बुधवार, ऑगस्ट 6, 2025
Home Blog Page 533

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संक्षिप्त परिचय 

मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

जन्म : २२ जुलै, १९७०

जन्म ठिकाण  : नागपूर

शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.ए., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डी.एस.ई. बर्लिन, जर्मनी येथून उत्तीर्ण

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अमृता.

अपत्ये  : एकूण १ (एक मुलगी).

व्यवसाय : सामाजिक कार्य.

पक्ष : भारतीय जनता पक्ष.

मतदार संघ : ५२ – नागपूर (दक्षिण-पश्चिम), जिल्हा – नागपूर.

इतर माहिती :

कार्यकारी सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (युनायटेड नेशन्सद्वारा मान्यता प्राप्त संस्था): उपाध्यक्ष, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक (भोसला मिलिटरी स्कूल), उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था, अध्यक्ष, स्व. आबाजी थत्ते अनुसंधान संस्थानचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर; अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केट बॉल संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विविध उपक्रमात सहभाग.

१९८९ वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, धरमपेठ वॉर्ड, नागपूर; १९९० प्रसिद्धी प्रमुख, भाजप, नागपूर (पश्चिम); १९९२-९५ अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, नागपूर शहर; १९९५-२००४ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, भारतीय जनता युवा मार्चा; २००४ – २००९, २००९ –२०१४ राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा; २००९ भाजप विदर्भ निवडणूक प्रमुख, २०१० महामंत्री, २०१२-२०१४ प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; ग्लोबल पार्लमेंट या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे प्रथम भारतीय लोकप्रतिनिधी;

उपाध्यक्ष, ग्लोबल पार्लमेंट फोरम, हाबीतात; १९९२ व १९९७ नागपूर महानगर पालिका सदस्य व १९९७ मध्ये महापौर, महानगरपालिका, नागपूर; १९९८ मे अरइन कौन्सिल पद्धती अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड;

१९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४ सदस्य,  महाराष्ट्र विधानसभा, सदस्य, विधानमंडळ नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, विनंती अर्ज समिती, गृहनिर्माण व नगरविकास स्थायी समिती सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समिती; सदस्य, कार्यकारी परिषद डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ; ओ.बी. सी, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न; अध्यक्ष, निती आयोग शेती विषयक उच्चाधिकार समिती, भारत सरकार, राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने सन २००३ या वर्षाचा महाराष्ट्र विधानसभेतील “उत्कृष्ट संसदपटु” पुरस्कार प्राप्तः ‘उत्कृष्ट वक्ता’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त; रोटरी क्लबचा “मोस्ट चॅलेंजिंग युथ अॅवार्ड” प्राप्त, हिंदू लॉ विषयात नागपूर विद्यापीठाचा “बी. के. बोस अॅवॉर्ड” प्राप्त; प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मुक्तचंद पुणे या संस्थे तर्फे “उत्कृष्ट संसदपटु” पुरस्कार, प्रकाश जोशी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राजयोगी नेता पुरस्काराने सन्मानीत; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानीत.

यशदा, पुणे येथे अर्बन फायनान्सिंग विषयावर व्याख्याने दिली. ३१ ऑक्टोबर २०१४ ते २१ नोव्हेंबर, २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, २२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर, २०१९ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, डिसेंबर २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.

३० जून २०२२ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ, खाती -गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ – १४ वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

0000

उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांचा संक्षिप्त परिचय 

जन्म : ६ मार्च १९६४.

जन्म ठिकाण : अहिर, तालुका – महाबळेश्वर, जिल्हा – सातारा.

शिक्षण : बी.ए.

ज्ञातभाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता.

अपत्ये : एकूण १ (एक मुलगा).

व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य

पक्ष : शिवसेना

मतदार संघ : १४७ – कोपरी – पाचपाखाडी, जिल्हा – ठाणे.

इतर माहिती :

ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सन १९८६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात १०० कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग,  ४० दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केला, संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, इंटरनिटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहिद हेमंत करकरे क्रीडा संकूल, जॉगिंग पार्क, सेंट्रल लायब्ररी सुरु केली; आदिवासी प्रभाग मोखाडा, तलासरी व जव्हार येथील आश्रम शाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करुन गरीब रुग्णांना विनामुल्य औषध वाटप केले; पालघर, बोईसर व सफाळे परिसरात शिवसेने तर्फे एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन, बाल नाट्य महोत्सवाचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, ‘जाणताराजा’ नाटकाचे अत्यल्पदरात आयोजन, अध्यक्ष, ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन; उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटना, पूरग्रस्तांना मदत,

ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी विशेष योगदान; एमएमआरडी सक्षम बनविण्यात यश, नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग, वांद्रे- वरळी सी लिंक, वाशी येथील तिसरा खाडीपुल, मुंबई –पुणे द्रुतगतीमार्गची क्षमता वाढविण्यासाठी खालपूर- लोणावळा टनेल मार्ग, शिळ – कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण, विदर्भात रेल्वेच्या २७ उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न; राज्यातील द्रुतगती मार्गावरील उपधान कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या; ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर सुरू केले; आरोग्य मंत्रीपदाच्या काळात आशा सेविकांची पगार वाढ केली; आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. पदवी धारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास केला; ठाणे मेट्रोच्या कामाला गती दिली; ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मंजुरी मिळविली; ठाणे जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या काळू धरणाच्या अडचणी सोडविण्यात यश; बारवी धरणाची उंची वाढविण्यासाठी मंजूरी मिळविली; एमएमआरडीला क्लस्टर योजना सुरू केली; ठाणे जिल्हा परिषद, तसेच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, महानगरपालिकेत व अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आणण्यात यश; १९८४ शिवसेना शाखा प्रमुख, वागळे इस्टेट, किसननगर; शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख; पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग, १९९७ व २००२ दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.

२००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; २०१४-२०१९ विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गट नेते; १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ विरोधीपक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा; ५ डिसेंबर २०१४ ते नोव्हेंबर २०१९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी २०१९ सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री; डिसेंबर २०१९ पासून शिवसेनेचे गट नेते; नोव्हेंबर २०१९ –जून २०२२ नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.

३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ. खाती – सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ – १४ वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

०००००

उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचा संक्षिप्त परिचय

जन्म : २२ जुलै १९५९

जन्म ठिकाण : देवळाली प्रवरा, तालुका – राहुरी, जिल्हा – अहमदनगर.

शिक्षण : बी.कॉम.

ज्ञातभाषा :मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा.

अपत्ये :एकूण २ (दोन मुलगे).

व्यवसाय : शेती.

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ : २०१ – बारामती, जिल्हा-पुणे,

इतर माहिती :

विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, तालुका इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि. भवानीनगर; संचालक, माळेगाव सहकारी साखर कारखाना, लि. संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि. जिल्हा पुणे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई, संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे; मार्च १९९१ ते ऑगस्ट १९९१ तसेच डिसेंबर १९९४ ते डिसेंबर १९९८ अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; ११ डिसेंबर १९९८ ते १७ ऑक्टोबर १९९९ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई; १९ डिसेंबर २००५ पासून संचालक,  महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई; २८ सप्टेंबर २००६ पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, मार्च २०१३ पासून अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, सप्टेंबर २००५ ते २३ मार्च, २०१३ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, १३ ऑगस्ट २००६ ते १९ ऑगस्ट २०१८ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन;

१७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ सदस्य, लोकसभा १९९१-९५ (पो.नि.), १९९५-९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधान सभा; २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर, १९९२ ते फेब्रुवारी, १९९३ जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री; २७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर २००३ पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर २००४ ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री; ९ नोव्हेंबर २००४ ते ७ नोव्हेंबर २००९ जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; ७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर २०१० जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) व ऊर्जा खात्याचे मंत्री; ११ नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा);  २२ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०१९ उपमुख्यमंत्री, डिसेंबर २०१९ – जून २०२२ उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), काहीकाळ राज्य उत्पादन शुल्क या खात्याचा अतिरिक्त कार्यभार.

जुलै २०२३ मध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, खाती – वित्त व नियोजन

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ – १४वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

००००

 

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

मुंबई,दि.५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.

पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.

चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

००००

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

ऐतिहासिक आझाद मैदानात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शपथविधी

मुंबई, दि. ५ : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.

आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व  महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सूक्ष्म मध्यम लघू उद्योगमंत्री जितनराम मांझी, केंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधिया, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्कर सिंह धामी, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यु रिओ, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, केंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, विविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, पवन कल्याण, राजेंद्र शुक्ला, अरुण सावो, विजय शर्मा, प्रेमचंद बैरवा, विजयकुमार सिन्हा, सम्राट चौधरी, कनक बर्धन सिंह देव, प्रवती परिदा, चौना मेन, प्रेसतोन त्यांसोंग, यांथुंगो पटॉन, टी. आर. झेलियांग, एस धार, श्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधू, संत, महंत, विविध धर्मांचे गुरु, राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवर, विशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली.

००००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून नव्या सरकार स्थापनेचा दावा

मुंबई, दि. ०४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला.

केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारमण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

००००

 

पोलीस क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील – विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

  • ५० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप चषक सातारा व कोल्हापूर पुरूष

   गटाला विभागून तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची बाजी

  • ५० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता भव्य समारोपीय समारंभातून संपन्न

कोल्हापूर, दि.4 : पोलीस विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास पुणे विभागाचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 50 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय समारंभावेळी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या खेळाडू व संघांना बक्षिस वितरित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपली मानसिक व शारिरिक तयारी ठेवण्यासाठी कोणत्याही क्रीडा प्रकाराची आवड असणे गरजेचे आहे. कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात क्रीडा प्रकारांना सर्वोच्च स्थान असल्याने अजूनच या स्पर्धेला रंगत प्राप्त झाली. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेतून अनेक चांगले खेळाडू पुढे येतील. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी पोलीस विभागातील खेळाडूंनी अजून आपली कामगिरीमध्ये सुधारणा करावी असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्‍हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस अधीक्षक कोल्हापूर महेंद्र पंडित, पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम.राजकुमार, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक सांगली संदिप घुगे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्रातील 50 व्या पोलीस क्रीडा स्पर्धाला शुक्रवार दि. 29 नोव्हेंबर रोजी पोलीस मैदानावर सुरुवात झाली. त्याचे उद्घाटन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते झाले होते. या स्पर्धेत कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून एकूण 19 संघ एकल व सांघिक गटात सहभागी झाले होते. 1,200 हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जवळपास 19 विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. यात जनरल चॅम्पियनशीप चषक सातारा व कोल्हापूर पुरूष गटाला विभागून मिळाला तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारत जनरल चॅम्पियनशीप चषकाला गवसणी घातली. पोलीस विभागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या संघांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेता येणार आहे. पुढिल वर्षीची स्पर्धा पुणे ग्रामीण यांच्याकडे आयोजित केली जाणार आहे. याची घोषणा व ध्वज हस्तांतरण यावेळी करण्यात आले.

व्हॉलीबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, क्रॉस कंट्री, मॅरेथॉन, कुस्ती, ज्युडो, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग अशा विविध खेळांचे सामने या स्पर्धेत झाले. यावेळी पहिल्यांदाच वुशू सारख्या खेळाचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्‍हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांनी या स्पर्धेच्या चांगल्या आयोजनासाठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी लोकसभा, विधानसभा तसेच इतर महत्त्वाच्या वय्क्तींचे दौरे विभागातील महत्त्वाचे सन उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडले. त्यांचा थकवा या स्पर्धेतून नक्कीच दूर झाला असेल. तसेच त्यांना कामाच्या दैनंदिन परिस्थितीतून एक वेगळे वातावरण देण्याचा प्रयत्न यातून केला. या स्पर्धेतून मिळालेली ऊर्जा चांगल्या कामी खर्ची घालावी तसेच नियंत्रित गुन्हेगारी कायम राहिल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी मनोगतामधून व्यक्त केले. प्रास्तविकात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीसांच्या समोरील विविध आव्हाणे व बदलते कामाचे स्वरूप यातून त्यांना चांगले वातावरण निर्माण व्हावे व त्यांना सांघिक भावना निर्माण व्हावी यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी मानले तर सुत्रसंचलन मोनिका जाजू यांनी केले. कार्यक्रमात वारणा व्हॅली स्कूल, तळसंदे येथील मुलांनी मल्लखांब क्रीडा प्रकारातील रोमहर्षक प्रात्यक्षिके सादर केली.

विजेते संघ व खेळाडू पुढीलप्रमाणे –

  1. 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये

पुरूष गटात सुवर्ण -कोल्हापूर, रौप्य – सातारा व  कांस्य – सांगली

महिला- 3 सुवर्ण कोल्हापूर, 2 रौप्य सातारा व 1 कांस्य पुणे ग्रामीण

2.त्वायक्वांदो- पुरुष – कोल्हापूर, महिला- कोल्हापूर

3.वुशू- पुरुष- कोल्हापूर, महिला- कोल्हापूर

4.वेटलिफ्टिंग- पुरुष- सातारा, महिला- सातारा

5.ज्युदो- पुरुष- सातारा, महिला- सातारा

6.कुस्ती- पुरुष-सातारा, महिला- सातारा

7.बॉक्सिंग- पुरुष- सातारा, महिला- सांगली

8.खो-खो- पुरुष- सांगली, महिला-  सोलापूर ग्रामीण

9.कबड्डी- पुरुष- पुणे ग्रामीण, महिला- कोल्हापूर

10.बास्केटबॉल- पुरुष- सोलापूर शहर, महिला- सोलापूर शहर

11.व्हालीबॉल- पुरुष- सांगली, महिला- कोल्हापूर

12.जलतरण- सातारा

13.हॅन्डबॉल – सांगली

14.हॉकी – कोल्हापूर

15.फुटबॉल- कोल्हापूर

16.क्रॉसकंट्री – पुरुष- सोलापूर शहर, महिला- कोल्हापूर

17.ॲथलॅटिक्स- पुरुष- कोल्हापूर, महिला- कोल्हापूर

18.बेस्ट ॲथलिट- पुरुष- अमृत तिवले, कोल्हापूर, महिला- सोनाली देसाई, कोल्हापूर

अशा प्रकारे जनरल चॅम्पियनशीप  पुरुष गट – कोल्हापूर व सातारा जिल्हा विभागून मिळाली तर महिला गटात कोल्हापूरने बाजी मारली.

00000000

भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणाऱ्या ‘मीडिया ॲवार्ड-२०२४’ साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुबंई, दि.४ : राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन २०२४ मध्ये मतदार साक्षरता व जनजागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये  चार वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रित माध्यम (प्रिंट मीडिया), टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक), रेडीओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाइन (इंटरनेट)/ सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट प्रचारासाठी पुरस्कार या चार  पुरस्कारांचा समावेश आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांनी आपले प्रस्ताव दि. १० डिसेंबर २०२४ पर्यंत  राजेश कुमार सिंग, अवर सचिव (संवाद),  भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन. अशोका रोड, नवी दिल्ली 110001. ईमेल: media-division@eci.gov.in ,  फोन नंबर: ०११-२३०५२१३१ केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली यांच्या कार्यालयाकडे परस्पर पाठवायचे आहेत.  प्रस्ताव इंग्रजी अथवा हिंदी भाषांमध्ये सादर करावेत. इतर भाषेतील प्रस्ताव  इंग्रजी भाषांतरासोबत सादर करावे.  पुरस्कारासंदर्भात अंतिम निर्णय हा निवड समितीचा राहील. प्रस्तावावर आपले पूर्ण नाव, प्रसारमाध्यमांचा सविस्तर पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल यांची अवश्य नोंद करावी.

निवडणुकांबद्दल जागरुकता निर्माण करून, निवडणूक प्रक्रियेबद्दल लोकांना साक्षर करून, निवडणुकीशी संबंधित माहिती व तंत्रज्ञान वापर, युनिक/रिमोट मतदान केंद्रांवरील कथा आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून मतदान, नोंदणीची प्रासंगिकता आणि महत्त्व या कार्यात निवडणूक सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या  उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

निकष – या पुरस्कारासाठी सादर करण्यात येणारे वृत्त, प्रसिद्धी साहित्य  2024 दरम्यान प्रसारित/प्रक्षेपित प्रकाशित केले गेले असावे. संबंधित कालावधीत केलेल्या कामाचा सारांश ज्यामध्ये बातम्या/लेखांची संख्या, चौरस सेमी मध्ये एकूण मुद्रण, पीडीएफ सॉफ्ट कॉपी QR संबंधित वेब पत्त्याची लिंक, वर्तमानपत्र/लेखांची पूर्ण आकाराची छायाप्रत/मुद्रित प्रत, थेट सार्वजनिक सहभाग इ. इतर माहिती याचा समावेश करावा.

मुद्रित माध्यमांसाठी प्रसिद्ध झालेले लेख अथवा बातम्या यांचा आकार, आणि पीडीएफ कॉपी सोबत जोडणे आवश्यक आहे. यासोबतच दैनिकाचा वर्ग अथवा एबीसीद्वारे प्रमाणित वर्गवारी यांची माहिती द्यावी.

ईलेक्टॉनिक माध्यमे यामध्ये विविध वाहिन्या, रेडीओ यासाठी प्रसारित केलेले साहित्य पेन ड्राईव्ह मध्ये सादर करावे तसेच प्रसारित झालेल्या बातम्या, यशोगाथा विशेष वृत्तांकन यांच्या प्रसारणाची वेळ नमूद करावी. मतदान जनजागृतीबाबत इतर विशेष उपक्रम वाहिनीमार्फत राबवण्यात आले असल्यास त्याची माहिती द्यावी.

प्रसारण/टेलिकास्टचा कालावधी आणि वारंवारता आणि कालावधी दरम्यान प्रत्येक स्पॉटच्या अशा प्रसारणाची एकूण वेळ,  सर्व स्पॉट्स/बातम्यांच्या एकूण प्रसारण वेळेची बेरीज याची माहिती नमूद करावी.  सीडी किंवा डीव्हीडी किंवा पेन ड्राईव्हमध्ये इतर डिजिटल मीडियावरील बातम्या फीचर्स किंवा मतदार जागृतीवर कार्यक्रम, कालावधी, टेलिकास्ट/प्रसारण तारीख आणि वेळ आणि वारंवारता याची माहिती द्यावी.

समाजमाध्यमांवरील प्रसारित साहित्य यामध्ये ब्लॉग, कॅम्पेन, ट्विट आणि लेख याची माहिती पीडीएफ तसेच सॉप्ट कॉपीमध्ये सादर करावी. तसेच प्रसारित केलेल्या लिंकचा तपशीलही त्यात द्यावा. याशिवाय लोकजागृतीसाठी इतर काही उपक्रम राबवले असल्यास त्याची माहिती द्यावी.

निवड झालेल्या पुरस्कारार्थींना राष्ट्रीय मतदार दिनी 25 जानेवारी 2025 रोजी पुरस्कार प्रदान केले जातील, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

मुंबई, दि. 4 : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025 या कालावधीत देण्यात येणार आहे. या 133 व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले असल्याचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा यांनी कळविले आहे. इच्छुकांनी 24 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थीकडून प्रतिमहिना रूपये 450/-, दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून रूपये 100/- शुल्क आकारले जाते. या प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थी निकष खालीलप्रमाणे आहेत.

1) प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. 2) प्रशिक्षणार्थी 18 ते 35 वयोगटातील असावा. 3) प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. 4) प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 5) प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 6) प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक / आधारकार्डधारक असावा. 7) प्रशिक्षणार्थीचा विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज असावा व त्या अर्जावर संबंधीत मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक असून 8) प्रशिक्षणार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या आयोजित प्रशिक्षणासाठी निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे 24 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावेत. या प्रशिक्षण सत्राच्या अधिक माहितीसाठी सचिन भालेराव, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो. 9920291237 आणि जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक मो. 7507988552 यांचेशी संपर्क साधावा. असे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा यांनी कळविले आहे.

0000

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस कार्यक्रमाचे १० डिसेंबर रोजी आयोजन

मुंबई, दि. ४ : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या वर्षाची संकल्पना (अवर राईट्स अवर फ्युचर राईट नाऊ) अशी आहे.  यानिमित्त आयोजित राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती निवृत्त न्यायाधीश एन.एच पाटील यांची असणार आहे.

या कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर (रा. अचलपूर, जि. अमरावती) हे अनाथ विकलांग मुलांच्या जीवनाच्या पुनर्वसन या विषयावर, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सच्या सहायक प्राध्यापक डॉ. वैशाली कोल्हे दिव्यांग व्यक्तींचे हक्क, एनजीओचे श्रीरंग बिजूर ऑटीझम / एएसडी दिव्यांगाचे हक्क या विषयावर, हेल्पेज इंडिया संस्थेचे सहसंचालक व्हॅलेरिअन पैस ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अंकुर ट्रस्टच्या सचिव डॉ. वैशाली पाटील आदिवासी कातकरी जमातीतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न या विषयावर, वाशिम येथील फार्मलॅब येरंडा ॲग्रोसोल्युशन प्रोड्युसर कंपनीचे संचालक संतोष चव्हाण शेतीतील खर्च कमी कसा करावा या विषयावर, बीआयएफ कंपनीचे अधिकारी संजय पाटील हे शेतीतील जैव विविधता व समाजातील हक्क या विषयावर संबोधित करतील.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या 2024 सोव्हिनिरचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात संपूर्ण राज्यातील 350 विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. तसेच कार्यक्रम ठिकाणी बांधावरील प्रयोगशाळा, आहार हेच औषध, महिला व मुलांची देह विक्रीबाबत जनजागृती, दिव्यांग व ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर व आदिवासी भागातील समस्या व त्यांचे हक्काबाबत जनजागृती करणारे स्टॉलही असणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य मानवी हक्क आयोगाने महात्मा गांधी यांच्या 11 शपथांवर आधारीत समाजरचनेच्या संकल्पनेची मांडणी व्याख्यानांद्वारे व स्टॉलवरील प्रदर्शनीद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे, असे आयोगाचे अध्यक्ष के.के. तातेड, सदस्य एम.ए सईद, संजय कुमार, सचिव नितीन पाटील यांनी कळविले आहे.

मानवी हक्क आयोगाविषयी थोडक्यात..

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 6 मार्च 2001 रोजी करण्यात आली. आयोगामध्ये 3 सदस्य आहेत. 7500 प्रकरणे 2024 मध्ये प्राप्त झाली आहे. त्यापैकी 5700 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. तसेच आयोगाने 134 प्रकरणांमध्ये सुमोटो दखल घेतलेली आहे. परदेशातील अनेक संस्था, भारताच्या इतर राज्यातील मानवी हक्क आयोगाचे प्रतिनिधी, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे प्रतिनिधी यांनी 2024 मध्ये आयोगास भेट दिली आहे. आयोगाने यावर्षी लोकांमध्ये जागरूकता व्हावी, म्हणून जिल्हास्तरावरसुद्धा कार्यशाळा घेतल्या आहेत.

मुंबई येथील आयोगाच्या न्यायालयीन कामकाजात नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. बऱ्याच दिव्यांग मुलांना स्वयंसेवी संघटनांकडून दानाच्या स्वरूपात ‘असिस्टीव्ह डिव्हाईसेस’ मिळवून दिले आहे.  मानवी हक्काचे विषय विधी शाखेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वेच्छा कार्यक्रम व परिविक्षाधीन कार्यक्रम राबविले आहे. आयोगाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे प्रश्न, देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न, महिला व मुलींच्या विक्रीबाबत आळा घालण्याबाबत पोलीसांसोबत शिबिरे घेण्यात आली आहेत.

0000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ ‘माहिती व जनसंपर्क’तर्फे अनोखी मानवंदना

मुंबई, दि. ४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपट आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.

‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. माहितीपट व चित्रपटाच्या प्रसारणाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक –  https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महापुरुष डॉ. आंबेडकरमाहितीपटाचे सकाळी ११ वा. प्रसारण

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता. महासंचालनालयाच्या एक्स,  फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १७ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याची ऐतिहासिक घटना दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंतिम दर्शनाचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. जी.जी. पाटील यांनी संकलन केले आहे. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर संगीत दत्ता डावजेकर यांचे आहे. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

बाबासाहेब आंबेडकरमाहितीपटाचे दुपारी १ वा. प्रसारण

भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ ची निर्मिती असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता महासंचालनालयाच्या एक्स, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन.एस. थापा यांनी १९८१ मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथया चित्रपटाचे दुपारी ४ वा. प्रसारण

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी ४ वाजता महासंचालनालयाच्या एक्स, या समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी  हा चित्रपट नक्की पहायला हवा.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

०००

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि. ३ : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT)  शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेच्या (CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती  जगदीप धनखड उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखडराज्यपाल सी.पी.राधाकृष्णनकेंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहानकेंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूरभारतीय कृषी संशोधन परिषदेचे सचिव तथा महानिदेशक डॉ.हिमांशु पाठक तसेच संस्थेचे पदाधिकारीकृषी तज्ज्ञसंशोधक व इतर मान्यवर उपस्थित होते.

 केंद्रीय कापूस संशोधन तंत्रज्ञान संस्था ही कापूस उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधनात महत्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT) १९२४ मध्ये स्थापन झाली. ही संस्था कापूस क्षेत्रातील संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करते.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

ताज्या बातम्या

‘स्मार्ट’द्वारे शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता….

0
कांचनी कंपनीची १०० कोटींच्यावर वार्षिक उलाढाल लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्याच्या उद्देशाने राज्यात...

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई, दि .5:- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या "राजा हरिश्चंद्र" चित्रपटाच्या...

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज...

0
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव स्व. राज कपूर जीवनगौरव...

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

0
नवी दिल्ली, 06 : साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24...

कांदळवन नुकसान व अनधिकृत बांधकाम प्रकरणी तत्काळ कार्यवाही करावी –  विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई,दि.५ : अलिबाग परिसरात काही कंपन्यांकडून होणारे कांदळवनाचे नुकसान व अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणांची संबंधित विभाग व यंत्रणांनी गांभीर्याने नोंद घेऊन त्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे ...