रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 552

स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम

मुंबई, दि. १३ – भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय येथे ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम आज सकाळी घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मंत्रालयीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/सं.स

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मंत्रालयात आयोजित बचतगटांच्या प्रदर्शनाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि.१३ :- महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिलांना जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहून महिला व बालविकास मंत्री म्हणून मला आनंद आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या  सक्षम करण्याच्या दृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

प्रदर्शन १४ ऑगस्टपर्यत असून ठाणे, चंद्रपूर, सातारा, सांगली, पुणे, जालना, नाशिक, रायगड, पालघर, कोल्हापूर या दहा जिल्ह्यामधील महिला बचत गटांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.

या प्रदर्शनात महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेले हस्त निर्मित राखी, पर्स, खाद्यपदार्थ, वारली पेंटिंग कोल्हापूरी चप्पल, घरगुती सरबत, तोरण, फुलांच्या माळा, बांबूपासून आकर्षित शोभेच्या वस्तू इत्यादी उत्पादीत वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

महाराष्ट्रातील ‘अहिल्याभवन’ संपूर्ण देशात आदर्श ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१३ : कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले ‘अहिल्याभवन’ मानखुर्द येथे उभारले जाणार असल्याची घोषणा आज केली. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या अहिल्याभवनासाठी ४७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच ३५,५०० स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले जाणारे आहे. या अहिल्याभवनामध्ये मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत.

चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने चेंबूर येथील फाईन आर्ट्स सोसायटी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत घोषणा केली.

मंत्री श्री लोढा म्हणाले की, “आज  भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन उभारले जाणार आहे. महिला आणि बालकांच्या विकासासाठी शासनाची कटिबद्धता दर्शवणारे हे भवन फक्त राज्यातच नव्हे, तर देशात आदर्श ठरेल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे. त्यांची शिकवण जपण्यासाठी, त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी शासनाचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे कार्य केले जाईल हा विश्वास आहे.

अहिल्याभवन येथे संकटात अडकलेल्या, हिंसाचाराचे बळी ठरलेल्या महिलांना मानसिक व कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुपदेशन केंद्रांच्या योजनेचे अद्ययावत समुपदेशन केंद्र या इमारतीत कार्यरत होईल. याद्वारे पीडित महिलांना आवश्यक ते समुपदेशन करून, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोबतच महिलांना विविध कायदे, योजना व विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी २०० व्यक्तींची क्षमता असलेले अद्ययावत ऑडिटोरियम या संकुलात उभे राहणार आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत हक्काचे विश्रामगृह या संकुलात उभारण्यात येणार आहे. याशिवाय महिला व बालकांच्या विविध विकासात्मक चळवळीसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देखील या विश्रामगृहाचा लाभ घेता येणार आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांचे एकूण २० कार्यालये या इमारतीत असतील. सद्यस्थितीत यातील बहुतांश कार्यालये मुंबईत भाड्याच्या इमारतीत आहेत. महिला आयोगाचे मुंबई विभागीय कार्यालय,बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचे कार्यालय , बालकल्याण समिती : मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या विचारात घेऊन या जिल्ह्यात २ बालकल्याण समिती कार्यालय आहेत. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या बाबतीत या समितीला निर्णय घेण्याचे न्यायिक अधिकार असतात. त्यांचे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेले दोन स्वतंत्र कार्यालये या इमारतीत असतील.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांच्या वाढत्या गुन्ह्यांमधील समावेशाचे प्रमाण लक्षात घेता या जिल्ह्यात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या दोन बालन्याय मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या इमारतीत या दोन्ही बालन्याय मंडळांसाठी अद्ययावत सुसज्ज असे कार्यालये असतील.महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे मुंबई जिल्ह्याचे कार्यालय : बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ यशस्वीपणे राबविणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय या इमारतीत असेल.

०००००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

 

 

 

जिल्ह्यातील प्रत्येक घरावर दिमाखात राष्ट्रध्वज फडकवा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

ध्वजारोहण करून ‘हर घर तिरंगा’ अभियानाला प्रारंभ

चंद्रपूर, दि. 13 : जिल्ह्यातील प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियान चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी करावे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे होणार आहे. या निमित्ताने मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील निवासस्थानी ध्वजारोहण केले आणि अभियानाचा शुभारंभ केला.

ध्वजारोहणानंतर श्री. मुनगंटीवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा… हर मन तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे देशवासियांना आवाहन केले आहे. ‘देशभक्ती ना हो क्षणिक उबाल… मन में पले वह पूरे साल’ अशी त्यामागची भावना आहे. 15 ऑगस्ट 1947 ला देशाच्या स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करताना विकासात योगदान द्यायचे आहे, असा संकल्प प्रत्येकाने करावा.’

