रविवार, जून 15, 2025
Home Blog Page 538

गडचिरोली : नक्षलग्रस्त ते विकसनशील जिल्हा प्रवास

समृद्ध आदिवासी संस्कृती, विपूल खनिज संपत्ती, सर्वाधिक हरित वने, बांबू आणि तेंदुपत्ता यासोबतच भात पिकांकरिता गडचिरोली जिल्हा प्रसिद्ध आहे. सुर्याच्या सोनेरी किरणांनी राज्यात सर्वप्रथम न्हावून निघणाऱ्या पूर्वेकडच्या या पहिल्या जिल्ह्यातील तब्बल ७६ टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. नद्या, डोंगरदऱ्या, वन्यजीव, वृक्षवल्ली, जैविक विविधतेने नटलेल्या आणि राष्ट्रकूट, चालुक्य, यादव व गोंड या प्राचिन राज्यकर्त्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे ऐतिहासिक मंदिरं आणि गडकिल्ल्यांच्या या प्रदेशात निसर्गानं आपलं वैभव मुक्तहस्ताने वाटलं आहे. या जिल्ह्याची निर्मिती २६ ऑगस्ट १९८२ रोजी झाली. जिल्ह्यात सुमारे ३९ टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. या निसर्गरम्य जिल्ह्याचा आर्थिक विकास मात्र दुर्गम क्षेत्र आणि नक्षलवादामुळे दीर्घकाळापासून रखडला होता. या आव्हानांचा सामना करत जिल्ह्यात विकासकामांना चालना देण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबीनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात निडरतेने पुढाकार घेत उद्योग विस्तारिकरणासह रस्ते, रेल्वे, विमानतळ, उद्योग, शिक्षण आणि इंटरनेट नेटवर्क यांसारख्या पायाभूत सुविधांना बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची मालिका येथे सुरू केली आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्याकडून विकसनशीलतेकडे होणाऱ्या या प्रवासातील विविध विकास योजना व उपक्रमांबद्दल अधिक जाणून घेवू या . . .

गडचिरोली ‘स्टिल हब’
देशाला जगातील तीसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी महाराष्ट्राला 2028 पर्यंत ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यात येथील लोहउद्योगाकडून राज्याला मोठ्या आशा आहे. सूरजागड येथे लोहखनिजाचे उत्खनन सुरू असून खाणीच्या विस्ताराला देखील परवानगी मिळालेली आहे. लोह खनिजाच्या मुबलक साठ्यांमुळे येथील लोह उद्योगात तब्बल एक लाख कोटी पर्यंतच्या गुंतवणूकीस वाव असल्याचा अंदाज आहे. येत्या काळातील भारताचा ‘स्टिल हब’म्हणून गडचिरोली जिल्ह्याची नवीन ओळख यातून निर्माण होत आहे. लोह खनिज संपत्तीमुळे मोठमोठे उद्योग येथे येण्यास आतूर आहेत. त्यातून स्थानिकांना रोजगारांच्या मोठ्या संधी येथे निर्माण होत आहेत.

विकासाच्या रेल्वेला गती
जिल्ह्याच्या विकासाकरिता उद्योग, व उद्योगाकरिता दळणवळणाच्या पायाभूत सुविधांची नितांत आवश्यकता असते. जिल्ह्यात वडसा-गडचिरोली या नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी वन, शासकीय व खाजगी क्षेत्रातील एकूण 220.468 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. 24 गावातून प्रस्तावित 52.68 कि.मी. रेल्वे मार्गापैकी 20.81 कि.मी. मार्गीकेचे बांधकाम सुरू झाले आहे. यासोबतच गडचिरोली ते भानुप्रतापपूर (छत्तीसगड) या 133 कि.मी. नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. गडचिरोली ते बचेली या ४९० कि.मी. रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी अंतिम सर्वेक्षण आणि डिपीआर तयार करण्याकरिता रेल्वे मंत्रालयाने नुकताच निधी मंजूर केला आहे. या रेल्वे मार्गांमुळे तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या व्यापारपेठा गडचिरोलीला नवीन संजीवनी देतील. रेल्वे मार्गाद्वारे देशातील इतर भागाला हा जिल्हा जुळल्याने आर्थिक विकासाला चालना मिळून नवनवीन उद्योगांना आकर्षित करण्यास मदत होईल.

गडचिरोली विमानतळावर विकासाचे उड्डाण
गडचिरोली येथे विमानतळाच्या निर्मितीसाठी शासनाद्वारे जागेचा पूर्व अभ्यास व पाहणी तसेच ओएलएस सर्व्हे जानेवारी 2024 मध्ये पूर्ण करण्यात आला आहे. आता जागेच्या भूसंपादनास मंजूरी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे.

समृद्धीचा महामार्ग
जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधा विस्तारतांना केंद्र शासनाच्या महत्वांकांक्षी ‘भारतमाला’ प्रकल्पांतर्गत गडचिरोली ते करिमनगर आणि गडचिरोली ते दुर्ग या महामार्गाद्वारे गडचिरोली जिल्हा तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांतील आर्थिक कॉरिडॉरला जोडला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 67 गावातून 82 कि.मी. चा चारपदरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलण्याचे सामर्थ्य असलेला व महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरू पाहणारा ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ गडचिरोलीपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यात अंतर्गत रस्त्यांचे जाळे विणतांना 487 कि.मी. चे 26 रस्ते बांधकामाचे नियोजन असून त्यापैकी 284 किमी. चे 14 रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. हे महामार्ग व रस्ते गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, सामान्य जनता, उद्योजक व व्यापाऱ्यांकरिता आर्थिक समृद्धीचा महामार्ग घेवून येतील यात शंका नाही.

जलवाहतूक
गडचिरोली हा नद्यांचा प्रदेश म्हणूनही ओळखला जातो. वैनगंगा, गोदावरी, इंद्रावती, वर्धा, प्राणहीता, पर्लकोटा, इंद्रावती पामुलगौतम, गाढवी, खोब्रागडी, पालवेलोचना, कठाणी, शिवणी, पोर आणि दर्शनी या नद्यांचे जाळे येथे पसरले आहे. येथील नद्यांमधून आंध्रप्रदेशच्या बंदरांपर्यंत जलवाहतूकीचा मार्ग तयार करण्यासाठी शासनाद्वारे अभ्यास गट नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री देवेद्र फडणवीस यांनी अहेरी येथे नुकतेचे एका १० हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी दिली आहे.
रस्ते, रेल्वे व हवाई मार्गासोबतच जल मार्गाद्वारे गडचिरोलीला जगाशी जोडून विकासाचे सर्व मार्ग खुले करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

दुर्गम भागात संपर्काचे जाळे
विस्तीर्ण पसरलेल्या जिल्ह्यातील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क पोहचवून प्रभावी संपर्क यंत्रणा विकसित करण्यासाठी 605 नवीन मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी २९३ टॉवरचे काम पूर्ण करण्यात आले असून १९० टॉवरचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शासकीय कार्यालये, आरोग्य यंत्रणा, शाळा, अंगणवाड्या व बँका इंटरनेटने जोडल्या गेल्याने नागरिकांची विविध कामे स्थानिक स्तरावरच मार्गी लागून पैसा व वेळेची बचत होईल.

शैक्षणिक हब
गडचिरोली येथे 2022 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले होते. या महाविद्यालयात येत्या शैक्षणिक सत्रापासून प्रवेशप्रक्रीया सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक सुविधा उपलब्धतेसाठी गोंडवाना विद्यापीठाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. यासाठी नवीन 68 हेक्टर जागा संपादीत करण्यात आली आहे. येथे शैक्षणिक संकुल, विद्यार्थ्यांकरिता वसतीगृहे, प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, कर्मचारी निवासी संकुल व इतर बाबींसाठी 884 कोटी निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यापैकी पी.एम. उषा योजनेंतर्गत नुकतेच 104 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हास्तरीय उपक्रम
जिल्हा प्रशासनाद्वारे लोककल्याणाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात ग्रामसभांचे बळकटीकरणासाठी ‘एकल’, डिजिटल शिक्षणातून कौशल्य विकासकरिता ‘अल्फा अकादमी’, किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूकतेकरिता ‘दिशा’, पायाभूत साक्षरता वाढविण्यासाठी ‘फुलोरा, ॲनिमिया आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘मुस्कान, तरुणांना उद्योग प्रशिक्षण देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इनक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर तसेच ‘पोलीस दादालोरा खिडकी’या उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय ‘शासन आपल्या दारी’योजनेतून एकूण 6,97,619 लाभांचे वितरण आणि मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण योजनेतून 10,38,018 लाभांचे वाटप करण्यात आले आहे. शासनाने नुकतेच सुरू केलेल्या जनकल्याणाच्या विविध योजना राबविण्यातही जिल्हा आघाडीवर आहे. यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पहिल्या टप्पयात १ लाख 53 हजार ३३० महिलांना लाभ मंजूर करण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत राज्यातील पहिली लाभार्थी निवड गडचिरोली जिल्ह्यातूल झाली तर सद्यस्थितीत या योजनेंतर्गत नागपूर विभागात गडचिरोली जिल्हा नियुक्तीपत्र देण्यात सध्या अग्रस्थानावर आहे. ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गतही ४७ हजार अर्ज मंजूर करून जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या’ लाभासाठी २५ हजार २३० लाभार्थी पात्र आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब लाभार्थीच्या 2 लाख 22 हजार शिधापत्रिकाधारकांना दरमाह मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत’ रोजगाराची मागणी केलेल्या प्रत्येकाला म्हणजे तब्बल 85 हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देत 25 लक्ष मनुष्यदिन निर्मिती साध्य करण्यात आली आहे.

उद्योग, दळणवळण यंत्रणा, उच्चशिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण आदी विविध उपक्रम व सुविधा उभारणीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा शासनाचा संकल्प अधोरेखित झाला आहे. विकास मालिकेची ही सुरूवात असली तरी जिल्ह्यातील परिवर्तनवादी उपक्रमांना शासन, प्रशासन व नागरिकांचे पाठबळ मिळाल्याने, गडचिरोलीचा राज्यातील प्रगती व संधीचे क्षेत्र म्हणून जलदगतीने उदय होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील विकास कामे तत्परतेने पूर्ण करून घेण्यासाठी सातत्याने लक्ष ठेवून आहेत. तर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एका कार्यक्रमात ‘गडचिरोली अब दौडेगा’या सूचक विधानातून गडचिरोलीच्या विकासाची लय व गती स्पष्ट केली आहे. राज्य व स्थानिक नेतृत्वाद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. जिल्हा व पोलिस प्रशासन विकास योजनांची प्रभावी अमलबजावणी व लोकाभिमुख कार्यातून नागरिकांचा विश्वास जिंकत आहेत. मागास आणि नक्षलग्रस्त ही ओळख पुसण्यासाठी उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती व कौशल्य विकासातून क्षमताबांधणी या विकासाच्या मार्गावर पडणारे पाऊल येत्या काळात गडचिरोली जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण करेल, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

 

गजानन जाधव,

जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.

मंत्रिमंडळ निर्णय

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना  मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे समितीच्या शिफारशीतले तत्व मान्य करुन राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५०% इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तिवेतनाच्या ६०% इतके कुटुंब निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल. वरीलप्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना १ मार्च, २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या व १ मार्च, २०२४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्तीपश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते २९ फेब्रुवारी, २०२४ पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वार्षिकी (Annuity) मधीलच लाभ लागू राहतील व १ मार्च, २०२४ पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्तिवेतनधारकास या योजनेंतर्गत निवृत्तिवेतन देण्यात येईल.

या योजनेतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी (वर्गणीशी) निगडीत असेल. ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल.

सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी वा नंतर काढलेली रक्कम १०% व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्तिवेतन त्या प्रमाणात अनुज्ञेय ठरेल.

यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यावर तसेच ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसमवेत अन्य कर्मचाऱ्यांसंदर्भाने सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमधून १ मार्च २०२४ पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल. मात्र या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमधील त्यांचे अंशदान अद्यावत भरणा केलेली असणे आवश्यक राहील. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या ६०% परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर Annuity Service Provider कडून प्राप्त होणारे ४०% वार्षिकीमधून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या योजनेंतर्गत निवृत्तिवेतन अनुज्ञेय ठरेल. त्यासंदर्भाने या योजनेच्या अटी व शर्ती विहित करुन त्यासंदर्भातील कार्यपध्दती PFRDA च्या मान्यतेच्या अधिन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषि विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्तप्रमाणे अटींची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील. तसेच हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील.

—–०—–

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार योजनेचा विस्तार

राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० राबविण्यात येत आहे. या मिशन मोडवरील या योजनेतून २०२५ पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवून ९००० मेगावॅट अधिक उर्वरीत ७००० मेगावॅट असे १६ हजार मेगावॉट विकेंद्रित सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

यात वीज उपकेंद्राची देखभाल व सुधारणा, प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य, ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व Revolving Fund या आर्थिक प्रोत्साहनासाठी सन २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीसाठी २ हजार ८९१ कोटी इतका अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी सन २०२४-२५ या वर्षीच्या ७०२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली.

केंद्र शासनाच्या केंद्रीय आर्थिक सहाय्य निधीच्या धर्तीवर राज्य शासनाकडून उर्वरित क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती करिता राज्य सरकार आर्थिक साह्य निधी ३०% (SGF) देण्यास व त्यासाठी सन २०२४-२५ ते सन २०२६-२७ या कालावधीसाठी एकूण १० हजार ४१ कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. याअंतर्गत सन २०२५-२६ साठी ६ हजार २७९ कोटी व सन २०२६-२७ साठी ३ हजार ७६२ कोटी इतक्या निधीच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली.

राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णता मोफत वीज पुरवली जाणार आहे. याकरिता १४ हजार ७६१ कोटी रुपये वार्षिक अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महावितरणचा सरासरी वीज खरेदीचा दर कमी होणार आहे. यातून आगामी काळातील कृषी क्षेत्रासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शासनावरील आर्थिक भार कमी होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा वीजदर सवलत योजना यशस्वीपणे राबविता येणार आहे.

—–०—–

सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जागा

सायन येथील म्हाडाची जमीन सहकार भवनासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ३० वर्षाकरिता भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

म्हाडाने या भूखंडाच्या २४ कोटी २३ लाख ३५ हजार ५३९ कोटी ४० लाख इतक्या किंमती ऐवजी सध्याचा शिघ्रगणकाचा बाजारभाव विचारात घेऊन या भूखंडावर बांधकाम करण्यात येणाऱ्या इमारतीत वाणिज्य आणि व्यापारी सर्व सोयी सुविधांसह २०३४.५५ चौ.मी. एवढे बांधीव चटई क्षेत्र म्हाडास मालकी हक्काने हस्तांतरित करण्याच्या अटींवर हा भूखंड देण्यात येईल.

—–०—–

मुंबई महानगरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करणार

शासकीय महामंडळे, प्राधिकरणांमार्फत मुंबई महानगरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

एकूण २२८ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यातून पूर्ण करण्यात येतील.  त्यामुळे २ लाख १८ हजार ९३१ सदनिका बांधण्यात येतील.  बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, सिडको, महाप्रित, एमआयडीसी, महाहाऊसिंग, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, एमएमआरडीए अशा महामंडळे आणि प्राधिकरणांना यासाठी संयुक्त भागीदारी तत्त्वावर हे प्रकल्प हाती घेण्यास मान्यता देण्यात आली.

—–०—–

पाचोऱ्याच्या सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आशीर्वाद सहकारी सूत गिरणी शासकीय अर्थसहाय्य देण्याचा  निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या गिरणीस वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ नुसार अटींच्या अधीन राहून १०:४०:५० या आकृतीबंधानुसार अर्थसहाय्य करण्यात येईल.

—–०—–

बार्टीच्या त्या ७६३ विद्यार्थ्यांना संपूर्ण अधिछात्रवृत्ती

बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा  निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यापूर्वी अधिछात्रवृत्ती योजनेतील २०२२ च्या विद्यार्थ्यांना ५० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.  विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने सारथी आणि महाज्योती प्रमाणेच या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्यात येईल. यासाठी एकूण सुमारे ३७ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली.

—–०—–

वारणा विद्यापीठास समुह विद्यापीठाचा दर्जा

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील वारणा विद्यापीठास समुह विद्यापीठाचा दर्जा देण्याचा  निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या समुह विद्यापीठास तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयांचा समावेश असेल.

—–०—–

ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना

राज्यातील सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हातारपण, बेरोजगारी, आजारपण, विकलांगता यामध्ये संरक्षण मिळेल आणि त्यांचा वृद्धापकाळ सुसह्य होण्यास मदत होईल. या महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असेल आणि महामंडळाचे भागभांडवल ५० कोटी इतके असेल.

——०—–

कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण कारखान्यांच्या संचालक मंडळावर जबाबदारी

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकांकडून कर्जासाठी शासन हमी देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जबाबदार राहतील अशी अट टाकण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
संबंधित संचालकांनी कर्ज वितरणापूर्वी बंदपत्र सादर करावयाचे आहे. सध्याच्या संचालक मंडळातील संचालक मयत किंवा अपात्र झाल्याने नव्याने पदभार घेतलेल्या संचालकांनी पदभार घेतल्यापासून १० दिवसाच्या आत या संदर्भात बंदपत्र द्यायचे आहे. या कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत निवडून आलेल्या संचालकांकडून पदभार घेतल्यापासून ३० दिवसांच्या आत बंदपत्र द्यावयाचे आहे.
यापूर्वी वैयक्तिक मालमत्तेवर कायदेशीर बाबींची पूर्तता करून या कर्जाचा बोजा चढविण्यात यावा अशी अट होती. त्याऐवजी वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जबाबदारी टाकण्यात आली आहे.

—–०—–

पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार; पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिकचे पाणी उपलब्ध होणार

खडकवासला प्रकल्पाच्या नविन मुठा उजवा कालव्याच्या फुरसुंगी बोगदा प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बोगद्यामुळे पुणे परिसरास सिंचन आणि पिण्यासाठी अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या नविन मुठा उजवा कालव्याचा कि.मी. १ ते ३४ लांबीचा भाग पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून जातो. पुणे शहराची सर्वांगिण बाजूने होणारी वाढ, झोपडपट्टी, अतिक्रमणे व पर्यायाने होणारे जलप्रदुषण, जलनाश यामुळे कालव्याची हानी झाली आहे. त्यामुळे कालव्याच्या वहनक्षमतेत झालेली घट टाळण्यासाठी नविन मुठा उजवा कालव्याच्या कि.मी.१ ते ३४ मधील लांबीसाठी पर्यायी खडकवासला ते फुरसुंगी पर्यंत बोगदा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे २.१८ टि.एम.सी. पाणी बचत होणार आहे. यातून सिंचनासाठी तसेच बिगर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून सिंचनापासून वंचित राहणारे ३४७१ हेक्टर इतके क्षेत्र पुरस्थापित होणार आहे. या प्रकल्पासाठी २ हजार १९० कोटी ४७ लाख रुपयांच्या तरतुदीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

—–०—–

कळंबोलीतील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ

पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली येथे अॅनिमल केअर सेंटर फाऊंडेशन संस्थेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा तसेच सेवाशुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अॅनिमल केअर सेंटर फाऊंडेशन संस्था ही मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. नवी मुंबईमध्ये रस्त्यावरील भटके प्राणी, पाळीव प्राणी व इतर यांचेसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून प्राण्यांना पशु वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी संस्था काम करणार आहे. ही संस्था ना-नफा ना तोटा या तत्वावर काम करते. संस्थेमार्फत हॉस्पीटल अंतर्गत पशु वैद्यकीय सेवा जसे अतिदक्षता विभाग, एम.आर.आय., सी.टी. स्कॅन इत्यादि सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबत सिडकोने प्रस्ताव सादर केला असून, संस्थेला नवी मुंबई येथील सेक्टर ९ई मधील भूखंड क्र.७+८ व ९ए, एकत्रित क्षेत्र सुमारे ४००० चौ.मी. वाटप केले आहे. या भूखंडांवरील मार्च-२०२४ अखेरपर्यंतचे अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क व जून, २०२४ अखेरपर्यंतचे सेवाशुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आली.

—–०—–

गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ

आरोग्य विभागांच्या गटप्रवर्तकाच्या मानधनात चार हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

आरोग्य क्षेत्रात गटप्रवर्तकांना क्षेत्रीय भेटीच्या व आशांवरील पर्यवेक्षणाच्या दृष्टीने दौरे करावे लागतात. त्यादृष्टीने त्यांना वाढीव मानधन देण्यास मान्यता देण्यात आली. हे वाढीव मानधन एप्रिल, २०२४ पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली. या खर्चापोटी १७ कोटी ५९ लाख रुपयांच्या वार्षिक आवर्ती खर्चास आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूरी घेण्यात येणार आहे.

—–०—–

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास निधी देणार

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मौ.गोळेश्वर येथील ऑलिम्पिकवीर स्व.पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास २५ कोटी ७५ लाख सुधारित निधी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यापूर्वी या संकुलास ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.  या कुस्ती संकुलात आवश्यक त्या इमारती,  क्रीडा सुविधा देण्यात येतील.  यामध्ये प्रशिक्षण केंद्र, हॉल याचाही समावेश आहे.

—–०—–

थकीत देण्यांसाठी महावितरणला कर्ज घेण्यास शासन हमी

महावितरण कंपनीस थकीत देणी देण्यासाठी सुमारे २९ हजार कोटी रुपये कर्जाची आवश्यकता असून त्यासाठी शासन हमी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

आरईसी आणि पीएफसी या वित्तीय संस्थांकडून हे कर्ज उभारण्यात येणार आहे. एकूण २० हजार ३८८ कोटी कर्ज व ९ हजार ६७० कोटी व्याज असेल.

—–०—–

नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता; नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा

नाशिक, जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या प्रकल्पाची किंमत ७ हजार १५ कोटी २९ लाख एवढी आहे. या नदी जोड प्रकल्पातून नार, पार, औरंगा या तीन नदींच्या खोऱ्यातून ९ धरणांमधून ९.१९ टीएमसी पाणी उचलून १४.५६ कि.मी. बोगद्याद्धारे गिरणा नदी पात्रात चनकापूर धरणाच्या बाजूस पाणी सोडण्यात येईल. सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे.

—–०—–

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्ट पर्यंत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासंदर्भात महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यात येईल. लोकसभा निवडणुकांमुळे सर्वसाधारण बदल्यांवर निर्बंध होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

ठाणे येथील क्लस्टर योजनेसाठी महाप्रित ५ हजार कोटी उभारणार

ठाणे येथील महत्वाकांक्षी नागरी पुनर्निर्माण कार्यक्रमांतर्गत क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या महाप्रित या कंपनीस ५ हजार कोटी इतका निधी गुंतवणूकदारांकडून इक्वीटी व कर्जरोख्याच्या स्वरुपात उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेत ६ हजार ४९ कोटी इतका खर्च अपेक्षित असून टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर भागात क्लस्टर गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येईल. त्याचप्रमाणे भिवंडीतील चाविंद्रे, पोगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका, चंद्रपूर महापालिकेअंतर्गत म्हाडाच्या कोसरा येथे सदनिका, यवतमाळ व वडगाव येथील सदनिका, ठाणे, नागपूर व पुणे महापालिकेत अक्षय ऊर्जा खर्च बजेट मॉडेलवर  आधारित प्रकल्प, मुंबई महानगरात ईव्ही पार्क, मेडीसिटी, मॅनग्रोव्ह पार्क, केमिकल हब, डिजिटल युनिव्हर्सिटी हे प्रकल्प देखील राबविण्यात येतील.  या सर्व प्रकल्पांना मिळून १० हजार कोटी रुपये लागतील.

—–०—–

श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या संरजाम जमिनींची सूट कायम

श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या संरजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे राज्याच्या इतिहासातील अनन्य साधारण महत्त्व विचारात घेऊन व श्रीमंत भोसले कुटुंबियांची उपजिविका यांच्या दर्जानुसार व्हावी यासाठी या घराण्याच्या खासगी जमिनी व इतर मालमत्ता यांना द बॉम्बे सरंजाम्स, जहागिर्स अँड अदर इनाम्स ऑफ पॉलिटीकल नेचर, रिझम्शन रुल्स १९५२ मधून त्या त्या आदेशात नमूद अटीं व शर्तींवर सूट देण्यात आली आहे.  ही सूट श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या हयातीनंतर वंश परंपरेने त्यांच्या लिनियल वारसांना चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या निर्णयास अधिन राहून असेल.

—–०—–

सनदी लेखापालांनी भारताच्या ‘बिग- फोर’ कंपनी निर्माण कराव्यात – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

मुंबई, दि. २५: विकसित भारताचे उद्दिष्ट साकारण्यासाठी तसेच भारताला तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी सातत्यपूर्ण व सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे.  हे उद्दिष्ट गाठताना जनसामान्यांपेक्षा सनदी लोकपालांना अनेक पटींनी अधिक योगदान द्यावे लागेल असे सांगताना  सनदी लेखापालांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेखा परीक्षण व कर सल्लागार कंपन्या निर्माण कराव्या, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे केले.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया सनदी लेखापालांच्या राष्ट्रीय संस्थेच्या  पश्चिम क्षेत्रीय विभागातर्फे आयोजित ३८ व्या क्षेत्रीय परिषदेचा समारोप शनिवारी (दि. २४) राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

सनदी लेखापाल हे शासन आणि उद्योग जगतातील दुवा असून अंबानी, अदाणी यांचेपासून लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांसह जनसामान्यांना योग्य तो सल्ला देण्याचे कार्य करीत असतात.  कोणतीही कंपनी ‘सत्यम’च्या वाटेने जाऊ नये या करिता काय योग्य आहे काय अयोग्य आहे तसेच पूर्वी झालेल्या चुका कश्या प्रकाराने टाळता येऊ शकतात याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

सशक्त सनदी लेखापाल, विकसित भारत या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे अभिनंदन करून सनदी लेखापालांनी राष्ट्रनिर्माण कार्यात तसेच समृद्ध भारताच्या निर्मितीत भागीदार व्हावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

आयसीएआय घडवणार पंचायत व पालिका लेखापाल : अंकीत राठी

आयसीएआय ही संस्था पंचायती व महापालिकांमध्ये आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने कार्य करीत असून नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्या सहकार्याने संस्थेने पंचायत तसेच पालिकांमध्ये लेखापाल निर्माण करणार असल्याची माहिती आयसीएआयचे पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष अंकीत राठी यांनी यावेळी दिली. या दृष्टीने आयसीएआयने   बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ महिन्यांचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंचायत व पालिका लेखापालांना अंदाजे चाळीस हजार रुपये वेतन मिळेल असे त्यांनी सांगितले.  अश्या प्रकारे आयसीएआय कौशल्य विकास करून युवकांना रोजगार सक्षम करीत आहे. देशातील केवळ २७ टक्के लोक आर्थिक दृष्ट्या साक्षर असून आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी आयसीएआय संस्था १२ भारतीय भाषांमधून  जनतेचे वित्त व लेखा विषयांवर प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समारोप सत्राला सनदी लेखापाल रणजीत कुमार अग्रवाल, अध्यक्ष, आयसीएआय, राहुल पारीख,  उपाध्यक्ष,पश्चिम क्षेत्र, गौतम लथ, सचिव तसेच पश्चिम क्षेत्रातील सनदी लेखापाल उपस्थित होते.

00000

जसंअ, राजभवन

‘भारतीय न्याय संहिता’ या विषयावर ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि.२५ :  देशात १ जुलै २०२४ पासून नवीन फौजदारी कायदे लागू झाले असून भारतीय न्याय संहिता व अन्य कायद्यांबाबत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांची मुलाखत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखतीत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांनी देशात १ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन नवीन कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत, सोमवार दि.२६ आणि मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.२५  ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

—— 000 —–

नांदेड रेल्वे स्टेशन देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन बनविणार : रवनीत सिंघ

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांच्या हस्ते पाच तख्त साहिबांची विशेष रेल्वेला हिरवी झेंडी

नांदेड दि. 25  (जिमाका)- नांदेड हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंघजी यांचे वास्तव्य असलेली पावन भुमी असून या भुमीत त्यांनी सर्व जगाला मानवतेची शिकवण दिली आहे. अशा या पावनभूमीतील नांदेडचे रेल्वे स्टेशन हे येत्या कालावधीत सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेले देशातील सर्वोत्तम रेल्वे स्टेशन करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी केले.

गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 25 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यत पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आज हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशन येथून दुपारी 12.30 वाजता या यात्रेचा प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी या विशेष ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

यावेळी आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, संत बाबा कुलवंत सिंघजी, समुह पंच प्यारे साहिबान, संत बाबा बलविंदर सिंघजी, आयोजक रविंद्रसिंघ बुंगई, दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे आदींची उपस्थिती होती.

नांदेड रेल्वे स्टेशन येथून आज पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वेला रवाना करण्यात आले. या यात्रेत 1 हजार 300 भाविकांचा समावेश असून ही यात्रा पटना, दिल्ली, अनंतसाहिब फतेहगडसाहिब सरहंद, दमदमासाहिब भटींडा, दरबारसाहिब अमृतसर येथे पोहोचणार आहे. तसेच ही यात्रा 6 सप्टेंबर रोजी नांदेडला पोहोचणार आहे. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी लंगर, वाहनांची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था केली आहे.

00000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दीदींशी संवाद; आर्थिक सक्षमतेबरोबर आत्मसन्मान मिळाल्याची लखपती दीदींची भावना

जळगाव,दि.25 (जिमाका) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जळगाव येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केली.

 

येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर झालेल्या लखपती दिदी संमेलनापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक अशा 80 लखपती दीदींशी संवाद साधला. या लखपती दिदी संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बॅंक सखी दिदी, ड्रोन दिदी, पशु दिदी, कृषी दिदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

०००००००

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाचे आयोजन

अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण; पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित

जळगाव, दि. 25 (जिमाका): भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरीबांसाठी घरकूल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत चार कोटी घरकूल वाटप करण्यात आली असून आगामी काळात 3 कोटी घरे बांधण्यात येतील, त्यात महिलांचे नाव प्रथम असेल, असेही त्यांनी सांगितले.

जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीअल पार्क येथे (विमानतळ परिसर) देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेन्नासानी, केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, आमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेच, कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्र ही राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आहे. या राज्याला मातृशक्तीचा समृध्द आणि गौरवशाली वारसा लाभला आहे. त्याचा परदेश दौऱ्यात वेळोवेळी प्रत्यय येतो. अलीकडेच पोलंड दौऱ्यात या संस्कृतीचे दर्शन घडले. जळगाव जिल्हा सुद्धा संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी आजही प्रत्येकाच्या ओठावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आपल्या देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोलाचा असून लखपती दीदी योजना ही त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.  मागील एका महिन्यात 11 लाख दीदी लखपती बनल्या आहेत, यात एक लाख दीदी महाराष्ट्रातील आहेत. त्यासाठी राज्य शासन ही पुढाकार घेत आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकीकडे विकसित राष्ट्र म्हणून त्या दिशेने काम सुरु असताना महिलांच्या समस्या सोडविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांसाठी 3 कोटी घरे बांधताना ती त्यांच्या नावावर केली जातील. याशिवाय केंद्र सरकारने जनधन खाते उघडले. मुद्रा योजना सुरू केली. विना तारण कर्ज दिले. यात 70 टक्के महिला आहेत. महिलांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला विश्वास आहे. त्यांच्यासाठी  स्व- निधी योजना सुरू केली. विश्वकर्मा परिवार अंतर्गत महिलांना जोडले. सखी मंडळ मार्फत 10 कोटी महिला जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांना गेल्या दहा वर्षांत 9 लाख कोटींची मदत केली, असे त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, बचतगटांच्या महिलांना ड्रोन पायलट बनविणार असल्याचे सांगून  त्यासाठीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल. आधुनिक शेतीसाठी महिलांना प्रेरित कऱण्यात येईल. यासाठी महिलांना कृषी सखी करून रोजगार वाढविण्यावर भर राहील. महिलांसाठी अर्थसंकल्पात 3 लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. सेनादलात महिलांचा समावेश केला गेला आहे. स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दोषींना कडक शासन व्हावे, यासाठी भारतीय न्याय संहिते अंतर्गत कायद्याचा वापर केला जाईल. महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महिलांचे सामर्थ्य वाढविण्याबरोबरच त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. यासाठी आवश्यक ती मदतही प्रत्येक राज्यांना केली जाईल, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत राहील. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. रोजगार आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष येथे असते. त्यामुळे या प्रयत्नांसाठी राज्य शासनाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाविकांना आदरांजली

दरम्यान, आपल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या यात्रेकरूंबाबत दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने पावले उचलली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना तातडीने नेपाळला पाठविले. या दुर्घटनेत जखमींवर चांगले उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजनेंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली. मुलींना  उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

देशात 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, यात राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील. अनेक भगिनी पुढाकार घेवून लघु उद्योग करून कुटूंबाला पुढे नेत आहेत. राज्यात 25 हजार स्वयंसहायता गटांना  30 कोटींची कर्जे देण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळत आहे. केंद्र शासनाने 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली. राज्यातील कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने आणि सिंचन प्रकल्पांना निश्चितपणे मदत करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना  शिवराज सिंह चौहान

लखपती दीदी ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि विकासाला वेग देणारी योजना आहे. महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. भरपावसात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल त्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.

देशाच्या विकासात नारीशक्तीचे मोठे योगदान  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला विकासाच्या प्रवाहात आल्यास देशात प्रभावी आणि विकासात्मक बदल घडू शकतो. त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या नारीशक्तीच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहाय्य करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नारीशक्ती ही विविध क्षेत्रात आपले नाव कमावत आहे. देशाच्या  विकासाच्या भागीदारीत महाराष्ट्र कुठेच कमी पडणार नाही.  संत मुक्ताई आणि कवयित्री बहिणाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अशा ठिकाणी हे लखपती दीदीचे संमेलन होत आहे. राज्यात बचतगटामार्फत 75 लाख कुटूंब जोडली गेली असून दोन कोटी कुटूंब जोडण्याचा संकल्प आपण केला आहे. जळगाव जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नार-पार सिंचन योजनेला आपण गती दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर निविदा आणि इतर प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्य शासन नेहमीच महिला भगिनींच्या पाठिशी  उपमुख्यमंत्री अजित पवार

संपूर्ण देशात सुरू असलेला विकासाचा रथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्यात आला आहे.  केळी,  कांदा उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प केला आहे. राज्यात  50 लाख लखपती दीदी बनविण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दरम्यान, आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वंदना पाटील, मनीषा जगताप, ज्योती तागडे, सीमा कांबळे, रमा ठाकूर यांच्यासह शीतल नारेट (हिमाचल प्रदेश), महबूबा अख्तर (जम्मू काश्मीर), गंगा अहिरवार (मध्य प्रदेश), एस. कृष्णावेण्णी (तेलंगणा) आणि नीरज देवी (उत्तर प्रदेश), सेरिंग डोलकर (लडाख) यांना यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बचतगटाच्या 48 लाख महिलांना 2500 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले.

उघड्या जीपमधून प्रधानमंत्री मोदी यांचे भगिनींना अभिवादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रमस्थळी उघड्या जीपमधून आगमन झाले. यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भगिनींना अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. कार्यक्रमस्थळी उभारलेल्या मंडपामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरी मारली. यावेळी उत्साहाने भारावलेल्या वातावरणात उपस्थित भगिनींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते.

0000

आकांक्षित तालुका विकासात जीवती तालुका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

केंद्र शासनाच्या ४थ्या डेल्टा रँकिंगमध्ये पटकाविले स्थान

चंद्रपूर, दि. 24 : विकासाच्या बाबतीत अतिमागास असलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या नीति आयोगाने संपूर्ण भारतात 500 आकांक्षित तालुके घोषित केले आहे. यात महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती या एकमेव तालुक्याचा समावेश असून नुकत्याच जाहीर झालेल्या 4 थ्या डेल्टा रँकिंगमध्ये जीवती तालुक्याने विकासाच्या बाबतीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर पहिल्या क्रमांकावर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आंतरमंत्रालयीन समितीने 27 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशातून 500 तालुक्यांची निवड केली आहे. त्यापैकी या योजनेत महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा समावेश आहे. 4 थ्या डेल्टा रँकिंगमध्ये जिवती तालुक्याने विकासाच्या बाबतीत राज्यातील 27 तालुक्यांमूधन द्वितीय क्रमांक, पश्चिम विभागातील 70 तालुक्यांमधून 21 वा क्रमांक तर संपूर्ण भारतातील 500 तालुक्यांमधून जीवती तालुक्याने 111 वा क्रमांक पटकाविला आहे.

आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, मुलभूत पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आर्थिक समावेश आणि सामाजिक विकास या थीमवर तालुक्यांचा विकास करण्यात येत आहे. या अंतर्गत तीन महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारच्या 40 निर्देशांकांपैकी जीवती तालुक्यात 6 निर्देशांक 100 टक्के साध्य करणे, हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 4 जुलै 2024 रोजी जीवतीमध्ये आकांक्षित तालुका अभियान अंतर्गत संपूर्णत: अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.

असे आहेत जीवती तालुक्यासाठी विशेष निर्देशांक : आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, सामाजिक विकास आणि मुलभूत पायाभूत सुविधा या प्रमुख पाच थीमवर सदर अभियान 4 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या  कालावधीत राबविण्यात येणार आहे. यात 1) गरोदर मातांची पहिल्या तिमाहीमध्ये 100 टक्के नोंदणी करणे, 2) तालुक्यामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वय असणा-या नागरिकांची 100 टक्के उच्च रक्तदाब तपासणी करणे, 3) या वयोगटातील नागरिकांची मधुमेह तपासणी करणे, 4) तालुक्यातील 100 टक्के गरोदर मातांना नियमितपणे पोषण आहार देणे, 5) भुधारकांना मृदा आरोग्य कार्डचे वितरण करणे आणि 6) तालुक्यातील 100 टक्के बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे.

0000000

रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होत राहणार – विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

नंदुरबार, दि. 24 ऑगस्ट : महिलांना समाजासह, कुटुंबात सन्मान मिळावा, त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासनाने  सुरू केली आहे. जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे, त्याचप्रमाणे लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

त्या जिल्ह्यातील सोयरापाडा ता. अक्कलकुवा येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या मेळाव्यात बोलत होत्या यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमशा पाडवी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगिता चव्हाण, जि.प.चे समाज कल्याण सभापती तथा सदस्य शंकर पाडवी,पंचक्रोशीतील सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य लोकप्रतिनिधी तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, माझ्या कामाची सुरवात आदिवासी भागातील महिलांच्या प्रश्नातून झाली आहे.  महिलांमध्ये लक्ष्मी,दुर्गा, सरस्वती असते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, दहेली जलसिंचन प्रकल्पाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत होता. धरण झाले त्याच्यावर 422 कोटींचा खर्च करूनही त्याला कालवे नव्हेत, या कालव्यांना मान्यता देण्याचे काम या शासनाने केले आहे. या धरणामुळे 26 गावातली 3 हजार 200 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. येणाऱ्या काळात या आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलकुवा उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देणार असून खापर येथे चांगले तालुका रुग्णालय व्हावे यासाठीही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर  मोलगी येथेही उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या,जसे रेशन वर्षानुवर्षे मिळत आहे. तसे लाकडी बहिण योजनेचे पैसे देखील मिळत राहतील. त्यासाठी निवडणूकीत चांगली कामे करणारी माणसं निवडून देण्याची दबाबदारी नागरीकांची असते. पुढच्या सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातले रस्ते चकाकण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या, बॅकामधली गर्दी पाहता बॅंकांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्याच्या  व बॅकांमध्ये कामानिमित्त आलेल्या महिलांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करुन देण्यासाठी सूचना केल्या जातील. अशा रांगांमध्ये उभ्या असलेल्या महिलांसाठी स्वत:च्या निधीतून चहापाणी आणि नाश्त्यासाठी निलम गोऱ्हे  यांनी दोन लाखांचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी विधान परिषदेत काम करत असताना, आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी प्रश्न मांडत असताना आपल्याला उपसभापती मिलन गोऱ्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असून त्यामुळे याभागातील अनेक योजनांना गती व न्याय मिळाला आहे.

यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना महिला, भगिनींना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

0000000000

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

उदगीर येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीचे भूमिपूजन
लातूर, दि. 24 : मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर्टी संस्था स्थापन करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातही समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
उदगीर शहरातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. आमदार अमित गोरखे, सचिन साठे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, नगरपरिषद मुख्याधिकारी सुंदर बोंदर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, बन्सीलाल कांबळे, अंबादास सगट यांच्यासह पदाधिकारी, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ना. संजय बनसोडे यांच्यासह मान्यवरांचे फुलांच्या पाकळ्या उधळून स्वागत करण्यात आले. ना. बनसोडे यांच्या हस्ते कुदळ मारून इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून या इमारतीसाठी 14 कोटी 96 लाख रुपये निधी उदगीर नगरपरिषदेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. तळ मजल्यावर पार्किंगची व्यवस्था असलेल्या या इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका असणार आहे.
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे चिराग नगरमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरात वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक होणार असून लवकरच त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
उदगीर शहरात अतिशय मोक्याच्या जागेवर  साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीची उभारणी होत आहे. याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी आणखी 50 लाख रुपये निधी दिला जाईल, असे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच जळकोट शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि भव्य सभागृह उभारण्यात आले आहे. उदगीर शहरात विविध ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज भवन उभारण्यात आल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
राज्य शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करीत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. पुढील काळात ही रक्कम दुप्पट करण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासन मातंग समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. बार्टीच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या आर्टी संस्थेमुळे मातंग समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षा, संशोधनासाठी मदत होवून समाजाचा विकास होईल, असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्य, कष्टकरी माणसाचे जीवन रेखाटले. या समाजाच्या विकासाबाबत चिंतन करून साहित्य निर्मिती केली. त्यांचे विचार प्रत्येकाने समजून घेवून कोणताही जातीभेद न मानता समाजासाठी काम करावे, असे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यावेळी म्हणाले.
प्रा. अंबादास सगट, रामचंद्र तिरुके, बन्सीलाल कांबळे, पप्पू गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पंडीत सूर्यवंशी यांनी केले, शिवाजी देवताळे यांनी सूत्रसंचालन केले.

ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई  देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे

0
नांदेड, दि. १४ जून :- मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, वादळी वारा सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे....

साजूर, तांबवे, किरपे, शेनोली रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील  साजूर, तांबवे, किरपे  शेनोली गावातील रस्त्याच्या  कामामुळे गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे...

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाणाचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री...

रोजगार हमी योजनेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री संजय राठोड

0
रोहयो कामे, पीएम आवास, स्मार्ट पीएचसीचा आढावा विहिरीचे आदेश पंचायत समितीतून थेट लाभार्थ्यांना द्या यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून नाट्यगृहाची पाहणी

0
यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची आज पाहणी केली....