मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 4

जागतिक सृजनशील सहयोगात भारताचे एक अभूतपूर्व पदार्पण

मुंबई, दि.4 :- जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) छत्राखाली आयोजित केलेल्या या बाजारपेठेत चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अॅ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍मेशन क्षेत्रात 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यावसायिक व्यवहार नोंदवले गेले. करार करण्याचे काम अजूनही सुरू असताना, काही दिवसांत एकूण मूल्यांकन 1000 कोटी रुपयांहून जास्त होण्याचा अंदाज आहे.

वेव्हज बाजारामुळे 500 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आणि येत्या काळात अतिरिक्त करार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 80-आसन व्यवस्था असलेल्या स्थानी  झालेल्या  चित्रपटांच्या क्युरेटेड स्क्रीनिंगला उत्साही प्रतिसाद मिळाला आणि निवडक चित्रपटांना दाद मिळाली. बाजाराने उदयोन्मुख निर्मात्यांना त्यांचे आयपी खरेदीदार आणि सहयोगींच्या जागतिक नेटवर्कमध्ये सादर करण्यास मदत केली, ज्यामुळे लक्षणीय औत्सुक्य निर्माण झाले आणि नवीन भागीदारी वाढली.

भारत आणि न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय सहकार्यातील एक मोठी कामगिरी म्हणजे, पेट्रिना डी’रोझारियो यांच्या नेतृत्वाखालील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी वेव्हजपासून प्रेरित होऊन न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला. उभय देशांमधील पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सह-निर्मिती संबंध अधिक दृढ करणे हा याचा उद्देश आहे.

प्रमुख करारविषयक घोषणा

प्राइम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहु-वार्षिक सहयोगाची घोषणा ही वेव्हज  बझार मधील मुख्य आकर्षण होती. या करारात 240 हून अधिक देशांमधील स्ट्रीमिंगचा समावेश आहे. यामध्ये 28 सबटायटल भाषा आणि 11 डब केलेल्या आवृत्त्या असतील. ‘देवी चौधराणी’, ‘व्हायोलेटेड’ या चित्रपटाच्या लाँचची घोषणा ही वेव्हज बझारचे उद्दिष्ट सिद्ध करणारी आणखी महत्त्वाची घटना होती. प्रभावी पदार्पणासह वेव्हज बझारने केवळ सर्जनशील सहयोगाचे जागतिक केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली नाही, तर देशाच्या सीमेपलीकडे जाऊन कथाकथन आणि उद्योग जगतातील परिवर्तनाच्या नवयुगाचा पाया रचला आहे.

अभिनय जितका प्रामाणिकपणे कराल, तितका तो उत्तम होईल – अभिनेता आमिर खान

मुंबई, दि. 4 :- एआय तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना  तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल असल्याचे सांगून ‘अभिनयाची कला’ या विषयावरील त्यांच्या अतिशय सहजसोप्या आणि उपयुक्त सल्ल्यांनी अभिनेता आमिर खान यांनी वेव्हज 2025 मध्ये अनेकांची मने जिंकली.

आमिर खान पुढे म्हणाले की, मी प्रशिक्षित अभिनेता नाही. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्याची माझी इच्छा होती, पण जमलं नाही. मी माझ्या वाटचालीत या लहान-लहान गोष्टी शिकलो, ज्या माझ्यासाठी उपयोगी ठरल्या.

चित्रपट निर्मितीच्या भविष्याबद्दल बोलताना, आमिर खान म्हणाले की, एआय तंत्रज्ञानामुळे आता अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे! एआय आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नंतर दृश्यात अभिनेत्याला जोडले जाऊ शकते.

एखाद्या अभिनेत्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे त्या पात्राच्या मनात प्रवेश करणे,  असे या अष्टपैलू अभिनेत्याने सांगितले,  ज्यांनी गेल्या अनेक वर्षांत साकारलेल्या अनेक अविस्मरणीय भूमिकांची भारतीय सिनेमाला भेट दिली आहे. आणि  त्या भूमिकेच्या अंतरंगात ते कशा प्रकारे सामावून जातात? त्यावर या सिनेक्षेत्राला वाहून घेतलेल्या अभिनेत्याचे उत्तर आहे, “मी स्क्रिप्टसोबत खूप वेळ घालवतो. मी पटकथा पुन्हा पुन्हा वाचतो. जर पटकथा चांगली असेल, तर तुम्हाला त्या पात्राची समज येईल, त्याचे भौतिक स्वरुप, वृत्ती इत्यादी सर्व काही त्यातूनच येईल”. याव्यतिरिक्त, दिग्दर्शकाशी पात्राबद्दल आणि कथेबद्दल चर्चा केल्याने देखील कल्पना येते.

