रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 567

पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा

मुंबई, दि. २७ : नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षीत नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी  ऑनलाईन सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहराविरहित) स्वरूपाची असून त्यासाठी अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून आधार ओटीपी किंवा मोबाईलद्वारे ओटीपी प्राप्त करून https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. त्यामध्ये पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित कार्यालयातील रोखपालद्वारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती जारी करण्यात येईल.

या फेसलेस सेवेमुळे सुमारे २.५० लाख वाहन मालकांना परिवहन कार्यालयांना भेट देण्याची आवश्यकता नाही. नागरिकांना काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा. आकर्षक/पसंती क्रमांक आरक्षित करण्यासाठी वरीलप्रमाणे (workflow) कार्यपद्धतीचा अवलंब वाहनधारकांनी करावा व या फेसलेस सेवेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.

अशी करा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी

अर्जदाराने https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर जावून न्यू युजर / रजिस्टर नॉऊ यावर क्लिक करावे. यामध्ये संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ईमेल व मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे पडताळून घ्यावे. त्यानंतर संकेतस्थळावर लॉग इनमध्ये जावून ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेले युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन उपलब्ध असणारे पसंती क्रमांक निवडावे. यासाठी घेण्यात येणारे शुल्क एसबीआय ई पे या पेमेंट गेटवेवरून ऑनलाईन अदा करावे आणि प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ई पावती प्रिंट काढून संबंधित वाहन विक्रेत्याकडे (डीलर)कडे नोंदणीसाठी देण्यात यावी.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी 

मुंबई, दि. २७ : हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.  राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे.

ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन मालकाचा वाहन नोंदणी अर्ज करावा लागणार आहे. तसेच वाहन नोंदणी शुल्क व वाहन कराचा भरणा करून नोंदणी करता येणार आहे.

सद्यस्थितीत खाजगी वाहनांच्या नोंदणीप्रमाणेच हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी या सुविधेमुळे वाहन वितरकांकडे करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता हलकी मालवाहू वाहने, यापुढे परिवहन कार्यालयात नोंदणीसाठी आणण्याची आवश्यकता राहणार नाही व नोंदणीची प्रक्रिया विनासायास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहन धारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. वाहन वितरकांस काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा.

तरी, सर्व नागरिकांनी व संबंधित वाहन वितरकांनी याची नोंद घेऊन, त्याप्रमाणे कार्यवाही करावी व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार  यांनी केले आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

 

‘विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको’- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन 

मुंबई, दि. २७ : देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासोबतच पर्यावरण रक्षणही महत्त्वाचे आहे. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते. पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथील सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते.

चर्चासत्राचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज संस्थेने ‘कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी’,  नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, एनआयटी वारंगल आदी संस्थेच्या सहकार्याने केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  मात्र कधी-कधी पर्यावरण विषयांवर ताठर भूमिका घेतली जाते. दक्षिण भारतातील एका मार्गावरील चार झाडांच्या रक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. या महामार्गावर पंधरा वर्षात जवळजवळ तीन हजार लोकांचे बळी गेले, असे सांगून चार झाडे कापणे आवश्यक असेल तर त्याऐवजी २५ नवी झाडे लावण्यासारखी सकारात्मक अट घातली गेली पाहिजे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

देशात जलसंवर्धन व नदीजोड प्रकल्पांचे काम झाल्यास देशातील अन्नधान्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढेल व भारत संपूर्ण जगासाठी अन्नधान्य उत्पादन करू शकेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

भारतीय संस्कृतीमध्ये नदी, पर्वतराजी व वृक्षवल्लीची पूजा केली जाते. आपण निसर्गाचे व नैसर्गिक संपदेचे मालक नसून विश्वस्त आहोत ही भूमिका भारतीय विचारातून अधोरेखित केली जाते. वसुंधरा आपल्या विविधतेसह पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी भारतीय विचारधारेतील पाण्याचा, अन्नधान्याचा व ऊर्जेचा जबाबदारीने विनियोग याबाबतचे चिंतन यावर भाष्य केले तसेच प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या आव्हानाबद्दल चिंता व्यक्त केली.

उद्घाटन सत्राला भारतीय नदी परिषदेचे सदस्य, ‘रिव्हर मॅन ऑफ इंडिया’ रमण कांत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor inaugurates Conference on ‘Lifestyle for Environment’

‘We should not be environmentally fanatic’: Governor C P Radhakrishnan

 

Mumbai, 27th Nov : Maharashtra Governor C P Radhakrishnan has said that there is a need to strike a fine balance between development and environment concerns. Stating that protection of the environment is receiving high priority, he said we should not be ‘environmentally fanatic’ when it comes to addressing the real problems of the people.

The Governor was speaking at a Conference on ‘Lifestyle for Environment: Bharatiya Perspective on Sustainability’ at National Stock Exchange Convention Centre in Mumbai on Wed (27 Nov).

The Conference was organised by the Govardhan Eco Village in association with Kotak School of Sustainability,  IGBC, NIT Warangal and other organisations.

The Governor said, Indian spirituality and festivals underscore sustainable practices. Worshiping rivers, mountains, and trees is not mere ritualism but a reminder of their indispensable role in sustaining life.

The Governor said Indian culture teaches us that we are not the owner of this planet but merely its trustee. He said the earth is not to be owned but nurtured and passed on, in all its richness, to future generations.

According to him, this perspective of trusteeship aligns beautifully with the principles of sustainability and forms the foundation of a holistic approach to development.

‘Riverman of India’ Raman Kant and Director of Govardhan Eco Village Gauranga Das were prominent among those present.

००००

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

नाशिक, दि. २६ (जिमाका): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी  नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, मतदानाची वाढलेली टक्केवारी व केलेले काम उल्लेखीनय आहे, अशा शब्दात मख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी कौतुक केले.

यावेळी बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह 15 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्यक्ष व ई-उपस्थित होते.

श्री. एस.चोक्कलिंगम यांनी  जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संवाद साधत निवडणूक कामकाज संदर्भात आलेला अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शक सूचनांचे स्वागत केले.

०००

 

आगामी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक नियोजन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक, दि.26 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा): आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने अंतिम आराखडा तयार  करण्यासाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी आवश्यक बाबींचा सार्वांगीण विचार करून समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या.


आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, त्रंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले सन २०२७ मध्ये नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशपातळीवरचा हा महत्त्वाचा सोहळा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे  सर्व यंत्रणांचा सहभाग महत्वाचा असून सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात बैठक होणार असून या बैठकीत प्रत्येक यंत्रणांनी केलेल्या कार्यपूर्तीचा आढावा घेतला जाणार आहे. या प्रत्येक बैठकीस संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य  असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिका व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी तयार केल्याल्या आराखड्याचे सादीकरण बैठकीत केले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी आराखड्यात आणखी समाविष्ठ करावयाच्या बाबी व करावयाचे बदल याबाबत मार्गदर्शन केले.  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा, आवश्यक सूचना जाणून घेण्यासाठी लवकरच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधु महंत, आखाडा प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत सांगितले.
0000000

महाराष्ट्रासह १५ राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी

नवी दिल्ली  26 : आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देत, महाराष्ट्रासह 15 राज्यांसाठी भूस्खलन जोखीम शमन आणि नागरी संरक्षण क्षमताबांधणीसाठी एकूण 1 हजार 115.67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने  15 राज्यांमध्ये भूस्खलन जोखीम शमन प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून महाराष्ट्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतच, सर्व राज्यांतील नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी 115.67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी समितीने हिमनदी उद्रेक पूर जोखीम व्यवस्थापनासाठी 150 कोटी रुपये आणि सात शहरांमध्ये नागरी पूर व्यवस्थापनासाठी 3 हजार 75.65 कोटी रुपये मंजूर केले होते.

आपत्ती व्यवस्थापनासाठी तसेच अनुषंगिक कामांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने या वर्षांतर्गत 21 हजार 476 कोटी रुपयांहून अधिक निधी विविध राज्यांना वितरित केला आहे. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, राज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी यांतील तरतुदींचा समावेश आहे.

00000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 146, दि.26.11.2024

संविधान दिनानिमित्त राज्यपालांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन

मुंबई, दि. २६ : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

0000

Maharashtra Governor reads out Preamble on ‘Constitution Day’

Mumbai, 26th Nov : The Governor of Maharashtra  C P Radhakrishnan  read out the preamble of the Constitution of India on the occasion of the Constitution Day at Raj Bhavan.

Officers and staff of Raj Bhavan and Police personnel posted in Raj Bhavan reiterated the resolve of the nation to constitute India into a Sovereign, Socialist, Secular and Democratic Republic on the occasion.

0000

 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली. पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळवले आहे.

या सोडतीच्या कार्यक्रमासाठी वित्त (लेखा व कोषागारे) विभागाचे सचिव डॉ. श्री. एन. रामास्वामी उपस्थित होते. प्रोत्साहनपर बक्षिस रूपये दोन लाखाचे चार क्रमांक, दुसरे बक्षिस रूपये पाच लाख पाच क्रमांक, तिसरे बक्षिस रूपये एक लाख पाच क्रमांक व त्यापुढे रू. १०,०००/- हुन कमी रकमेची १०,४२८ बक्षिसे लागली आहेत. असे एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रू. २,२०,५०,०००/- इतकी आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी असे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी कळविले आहे.

0000

विभागीय आयुक्तालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

अमरावती, दि. 26 :  संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

यावेळी अपर आयुक्त संजय पवार, उपायुक्त गजेंद्र बावणे, संतोष कवडे, राजू फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मुल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी सर्वांना माहिती होण्यासाठी शासनाने जिल्ह्यात संविधान मंदिरांची उभारणी केले असल्याचे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना श्रीमती पाण्डेय यांनी उजाळा दिला.

0000

मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

मुंबई, दि. २६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज (दि. २६ नोव्हेंबर) राजभवन, मुंबई येथे  भेट घेऊन त्यांना आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले.

यावेळी मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे व इतर देखील  उपस्थित होते.

0000

CM, Dy CMs meet Governor; CM tenders own, cabinet resignation

Mumbai, 26th Nov : Chief Minister Eknath Shinde accompanied by Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar met Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai on Tue (26 November).

The Chief Minister tendered the resignation of his post and that of his cabinet to the Governor on this occasion.

The Governor has asked the Chief Minister Eknath Shinde to continue to hold the charge of his post till alternate arrangements are made.

Ministers Deepak Kesarkar and Dadaji Bhuse were  also present.

0000

ताज्या बातम्या

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल

0
मुंबई, दि. १७ : श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या सोमवार १८ रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा उद्या निकाल

0
मुंबई, दि. १७: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र...

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...