रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 553

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ८० शैक्षणिक संस्था; ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ देशात तिसरे सर्वोत्कृष्ट विद्यापीठ

नवी दिल्ली, 12: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी  भारतीय मानांकने 2024 अहवाल जारी केला. भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या भारतीय मानांकनाचा अहवाल जारी होण्याचे हे सलग नववे वर्ष आहे.

राजधानीतील भारत मंडपम येथील सभागृहात, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-2024 आज जाहीर करण्यात आली.  शिक्षण, शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण 13 श्रेणींमध्ये  सर्वोत्कृष्ट 80 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली  आहे. विशेष म्हणजे वर्ष 2024 पासून तीन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला असून, यात राज्यांतील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे, सर्वोत्कृष्ट मुक्त विद्यापीठे आणि कौशल्य विद्यापीठांचा समावेश करण्यात आला. यामध्ये पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेला तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान प्राप्त झाला.

या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ सुकांती  मुजुमदार,  युजीसी अध्यक्ष प्रा. एम जगदीश कुमार, ऑल इंडिया कॉउसिंल ऑफ ट्रेनिंग अँड एजुकेशन अध्यक्ष प्रा. टी.जी. सिथाराम, शिक्षण मंत्रालयाचे सचिव के. संजय मूर्थी, सह सचिव गोविंद जयस्वाल यासह सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या  11  संस्था

संस्थात्मक रँकिंगच्या यादीत समग्र संस्थांच्या श्रेणीमध्ये निवडलेल्या देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत तिस-या स्थानावर आहे तर होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई (27), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (37), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे, (42), सिम्बायोसिस इंटरनॅशनल पुणे, (52), रसायनशास्त्र तंत्रज्ञान संस्था, मुंबई (56), डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे(63), दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एडुकेशियन अँड रीसर्च, वर्धा (71), विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (77), एस. व्ही. के. एम. ची नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई(84) तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई (98) क्रमांकावर आहे.

विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 10 विद्यापीठे

देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांचा समावेश आहे. यात क्रमांक निहाय संस्थांचा समावेश – होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई (16), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे (23) सिम्बायोसिस इंटरनॅशनल पुणे (31), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई (35), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा (42), एस. व्ही. के. एम. ची नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई (49), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई (58), मुंबई विद्यापीठ मुंबई (61) तर भारती विद्यापीठ पुणे (78) क्रमांकावर  आहे.

राज्य सार्वजनिक विद्यापीठे (State Public University)

या वर्षापासून सर्व राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचा अवलोकन करण्यात आले असून यात राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला आहे. या सोबतच, मुंबई विद्यापीठ, मुंबई (18), सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे (33) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (46) क्रमांकावर राहिले आहेत.

संशोधन संस्थांच्या रॅकिंग मध्ये राज्यातील 5 संस्था

संशोधन संस्थांच्या रँकिंग मध्ये देशातील 50 संस्थामध्ये महाराष्ट्रातील 5 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये चौथ्या क्रमांकावर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (4) आहे तर, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट बॉम्बे (6), टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (12), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (29) आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (40) व्या स्थानावर आहे.

राज्यातील पाच अभियांत्रिकी संस्थांची रँकिंग

अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील पाच संस्थांचा समावेश आहे. यात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई तिस-या क्रमांकावर, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर (39), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी बॉम्बे (41), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (63) तर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे (77) व्या स्थानावर राहिले आहे.

चार महाविद्यालयांना मिळाली रँकिंग

महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 100 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील चार महाविद्यालयांचा समावेश आहे. यात फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) पुणे (45) क्रमांकावर, सरकारी विज्ञान संस्था, नागपूर (64) व्या क्रमांकावर, सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई (89) तर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (99) वा स्थान प्राप्त केला आहे.

राज्यातील नऊ व्यवस्थापन संस्थांना रँकिंग

देशातील 100  उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील नऊ  संस्थांचा समावेश आहे. यामध्ये

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (6), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (10), सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे (13), एस. व्ही. के. एम. नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई (20), एस.पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई (20), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट नागपूर (31), के.जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसेराच मुंबई (63), प्रिन्स.एल.एन वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था, मुंबई (84) तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, पुणे (91) वा क्रमांक मिळवला आहे.

औषधीय संस्थांमध्ये राज्यातील 16 संस्था

देशातल्या उत्कृष्ट 100 औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 16  संस्थांचा समावेश आहे. पहिल्या 10 औषधीय संस्थांमध्ये मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पाचव्या क्रमांकावर नाव कोरले. एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज- मुंबई या संस्थेने 10 व्या स्थानावर आपले नाव कोरले. यासोबतच, पूना कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे (35), डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च, पुणे (36),  एसव्हीकेएमचे डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई (39), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (51), आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल शिक्षण आणि रिसर्च शिरपूर, (56), श्रीमती. किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर, (61),  कृष्णा विश्व विद्यापीठ कराड, (67), डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे (72), बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई (73), वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, औरंगाबाद (76), भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर (80), पी.ई. सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी पुणे, (96), प्राचार्य के.एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई (97) तर एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी पुणे (99) वा क्रमांक मिळवला.

वैद्यकिय महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये तीन महाविद्यालय

वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे (11), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था वर्धा (23) तसेच सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (30) वा स्थान प्राप्त केला आहे. कल्पकता (इनोव्हेशन) संस्था या श्रेणीमध्ये  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या संस्थेने अव्वल क्रमांक मिळवला आहे.

दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये सहा महाविद्यालय

दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सहा महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे पाचव्या क्रमांकावर तर,  शासकीय दंत महाविद्यालय नागपूर (15), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था वर्धा (24), शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई (25), नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज, मुंबई (28) ता भारती विद्यापीठ (मानित) दंत महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे (36) स्थानावर आहे.

कृषी आणि संलग्न क्षेत्रात केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्था, मत्स्यपालन विद्यापीठ, मुंबई या संस्थेने नववा स्थान प्राप्त केला आहे. वास्तुकला आणि नियोजन या श्रेणीमध्ये विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर या संस्थेने दहावा स्थान मिळवला आहे.

राज्यातील तीन विधी महाविद्यालयांची रॅकिंग

देशातील 30 सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे या संस्थेला पाचवा क्रमांक मिळाले असून, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई (31) तर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर या संस्थेला 34 व्या क्रमांकावर आहे.

कौशल्य विद्यापीठ या श्रेणीमध्ये

सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ अव्वल शैक्षणिक वर्ष 2024 पासून तीन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला. यात कौशल्य विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. यात सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ (पूर्वी सिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ पुणे) देशातील पहिली उत्कृष्ट विद्यापीठ ठरली आहे.

००००

 

 

 

राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे (PSP) अपारंपारीक ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेच्या पूर्तीसाठी सामंजस्य करार

मुंबई, दि. १२ :   अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांच्या गुंतवणुकीत भरीव वाढ करण्याच्या वचनबद्धतेस अनुसरुन उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या समारंभात जलसंपदा विभाग व महाजनको, द टाटा पॉवर लि., आवाडा ग्रुप यांच्या दरम्यान उदंचन जलविद्युत प्रकल्पांसदर्भात सामंजस्य करार करण्यात आले. याव्दारे राज्यात  रु. 24631 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून यातून 5630 मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मितीचे उद्दीष्ट असून 10300 एवढी रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात जलसंपदा, महाजनको, द टाटा पॉवर लि. आणि अवाडा  ग्रुप यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की,  सन 2030 पर्यंत राज्याच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या 50 टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जा निर्मितीव्दारे पूर्ण करण्याच्या दूरदर्शी योजनेची रूपरेषा तयार झाली असून हा उपक्रम महाराष्ट्राच्या ऊर्जा निर्मिती धोरणाचा मुख्य आधारस्तंभ  आहे.  याव्दारे वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्तता तसेच शाश्वत आणि हरित उर्जा निर्मितीव्दारे राज्याच्या ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी  हे महत्वाचे पाऊल  असल्याचेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, “नूतनीकरणक्षम ऊर्जा हा केवळ एक पर्याय नसून तो आपल्या भावी आर्थिक स्थिरतेचा एक मूलभूत आधारस्तंभ आहे. द टाटा पॉवर व आवाडा ग्रुपची वचनबद्धता प्रशंसनीय आहे. या धोरणात्मक भागीदारांच्या सहयोगी प्रयत्नांमुळे, महाराष्ट्राला हरित ऊर्जेमध्ये अग्रेसर बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. अपारंपारीक ऊर्जा स्त्रोतांद्वारे पायाभूत सुविधा वाढवण्याची राज्याची वचनबद्धता शाश्वत विकास आणि आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी राज्याचा सक्रिय दृष्टीकोन या करारामध्ये प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

000

संजय ओरके/विसंअ

स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक

मुंबई, दि. 12 : मुंबई हे राजधानीबरोबरच जागतिक दर्जाचे शहर आहे. शहरातील नागरिकांच्या हिताची विविध विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करुन संबंधित सर्व यंत्रणांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेत बोलले जावे, अशी आग्रही सूचना त्यांनी यावेळी केली.

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची 2024-25 मधील कामांची आढावा बैठक पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील सभागृहात झाली. या बैठकीस खासदार अनिल देसाई, आमदार सर्वश्री सचिन अहिर, सदा सरवणकर, श्रीमती यामिनी जाधव, अमिन पटेल, अजय चौधरी, कालिदास कोळंबकर, सुनील शिंदे, कॅप्टन आर.तमिल सेल्वन यांच्यासह जिल्हा नियोजन समिती सदस्य, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर तसेच संबंधित सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, सन 2023-24 च्या 365 कोटी रुपयांच्या तुलनेत 2024-25 मध्ये 490 कोटी इतका भरीव निधी अर्थसंकल्पित झाला आहे. यामध्ये पोलीस वसाहतींची दुरुस्ती, रुग्णालयांमधील औषधे, यंत्रसामग्री आणि बांधकाम, शासकीय महाविद्यालयांचा विकास, शासकीय कार्यालयीन इमारतींची दुरुस्ती, कामगार कल्याण, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा, झोपडपट्टीवासियांचे स्थलांतर आणि पुनर्वसन आदी बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. याबरोबरच बीडीडी चाळींतील वॉटरप्रुफींग, म्हाडाच्या संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा, जुन्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रुग्णालयांमध्ये डायलेसिसची सुविधा वाढविणे आदी कामे करण्यावरही भर दिला जाणार आहे. येत्या वर्षात होणाऱ्या निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेचा कालावधी विचारात घेता तातडीने निविदा प्रक्रिया राबवून ही कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सागरी किनारा मार्गासंदर्भात उपस्थित मुद्यांवर माहिती देताना महानगरपालिका आयुक्त श्री.गगराणी यांनी हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सुरू असल्याचे यावेळी सांगितले. पुढील महिन्यात हा मार्ग वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्याचा प्रयत्न असून या मार्गाचा वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीत मुंबई जिल्ह्याच्या सन 2023-24 अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विविध कामांचा अनुपालन अहवाल सादर करुन त्यास मान्यता घेण्यात आली.  याबाबतचे सादरीकरण करुन या वर्षात 100 टक्के निधी खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या मांडून सूचना केल्या. त्यांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना पालकमंत्री श्री.केसरकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना केली.

00000

 

मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

उच्च शिक्षण विभागाकडून मदतीसाठी पोर्टलचीही सुविधा

मुंबई,दि. १२ :   नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी  उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा  कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे.  या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास  त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व हेल्प डेस्क सुरू केला आहे. ही हेल्पलाईन 0796134440, 07969134441 या क्रमांकावर आणि  helpdesk.maharashtracet.org यावर संपर्क करावा, ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत कार्यरत आहे. या हेल्पलाईनचा उपयोग करावा,  असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या योजनेसाठी  https://mahadbt.maharashtra.gov. in  पोर्टलवर  ऑनलाईन अर्ज  करू शकतात.  राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने/सार्वजनिक विद्यापिठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना  वार्षिक शैक्षणिक व परीक्षा शुल्क या योजनेद्वारे 100 टक्के मोफत करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष सन 2024-25 व त्यापूर्वी ज्या मुलींनी प्रवेश घेतलेला आहे, सध्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलींना अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थीनींनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्यांना भरण्यात आलेले पैसे परत करण्यात येणार आहेत.  त्यासाठी पात्र मुलींना रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे.

या योजनेचा अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य/नोडल अधिकारी, विभागीय सहसंचालक कार्यालयातील नोडल अधिकारी किंवा महाआयटीच्या पोर्टलवरील  Grieviance Section मध्ये नोंद करावी. या योजनेची माहिती महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in , उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ  https://dhepune.gov.in , तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ   https://www.dtemaharashtra.gov.in, कला संचालनालयाचे  https://doa.maharashtra.gov.in  या सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

मंजूर शिष्यवृत्ती सत्र निहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थीनी पात्र असणार आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

 

000

नवभारत वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक विनोद माहेश्वरी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई, दि. 12 :- “नवभारत वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक विनोद माहेश्वरी यांचे निधन ही महाराष्ट्राच्या वृत्तपत्र, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने निर्भीड, निष्पक्ष, लोकाभिमुख पत्रकारितेचा आदर्श हरपला आहे. त्यांचे वडील महान स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय रामगोपाल माहेश्वरी यांनी सुरू केलेल्या नवभारत वृत्तपत्राला प्रतिष्ठा, लोकप्रियता,  विश्वासार्हता मिळवून दिली. वडिलांकडून मिळालेला देशभक्तीच्या विचारांचा वारसा सन्माननीय विनोदबाबूंनी यशस्वीपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या, देशाच्या वृत्तपत्र चळवळीला नवी दिशा आणि उंची प्राप्त करून देण्याचे काम त्यांनी केले. विनोदबाबू माहेश्वरी यांच्या कुटुंबीयांच्या, नवभारत वृत्तपत्रसमूह परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मी स्वर्गीय विनोदबाबूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनोदबाबू माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

—००००—-

शेतीला सौर ऊर्जा, शेतकऱ्यांमध्ये चैतन्य…

देशातील ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे 22 टक्के वापर होतो. महाराष्ट्रात सुमारे 45 लाख कृषी वीज ग्राहक असून ते वीजेचा वापर हा मुख्यत: कृषी पंपासाठी करतात. शेतकऱ्यांना पूर्वी चक्रीय पद्धतीने दिवसा आणि रात्री वीजपुरवठा केला जात होता. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात सिंचन करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत असे. यावर उपाय म्हणून शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ 14 जून 2017 साली सुरू केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी या योजनेत आवश्कतेनुरूप बदलही करण्यात आले. तथापि, या योजनेच्या अंमलबजावणीचा अनुभव व आव्हाने पाहता या योजनेची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्याची आवश्यकता निर्माण झाली.

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’चे सुधारित स्वरूप निश्चित करण्यासाठी महानिर्मिती, महावितरण व महापारेषण कंपनी, महाऊर्जा तसेच पीडब्ल्यूसी संस्था यांच्या प्रतिनिधींचा एक अभ्यासगट प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला. या  अभ्यासगटाने विविध शिफारसी आणि मिशन 2025 संदर्भात प्रयास संस्थेचा अहवाल विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीपंपाना दिवसा वीज पुरवठा करण्यसाठी तसेच कृषी फिडर्सचे सौर ऊर्जीकरण मिशन मोडमध्ये करण्याच्या दृष्टीने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.

या अभियानामध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ अधिक सक्षम आणि सुव्यवस्थित करणे, सन 2025 पर्यंत कृषी वीज वाहिनीचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक कार्यपद्धती आणि देखरेखीचा आराखडा तयार करणे आणि शेतकऱ्यांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा करणे आणि किमान 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणे, ही उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली.

या अभियानांतर्गत विकेंद्रित प्रकल्प आस्थापित करण्यासाठी वीज उपकेंद्रांच्या परिघातील जमिनीची उपलब्धता, ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि प्रकल्पाचे आकारमान हे महत्त्वाचे घटक आहेत. हे घटक परिस्थितीनुरूप बदलत असतात. यासाठी काही तरतुदींचा अवलंब करण्यात आला. जसे 0.5 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करून ते 11 केव्ही/22 केव्ही स्तरावर जोडणे, 5 ते 25 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करून ते 33 केव्ही स्तरावर जोडणे, ग्रीड कनेक्टीव्हिटी उपलब्ध असल्यास उजनी, जायकवाडी व इतर जलाशयांवर व्यवहार्यतेच्या अधीन राहून 10 ते 50 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प 11 केव्ही / 22 केव्ही / 33 केव्ही स्तरावर जोडणे, प्रकल्प समूह  तयार करणे अशा विविध तरतुदींचा अवलंब करण्यात आला.

या अभियानासाठी पडीक जमिनीची आवश्यकता असल्याने ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी  संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी वीज उपकेंद्रापासून जवळच्या परिघातील खाजगी जागा निश्चित करून सौर ऊर्जा प्रकल्पास उभारण्यास द्यावी, असे ठरविण्यात आले. यासाठी प्रकल्पासाठी शासकीय जमिनी नाममात्र रूपये एक या दराने 30 वर्षाच्या कालावधीकरिता भाडेपट्याने आणि पोटभाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत खाजगी जमीन भाडेपट्ट्यावर घेताना त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या 6 टक्के दरानुसार परिगणीत केलेला दर किंवा प्रतिवर्ष 1 लाख 25 हजार रूपये प्रती हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम पायाभूत वार्षिक भाडेपट्टा दर म्हणून गृहीत धरण्यात आला. अशा प्रकारे प्रथम वर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टा दरावर प्रत्येक वर्षी 3 टक्के सरळ पद्धतीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत प्रकल्पाची क्षमता कमी असल्यामुळे प्रकल्प आस्थापनेचा खर्च वाढतो व प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता कमी असते. तरीही कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याची गरज लक्षात घेता अशा प्रकल्पांना चालना देण्यासाठी विकासकांना प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य देण्याचे ठरले. तसेच या अभियानात भाग घेणाऱ्या विकासकांना नाबार्ड, इरेडा, सार्वजनिक बँकाकडून माफक दराने प्रकल्प निधी मिळण्यासाठी शासनाने आवश्यक ती मदत केली.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान असल्याने नोडल एजन्सी, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, स्वतंत्र यंत्रणा, महाऊर्जा, प्रकल्प विकासक, स्थानिक प्रशासन, शेतकरी यांचे एकत्रित प्रयत्न झाले. यासाठी उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. अभियानाची यशस्वी व जलदगतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली.

या अभियानाचा फायदे पाहता, या अभियानामुळे औद्योगिक व व्यावसायिक वीज ग्राहकांवर आकारण्यात येणारी क्रॉस सबसिडी कमी होऊन औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांच्या वीज दरात कपात, राज्याच्या विविध जिल्ह्यात मोठी गुंतवणूक आणि ग्रामीण भागात पूर्णवेळ आणि अर्धवेळ रोजगार निर्मिती होत आहे. महावितरण व महापारेषण कंपनीची वितरण प्रणाली सुद्धा बळकट झाली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना योग्य त्या भाराने वीज पुरवठा होण्यास मदत झाली. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाडेपट्ट्याने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना 25 वर्षाच्या कालावधीकरिता शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आणि राहणीमानाचा दर्जा व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली. त्याचबरोबर सामाजिक फायदा सुद्धा झाला आहे.

संजय डी.ओरके

विभागीय संपर्क अधिकारी (ऊर्जा)

000

मुख्यमंत्री महिला सबलीकरण अभियान : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी

जळगाव दि. 12 ( जिमाका )  – संपूर्ण राज्यात महिलांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांसाठी एस टी प्रवासात सवलत आणि आता मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना, यामुळे महिलांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यासर्व योजनाच्या बाबतीत बहिणींशी सुसंवाद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार हे सर्वजण उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी 2.30 वाजता  सागर पार्कवर होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

सागर पार्कवर होणार असलेल्या कार्यक्रमाची तयारी सुरु असून त्याची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला जवळपास 40 हजार  बहिणीसह इतर जिल्ह्यातील लोकं, सरपंच उपस्थित राहतील. त्या दृष्टीने तयार करण्यात आल्याची माहिती दिली. शहरात विविध तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात दत्त मंदिर ते सिंध कॉलनी रोड, डी मार्ट ते काव्य रत्नावली चौक, खान्देश मॉल पार्किंग, जी. एस. मैदान,    …. अशा पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम स्थळी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेऊया, चला धार्मिक स्थळे पाहूया !

विविधतेने नटेलेला असा आपला भारत देश आहे. भारतात तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये भाविकांनी गजबजलेली प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे पाहायला मिळतात. राज्यासह देशात असे असंख्य ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्यांचे या तीर्थक्षेत्रांना आयुष्यात एकदा तरी भेट देता यावी असे स्वप्न असते. पण अनेकदा गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे तसेच कुणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशा माहितीच्या अभावाने तिथे जाता येत नाही. परंतु आता अशा ज्येष्ठ नागरिकांना काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. काही ज्येष्ठ नागरिक आर्थिक, शारीरिक परिस्थितीमुळे त्यांची तीर्थक्षेत्रांना जाण्याची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘ महाराष्ट्रातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्ष व त्यावरील नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरू केली आहे.

हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मीयांची मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना”  या योजनेमध्ये भारतातील एकूण 73 व  महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

योजना सुरू करण्यामागचा मानस

राज्यातील सर्व धर्मातील सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाण्याची इच्छा पूर्ण व्हावी. यासाठी त्यांना राज्यातील आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे.

योजनेत कोणत्या स्थळांचा समावेश

या योजनेमध्ये भारतातील एकूण 73 व  महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील सिद्धीविनायक, चैत्यभूमी, माउंट मेरी चर्च;आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही समावेश आहे.तीर्थक्षेत्रांमध्ये वैष्णोदेवी मंदीर, अमरनाथ गुहा, अमृतसरमधील सुवर्ण मंदीर, अयोध्येतील श्रीराम मंदीर, वेरावळमधील सोमनाथ मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश होतो. याशिवाय तामिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, झारखंड, आंध्रप्रदेश, आसाम, ओरीसा, झारखंड, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, जम्मू आणि काश्मिर आणि कर्नाटक या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतील 15 धार्मिक स्थळंही या यादीत आहेत. या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा केवळ एक वेळच लाभ घेता येईल.

या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतकी असेल. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवासाची सोय इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल.

योजनेसाठी आवश्यक पात्रता

लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

वय वर्ष 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक तसेच

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

योजनसाठी अपात्र कोण ठरणार?

कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा. कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. दरम्यान, अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र ठरतील. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नसावेत. कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नसावेत. चारचाकी वाहनं (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे. प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगानं ग्रस्त नसावे, जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोना, थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी. अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे) जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही

0000

मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची गुणवत्तावाढ करुन नावलौकिक वाढवावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि. 12 ( जिमाका ) – प्रत्येक शिक्षकाने नव्या तंत्रज्ञानासह अद्ययावत राहून स्वत:मध्ये तसे बदल करून घेणे गरजेचे आहे.मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा निर्माण करून शाळेचा नावलौकिक वाढवावा. यशस्वी शाळांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा ’ स्पर्धेमुळे समाजाचा शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते  सेंट टेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल येथे पंचायत समिती, जळगाव आयोजित “मुख्यमंत्री, माझी शाळ – सुंदर शाळा” पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.