अतिशय परिश्रम करण्याच्या आपल्या वृत्तीविषयी स्पष्टीकरण देताना आमिर खान यांनी सांगितले, “माझी स्मरणशक्ती कमी आहे. त्यामुळे मी हाताने संवाद लिहितो. सर्वात आधी मी अवघड दृश्ये करायला घेतो. संवादांचे पाठांतर झालेच पाहिजे. पहिल्या दिवशी मी केवळ त्यावर काम करतो, तीन ते चार महिने मी दररोज तेच करत राहतो आणि मग त्यामध्ये शिरतो. संवाद हे तुमच्यामध्ये सामावले पाहिजेत. ते तुमचे स्वतःचे वाटले पाहिजेत. ज्यावेळी ते लिहिले गेले तेव्हा ते पटकथाकाराचे होते. पण नंतर ते तुमचे झाले आहेत. ज्यावेळी तुम्ही एक ओळ पुन्हा पुन्हा उच्चारता, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की हे तुम्ही अनेक प्रकारे करू शकता.

कलाकारांसाठी सर्वात कठीण काम कोणते असते? त्यावर आमिर खान म्हणाले, की कलाकाराला दररोज पुन्हा पुन्हा त्याच उत्कटतेने भावनिक अभिनय सादर करावा लागणे.

नवोदित कलाकारांसाठी आमिर खान यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे – “तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल”.

तर, मग खुद्द आमिर खान त्यांच्या दृश्यांचा सराव कसा करतात?

याचे उत्तर असे, की “मी शॉट्स देण्यापूर्वी त्या दृश्याची कल्पना करतो आणि त्या दृश्यांचा सराव करत असताना मी कधीच आरशात पाहत नाही.”

आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी आमिर खान यांचा आवडता चित्रपट कोणता? अनेकांनी अंदाज लावलाच असेल, की तो चित्रपट ‘तारे जमीन पर’ असावा. तर होय, कारण या चित्रपटाने अनेक पालकांना त्यांच्या मुलांशी संयमाने वागायला, त्यांना प्रसंगी आधार द्यायला आणि त्यांच्या लहान मुलांशी सहानुभूतीपूर्वक वागायला शिकवले!

अभिनय क्षेत्रात सुरुवात करणाऱ्या नवोदितांसाठी या ज्येष्ठ अभिनेत्याकडे आणखी कोणत्या टिप्स आहेत?

“भावना या पटकथेतूनच समोर येतात. तुमचा पटकथेवर विश्वास असावा लागतो. कधीकधी चित्रपटांमध्ये अशी काही दृश्ये असतात, जी अविश्वसनीय वाटतात. पण अभिनेता तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. त्यामुळे अभिनेत्याला प्रेक्षकांना पडद्यावर दाखवली जाणारी गोष्ट पटवून सांगावी लागते”.

चांगली पटकथा म्हणजे काय असते? आमिर खान यांनी उत्तरात सांगितले, की “चांगल्या पटकथेला उत्तम संकल्पनेचा आधार असावा लागतो. कथेच्या पहिल्या दहा टक्के भागात कथानकाचे ध्येय निश्चित झाले पाहिजे. नाहीतर प्रेक्षकांचा हिरमोड होईल”.

मात्र, चित्रपटामध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे – “जे त्या दृष्यामध्ये अपेक्षित आहे, ते करा आणि निव्वळ तुमच्या स्वतःच्या कामापुरता विचार करू नका”.

यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते आमिर खान यांचा सत्कार करण्यात आला.

0000

शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरेल – कलादिग्दर्शक पी.एम. विचारे

मुंबई, दि. 4 : शिल्पकला ही इतिहासाची साक्षीदार असते. एखादी शिल्पकृती पाहिली की त्यामधून प्राचीन काळातील घटना, प्रसंग आणि संस्कृती समजते. शिल्पकलेद्वारे आपल्याला इतिहास समजून घेऊन तो इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो.  शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती कलात्मक अभिव्यक्ती न राहता समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम तयार होते, असे टेक्निकल गेम्स कंपनीचे कला दिग्दर्शक पी.एम. विचारे यांनी यावेळी सांगितले.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्कशॉप ऑन डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा’  या विषयावर श्री विचारे यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री. विचारे यांनी स्वतः तयार केलेल्या शिल्पातून श्रोत्यांना शिल्प तयार करण्याचे तंत्रपद्धत विषद केली. त्यांनी भारतीय दंतकथेवर आधारित शिल्पकलेबद्दल त्यांनी माहिती दिली. सामाजिक जीवनातील प्रसंग, दिनचर्या आणि सामजिक संदेश शिल्पकलेतून त्यांनी मांडला आहे. वनातील सीता, अहंम ब्रह्मा यांची शिल्पे तयार करताना तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विविध भावमुद्रा, हालचाली जीवंत होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह दाखवून दिले.

ब्युटी अँड बिस्टमधून सामाजिक जाणिवेचा संदेश

शिल्पातून कथा सांगणे किती प्रभावी होऊ शकते, याचे उदाहरण देताना त्यांनी ‘ब्युटी अँड द बीस्ट’हे शिल्प सादर केले. “सामान्यतः ब्युटी म्हणजे स्त्री आणि बीस्ट म्हणजे प्राणी, अशी समजूत असते. पण त्यांनी हे उलटे मांडले आहे. माणसंच खरे बीस्ट आहेत, जी प्राण्यांची कातडी वापरतात, त्यांना ठार करतात. प्राणी हेच खरे सौंदर्य आहेत,” असा सामाजिक जाणिवेचा संदेश त्यांनी दिला.

याबरोबरच त्यांनी ‘सायलंट म्युझिक’या शिल्पाची ओळख करून दिली. “ही कलाकृती म्हणजे नाद नसलेली पण जाणवणारी संगीतातील एक अवस्था आहे. डोळ्यांनी बघताना शांततेत सुद्धा संगीताची अनुभूती येते,” असं ते म्हणाले. या संकल्पनेत त्यांनी पंचमहाभूतांचा समावेश करून सर्जनशीलतेचा वापर केला आहे.

शिल्पकलेमध्ये  रचना महत्वाची असते. यामध्ये नैसर्गिक कृतीचा केंद्रबिंदू ठरतो, बॅलन्सिंग कला, त्रिमितीय पेंटिंग, आर्मीचर या शिल्पकलेमध्ये विविधता केली तरच प्रेक्षकांच्या मनाला भावते. शिल्प कलेमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या वापरामुळे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. शिवाय यातून समाज प्रबोधनाचा संदेश देता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

धोंडिराम अर्जुन/ससं/

जनरेटिव्ह ‘एआय’मुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन घडेल

मुंबई दि. 4 :- मीडिया व्यवसाय आता केवळ माहिती किंवा करमणुकीपुरता मर्यादित न राहता अत्याधुनिक डिजिटल अनुभव देणाऱ्या उद्योगात परिवर्तित झाला आहे. जनरेटिव ‘एआय’मुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन झाले असून ‘एआय’ ही केवळ कल्पना नसून व्यवसायासाठी उपयुक्त ठरणारी वस्तुस्थिती असल्याचे मत जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-2025  समिटमध्ये वेव्हजएक्स मध्ये “जनरेटिव्ह ‘एआय’ स्टार्टअप व्यवसायाचे आणि M&E (मीडिया आणि मनोरंजन) स्टार्टअपचे Amazon द्वारे स्केलिंग” या विषयावरील चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.  या चर्चा सत्रात उद्योग विषय तज्ञ महेश्वरन जी. आणि AWS चे पुण्यब्रथा दासगुप्ता यांनी सहभाग घेतला.

‘एआय’चा वापर आता मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात नवे क्षितिज खुले करत आहे.  या क्षेत्रातील कंपन्या व उद्योग एआयच्या मदतीने डिजिटल मूल्य निर्माण करत आहेत. ग्राहक अनुभव सुधारणे, उत्पादकता वाढवणे, जुन्या कंटेंटचा वापर करून नवे उत्पन्न मिळवणे आणि सर्जनशीलतेत वाढ  या चार स्तंभांवर एआय आधारित यशस्वी मॉडेल तयार होत आहेत, असे या चर्चा सत्रात सांगण्यात आले.

मीडिया आणि मनोरंजन उद्योगात जनरेटिव्ह ‘एआय’ (Generative AI) मुळे मोठे बदल घडत आहेत. पूर्वी एकसंध असलेला प्रेक्षक वर्ग आता विविध प्लॅटफॉर्म्सवर, वेगवेगळ्या वेळांना आणि  विविध पद्धतींनी कंटेंट पाहू लागला आहे. त्यामुळे उद्योगात वैयक्तिकरण, शिफारसी, आणि स्केलेबिलिटी यासारख्या बाबींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

जनरेटिव्ह एआय केवळ स्क्रिप्ट लेखन किंवा व्हिडिओ निर्मितीपुरता मर्यादित न राहता, स्टोरीबोर्डिंग, टीआरपी विश्लेषण, जुना कंटेंट नव्याने सादर करणे अशा अनेक टप्प्यांवर उपयोगी ठरतो. जुनी पात्रं आणि प्रसंगही ‘एआय’च्या मदतीने नव्या रूपात पुन्हा सादर करता येतात. तसेच मीडिया उद्योगासाठी ‘एआय’ केवळ कल्पनाशक्ती वाढवण्याचे नव्हे, तर नफा वाढवण्याचेही साधन ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर

मुंबई, दि. 4 : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) नवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षण, उद्योग क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरू झाले आहे. अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ॲनिमेशन क्षेत्रात एआयचा वापर वाढला असला तरी सर्जनशीलता येणार नाही, ते कृत्रिम दिसेल, नैसर्गिक हे नैसर्गिकच राहणार असल्याचे या परिसंवादात तज्ज्ञांनी मत मांडले.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत ‘चेंजिंग डायनामिक्स ऑफ एव्हीजीसी एक्सआर इन एआय एरा : हाऊ टू ब्रिज इंडस्ट्री अँड अकॅडमी’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ ब्रियना याऱ्हौसे, अमेरिकेतील ऍनिमेशन तज्ञ प्रमिता मुखर्जी, अस्पाचे संचालक संजय खिमेसरा सहभागी झाले होते. तर समन्वयक म्हणून विनिता बच्चानी यांनी काम पाहिले.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे सर्जनशीलतेचा नवा अध्याय – ब्रियना याऱ्हौसे

विद्यार्थ्यांनी एक एआयचा वापर नवीन कल्पना, संशोधन आणि कलेतील नव्या कल्पकता शोधण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांना शाळा,महाविद्यालयातसुद्धा नवीन तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी तंत्रज्ञानासोबत लवकर जुळवून घेऊन सर्जनशीलतेसह नेतृत्व करतील, असे श्रीमती याऱ्हौसे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आवश्यक – संजय खिमेसरा

देशाच्या अर्थव्यवस्थेत शिक्षणाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कुशल मनुष्यबळ निर्माण करणे, नवसंशोधनाला चालना देणे आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, असे अस्पाचे संचालक संजय खिमेसरा यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही संधी आहे, धोका नाही – प्रमिता मुखर्जी

अ‍ॅनिमेशन हे सर्जनशील क्षेत्र आहे. एआय हे रिपिटेटिव्ह, प्रक्रियात्मक कामे, डेटा ट्रान्सफर, प्लगइन लेखन या गोष्टींसाठी उपयुक्त आहे, पण सर्जनशील क्षेत्र अजूनही मानवकेंद्रित राहील. सर्जनशील कलाकारांसाठी संधी कमी होणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आपल्या कौशल्यात वाढ करून देणारी संधी म्हणून बघायला हवे, असे मत अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील अमेरिकेतील अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ प्रमिता मुखर्जी यांनी व्यक्त केले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

सुकर व गतिमान प्रशासन

बदल हा सृष्टीचा नियम आहे, मग तो स्वभावाचा असो की कामकाजाचा. बदलत्या काळानुसार चालणे आज अत्यावश्यक झाले आहे. पहिले ‘सरकारी काम…अनं सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित होती. आता मात्र ती कालबाह्य ठरली आहे. माहिती आणि तत्रंज्ञान तसेच समाज माध्यमांमुळे प्रशासन लोकाभिमुख होत असल्याची प्रचिती येत आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सरकार सत्तारुढ झाल्याबरोबर प्रशासनातर्फे नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व शासकीय विभागांना 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आखून दिला. मग काय, राज्यातील संपूर्ण प्रशासन झपाट्याने कामाला लागले.

राज्य शासनाच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय विभागांमध्ये एकप्रकारची स्पर्धाच या 100 दिवसांत अनुभवास आली. या स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र दिनी जाहीर झाला आणि संपूर्ण राज्यातून बाजी मारली आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी. सात निकषांवर आधारीत उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत 84.29 गुण घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात सर्वोत्कृष्ट ठरले. ही फलश्रृती आहे जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या नियोजनाची आणि सुकर व गतीमान प्रशासनाची.

संकेतस्थळ : जिल्हा संकेतस्थळ हे वापरण्याकरिता सुलभ असून त्यावर विषयनिहाय माहिती अद्यावत करण्यात आली आहे. कार्यप्रणाली, शासन निर्णय, पर्यटन स्थळाची माहिती, 112 हेल्पलाइन क्रमांक, इत्यादीचे अद्यावतीकरण केले आहे. तसेच राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची /प्रकल्पांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकसेवा हक्क अधिनियम – 2015 अंतर्गत नियम व अधिसूचित 17 सेवा स्वतंत्र टॅबद्वारे मुख्य पृष्ठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाची सुसंवाद : या अंतर्गत केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येतो. पीएम किसान योजनेचे एकूण 2 लक्ष 45 हजार 855 पैकी 2 लक्ष 29 हजार 280 असे 93.25 टक्के लाभार्थ्यांचे ॲग्रीस्टॅक शेतकरी आयडी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेअंतर्गत 100 टक्के निधी पी. एफ. एम. एस. प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला आहे. केंद्रीय योजनांसाठी केंद्राचा हिस्सा प्राप्त करून घेणे तसेच राज्याचा निधी अर्थसंकल्पीत करून घेण्याची कारवाई वेळोवेळी होत आहे.

स्वच्छता : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत अभिलेखांचे निंदनीकरण करून 21,443 नसतींचे अ, ब, क, ड वर्गवारीत वर्गीकरण करण्यात आले आहे. निंदनीकरणानंतर मुदतबाह्य 2858 संचिका नष्ट करण्यात आल्या आहेत. जडवस्तू संग्रह नोंदवही 31 मार्च 2025 पर्यंत अद्ययावत झाल्या आहेत.  जुन्या निर्लेखित व निरुपयोगी 197 वस्तू व साधन सामग्री यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. 10 जुने वाहनांचे निर्लेखन करून 2 लक्ष 55 हजार 218 इतका निधी प्राप्त झाला. सदर निधी शासन जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे

जनतेच्या तक्रारीचे निवारण : ‘आपले सरकार पोर्टल’ व ‘पीजी पोर्टल’ अंतर्गत अंतर्गत 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या 100 टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. अभ्यागतांना भेटीकरिता सोमवार, बुधवार व शुक्रवार हे दिवस सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंतचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. तसे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहे. लोकशाही दिनातील एकूण 17 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

कार्यालयीन सोयी सुविधा : कायमस्वरूपी कर्मचारी व अभ्यागतांकरिता स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ प्रसाधनगृहाची सुविधा करण्यात आली आहे. अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतीक्षालय, बसण्यासाठी सोफा, पंखा, कुलर तसेच वाचनासाठी वर्तमानपत्र व मासिके ठेवण्यात आली आहे. कार्यालयाच्या आतमध्ये झाडांच्या कुंड्याद्वारे सुशोभिकरण तसेच प्रवेशद्वारावर व्हर्टीकल गार्डन व सुसज्ज पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्तनमाता व महिला यांच्याकरिता हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 कामकाजातील सुधारणा : जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय येथे 100 टक्के ई -ऑफिस प्रणालीचा वापर सुरू आहे. या प्रणाली द्वारे 100 टक्के नस्ती निकाली काढण्यात आली आहे. वृत्तपत्रातील शासनाविरुद्ध प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांबाबत जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत संबंधित विभागातर्फे तात्काळ खुलासा मागून स्पष्टीकरण खुलासा नियमित प्रसिद्ध करण्यात येतो.

अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर : नव्याने सेवेत प्रविष्ट झालेले एकूण 106 ग्राम महसूल अधिका-यांना विविध विषयांबाबत प्रशिक्षित करण्यात आले. जिल्ह्यातील शिपाई, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक व सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी महसूल सेवक, वाहन चालक या संवर्गाच्या दिनांक 1 जानेवारी 2025 या अहर्ता दिनांकावर आधारित सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाज अचूक होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चॅटजीपीटी, ग्रोक व इतर ए.आय. ॲप्स विषयी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन : उद्योजकांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्याकरिता इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. 11 एप्रिल 2025 रोजीच्या जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये 17431 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून 14 हजार 100 रोजगार निर्मिती होईल. गतवर्षीच्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल समीटमध्ये झालेल्या 76,410 कोटीचे सामंजस्य करार अंमलबजावणीसाठी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्योगांना आवश्यक परवानगीबाबत मानद कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्यात असून जमिनीचा वापर व हस्तांतरणबाबत आवश्यक शासन निर्णय, आदेश, परिपत्रकासह या कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच मोबाईल चॅटबोटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रम : लोकसेवा हक्क अधिनियम -2015 अंतर्गत अधिसूचित 57 सेवा ऑनलाईन व ऑल-इन-वन मोबाईल ॲपद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, जन्ममृत्यू व विवाह प्रमाणपत्रासह विविध सेवा आणि करभरणा करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने 24 बाय 7 व्हाट्सअप चॅटबोटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शस्त्र परवाना व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत अर्ज करण्यापासून परवाना मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे.

बळीराजा समृद्धी मार्ग /पाणंद रस्ता अंतर्गत जिल्ह्यात 5001 कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. मोरवा (चंद्रपूर) येथे फ्लाईंग क्लब कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गम, आदिवासी विद्यार्थ्यांना सहज शक्य नसलेले वैमानिक प्रशिक्षण कमी खर्चात उपलब्ध झाले असून चांगल्या पगारावर नोकरीची संधी उपलब्ध होईल. ‘महसूल मित्र’ अंतर्गत नागरिकांना महसूल विभागातील 68 सेवांची माहिती तात्काळ उपलब्ध होईल. प्रत्येक सेवेकरिता आवश्यक अर्ज, कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रबाबत माहिती तसेच प्रत्येक प्रमाणपत्रासाठी हायपर लिंक उपलब्ध करून दिल्याने अर्ज करण्यापासून प्रमाणपत्र मिळेपर्यंतची प्रक्रिया सुलभ झाली आहे.

राजेश का. येसनकर

जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

“टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

मुंबई, दि. ४ : प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”  दि. ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे.  कृत्रिम बुद्धिमत्ता(AI), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या

अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक  दि.५ मे २०२५ रोजी  सकाळी ११:०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ९ मे रोजी  दुपारी ३.०० या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

‘टेक वारी’ म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी  होय. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असून ‘टेक वारी’ ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. या ‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम टेक वारीच्या

https://www.youtube.com/@TECH-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80

या यू ट्यूब चॅनलवर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/MahaDGIPR) पाहता येतील.

पहिल्या दिवशी दि. ५ मे रोजी मंत्रालयातील त्रिमुर्ती  येथे ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर श्री.प्रभु गौर गोपाल दास मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान” या विषयावर केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या श्रीमती देबजानी घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील समिती सभागृह (कक्ष ३), ७ वा मजला येथे”शासकीय कामकाज डिजिटल पद्धतीने कसे करावे” या विषयावर मायक्रोसॉफ्ट,नॅसकॉमचे श्री. मंदार कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला “कृत्रिम बुद्धिमत्ता” याविषयी नवी दिल्लीचे  माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग यांचे व्याख्यान होणार आहे.

मंगळवारी दि.६ मे २०२५ सकाळी ११:३० ते १२:३० परिषद सभागृह, ६ वा मजला येथे ‘तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला येथे कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे.  दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “भाषिणी-भाषेचा अडसर दूर करणे” या विषयावर  डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच २:०० ते ३:०० त्रिमुर्ती प्रांगण येथे “प्रवास पाककृतींचा” या विषयावर डिजिटल जगातील महाराष्ट्रीयन पाककृतींची प्रणेती श्रीमती मधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला येथे समिती क्रमांक ३ मध्ये “इंटरनेट ऑफ थींग्ज (Internet of Things)” या विषयावर व्याख्यान होणार आहे.दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी” नेसकॉमचे लौकिक रग्जी यांचे व्याख्यान होणार आहे.

