रविवार, जून 15, 2025
Home Blog Page 537

राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी धैर्यशील पाटील आणि नितिन पाटील यांची बिनविरोध निवड

राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी धैर्यशील पाटील आणि नितिन पाटील यांची बिनविरोध निवड

मुंबई, दि. २६ : राज्यसभेच्या राज्यातील दोन रिक्त जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. नितिन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन जागांवर नितिन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित अर्जदार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा दूधगंगा धरण प्रकल्पातील धरणग्रस्तांना दिलेल्या नोटीसीबाबत बैठक झाली. त्यानंतर माद्याळ, ता. कागल येथील गायरान गट नंबर ३९ पै. क्षेत्र ०.१० हे. आर इतकी जमीन सामाजिक सभागृहासाठी उपलब्ध करणेबाबत बैठक झाली. यात प्रस्तावावरती तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश घेण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या.

संजय दादू पाटील, तानाजी शिवाजी सामंत व प्रदीप बाळासो पाटील, रा. केंबळी, ता. कागल, जि. कोल्हापूर यांची गट नं. ११६ मधील प्लॉटधारकांची ७/१२ व ८ अ पत्रकी नोंदीबाबत बैठक झाली. श्री लक्ष्मी आजी-माजी सैनिक कल्याणकारी संस्था, हासूर खुर्द यांनी जागा उपलब्ध करुन मिळणेबाबत केलेल्या विनंती अर्जाबाबत बैठक झाली. आंबेओहळ प्रकल्पातील संकलन दुरुस्तीच्या प्रलंबित असलेल्या रिव्हीजन प्रकरणाबाबत व मौजे चाफोडी तर्फे ऐनघोल, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर या गावाचे पुनर्वसन करणेबाबत बैठकीत चर्चा झाली. हुपरी गावातील छत्रपती शिवाजी नगर व इतर तत्सम भागांचा सिटी सर्व्हे होऊन प्रोपर्टी कार्ड देणेबाबत आणि कागल- मुकेश महुरे-प्रॉपर्टी कार्ड तसेच इचलकरंजी कबनूर – प्रॉप्रटी कार्ड श्री मुल्लाणी व उत्तूर गावठाण मधील प्लॉट नियमानुकूल करणेबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला नियमानुसार लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

००००

कामगार कल्याणासाठी शासन कटिबद्ध –  पालकमंत्री डॉ . सुरेश खाडे

सांगली ( जि.मा.का. ) दि. २६ : राज्यात सुमारे ५ लाख ८ हजार घरेलू कामगारांची नोंदणी झाली असून, आपल्या मंत्रिपदाच्या कालखंडात सुमारे ३० हजार ५०० इतक्या घरेलू कामगारांची नोंदणी महामंडळात करण्यात आली आहे . या घरेलू कामगारांच्या कल्याणासाठी शासन पर्यायाने आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ .सुरेश खाडे यांनी दिली.

मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्यावतीने, आज घरेलू कामगारांना गृह उपयोगी वस्तु संचचे वितरण पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ ,सहाय्यक कामगार आयुक्त (कोल्हापूर) विशाल घोडके, सहाय्यक कामगार आयुक्त (सातारा) आर.एन.भिसे, सहाय्यक कामगार आयुक्त (सांगली) मुजम्मिल मुजावर ,माजी नगरसेविका तथा घरेलू कामगार संघटक स्वाती शिंदे, श्रीमती सुमन खाडे आदी उपस्थित होते .

ते पुढे म्हणाले ,घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंद असणाऱ्या कामगारांसाठी विभागामार्फत चार लाभार्थी योजना सुरू असून, मागील वर्षभरात या कामगारांना विविध योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 88 लाख इतकी लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर मंडळामार्फत अदा करण्यात आली .सांगली जिल्ह्याचा विचार करता 2 हजार 424 इतक्या कामगारांची नोंद झाली असून आज या मेळाव्यामध्ये 1324 घरेलू कामगारांना अंदाजित 9हजार रुपये इतक्या किंमतीच्या भांड्यांचा संच वाटप करण्यात आला आहे .उर्वरित घरेलू कामगारांनाही लवकरच मेळावा घेऊन त्यांनाही याचे वाटप केले जाईल असे सांगितले .

यावेळी श्रीमती प्रणाली कोळी व रूपाली पन्हाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ तर आभार प्रदर्शन सहाय्यक कामगार आयुक्त श्री. मुजावर यांनी केले .

बालगंधर्व नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमासाठी श्रीमती ज्योती कांबळे, प्रवीण लावंड, अनघा कुलकर्णी, अरुण राजमाने, काकासाहेब धामणे, स्नेहल जगताप , आम्रपाली कांबळे,अनुप वाडेकर, यांच्यासह हजारो घरेलू कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

00000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप

पुणे, दि.२६: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पूरग्रस्तांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. अनुदानाची रक्कम सर्व कुटुंबांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे, यशवंत माने, तहसिलदार किरण सुरवसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

नागरिकांनी पूर परिस्थितीत अधिक दक्षता घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. खडकवासला धरणातून विसर्ग सोडल्यावर नदीपात्रात प्रवाहाला अडथळा येणार नाही यासाठी महानगरपालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना श्री.पवार यांनी यावेळी दिल्या.

जुलै २०२४ मध्ये अतिवृष्टी व वादळवाऱ्यांमुळे जिल्ह्यात अनेक नागरिकांचे नुकसान झाले होते. ज्या घरात पाणी शिरले अशा कुटुंबांना प्रशासनातर्फे मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शासनाने विशेष बाब म्हणून प्रती कुटुंब ५ हजारऐवजी १० हजार रुपये अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार पुणे शहरातील ७ हजार ९७७ कुटुंबांना ७ कोटी ९७ लाख ७० हजार, हवेली तालुक्यातील ६८२ कुटुंबांना ६८ लाख २० हजार, पिंपरी चिंचवड शहरातील ७ हजार ५१९ कुटुंबांना ७ कोटी ५१ लाख ९० हजार आणि मुळशी तालुक्यातील ९० कुटुंबांना ९ लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे.

याशिवाय वीजेचा झटका लागून मयत झालेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लाख, तर मुळशी तालुक्यातील आदरवाडी येथे दरड कोसळून मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ४ लाखाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश

पुणे, दि. २६: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील पुरुष व महिला स्वतंत्र इमारतीची पुनर्बांधणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय आणि मध्यवर्ती इमारत क्र. २ च्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ करण्यासह वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, असे श्री. पवार यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, महिला व बालविकास डॉ. प्रशांत नारनवरे, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता सुरेंद्र काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलकुमार मुंढे, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक सुनील पाटील आदी उपस्थित होते.

प्रस्तावित प्रादेशिक मनोरुग्णालय येथे २३ हजार २२९ चौ.मी. बांधकाम क्षेत्रफळात बांधण्यात येणाऱ्या इमारतीत पुरुष व महिलांकरिता एकूण ९ कक्ष, कुटुंब कक्ष १, पुरुष व महिला आरोपीकरिता प्रत्येकी १ कक्ष,  लाँड्री, परिचारिका कक्ष, शवगृह असे एकूण १५ कक्षाचे बांधकाम करण्यात येणार आहे. इमारतीत एकूण १ हजार २९ खाटा असणार आहेत. या कामांकरिता १३१ कोटी ७४ लाख रुपयास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नवीन कक्षाचे बांधकाम बेंगळरू येथील राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य व मज्जातंतू विज्ञान संस्थेच्या धर्तीवर करण्यात येणार आहे.

प्रस्तावित मध्यवर्ती इमारत क्र. 2 च्या इमारत बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ २२ हजार ५०० चौ.मी. आहे. हरित संकल्पनेवर आधारित १० मजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये २१८ चारचाकी वाहन व १ हजार ३०९ दुचाकी वाहनाकरिता वाहनतळ असणार आहे. या बांधकामाकरिता ९६ कोटी ३८ लाख रुपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यामुळे पुणे शहरातील विविध विभागांची भाडेतत्वावर असलेल्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच इमारतीत येणार आहे. सद्यस्थितीत अदा करण्यात येणाऱ्या वार्षिक भाड्यातही बचत होणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता या इमारतीचा उपयोग होणार आहे.

प्रस्तावित जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमीलेख कार्यालयाचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ १८ हजार ५०३ चौ.मी. आहे. यामध्ये प्रशासकीय इमारत, जमाबंदी आयुक्त यांचे निवासस्थान, अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता विश्रामगृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. याकरिता ७८ कोटी ६७ लाख रुपयास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

भूमिपूजनापूर्वी श्री. पवार यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र परिसरात उभारण्यात येणाऱ्या महिला व बाल विकास भवन (अहिल्या भवन) कामांची माहिती घेतली. यावेळी परिसरातील जागेचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे, याकरिता वेगवेगळ्या वास्तुविशारदाकडून या भवनाची तीन- चार संकल्पचित्रे तयार करुन घ्यावेत, यातून उत्तम दर्जाचे काम होईल अशा संकल्पचित्राची निवड करावी, अशा सूचना श्री. पवार यांनी केल्या.

आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि.२६ : आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आदिवासी बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देवून आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  केले.

आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनविणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे या विषयाबाबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज राजभवन येथे बैठक झाली.

या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी,ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे,आदिवासी विकास वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी संशोधन, प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडे, पद्मश्री पोपटराव पवार, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, राज्यात आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल. या गावांमध्ये रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, दर्जेदार शिक्षण, शाश्वत कृषी विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे. ही आदर्श गावे ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देण्याबरोबरच आदिवासी बांधवांच्या सबलीकरणाबरोबरच आत्मविश्वास वाढवताना मानक म्हणून काम करतील. आदिवासी बांधवांच्या  सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी प्रयत्न न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्तम शाळा सुरू करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या विद्यार्थ्यांसाठी ‘के जी टू पी जी’ पर्यंतचे उत्तम शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा देऊन आदिवासी विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या विद्यापीठामधून उच्चशिक्षित विद्यार्थी घडले पाहिजेत. आदिवासी बांधवात शाश्वत शेती व व्यावसायिक प्रशिक्षण याबाबत जास्तीत जास्त जनजागृती करावी. यासाठी विविध विभागाचे सचिव आणि सामाजिक संस्थांचे  सहकार्य मोलाचे असणार आहे, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

दरम्यान ‘प्रधानमंत्री जनमन योजने’च्या राज्यातील अंमलबजावणीचा आढावा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतला. यासोबतच आदिवासी बांधवांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता यावा या बांधवांकडे ओळख दर्शविणारे कागदपत्रे वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी दिले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

जन्माष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले भगवान श्री कृष्णाचे दर्शन

मुंबई, दि. २६ : जन्माष्टमीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज जुहू येथील इस्कॉनच्या राधा रासबिहारी मंदिरात जाऊन भगवान कृष्णाचे दर्शन घेतले व आरती केली.

यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जुहू इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष ब्रजहरी दास, विभागीय सचिव देवकीनंदन दास, भक्ती वेदांत संस्थेचे संचालक रसराज दास व उपाध्यक्ष मुकुंद माधव दास उपस्थित होते.

०००

२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे ३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरविणे विषयावर चर्चा

मुंबई, दि.२३: केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग आणि राज्य शासनाचा प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन उपविभाग सामान्य प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२७ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२४’ दि. ३ व ४ सप्टेंबर, २०२४ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र राज्याकडे असून ‘विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरविणे’ (Viksit Bharat : Secure and Sustainable e-Service Delivery) हा या परिषदेचा विषय आहे.

या परिषदेस प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या समारोपास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर पालक मंत्री दीपक केसरकर,   कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा  मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हेही या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेतून सु-प्रशासन तसेच ई- गव्हर्नन्ससाठीच्या उत्कृष्ट संकल्पनांचे आदान-प्रदान होणार आहे. या परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय सुधारणा, रचना व कार्यपद्धती या उपविभागाच्या नवीन नावांची घोषणादेखील केली जाणार आहे. या परिषदेमध्ये सहा मुख्य सत्रे आणि सहा उप-सत्रे होणार आहेत. त्यांमध्ये शासकीय, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील व्याख्याते आणि पुरस्कार विजेते भाग घेणार असून नावीन्यपूर्ण ई-प्रशासन पद्धतींवर चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे. या परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मार्गदर्शनपर भाषणे होणार असून डॉ. जितेंद्र सिंह, केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कार विजेते, व्याख्याते आणि इतर सहभागींसाठी www.nceg.gov.in   या पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे.

०००

पुणे येथील वस्तू व सेवा कर भवन नूतन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २६: येरवडा येथे वस्तू व सेवा कर भवन, नूतन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, विशेष राज्य कर आयुक्त अभय महाजन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, उमाकांत बिराजदार आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी इमारतीतील दालनांची पाहणी केली. मुख्य अभियंता अतुल चव्हाण आणि वास्तुविशारद यांनी इमारतीतील सुविधांची श्री. पवार यांना माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी इमारतीतील फर्निचर, दरवाजे, स्वच्छता आदींच्या अनुषंगाने सूचना दिल्या.

याप्रसंगी पुणे विभागाचे राज्यकर सह आयुक्त प्रकाश पोटे, राजेंद्र अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर आदी उपस्थित होते.

नवीन विस्तारित प्रशासकीय इमारतीचे वैशिष्ट्ये :

ही इमारत तळमजला अधिक ४ मजल्यांची असून इमारतीच्या संकल्पनानुसार अजून ४ मजले वाढवता येऊ शकतील. इमारतीसाठी ६७ कोटी २३ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. एकूण विक्रीकर भवनाचे क्षेत्रफळ २ लाख ६३ हजार ८२५ चौरस फूट असून जुन्या इमारतीचे १ लाख ३८ हजार ५८६ चौ.फू. तर नवीन इमारतीचे क्षेत्रफळ १ लाख १५ हजार २४४ चौ.फू. आहे. वापरण्यात आलेले क्षेत्रफळ ९५ हजार ४७२ चौ.फू. आहे.

प्रकल्पात १५४ चारचाकी पार्किंग, ४०० दुचाकी पार्किंग व्यवस्थेचे दुमजली बेसमेंट बांधकाम, प्रशासकीय कार्यालयासाठी तळमजला अधिक ४ मजले, अद्ययावत फर्निचरसह अधिकारी, कर्मचारी यांची दालने. अधिकाऱ्यांसाठी १६० दालने, ६०० कर्मचाऱ्यांची बसण्याची संख्या, ७० नागरिकांसाठी प्रशस्त अद्ययावत बैठक हॉल व २ लहान बैठक हॉल, प्रत्येक मजल्यावर १५० अधिकारी, कर्मचारी यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था. तळमजल्यावर १२ हजार चौरस फुटाचा अभिलेख कक्ष, प्रशस्त अभ्यागत दालन व चार उद्वाहन अशी व्यवस्था आहे.

विक्रीकर भवनाची सध्याची इमारत १९९९ साली बांधण्यात आलेली आहे. जुलै २०११ मध्ये झालेल्या विक्रीकर खात्याच्या पुनर्रचनेनुसार तसेच वस्तू व सेवा कर कायदा अंमलात येत असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्या संख्येत आणखी सुमारे ३० टक्के वाढ होणार असल्यामुळे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सप्टेंबर २०११ मध्ये या सध्याच्या प्रशासकीय इमारतीस लागून पूर्व बाजूस एक नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २२:- जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले लोकाभिमुख नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच लोकसभा सदस्य असा त्यांचा राजकीय आलेख राहिला आहे. घरातून मिळालेला समाजकारण, राजकारणाचा वारसा चालवताना त्यांनी नेहमीच लोकाभिमुख भूमिका घेऊन सहकार तसेच विविध क्षेत्रांत काम केले. नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही कार्य केले. नायगाव विधानसभा क्षेत्र आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे ज्येष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांवर आघात झाला आहे. ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ नेते, खासदार वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई  देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे

0
नांदेड, दि. १४ जून :- मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, वादळी वारा सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे....

साजूर, तांबवे, किरपे, शेनोली रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील  साजूर, तांबवे, किरपे  शेनोली गावातील रस्त्याच्या  कामामुळे गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे...

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाणाचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री...

रोजगार हमी योजनेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री संजय राठोड

0
रोहयो कामे, पीएम आवास, स्मार्ट पीएचसीचा आढावा विहिरीचे आदेश पंचायत समितीतून थेट लाभार्थ्यांना द्या यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून नाट्यगृहाची पाहणी

0
यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची आज पाहणी केली....