रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 556

रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे असे करा व्यवस्थापन…

कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो तर तूडतुड्यांचा प्रादूर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकीड्यांचा ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून आढळून येतो. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसुन येतो. वरील सर्व प्रकारच्या किडीमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब करावा.

एकात्मिक व्यवस्थापन:

  • रस शोषक कीडींचे व्यवस्थापन
  • बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रीड किंवा थायमिथोक्झाम किटकनाशकांची बीजप्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोषक किडींपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यापर्यंत पिकाला संरक्षण मिळते म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये.
  • वेळोवेळी प्रादूर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमा करून किडींसहीत नष्ट करावा.
  • पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर २५ पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टर लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे.
  • कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे त्यामुळे चवळी पीकावर कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू किटकांचे पोषण होईल.
  • वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडींच्या पर्यायी खाद्य तणे जसे अंबाडी, रानभेंडी इ. नष्ट करावी.
  • मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील.
  • रस शोषक किडीवर उपजीविका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफीड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा इत्यादी परोपजीवी किटकांची संख्या पूरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.
  • रस शोषक किडींसाठी कपाशी पिकाचे प्रादूर्भावाबाबत सर्वेक्षण करावे.
  • सरासरी संख्या १० मावा/पान किंवा २ ते ३ तूडतूडे/पान किंवा दहा फूलकीडे/पान किंवा मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली., किंवा फिप्रोनील ५ टक्के प्रवाही ३० मि.ली., किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन

  • पिक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनतर फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा वापर करावा. सापळे पिकापेक्षा किमान एक फुट उंचीवर लावावेत, जेणेकरून फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन (कामगंध) सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.
  • प्रत्येक कापूस संकलन केंद्रावर व जीनींग फॅक्टरीमध्ये १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगाचा नायनाट करावा.
  • पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढ्यांची रोकथाम करता येईल
  • पिक उगवणी नंतर ३५ ते ४० दिवसांपासुन दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझॅडिरेक्टिन ३००० पीपीएम ४० मिली प्रति १० ली पाणी या प्रमाणे फवारणी.
  • पिक उगवणी नंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकांची कार्ड (१.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी) चार वेळा पिकावर लावावेत.
  • गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली दिल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
  • प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणत्याही एका किटकनाशकची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 ००००

(माहिती संकलन : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि.१३: पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर ३१ ऑगस्ट. २०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन २०२४ च्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा घेऊन विजेत्या मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धचे आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देईल. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन देण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे, सर्व कागदपत्र व व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करण्यात येतील. निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील.

000

संध्या गरवारे/विसंअ

सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्या’तून लाभ द्यावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • राज्यात पानमांजर, गिधाड, रानम्हैससाठी प्रजनन केंद्र
  • दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर
  • ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवा

मुंबई, दि. १२ : राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पानमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज मान्यता दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राज्यात सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयामध्ये प्रभावी राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वनमजुर म्हणून सामावून घ्यावे. तसेच सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे तसेच सर्पदंशावर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी ‘क्लिनिक ऑन व्हील’ उपक्रम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी आज येथे दिले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दुरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मंडळाचे सदस्य आमदार आशीष जयस्वाल, आमदार संदीप धुर्वे, मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पेंच येथे पानमांजर, नाशिक येथे गिधाड आणि गडचिरोली येथे रान म्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली. दुर्मिळ होत चालेल्या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी ही केंद्रे उपयुक्त ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मनुष्य आणि वन्य प्राण्यांच्या संघर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला वन विभागात वन मजूर म्हणून सामावून घेण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिले. गावांमध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी होते त्याला तात्काळ प्रतिसाद म्हणून पथक नेमतानाच वनपाटील यांची देखील नियुक्ती केली जावी याबाबत याबैठकीत चर्चा झाली.

जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची राज्यात जास्तीतजास्त जाणीवजागृती करावी. वृक्षारोपण केलेल्या रोपाचे संगोपन केले जावे यासाठी राज्यभर ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबु लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे सांगत राज्यात दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी वन विभागाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सातारा जिल्ह्यातील जावळीच्या जंगलात ५०० प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती असल्याचे सांगत त्याठिकाणी संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जंगलांमध्ये वैद्यकीय पर्यटनाला प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि दुर्मिळ वनस्पतींचे जतन देखील होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, व्याघ्र भ्रमण मार्गातील चार विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. बैठकीस मंडळाचे सदस्य किरण शेलार, पुनम धनवटे, अनुज खरे, अंकुर पटवर्धन, चैत्राम पवार, विनायक धलकर उपस्थित होते.

००००

कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा क्षेत्रावर ‘मित्र’ने विशेष लक्ष केंद्रीत करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • ‘मित्र’ची नियामक मंडळाची बैठक संपन्न
  • महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ कार्यरत
  • महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणार

मुंबई, दि. १२ : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच ‘मित्र’ ने कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत करावे. जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि राज्याच्या विकासाला देखील मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. यावेळी महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प (188 million USD जागतिक बँक साहाय्याने) कृष्णा भीमा खोऱ्यातील विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती (४०० mn USD जागतिक बँक) नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

वर्षा निवासस्थानी ‘मित्र’च्या नियामक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘मित्र’चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य हे भारतात पाहिले राज्य आहे ज्याने अर्धा million USD चे ध्येय गाठले आहे. महाराष्ट्र आर्थिक विकास सल्लागार परिषदेने शिफारस केलेल्या जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण करणे तसेच जिल्ह्यांना विकास व उत्पन्न वाढीचा केंद्रबिंदू करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणास अनुसरुन राज्यात महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्पाचा Maharashtra District Growth ar In Institutional Capabilities (MahaSTRIDE) शुभारंभ यावेळी करण्यात आला. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून १५६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.

यावेळी कृष्णा भिमा खोऱ्यातील विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्याचाही यावेळी शुभारंभ झाला. हा प्रकल्प ३२०० कोटींचा असून त्यापैकी जागतिक बँकेकडून २२४० कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे, असे ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परदेशी यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्याचा विकास दर २०२८ पर्यंत १७.५५ टक्के करणे, राज्यात गुंतवणुकीचा दर वाढवून तो जीडीपीच्या ३७ टक्के करणे याबाबींवर सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ अतिशय चांगले काम करीत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यादृष्टीने ‘मित्र’ने मुंबईसह, मुंबई महानगर परिसरातील पूरक बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. त्याचबरोबर हवामान बदल, कृषी क्षेत्रात नवीन प्रयोग, सेंद्रीय शेतीला चालना मिळावी म्हणून ‘मित्र’मधील संशोधकांनी यावर भर द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्यात १२३ जलसिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रत करण्यात आले आहे. कृषी क्षेत्राला सौर उर्जा उपलब्ध करून देण्यासाठी देखील राज्य शासन प्रयत्नशील असून या क्षेत्रातून ९२०० मेगा वॅट सौर उर्जा निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मित्र ने केले प्रस्ताव यामध्ये mahaStride अंमलबजावणी कक्ष व MRDP चे अंमलबजावणी कक्ष कार्यान्वित करण्यासाठी मान्यता दिली

तसेच राज्यात नावीन्यपूर्ण State Data Policy यामध्ये सांख्यिकी माहितीचा विकास कामासाठी उपयोग करता यावा यासाठी मान्यता दिली.

महाराष्ट्र प्रगत राज्य असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे आता महानगरांसोबतच मराठवाडा, विदर्भ या भागात जास्तीत जास्त उद्योग गेले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ग्रीन हायड्रोजनला प्राधान्य देतानाच नारपार, मराठवाडा वॉटरग्रीड, पैनगंगा, वैनगंगा, नळगंगा सारख्या जिल्ह्यांना वरदान ठरणाऱ्या प्रकल्पांच्या पूर्णतेसाठी ‘मित्र’ने चांगले काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र’ने चार संस्थांशी नॉलेज पार्टनरसाठी सामंजस्य करार आज मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यामध्ये गोखले इन्स्टीट्यूट, आयआयएम नागपुर, आयआयटी मुंबई, मुंबई स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांचा समावेश आहे. पिरामल फाऊंडेशन प्रशिक्षणासाठी सहकार्य करणार आहे.

०००

 

विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थी महिलांची यादी  शासनाकडे पाठवावी

मुंबई, दि.१२:  राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी  तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुलभतेने होण्यासाठी ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र विकास समिती गठीत झाली नाही किंवा विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली नाही अशा जिल्ह्याची यादी जिल्हाधिकारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवावी.

यासाठी विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी. जर समितीची मान्यता घेण्यास  समस्या असतील, तर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांची मान्यता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमबजावणीसंदर्भात हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

०००

काशीबाई थोरात/वि.स.अ

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/202408071845076430.pdf.pdf”]

‘ऑलिम्पिक’मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नीलच्या आईवडिलांना सॅल्युट.. ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले ऋण

  • जिल्ह्यात अनेक कर्तबगार खेळाडू; खेळाला चालना देण्यासाठी अद्ययावत सुविधा देणार 
  • केशवराव भोसले नाट्यगृह उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

कोल्हापूर, दि.11(जिमाका): ‘ऑलिम्पिक’मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देवून जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या स्वप्नीलला घडवणाऱ्या त्याच्या आई -वडिलांना सॅल्युट.. ! अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कर्तबगार खेळाडू असून खेळाला चालना देण्यासाठी अद्ययावत सुविधा देण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी  यावेळी व्यक्त केला.

पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 50 मीटर रायफल थ्री प्रकारात नेमबाज स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवल्याबद्दल त्याच्या आई अनिता व वडील सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरीत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजापूर येथे झालेल्या घटनेत नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना एकूण एक कोटी 49 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 20 नुकसानग्रस्तांना 53 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच जुलै 2024 मधील महापुरात शिरोळ तालुक्यातील अकिवाट – बस्तवाड ओढ्याच्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन मृत झालेल्या सुहास पाटील, अण्णासो हसुरे व इकबाल बैरागदार यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मध्यमवर्गीय असणाऱ्या स्वप्नील च्या आई-वडिलांनी स्वप्निल ऑलिंपिक पर्यंत पोहोचण्यासाठी आजवर खूप कष्ट सोसले आहे. प्रसंगी कर्ज काढून त्याच्यासाठी रायफल, बुलेट व आवश्यक त्या सोयी सुविधा दिल्या आहेत. ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून स्वप्नील ने आई-वडिलांचे कष्ट सार्थकी लावले आहेत. राज्य शासनाच्या वतीने लवकरच स्वप्नीलच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 केशवराव भोसले नाट्यगृहाची हेरिटेज वास्तू उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नाट्य कलाकारांसाठी उभं केलेलं केशवराव भोसले नाट्यगृह हे एक प्रकारचं वैभव होतं. त्या काळात शाहू महाराजांनी हे नाट्यगृह अत्यंत दर्जेदार पद्धतीने उभारलं होतं. आगीमुळे या नाट्यगृहाचे प्रचंड नुकसान झालं आहे. केशवराव भोसले नाट्यगृह हे केवळ कोल्हापूरच नाही तर राज्यभरातील कलाकारांचं घर होतं. या नाट्यगृहाविषयी असलेल्या भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. कलाकार आणि कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेऊन हे नाट्यगृह अद्ययावत पद्धतीने जसं आहे तसं हेरिटेज पद्धतीने लवकरात लवकर साकारण्यात येईल. हे नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 20 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे व पाच कोटी विम्याची रक्कम मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तथापि दर्जेदार पद्धतीने बांधकाम करताना निधीची कमतरता भासल्यास अधिकचा निधीही देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट झालेल्या ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी शासनाच्या वतीने निधी देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

विशाळगड अतिक्रमण हटवण्याबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती निवारण्यासाठी जागतिक बँकेने 3200 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, यातून पूर निवारण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जातील, असे सांगून त्यांनी जिल्ह्याशी संबंधित विविध बाबींचा उहापोह केला.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

****

 कागलच्या पाझर तलावातील संगीत कारंजा, कृत्रिम धबधबा, बोटिंग क्लबचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

कागलच्या धर्तीवर कृत्रिम धबधबा उपक्रम राज्यात राबवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि.11 (जिमाका): कागल मधील निसर्ग संपन्न पाझर तलाव परिसरात तयार करण्यात आलेला कृत्रिम धबधबा, बोटींग, म्युझिक फाऊंटन, व्हॉईस फाऊंटन हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, असे उपक्रम बारामतीसह अन्य ठिकाणीही विकसित करण्यात येतील, अशा शब्दांत या उपक्रमाचे कौतुक करुन या आल्हाददायक परिसराला भेट देण्यासाठी अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

कागल नगरपरिषदेच्या वतीने पाझर तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेला पादचारी मार्ग, संगीत कारंजा, कृत्रिम धबधबा तसेच बोटिंग क्लब तसेच मटण, चिकन व फिश, व्हेजिटेबल मार्केटच्या नवीन इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील,  जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, राधानगरी कागल विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कागल येथे 13 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून पाझर तलाव परिसर सुशोभित करण्यात आला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याजोगे आल्हाददायक वातावरण निर्मिती या परीसरात करण्यात आली आहे. तलावाच्या काठावर छोट्या कार्यक्रमांसाठी लॉन, तलावात बोटिंग, म्युझिकल फाउंटन (संगीत कारंजा), कृत्रिम धबधबा तयार करण्यात आला आहे. पाझर तलाव परिसर पर्यटकांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

तसेच 15 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मटण, चिकन, फिश, व्हेजिटेबल मार्केटच्या नूतन इमारतीत 93 गाळे आहेत. या सुसज्ज अशा महात्मा फुले मार्केटमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. याठिकाणी पार्किंग व अग्निशमन व्यवस्था करण्यात आली आहे.

****

 

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हजारोंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ साजरा;

सर्वांच्या हिताचा ‘डीपी प्लॅन’ करण्याची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

छत्रपती संभाजीनगर दि. ११ : येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो. ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.  तसेच शहराचा डीपी प्लॅन हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करु अशी ग्वाही त्यांनी शहरवासियांना दिली.

 

छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर चौकात आज ‘मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात  अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाचे बुद्ध विहार विपश्यना केंद्र उभारणी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये, भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपये, टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजीमहाराज पुतळा व अशोक स्तंभ उभारणीसाठी पाच कोटी रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी २५ कोटी रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर डीजीटल प्रोजेक्टसाठी  २५ कोटी रुपये, तारांगणासाठी १० कोटी तसेच मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत बेरोजगारांना मदत अशा विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आज आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्री श्री. ‍शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट तसेच संयोजक जालिंदर शेंडगे व सर्व समिती सदस्य उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

कृतज्ञता महामानवाप्रति

मुख्यमंत्री म्हणाले की, आज आपण कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने माझ्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी जनतेचे मनापासून आभार मानतो.  पण, कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे कोणतेही काम मी केलेले नाही. मी जे काही करतोय ते माझे कर्तव्य आहे आणि इथे जी काही कामे होत आहेत तो तुमचा तो अधिकार आहे. आपण सगळे बाबासाहेबांच्या महान कार्याला पुढे चालवणारे त्यांचे लहान अनुयायी आहोत. आपण भाग्यवान आहोत की, बाबासाहेबांसारखे मोठे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले. आपण या महामानवा प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आज ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी उभा आहे, या भूमीवर बाबासाहेबांचे पवित्र पाऊल पडले आहे. बाबासाहेबांना या शहराबद्दल विशेष आपुलकी होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज आपण जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी सुंदर असं बुद्ध विहार, विपश्यना केंद्र उभारणार आहोत. बाबासाहेबांचा पुतळा उभारतो आहोत. शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीत वाचनालय, रिसर्च सेंटरचा डिजिटल प्रोजेक्ट, तारांगण सेंटर, मागास उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे करणे असे विविध उपक्रम आपण राबवत आहोत. यातून प्रेरणा मिळावी हा आपला हेतू आहे.

संविधानाबद्दल गौरवोद्गार

बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आपला देश चालतो. चार दिवसांनी देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन आहे. बाबासाहेबांची घटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जातो. त्यामुळे संविधान बदलण्याच्या अपप्रचाराला आपण बळी पडू नका, असे सांगून ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, अशा शब्दात त्यांनी संविधानाबद्दल गौरव व्यक्त केला.

महाराष्ट्र माझा परिवार

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हे सरकार दुर्बल, मागास, कष्टकरी, कामगार, गरिबांचे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एक लाख कोटींच्या योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी ४५ हजार कोटी तर राज्यातील माझ्या भगिनींच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, युवा कार्य प्रशिक्षण, वर्षाला तीन सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना सुरू केली. मुलींचे संपूर्ण शिक्षण मोफत केले. दुर्बलांना मदत करणे, त्यांचे जीवन आनंदी करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्र हा माझा परिवार आहे, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांबद्दल आपुलकी व्यक्त केली.

त्यांनी सांगितले की, मुंबईत इंदू मिल इथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना आम्ही फेलोशिप मंजूर केली. बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, टीआरटीआय या संस्थाच्या अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांमध्ये समानता आणली. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेत निवृत्तीवेतन वाढवले. राज्यातल्या ७३ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांना नवे रूप देतो आहोत.  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब, मागास, दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणतोय, असे सांगून शासनामार्फत मागास घटकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहितीही उपस्थितांना दिली.

सर्वांच्या हिताचा विकास आराखडा

त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा जळगाव जालना या महामार्गाच्या उभारणीसाठी शासनाच्यावतीने द्यावयाच्या ३५५२ कोटी रुपयांचा हिस्साही भरण्यास मान्यता दिली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, सर्वांच्या हिताचा विचार करणारा विकास आराखडा आपण तयार करु, हे घर देणारे सरकार आहे लोकांना बेघर करणारे नाही,असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम खरात यांनी केले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जयस्वाल, खासदार संदिपान भुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  पंचशिला भालेराव यांनी ‘शिंदे साहेबांनी आणली लाडकी बहीण योजना’ हे गीत सादर केले.या सोहळ्यास मोठ्या संख़्येने नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.

००००००

‘हर घर तिरंगा’ अभियानात चंद्रपूर जिल्हा राज्यात ठरावा अव्वल, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

नागरिकांना तिरंगा उपलब्ध करून देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपूर, दि. 11 : ‘चलेजाव’ आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे 16 ऑगस्ट 1942 रोजी सर्वात प्रथम भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. देशात सर्वांत पहिले स्वातंत्र्य अनुभवण्याचे भाग्य आपल्या जिल्ह्यातील चिमूरला लाभले. ही शहिदांची आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या जाज्ज्वल्य आठवणींना उजाळा देऊन शहिदांचे स्मरण झालेच पाहिजे. त्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियान हा केवळ एक उपक्रम न समजता राष्ट्रभक्तीचे प्रतिक समजून काम करा. हे अभियान यशस्वी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरेल, यादृष्टीने जनजागृती करा, अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली.

नियोजन भवन येथे ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानचा आढावा श्री. मुनगंटीवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मंगेश खवले चंदनसिंग चंदेल, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती.

13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सर्वात प्रथम चंद्रपूर जिल्ह्यात तिरंगा फडकला. आता अभियानातही चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा. भारताच्या तिरंगा ध्वजाचा सन्मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता घरावर लावलेला तिरंगा सलग तीन दिवस ठेवून 15 ऑगस्ट रोजी सुर्यास्तापूर्वी सन्मानपूर्वक उतरवावा. यासाठी ध्वज संहितेमध्ये रात्री तिरंगा फडकविण्याबाबत शिथिलता देण्यात आली आहे.’ ‘हर घर तिरंगा’ अभियानादरम्यान राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिलेले कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी भागात विभागून उत्कृष्ट नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी सादरीकरण केले.

नागरिकांसाठी ‘सेल्फी पॉईंट’

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करून द्यावा. तसेच या अभियानांतर्गत सरकारी इमारतींवर आकर्षक विद्युत रोशनाई करावी. देशभक्तीपर गीते आणि संदेश प्रसारीत करावे. तसेच ‘तिरंगा सेल्फी पॉईंट्स’ मोठ्या प्रमाणात लावावे. नागरिकांनीसुध्दा तिरंगा ध्वजासोबतचा सेल्फी ‘harghartiranga.com’ या संकेतस्थळावर अपलोड करावा. नागरिकांना ध्वज वाटप करताना त्यांच्याकडून संकल्पपत्र सुध्दा लिहून घेण्याचे नियेाजन करावे, अशी सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिली.

0000

शेतकऱ्यांचे पीक विमाबाबत प्रश्न निकाली निघाल्याचे समाधान – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • ३१ ऑगस्टपर्यंत मिळणार शेतकऱ्यांना रक्कम

  • शेतकऱ्यांकडून पालकमंत्री मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूर, दि. ११ : राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन केवळ पाच दिवसांत चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषिमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला असून जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची 202 कोटी 76 लाखांची रक्कम 31 ऑगस्टपर्यंत मिळणार असल्याचे समाधान आहे, अशा भावना राज्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

नियोजन भवन येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, चंदनसिंग चंदेल, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, बंडू गौरकर आदी उपस्थित होते.

पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन 5 ऑगस्ट रोजी चंद्रपूरात, लगेच 7 ऑगस्ट रोजी मुंबई येथे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि (शनिवारी )10 ऑगस्ट रोजी पुन्हा चंद्रपूर येथे पीक विमा योजनेचा आढावा घेण्यात आला, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेचा प्रश्न सुटलेला आहे.

पुढे पालकमंत्री म्हणाले, नो रेनफॉल या अटीअंतर्गत 20095 शेतकऱ्यांचे अर्ज होते. हे सर्व अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने म्हटले आहे. तसेच पेरील नॉट कव्हर्ड या अंतर्गत असलेले 6864 अर्ज, लेट इंटिमेशन (सुचना वेळेवर न देणे) अंतर्गतचे 7959 अर्ज, क्लेम स्क्रुटीनी अंतर्गत 4811 अर्ज व इतर त्रृटी असलेले असे साधारणत: 37 हजारांच्या वर अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने कबूल केले आहे. याशिवाय 4668 डुप्लीकेट अर्जांची पुन्हा पडताळणी करून स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये मान्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. क्रॉप मिसमॅचचे 1762 अर्जांची कृषी विभाग आणि विमा कंपनी पुन्हा नव्याने पडताळणी करणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. सादरीकरण जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार यांनी केले.

प्रशासनाची ही तत्परता

प्रधानमंत्री पीक विमा योजना या संवेदनशील विषयावर जिल्हाधिकारी विनय गौडा, तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाची अतिशय तत्परता जाणवली. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करून संबंधित विभागाचा आढावा घेतला आणि सुचना केल्या. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केल्याबद्दल पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

जिल्ह्यात प्रथमच पीक विम्यासाठी ऐवढी मोठी रक्कम

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे एकूण 202 कोटी 76 लाख 23 हजार 944 रुपयांचे क्लेम आहेत. यात 1 लाख 51 हजार 352 शेतकऱ्यांचा समावेश असून यापैकी 86,657 शेतकऱ्यांना 80 कोटी 66 लाख 34 हजार 910 रुपयांचे विमा रक्कम मिळाली आहे. कंपनीकडून उर्वरीत 63 कोटी रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. शासनाच्या वतीने उर्वरित 59 कोटीची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विम्याचे 3 लक्ष 46 हजार अर्ज

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यापूर्वी केवळ 62 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. मात्र गतवर्षी 1 लक्ष 84 260 शेतकऱ्यांचे 3 लक्ष 41 हजार 233 अर्ज आले. तर यावर्षी आतापर्यंत 1 लक्ष 79 हजार 443 शेतकऱ्यांचे 3 लक्ष 46 हजार 692 अर्ज आले आहेत.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे उर्वरित 46,500 हजार शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीकविम्याचा क्लेम मिळाला नाही . अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या लाभ होणार आहे. उर्वरित 46500 हजार शेतकऱ्यांना आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच साधारण 56 कोटी रुपये मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामूळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दरवर्षी पेक्षा सर्वाधिक पीक विमा रक्कम या वर्षी मिळणार आहे. हे विशेष.

शेतकऱ्यांनी मानले पालकमंत्री यांचे आभार

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व विशेष प्रयत्नाने ही पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

000000

 

ताज्या बातम्या

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...