शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 492

एड्स प्रतिबंधामध्ये युवकांची मोलाची भूमिका

०१ डिसेंबर जागतिक एड्स दिन. या जागतिक एड्स दिनानिमित्त २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ या सप्ताहामध्ये एड्स जनजागृती सप्ताह अभियानामध्ये जिल्हा रूग्णालयाकडून विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊ या… सामाजिक ऋण तसेच राष्ट्रीय कार्यास हातभार लाऊया… या दिनान‍िमित्त हा विशेष लेख.

“भला जन्म हा तुला लाभला खुलास – हृदयी बुधा धरिसी तरी हरिचा सेवक सुधा”

सुप्रसिद्ध लावणीकार, कवी राम जोशी मानवी नरदेहाबाबत वर्णन करताना ही लावणी गायलेली आहे. चौऱ्यांशी दशलक्षकोट्या योन्या फिरल्यानंतर मानवाला दुर्लभ असा नरदेह प्राप्त होतो. त्यामुळे त्याने या देहाचा उपयोग विधायक कार्यासाठी करणे आवश्यक आहे. परंतु आज वाढती व्यसनाधिनता नैतिक मुल्याचा ऱ्हास, तसेच सहजीवनाचा वाईट परिणाम देशातील लोकांवर मुख्यत्वे करुन युवकांवर पडत असलेला पहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम देशाची भावी आधारस्तंभ असणारी तरुण पिढी ही एचआयव्ही संक्रमणाला बळी पडत असलेली पहावयास मिळते. मानवी भावना या नैसर्गिक असतात. परंतु या भावनांचा उद्रेक म्हणजेच विनाशास निमंत्रण असते. त्यामुळे त्यामध्ये सुवर्णमध्य साधणे आवश्यक असते.

तारुण्याचे तीन ‘त’कार”

तेजस्वीतता, तपस्वीतता, तत्परता हे तारुण्याचे तीन ‘त’ कार आहेत. हे प्रत्यक तरुण-तरुणीमध्ये असले पाहिजेत. परंतु खरोखरच हे तिन्ही गुण आपल्या स्वतः मध्ये आहेत का ? या प्रश्नाचे आत्म संशोधन करण्याची आज वेळ आली आहे. कारण नैतिक शिक्षण आवश्यक झालेले आहे. त्यामुळे व्यक्तीला गतिमानता प्राप्त होण्यास मदत होईल. आजचा युवक व्यसनरूपी चक्रव्युव्हामध्ये अडकत आहे. ज्याचे पर्यावसन १५ ते ४९ या वयोगटातील लोकच आज जास्तीत जास्त व्यसनाधीन, एचआयव्ही बाधित पहावयास मिळताहेत.

एचआयव्ही संक्रमणाला बळी पडण्याचे महत्त्वाचे कारण हे या रोगाबद्दल असलेले अपुरे ज्ञान. तारुण्य अवस्थेतील जल्लोष आहे. त्यामुळे आजच्या युवांनी या आजाराबाबत प्रशिक्षित समुपदेशक, सल्लागार यांच्या मार्फत शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे. आयसीटीसी केंद्र यामध्ये (दिशा केंद्रामध्ये) येणाऱ्या सर्व व्यक्तींना एचआयव्ही, एड्स बाबत संपूर्ण शास्त्रीय माहिती दिली जाते. तसेच त्यांच्या संमतीनेच त्यांची एचआयव्ही चाचणी केली जाते. चाचणीपूर्व तपासणीमध्ये चाचणी नंतरच्या निष्कर्षाबाबत समोरील व्यक्तीला कल्पना दिली जाते. तपासणीबाबत पूर्णपणे गोपनीयता ठेवली जाते. चाचणी पश्चात समुपदेशनामध्ये समोरच्या व्यक्तीच्या मानसशास्त्रीय मुल्याचा अभ्यास करुन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना समुपदेशन केले जाते.

“गळणाऱ्या पानांकडे नसते झाडाचे कधी लक्ष – नव्या पालवीलाच असते गोंजारण्यात ते दक्ष”

तात्पर्य, परिवर्तन हा काळाचा नियम आहे. या चराचर सृष्टीची निर्मिती ज्या निर्मिकाने उदात्त धोरणाने केली,  तो उद्देश सफल करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. संस्कृतीचा वारसा आपण जोपासला पाहिजे. परंतु नवीन इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप च्या संस्कृतीमध्ये आपण आपली जुनी संस्कृती, नितीमुल्य पायदळी तुडवता कामा नये. वाढती फॅशन, अंगप्रदर्शन तसेच संयमहीन जीवन यामुळे आपण आपले अस्तित्वच विसरत चाललो आहोत. खऱ्या अर्थाने युवकांनी एड्समुक्त महाराष्ट्र, भारत… स्वप्न नव्हे… ध्येय, हे वाक्य खरे ठरवायचे असेल तर वरील सर्व बाबींचा सारासार विचार करायला हवा.

“एकटे नाहीत तुम्ही – साथ आहोत आम्ही”

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. या कक्षांतर्गत विविध आयसीटीसी मार्फत युवकांसाठी एचआयव्ही, एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन, शिबिरे, चर्चासत्रे, परिसंवाद, पोस्टर प्रदर्शन इत्यादी उपक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन वेगवेगळया लक्ष्यगटांमध्ये केले जाते.

यावर्षीचे जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य आहे “Take The Rights Path” मार्ग हक्काचा, सन्मानाचा ! हे आहे. म्हणजेच एचआयव्ही संसर्गित लाभार्थ्यांना पण सर्व सामान्य नागरिकांसारखे हक्क आहेत, ते वेगळे नाहीत. त्यांना समाजामध्ये सन्मानाची व आदराची वागणूक दिली पाहिजे. सर्व कौटुंबिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करुन घेणे आवश्यक आहे, नव्हे तो त्यांचा हक्क आहे. यासाठी भारत सरकारने हक्काची जोपासणा करण्यासाठी एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७ अंमलात आणला आहे. ज्या कायद्याद्वारे एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना सन्मानपूर्वक वागणूक प्रदान करण्यात आली आहे. जर कोणी कलंकित करत असेल किंवा भेदभाव करत असेल, तर कायद्याने त्यांना शिक्षा देण्यात आली आहे. यावर्षीच्या घोषवाक्यानुसार एकटे नाहीत तुम्ही साथ आहोत आम्ही ही आम्हीपणाची भावना एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये विविध जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढीस लावणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

चला तर मग ०१ डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्त २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ या सप्ताहामध्ये एड्स जनजागृती सप्ताह अभियानामध्ये आपण सारेजन सहभागी होऊ या… सामाजिक ऋण तसेच राष्ट्रीय कार्यास हातभार लाऊया… एचआयव्हीबद्दल अधिक विस्तृत माहितीसाठी १०९७ टोल फ्री क्रमांकावर आपण माहिती विचारु शकता किंवा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, बीड येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

सुहास मनोहरराव कुलकर्णी

(जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक)

 जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, बीड

  मो.नं. ९४२००१७५३९

‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. 30 : ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी ‘एनसीसी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

‘एनसीसी’च्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. महाराष्ट्र एनसीसी संचालनालय व एचएसएनसी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे चर्चासत्राचे आयोजन केले होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एनसीसी’च्या विस्ताराबाबत सूचित केले आहे. यादृष्टीने जास्तीत जास्त युवक-युवतींनी ‘एनसीसी’मध्ये आपला सहभाग वाढवला पाहिजे असे सांगून ‘एनसीसी’मुळे शिस्तपालनाचे महत्त्व कळते व देशभक्तीची भावना जोपासली जाते असे राज्यपालांनी सांगितले.

शिस्त नसली तर यश मिळत नाही त्यामुळे युवकांनी ‘शिस्त’अंगी बाणवली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. युवक-युवतींनी दिवसातील किमान 15 मिनिटे योग व ध्यानधारणेसाठी दिल्यास त्यांची एकाग्रता शक्ती वाढेल असे सांगताना युवकांनी मोबाईलवरील वेळ नियंत्रित ठेवला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

चर्चासत्राला ‘एनसीसी’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह, एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ.निरंजन हिरानंदानी, सर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीन, महासंचालक सशस्त्र सैन्य दल वैद्यकीय महाविद्यालय, दिप्ती चावला, अतिरिक्त सचिव, संरक्षण मंत्रालय, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.हेमलता बागला, एनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग तसेच सैन्य दलातील अधिकारी, जवान व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor inaugurates seminar on ‘Empowering Girl Cadets through NCC’

Mumbai – The Governor of Maharashtra and Chancellor of state universities C P Radhakrishnan today inaugurated a Seminar on ‘Empowering Girl Cadets through NCC’ at KC College Auditorium in Mumbai.

The Seminar was organized by NCC Directorate Maharashtra in association with HSNC University.

Director General of NCC Lt Gen Gurbir Pal Singh, Provost of HSNC University Dr Niranjan Hiranandani, Surgeon Vice Admiral Aarti Sarin DG Armed Forces Medical College, Dipti Mohil Chawla, Additional Secretary, Ministry of Defense, Vice Chancellor of HSNC University Prof Hemlata Bagla, Additional DG, NCC Maharashtra Maj Gen Yogender Singh, officers of Armed forces and NCC cadets were present.

0000

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जागतिक एड्स दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ०२ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर आधारित प्रदर्शन स्टॉल, लोककलापथक सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींचे मनोगत तसेच जिल्हास्तरावर काम करणाऱ्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांचा सत्कार इ. कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

जागतिक एड्स दिन दरवर्षी ०१ डिसेंबर रोजी पाळला जातो. हा दिवस एड्सबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि एड्समुळे मृत पावलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी समर्पित आहे. यावर्षी सन २०२४ ची जागतिक एड्स दिनाची संकल्पना टेक द राईटस् पाथ ही आहे. ही संकल्पना एचआयव्ही/एड्स संसर्गाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तसेच मानवी हक्कांचे समर्थन करण्याच्या महत्वावर भर देते.

या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव-२ नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, संचालक आरोग्य सेवा, मुंबई डॉ. स्वप्निल लाळे, संचालक आरोग्य सेवा, पुणे डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था डॉ. विजय कंदेवाड, सिनेकलाकार संजय नार्वेकर, श्रीमती कल्याणी मुळे उपस्थित राहणार आहेत.

००००

मुलांनी फुलाप्रमाणे प्रफुल्लित, आनंदी राहावे – न्यायाधीश सुनीता तिवारी

सांगली, दि. २९ (जि. मा. का.) : मुलांनी त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीकरिता फुलाप्रमाणे प्रफुल्लित, आनंदी, विवेकी जीवन व्यतीत करावे, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सुनीता तिवारी यांनी केले.

कौटुंबिक न्यायालय सांगली यांच्या वतीने बालसुरक्षा सप्ताह अंतर्गत पक्षकार, वकील वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या मुलांकरिता मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी  सामाजिक कार्यकर्ते वैभवी प्रेमलता संजय व रोहित वनिता गजानन यांनी मुलांसाठी विविध खेळ व गाणी घेतली. यामध्ये सर्व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या कार्यक्रमांतर्गत सर्व सहभागी बालकांसाठी माणुसकीची भिंत या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. सर्व बालकांना त्यांच्या आवडीच्या अनेकविध वस्तू मिळाल्याने मुले आनंदीत झाली होती.

सूत्रसंचालन कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक ज्योती बावले भालकर यांनी केले तर आभार न्यायालयाच्या सहाय्यक अधिक्षक शैलजा वेदपाठक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालयाचे कर्मचारी विकास राऊत, संजय लोणकर, महेश खटावकर, सुनीता चौगुले, श्रुती दुधगावकर, शरद चांदवले, तृप्ती फासे आदिंनी परिश्रम घेतले.

00000

गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री यांच्याकडून मदतीची घोषणा

नवी दिल्ली, 29 :- महाराष्ट्रातील गोंदिया येथे झालेल्या भीषण बस अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री यांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या दु:खद घटनेबाबत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी समाजमाध्यम एक्सवर नमूद केले आहे की, महाराष्ट्रात गोंदिया येथे झालेल्या बस अपघातात जीवितहानी झाल्यामुळे अत्यंत व्यथित आहे. जखमींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत असून मृतांच्या कुटुंबियांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

0000

 

काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद

मुंबई, दि. २९ : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले.

काश्मीर हा भारतातील सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते असे सांगून एम. जी. रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणास काश्मीरचे दर्शन घडल्यापासून आपण काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विविध प्रदेशांना भेट दिल्यास आपण परस्परांना चांगले समजून घेऊ शकतो असे राज्यपालांनी सांगितले. या दृष्टीने काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर सबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग असून पुढे देखील राहील असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. आपण सर्वांनी एक देश म्हणून एकत्र राहिल्यास जगातील कोणतीही महाशक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम व पहलगाम या जिल्ह्यातील युवक- युवतींनी राज्यपालांशी संवाद साधला. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनांचे राज्य संचालक प्रकाश मनुरे, जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व इतर उपस्थित होते. या भेटीनंतर काश्मिरी युवकांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.

0000

Group of 125 Kashmiri Youths meet Maharashtra Governor

Mumbai A group of 125 youths from the six districts of Kashmir, currently on a visit to Mumbai called on Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan. The youths comprising 30 girl students are visiting Maharashtra under the ‘Watan Ko Jaano’ programme organised by the Nehru Yuva Kendra Sanghatan as part of the Kashmir Youth Exchange Programme.

State Director of Nehru Yuva Kendra Sanghatan Prakash Manure, District Youth officer Nishant Rautela and others were present.

००००

 

गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २९ : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.
अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
0000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ३ डिसेंबरला डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

मुंबई. दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात महापरिनिर्वाणदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार या विषयावर अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून देशाची राज्यघटना लिहिली आणि देशाला एक सर्वंकष असे संविधान दिले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही संबोधले जाते. त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमात माहिती दिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवरही मुलाखत प्रसारित होणार आहे.  निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

एक्स – https://x.com/MahaDGIPR,  

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,  

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा

मुंबई, दि. २७ : नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षीत नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी  ऑनलाईन सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहराविरहित) स्वरूपाची असून त्यासाठी अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून आधार ओटीपी किंवा मोबाईलद्वारे ओटीपी प्राप्त करून https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. त्यामध्ये पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित कार्यालयातील रोखपालद्वारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती जारी करण्यात येईल.

या फेसलेस सेवेमुळे सुमारे २.५० लाख वाहन मालकांना परिवहन कार्यालयांना भेट देण्याची आवश्यकता नाही. नागरिकांना काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा. आकर्षक/पसंती क्रमांक आरक्षित करण्यासाठी वरीलप्रमाणे (workflow) कार्यपद्धतीचा अवलंब वाहनधारकांनी करावा व या फेसलेस सेवेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.

अशी करा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी

अर्जदाराने https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर जावून न्यू युजर / रजिस्टर नॉऊ यावर क्लिक करावे. यामध्ये संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ईमेल व मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे पडताळून घ्यावे. त्यानंतर संकेतस्थळावर लॉग इनमध्ये जावून ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेले युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन उपलब्ध असणारे पसंती क्रमांक निवडावे. यासाठी घेण्यात येणारे शुल्क एसबीआय ई पे या पेमेंट गेटवेवरून ऑनलाईन अदा करावे आणि प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ई पावती प्रिंट काढून संबंधित वाहन विक्रेत्याकडे (डीलर)कडे नोंदणीसाठी देण्यात यावी.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी 

मुंबई, दि. २७ : हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.  राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे.

ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन मालकाचा वाहन नोंदणी अर्ज करावा लागणार आहे. तसेच वाहन नोंदणी शुल्क व वाहन कराचा भरणा करून नोंदणी करता येणार आहे.

सद्यस्थितीत खाजगी वाहनांच्या नोंदणीप्रमाणेच हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी या सुविधेमुळे वाहन वितरकांकडे करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता हलकी मालवाहू वाहने, यापुढे परिवहन कार्यालयात नोंदणीसाठी आणण्याची आवश्यकता राहणार नाही व नोंदणीची प्रक्रिया विनासायास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहन धारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. वाहन वितरकांस काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा.

तरी, सर्व नागरिकांनी व संबंधित वाहन वितरकांनी याची नोंद घेऊन, त्याप्रमाणे कार्यवाही करावी व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार  यांनी केले आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...