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात अभियान सुरू झाले आहे. तिरंगा यात्रा मनामनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. तिरंगा आपल्यासाठी प्राणप्रिय आहे. देशाची शान आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

तिरंगा ध्वज हा केवळ चौकोनी कापडाचा तुकडा नाही. भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. लाखो शहिदांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर हा तिरंगा ध्वज हाती आला आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी हसत हसत देशासाठी आपले प्राण अर्पण केले. स्वतः च्या परिवारापेक्षा माझा देश म्हणजेच माझा परिवार या भावनेने त्यांनी आपले आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले. अशा वीर शहिदांचे स्मरण करूया, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

राज्यपालांची छेडानगर सुब्रमण्यम समाज मंदिराला भेट

चंडी महायज्ञात दिली पूर्णाहुती; पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांचे संबोधन

मुंबई, दि. 13 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी छेडानगर,चेंबूर, मुंबई येथील दक्षिण भारतीयांच्या जुन्या श्री सुब्रह्मण्य समाज मंदिराला काल (दि. 12) भेट दिली.

अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सुब्रह्मण्य समाजाच्या श्री मुरुगन (कार्तिक स्वामी) मंदिरात चंडी महायज्ञ, लक्ष्मीनारायण हृदय पारायण तसेच संपूर्ण चतुर्वेद पारायणाचे समापन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाले.

भारतात लोककल्याणासाठी आणि शांततेसाठी वेळोवेळी महायज्ञ व अनुष्ठानाचे आयोजन होत आले आहे. त्यामुळे देशात शांती व सौहार्द निर्माण होऊन देश सुजलाम सुफलाम राहण्यास मदत झाली आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी सुब्रह्मण्य समाज मंदिरात वल्ली – देवसेना सहित श्री सुब्रह्मण्य स्वामी, महागणपती, अय्यप्पन, गुरुवायुरप्पन, दुर्गा देवी, शिव पार्वती आणि नवग्रहांचे दर्शन घेतले तसेच चंडी महायज्ञात पूर्णाहुती दिली.

महाराष्ट्र ही  संतांची तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. कांची कामकोटी पिठाचे महास्वामी शंकराचार्य तसेच जयेंद्र स्वामी यांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम राहिले आहे असे पिठाचे विद्यमान पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांनी दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करताना सांगितले.

छेडानगर येथील मंदिरात आजवर चारवेळा पूर्ण कुंभाभिषेक झाल्यामुळे हे मंदिर विशेष महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सुब्रमण्यम समाजाचे सचिव पी. सुब्रमण्यम, डी. विजया भानू गणपतीगल, श्रुती स्मृती सेवा ट्रस्ट व श्री सुब्रह्मण्य समाजाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor visits Subramanya Samaj Mandir on its Platinum Jubilee; Kanchi Seer Vijayendra Saraswati blesses people

 

Mumbai Dated 13 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan visits Subramanya Samaj Mandir on its Platinum Jubilee; Kanchi Seer Vijayendra Saraswati blesses people

Maharashtra Governor C.P. Radhakrishnan visited the Subramanya Samaj’s Lord Murugan (Kartik Swami) temple at Chhedanagar, Chembur in Mumbai on the occasion of the 120th day of the Chandi Maha Yagyam on Mon (12 Aug)

The temple, which is one of the biggest and oldest Lord Murugan temples in Mumbai is celebrating its Platinum Jubilee this year.

The Governor had the darshan of Valli Devasena Sameth Sri Subramania Swamy, Shiva Parvathi, Nataraja, Maha Ganapathi, Dharmasanstha Ayyapa, Guruvayurappan, Durga Devi and the Navagrahas.

The Governor offered Purnahuthi at the Chandi Maha Yagyam and interacted with devotees assembled on the occasion.

The Peethadhipati of Kanchi Kamakoti Peetam Vijayendra Swamy addressed the meeting through online mode.

Along with the Chandi Maha Yagyam, the temple also organised Lakshmi Narayana Hridaya Stotram and Sampoorna Chaturveda Paranayam to commemorate the occasion.

The Secretary of Sri Subramania Samaj P. Subramanian, D. Vijaya Banu Ganapadigal, Vice President of Sri Subramania Samaj Ramnath S, Chairman of Shruti Smruti Seva Trust and devotees were present.

0000

बचावकार्यासाठी अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १९५० कामांना मंजुरी; मंत्रालयातील राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र अद्ययावत करणार

मुंबई, दि. १३ : नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना असणाऱ्या २,७६६ कोटी रुपयांच्या १९५० विविध कामांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी दिली. दरड प्रतिबंधक, वीज कोसळण्यापासून प्रतिबंध, पूर संरक्षण भिंत, लहान पुलांचे काम, नाला खोलीकरण दुष्काळ निवारणासाठी भूजल पुनर्भरण, तलाव दुरुस्ती, वनीकरण आदी कामांचा समावेश आहे. मंत्रालयातील राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र अद्ययावत करण्याचा देखील निर्णय यावेळी घेण्यात आला.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी यावेळी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याने ही आपत्ती प्रतिबंधक उपाययोजनेची कामे वेळेत आणि गुणवत्ता पूर्ण पद्धतीने करा. आपत्तीमध्ये बचावकार्यासाठी उपयुक्त ठरतील असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेली साधनसामुग्री घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

मंत्रालयातील राज्य आपत्कालिन प्रतिसाद केंद्राचे अद्ययावतीकरण करताना अत्याधुनिक साधन सामुग्रींचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हाधिकारी यांना या केंद्राची कनेक्टीव्हीटी देखील दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आपत्कालिन प्रतिसाद केंद्राचे देखील अद्ययावतीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी राज्य भुस्खलन व्यवस्थापन आराखडा, ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन आराखडा, महाराष्ट्र राज्य उष्मलाट कृती आराखडा या आपत्ती विषयक आराखड्यांना तसेच पालघर-वसई भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाला मंजुरी देण्यात आली.

००००

मंत्रिमंडळ निर्णय

विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार १४९ कोटीस मान्यता

विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्प्पा-२ राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासाठी  १४९ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.  प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी ४२ लाख इतकी असून यापैकी १७९ कोटी १६ लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकांचा आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायांचा समावेश असून यामध्ये दुग्ध व्यवसायाचा देखील वाटा आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प २०२६-२७ पर्यंत राबविण्यात येईल.  यापूर्वी २०१६ मध्ये हा प्रकल्प विदर्भ मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला होता. या प्रकल्पात गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची व्यवस्था तसेच भ्रृण प्रत्यारोपण करून दुधाळ जनावरांची संख्या वाढविणे, शेतकऱ्यांना वैरण विकास कार्यक्रम, संतुलित आहार आणि दर्जेदार चारा पुरवठा करणे, पशु आरोग्य सुविधा पुरविणे, उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींचे वाटप करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून रोजगार निर्मिती देखील करणे अशी उद्दिष्टे आहेत.

या ३ वर्षांच्या कालावधीत या १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ गाई आणि म्हशींचे वाटप करण्यात येईल. या प्रकल्पाचे मुख्यालय नागपूर येथे राहील. तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी याची अंमलबजावणी करतील.

—–०—–

डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना

डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र  विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या तीनही संस्था शासनाच्या अधिपत्याखालील अभिमत विद्यापीठे आहेत. त्यामुळे शासनाच्या अनुदानित महाविद्यालयांना लागू असलेली वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना त्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील

यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

२७ अश्वशक्तीपेक्षा जास्त पंरतु २०१ अश्वशक्तीपेक्षा कमी अशा यंत्रमागांना प्रती युनिट ७५ पैसे तसेच २७ अश्वशक्तीपेक्षा कमी भाराच्या यंत्रमागांना प्रती युनिट एक रुपया अतिरिक्त वीज दर सवलत लागू करताना असलेली नोंदणीची अट शिथिल करण्यात येईल. विविध लोकप्रतिनिधी तसेच वस्त्रोद्योग संघटना व यंत्रमाग घटकांना ही अट रद्द करण्याबाबत निवेदने दिली होती.

—–०—–

सेवानिवृत्त चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार प्राध्यापकांना ठोक मानधन

शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांना करार पद्धतीने मानधन देण्यात येते.  जास्तीत जास्त प्रमाणात प्राध्यापक उपलब्ध व्हावेत तसेच विद्यार्थी आणि रुग्णांना त्याचा लाभ व्हावा म्हणून एक विशेष बाब म्हणून सेवानिवृत्त अध्यापकांना एकठोक रकमी मानधन देण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार आता उर्वरित महाराष्ट्रासाठी प्राध्यापकांना एक लाख 85 हजार आणि सहयोगी प्राध्यापकांना एक लाख 70 हजार  तसेच दूरस्थ क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी प्राध्यापकांना दोन लाख आणि सहयोगी प्राध्यापकांना एक लाख 85 हजार मानधन देण्यात येईल.

—–०—–

सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण;

सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता

सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेत राज्यातील सहा हजार किमी रस्ते डांबरीकरण करण्यात येणार होते मात्र त्याऐवजी या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित ३६ हजार ९६४ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

डांबरीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या मान्यतेनुसार २८ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या नव्या निर्णयामुळे सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेत शासनाच्या सहभागाची रक्कम २५८९ कोटी इतकी वाढली असून एकूण शासन सहभागाची रक्कम ११ हजार ८९ कोटीस मान्यता देण्यात आली.  महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या सहभागाची रक्कम ५८७५ कोटी इतकी वाढली आहे.  हे सहा हजार कि.मी.चे रस्ते महामंडळाला १७.५ वर्षे कालावधीसाठी हस्तांतरीत करण्यात येतील.

—–०—–

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना लाभ

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ लाखो नागरिकांना होणार असून ६० वर्षांपासूनची मागणी निकाली निघणार आहे.

या अनुषंगाने हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम १९५४ आणि हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम १९५२ मध्ये सुधारणा करण्यात येतील. मराठवाड्यातील मदतमाश जमीनीच्या (केलेल्या कामगिरीसाठी इनाम दिलेल्या जमिनी) अकृषिक प्रयोजनाकरिता वर्ग 1 मधील रुपांतरणासाठी नजराण्याची रक्कम चालू बाजारमूल्याच्या 50 टक्के ऐवजी पाच टक्के इतकी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे या समितीच्या शिफारशीनुसार हैद्राबाद अतियात अनुदान चौकशी अधिनियम, 1952  च्या कलम सहामध्ये दुरुस्ती करुन काही प्रमाणात जमीनी हस्तांतरण योग्य करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला.

मराठवाडा विभागाच्या आठही जिल्ह्यात ४२ हजार ७१०.३१ हेक्टर जमीन ही अतियात अनुदान किंवा खिदमतमाश इनाम जमिनी (देवस्थानाच्या देखभालीसाठी दिलेल्या जमिनी) आहेत. तसेच १३ हजार ८०३.१३ हेक्टर जमीन ही मदतमाश इनाम जमीन आहेत.

मराठवाडा विभागातील मदतमाश इनाम जमिनींना हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम १९५४ मधील तरतूदी लागू होतात. मराठवाड्यातील आठ जिल्‍ह्यांमध्‍ये हैद्राबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्‍याबाबत अधिनियम, १९५४ चे कलम ६(१) च्‍या तरतूदीनुसार दि.०९.०७.१९६० चे शासन परिपत्रकानुसार तत्‍कालीन परिस्थितीमध्‍ये  दि.०१.07.१९६० रोजी इनामदार यांच्‍याकडील जमीनी खालसा (Abolition) करुन शासनाकडे निहित करण्‍यात आल्‍या. त्यानंतर सक्षम अधिकारी यांच्‍या पूर्वपरवानगीशिवाय हस्‍तांतरण व विभाजन करण्‍यास प्रतिबंध ठेवून नवीन अविभाज्‍य भोगवटादार दोन च्‍या शर्तीवर इनामदार, काबीज-ए-कदीम, कायम कुळ व साधे कुळ यांचेकडून जमीनीचे तत्‍कालीन परिस्थितीत नजराणा/भोगवटा मुल्‍य घेवून पुनःप्रदान (Regrant) करण्‍यात आले आहे.

मराठवाडा विभागातील मदतमाश इनाम जमिनींच्या हस्तांतरणावर हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम १९५४ चे कलम ६ (३) अन्वये निर्बंध होते. मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी धारण केलेल्या इनाम जमिनींचे बेकायदेशीररित्या हस्तांतरणे झालेली आहेत. या जमिनीवरील निर्बंध कमी करण्यासाठी हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम, १९५४ मध्ये सन 2015 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 50 टक्के नजराण्याची रक्कम घेवुन या जमीनी वर्ग-1 करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.  तथापि, त्यानंतरही या इनाम मिळकतीच्या हस्तांतरणासंदर्भात आणखी काही निर्बंध कमी करणे आवश्यक होते.  याबाबत विविध लोकप्रतिनिधी यांचेकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड अविनाश पाठक यांच्या अध्यतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला होता.

तसेच बीड जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनीच्या अनधिकृत हस्तांतरणाबाबत प्राप्त तक्रारींबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी गठीत केलेल्या समितीच्या  अहवालात केलेल्या ‍शिफारशीस अनुसरुन हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम १९५४ च्या कलम 2 (ए) (3) मध्ये नमूद 1 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर अपवादात्मक प्रकरणी उप कलम (1) अन्वये घेण्यात आलेल्या प्रकरणांची कायदेशीर वैधता, नियमितता तपासण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीची मर्यादा वाढविणे आवश्यक होते. त्याचा विचार करुन या अधिनियमाच्या कलम 2 (ए) मधील तरतुदीनुसार जमीनीचा प्रकार ठरविलेल्या प्रकरणांचा अपवादात्मक प्रकरणी फेरविचार करण्यासाठी शासनाच्या मान्यतेने विभागीय आयुक्त यांना पुनर्निक्षणाचे अधिकार प्रदान करण्याकरिता हैदराबाद इनामे आणि रोख अनुदाने  नष्ट करणे अधिनियम, 1954 च्या कलम 2 ए (3) मध्ये सुधारणा करण्याचा मं‍त्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.

—–०—–

नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे

राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येतील. राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२१-२२ मध्ये झाल्या असून त्याचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. तो आता संपत असल्यामुळे हा कालावधी पाच वर्षाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल.

—–०—–

सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार

राज्यातील 390 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या प्रकल्पांच्या खर्चापोटी 1564 कोटी 22 लाख ऐवजी 1494 कोटी 46 लाख किंमतीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार काऊंटरपार्ट फंडींग प्रकल्पाच्या कमीत कमी 30 टक्के असावे म्हणून सुधारित वित्तीय पॅटर्ननुसार कर्जाचे प्रमाण प्रकल्प खर्चाच्या 85 टक्के ऐवजी 70 टक्के ठेवण्यास मान्यता देण्यात आली. केएफ डब्ल्यू कंपनीचे 130 दशलक्ष युरो इतके कर्ज 0.05 टक्के व्याज दराऐवजी 2.84 टक्के प्रती वर्ष या स्थिर व्याजदराने कमाल 12 वर्षात परतफेड करण्यात येईल. हे प्रकल्प यवतमाळ, वाशिम तसेच चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात येत आहेत.

—–०—–

 

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

  • ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर
  • आरती अंकलीकर-टिकेकर, प्रकाश बुद्धीसागर, शुभदा दादरकर यांचाही होणार पुरस्काराने गौरव
  • यावर्षीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही जाहीर
  • सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पुरस्कारार्थींचे अभिनंदन

 मुंबई, दि. १३ : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन  २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही  घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने या पुरस्कारांची शिफारस केली आहे. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सर्व पुरस्कारार्थींचे सास्कृति कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा सन २०२४ च्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार- २०२४ साठी  मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर  यांना जाहीर झाला आहे.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४ चा पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे.  संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन २०२४ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार २०२३ साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली असून, २०२४ साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ मान्यवर कलाकारास या पुरस्काराने गौरविण्यात येते.

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ ची ही घोषणा करण्यात आली आहे.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४ चा नाटक विभागासाठीचा  पुरस्कार  विशाखा सुभेदार,  उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये  डॉ. विकास कशाळकर,  कंठसंगीत प्रकारातील  पुरस्कार सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे. लोककला क्षेत्राचा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर, शाहिरी क्षेत्रातील पुरस्कार शाहिर राजेंद्र कांबळे, नृत्य वर्गवारीत श्रीमती सोनिया परचुरे, चित्रपट क्षेत्रासाठीचा पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना घोषित झाला आहे. तसेच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात नागेश सुर्वे (ऋषीराज), तमाशा वर्गवारीतील  राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास मारुती सावंत, तर आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये  शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गतवर्षीपासून दुप्पट वाढ करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच लक्ष, मानपत्र व मानचिन्ह असे होते; ते आता रूपये १० लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे झाले आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये, मानचिन्ह व मानपत्र होते, तर आता या पुरस्काराचे स्वरूप रुपये तीन लक्ष रोख, मानपत्र व मानचिन्ह असे  झाले आहे.

मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केलेले आहे. या पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून या पुढील काळातील सांस्कृतिक क्षेत्राची सेवा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबत, सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहत असून, भविष्यातही कलाकारांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र अधिकाधिक संपन्न व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सदैव तत्पर असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच हे सर्व पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येतील,  असेही त्यांनी सांगितले.

00000

 

चला.. साजरा करुया.. पर्यावरणपूरक गणेशोत्सव.. !

गणेशोत्सवाची लगबग आता लवकरच सुरु होईल आणि वातावरणात चैतन्य, उत्साह पसरेल.. शासन आणि संबंधित जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. पुरोगामी विचारांचा जिल्हा असणारा कोल्हापूर जिल्हा या उपक्रमात अग्रेसर आहे. आपण सर्वजणही शाडू अथवा मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, कृत्रिम कुंडात मुर्ती विसर्जन, मिरवणूकीत पारंपरिक वाद्यांवर भर, लोककला व शिवकालीन साहसी कलांच्या सादरीकरणातून या कलेला चालना, डॉल्बीचा मर्यादित आवाज ठेवून खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया आणि आपल्या आरोग्याचं आणि पर्यावरणाचं रक्षण करुया.. !

शाडू व मातीच्या गणेश मूर्तींवर भर

सध्या बहुतांश गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवल्या जातात. तसेच या मूर्तींना सजवण्यासाठी हानिकारक ठरणारे रंग वापरले जातात. या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले तरी त्या पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत.  त्यामुळे जल, वायू प्रदुषणात भर पडते. म्हणूनच शाडू अथवा मातीच्या गणेश मूर्ती बसवण्यावर भर देणं गरजेचं आहे.

पारंपरिक वाद्यांचा वापर

विविध भागांतील लोकनृत्य, कलापथक व पारंपरिक वाद्यं ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. कोणत्याही मोठ्या सण समारंभात ढोल, ताशा, हलगी, झांज, लेझीम तसेच तलवारबाजी, दांडपट्टा, मर्दानी खेळ अशा शिवकालीन साहसी कला प्रकारांना चालना देणे आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सव व मिरवणुकीदरम्यानही लोकनृत्य व पारंपरिक वाद्यांच्या सादरीकरणावर भर देणे आवश्यक आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी राज्य शासनाचे प्रयत्न

राज्य शासनाच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देवून गौरवले जाते. मागील वर्षी राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाच्या मंडळाला 5 लाख, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार, तर तृतीय क्रमांकास 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवले होते. तर उर्वरित उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील

जिल्ह्यात सन 2015 पासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून सन 2015 ते 2023 या नऊ वर्षांत या उपक्रमाला येथील नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात जिल्ह्यातील सर्व कुटुंबांनी सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. हा उपक्रम अत्यंत नियोजनद्ध पध्दतीने यशस्वी होण्यासाठी तसेच जिल्ह्यातील नदी, तलाव, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी अशा सार्वजनिक जलस्त्रोतांचे प्रदूषण होवू नये, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी नियोजन केले आहे.

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, पर्यावरण विभागाचे अधिकारी व तज्ज्ञांसमवेत जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या प्रमुखांची बैठक घेऊन जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात व देशात अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनीही सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमासाठी चोख नियोजन केले आहे. या उपक्रमात अधिकाधिक कुटुंबे सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात येत आहे.

गावामध्ये ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करणे, घरगुती गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करताना धातू, संगमरवरी, इतर पर्यायी किंवा मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करणे तसेच घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी किंवा नजिकच्या कृत्रिम तलाव, कुंड अशा कृत्रिम विसर्जनस्थळी करण्याबाबत गावस्तरावर प्रबोधन, गावनिहाय मूर्ती संकलन व विसर्जन, फेर विसर्जनासाठी दिलेल्या मूर्ती मुर्तीकारांकडे परत देण्यासाठी गावस्तरावर यादी करणे, निर्माल्य संकलन, वाहतूक व्यवस्था व त्याचे सुयोग्य व्यवस्थापन याबाबत आशा, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे जिल्हा स्तरावरुन सनियंत्रण करण्यात येणार आहे.

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी मागील वर्षी जिल्ह्यात एकूण 1 हजार 122 जुन्या विहीरी, खणी निश्चित करण्यात आल्या होत्या. तर एकूण 977 काहिली, कृत्रिम तलाव, मोठी भांडी अशी पर्यायी व्यवस्था केली होती. तसेच मुर्ती परत घेण्यासाठी 300 मुर्तीकार होते. निर्माल्य संकलनासाठी 1 हजार 321 ट्रॉली व 188 घंटागाडी ठेवण्यात आल्या होत्या.

सन 2023 मध्ये 4 लाख 67 हजार गणेशमूर्ती संकलित करुन त्या जलस्त्रोतात विसर्जित न करता पर्यायी विसर्जन कुंड तयार करुन श्रद्धापूर्वक विसर्जित केल्या गेल्या. नदी प्रदुषण टाळण्यासाठी नदीमध्ये मूर्ती विसर्जन करणे टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी केले आहे.

फटाक्यांचा अतिरेक टाळूया

फटाक्यांमधील हानिकारक वायू आणि विषारी पदार्थ वातावरणात मिसळले गेल्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होवून आरोग्याला धोका पोहोचू शकतो. यासाठी सर्वच सार्वजनिक सण, समारंभांमध्ये फटाक्यांचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे.

आवाजाची पातळी मर्यादित ठेवूया

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत सन 2023 मधील गणेशोत्सवादरम्यान कोल्हापूर शहरातील 22 ठिकाणच्या आवाजाची मोजमाप चाचणी केली होती. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वच ठिकाणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड) ने घालून दिलेल्या मानांकनापेक्षा जास्त मर्यादा ओलांडण्यात आल्याचे दिसून आले. शैक्षणिक परिसर, रुग्णालये, न्यायालयाच्या आसपासच्या शांतता क्षेत्रातही आवाजाची पातळी प्रमाणापेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचे संशोधनातून आढळून आले.

रहिवासी क्षेत्रात रात्रीच्या वेळी 45 डेसिबलच्या आसपास आवाजाची पातळी असणे आवश्यक असते. मात्र अनंत चतुर्दशी दिवशी झालेल्या मिरवणुकीदरम्यान शहरातील बहुतांशी भागात 76 ते 78 डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. मिरवणूक मार्गावर रात्रीच्या वेळी 102 डेसिबल म्हणजे साधारण दुप्पटीच्या आसपास आवाजाची नोंद झाली असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाच्या विभाग प्रमुख आसावरी जाधव यांनी दिली आहे. आरोग्याच्या हितासाठी सण, समारंभ, मिरवणुकांदरम्यान आवाजाची पातळी मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.

पर्यावरण स्नेही कृतीची गरज

गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात होणारे जलस्त्रोतांचे प्रदूषण आणि गाळाचे प्रमाण अधिक होऊन उद्भवणारा पुराचा धोका, फटाके आणि ध्वनीक्षेपकांनी मर्यादा ओलांडल्यामुळे झालेले हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण हे मानवाला विशेषत: वृद्ध, गर्भवती आणि लहान मुलांना आघात पोहचविणारे आहे. लोकांनी याबाबत सजगपणे बदल स्वीकारुन पर्यावरण स्नेही कृती केली पाहिजे. तरच पर्यावरण टिकून राहण्यास मदत होईल, असे आवाहन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी केले आहे.

चांगल्या आरोग्यासाठी खबरदारी घेवूया

सर्वसाधारणपणे आपण 50 डेसिबलपर्यंतचा आवाज अर्ध्या ते एक तासापर्यंत सहन करु शकतो त्याहून अधिक आवाज अर्ध्या तासापेक्षा जास्त ऐकावा लागला तर डोके दुखणे, डोके जड येणे अशा स्वरुपाचा त्रास होऊ शकतो. तर त्याहून जास्त पातळीचा आवाज तीन मिनिटांहून अधिक काळ सलग ऐकावा लागला तर कोणत्याही व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. तसेच शरीराचे ब्लड सर्क्युलेशन गतीने होते. यामुळे उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर) जडतो. त्याचबरोबर ब्लड प्रेशर मध्ये चढ-उतार होऊन हृदय, मेंदू व शरीराच्या कोणत्याही भागाला इजा पोहोचू शकते. 130 हुन अधिक डेसिबल आवाजामुळे कान, डोके सुन्न होणे, चक्कर येऊन शुद्ध हरपून जाणे मेंदूत रक्तस्त्राव (ब्रेन हॅमरेज) होऊ होवू शकतो. तसेच कानाचे पडदे फाटून कायमस्वरूपी बहिरत्व येऊ शकते. हृदयात धडधड, हार्ट फेल्युअर कायमचा हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो.

सर्वसाधारणपणे 70 डेसिबल होऊन अधिक आवाजाच्या पातळीतील डॉल्बी स्टेरिओचा आवाज धोकादायक ठरु शकतो. त्यातही बंद सभागृहातील स्पीकर्स डॉल्बी साउंड अधिक धोकादायक ठरतात. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा रात्रीच्या शांत वातावरणात 70 हून अधिक डेसिबल आवाज अत्यंत हानिकारक ठरु शकतो. लहान बालके, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, हृदय रुग्ण, पॅरालिसीसचे रुग्ण व मनोरुग्णांना 60 डेसिबलहून अधिक आवाजाची पातळी धोकादायक ठरण्याबरोबरच आजार वाढवणारी ठरु शकते. गरोदर मातांच्या पोटातील बाळाच्या अवयवांना धोका पोहोचून वाढीवर परिणाम होऊ शकतो तसेच प्री मॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते, अशी माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मधील हृदय चिकित्सा विभाग (कार्डीओलॉजी) विभागाचे प्रमुख डॉ.अक्षय बाफना यांनी दिली आहे.

कान, डोळ्यांची काळजी घ्या

हल्ली सण, समारंभादरम्यान डॉल्बी स्टेरिओच्या आवाजाची पातळी 90 ते 100 डेसिबलपेक्षाही अधिक असते. यामुळे कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकते तसेच पडद्याच्या आतील हाडांच्या साखळीला किंवा अंतरकर्णातील वाहिन्यांना धोका पोहोचू शकतो. यामुळे तात्पुरते किंवा कायमचे बहिरत्व येऊ शकते. यासाठी डॉल्बी स्टेरिओचा आवाज शक्यतो 80 डेसिबल पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण स्पीकरच्या समोर उभे राहणे टाळणे आवश्यक आहे. तसेच लेझर लाईटमुळे दृष्टी कमी होण्याचा किंवा गमावण्याचा धोका होऊ शकतो. म्हणूनच लेझर लाईट डोळ्यावर पडणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असे आवाहन छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मधील कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली आहे.

गणेश मंडळांमार्फत सामाजिक प्रबोधनाला प्राधान्य देऊया

गणेशोत्सव, नवरात्र तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या उत्सवातून महापुरुषांचे विचार व त्यांच्या कार्याचा तसेच सामाजिक प्रबोधनपर विषयांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवानिमित्त केलेले देखावे पाहण्यासाठी हजारो नागरिक गणेश मंडळांना भेटी देतात. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळे देखाव्यांमधून झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक बंदी, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, पाण्याची बचत अशा पर्यावरण रक्षण तसेच सामाजिक एकात्मता, महिला सक्षमीकरण, महिला व बालकांचे कायदे, विधवा प्रथा बंदी, व्यसनमुक्ती, ऐतिहासिक, पुरातन वास्तु आणि गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन अशा विषयांवर जनजागृती करताना तसेच ढोल ताशा सारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करत असल्याचे दिसते. परंतु, देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या व उत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देखावे तयार करताना पर्यावरणपूरक घटकांच्या वापरावर भर दिल्यास प्रदूषणही रोखले जाईल..

गणेशोत्सव हा अबाल, वृद्धांच्या आनंदाचा.. मांगल्याचा.. जल्लोषाचा सण.. या सणात पारंपरिक वाद्ये, लोककला व साहसी खेळांचे सादरीकरण होण्याबरोबरच सामाजिक प्रबोधनावर आधारीत देखाव्यांवर भर देवुया.. आणि हा सण मोठ्या उत्साहात.. भक्तीभाव, श्रद्धा, आत्मियता आणि आरोग्याची काळजी म्हणून पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करुया..!

 – वृषाली पाटील, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंगोलीच्या कावड यात्रेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली, दि. 12 (जिमाका): मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार असून एकूणच मराठवाड्याला समृद्ध करणारच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे कयाधू अमृतधारा महादेव मंदिर आणि आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, हेमंत पाटील यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आनंदाचा शिधा, मुलींसाठी 100 टक्के मोफत उच्च शिक्षण आदी योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी उपस्थितांना केले.

 

कळमनुरी येथे आमदार संतोष बांगर यांनी दान स्वरुपात चार एकर जमीन दिली आहे. त्याठिकाणी विपश्यना केंद्र सुरु करण्यात येणार आहे. वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रास 800 कोटी रुपये निधी मंजूर आहे. तर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासह सर्व योजनांसाठीही भरीव निधी भरीव तरतूद केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह अन्य विकासात्मक कार्यासाठी आमदार बांगर यांचे कौतुकही श्री. शिंदे यांनी केले.

अद्याप मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परंतु उर्वरीत कालावधीतही मुबलक पाऊस पडावा, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी औंढा नागनाथ येथील नागनाथाला साकडे घातल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आमदार बांगर यांच्या पुढाकारातून मागील दहा वर्षांपासून कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव संस्थान येथून कावड यात्रा काढण्यात येते. कळमनुरी येथून काढलेली ही कावड यात्रा हिंगोलीतील कयाधू नदी तिरावरील अमृतेश्वर महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येते. या यात्रेस कावडधारींसह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

००००

ताज्या बातम्या

“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0
मुंबई, ८ :  भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि...

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...