‘डायट’चे प्राचार्य  अनिल झोपे यांनी सांगितले की, कुठल्याही व्यवस्थेच्या कामगिरीसाठी क्षमता आणि बांधिलकी या दोन गोष्टी शिक्षकांमध्ये असणे महत्त्वाचे आहे तर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान टप्पा क्रमांक दोन मध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवावे तसेच शाळांनी कशा पद्धतीने तयारी करावी या विषयाचे मार्गदर्शन केंद्रप्रमुख सुशील पवार यांनी केले.

सुरुवातीला “मुख्यमंत्री, माझी शाळा – सुंदर शाळा” या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण विभाग तर्फे सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूल जळगाव येथे आयोजित  मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान टप्पा क्रमांक एकचे तालुकास्तरीय पारितोषिक वितरण तसेच समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले. या प्रसंगी  डायट प्राचार्य अनिल झोपे, गटशिक्षणाधिकारी सरला विजय पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी  खलील शेख, जितेंद्र चिंचोले, मनोज पाटील,  ज्ञानेश्वर सोनवणे, नरेंद्र सपकाळे, सचिन पवार, मिलिंद बागुल, कादर कच्ची, सिस्टर जुलीएट, जितेंद्र पाटील यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सौ. सरला पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खलील शेख यांनी केले.  सूत्रसंचालन अनिता चौधरी आणि नाझिया काझी  यांनी केले.

…यांना मिळाले बक्षिस

सदर कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत तालुकास्तरीय पारितोषिक वितरण सोहळा साजरा करण्यात आला. त्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्य शाळा या श्रेणीतून  प्रथम क्र. – ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन जळगाव शह,र मनपा उर्दू शाळा क्रमांक 11 सुप्रीम कॉलनी , द्वितीय क्रमांक- जि. प. प्राथमीक शाळा सावखेडा खु।।, तृतीय क्रमांक जि. प. प्राथमीक शाळा शिरसोली प्र. बो. या शाळेला मिळाला त्याचप्रमाणे इतर व्यवस्थापनाच्या शाळा या श्रेणी अंतर्गत प्रथम क्रमांक- सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूल जळगाव द्वितीय क्रमांक- माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसुंबा खुर्द तर तृतीय क्रमांक- एस एस. पी. डी. माध्यमिक  व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद या विद्यालयाला मिळाला आहे. या कार्यक्रमांमध्ये समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेयर तसेच कर्णयंत्र इत्यादी साहित्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना ‘कवी नर्मद साहित्य पुरस्कार’ जाहीर

मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्यावतीने  देण्यात येणारा सन 2023-24 या वर्षीसाठीचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना जाहीर करण्यात आला आहे, तसेच कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ईश्वरलाल परमार यांना झाला आहे. रोख 51 हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 24 ऑगस्ट 2024 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान समारंभ होणार असल्याची माहिती अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव स. व. निंबाळकर यांनी दिली आहे. या पुरस्कार निवडीबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. भांड आणि श्री. परमार यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी कडून दरवर्षी कवी नर्मद यांचे नावे दोन सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतात. या दोन पुरस्कारापैकी एक पुरस्कार ज्येष्ठ मराठी साहित्यिकांना तर दुसरा पुरस्कार जेष्ठ गुजराती साहित्यिकांना प्रदान करण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी श्री. भांड आणि श्री. परमार यांची निवड करण्यात आली आहे. 24 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे या पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्री. बाबा भांड यांचे मराठी साहित्य क्षेत्रात भरीव असे योगदान आहे. त्यांच्या 9 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह, 4 प्रवासवर्णने, 6 ललीत गंध, 5 जीवनवृत्त, 5 अनुवाद, 25 संपादन, 16 बाल कादंबऱ्या, 25 बाल कथासंग्रह, 3 एकांकिका इत्यादी विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहेत. सन 2015 ते 2018 या कालावधीत ते मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या दशक्रिया या कांदबरी वर आधारित चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.

यापूर्वी कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कविवर्य मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ साहित्यिक शंकर वैद्य, कवी ना.धों. महानोर, विजया राजाध्यक्ष, रत्नाकर मतकरी, सुरेश खरे, मारुती चितमपल्ली, आशा बगे, राजेंद्र बनहट्टी यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती श्री. निंबाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...