंदर्भातील कार्यवाहीसाठी राज्यात एक पथकही नियुक्त करण्यात आले आहे. राज्यातील या बाधितांना जलद गतीने मायदेशात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या चर्चेदरम्यान सांगितले.

बांगलादेशातील अशांत परिस्थिती निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्वरित परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला होता. यासंदर्भात श्री. शिंदे हे परराष्ट्र मंत्रालयाशी सतत संपर्कात आहेत.

०००

एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

  • सर्वांच्या साथीने इथपर्यंत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

ठाणे,दि.,(जिमाका): भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथील नाट्यगृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून हा चरित्र ग्रंथ मंचावर आणून याचे प्रकाशन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री शंकर बाबा पापळकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे, शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्यच समजतो. मला याचा मनस्वी आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसती. त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचे नाव आज संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून माझी अशी खात्री झाली आहे की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत.

राज्यपाल पुढे म्हणाले की, पुस्तके कधीही फुकट घेऊन वाचू नयेत. पुस्तकाचे मूल्य देऊन पुस्तके वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचे वाचन करताना एकजीव होतात, त्यातील मतितार्थ आपल्याला समजतो, असे माझे व्यक्तिगत मत आहे.

भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळेच श्री. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री तर श्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले.

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेले काम हा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. त्यांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या भागात केलेले काम हे अतिशय वाखाणण्याजोगे आहे. मनापासून एखादे काम करणे, ही इच्छाशक्ती असणे यातूनच व्यक्ती समाजासाठी काहीतरी करू शकतो, तसे काम मुख्यमंत्री श्री. शिंदे सतत करताना दिसून येतात. २०४७ साली भारत हा महासत्ता बनणार यात शंकाच नाही. विशेष म्हणजे हे शासन ज्या प्रकारे काम करीत आहे त्यातून महाराष्ट्राचा विकास हा होणारच.मी महाराष्ट्रात जनतेचा सेवक म्हणून आलो आहे. त्यामुळे शक्य तितकी जनसेवा करण्याचा संकल्प मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करीत आहे, असे ते शेवटी म्हणाले.

सर्वांच्या साथीने इथपर्यंत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्यावर पुस्तक लिहिण्याइतपत मी असे काही मोठे काम केलेले नाही. सर्वांच्या साथीने मी इथपर्यंत पोहोचलो आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. सत्तेचा वापर हा गोरगरिबांच्या कल्याणासाठीच व्हायला हवा. मला काय मिळाले, यापेक्षा मी समाजाला काय दिले हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच मी या मार्गावर काम करण्याचा प्रयत्न करतोय. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे, आणि उद्याही मी कार्यकर्ताच राहणार आहे. मी असे मानतो की, सी. एम. म्हणजे कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणूस. त्याआधारे काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने कधीच जात नाही आणि कधी जाणारही नाही. संपूर्ण महाराष्ट्र हे मी माझे कुटुंब मानतो. यश आले तर हुरळून जाऊ नये आणि अपयश आले तर खचून जावू नये, ही आईची शिकवण मी आजही कायम स्मरणात ठेवली आहे. हे शासन चोवीस तास लोककल्याणासाठी काम करीत आहे. हे शासन विकास आणि कल्याण याची सांगड घालून लोकांसाठी चांगल्या योजना राबवीत आहे. यापुढेही हे शासन लोककल्याणाचा विचार करूनच निर्णय घेणार, राजकीय हिताचे कधीही निर्णय घेतले जाणार नाहीत.

 

शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येण्यासाठी आम्ही सर्व एकत्र मिळून प्रयत्नशील आहोत. त्यामुळे जे काम करीत आहोत ते सर्वसामान्य जनतेसाठीच. यामुळे माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी समाजासाठी काम करीत राहणार, माझ्या या सर्व वाटचालीत माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे. तिची खंबीर साथ मला नेहमी समाजासाठी काम करण्याची सदैव प्रेरणा देते. माझ्या या सामाजिक कार्यात माझे सर्व कुटुंबिय सदैव माझ्या पाठीशी असतात, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी देव, देश आणि धर्मासाठी लढणे हा मंत्र जपला होता आणि आधुनिक युगात हा मंत्र जपताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कृतीतून दिसतात. त्यांची संयमी वृत्ती, लोकांचे ऐकून घेण्याची प्रवृत्ती, कठोर मेहनतीची तयारी, विविध पदांना न्याय देण्याची वृत्ती हे त्यांचे गुणविशेष अनुकरणीय आहेत. जनतेत राहून जनतेसाठी काम करणे, हा ध्यास घेतलेला लोकनेता एकनाथ शिंदेंकडे पाहिले की दिसून येतो. संघर्षाला शांतपणे तोंड देण्याची वृत्ती, मित्रांप्रती कर्तव्य हेही त्यांचे गुणविशेष आहेत. अशा व्यक्तीचा चरित्र ग्रंथ प्रकाशित होणे, हे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक असते. अशा व्यक्तींचे चरित्र वाचल्यावर ते सर्वसामान्यांना नेहमीच प्रेरणा देतात आणि त्यातून सर्वसामान्य नागरिक घडतातही.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाची शिकवण अवघ्या महाराष्ट्राला दिली. त्यांच्या शिकवणीचे अनुकरण करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. लोकांच्या सदैव गराड्यात राहणारा मुख्यमंत्री, शेतीची आवड असणारा मुख्यमंत्री, गावाकडे रमणारा मुख्यमंत्री ही सर्व विशेषणे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना लागू होतात. त्यांच्या सर्व यशात त्यांच्या सर्व कुटुंबियांचेही मोठे योगदान आहे.

याप्रसंगी पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाविषयी अनेक उदाहरणे देऊन ते सर्वसामान्यांचे नेते आहेत, ते लोकनेते आहेत, ते अनाथांचे नाथ आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली तर सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले. या चरित्र ग्रंथाचे लेखक प्रा.डॉ.प्रदीप ढवळ यांनी मनोगत व्यक्त करताना या चरित्र ग्रंथाच्या निर्मिती विषयीची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ.प्रदीप ढवळ, डॉ.अरुंधती भालेराव, राजन बने आणि सान्वी ओक तसेच ग्रंथाली प्रकाशनचे सुरेश हिंगलासपूरकर यांचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून तसेच राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली. शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.विलास ठुसे यांनी आभार मानले.

०००

ताज्या बातम्या

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

0
पुणे, दि. १८: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे,...

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

0
मुंबई, दि. १७: राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून...

‘मनरेगा’शी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री भरत गोगावले

0
मुंबई, दि. १७ : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना,...

स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

0
मुंबई, दि. १७: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील थकीत कमिशन अदा करण्याची कार्यवाही करावी. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्याला द्यावयाचा हिस्सा तातडीने देवून कमीशन...

रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – मंत्री संजय राठोड

0
मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात...