रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 554

ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना ‘कवी नर्मद साहित्य पुरस्कार’ जाहीर

मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्यावतीने  देण्यात येणारा सन 2023-24 या वर्षीसाठीचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना जाहीर करण्यात आला आहे, तसेच कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ईश्वरलाल परमार यांना झाला आहे. रोख 51 हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 24 ऑगस्ट 2024 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान समारंभ होणार असल्याची माहिती अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव स. व. निंबाळकर यांनी दिली आहे. या पुरस्कार निवडीबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. भांड आणि श्री. परमार यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी कडून दरवर्षी कवी नर्मद यांचे नावे दोन सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतात. या दोन पुरस्कारापैकी एक पुरस्कार ज्येष्ठ मराठी साहित्यिकांना तर दुसरा पुरस्कार जेष्ठ गुजराती साहित्यिकांना प्रदान करण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी श्री. भांड आणि श्री. परमार यांची निवड करण्यात आली आहे. 24 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे या पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्री. बाबा भांड यांचे मराठी साहित्य क्षेत्रात भरीव असे योगदान आहे. त्यांच्या 9 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह, 4 प्रवासवर्णने, 6 ललीत गंध, 5 जीवनवृत्त, 5 अनुवाद, 25 संपादन, 16 बाल कादंबऱ्या, 25 बाल कथासंग्रह, 3 एकांकिका इत्यादी विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहेत. सन 2015 ते 2018 या कालावधीत ते मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या दशक्रिया या कांदबरी वर आधारित चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.

यापूर्वी कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कविवर्य मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ साहित्यिक शंकर वैद्य, कवी ना.धों. महानोर, विजया राजाध्यक्ष, रत्नाकर मतकरी, सुरेश खरे, मारुती चितमपल्ली, आशा बगे, राजेंद्र बनहट्टी यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती श्री. निंबाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ

विनोद माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई, दि. 12 : नवभारत समुहाचे मुख्य व्यवस्थापकीय संपादक विनोद माहेश्वरी यांच्या निधनाबददल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

नवभारत हिंदी व नवराष्ट्र मराठी वृत्तपत्रांचे मुख्य व्यवस्थापकीय संपादक विनोद माहेश्वरी यांच्या निधनाचे वृत समजून दुःख झाले. विनोद माहेश्वरी हे उत्कृष्ट पत्रकार, मनमिळावू व्यक्ती व समाज सेवक होते.

आपले वडील, स्वातंत्र्य संग्राम सैनिक  स्व. रामगोपाल माहेश्वरी यांनी सुरु केलेल्या नवभारत दैनिकाला त्यांनी वेगळया उंचीवर नेले. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक ध्येयनिष्ठ पत्रकार तसेच समाजसेवक गमावला आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोक संदेशांत म्हटले आहे.

0000

 

Governor condoles demise of Vinod Maheshwari

Mumbai Dated 12 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan has expressed condolences on the demise of chief managing editor of Hindi daily Nava Bharat and Marathi daily Nava Rashtra Vinod Maheshwari.

In a condolence message the Governor has said:

“I was saddened to know about the passing of the chief managing editor of Nava Bharat group Vinod Maheshwari. He was a dedicated journalist, kind human being and a committed social worker. He took the Nava Bharat group founded by his illustrious father late Ramgopal ji Maheshwari to great heights.

In his demise, Maharashtra has lost a committed journalist and a social worker.”

000

‘परिवर्तनाचा नायक’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई, दि. १२ : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात झालेल्या परिवर्तनाची माहिती देणाऱ्या ‘परिवर्तनाचा नायक’ या पुस्तकाचे प्रकाशन आज  मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी पुस्तकाचे लेखक व एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे अध्यक्ष तथापी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक आशिष चंदाराणा व नीता केळकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जामंत्रीपदाच्या अवघ्या सव्वा दोन वर्षांच्या काळात राज्यामध्ये ऊर्जा क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्यात आल्या. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी 9000 मेगावॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. हा जगातील सर्वात मोठा डिस्ट्रिब्युटेड रिन्युएबल एनर्जी प्रकल्प आहे. त्यासोबत नवीनकरणीय ऊर्जेचा वापर करण्यास चालना देणारी अनेक पावले टाकण्यात आली. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्यासाठी आवश्यक ऊर्जा सज्जता निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठीही महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात आले. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा मिळण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. उपमुख्यमत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वात अत्यंत कमी कालावधीत राज्यात ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन झाले व त्याचा लाभ राज्यालाआगामी काळात होत राहणार आहे, याविषयीची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

000

संजय ओरके/विसंअ

महत्वाकांक्षी योजनांच्या प्रचाररथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

चंद्रपूर, दि. 12 : राज्य शासनाने शेतकरी, महिला, युवक-युवती, सर्वसामान्य नागरिक, वृद्ध नागरिक व इतरांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती जनतेला माहित व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांचा प्रचाररथ जिल्ह्यात फिरविण्यात येत आहे. या प्रचाररथाला राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

नियोजन सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना जसे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना, अन्नपूर्णा योजना आदी योजनांची  प्रचार प्रसिध्दी या चित्ररथाद्वारे करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : राज्य शासनाची अतिशय महत्वकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लक्ष 84 हजार 857 अर्ज प्राप्त झाले. यापैकी तपासणी पूर्ण झालेल्या अर्जांची संख्या 2 लक्ष 81 हजार 588 आहे. ही टक्केवारी 98.85 आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सर्व लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे 3000 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 59,765 शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे. सध्या राज्यात कृषीपंपांना रात्री 8 तास किंवा दिवसा 8 तास चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीज पुरवली जाते. आता शासनाने 7.5 एच.पी. पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत बीज देण्याचे ठरविले आहे. या योजनेचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील 59765 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना : राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी  आवश्यक साहित्य / उपकरणे खरेदी करणे, तसेच वृध्दांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : 12 वी पास, विविध ट्रेडमधील आय.टी.आय., पदविधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या योजनेंतर्गत शासनामार्फत शैक्षणिक अर्हता 12 वी पास करीता प्रतिमाह विद्यावेतन 6 हजार रुपये, आय.टी.आय/पदविका करीता प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर करीता प्रतिमहा 10 हजार याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येईल.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना : महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देण्याची / दर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडरचे पूनर्भरण मोफत उपलब्ध करू देण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांची गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे व त्यामुळे सर्व गॅस लाभार्थी यांनी गॅसची  ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ तारखेला जमा होणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

१ कोटी पेक्षा जास्त महिलांना मिळणार लाभ

ठाणे दि.12 (जिमाका) : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना कायमस्वरूपी राबविली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दि.17 ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील १ कोटीपेक्षा जास्त महिलांना यांचा लाभ मिळणार आहे, असे विधान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) संजय बागूलमहिला आर्थिक व विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते, कायापालट लोकसंचलित केंद्राच्या पदाधिकारी, महिला बचतगट व अंगणवाडीच्या महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दि. १७ ऑगस्ट रोजी संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता, गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बॅक खाते ही अट ठेवली आहे. ज्या महिलांनी बॅक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बॅक खाते काढून ३१ ऑगस्टपूर्वी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा अर्ज भरावा.

कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅज्युएटी देणार आहोत. तसेच केंद्र शासनाकडे मानधन वाढीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. १ लाख १४ हजार महिला स्मार्टफोन देण्यात आले आहे. ४ लाखापेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचतगटांना देण्यात आले आहे. त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला ११० रुपये मिळत आहे. यातून महिलांना रोजगार मिळत आहे. अंगणवाडी सेवकांना “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी ५० रुपये देण्यात येत आहेत, असेही यावेळी मंत्री तटकरे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार दौलत दरोडा यांनी कायापालट लोकसंचलित केंद्र चांगले काम करीत असून यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. हे केंद्र करीत असलेल्या कामकाजासाठी शासनाकडून प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी मंत्री महोदयांकडे केली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांनी अर्ज भरून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजया गवारी यांनी केले.

५२ हजार कोटींची गुंतवणूक घडवेल आर्थिक क्रांती – उद्योग मंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर दि.१२ (जिमाका)- औद्योगिक गुंतवणुकीसाठी अथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, टोयोटो किर्लोस्कर, लुब्रिझॉल या उद्योग समूहांनी छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीची निवड केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याचा शाश्वत विकासाची आर्थिक क्रांती घडवेल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

चिकलठाणा मसिआ रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मसिआमार्फत करण्यात आले.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ,उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे  व्यवस्थापकीय संचालक मलिकनेर,सह कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, महानगरपालिका आयुक्त जी  श्रीकांत, पोलीस आयुक्त किरण पवार, पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड, मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, एथर एनर्जी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रतो कुमार मित्रा, टोयाटो किर्लोस्कर उद्योग समूहाचे उप व्यवस्थापकीय संचालक स्वप्नेश मारू. जेएसडब्ल्यू उद्योग समूहाचे प्रकल्प व्यवस्थापक बीभू नंदा. लुब्रिझॉलचे प्रतिनिधी नितीन मेनगी यांच्यासह मराठवाड्यातील विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले की मराठवाड्यामध्ये एथर एनर्जी, लुब्रिजॉल, जेएसब्ल्यू ,टोयाटो किर्लोस्कर  यासारख्या उद्योग समुहांनी ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर शाश्वत विकास करण्याबरोबरच आर्थिक क्रांती घडवणारी ठरेल.  लघुउद्योगास प्रोत्साहन यामुळे मिळेल. तसेच प्रशिक्षण देणाऱ्या संस्था  निर्माण होतील.तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन पूरक उद्योग विकासाला चालना मिळेल.

श्री. सामंत म्हणाले की, उद्योगासाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. उद्योग उभारताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याची काळजी  शासन घेत आहे. राज्याच्या या धोरणांमुळे आगामी काळात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या बाबत मसीआ या उद्योग संस्थेच्या मार्फत मंत्री उदय सामंत व उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. मानपत्र देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले. मंत्री अतुल सावे यांनी क्रिकेटच्या स्टेडियमसाठी एमआयडीसीची जागा देण्याची मागणी केली असता लवकरच या जागेत बाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.

प्रास्ताविकामध्ये मसीआचे अध्यक्ष चेतन राऊत यांनी केले. सूत्रसंचालन निता पानसरे यांनी केले.

उद्योगातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य; कौशल्य प्रशिक्षणही देणार- उद्योगमंत्री उदय सामंत

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदला लवकरात लवकर देण्याची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर दि.१२ (जिमाका)- उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका आहेच. आहे त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल शिवाय आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले जाईल,असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. जिल्ह्यातील बिडकीन एमआयडीसीसाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ, ही सगळी प्रकरणे दि.१७ रोजी मंत्रालयात पाठवावी,असे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.

बिडकीन औद्योगिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात आज उद्योग मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, अर्जून खोतकर, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे  व्यवस्थापकीय संचालक मलिकनेर, सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे तसेच बिडकीन सरपंच व प्रकल्पग्रस्त शेतकरी आदी उपस्थित होते.

श्री.सामंत यांनी निर्देश दिले की, जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांपैकी वर्ग २ जमिनीचा मोबदला ७० टक्के देण्यात आला आहे. उर्वरित मोबदला न दिलेल्या २२५ प्रकरणांपैकी ७५ प्रकरणात मोबदला देण्यात आला आहे. शिल्लक १५० प्रकरणे संकलित करुन जिल्हा व विभागस्तरावरील मान्यता घेऊन दि.१७ रोजी शासनाकडे पाठवावे. शासनस्तरावरून लवकरात लवकर निर्णय होऊन शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत कार्यवाही होईल,अशी ग्वाही श्री. सामंत यांनी दिली. त्याचप्रमाणे वृक्ष, विहीर मोबदला देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ११ कोटी २६ लक्ष रुपयांचा निधी वर्ग केला जाईल. शेतकऱ्यांना भूसंपादन प्रमाणपत्र देण्यात यावे,असे निर्देशही श्री. सामंत यांनी दिले.

श्री. सामंत म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या म्हणून तेथे इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येऊ शकली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याकडे शासनाची भुमिका आहे.याच शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शैक्षणित पात्रतेप्रमाणे नोकरी देण्यास प्राधान्य असेल. शिवाय तशी शैक्षणिक पात्रता नसली तरी उद्योग त्यांना लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण देतील आणि त्या उमेदवारांना नोकरीत सामावून घेतले जाईल,असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. बिडकीन येथे एक सभागृह बांधणे, औद्योगिक वसाहतीच्या सिमेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना  शेतात येण्या जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने रचना करणे, कौशल्य प्रशिक्षणासाठी कन्व्हेंशन सेंटर इ. आश्वासनेही श्री. सामंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

मतदार यादीत नाव नोंदणीसह तपशील अद्ययावत करण्याचे आवाहन          

मुंबई, दि. १२ : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुन:रीक्षण कार्यक्रम घोषणा झाली आहे. यात मतदार दावे आणि हरकती २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करु शकतात. या कार्यक्रमातंर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी उपलब्ध आहे. सर्व मतदारांनी आपले मोबाईल क्रमांक मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडून घ्यावे,असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.

मतदार यादीत आपला मोबाईल क्रमांक जोडल्याने भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना आणि निर्देशांची माहिती मतदारांना सुलभतेने मिळणार आहे.  भारत निवडणूक आयोगाच्यावतीने राबवले जाणारे मतदार सर्वेक्षणासारखे उपक्रम, मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्या संदर्भातील अर्जावरील कार्यवाही याबाबतच्या सूचना – नोटीसा, पंचनाम्याची सूचना (असेल तर) प्राप्त होते, आणि संभाव्य कार्यवाही सुलभ होते. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळाद्वारे तसेच Voter Helpline अॅपद्वारे मतदार यादीतील आपल्या नावाचा सुलभतेने शोध घेता येतो. त्यासोबतच मतदारांना आपले ई – मतदार ओळखपत्र ही सहजतेने डाऊनलोड करता येते.

एक मोबाईल क्रमांक एकाच मतदाराच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक

एका मोबाइल क्रमांकाचा वापर फक्त एकाच मतदार ओळखपत्रासाठी केला जावा.  त्यामुळे विद्यमान मतदारांसह ज्यांच्या मतदार यादीतील नावासोबत त्यांचा विशिष्ट, अर्थात युनिक मोबाईल क्रमांक जोडलेला नाही, त्यांनी अर्ज क्र. ८ भरून आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेणे मतदारांच्या हिताचे आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्यासाठीचे पर्याय :-

१) नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना-

नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना आपल्याला अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक  देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याचवेळी आपण इतर कोणत्याही मतदार ओळखपत्रासाठी वापरला न गेलेला असा स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला तर तो मतदार यादीत आपल्या नावासोबत जोडला जातो.

२) विद्यमान नोंदणीकृत मतदारांसाठी अर्ज क्र. ८

भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांकरता असलेल्या अर्ज क्र. ८ मध्ये मतदार यादीतील वैयक्तिक तपशीलांमधील बदल, दुरुस्त्या आणि अद्ययावतीकरणा अंतर्गत मतदार यादीत आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय दिला आहे.  हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येतो.

ऑनलाईन अर्ज भरण्याकरता www.voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline हे मोबाईल अॅप वापरता येते. या संकेतस्थळावर लॉगीन केल्यावर अर्ज क्रमांक ८ निवडून, त्यात  ‘Correction of Entries in Electoral Roll’या सुविधे अंतर्गत, आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय मिळतो.

Voter Helpline App च्या होम पेजवरील Search Your Name In Electoral Roll हा पर्याय निवडला की, वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्यूआर कोड आणि मतदार ओळखपत्र क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात. voters.eci.gov.in या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक आणि मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडलेला युनिक मोबाइल नंबर या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपलं नाव शोधण्याचे पर्याय दिसतात.  आपण एसएमएसद्वारे देखील मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो. त्यासाठी आपल्या मोबाइलवरून ‘ECI <स्पेस><मतदान ओळखपत्र क्रमांक>हा मेसेज 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो.

ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मतदार जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन, तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्येही ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतील.

मतदार यादीत नाव तपासणे का गरजेचे

नागरिक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात.  त्यांचे नाव मतदार यादीत आढळले नाही की, ते मताधिकाराला मुकतात. बऱ्याचदा मतदार त्यांनी आधीच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मत दिले होते, तिथेच आपले नाव असेल, असे गृहीत धरून त्याच मतदान केंद्रावर जातात. मात्र मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले असू शकते. या माहितीच्या अभावामुळेही मतदार यादीत आपले नाव नाही, असे समजून ते मतदानाला मुकतात. मतदार ओळखपत्रात नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक इ. वैयक्तिक तपशिलांत चुका असल्यास त्यात दुरुस्ती करण्यात यावी, मतदाराला असे ओळखपत्र एखाद्या ठिकाणी पुरावा म्हणून देण्यास अडचण येऊ शकते, म्हणून त्यांनी हे बदल करून घेतले पाहिजेत. दुसर महत्वाच म्हणजे मतदानाच्या वेळीही ओळख पटवण्यासाठी ते अडचणीचं ठरू शकतं त्यामुळेही हे बदल करून घेणे आवश्यक असतं.

जेणेकरून मतदार यादीत आपले नाव नसेल तर आपण मतदार नोंदणीचा अर्ज भरू शकतो, तसेच आपल्या वैयक्तिक तपशिल अथवा पत्त्यात बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करायची गरज असेल तर त्यासाठीचे अर्जही वेळेत भरू शकतो.

आपण आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि त्यांनाही मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून देण्याची विनंती करू शकता, असे अवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

                                      ०००००

वंदना थोरात/विसंअ

 

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ ‘शेतकरी दिन’ साजरा करणार

मुंबई दि. 12 : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी 19 ऑगस्ट 2024 आणि या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालय निर्गमित करणार आहेत. शेतकरी दिनानिमित्त वेबिनार संवाद/मार्गदर्शन वर्ग आयोजित करुन दि.19 ऑगस्ट,2024 रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

अंगणवाडी केंद्रांमध्ये चिमुकल्यांच्या हस्ते २ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण

मुंबई,दि. १२ : केंद्र पुरस्कृत ‘एक पेड मॉ के नाम ‘ आणि ‘चिमुकल्यांची वसुंधरा’ या अभियानांतर्गत राज्यातील सर्व अंगणवाडी परिसरात प्रत्येक बालकांच्या नावे एक झाड  लावण्यात येत आहे.  आजपर्यंत अंगणवाडी केंद्रांमध्ये २ लाख ६१ हजार ८३१ रोपांचे बालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.

१ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या हस्ते लावण्यात येणाऱ्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची असणार आहे. या अभियानासाठी विशेष मेहनत घेतलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे एकात्मिक बाल सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांनी अभिनंदन केले आहे.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

ताज्या बातम्या

“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0
मुंबई, ८ :  भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि...

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...