बुधवार दि.७ मे २०२५   तिस-या दिवशी सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे ‘सायबर सुरक्षा: या विषयावर नेस्कॉमचे प्रसाद देवरे आणि सुकृत घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत त्रिमूर्ती प्रांगण मंत्रालय येथे आहार तज्ञ ऋतुजा दिवेकर यांचे ‘आरोग्यदायी जीवनशैली’या विषयावर व्याख्यान होणार आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत ‘फ्रंटियर तंत्रज्ञानाद्वारे प्रशासन नव्याने परिभाषित करणे’ या विषयावर केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांचे व्याख्यान होणार आहे.  दुपारी ३ ते ४ या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला समिती सभागृह क्रमांक तीन येथे ‘स्मार्ट बैठक आयोजित करणे’या विषयावर  झूम नेस्कॉमचे शैलेश रंगारी, मेहेर उल्ली पालेम यांचे व्याख्यान होणार आहे.

गुरुवार दि.८ मे २०२५ – चौथ्या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत “शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर” या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला मंत्रालय विस्तार येथे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त नागपूरच्या विजयालक्ष्मी बिदरी, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम,  पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांचे या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी २ ते ३ या वेळेत त्रिमुर्ती प्रांगण येथे”जीवन संगीत” या विषयावर जीवन संगीत समर्थक संतोष बोराडे यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला, समिती कक्ष क्रमांक ३ येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’या विषयावर नेस्कॉमचे मनीष पोतदार,सरस्वती गोल्लेरकरी यांचे व्याख्यान होणार आहे.  दुपारी ४:०० ते ५:०० परिषद सभागृह सहावा मजला येथे  ‘डब्यासाठीच्या आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती’या विषयावरती केटरिंग टेक्नॉलॉजी न्यूट्रिशन, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अन्वेषा पात्रा यांचे व्याख्यान होणार आहे.

शुक्रवार दि. ९ मे २०२५  पाचव्या दिवशी सकाळी १०:३० ते १:३० समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे वेळेत कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांचे “स्टार्टअप डेमो डे” या विषयी व्याख्यान होणार आहे.सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे नॅसकॉमचे श्रीमती प्राजक्ता तळवेलकर, सुची गुप्ता, राहुल मुलाने यांचे “डिजिटली सजग बना” या विषयी व्याख्यान होणार आहे.महाराष्ट्राच्या  संत परंपरां आणि भक्तिभावाला  उजाळा देणाऱ्या “ज्ञानाची वारी” या सांस्कृतिक कार्यक्रमाने ‘टेक वारीचा’ समारोप होणार आहे   दुपारी १२.३०  ते २.३० या वेळेत हा कार्यक्रम त्रिमूर्ती प्रांगण येथे होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टेक वारी या कार्यक्रमाचा समारोप दुपारी ३.०० वाजता होणार आहे.

‘फूड दॅट हील्स’ या उपक्रमांतर्गत पौष्टिक व पारंपरिक पाककृतींचे दररोज मेनू तयार केले जातील. तसेच  विविध क्षेत्रातील २४ स्टार्टअप्सचे सादरीकरण होणार आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना

विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व वर्गातील लोकांच्या विकासाबरोबरच अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात राहता यावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन विविध सामाजिक आणि शैक्षणिक, आर्थिक योजना राबवितात. भारतात राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायद्याअंतर्गत मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि झोरोस्ट्रियन (पारशी) या सहा धार्मिक समुदाय अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात.

परदेश शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या होतकरू व गुणवत्ताधारक मुलांना व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळवून देण्यासाठी त्यांना परदेश शिष्यवृत्ती योजना प्रदान करण्यात येते.

२०२५ – २६ या आर्थिक वर्षाकरिता १५.१५ कोटी रूपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आणि पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नाही, तसेच एकाच कुटुंबातील किमान दोन विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. ७५ विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची अथवा अन्य संस्थांकडून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.  प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा तसेच अभ्यासक्रमाचा कालावधी कमीत कमी दोन वर्षाचा असावा. एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांत प्रवेशित विद्यार्थी या योजनेस पात्र असणार नाहीत.

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित कायम अथवा विना अनुदानित अथवा विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येतात. सदर योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात  245 शाळांमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे.

अल्पसंख्यांक समाजातील होतकरू व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रम, तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी ५० हजार किंवा शैक्षणिक शुल्क तसेच १२ वी नंतरचे कला, वाणिज्य, विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ५ हजार रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.

राज्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकांना २० लाख, अ वर्ग नगरपालिकांना १५ लाख तर ब व क वर्ग नगरपालिकांना  १० लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते.

राज्यातील अल्पसंख्याकांना शिक्षण, आरोग्य, निवास सुविधा, रोजगार, पतपुरवठा व इतर मुलभूत सुविधाप्राप्त करण्यासाठी सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या विविध प्रश्नांबाबत संशोधन करून त्यावर उपाययोजना करणे. यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी व जैन विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख व्यावसायिक शिक्षण देणे. मुंबईतील मांडवी, उपनगरमधील चांदिवली येथे व राज्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या/तिसऱ्या पाळीत अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. ४४१६ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये दुसऱ्या पाळीत अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण देण्यात येते.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहारासाठी ०.४० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत वसतीगृह, शाळा इमारत, इत्यादी संस्थाद्वारे अल्पसंख्यांक बहुल जिल्ह्यातील लोकांच्या एकंदर राहणीमानाचा दर्जा उंचावणे, मुलभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तरात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी राज्य हिस्सा ८० कोटी, केंद्र हिस्सा १२० कोटीची निधीची तरतूद करण्यात आली आहे.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीसाठी वसतिगृह योजनेअंतर्गत मुलींसाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध करून मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी ३ कोटी निधीची तरतूद करण्यात आली. २५ जिल्ह्यांमधील ४३ शहरे अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रे घोषित केली आहेत. अशा २५ जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी शासकीय सेवा भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग तसेच मराठी भाषा फाउंडेशन वर्ग चालविले जातात. तसेच आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहाय्‍याने अल्पसंख्यांक महिलांचे मागासलेपण दूर करण्यासाठी स्वयंसहाय्यता गटांकरिता अनुदान देण्यात येते.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात १९० पात्र मदरसांना एकूण ११.५५ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला.  १६५ मदरसांमध्ये विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देण्यात येते.

राज्यात उर्दू भाषेची वाड्.मयीन प्रगती, मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत यामध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड्.मयीन विकास व्हावा यासाठी उर्दू घर नांदेड, मालेगाव, सोलापूर येथे कार्यान्वित असून नागपूर येथे काम सुरू आहे.

याचबरोबर अल्पसंख्यांक लोकसमुहाकरीता धर्मक्षेत्र व परिसर विकास आराखडा योजना, महिला बचत गटातील सदस्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, महिला व युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, पोलीस भरती पूर्व परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याकरिता अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने योजना राबविण्यात येतात.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणे ही केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रगतीची बाब नाही तर ती संपूर्ण समाजाच्या विकासाची दिशा आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समूहातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या परदेश शिक्षणाच्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जीवनाला नवी दिशा द्यावी.

 

श्रद्धा मेश्राम

सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे.

साहित्य अकादमीमार्फत १९८९ पासून मान्यताप्राप्त २४ भारतीय भाषांपैकी प्रत्येकी २४ भाषांमध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.

साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दरवर्षी भारतीय अनुवादकांनी आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, उर्दू आणि तेलुगू या भाषांमध्ये अनुवादित केलेल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो.

हे पुरस्कार एका दिमाखदार समारंभात प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे आहे.

साहित्य अकादमी यांनी भारतीय अनुवादकांना, त्यांच्या हितचिंतकांना आणि प्रकाशकांना २०२५ च्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठी मान्यताप्राप्त सर्व २४ भारतीय भाषांमध्ये अनुवादित पुस्तके सादर करण्याचे आमंत्रण दिले आहे. २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये (म्हणजे १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान) प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

प्रत्येक पुस्तकाच्या १ प्रतीसह अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. पुरस्काराची सविस्तर माहिती,  www.sahitya-akademi.gov.in  या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे अकादमीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

००००

अंजू निमसरक,मा.अ/वि.वृ.क्र.100 /दि.03.05.2025

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ‘ क्रिएट इन इंडिया’ या स्पर्धेतील विजेत्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे सकाळी १०  ते सायंकाळी ६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

या परिषदेत मास्टरक्लास सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1.30 पर्यंत क्रीटोस्फीअर स्टेज, दालन क्रमांक 204 ए मध्ये विविध मनोरंजन क्षेत्राविषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेव्ह एक्स या सत्रामध्ये स 10 ते 11.40 दरम्यान दालन क्रमांक 104 बी येथे मनोरंजन क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नवनवीन तंत्रज्ञान यावर चर्चासत्रे होतील.

०००

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

0
मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी...

 जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा...

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर...

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...