शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 485

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून अधिवेशन तयारीचा आढावा

नागपूर,दि. 15 : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 16 डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तयारीचा आढावा घेतला. अधिवेशन कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना केल्या.

विधानभवनाच्या मंत्रिपरिषद दालनात आयोजित बैठकीला विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, वि. गो. आठवले, महसूल विभागाच्या अपर आयुक्त राजलक्ष्मी शहा, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह विधानमंडळ, महसूल, उर्जा, बांधकाम, परिवहन, दुरसंचार, आरोग्य, शासकीय मुद्रणालय, अन्न व औषध प्रशासन आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अधिवेशन काळात कुठेही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या. मंत्री, आमदारांसह, विधानमंडळ तसेच अन्य विभागाचे बाहेरून येणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजेत, अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केल्या. दरवर्षी उत्तम नियोजन केले जाते. त्याप्रमाणे यावर्षीदेखील चांगले नियोजन होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विधानभवनासह अधिवेशन कामकाजाशी संबंधित सर्व इमारतींची वीजपुरवठ्याची चाचणी घेण्यात आली आहे. सर्व ठिकाणी विशेष मनुष्यबळ ठेवण्यात आले असून पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानमंडळ परिसरात पार्किंगचे एकूण सात स्लॉट तयार करण्यात आले असून या व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. विधानभवन इमारतीत हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आमदार निवास येथेदेखील कक्ष उभारण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सर्व ठिकाणी दूरध्वनी व वायफाय कनेक्शन देण्यात आले आहेत. आतापर्यंत 884 वाहने पुरविण्यात आली आहे. अतिरिक्त वाहने लागल्यास तशी व्यवस्था करण्यात आली आहे. विधानभवनाच्या आतील व बाहेरील सुरक्षा व्यवस्था, नागभवन, रविभवन, आमदार निवास येथे आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हीआयपींना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना पास घेऊनच प्रवेश दिला जाईल, असे पोलिस विभागाच्यावतीने यावेळी सांगण्यात आले.

शहरात 38 प्रस्तावित ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणची दुरूस्ती, रंगरंगोटी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्यावतीने पाणीपुरवठा, स्वच्छता व अग्निशमन सेवा पुरविण्यात येणार आहे. यासाठी विशेष स्वच्छता पथके कार्यरत राहणार असून स्वच्छतेसाठी जलद प्रतिसाद पथके देखील नेमण्यात आली आहेत. विधानभवनसह विविध ठिकाणी पाच आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ व औषधे तसेच ॲम्ब्युलन्स उपलब्ध राहणार आहे. विधानभवन व सर्व संबंधित इमारतींचे फायर ऑडिट करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उपसभापतींकडून दोनही सभागृहांची पाहणी

      बैठकीपूर्वी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद व विधासनसभा या दोन्ही सभागृहांची पाहणी केली. विधिमंडळ कामकाजासाठी सदस्यांकरिता यावेळी पेपरलेस व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. त्याची माहिती संबंधितांकडून जाणून घेतली. दोन्ही सभागृह कामकाजासाठी तयार असल्याची खात्री केली व व्यवस्थेबाबत संबंधितांशी चर्चा केली. यासोबतच विधानभवन परिसरातील पक्ष कार्यालयांनाही भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

समाजाची सृजनशीलता, वैचारिकतेसाठी वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि.१४: समाजाला सृजनशील आणि वैचारिक ठेवण्यासोबतच सामाजिक मूल्ये जोपासण्यासाठी वाचन संस्कृती जीवंत ठेवणे ही काळाची गरज असून त्याकरीता अशा पुस्तक महोत्सवांचे आयोजन करणे आवश्यक आहे. हा पुस्तक महोत्सव पुण्यापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे आयोजन केले पाहिजे, यासाठी शासन आपल्या पाठीशी नेहमी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन कॉलेज येथील मैदानावर आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सर्वश्री चंद्रकांत(दादा) पाटील, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, अमित गोरखे, हेमंत रासने, शंकर जगताप, आमदार माधुरी मिसाळ महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आचार्य पवन त्रिपाठी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, इतिहासात ग्रंथांचे महत्त्व चिरकाल आहे. आपली ग्रंथसंपदा ज्ञान किती थोर आहे हे सहाव्या शतकातील नालंदा विश्वविद्यालयाच्या ग्रंथसंपदेतून दिसून येते. त्याकाळी नालंदा विश्वविद्यालयात सर्व विद्या शाखांचा अभ्यास करण्यात येत असे. बख्तियार खिलजी याने नालंदा विश्वविद्यालयावर हल्ला केला आणि तेथील ग्रंथसंपदेला आग लावली ज्यामध्ये तेथील ग्रंथसंपदा तीन महिने जळत होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, ग्रंथांशी आपले नाते खूप जुने असून ते चिरकाल टिकले आहे. भारतीय संस्कृती जगातल्या सर्वात जुन्या संस्कृतीपैकी आहे. जगातील इतर संस्कृती संपल्या असल्या तरीही भारतीय संस्कृती चिरंतर चालू आहे. सर्व दिशांनी येणारे ज्ञान ग्रहण केले पाहिजे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. म्हणूनच ग्रंथांशी आपले नाते अतूट राहिले आहे.

डिजिटल युगातही आपले ग्रंथ आणि विचार टिकून राहणार आहेत. आपली ग्रंथसंपदा आणि विचार कधीही संपू शकत नाही. कोणतेही पुस्तक आता तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध भाषांमध्ये सहज वाचता येणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाने ज्ञानाची दारे उघडी केली आहेत. आपली वाचन संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. वैश्विक मराठी अभिजात भाषा झाली असून मराठीला राजमान्यता मिळाली आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आपण सर्वांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम केले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

पुस्तक प्रदर्शनानिमित्त लावलेल्या विविध दालनांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि प्रकाशक मुद्रक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. यावेळी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष कवयित्री अरुणा ढेरे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, कर्नल युवराज मलिक यांनीही आपले विचार व्यक्त केले. पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नॅशनल बुक ट्रस्टच्या पुणे कार्यालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबाबतचे पत्र हस्तांतर करण्यात आले. कार्यक्रमास साहित्यप्रेमी, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रकाशक, मुद्रक उपस्थित होते.

०००

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ ची ८.१३% टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. १३: राज्य शासनामार्फत ८.१३% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची १३ जानेवारी, २०२५ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १४ जानेवारी, २०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १४ जानेवारी, २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँक शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे,  त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/ इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.१३% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घ्यावी.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे  सचिव  (वित्तीय सुधारणा) श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

०००

परभणीतील दंगलीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा – उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर, दि. १३: परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीला बाधा पोहचविल्याच्या घटनेबाबत महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. घटनेची सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश अॅड. मेश्राम यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

परभणी येथे 10 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेबाबत वृत्तपत्रात जे वृत्तांकन आले व घटनेनंतरच्या उसळलेल्या दंगलीसंदर्भात तपशीलवार माहिती सादर करण्याचे लेखी पत्र निर्गमित करण्यात आले आहे. ॲड. मेश्राम हे परभणी जिल्हा दौरा लवकरच करणार आहेत.

परभणीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या घटनेबाबत स्वतंत्र अहवाल तत्काळ सादर करावा असे देखील निर्देश ॲड. मेश्राम यांनी दिले.

ooo

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणाची संधी

मुंबई, दि. १३: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतीसाठी 30 डिसेंबर 2024 ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत एस.एस.बी.(SSB) कोर्स क्र. 60 आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे 24 डिसेंबर 2024 रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी आवाहन केले आहे. मुलाखतीस Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर एस.एस.बी.-60 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत यावे.

एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.

कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी  शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com किंवा दूरध्वनी क्र.  0253-2451032 किंवा व्हॉट्स ॲप क्र. 9156073306 यावर प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

०००

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांची १४, १६ व १७ डिसेंबरला विशेष मुलाखत

मुंबई, दि. १३: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात ‘नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी’ या विषयावर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 लागू झाल्यापासून, भारतीय शैक्षणिक परिसंस्थेत परिवर्तनात्मक बदल घडवून आणले आहेत. त्याचा दूरगामी परिणाम अनेक बदलांमधून दिसून येत आहे. या धोरणांतर्गत अभ्यासक्रम- संरेखित शिक्षणाकडे वळणे, प्रादेशिक भाषा हे शिक्षणाचे माध्यम, शिक्षणात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन तसेच शैक्षणिक आणि व्यावहारिक ज्ञानातील अंतर कमी करणे आदी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठात या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कशाप्रकारे करण्यात येत आहे. याचबरोबर विद्यापीठात आणखी कोणकोणते नवनवीन अभ्यासक्रम व उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. याविषयी कुलगुरु डॉ. शिर्के यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि. 14, सोमवार दि. 16, मंगळवार दि. 17 डिसेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

नवी मुंबईत उद्यापासून महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन

मुंबई, दि. १३: राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येते. याअंतर्गत महिलांना कौशल्य व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे देण्यात येतात. या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ प्राप्त करून देण्यासाठी  ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२४’  चे आयोजन सिडको एक्झीबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे १४ ते २५ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे.

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन’ आयोजित केले जाते.  आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी ‘महालक्ष्मी सरस’ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला दरवर्षी चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळतो.

‘महालक्ष्मी सरस’ चे नवी मुंबईतील हे दुसरे वर्ष आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ३७५, इतर राज्यातून सुमारे १०० असे स्टॉल असणार आहेत. तसेच खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७५ स्टॉलचे मिळून भव्य असे ‘फूड कोर्ट’ असणार आहे.

या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तू याशिवाय महिलांच्या आकर्षणाच्या अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल असणार आहे. या प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना होणार आहे. राज्याच्या सर्व भागाची चव एकाच ठिकाणी भेट देणाऱ्यांना अनुभवता येणार आहे. सहकुटुंब भेट देणाऱ्या कुटुंबांचा विचार करून लहान मुलांना खेळवाडी (प्ले एरिया) उभारण्यात आला आहे. यावेळी या प्रदर्शनात अनुभव केंद्र असणार आहे.

नवी मुंबई परिसरात सुद्धा महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची परंपरा निर्माण व्हावी या हेतूने सलग दुसऱ्या वर्षी वाशी येथे हे भव्य प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला हातभार लावण्यास मदत होईल त्यामुळे या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

०००

वि.स.अ./श्रीमती श्रध्दा मेश्राम

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१३: महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केले आहे. आता 2028 ते 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जिओ  वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बिकेसी, वांद्रे येथे 13 ते 15 डिसेंबर दरम्यान आयोजित वर्ल्ड हिन्दू  इकॉनॉमिक परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद, अध्यक्ष राजेश शर्मा, प्रमुख वक्ते पद्मश्री टी. व्ही. मोहनदास पै, सहसचिव शैलेश त्रिवेदी यासह जगातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच मात्र भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी बनेल. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेने भारताची संस्कृती आणि विविध क्षेत्रातील विकास तत्वावर आधारित वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या आहेत. पाश्चिमात्य आणि आपल्या संस्कृतीमध्ये मूलभूत अंतर आहे. पाश्चिमात्य संस्कृतीत जो  सक्षम आहे तोच विकास करू शकतो मात्र, आपल्या संस्कृतीमध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याचा हक्क आणि अधिकार आहे.

