रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 551

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

SPK DGIPR Mantralay Mumbai

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्यसाठी आयोजित कार्यक्रम

मुंबई,  दि. १३ – महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हॉटेल ताज पॅलेस येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्य, मंत्रिमंडळ सदस्य व मान्यवरांसाठी आयोजित कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज शिष्टाचार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव इकबालसिंग चहल, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह विविध देशातील उच्चायुक्त  उपस्थित होते.

उपस्थित सर्वांना ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण, पायाभूत सोयी सुविधा अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे. राज्याची अर्थ व्यवस्था एक ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. राज्यात उद्योगस्नेही वातावरण आहे. तसेच राज्यात उद्योग उभारणी आणि वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक नेतृत्व दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात देश लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

०००००

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या नूतन वास्तूचे मुंबईत उद्घाटन

नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे औषध व्यवसाय परिषदेची वेगळी ओळख – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

मुंबई, दि.१३ : फार्मासिस्ट आणि सामान्य नागरिकांसाठी नवनवीन उपक्रम हाती घेऊन औषध व्यवसाय परिषद एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या मुलुंड येथील नूतन वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री श्री.मुश्रीफ बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, परिषदेने मुलुंड येथे स्वमालकीची जागा खरेदी करुन यामध्ये अत्याधुनिक सेवा देणारे कार्यालय, जागतिक स्तराप्रमाणे विकसित औषध माहिती केंद्र  आणि फार्मासिस्टचे ज्ञान व कौशल्य याचे निरंतर प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले सभागृह बनविले आहे. हे राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. फार्मासिस्टचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी व जागतिक स्पर्धेला स्पर्धेनेच उत्तर देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाची निर्मिती करून कार्यशाळा राज्याच्या तालुका, जिल्हा पातळीवर तज्ञ मार्गदर्शकामार्फत आयोजित केल्या जातात हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे.कारण अपडेट असणे काळजी गरज आहे ते तुम्ही करता.यामुळे परिषद अधिक गुणवत्तापूर्ण काम करेल अशी  खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

आजअखेर महाराष्ट्र राज्यामध्ये ४७९ पदविका (Diploma) आणि ३१२ पदवी (Degree) व फार्म. डी. (Doctor of Pharmacy) ची ७ शासन मान्य फार्मसीची कॉलेज कार्यान्वित आहेत. कायद्याअंतर्गत फार्मसीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- विद्यार्थीनी फार्मसीचा व्यवसाय करणे, उत्पादन क्षेत्रामध्ये महत्वपुर्ण भुमिका बजावणे यासह सरकारी, निमसरकारी सेवा (फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर, फार्मसी इन्स्पेक्टर) करण्यासाठी नियम व अटींच्या आधीन राहून पंजीकरण (नोंदणी) करणे अनिवार्य आहे. आज अखेर ४.३ लाख फार्मासिस्टची नोंदणी परिषदेकडे झाली आहे.

परिषदेचे मागील २५ वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजना कार्यान्वित केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवली आहे.

१९९८ मध्ये परिषदेने संकेतस्थळाची निर्मिती करुन कालानुरुप परिषदेचे सर्व कामकाज नोंदणी, पुर्नर्नोदणी, नूतनीकरण, इ. कामकाज ऑन लाइन पद्धतीने करण्यात येते.

फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रोफाइल (पी.पी.पी. कार्ड) ची नवीन संकल्पना अंमलात आणून त्याचे स्मार्टकार्डमध्ये रूपांतर केले आहे. यास अन्न आणि औषध प्रशासनाने देखील मान्यता दिली आहे. फार्मासिस्ट, औषध क्षेत्रातील संशोधक, प्राध्यापक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि नागरीकांना औषधाची माहिती, त्याचे शरीरावर होणारे अनुकूल व प्रतिकूल परिणाम, रासायनिक बदल बाबतची योग्य माहिती मिळू लागली आहे. यासाठी जगप्रसिद्ध Micromedex या डाटाबेस ची उपलब्धता केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

000000000

राजू धोत्रे/विसंअ

 

खादी हे शाश्वत विकासाचे साधन – सभापती रविंद्र साठे

मुंबई, दि. 13 : खादी हे कापड नसून जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. खादी हे शाश्वत विकासाचे एक साधन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमांत देशातील जनतेने खादी वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्यातील लघुउद्योजकांना सक्षम करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने मागील 64 वर्ष अविरतपणे काम केले आहे, असे राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी व्यक्त सांगितले.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या 64 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण सभागृह येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, अर्थसल्लागार स्मिता खरात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, खादी आयोगाचे संचालक योगेश भामरे, नित्यांनद पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तसेच राज्यातील विविध भागातील यशस्वी उद्योजक उपस्थित होते.

सभापती श्री.साठे म्हणाले  की, पुरस्काराने ग्रामीण उद्योजकांना प्रेरणा मिळते. ग्रामीण रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मंडळ अनेक योजना राबवित आहे. मधाचे गाव ही नावीन्यपूर्ण योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मधमाशी पालन हा शेतीला पूरक असणारा व्यवसाय लोकाभिमुख होत आहे. मंडळ 64 वर्ष ग्रामीण जनतेसोबत असून त्यांच्याकरिता रोजगार निर्माण करून लोकांना अर्थसहाय्यासोबत अनुदान देखील मंडळाकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला म्हणाल्या, रोजगार, पर्यावरण आणि लोकाभिमुख काम करण्यासाठी मंडळाचे योगदान मोठे आहे आजअखेर हजारो लोकांना मंडळाने हाताला काम देऊन स्वावलंबी केले आहे. ग्रामीण उद्योजक खऱ्या अर्थाने समाजहिताचे काम करीत आहेत. वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुरस्कार कार्यक्रम अनेकांना प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कारामध्ये  सिंधुदुर्ग येथील कौसर खान यांना प्रथम, पुणे येथील प्रमोद रोमन यांना द्वितीय तर गोंदिया येथील श्रीकांत येरणे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आले. उत्तेजनार्थ पुरस्कार ठाणे येथील सुजाता पवार, नांदेडचे बालाजी काजलवाड अमरावतीच्या उज्वला गोपाळ चंदन यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

या कार्यक्रमात बिपीन जगताप, योगेश भामरे, यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमात मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामोद्योग अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमात पुरस्कार्थींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी म्हाम्बरे यांनी तर आभार रेश्मा माळी यांनी मानले.

000

संजय ओरके/विसंअ

 

 

 

 

जमीन अधिग्रहणासंदर्भातील प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले नाहीत

‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात न्यायालयाने केलेले भाष्य, तो एक संवादाचा भाग

मुंबई दि.१३:– जमीन अधिग्रहणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील सुरू असलेली सुनावणी आणि ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अनुषंगाने विविध प्रसार माध्यमातून दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित झालेले असून याबाबत वस्तुस्थिती पुढील प्रमाणे आहे.

पुण्याच्या एका जमीन अधिग्रहणा संदर्भातील प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारचे ताशेरे आदेशात ओढलेले नाहीत. हे प्रकरण उद्या सुनावणीसाठी ठेवलेले आहे. न्यायालयाने जे ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजने संदर्भात भाष्य केले तो एक संवादाचा भाग होता. न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आज कोणत्याही प्रकारचे प्रतिकूल शेरे दिलेले नाहीत’, असा खुलासा राज्याच्या महसूल विभागाच्या वतीने राज्य शासनाचे सर्वोच्च न्यायालयातील विशेष समुपदेशी (Special Counsel for Maharashtra Govt) यांनी केला आहे.

जमीन अधिग्रहण प्रकरणी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येत असून सदर याचिकाकर्त्यांची मोबदला रक्कम 37,42,50,000/- रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही याचिकाकर्त्याने अधिक रकमेची मागणी केल्याने उद्यापर्यंत वेळ मागितला आहे . आणि न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीसाठी उद्या ठेवलं आहे, असे विभागाने कळविले आहे.

00000

किरण वाघ/विसंअ

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न करावे – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ नियामक परिषदेची पहिली बैठक

मुंबई,दि.१४ कलावंतांची खरी संपत्ती ही कलेची  निर्मिती असते.  ती राज्याची, देशाची व जगाचीही असते. त्या कलेचे वैभव जोपासण्यासाठी कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच कला शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने प्रयत्न करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.

मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ नियामक परिषदेची पहिली बैठक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. यावेळी उच्च व तंत्र  शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी,कला संचालक राजेश मिश्रा, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

याबैठकीत शासकीय उच्च कला  परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा यांचे प्रस्तावित परीक्षा शुल्कास तसेच उच्चकला पदविका प्रमाणपत्र परीक्षेसाठी  विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या शुल्कास मान्यता, राज्यकला शिक्षण मंडळासाठी लेखा परिक्षणासाठी लेखा परीक्षकाची नेमणूक, महाराष्ट्र राज्य कला संचालनालय पीएलएमधून तात्पुरत्या स्वरूपात निधी देण्यास मान्यता,महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा परीक्षा,शुल्क निश्चित समितीच्या कामासाठी संगणक प्रणाली  राबविणे याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आर.के.लक्ष्मण फाउंडेशन आणि डॉ.होमी भाभा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 13 :  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत आर.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्र दालन संदर्भात आर.के.लक्ष्मण फाउंडेशन आणि डॉ. होमी भाभा विद्यापीठ,मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी  आणि आर. के. लक्ष्मण फाउंडेशन यांच्यातील या सामंजस्य कराराच्या माध्यमातून  आर. के. लक्ष्मण यांच्या सर्जनशील तत्त्वज्ञानाचा समावेश करून कला शिक्षणाचा विकास करणे, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कला आणि संवाद शिक्षण सुधारण्यासाठी प्रशिक्षण आणि सर्जनशील अभिव्यक्ती, चिंतनशील विचार, आणि संवाद कौशल्ये विकसित करण्याच्या संधी प्रदान करण्यात येणार आहे.

या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी  आणि आर. के. लक्ष्मण फाउंडेशन ११ वी इयत्तेपासून पुढील विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षण कार्यक्रम सह-निर्मित आणि व्यवस्थापित करतील. या कार्यक्रमांमध्ये संग्रहालय दौऱ्यांचे आयोजन, कार्यशाळा, आणि ख्यातनाम कलाकारांशी संवाद अशा प्रत्यक्ष शिक्षणाच्या संधी समाविष्ट केल्या जातील. शिवाय, आर. के. लक्ष्मण फाउंडेशन डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावहारिक कौशल्ये आणि सर्जनशील विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देईल.

मंत्रालयात झालेल्या सामंजस्य कराराच्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत, डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव विलास पाध्ये,आर.के.लक्ष्मण फाउंडेशनचे संचालक उषा लक्ष्मण, डॉ.विशाल बानेवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव विलास पाध्ये यांनी तर आर.के.लक्ष्मण फाउंडेशनचे संचालक उषा लक्ष्मण यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

डी-नोव्हो विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,दि.१३ : मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा तीनही शासकीय महाविद्यालयांचा मिळून डी-नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.या विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात  सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र  शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या विद्यापीठासाठी आवश्यक पदे भरण्यास मान्यता, अध्यापकीय पदांची पदभरती, शिक्षकेत्तर  पदभरती, वसतिगृह,याबाबत सविस्तर यावेळी चर्चा करण्यात आली.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

 

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅइक (विषाणूजन्य) रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. पिवळा मोझॅइक संदर्भातील लक्षणे व उपाय खालीलप्रमाणे :-

पिवळा मोझॅइकची लक्षणे (Yellow Mosaic Virus – YMV)

रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळया रंगाचे छोटे-छोटे चट्टे दिसतात, तद्नंतर पानावर चमकदार पिवळया हिरव्या रंगाचे मोठ्या आकारचे चट्टे दिसतात व पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुजी राहतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे व दुय्यम प्रसार हा पांढऱ्या माशीद्वारे होतो.

सोयाबीन मोझॅइक विषाणूची लक्षणे (Soybean Mosaic Virus – SMV):

या रोगाचा प्रादुर्भाव सद्यजरी दिसून आला नसला तरी भविष्यातील खबरदारी म्हणून या रोगाची लक्षणे व व्यवस्थापन-

रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखुड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजूने दुमडतात. पानामध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो. पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलुन करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे होतो व दुय्यम प्रसार हा मावा किडीद्वारे होते.

प्रतिबंधात्मक उपाय:-

सुरूवातीसच रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावीत. पिकामधील व बांधावरील तण नियंत्रण करणे आवश्यक आहे.

नियंत्रणाचे उपाय:-

माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५ x ३० सेमी आकाराचे एकरी २०-२५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर लावावेत.

रोग/किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पुढील प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढरी माशी व मावा या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

इमीडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.५ मिली किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के डब्लुजी २ ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्युजी ३ ग्रॅम किंवा अॅसिटामिप्रिड २५ टक्के + बायफेन्थ्रीन  २५ डब्लुजी ५ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करतांना किटकनाशके आलटून पालटून वापरावीत.

टिप: नियंत्रण उपायामधील रासायनिक किटकशाकांच्या शिफारसी या तदर्थ (Adhoc) स्वरुपाच्या आहेत.

(माहिती : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला)

00000

 

विदर्भ-मराठवाड्यात घडणार दुधक्रांती; सर्व १९ जिल्ह्यात शासनातर्फे राबविला जाणार दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २

मुंबई, दि. १३ :- मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पशुपालन व दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला १४९.२६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले, विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा १ मध्ये मराठवाडा व विदर्भातील केवळ ११ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र  आता यामध्ये  आणखी ८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. आज झालेल्या निर्णयामुळे  उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी / म्हशी तसेच उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे अनुदान तत्वावर वाटप केले जाणार आहे. तसेच या  प्रकल्पामुळे मराठवाडा आणि विदर्भात नवी दुधक्रांती होऊन शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल,  असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

दुग्ध व्यवसाय मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की,  प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी ४२ लाख इतकी असून यापैकी १७९ कोटी १६ लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकांचा आहे.

हा प्रकल्प राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि मदर डेअरी यांच्या सहकार्याने राबविला जाणार आहे.  या प्रकल्पात उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी-म्हशींचे वाटप, गायी म्हशीं मधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम, उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे वाटप, पशुप्रजनन पुरक खाद्याचा पुरवठा, दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक खाद्य पूरकांचा पुरवठा, चारा-पिके घेण्यासाठी अनुदान, विद्युत चलित कडबाकुट्टी सयंत्रांचे वाटप, मुरघासासाठी अनुदान, आणि आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण अशा एकुण ९ घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकल्पात विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम तर मराठवाड्यातील नांदेड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या  प्रकल्पाच्या ३ वर्षांच्या कालावधीत  १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ गाई आणि म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे.  या प्रकल्पाचे मुख्यालय नागपूर येथे राहणार असून जिल्हा प्रकल्प अधिकारी याची अंमलबजावणी करतील, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

००००

किरण वाघ/विसंअ

दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम राज्य सल्लागार मंडळाची बैठक

मुंबई, दि. १३:- दिव्यांग बांधव समाजाचा महत्वाचा घटक असून त्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अनुसार गठीत राज्य सल्लागार मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बंदर विकास मंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव विजय वाघमारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, की दिव्यांग बांधवांना सार्वजनिक ठिकाणी वावर सुकर होण्याकरिता कार्यालये, शाळा, रुग्णालये ही दिव्यांगसुगम तयार करावीत. यासाठी सर्व विभागांना पत्र पाठवून सूचीत करण्यात यावे. दिव्यांगासाठी शासन अनेक योजना राबवत आहेत. विविध विभागांच्या समन्वयातून या योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी अधिनियमाबाबत सादरीकरण केले.

00000

ताज्या बातम्या

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. 8 : प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर...

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H2OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

0
मुंबई, दि. 8 - गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या 'प्रोजेक्ट H2OPE' (होप)...

सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा  वापर सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ :  राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे...