बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 474

बदलापूरची घटना दुर्दैवी, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस महानिरिक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी;  तीन पोलिस निलंबित, फास्टट्रॅक सुनावणी, ॲड.ऊज्वल निकम-विशेष सरकारी वकील

 नवी दिल्ली, दि २० : बदलापूर (जि.ठाणे) येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठित करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. ऊज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवी दिल्ली येथे ते माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, पोलिस आयुक्तालयाच्या कक्षे अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. पोलिस संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि, कुठे काही विलंब असेल, तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

अशा गंभीर घटनांमध्ये न्याय कसा मिळवून देता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि त्या मुलींना न्याय देणे याला प्राधान्य आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश सुद्धा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.ऊज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

००००

देवळाली येथील कश्यपी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला सविस्तर आढावा

नाशिक महापालिका भरतीत कश्यपी प्रकल्पग्रस्तांना ठरलेल्या टक्केवारीनुसार प्राधान्य द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

मुंबई, दि. २०:- कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. कश्यपी प्रकल्पातील पाण्याचा नाशिक महानगरपालिकेला लाभ होत आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या यापुढे होणाऱ्या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना ठरलेल्या टक्केवारीनुसार प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

देवळाली येथील कश्यपी धरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात आज बैठक झाली. बैठकीस मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, आमदार सरोज अहिरे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव संजय बेलसरे, लेखा व कोषागारे सचिव डॉ. रामस्वामी एन., महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन्बलगन, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाशिक महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील जलसंपदा विभागाच्या पाण्याच्या स्रोतांमधून पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्याचे धोरण आहे. पिण्याच्या पाण्यानंतर शेतीला आणि त्यानंतर उद्योगासाठी पाणी दिले जाते. त्यानुसार पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या आढाव्यात कश्यपी धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने ३७८ प्रकल्पग्रस्तांपैकी ३०२ प्रकल्पग्रस्तांना दाखले दिले आहेत. मात्र, उर्वरित प्रकल्पग्रस्तांनी अर्ज न केल्याने किंवा त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी राहिल्याने त्यांना दाखले दिले गेले नाहीत. दाखले न दिलेल्या पात्र प्रकल्पग्रस्तांना तातडीने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले जावे. यापूर्वी ६० प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात आल्याचे दिसून येत असून नोकरीसाठी मागणी करणाऱ्या उर्वरित पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी नाशिक महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये ठरलेल्या टक्केवारीनुसार प्राधान्य देण्यात यावे.

याप्रसंगी कश्यपी प्रकल्पग्रस्त, एकलहरे ऊर्जा प्रकल्पग्रस्त, पिण्यासाठी वाढीव पाणी आरक्षण आदी विषयांबाबत चर्चा झाली. कश्यपी धरण प्रकल्पाच्या पाटचारीसाठी जमिनी गेलेल्या भुगाव, मनोली येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या अडचणी मांडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यावर मार्ग काढण्याचे संबंधितांना निर्देशही दिले.

——०००—–

जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि.२० : महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणानुसार युवा हा घटक महत्त्वाचा मानण्यात आला आहे. युवकांना व युवतींना त्यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या नवीन युवा धोरणानुसार राज्य व जिल्हा युवा पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत. जिल्हास्तर युवा पुरस्कार स्वरुप एक युवक व एक युवती यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रु. १०,०००/- व नोंदणीकृत संस्थेस गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रु. ५०,०००/- असे आहे.

अधिक माहिती विहीत नमुन्यातील अर्ज व माहिती तसेच शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २०१३१११२११२२०४३३२९ या संगणक संकेतांकावर उपलब्ध आहे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग ५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्जावरील लिंकवर सोबतच्या संकेतांकावरील शासन निर्णयात शेवटी उपलब्ध आहे. २० ऑगस्ट ते १८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत कार्यालयीन कामकाज दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण भरलेल्या विहीत अर्जाची प्रत, आवश्यक ती छायांकित केलेली कागदपत्रे (सत्यप्रत केलेली), तीन पासपोर्ट फोटो इ. सर्व कागदपत्रे पुस्तिकेच्या स्वरूपात एकत्रित करून बंद लिफाफ्यातच या कार्यालयात कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, समता नगर, कांदिवली, मुंबई येथे १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सादर करावे.

अधिक माहितीसाठी ०२२-२०८९०७१७ या क्रमांकाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा युवा पुरस्कार सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षाकरीता मूल्यांकन करण्यात येणार आहे. युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य  १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील पुरस्कार वर्षाच्या गत तीन वर्षामध्ये केलेले कार्य व कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनु-सूचित जाती, जमाती, जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्यशिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभूण हत्या, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वागीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण इ. बाबत कार्य, साहस इ. बाबतचे कार्य यानुसार मूल्यांकन होवून जिल्हास्तर युवा पुरस्कार २६ जानेवारी २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातून युवक व युवती तसेच नोंदणीकृत संस्थांनी प्रस्ताव या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

००००

जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचे आवाहन

मुंबई, दि. २० : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचे द्वारा सन २०२३-२४ या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे / योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२२-२३ या वर्षाकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष

(ब) क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (१) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्‍या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्ह्यामध्ये वास्तव्य असावे. वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत, सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. (४) गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील, असे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.

(ब) खेळाडू पुरस्कार (पुरुष महिला आणि दिव्यांग) : (१) खेळाडुने पुरस्कार वर्षासह लगत पूर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. (२) खेळाडूंची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य / राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षालगत पूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरीष्ठ / कनिष्ठ शालेय, राष्ट्रीय शालेय व केंद्रशासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी आणि या पैकी उत्कृष्ट तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.

वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व) मुंबई ४००१०१ येथे पृष्ठांकीत करुनच आणि सीलबंद पाकीटामध्ये सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२/ २८८७११०५ या वर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

००००

मंकीपॉक्सला घाबरू नका; सतर्क राहावे; मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

 

मुंबई, दि. २० : जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केली आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनेनुसार केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रतिबंध व उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळे, बंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा समावेश आहे. यानुसार राज्याने याबाबत सर्वेक्षण, प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे – आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक

मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क रहावे व सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच या आजाराबाबत संशयित रुग्ण आढळल्यास किंवा काही लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक यांनी केले आहे.

मंकीपॉक्स या आजाराविषयी काळजी घेण्यात येत असून जिल्ह्यातील आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश आरोग्य उपसंचालक, आरोग्य अधिकारी, महापालिकांचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनाही आयुक्त श्री. नायक यांनी निर्देश दिले आहेत.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो. मंकीपॉक्स हा प्रामुख्याने माणसापासून माणसाला होणारी लागण जसे की, थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचे संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबा वाटे संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे, प्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

संशयित रुग्णाची लक्षणे

  • मागील ३ आठवड्यात मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करुन राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे
  • सुजलेल्या लसिका ग्रंथी
  • ताप
  • डोकेदुखी
  • अंगदुखी
  • प्रचंड थकवा
  • घसा खवखवणे आणि खोकला

मंकीपॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी-

  • संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे.
  • रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरुणा पांघरुणाची संपर्क येऊ न देणे.
  • हातांची स्वच्छता ठेवणे.
  • आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.
  • नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे.

००००

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/Circular-Guidelines-for-management-of-Monkeypox-disease-compressed.pdf” title=”Circular – Guidelines for management of Monkeypox disease-compressed”]

निलेश तायडे/विसंअ

बांबू लागवडीसाठी मानवविरहित यंत्र विकसित करणार – मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल

मुंबई, दि.२० : बांबू लागवडीसाठी  खड्डे खोदणे व बांबू  कापणे या कामांसाठी मानवविरहित यंत्राचा वापर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे  कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. कृषिमंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सच्या बैठक झाली.

डॉ.भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ इनव्हा ॲग्रो मेक प्रायव्हेट लिमिटेडचे वेंकट राव,ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे सरदार बलमल सिंह यावेळी उपस्थित होते.

अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले की, राज्यातील पडीक जमिनीवर २१ लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी भारतातील पहिली इलेक्ट्रीक टूल बार यंत्रणा वापरण्यात येणार आहे. एक एकर क्षेत्रात एक व्यक्ती दोन ते तीन दिवसात  फक्त १२ ते १३ खड्डे काढू शकतो. मात्र या इलेक्ट्रीक टूल बार या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे ४५० बांबू लागडवडीसाठी खड्डे खोदता येतील. तसेच या यंत्रासोबत बांबू कापण्यासाठी मनुष्यबळाची देखील आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन यामध्ये डॉ.भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत अधिक संशोधन करून बांबू कापण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे जेणेकरून कमी मनुष्यबळ आणि कमी खर्चात हे काम करता येणे शक्य होईल, अशा सूचनाही श्री.पटेल यांनी यावेळी केल्या.

००००

संध्या गरवारे/विसंअ

‘जलजीवन मिशन योजने’च्या कामांना अधिक गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २० :- ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासंदर्भात जलजीवन मिशन योजना महत्त्वाची असून यामुळे अनेक गावात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. यामुळे या योजनेतील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी या कामांना अधिक गती द्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी जल जीवन मिशन योजना व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) २.० चा आढावा घेतला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे कार्यकारी संचालक अभिषेक कृष्णा यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जल जीवन मिशन योजनेतील कामांचा आढावा घेतल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जल जीवन मिशन योजनेतील कामे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येत आहेत. योजनेतील कामे निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. तसेच योजनेतील ज्या कामांचे कार्यादेश प्रलंबित आहेत त्यांची पूर्तता करून करून ते तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ चा आढावा घेताना पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, सन २०२४-२५ पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त अधिक (ODF+) मॉडेल बनवणे हा मुख्य उद्देश आहे. स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम  यासह विविध कामे तातडीने पूर्ण करावीत व यादृष्टीने कार्यवाही केली जावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या मानवतेच्या दृष्टिकोनातून तातडीने सोडविण्यात याव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २० :- पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक नियमितपणे येत असतात. येथील नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे शहरातील साफ-सफाईबरोबरच हाताने मैला उचलण्याचे काम केले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात. पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार नियुक्ती देण्यात यावी. त्यासंदर्भातील प्रलंबित वारसांच्या पात्रतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सोलापूर उपजिल्हाधिकारी आणि पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत वारसा हक्क कागदपत्रे तपासणीसाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना केल्या.

पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, नगरपरिषदेतील ३६२ पात्र सफाई कर्मचाऱ्यांना योग्य क्षेत्रफळाची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाच्या सचिवांनी संबंधित विषयाबाबत बैठक घेऊन योग्य तोडगा काढावा. नागरी हिवताप प्रतिरोध योजनेतील कार्यरत अस्थायी पदे पुढे कार्यरत ठेवण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने करावी. पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या १६ पात्र वारसांना नियुक्ती देण्यात आली आहे. तथापि प्रलंबित ६६ वारसांना नियुक्ती प्रकरणी अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होऊ शकली नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या ६६ वारसांबाबत पुन्हा निर्णय घेण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष शिबिराचे आयोजन करुन वारसांकडील कागदपत्रे आणि नगरपालिकेकडील कागदपत्रे तपासण्यात यावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

——०००—–

लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. २०:- पुणे जिल्ह्यातील लोणावळा व खंडाळा ही राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे असून येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. या शहराच्या भविष्यातील लोकसंख्येचा, पर्यटकांचा विचार करून खंडाळा भागाकरिता ५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि लोणावळा शहरासाठी विविध ९ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

लोणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. बैठकीस आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डॉ. के.एच. गोविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुण्याचे नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक अविनाश पाटील आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाचे उर्वरित काम नगरपरिषद आणि रेल्वे प्राधिकरणाकडून तातडीने करण्यात यावे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून रस्ता केल्याशिवाय या उड्डाणपुलाचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या कामाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनामार्फत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषदेच्या सहाय्याने तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, लोणावळा शहरातील दीर्घकालीन भाडेतत्त्वावर (लिजवर) दिलेल्या मालमत्तांची मुदत संपली आहे. मात्र, लिजधारकांनी परस्पर मालमत्ता विकल्याचे निर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर या मालमत्तांबाबत अंबरनाथ नगरपालिकेच्या धर्तीवर दंड आकारून त्या नियमित करण्याबाबत मार्ग काढण्यात यावा. शहरातील स्थानिक रिक्षा, टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही यादृष्टीने ओला, उबर यासारख्या ऑनलाईन कॅबचालक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. शहरातील पथविक्रेत्यांच्या समितीमध्ये स्थानिक पथविक्रेत्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांना निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात यावे. औद्योगिक वसाहतीमधील विजेची समस्या सोडविण्यासाठी एक्प्रेस फीडर देऊन प्रश्न मार्गी लावावा. अधिसंख्य पदांची निर्मिती करुन नगरपरिषदेच्या आस्थापनेवर सफाई कामगारांच्या वारसांना वर्ग चार च्या पदांवर नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

लोणावळा शहराचा विकास आराखडा अंतिम करताना हनुमान टेकडी परिसरातील म्हाडा घरकुलांना वाढीव एफएसआय देण्याबाबत नगरविकास सचिवांनी संबंधितांची बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करावी. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लोणावळा शहरातील दोन किलोमीटर मार्गाचे नगरपरिषदेच्या निधीतून रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावास रस्ते विकास महामंडळाने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. नगरपरिषदेला पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची ६.५ गुंठे जागा मिळण्यासाठी एकत्रित पाहणी करुन सध्याच्या टाकीलगतची जागा तातडीने देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

——०००—–

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मनाेगत

मुंबई, दि २० :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली आहे.

बुधवार, दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हे मनोगत प्रसारित होणार आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व विविध घटकांसाठीच्या विकास कामांचे नियोजन केले जाते, त्याची प्रभावी अंमलबजावणीही केली जाते. मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील विकास कामांबाबत दिलखुलास कार्यक्रमात माहिती दिली आहे.

—-000—

केशव करंदीकर/व.स.सं

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

0
मुंबई, दि.१४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, अमरावतीचे...

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...