भारताच्या नेत्रदीपक प्रगतीने सर्व जगाला थक्क करून टाकले आहे. सर्वाधिक गतीने पुढे येणारा भारत जगात तिसरी महासत्ता म्हणून पुढे येत आहे. जगातील लोक म्हणत होते की, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश कशाप्रकारे प्रगती करू शकतो? परंतु देशातील कुशल मनुष्यबळ हेच विकासाचे महत्त्वाचे साधन असून प्रत्येकाला विकासामध्ये सोबत घेऊन जात आहोत असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र आज मोठ्या गतीने पुढे जात आहे. महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी सल्लागार कमिटीची स्थापना केली असून यामाध्यमातून महाराष्ट्र कोणकोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो याचा अभ्यास करुन यावर आधारित महाराष्ट्राच्या विकासाची धोरणे आखली जात आहेत. जागतिक पातळीवरती महाराष्ट्र विकासाला पूरक एक साखळी बनवत आहे. यामध्ये लॉजिस्टिक धोरण, सर्वाधिक गतिमान रस्त्यांचे जाळे बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग 700 किलोमीटर असून जो 16 जिल्ह्यांना जोडला आहे. हा महामार्ग थेट जेएनपीटी या बंदराला जोडला आहे, यातून अत्यंत चांगल्या पुरवठादारांची साखळी निर्माण होत आहे, रस्ते, विमान वाहतूक, बंदर विकास या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर राज्य शासन भर देत आहे. देशासोबतच महाराष्ट्राला मेरीटाईमची ताकद बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ध्यास आहे. सन 2014 पासून पंतप्रधान श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला गती दिली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगीतले.

पंतप्रधान श्री. मोदी यांनी देशाच्या विकासाला गती देणारी नवीन धोरण बनवले आहेत. भारताने गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेवरती आणले आहे. सन 2030 पर्यंत भारताला 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवणार आहोत. हे उद्दिष्ट आम्ही 2028 पर्यंतच पूर्ण करू. जागतिक पातळीवरील आर्थिक संस्थांच्या माध्यमातून भारत देश सात ट्रिलियन इकॉनॉमीचे किंवा 9 ट्रिलियनचेही उद्दिष्ट गाठू शकतो असे सर्वेक्षण समोर येत आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित विकासावर अधिक भर देण्यात येत आहे. सन 2020 च्या देशपातळीवरील विकास सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र देशात भू-जल पातळीमध्ये देखील प्रथम होते. राज्यातील वनांचे आच्छादन देखील जास्त आहे. ग्रीन ऊर्जा, नदीजोड प्रकल्प यातून शाश्वत विकासावरती राज्य शासन भर देत आहे असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी सांगितले.

प्रमुख वक्ते पद्मश्री टी. व्ही. मोहनदास पै म्हणाले की, देशामध्ये उपलब्ध मनुष्यबळ हे आपल्या विकासाचे बलस्थान आहे. विकसित भारत हेच भारताचे भवितव्य आहे. भारतीय संस्कृती हा विचार आहे तो जगात पुढे नेणे गरजेचे आहे. युवांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणे, आरोग्य, शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, महिला सबलीकरण यावरती काम होणे गरजेचे आहे. भारताला जगातील महसत्ता बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे विकासाचे अनेक पैलू यावेळी श्री. पै यांनी मांडले.

०००

वि.स.अ./श्रीमती संध्या गरवारे

विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२ : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, ‘डी. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावली आहेच. त्याचबरोबर आपल्या देशाचा बुद्धिबळाच्या क्षेत्रातील दबदबा आणखी वाढला आहे. विश्वनाथन आनंदच्या कामगिरीमुळे देशातील मुलांना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली. आता याच कामगिरीची परंपरा गुकेश समर्थपणे पुढे नेईल’, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

000

अभिजात मराठी : ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 12 : मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विषयावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही बाब विचारात घेऊन केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात मराठी भाषेचा दर्जा’ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभवाची जगभरात ओळख असून ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असणार आहे. याचबरोबर मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळणार असून, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे. त्या अनुषंगाने अभिजात भाषेचा दर्जा आणि अभिजात दर्जा बहाल केल्यास मराठी भाषेत नेमके काय बदल होणार आहे आणि मराठी भाषेचा इतिहास काय आहे या विषयी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून डॉ. सदानंद मोरे यांनी माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत दोन भागात प्रसारित होणार आहे.  या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 17 डिसेंबर 2024 रोजी तर दुसऱ्या भागाचे मंगळवार दि. 24 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘दिलखुलास’कार्यक्रमातून ही मुलाखत दि. १८ १९, २०, २१ व २३ डिसेंबर २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

0
मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल...