रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 555

उद्योगातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य; कौशल्य प्रशिक्षणही देणार- उद्योगमंत्री उदय सामंत

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदला लवकरात लवकर देण्याची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर दि.१२ (जिमाका)- उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका आहेच. आहे त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल शिवाय आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले जाईल,असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. जिल्ह्यातील बिडकीन एमआयडीसीसाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ, ही सगळी प्रकरणे दि.१७ रोजी मंत्रालयात पाठवावी,असे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.

बिडकीन औद्योगिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात आज उद्योग मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, अर्जून खोतकर, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे  व्यवस्थापकीय संचालक मलिकनेर, सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे तसेच बिडकीन सरपंच व प्रकल्पग्रस्त शेतकरी आदी उपस्थित होते.

श्री.सामंत यांनी निर्देश दिले की, जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांपैकी वर्ग २ जमिनीचा मोबदला ७० टक्के देण्यात आला आहे. उर्वरित मोबदला न दिलेल्या २२५ प्रकरणांपैकी ७५ प्रकरणात मोबदला देण्यात आला आहे. शिल्लक १५० प्रकरणे संकलित करुन जिल्हा व विभागस्तरावरील मान्यता घेऊन दि.१७ रोजी शासनाकडे पाठवावे. शासनस्तरावरून लवकरात लवकर निर्णय होऊन शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत कार्यवाही होईल,अशी ग्वाही श्री. सामंत यांनी दिली. त्याचप्रमाणे वृक्ष, विहीर मोबदला देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ११ कोटी २६ लक्ष रुपयांचा निधी वर्ग केला जाईल. शेतकऱ्यांना भूसंपादन प्रमाणपत्र देण्यात यावे,असे निर्देशही श्री. सामंत यांनी दिले.

श्री. सामंत म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या म्हणून तेथे इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येऊ शकली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याकडे शासनाची भुमिका आहे.याच शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शैक्षणित पात्रतेप्रमाणे नोकरी देण्यास प्राधान्य असेल. शिवाय तशी शैक्षणिक पात्रता नसली तरी उद्योग त्यांना लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण देतील आणि त्या उमेदवारांना नोकरीत सामावून घेतले जाईल,असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. बिडकीन येथे एक सभागृह बांधणे, औद्योगिक वसाहतीच्या सिमेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना  शेतात येण्या जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने रचना करणे, कौशल्य प्रशिक्षणासाठी कन्व्हेंशन सेंटर इ. आश्वासनेही श्री. सामंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

मतदार यादीत नाव नोंदणीसह तपशील अद्ययावत करण्याचे आवाहन          

मुंबई, दि. १२ : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुन:रीक्षण कार्यक्रम घोषणा झाली आहे. यात मतदार दावे आणि हरकती २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करु शकतात. या कार्यक्रमातंर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी उपलब्ध आहे. सर्व मतदारांनी आपले मोबाईल क्रमांक मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडून घ्यावे,असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.

मतदार यादीत आपला मोबाईल क्रमांक जोडल्याने भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना आणि निर्देशांची माहिती मतदारांना सुलभतेने मिळणार आहे.  भारत निवडणूक आयोगाच्यावतीने राबवले जाणारे मतदार सर्वेक्षणासारखे उपक्रम, मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्या संदर्भातील अर्जावरील कार्यवाही याबाबतच्या सूचना – नोटीसा, पंचनाम्याची सूचना (असेल तर) प्राप्त होते, आणि संभाव्य कार्यवाही सुलभ होते. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळाद्वारे तसेच Voter Helpline अॅपद्वारे मतदार यादीतील आपल्या नावाचा सुलभतेने शोध घेता येतो. त्यासोबतच मतदारांना आपले ई – मतदार ओळखपत्र ही सहजतेने डाऊनलोड करता येते.

