बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 475

शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांची कार्यवाही तत्परतेने करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. २० : शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांच्या निविदा प्रक्रिया येत्या महिनाअखेर पूर्ण कराव्यात तसेच विहित कालमर्यादेत या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.

शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री.चव्हाण यांनी संबंधितांना सूचित केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर आदींसह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी  अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, रत्नागिरी, कोकण, ठाणे, विक्रमगड, पेण या ठिकाणच्या मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकाम प्रस्तावांच्या संदर्भात सद्यस्थितीचा आढावा घेऊन मंत्री श्री. चव्हाण यांनी या महिनाखेर सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच याबाबत पुढील कार्यवाही तत्परतेने करुन शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीचे बांधकाम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचित केले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, शासकीय तंत्रनिकेतन मधील पदविकाधारक विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच बाहेरही मागणी वाढत असून रोजगाराच्या संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. शासकीय तंत्रनिकेतन मधून प्राप्त होणाऱ्‍या कौशल्याची  उपयुक्तता आणि महत्त्व  विशेष  उपक्रमाद्वारे उच्च शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर तंत्रनिकेतन इमारतीचे बांधकाम हे दर्जेदार करण्याची खबरदारी सर्व संबंधितांनी  घ्यावी, सुविधायुक्त तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याच्या व्यापक उद्देशाने सर्वांनी कार्यवाही करावी, असे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ

लोणारी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 20 : लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मान्यतेसाठी लवकरच ठेवण्यात येईल, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

लोणारी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल व अखिल भारतीय लोणारी  समाज संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लोणारी समाजातील बांधवाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक विकास महामंडळासोबत लोणारी समाजाच्या मुला-मुलींसाठी नवी मुंबई किंवा पुण्यामध्ये वसतिगृह सुरू करावे, लोणारी समाजाचे विष्णूपंत दादरे यांचे सांगोला तालुक्यात स्मारक उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समाजाच्या इतर विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

रामोशी, वडार, गुरव, लिंगायत, नाभिक, सुतार, विणकर या समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले असून लोणारी समाजासाठीचे महामंडळ लवकरच होईल. राज्यातील इतर मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू केली असून या वसतिगृहाचा तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचाही लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ

राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ.आंबेडकर स्मारकाची पाहणी

मुंबई, दि. २० : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण होत असलेल्या भव्य स्मारकाची पाहणी केली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेसाठी आपले जीवन समर्पित केले. डॉ.आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक ही त्यांना यथोचित आदरांजली असून या स्मारकामुळे देश विदेशातील लोकांना डॉ.आंबेडकर यांच्या कार्याची महती कळेल, असे राज्यपालांनी सांगितले. डॉ.आंबेडकर यांच्या भव्य स्मारकामुळे भारतीय समाज अधिक सशक्त व एकसंध होण्यास मदत होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.  सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे करण्यात आलेल्या सादरीकरणाच्या वेळी राज्यपालांनी स्मारकाच्या निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्मारकामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी करण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा तसेच स्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

इंदू मिल येथील भव्य स्मारक हा संपूर्ण हरित परिसर असेल तसेच तेथे ७५० ते ८०० मोठी झाडे लावण्यात येणार आहे. या ठिकाणी १००० व्यक्तींची आसन क्षमता असलेले सभागृह, चवदार तळ्याचे प्रतिरूप तळे तसेच ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय व भूमिगत वाहनतळ असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, भंते डॉ. राहुल बोधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडे व विजय वाघमारे, वास्तुशिल्पकार शशी प्रभू, मूर्ती शिल्पकार अनिल सुतार आदी उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor reviews progress of Dr.Ambedkar Memorial at Indu Mill Compound

Mumbai Dated 20 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan visited the Grand Memorial of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar at Indu Mills Compound in Mumbai and reviewed the progress of its construction on Tue (20 Aug).

Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale, Maharashtra’s Minister for Youth Affairs and Sports Sanjay Bansode, senior government officers, Nagsen Kamble, Bhante Dr Rahul Bodhi and others were present.

0000

दिवंगत राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन

‘सद्भावना दिना’निमित्त राज्यपालांनी दिली सद्भावना प्रतिज्ञा

मुंबई, दि.२० : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन  यांनी  राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.

राज्यपालांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

“जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची” प्रतिज्ञा राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना दिली.

यावेळी राज्यपालांचे  प्रधान सचिव प्रवीण दराडे व  सहसचिव श्वेता सिंघल उपस्थित होते.

000

Floral tributes offered to late PM Rajiv Gandhi

 Governor administers Sadbhavana Day Pledge

Mumbai,20 :-The Governor of Maharashtra  C.P. Radhakrishnan administered the ‘Sadbhavana Day Pledge’ to the officers and staff of Raj Bhavan on the occasion of the birth anniversary of the late Prime Minister of India Rajiv Gandhi at Raj Bhavan Mumbai on Tue (20 Aug).

Earlier the Governor offered floral tributes to the portrait of Rajiv Gandhi. The birth anniversary of Rajiv Gandhi is observed as ‘Sadbhavana Diwas’.

The Sadbhavana Day Pledge calls upon the people ‘to work for the emotional oneness and harmony of all the people of India regardless of caste, creed, region, religion or language’ and to ‘resolve all differences through dialogue and constitutional means without resorting to violence’.

Principal Secretary to the Governor  Pravin Darade  and Joint Secretary Shweta Singhal were prominent among those present.

000

 

राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी २८ व २९ ऑगस्ट रोजी मुलाखत

मुंबई, दि.२० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती  २८ व २९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी  ८.३० वा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील  सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

मुलाखतीस अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीसाठी विहित दिनांकास व विहित वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय, ११ वा मजला, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट क्रं. ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४ येथे  उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सही व शिक्क्यासह प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र मुलाखतीच्यावेळी सादर करणे अनिवार्य आहे.  विहित नमुन्यातील सर्व मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सादर करणे आवश्यक असून, मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच कागदपत्रे सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/वि.सं.अ/

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ‘सद्भावना दिना’ची प्रतिज्ञा

मुंबई, दि. 20 : माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजीव गांधी यांची जयंती ‘सद्भावना दिन’ म्हणून साजरा करण्यात येते, यानिमित्त उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव आदी उपस्थित होते.

00000

धोंडिराम अर्जुन/स.सं

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल; आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार

मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई दि. २०: बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली.  तसेच शाळांमध्ये ‘सखी सावित्री समित्या’ स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले.

बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तातडीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितले.  विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थिनींना संशय आल्यास संबंधित व्यक्तीस न घाबरता तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना निदर्शनास आणून देता आले पाहिजे अशी यंत्रणा हवी.  सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी चर्चा करून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्थाचालकांची चूक असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.

०००

 

 

कोल्हापुरातील महिला सन्मान सोहळा यशस्वी करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी तपोवन मैदानावर होणारा महिला सन्मान सोहळा यशस्वी करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

तपोवन मैदानावर गुरुवारी दि. २२ रोजी होणारा सन्मान सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या महिला सन्मान सोहळ्याची नियोजन बैठक पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, लाभार्थी महिलांच्या सहभागातून होणारा हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्या चोख पार पाडाव्यात. कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या महिला लाभार्थ्यांची तालुकानिहाय यादी तयार करा. कार्यक्रमात उपस्थित लाभार्थ्यांना फूड पॅकेट, नाश्ता, पिण्याचे पाणी, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था, साफसफाई, पार्किंग, वाहतूक व्यवस्था यांचे योग्य नियोजन करा.

यावेळी मान्यवरांची बैठक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय सुविधा, विद्युत पुरवठा, स्वच्छता, पोलीस बंदोबस्त यांचा आढावा त्यांनी घेतला.

 

यावेळी जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमस्थळी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.

दौंडमधील विकासासाठी सकारात्मक निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई, दि.१९ : दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्यासाठी सुधारित धोरण ठरविण्याबाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या अहवालानंतर धोरण निश्चित करण्यात येणार आहे.

दौंड येथील विविध विकासात्मक कामासंदर्भात आमदार राहुल कुल यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार श्री. कुल, आमदार जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह दौंड तालुक्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

खडकवासला धरण ते फुरसुंगी-लोणी काळभोरपर्यंत भूमिगत कालवा करण्याच्या प्रकल्पास मंजुरी देणे.जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत स्थापन केलेल्या सुर्वे समितीचा अहवाल स्वीकारून, धोरण निश्चित करणे याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. हे विषय मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरण करणे व अस्तरीकरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता व मंत्रिमंडळ मान्यता मिळणे तसेच राज्यातील चिबड, खारवट व पाणथळ शेतजमिनी निर्मूलनासाठी सुधारित धोरण निश्चित करून दौंड तालुक्यातील कामांना मान्यता देणेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

यवत येथील सिटी सर्व्हे ५५० व ५७४ मधील जलसंपदा विभागाच्या नावे असलेल्या १ हे. ३० आर क्षेत्रापैकी १ हे. क्षेत्र यवत पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहत बांधकामाकरिता पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे सांगून दौंड तालुक्यातील एमएसईडीसीएल (MSEDCL) च्या विविध समस्या आणि मागण्यांकरिता ऊर्जा सचिवाना सूचना देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ

 

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई दि.१९ : उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील नदीच्या दोन्ही बाजूच्या पूर बाधितांविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. मात्र, त्याचवेळी भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा येणार नाही, हे सुद्धा सुनिश्चित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कुळगाव-बदलापूर उल्हास येथील नदीवरील पूर नियंत्रण रेषेबाबत निगडित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार किसन कथोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, ठाण्याचे जिल्हाधिकारी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेसह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पूर रेषेशी संबधित ब्ल्यू आणि रेड पूररेषेचा पुन्हा अभ्यास करावा. बदलापूर शहरातील पूर नियंत्रण आणि भविष्यात नदी पात्राजवळ अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तंत्रशुद्ध अभ्यास करून आणि नागरिकांची भविष्यातील सुरक्षा लक्षात ठेवूनच निर्णय घेण्यात यावा. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन गृहनिर्माण संस्थांना व मूळ जागा मालकांना पुनर्बांधणी करण्यास परवानगी देण्यासाठी त्यानुषंगाने निर्णय घेण्यात येतील.

या बैठकीत चुकीच्या पूर रेषांची दुरुस्त करणे,  नाल्यापासून अंतर सोडून बांधकामास परवानगी देणे, जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी ब्लू लाईनमध्ये टीडीआर वापरण्यास परवानगी देणे, ज्या इमारतीत पूर्वीपासून व्यावसायिक गाळे असतील, अशा इमारतींना रस्त्यापासून एक मीटर उंचीवर व्यावसायिक गाळ्यांना परवानगी देणे, ब्लू लाईनमधील ज्या भूखंडावर विकास आराखड्‌यात आरक्षण टाकलेले आहे त्यांना शासनाने टीडीआर किंवा आर्थिक भरपाई देणे, पूर नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

नदीचे खोलीकरण, संरक्षित भिंत बांधणे, आपटी व बॅरेज धरणाला स्वयंचलित दरवाजे बसविणे व पोशीर धरण लवकरात लवकर काम पूर्ण करणे, याविषयी यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

००००

राजू धोत्रे/विसंअ

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...