शुक्रवार, ऑगस्ट 15, 2025
Home Blog Page 551

प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १०: लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण होणे गरजेचे आहे. आपण या तत्वाचे पालन करत असल्यानेच आपली लोकशाही बळकट असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये मानवी हक्कांबाबतचे शिक्षण समाविष्ट करून युवकांमध्ये सहानुभूती आणि न्यायाची संस्कृती निर्माण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे राज्य मानवी हक्क आयोगामार्फत आयोजित कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, आयोगाचे अध्यक्ष न्या. के.के. तातेड, आयोगाचे सदस्य एम. ए. सईद, संजय कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, जमाती, महिला, मुले, तृतीयपंथी आणि दिव्यांग व्यक्तींचे हक्क हे आपल्या मानवाधिकार अजेंड्याच्या अग्रस्थानी राहिले पाहिजेत. प्रत्येक गट समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो आणि त्यांना समानतेचे आणि आदराचे वातावरण मिळणे आवश्यक आहे.

हवामान बदल व अन्य नैसर्गिक घटक हेदेखील शेतकऱ्यांसमोरील आव्हानांचे व्यापक स्वरूप असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी समुपदेशन सेवा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. मानवी हक्क आयोगाचे कार्य दुर्बल घटकांपर्यंत न्याय पोहोचविण्यात उपयुक्त ठरले असल्याचेही ते म्हणाले.

मानवी हक्क दिनाचा यावर्षीचा ‘आपले हक्क, आपले भविष्य, आत्ता’ हा विषय अत्यंत दूरदृष्टीपूर्ण असून मानवाधिकारांच्या आव्हानांवर तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी आयोगाचे कौतुक केले. राज्य मानवी आयोग स्थापन झाल्यापासून, अशा असंख्य व्यक्ती आणि गटांसाठी तो आशेचा किरण ठरला असल्याचे सांगून राज्यभरातील व्यक्तींच्या सन्मान आणि हक्कांचे रक्षण करण्याचे राज्य मानवाधिकार आयोगाचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने जगता येईल अशा संधी निर्माण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, जागतिक हवामान बदलांना सामोरे जाणे याला आपण सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल, असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले.

मान्यवरांच्या हस्ते यावेळी आयोगाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. न्या. तातेड यांनी प्रारंभी आयोगाच्या कार्याची माहिती दिली. तर, न्या. पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या हक्कांचे जतन करतानाच इतरांच्या हक्कांचीही जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी बांधावरील प्रयोगशाळा, आहार हेच औषध, महिला आणि मुलांची देह विक्रीबाबत जनजागृती, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर तसेच आदिवासी भागातील समस्या आणि त्यांच्या हक्काबाबत जनजागृती करणारी दालने उभारण्यात आली होती, त्यांची राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी पाहणी केली.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १०: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या निधनाने राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, न्यायिक क्षेत्रातील दिग्गज, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना दांडगा राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक अनुभव होता. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. या पदांवरून काम करताना त्यांनी नेहमीच लोकहीत जपण्याचा प्रयत्न केला आहे. पायाभूत सुविधांचा विकास, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुधारणा आदी बाबतीतील त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाचे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना करतो. एस.एम. कृष्णा यांचे कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते, चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

०००

एस. एम. कृष्णा यांच्या निधनामुळे राजकारणातील सुसंस्कृत, अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि.10 : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दुःख व्यक्त केले आहे.

एस. एम. कृष्णा हे कर्नाटक व देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. उच्च विद्याविभूषित असलेले एस. एम. कृष्णा एक अनुभवी संसदपटू होते. बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रजा समाजवादी पक्षातर्फे ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले.

साहित्य, टेनिस व शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या एस. एम. कृष्णा यांनी राजभवन येथे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यपाल पदाची गरिमा जपली. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सुसंकृत व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले आहे.

या दुःखद प्रसंगी एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

०००००

S M Krishna was a man of higher tastes”: Governor C P Radhakrishnan

Mumbai 10 :  Maharashtra Governor C P Radhakrishnan has expressed grief over the demise of former Governor of Maharashtra and former Karnataka Chief Minister S. M. Krishna.

In a condolence message, Governor Radhakrishnan wrote:

“Former Governor of Maharashtra S M Krishna was a popular figure in the politics of Karnataka and the country. Starting his career as a Professor of Law, S M Krishna got elected to Parliament from the Praja Socialist Party of Barrister Nath Pai.

In his long political journey, Krishna held various positions such as the Speaker of Karnataka Legislative Assembly, Chief Minister of Karnataka, Governor of Maharashtra and Union Minister of External Affairs.  S M Krishna was a man of higher tastes who took keen interest in literature, tennis and classical music. He had organized classical music programs in Maharashtra Raj Bhavan. He upheld the dignity of the post of Governor. In his demise, we have lost an erudite and cultured leader. I pay homage to the memory of late S M Krishna and convey my heartfelt condolences to the members of the bereaved family.”

0000

राजकारणातून समाजहित जपणारा नेता गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १० : ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा तथा एस.एम.कृष्णा यांच्या निधनाने, आपल्या राजकारणातून समाजहित जपणारा आणि देशाच्या सेवेसाठी समर्पित भावनेने कार्यरत असलेले नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, श्री. एस. एम. कृष्णा यांनी लोकहिताच्या कामासाठी पदे असतात हे ओळखून त्यांनी लोकांचे जीवन उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी राज्याला मार्गदर्शन करण्याचे काम केले. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व सभागृहात काम करताना त्यांनी, विधानसभा अध्यक्ष, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी सर्व पदे भूषविली. विद्यापीठ सुधारणा हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. विशेषतः बंगळुरूचे माहिती आणि तंत्रज्ञान शहरात रूपांतर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2023 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे हे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

0000

मूलभूत हक्कांचे संरक्षण करणारे राज्य मानवी हक्क आयोग  

संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. मानवी हक्कांची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेचे अपत्य आहे. जन्मानेच माणूस काही हक्क घेऊन येतो. त्या गृहीतकृत्यांवर ह्या हक्कांची मांडणी करण्यात येते. मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले जीवनाधिकार, यातनांपासून मुक्तता, गुलामगिरीपासून मुक्तता, कोर्ट सुनावणीचा अधिकार, भाषण स्वातंत्र्य, वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य हे काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात. अशा या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्यास महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागता येते. कोणत्याही शुल्काशिवाय व वकिलांशिवाय आयोगाकडे तक्रार करता येते.

मानवी हक्क म्हणजे सर्व मानवांचे अनन्य संक्राम्य असलेले मूलभूत हक्क. मानवी हक्क हे देश, स्थान, भाषा, धर्म, मानववंशीय उद्गम, लिंग, जात, जमात इत्यादींच्या पलीकडे सार्वत्रिक अशा स्वरूपाचे आहेत. राष्ट्रसंघाच्या (यूनो) परिषदांनुसार व संकेतांनुसार व मानवी हक्काच्या सार्वत्रिक घोषणांमध्ये भर दिल्यानुसार कोणत्याही देशामध्ये कोणतीही राजकीय, आर्थिक किंवा सांस्कृतिक पद्धती अंमलात असली तरीही सर्व मानवी हक्कांचे संरक्षण करणे हे व त्यांना प्रोत्साहन देणे त्या-त्या राज्याचे कर्तव्य आहे.

त्यानुसार भारतामध्ये मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३ अस्तित्वात आला. या अधिनियमाचे उद्दिष्ट सीमित असले, म्हणजेच मानवी हक्क आयोग हा केवळ सार्वजनिक सेवकांनी केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचीच चौकशी करू शकतो आणि केवळ शिफारस करणारे आदेशच जारी करू शकतो तरीही महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने त्यांचे मर्यादित अधिकार व मर्यादित अधिकार क्षेत्र यामध्येही आयोगाला प्राप्त झालेल्या मानवी हक्क अधिकारांच्या उल्लंघनाच्या तक्रारींची चौकशी करणे व स्वतःहून पुढाकार घेऊन चौकशी करणे याद्वारे सार्वजनिक सेवकांनी केलेल्या मानवी हक्काच्या उल्लंघनामध्ये लक्ष घातले आहे. आयोग मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतची गाऱ्हाणी व तक्रारी याकडे लक्ष देत आहे. महाराष्ट्र राज्यात मानवी हक्कांच्या स्थितीमध्ये सुधारणा करणे व सर्व समाजाच्या कल्याणासाठी मानवी हक्कांच्या संरक्षणाचे संवर्धन करणाऱ्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे यासाठी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग प्रयत्न करीत आहे.

आयोगाचा परिचय

मानवी हक्क म्हणजे मानवी वर्तणुकीच्या दर्जाची विवरण करणारी काही नैतिक तत्त्वे किंवा रिवाज होय. या मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये नियमितपणे संरक्षण होते.

मानवी हक्क सार्वत्रिक असणे, ते हक्क सर्व जगभरात समान असणे हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्यांचा पायाभूत मानक ठरला. १९४८ साली मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणांमध्ये या तत्त्वावर पहिल्यांदा भर देण्यात आला व अनेक आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संमेलने, ठराव व घोषणांमध्ये या तत्त्वांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. भारताच्या घटनेमध्ये सुद्धा मानवी हक्कांच्या सर्व सार्वत्रिक घोषणेचा मूलभूत हक्क म्हणून समावेश केला आहे. भारताच्या संसदेने मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३ पारित केला. हा अधिनियम मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध सुरक्षितता प्रदान करतो. या अधिनियमामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्याचा तसेच जिल्हा स्तरावर मानवी हक्क न्यायालय स्थापन करण्याची तरतूद आहे.

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगा बद्दल

आंतरराष्ट्रीय संकेत व मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३ यांच्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 6 मार्च 2001 रोजी झाली.

आयोगावर एक अध्यक्ष व दोन सदस्य आहेत. आयोगाकडे एक सचिव, एक विशेष पोलीस महानिरीक्षक व एक प्रबंधक आहेत. आयोगाचे पुढीलप्रमाणे तीन विभाग आहेत : (१) विधी विभाग, (२) प्रशासन विभाग, (३) अन्वेषण विभाग. आयोगाकरिता नियमित ५४ पदे मंजूर असून याशिवाय दोन वर्षांच्या कालावधीसाठी १५ काल्पनिक पदे मंजूर केली आहेत. अशाप्रकारे ६९ पदे निर्माण करण्यात आली आहेत.आयोगाचे कार्यालय प्रशासकीय अधिकारी महाविद्यालय आवार, ९, हजारीमल सोमाणी मार्ग, सी. एस. टी. समोर, मुंबई-४०० ००१ येथे आयोगाचे कार्यालय शासनाच्या गृह विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

व्हिजन मिशन

मानवी हक्कांचे संरक्षण (सुधारणा) कायदा, 2006 द्वारे सुधारित केल्यानुसार मानवी हक्कांचे संरक्षण कायदा (PHRA), 1993 म्हणून स्थापित केले गेले आहे.

आयोगाची जबाबदारी जनतेमध्ये मानवी हक्क जागरुकता पसरवणे आणि मानवी हक्क साक्षरतेच्या क्षेत्रातील सर्व भागधारकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हे आहे.

मानवी हक्कांना घटनेने हमी दिलेले किंवा मूर्त स्वरूप दिलेले व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठेशी संबंधित अधिकार म्हणून परिभाषित करते.

आयोगाची रचना

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग ही वैधानिक संस्था आहे. त्याची रचना खालीलप्रमाणे –

  • जी व्यक्ती एखाद्या उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीश होती अशी व्यक्ती आयोगाची अध्यक्ष असेल.अशी व्यक्ती की जी उच्च न्यायालयाची न्यायाधीश होती किंवा आहे किंवा राज्यातील जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीश होती किंवा आहे आणि त्या व्यक्तीला जिल्हा न्यायाधीश म्हणून किमान सात वर्षे अनुभव आहे, अशी व्यक्ती आयोगाची सदस्य असेल,
  • अशा व्यक्तीला आयोगाचा सदस्य नेमला जाईल की ज्या व्यक्तीला मानवी हक्कासंबंधित बाबींच्या संबंधित अनुभव असेल किंवा मानवी हक्कासंबंधित बाबींचे ज्ञान असेल.

आयोगाचे कार्य

  1. लोकसेवकाकडून मानवी हक्क भंग झाला आहे वा त्या बाबतीत त्यांनी अपप्रेरणा दिली आहे वा मानवी हक्क भंगाचा प्रतिबंध करण्यात दुर्लक्ष केले आहे, अशा प्रकरणी स्वप्रेरणेने वा ग्रस्त व्यक्तीकडून तक्रार आल्यावर चौकशी करणे.
  2. न्यायालयाकडे प्रलंबित असलेल्या कार्यवाहीबाबत मानवी हक्क भंग झाल्याची तक्रार असेल, तर अशा बाबतीत संबंधित न्यायालयाच्या मान्यतेने हस्तक्षेप करणे.
  3. कैद्यांच्या राहणीमानाची पाहणी व अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाला सूचना देऊन, तुरुंगांना वा ज्या संस्थेत कैद्यांना उपचारार्थ वा सुधारण्यासाठी वा संरक्षणाखाली ठेवले असेल, अशा ठिकाणांना भेटी देणे.
  4. मानवी हक्क संरक्षणार्थ राज्यघटना वा कोणत्याही विद्यमान कायद्याखाली पुरविण्यात आलेल्या सुरक्षिततेसंबंधीच्या तरतुदींचा आढावा घेणे व अशा तरतुदींच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी शिफारशी करणे.
  5. मानवी हक्कांचा संकोच करणाऱ्या अतिरेकी व इतर घटकांचा आढावा घेणे व योग्य ती उपाययोजना सुचविणे.
  6. मानवी हक्कांवरील प्रबंध व आंतरराष्ट्रीय कायदेशीर शोधग्रंथांचा अभ्यास करणे व त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारशी करणे.
  7. मानवी हक्कांसंबंधी संशोधनाचे काम हाती घेणे व प्रोत्साहन देणे.
  8. समाजातील विविध प्रवर्गात मानवीहक्कांविषयी जाणीव निर्माण करणे आणि प्रसिद्धी व प्रसार माध्यमे, संमेलने व अन्य उपलब्ध साधनांद्वारे मानवीहक्क संरक्षणाच्या उपलब्ध तरतुदींविषयी जागृती वाढावी म्हणून प्रयत्न करणे.
  9. मानवी हक्क क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशासकीय संघटना व संस्थांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे.

आयोगाकडे तक्रार करतानाची कार्यपद्धती किंवा आयोग स्वतःहून कृती करील तेव्हाची कार्यपद्धती

१. मानवी हक्कांचा भंग झाल्याची तक्रारी पीडित व्यक्ती किंवा त्या व्यक्तीतर्फे अन्य व्यक्ती तक्रार दाखल करू शकेल. सदर तक्रार मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत करता येईल. सदर तक्रार ऑनलाईन किंवा टपालाने सादर करता येईल.

२. तक्रार करताना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, कोणतेही कोर्ट फी तिकीट लावावे लागणार नाही. वकील नेमण्याची गरज नाही.

३. कोणत्याही शासकीय सेवकांविरुद्ध तक्रार करायची असेल तर ती आयोगाच्या अध्यक्षांना उद्देशून करायची असते व त्यामध्ये खालील तपशील असणे आवश्यक आहे:-

  • तक्रारदाराचे पूर्ण नाव,तक्रारदाराचा पूर्ण टपालाचा पत्ता, टेलिफोन क्रमांक / ई-मेल क्रमांक, घटनेची तारीख व स्थळ, घटना केव्हा घडली ती वेळ, मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या घटनांचा तपशील स्पष्ट करा.
  • कोणत्या शासकीय सेवकाविरुद्ध / शासकीय विभागाविरुद्ध / शासकीय संस्थेविरुद्ध / शासकीय प्राधिकरणाविरुद्ध तक्रार केली जात आहे?
  • सदर बाब कोणत्याही न्यायालयात,राष्ट्रीय मानव हक्क आयोगात, न्यायासनात किंवा अन्य वैधानिक मंचाकडे प्रलंबित आहे काय ?

आयोगाकडे येण्याची कारणे

  • संस्थात्मक स्वायत्तता व स्वांतत्र्य
  • सोपी उपलब्धता
  • कोणतेही शुल्क आकारले जात नाही
  • कमी किचकट कार्यपद्धती
  • त्वरित न्याय
  • कोणत्याही व्यावसायिक वकिलाच्या सहाय्याची गरज नाही

आयोगाचा पत्ता व संपर्क

  • पत्ता : हजारीमल सोमाणी मार्ग, सीएसएमटी स्टेशन, मुंबई – 400 001
  • वेबसाइट दुवा : http://www.mshrc.gov.in
  • दूरध्वनी : 02222076408
  • ईमेल : complaint-mshrc@gov.in

नागरिकांनी आपल्या मानवी हक्कांसंदर्भात सजग राहणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्यांना न्याय देण्याचे राज्य मानवी हक्क आयोग हे एक हक्काचे ठिकाण आहे. मानवी हक्कांबाबत जनजागृती करणे व तळागाळातील नागरिकांपर्यंत मानवी हक्कांची अंमलबजावणी होण्यासाठी आयोग कार्यरत आहे. त्यामुळे जर कोणाच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाले असे वाटल्यास त्या नागरिकांनी आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या हक्कांचे संरक्षण करू शकता.

नंदकुमार बलभीम वाघमारे,

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

अल्पसंख्याक शाळेतील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान

नागपूर,दि.9 : अल्पसंख्याक समाजातील मुलांना योग्य शिक्षण मिळावे, अभ्यासातून त्यांना पुढे येता यावे यासाठी त्यांना त्यांच्या भाषेतून शिक्षण देणे उचित राहील अशा भूमिकेतून शासनाने उर्दू भाषेतील शाळांना मान्यता दिली. यासाठी अनुदानाची व्यवस्था केली. एक व्यापक दृष्टीकोन शासनाने ठेवला. तथापि काही संस्थांनी शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासल्याचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी उद्विग्न होऊन सांगितले. अल्पसंख्यांक शाळेतील कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे बजावून त्यांनी शिक्षण विभागाला अशा गैरप्रकाराविरुध्द तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे अल्पसंख्याक आयोगाच्या वतीने आज विविध दाखल प्रकरणांबाबत सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत एका प्रकरणाबाबत त्यांनी आपल्या मनोगतात शिक्षण संस्थेच्या कार्यपध्दतीतील दोषांबाबत बोलतांना हे निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे व वरिष्ठ अधिकारी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळांचे संस्थाचालक, पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.

उर्दू भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर अभियांत्रीकी, वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यावयाचा झाल्यास त्याला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. या विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच चांगल्या वातावरणासह शिक्षणाची सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही संस्थाचालकाची आहे. उर्दू भाषेतील अनेक शाळेत घाणीचे साम्राज्य असून तिथे बसणे अत्यंत अवघड आहे. संस्थाचालकांनी शाळांकडे व्यवसायाच्या नजनेतून न पहाता आपण भविष्यातील पिढ्यांना घडविण्यासाठी आपली संस्था सुरु केली आहे याचे भान ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

******

विधानपरिषद विशेष अधिवेशनाचे कामकाज संस्थगित

मुंबई, दि. ९ :  विधानपरिषदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज संस्थगित करण्यात आले असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 16 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. राष्ट्रगीताने अधिवेशन कामकाजाची सांगता करण्यात आली.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९ : कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. तसेच कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्नाटक विधानसभेतील प्रतिमा काढणार असल्याचे वक्तव्य केले, हे गंभीर असून या घटनेचा राज्य शासन निषेध करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी  ठामपणे उभे असून बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील 12 कोटी जनता आणि जगभरातील मराठी माणूस कर्नाटक सीमाभागातील मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी  आम्ही शिक्षण, आरोग्य सेवा उपलब्ध केल्या आहेत. यापुढे देखील सीमा भागातील मराठी भाषिकांचे  प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सरकार तत्पर राहील.

मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य यांना अटक करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्यात आले. या कर्नाटक सरकारच्या कृत्याचा महाराष्ट्र शासन तीव्र निषेध करीत आहे. मी देखील मराठी भाषिकांच्या लढ्यात तुरुंगवास भोगला असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच भूमिका आमच्या सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने वकील दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देखील यापूर्वी या प्रश्नाबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन देखील कर्नाटक सरकार अशी भूमिका घेत असेल तर कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

मुंबई, दि. ९ : विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव विधानसभेत मांडला. दिवंगत सदस्यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिवंगत उद्योगपती रतन नवल टाटा, माजी सदस्य तथा माजी मंत्री मधुकर काशिनाथ पिचड, माजी सदस्य तथा माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील, माजी सदस्य तथा माजी राज्यमंत्री बाबा झियाउद्दीन सिद्दीकी, लोकसभा सदस्य व माजी वि.स.स. वसंतराव बळवंतराव चव्हाण, माजी वि.स.स. ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, निवृत्ती विठ्ठलराव उगले, रामकृष्ण रघुनाथ पाटील, उल्हास नथोबा काळोखे, अर्जुनसिंग पिरसिंग वळवी, हरीराम आत्मारामजी वरखडे, सिताराम भिकाजी दळवी, विजय ऊर्फ आप्पा दत्तात्रय साळवी व हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्ताव सादर करण्यात आला.

दिवंगत सदस्यांच्या कार्याला अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी उजाळा दिला. सभागृहात दोन मिनिटे मौन बाळगून दिवंगत सदस्यांना सर्व उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक; जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

मुंबई, दि. ९ : सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक असून जनतेच्या आशा आकांक्षा व्यक्त करणारे हे सभागृह आहे. सभागृहाच्या वेळेचा  राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि न्यायासाठी उपयोग करून, जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार असल्याचे  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले.

विधानसभेत 15 व्या विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबदल सर्वांचे आभार मानत श्री. नार्वेकर म्हणाले, सदस्यांनी सभागृहात असताना समाजाच्या विकासाचा आणि समाजात वावरत असताना सभागृहाचा विचार डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. सभागृहाचे कामकाज अधिक प्रभावी होण्यासाठी चतुसूत्री कार्यक्रम राबविण्यात येईल. सभागृहात सदस्यांना आपापल्या विधानसभा मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी प्रश्नोत्तराच्या तासाचे विशेष महत्व आहे. समिती पद्धती हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे, तर कायदा निर्मिती हे विधानमंडळाचे अंगीभूत महत्वाचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे कल्याणकारी संकल्पनेची प्रभावी अभिव्यक्ती आहे. सदस्यांना अर्थसंकल्पावरील चर्चा करण्यासाठी पुरेसा अवधी देऊन, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वानी कार्य करून  विधिमंडळ कामकाज करत असताना दोन्ही बाजूंचे सहकार्य आवश्यक असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी कार्यभार स्वीकारला मुंबई, दि. १४ : मुंबई स्लम-फ्री करायची असेल, पुनर्विकास जलद करायचा असेल, तर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प...

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ‘प्रभागसंघ आत्मनिर्भर संघटन पुरस्कार २०२४’ पुरस्कार सोहळ्यात...

0
नवी दिल्ली, दि.१४ : देशभरातील ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (DAY-NRLM) 'प्रभागसंघ आत्मनिर्भर संघटन पुरस्कार २०२४'...

जिल्हा विकास निधीचा प्रत्येक रुपया जनहितासाठी — सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

0
सामूहिक लाभ, कायमस्वरूपी मालमत्ता आणि उत्पन्नवाढीच्या योजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देश जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६९७ कोटी रुपयांच्या आराखड्याचा आढावा गडचिरोली, दि.14 ऑगस्ट (जिमाका):  जिल्हा विकास निधीतील प्रत्येक...

सुलवाडे-जामफळ-कनोली योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार – पालकमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

0
सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे ८१ टक्के काम पूर्ण; पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून कामाचे कौतुक धुळे,दिनांक 14 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व...

धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा धुळ्यातील नूतन शहीद स्मारक त्यांच्या बलिदानाची...

0
पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाचे लोकार्पण संपन्न धुळे, दिनांक 14 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा आहे. धुळे जिल्हा...