एक मोबाईल क्रमांक एकाच मतदाराच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक

एका मोबाइल क्रमांकाचा वापर फक्त एकाच मतदार ओळखपत्रासाठी केला जावा.  त्यामुळे विद्यमान मतदारांसह ज्यांच्या मतदार यादीतील नावासोबत त्यांचा विशिष्ट, अर्थात युनिक मोबाईल क्रमांक जोडलेला नाही, त्यांनी अर्ज क्र. ८ भरून आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेणे मतदारांच्या हिताचे आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्यासाठीचे पर्याय :-

१) नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना-

नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना आपल्याला अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक  देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याचवेळी आपण इतर कोणत्याही मतदार ओळखपत्रासाठी वापरला न गेलेला असा स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला तर तो मतदार यादीत आपल्या नावासोबत जोडला जातो.

२) विद्यमान नोंदणीकृत मतदारांसाठी अर्ज क्र. ८

भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांकरता असलेल्या अर्ज क्र. ८ मध्ये मतदार यादीतील वैयक्तिक तपशीलांमधील बदल, दुरुस्त्या आणि अद्ययावतीकरणा अंतर्गत मतदार यादीत आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय दिला आहे.  हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येतो.

ऑनलाईन अर्ज भरण्याकरता www.voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline हे मोबाईल अॅप वापरता येते. या संकेतस्थळावर लॉगीन केल्यावर अर्ज क्रमांक ८ निवडून, त्यात  ‘Correction of Entries in Electoral Roll’या सुविधे अंतर्गत, आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय मिळतो.

Voter Helpline App च्या होम पेजवरील Search Your Name In Electoral Roll हा पर्याय निवडला की, वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्यूआर कोड आणि मतदार ओळखपत्र क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात. voters.eci.gov.in या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक आणि मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडलेला युनिक मोबाइल नंबर या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपलं नाव शोधण्याचे पर्याय दिसतात.  आपण एसएमएसद्वारे देखील मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो. त्यासाठी आपल्या मोबाइलवरून ‘ECI <स्पेस><मतदान ओळखपत्र क्रमांक>हा मेसेज 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो.

ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मतदार जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन, तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्येही ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतील.

मतदार यादीत नाव तपासणे का गरजेचे

नागरिक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात.  त्यांचे नाव मतदार यादीत आढळले नाही की, ते मताधिकाराला मुकतात. बऱ्याचदा मतदार त्यांनी आधीच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मत दिले होते, तिथेच आपले नाव असेल, असे गृहीत धरून त्याच मतदान केंद्रावर जातात. मात्र मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले असू शकते. या माहितीच्या अभावामुळेही मतदार यादीत आपले नाव नाही, असे समजून ते मतदानाला मुकतात. मतदार ओळखपत्रात नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक इ. वैयक्तिक तपशिलांत चुका असल्यास त्यात दुरुस्ती करण्यात यावी, मतदाराला असे ओळखपत्र एखाद्या ठिकाणी पुरावा म्हणून देण्यास अडचण येऊ शकते, म्हणून त्यांनी हे बदल करून घेतले पाहिजेत. दुसर महत्वाच म्हणजे मतदानाच्या वेळीही ओळख पटवण्यासाठी ते अडचणीचं ठरू शकतं त्यामुळेही हे बदल करून घेणे आवश्यक असतं.

जेणेकरून मतदार यादीत आपले नाव नसेल तर आपण मतदार नोंदणीचा अर्ज भरू शकतो, तसेच आपल्या वैयक्तिक तपशिल अथवा पत्त्यात बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करायची गरज असेल तर त्यासाठीचे अर्जही वेळेत भरू शकतो.

आपण आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि त्यांनाही मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून देण्याची विनंती करू शकता, असे अवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

                                      ०००००

वंदना थोरात/विसंअ

 

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ ‘शेतकरी दिन’ साजरा करणार

मुंबई दि. 12 : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी 19 ऑगस्ट 2024 आणि या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालय निर्गमित करणार आहेत. शेतकरी दिनानिमित्त वेबिनार संवाद/मार्गदर्शन वर्ग आयोजित करुन दि.19 ऑगस्ट,2024 रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

अंगणवाडी केंद्रांमध्ये चिमुकल्यांच्या हस्ते २ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण

मुंबई,दि. १२ : केंद्र पुरस्कृत ‘एक पेड मॉ के नाम ‘ आणि ‘चिमुकल्यांची वसुंधरा’ या अभियानांतर्गत राज्यातील सर्व अंगणवाडी परिसरात प्रत्येक बालकांच्या नावे एक झाड  लावण्यात येत आहे.  आजपर्यंत अंगणवाडी केंद्रांमध्ये २ लाख ६१ हजार ८३१ रोपांचे बालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.

१ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या हस्ते लावण्यात येणाऱ्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची असणार आहे. या अभियानासाठी विशेष मेहनत घेतलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे एकात्मिक बाल सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांनी अभिनंदन केले आहे.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. 12 : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ व ‘अन्नपूर्णा योजना’ या सर्वसामान्य महिलांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. शासन राज्याच्या विकासाला प्राधान्य देत असतानाच कल्याणकारी योजनाही राबवित असून यातून विकास व कल्याण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

इंडिया टुडे ग्रुपच्या ‘मुंबई तक बैठक’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुंबई तकच्या अँकर हर्षदा परब, अनुजा धाक्रस आणि माधवी देसाई यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची आज मुलाखत घेतली.

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे शासन आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना, अन्नपूर्णा योजना याबरोबरच वयोश्री योजना, तीर्थक्षेत्र योजना अशा अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेची तयारी ही गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सुरू होती. घरातील महिलांना घरखर्च करताना कसरत करावी लागते. त्यांना आधार देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून राज्य शासन करत आहोत. ही योजना सध्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेतून वर्षातून तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. ‘लेक लाडकी लखपती योजना’ तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शिक्षण शुल्क माफी अशा योजनेतून महिलांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. या कल्याणकारी योजनांसाठी निधीची तरतूद करूनच त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

महाराष्ट्र हे राज्य प्रगतीशील राज्य असून राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू होत असून रोजगार संधी निर्माण होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. राज्य शासन करत असलेली सकारात्मक कामे, योजना ही माध्यमांनी आपल्या व्यासपीठावरून लोकांपर्यंत पोहोचवावीत. लोकांच्या हिताची कामे दाखवावेत. वस्तुनिष्ठ माहिती पोचवावी. लोकांच्या समस्यांना वाचा फोडणारी पत्रकारिता व्हावी अशी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

 

रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे असे करा व्यवस्थापन…

कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो तर तूडतुड्यांचा प्रादूर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकीड्यांचा ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून आढळून येतो. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसुन येतो. वरील सर्व प्रकारच्या किडीमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब करावा.

एकात्मिक व्यवस्थापन:

  • रस शोषक कीडींचे व्यवस्थापन
  • बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रीड किंवा थायमिथोक्झाम किटकनाशकांची बीजप्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोषक किडींपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यापर्यंत पिकाला संरक्षण मिळते म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये.
  • वेळोवेळी प्रादूर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमा करून किडींसहीत नष्ट करावा.
  • पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर २५ पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टर लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे.
  • कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे त्यामुळे चवळी पीकावर कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू किटकांचे पोषण होईल.
  • वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडींच्या पर्यायी खाद्य तणे जसे अंबाडी, रानभेंडी इ. नष्ट करावी.
  • मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील.
  • रस शोषक किडीवर उपजीविका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफीड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा इत्यादी परोपजीवी किटकांची संख्या पूरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.
  • रस शोषक किडींसाठी कपाशी पिकाचे प्रादूर्भावाबाबत सर्वेक्षण करावे.
  • सरासरी संख्या १० मावा/पान किंवा २ ते ३ तूडतूडे/पान किंवा दहा फूलकीडे/पान किंवा मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली., किंवा फिप्रोनील ५ टक्के प्रवाही ३० मि.ली., किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन

  • पिक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनतर फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा वापर करावा. सापळे पिकापेक्षा किमान एक फुट उंचीवर लावावेत, जेणेकरून फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन (कामगंध) सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.
  • प्रत्येक कापूस संकलन केंद्रावर व जीनींग फॅक्टरीमध्ये १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगाचा नायनाट करावा.
  • पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढ्यांची रोकथाम करता येईल
  • पिक उगवणी नंतर ३५ ते ४० दिवसांपासुन दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझॅडिरेक्टिन ३००० पीपीएम ४० मिली प्रति १० ली पाणी या प्रमाणे फवारणी.
  • पिक उगवणी नंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकांची कार्ड (१.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी) चार वेळा पिकावर लावावेत.
  • गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली दिल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
  • प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणत्याही एका किटकनाशकची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 ००००

(माहिती संकलन : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि.१३: पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर ३१ ऑगस्ट. २०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन २०२४ च्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा घेऊन विजेत्या मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धचे आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देईल. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन देण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे, सर्व कागदपत्र व व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करण्यात येतील. निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील.

000

संध्या गरवारे/विसंअ

सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्या’तून लाभ द्यावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • राज्यात पानमांजर, गिधाड, रानम्हैससाठी प्रजनन केंद्र
  • दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर
  • ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवा

मुंबई, दि. १२ : राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पानमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज मान्यता दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राज्यात सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयामध्ये प्रभावी राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वनमजुर म्हणून सामावून घ्यावे. तसेच सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे तसेच सर्पदंशावर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी ‘क्लिनिक ऑन व्हील’ उपक्रम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी आज येथे दिले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दुरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मंडळाचे सदस्य आमदार आशीष जयस्वाल, आमदार संदीप धुर्वे, मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पेंच येथे पानमांजर, नाशिक येथे गिधाड आणि गडचिरोली येथे रान म्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली. दुर्मिळ होत चालेल्या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी ही केंद्रे उपयुक्त ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मनुष्य आणि वन्य प्राण्यांच्या संघर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला वन विभागात वन मजूर म्हणून सामावून घेण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिले. गावांमध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी होते त्याला तात्काळ प्रतिसाद म्हणून पथक नेमतानाच वनपाटील यांची देखील नियुक्ती केली जावी याबाबत याबैठकीत चर्चा झाली.

जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची राज्यात जास्तीतजास्त जाणीवजागृती करावी. वृक्षारोपण केलेल्या रोपाचे संगोपन केले जावे यासाठी राज्यभर ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबु लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे सांगत राज्यात दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी वन विभागाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सातारा जिल्ह्यातील जावळीच्या जंगलात ५०० प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती असल्याचे सांगत त्याठिकाणी संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जंगलांमध्ये वैद्यकीय पर्यटनाला प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि दुर्मिळ वनस्पतींचे जतन देखील होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, व्याघ्र भ्रमण मार्गातील चार विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. बैठकीस मंडळाचे सदस्य किरण शेलार, पुनम धनवटे, अनुज खरे, अंकुर पटवर्धन, चैत्राम पवार, विनायक धलकर उपस्थित होते.

००००

कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा क्षेत्रावर ‘मित्र’ने विशेष लक्ष केंद्रीत करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • ‘मित्र’ची नियामक मंडळाची बैठक संपन्न
  • महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ कार्यरत
  • महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणार

मुंबई, दि. १२ : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच ‘मित्र’ ने कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत करावे. जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि राज्याच्या विकासाला देखील मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. यावेळी महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प (188 million USD जागतिक बँक साहाय्याने) कृष्णा भीमा खोऱ्यातील विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती (४०० mn USD जागतिक बँक) नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

वर्षा निवासस्थानी ‘मित्र’च्या नियामक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘मित्र’चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य हे भारतात पाहिले राज्य आहे ज्याने अर्धा million USD चे ध्येय गाठले आहे. महाराष्ट्र आर्थिक विकास सल्लागार परिषदेने शिफारस केलेल्या जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण करणे तसेच जिल्ह्यांना विकास व उत्पन्न वाढीचा केंद्रबिंदू करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणास अनुसरुन राज्यात महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्पाचा Maharashtra District Growth ar In Institutional Capabilities (MahaSTRIDE) शुभारंभ यावेळी करण्यात आला. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून १५६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.

यावेळी कृष्णा भिमा खोऱ्यातील विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्याचाही यावेळी शुभारंभ झाला. हा प्रकल्प ३२०० कोटींचा असून त्यापैकी जागतिक बँकेकडून २२४० कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे, असे ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परदेशी यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्याचा विकास दर २०२८ पर्यंत १७.५५ टक्के करणे, राज्यात गुंतवणुकीचा दर वाढवून तो जीडीपीच्या ३७ टक्के करणे याबाबींवर सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ अतिशय चांगले काम करीत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यादृष्टीने ‘मित्र’ने मुंबईसह, मुंबई महानगर परिसरातील पूरक बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. त्याचबरोबर हवामान बदल, कृषी क्षेत्रात नवीन प्रयोग, सेंद्रीय शेतीला चालना मिळावी म्हणून ‘मित्र’मधील संशोधकांनी यावर भर द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्यात १२३ जलसिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रत करण्यात आले आहे. कृषी क्षेत्राला सौर उर्जा उपलब्ध करून देण्यासाठी देखील राज्य शासन प्रयत्नशील असून या क्षेत्रातून ९२०० मेगा वॅट सौर उर्जा निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मित्र ने केले प्रस्ताव यामध्ये mahaStride अंमलबजावणी कक्ष व MRDP चे अंमलबजावणी कक्ष कार्यान्वित करण्यासाठी मान्यता दिली

तसेच राज्यात नावीन्यपूर्ण State Data Policy यामध्ये सांख्यिकी माहितीचा विकास कामासाठी उपयोग करता यावा यासाठी मान्यता दिली.

महाराष्ट्र प्रगत राज्य असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे आता महानगरांसोबतच मराठवाडा, विदर्भ या भागात जास्तीत जास्त उद्योग गेले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ग्रीन हायड्रोजनला प्राधान्य देतानाच नारपार, मराठवाडा वॉटरग्रीड, पैनगंगा, वैनगंगा, नळगंगा सारख्या जिल्ह्यांना वरदान ठरणाऱ्या प्रकल्पांच्या पूर्णतेसाठी ‘मित्र’ने चांगले काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र’ने चार संस्थांशी नॉलेज पार्टनरसाठी सामंजस्य करार आज मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यामध्ये गोखले इन्स्टीट्यूट, आयआयएम नागपुर, आयआयटी मुंबई, मुंबई स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांचा समावेश आहे. पिरामल फाऊंडेशन प्रशिक्षणासाठी सहकार्य करणार आहे.

०००

 

विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थी महिलांची यादी  शासनाकडे पाठवावी

मुंबई, दि.१२:  राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी  तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुलभतेने होण्यासाठी ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र विकास समिती गठीत झाली नाही किंवा विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली नाही अशा जिल्ह्याची यादी जिल्हाधिकारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवावी.

यासाठी विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी. जर समितीची मान्यता घेण्यास  समस्या असतील, तर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांची मान्यता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमबजावणीसंदर्भात हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

०००

काशीबाई थोरात/वि.स.अ

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/202408071845076430.pdf.pdf”]

ताज्या बातम्या

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. 8 : प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर...

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H2OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

0
मुंबई, दि. 8 - गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या 'प्रोजेक्ट H2OPE' (होप)...

सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा  वापर सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ :  राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे...

राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

0
मुंबई, 8 : राज्यात मागील 24 तासांमध्ये (8 जून रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड 20.8 मिमी, धाराशिव 13.8 मिमी, ठाणे 7.9 मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात कालपासून आज 8 जून  रोजी...

आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0
मुंबई, ८ :  भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि...