गुरूवार, जून 12, 2025
Home Blog Page 566

उदगीर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे नागरिक, वाहनधारकांची गैरसोय दूर होणार- मंत्री संजय बनसोडे

लातूर, दि. ९ : उदगीर येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन होत असून उदगीरकरांसाठी आज अतिशय आंनदाचा दिवस आहे. या कार्यालयामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक यांना परिहवन विभागाच्या सर्व सेवा उदगीर येथे उपलब्ध होणार असल्याने त्यांची गैरसोय दूर होईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

उदगीर शहरातील लिंबोटी प्रकल्प उद्भव जलशुद्धीकरण केंद्र येथे नव्याने सुरु होत असलेल्या एमएच-५५ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. बनसोडे बोलत होते. माजी आमदार गोविंद केंद्रे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, सर्जेराव भांगे, रामभाऊ तिरुके, शिवानंद हैबतपुरे, रामराव ऐनवाड, विजय निटूरे, दिपाली आवटे आदी यावेळी उपस्थित होते.

९ ऑगस्ट या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व असून आजच्या दिवशी उदगीर येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु होत असून उदगीरच्या विकासातील हा महत्वाचा टप्पा आहे. अनेक दिवसांपासून हे कार्यालय उदगीर येथे सुरु करण्याबाबत मागणी होती. विविध मोटारवाहन चालक मालक आणि मॅकेनिकल संघटना यांनीही मागणी केली होती. या कार्यालयामुळे उदगीर तालुक्यासह या कार्यालयाला जोडलेल्या सर्व तालुक्यातील नागरिकांना वाहन चालक परवाना, वाहन नोंदणी, त्याचे नूतनीकरण, वाहन तपासणी आदी सर्व सुविधा मिळणार आहेत. तसेच वाहनधारकांना आवश्यक कागदपत्रे काढण्याबाबत परिवहन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले.

शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा

राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक, शेतकरी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणि मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना यासारख्या महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती गाव-खेड्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहचवून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी उपस्थित नागरिकांना केले.

प्रारंभी मंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे फीत कापून आणि कोनशीला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच विविध मोटारवाहन चालक मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

०००

‘हर घर तिरंगा घर घर तिरंगा’ उपक्रम विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन यशस्वी करावा-पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. ९ :  ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा. तसेच प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचाही सहभाग घ्यावा, असे निर्देश  पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ उपक्रमासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

 

‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सातारा शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या उपक्रमांतर्गत शासकीय कार्यालये व जिल्ह्यातील धरणांवर विद्युत रोषणाई करावी.  प्रशासनाने सेल्फी पॉईंट, बचत गट यांचा तिरंगा मेलाचे आयोजन करावे. अशा सूचनाही त्यांनी केल्या.

०००

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत निधी वाटपाच्या कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. ९:  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजार 17 इतके ऑनलाईन  अर्ज प्राप्त झाले असून  यापैकी 5 लाख  10 हजार 419 इतक्या अर्जांना   मान्यता दिली आहे.  याची टक्केवारी 98.42 असून या योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथे होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी  अधिकारी अर्चना वाघमळे,   महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी उपस्थित होत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या अर्जांना मंजुरी दिलेली नाही त्या अर्जाना तात्काळ मंजुरी द्यावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई सांगून मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिला लाभार्थी येतील यासाठी नियोजन करावे.  महिलांसाठी वाहनांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही  त्यांनी केल्या.

या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.  यावेळी  5 युवकांना नियुक्तीचे पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते देण्यात आले.  तसेच वीर पत्नी साधना साळुंके, अतित ता. खंडाळा यांना शासनाकडून  2 हेक्टर जमीन वाटपाच्या आदेशाचे प्रदान करण्यात आले.

०००

ग्रामीण भागातील नागरीकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

  • घोणसी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन

लातूर, दि. ९ : ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यादृष्टीने जळकोट, उदगीर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला प्राधान्य दिल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

जळकोट तालुक्यातील घोणसी येथे नव्याने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत भूमिपूजनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्याम डावळे, तालुका आरोग्य अधिकारी संजय पवार, डॉ. प्रशांत कापसे,   नायब तहसीलदार राजाराम खरात, सरपंच यादवराव केंद्रे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा, यासाठी घोणसी, मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मंगरुळ येथील प्राथमिक केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून घोणसीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे आज भूमिपूजन होत आहे. यापुढेही ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

उदगीर आणि जळकोट तालुक्यातील नागरिकांसाठी दळणवळण सुविधा निर्माण करणे, विविध प्रशासकीय इमारती, विविध समाजाची सभागृहे, भवन उभारण्यासह महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व विकास कामांमुळे दोन्ही तालुक्यातील नागरीकांना चांगल्या मूलभूत सुविधा मिळत आहेत. सिंचनासाठी बॅरेज, पाझर तलावांची निर्मिती करण्यात आल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये दरमहा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण काळात शैक्षणिक अर्हतेनुसार दरमहा सहा ते दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या कृषि पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

०००

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविताना पारदर्शकता ठेवा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

  • प्राप्त लाख ५९  हजार ८२७  अर्जापैकी ४ लाख २४ हजार २११ अर्जांना मान्यता
  • प्राप्त सर्व अर्ज तात्काळ निकाली काढा

सांगली, दि. (जिमाका): महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा तळागाळातील लोकांपर्यंत मिळेल. ही योजना राबविताना पारदर्शकता ठेवावी. प्राप्त सर्व अर्ज निकाली काढावेत, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा आढावा पालकमंत्री डॉ. खाडे यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संदीप यादव, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की, या योजनेंतर्गत जिल्ह्यात दिनांक 9 ऑगस्ट रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 4 लाख 59 हजार 827 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 4 लाख 24 हजार 211 अर्जांना मान्यता दिली आहे, अंशता अमान्य अर्ज 33 हजार 313 असून 2 हजार 303 अर्ज अमान्य आहेत. अंशता अमान्य अशा अर्जातील त्रुटी प्रशासनाने संबंधिताना कळविल्या आहेत. संबंधितांनी त्या त्रुटींची पुर्तता तात्काळ करावी. या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत मंजूर होवून शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील प्राप्त अर्जांची कार्यवाही पुढे चालू राहणार असून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने  प्राप्त अर्जांना मंजुरी देण्यात आली.  बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संदीप यादव यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्राप्त व निकाली अर्जांची सविस्तर माहिती दिली.

०००

क्रीडा संकुलात विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी तात्काळ प्रस्ताव द्या -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. ९, (जिमाका) : क्रीडा संकुलात विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी तात्काळ प्रस्ताव द्या, अशा सूचना राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किर्तीकर मिरजकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव दुरूस्ती, 400 मिटर सिंथेटिक ट्रॅकचे बांधकाम, व इतर आवश्यक दुरूस्ती, सुरक्षा रक्षक सेवा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे वसतिगृहाबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी दिल्या.

०००

वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत कार्यरत हातमाग विणकरांना तहहयात पेन्‍शन देण्याचा लवकरच निर्णय – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

▪️नागपूर येथे राज्यस्तरीय हातमाग पुरस्काराचे शानदार वितरण

नागपूर,दि.: अत्यंत आव्हानांना सामोरे जात आपल्या पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या कलेला जीवंत ठेवण्यासमवेत त्यात आपल्या कौशल्यातून भर टाकणाऱ्या हातमाग विणकरांचे योगदान अनेक पुरस्कारांपेक्षाही मोठे आहे. वयाच्या साठ वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या हातमाग विणकरांना त्यांच्या योगदानाप्रती वार्धक्यातील शिदोरी म्हणून पेन्‍शन देण्याचा लवकरच निर्णय आम्ही घेत असल्याचे सूतोवाच  वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

राष्ट्रीय हातमागदिनानिमित्त आज येथील नियोजन सभागृहात आयोजित राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेतील बक्षीस वितरण सभारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी  वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा, रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत व मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या हातमाग धोरणानुसार जास्तीत जास्त व्यक्तींना यातून रोजगार उपलब्ध व्हावेत यादृष्टीने आपण भर दिला आहे. उत्तम काम करणाऱ्या विणकरांचा गौरव व्हावा, त्यांच्या निर्मितीला चालना मिळावी यासाठी आपण घोंगडीपासून करवत काटी साडी, पैठणी, खण, हिमरु शाल आदी पारंपारिक कलाकौशल्यावर भर दिला आहे. याचबरोबर हातमाग व्यवसायाला लागणारे जे रेशीम आहे त्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान झाला पाहिजे याउद्देशाने आपण तुती लागवडीद्वारे भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही पुरस्कार देत आहोत, असे वस्त्रोद्योग मंत्री यांनी आपल्या भाषणात सांगितले.

अल्प भू-धारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. वस्त्रोद्योग व हातमाग या व्यवसायाला येणारा कच्चा माल हा शेतीतूनच येतो. यात प्रामुख्याने हातमागासाठी  वरचेवर मोठ्या प्रमाणात सिल्कची मागणी वाढत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून तुती लागवडीद्वारे रेशीम कोषाची निर्मिती करणारे शेतकरी वाढले आहेत. यात त्यांनी आपल्या कष्टातून एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन कृषी क्षेत्रातला नवा मार्ग समृद्ध केल्याचे गौरोद्गार वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकात पाटील यांनी काढले. माझे वडिल केवळ अडीच एकर शेती असल्याने गाव सोडून मुंबईकडे वळले होते. गावी सिंचनाची सुविधा झाल्यामुळे मी आता महानगरातून गावी परतलो, असे ते म्हणाले.

अगदी प्रारंभीच्या काळात भारताने उत्तम वस्त्र निर्मिती केलेली होती. तेव्हाच्या एकूण जागतिक व्यापारात 32 टक्के वाटा हा आपला होता. हातमाग वस्त्र व मसाल्याच्या पदार्थातून आपण निर्यातीवर पकड ठेवली होती. ब्रिटीशांच्या काळात जहाज निर्मितीलाही भारतीयांनी आपले कौशल्य सिध्द करुन दाखविले होते. हे वैभव ब्रिटीशांनी लुटून नेले हे आपण विसरता कामा नये. अशा परिस्थितीत आपण स्वातंत्र्यानंतर आज पुन्हा जागतिक पातळीवर एक भक्कम स्थिती गाठल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कष्टकरी, विणकरी आणि इतर कारागिरांसाठी अनेक विकासाच्या योजना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनही अनेक योजना घेऊन विणकरांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा यांनी केले तर वस्त्रोद्योग विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत यांनी दिली.

 

असे आहेत विजेते

राष्ट्रीय हातमाग कापड स्पर्धेतील वॅल हँगीग (संत कबीर) या प्रकारात सोलापूर येथील राजेंद्र सुदर्शन अंगम यांनी 50 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले.  पैठणी ब्रोकेट साडी या वाणाच्या प्रकाराला गिराम तालेब कबीर या छत्रपती संभाजीनगरच्या  विणकराला 40 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले. भंडारा येथील कोसा करवती साडी वाणाच्या प्रकारातील मुरलीधर निनावे या विणकराला 30 हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.

राज्यस्तरीय पारंपारिक कापड स्पर्धेत गिराम तालेब कबीर या विणकराला पैठणीसाठी प्रथम 20 हजार रुपयांचे, दीपक माहुलकर या येवला येथील विणकराला द्वितीय क्रमांकाचे 15 रुपयांचे   तर येवलाच्याच युवराज परदेशी याला तृतीय क्रमांकाचे 10 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. हिमरु शाल प्रकारात छत्रपती संभाजी नगरच्या इमरान कुरेशी यांना 20 हजार रुपयांचे प्रथम, फैसल कुरेशी यांनी 15 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.

करवतीसाठी प्रकारात अनुक्रमे उद्धव निखारे, गंगाधर गोखले, इशिका पौनीकर यांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे पुरस्कार मिळाले. घोंगडी प्रकारात अक्कलकोट येथील सिद्धम्मा कलमनी, रेव्वंमा सिन्नुर, विजयालक्ष्मी हुलमनी या तिन्ही महिलांनीच अनुक्रमे प्रथम ते तृतीय पुरस्कार मिळविले. खण फॅब्रीक प्रकारात उमरेड येथील कृष्णाजी धकाते, यशवंत बारापात्रे ( नागपूर ) व प्रभाकर निपाने यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय असे पुरस्कार प्राप्त केले. याचबरोबर तुती/टसर लक्षाधीश शेतकऱ्यांना या कार्यक्रमात पुरस्कार बहाल करण्यात आले.

०००

२ लाख ७४ हजार ३४६ भगिनींच्या खात्यावर ८२ कोटी ३० लाख ३८ हजार होणार जमा -पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि. (जिमाका): ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तंर्गत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 74 हजार 346 लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ 82 कोटी 30 लाख 38 हजार रकमेचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

तालुकानिहाय अनुक्रमे प्राप्त अर्जांची संख्या आणि वितरीत होणारी रक्कम पुढीलप्रमाणे आहे.  मंडणगड-10 हजार 178, रक्कम-5 कोटी 45 लाख 34 हजार.  दापोली-31 हजार 370, रक्कम-9 कोटी 41 लाख 10 हजार.  खेड-29 हजार 304 रक्कम-8 कोटी 79 लाख 12 हजार.  चिपळूण-43 हजार 778,  रक्कम-13 कोटी 13 लाख 34 हजार.  गुहागर-25 हजार 543, रक्कम-7 कोटी 36 लाख 29 हजार.  संगमेश्वर-32 हजार 532 रक्कम-9 कोटी 75 लाख 96 हजार.  रत्नागिरी-53 हजार 912 रक्कम-16 कोटी 17 लाख 36 हजार.  लांजा-18 हजार 901 रक्कम-5 कोटी 65 लाख 3 हजार.  राजापूर- 29 हजार 828 रक्कम-8 कोटी 94 लाख 84 हजार.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत 3 हजार 90 लाभार्थ्यांना 92 लाख 70 हजार होणार वितरण

वयाची 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांनी वयोमानपरत्वे येणारे अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून त्यांना आवश्यक सहाय उपकरणे, साधने खरेदी करण्यासाठी त्याबरोबर मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे.  या योजनेत 3 हजार रुपयांप्रमाणे साधने घेण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे.

तालुकानिहाय अनुक्रमे नोंदणी केलेल्या अर्जांची संख्या आणि देण्यात येणारी रक्कम पुढीलप्रमाणे आहे.

मंडणगड-97, रक्कम-2 लाख 91 हजार, दापोली-137. रक्कम-4 लाख 11 हजार.  खेड-21 रक्कम-63 हजार. चिपळूण 469 रक्कम-14 लाख 7 हजार.  गुहागर 231 रक्कम-6 लाख 93 हजार.  संगमेश्वर-872 रक्कम-26 लाख 16 हजार.  रत्नागिरी-486 रक्कम-14 लाख 58 हजार.  लांजा-117 रक्कम-3 लाख 51 हजार.  राजापूर-660 रक्कम-19 लाख 80 हजार असे एकूण 3 हजार 90 लाभार्थ्यांना 92 लाख 70 हजार रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.

०००

शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत-सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि. ९: भारतीय राज्यघटनेने आदिवासी नागरिकांना दिलेले हक्क अबाधित राखून शिक्षणाच्या माध्यमातून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाच्यावतीने कोटमदरा येथे आयोजित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी  गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, सहायक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी विजया पंढुरे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश घोलप आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने समाजातील सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान केले असून आदिवासी नागरिकांचे हक्क अबाधित राखून त्यांचे रक्षण करावे, त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. आदिवासी समाजाच्या प्रगतीकरीता शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, शिष्यवृत्ती आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, या सुविधेचा शिक्षणाकरीता उपयोग केला पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्यात परिवर्तन होत असल्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवून त्यांना लाभ देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे याकरीता आश्रमशाळेच्या अत्याधुनिक इमारती, मुला-मुलींची स्वतंत्र वसतिगृहे उभारण्यात येत आहे.  येथील विद्यार्थ्यांना पुणे येथे पुढील शिक्षण घेता यावे, याकरीता ७ हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याबाबत राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यासोबत चर्चा करण्यात आली आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचे फार मोठे योगदान असून आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळी विचारांची लढाई लढली, शांततेत आंदोलन करुन चर्चेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.  आजही आदिवासी समाजानत सामुदायिक विवाह व सामूहिक निर्णयपद्धती, आवश्यकतेनुसार पीक पिकविणे, जंगलाचे रक्षण आदी चांगल्या प्रथांचे जतन केले जाते. आदिवासी समाज  निर्सगाच्या विरुद्ध  पाऊल न टाकता त्याचे रक्षण करण्याचे काम करतात. त्यांच्याकडून इतर समाजाला बोध घेण्याची गरज आहे.

आदिवासी भागांचा विकास करताना वन कायदा, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र, परिसराला लागून अभयारण्य, पर्यावरणाचे रक्षण या बाबींचा विचार करुनच विकास करावा लागतो, परिसराचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मंत्री श्री. वळसे पाटील यांनी दिली.

प्रकल्प अधिकारी श्री. पाटील म्हणाले, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय योजना, न्यूक्लियस बजेट योजना, ठक्करबप्पा आदिवासी वस्तीसुधार योजना, प्रधानमंत्री आदि आदर्श योजना, शबरी घरकुल योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना आदी विविध योजना राबविण्यात येत आहे. तसेच रस्ते, वीज, पाणी, विद्युत योजना अशा पायाभूत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

मंत्री श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थी, शासकीय वसतिगृह व आश्रमशाळेतील स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आदिवासी बचत गटाच्यावतीने मांडण्यात आलेल्या स्टॉलला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली.

०००

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे १४ लाख खातेदारांना ५२१६ कोटी रकमेचे वाटप

पात्र ठरलेल्या ३३ हजार ३५६ कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई, दि. 9 : सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे. मात्र, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली. सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये 50 हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी महा-आयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बॅंकांनी एकूण 29 लाख 2 हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली. त्यापैकी, 4 लाख 90 हजार कर्जखाती आयकर दाते, पगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरली, तर साधारणत: 8 लाख 49 हजार कर्जखाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली आहेत.

पात्र ठरलेल्या 15 लाख 44 हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी 14 लाख 40 हजार कर्जखात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ

‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ९ : ०७ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” मधील विहित नमुन्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि. ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२४ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देतील.

जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येवून ३ गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे, सर्व कागदपत्र व्हिडीओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडे सादर करतील. निकालाचा दिनांक, सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणाचा समारंभ कोठे व कसा करायचा याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय यांच्याकडून स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००

केशव करंदीकर/व.स.सं

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/Ganeshotsav-GR-२४-ANTIM.pdf” title=”Ganeshotsav GR २४ ANTIM”]

 

ताज्या बातम्या

फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ...

0
सातारा दि. 11: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्हा आहे. मराठ्याचा इतिहास आणि त्याशी संबंधित   जिल्ह्यात ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ असणारी...

शाहिरी कलेचे जनत आणि संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार

0
सातारा दि.11 (जिमाका ) : शाहिरी परंपरेने लोकमानसाप्रमाणेच लोकचेतना जागविण्याचे, चेतविण्याचे कार्य केले. या कलेचे स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देश घडविण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे . शाहिरी...

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २००  विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री...

0
पंढरपूर (११ ) :-आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व...

सिंचन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ – जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण...

0
उर्वरित क्षेत्रही सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न पाटबंधारे विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा पूरपरिस्थिती रोखण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा करण्याचे निर्देश सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : सांगली पाटबंधारे विभागाअंतर्गत पूर्णत्वाकडे जाणाऱ्या...

पुलं कट्ट्याच्या नव्या पर्वाची सुरुवात — २५व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाची घोषणा

0
मुंबई, ११ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने पुलं कट्ट्याच्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल....