बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 473

शहरी भागातील बांधकाम परवानगीच्या अडचणींबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार – आदिवासी विकासमंत्रीडॉ. विजयकुमार गावीत

नंदुरबार, दिनांक 21 ऑगस्ट, 2024 (जिमाकावृत्त) जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात नगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवानगीबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, नगर रचना सहायक संचालक महेंद्र परदेशी, ऑर्कीटेक, ठेकेदारआदि उपस्थित होते.

यावेळी आर्कीटेक व ठेकेदार यांनी ऑनलाईन परवानगीसाठी 3 ते 4 महिने लागत असून प्रणालीमध्ये वेळोवेळी अडचणी उद्भवत असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागासाठी कायमस्वरुपी तांत्रिक अभियंतायांची नेमणूक करावी. तसेच ऑनलाईन प्रणाली सुरळीत होत नाही तोपर्यंत ऑफलाईन परवानगी देण्याबाबत मागणी केली.

आदिवासी विकास मंत्री डॉ.गावित यांनी यावेळी समस्या एकूण त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करु नये त्या आठ दिवसात त्या सोडविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी दिली.

 

000

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणारे महाशिबिर यशस्वी करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

तयारीचा आढावा घेऊन कार्यक्रमस्थळाची केली पाहणी

नाशिक, दि. २० ऑगस्ट, २०२४ (जि. मा. का. वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणारे महाशिबिर संवेदनशीलतेने व जबाबदारीने सूक्ष्म नियोजन करून यशस्वी करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या योजनेसह महिलांविषयक अन्य कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद व योजनांची प्रचार प्रसिद्धी होण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सिटी बस लिंक डेपो शेजारील मैदानात हे महाशिबिर होत आहे. या महाशिबिरासाठी जवळपास ५० हजार लाभार्थी उपस्थित राहण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी महाशिबिराच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.

नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थितीत होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ११ लाखहून अधिक लाभार्थी नोंदणी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, उपस्थित महिलांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती होण्यासाठी फलक लावावेत. त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी कार्यक्रमस्थळाजवळ शिबिर आयोजित करावे. या महिलांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. पार्किंगची सुव्यवस्थित आखणी करावी. शहर व जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी बसेस येणार आहेत. त्या अनुषंगाने शहर व ग्रामीण वाहतुकीचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी महाशिबिरासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी त्याना नेमून दिलेल्या कामासंदर्भात केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती सादर केली.

कार्यक्रमस्थळाची केली पाहणी

दरम्यान बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. भुसे यांनी कार्यक्रमस्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मुख्य सभा मंडप, मान्यवर पार्किंग, त्याचबरोबर लाभार्थी व नागरिकांची बैठक व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत तसेच बचतगटामार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, वाहन पार्किंग व्यवस्था आदिंची पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या व सोईसुविधा पुरविण्याच्या सूचना सर्व विभागाच्या संबंधितांना दिल्या. तसेच वाहनतळ व्यवस्था व लाभार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेबरोबरच पिण्याचे पाणी, शौचालय सुविधा आदिबाबत संबंधितांना सूचना केल्या.

00000

स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत होईल – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न

मुंबई, दि. २१ : गेल्या दहा वर्षात भारत जगातील पाचव्या क्रमांकाची महासत्ता झाला असून २०३० पर्यंत तिसरी मोठी महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार केला जात असून स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत व सर्वसमावेशक होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २१) मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ‘उद्योजकता प्रोत्साहन’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन, मुंबई व स्वदेशी जागरण मंच, कोकण यांच्या वतीने करण्यात आले.

स्वदेशी संकल्पनेचा पुरस्कार लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या नेत्यांनी केल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीला चळवळीचे रूप आले. आज उत्पादन व सेवा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. उत्पादनासह देश तंत्रज्ञानात देखील आत्मनिर्भर होत आहे. मात्र, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्युच्च गुणवत्ता व स्पर्धात्मक मूल्य ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा भारत आज अनेक क्षेत्रात निर्यातदार झाला आहे असे सांगून सर्वांनी सशक्त भारत निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते युवा उद्योजक डॉ. दिव्या राठोड व निकुंज मालपाणी यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते ‘३७ कोटी स्टार्ट अप्सचा देश’ आणि ‘मंदिर अर्थशास्त्र’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय सह-संयोजक अजय पत्की, रा.स्व. संघाचे मुंबई विभाग संघचालक रवींद्र संघवी, आंतरराष्ट्रीय वैश फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप माहेश्वरी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

0000

Swadeshi will make economic development sustainable

– C P Radhakrishnan

 

Mumbai dated 21 : Maharashtra Governor C P Radhakrishnan today said that India is aspiring to become a developed nation by 2047. Stating that the Government is providing strong impetus to Make in India, he said Swadeshi will make economic development of the nation sustainable.

 

The Governor was speaking at the ‘Entrepreneurship Promotion Programme’ on the occasion of World Entrepreneur Day at World Trade Centre in Mumbai on Wed (21 Aug).

 

The programme was jointly organised by the International Vaish Federation and Swadeshi Jagran Manch, Mumbai.

 

The Governor felicitated young entrepreneurs Dr Divya Rathod  and Nikunj Malpani on the occasion.

 

The Governor also released two books ’37 Crore Start Ups Ka Desh’ and ‘Temple Economics’ on the occasion.

 

Ajay Patki, All India Co-Convenor of Swadeshi Jagran Manch (SJM), Konkan, Ravindra Sanghvi, Vibhag Sanghachalak (RSS) Mumbai, Dilip Maheshwari, President, International Vaish Federation and Vijay Kalantri, President, World Trade Centre Mumbai were present.

0000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना श्रद्धांजली

मराठी भाषेच्या ऐश्वर्यात भर घालणारा श्रमसाधक लेखक

मुंबई, दि. २१ : श्रमसाधनेबरोबरच आपल्या साहित्यसेवेतून मराठी भाषेचं ऐश्वर्य वाढवणारा साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

निपाणी सारख्या परिसरात राहून त्यांनी आपल्या लेखनातून या परिसरातील मराठी भाषेची श्रीमंती जगभर पोहोचवली. सीमा भागातील मराठी भाषकांसाठी मोरे यांचे लेखन नेहमीच नंदादीपासारखं तेवत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, महादेव मोरे यांनी आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच निरलस, निखळपणे साहित्याची सेवा केली. त्यांनी आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सीमाभागातील मराठीचा लहेजा, शैली आणि मराठी संस्कृतीचं महत्वाचं चित्रणही त्यांच्या लेखनात येते. श्रमांचे मोल जाणणारा, श्रमसंस्कार झालेला, कष्टकरी, कामगार आणि ग्रामीण जीवनाचं नेमकं चित्रण करणारे लेखक म्हणून महादेव मोरे मराठी भाषा प्रेमींच्या सदैव स्मरणात राहतील. ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

०००

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेसाठी युवकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.२१ : सर्वाधिक रोजगार देणारे शहर मुंबई असून योग्य प्रशिक्षित मनुष्यबळ  उपलब्ध झाल्यास जास्तीत-जास्त रोजगार निर्माण होतील. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र महाविद्यालयात सुरू करण्यासाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व  महाविद्यालयांनी मागणी नोंदवावी. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी जास्तीत-जास्त रोजगाराची मागणी नोंदवावी, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात आयोजित बैठकीच्या उद्घाटन  प्रसंगी कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा बोलत होते.  मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, मुंबई उपनगरचे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रवींद्र सुरवसे, मुंबई शहरचे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संदीप गायकवाड यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, शिक्षणासोबत योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. उद्योग जगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शासन, उद्योजक व अशासकीय सर्व संस्था यांच्या मदतीने आपण कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाने रोजगार निर्मितीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढीस लागावे यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकासकेंद्र देखील सुरू केलेले आहेत. राज्यात एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येक महाविद्यालयात  एक कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या केंद्रांसाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मधून शंभर टक्के केंद्रांची मागणी नोंदवावी. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी जास्तीत-जास्त रोजगाराची मागणी नोंदवावी. उद्योजकांनी तसेच खाजगी आस्थापनांनी आपली रोजगाराची मागणी नोंदवावी, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले की, भारत हा सर्वाधिक युवांची संख्या अधिक असलेला देश आहे. भारताची लोकसंख्या हेच सध्या बलस्थान आहे. प्रत्येक युवक युवतीला काळानुरूप कौशल्य विकास करून जास्तीत-जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. प्रत्येक महाविद्यालयाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून पदवी सोबतच काळानुरूप कौशल्य युवांना शिकवावेत. कौशल्य विकास विभागाच्या दोन्ही योजना पूरक असून या दोन्ही योजनेमध्ये प्रत्येक महाविद्यालयाने तसेच उद्योजकांनी, विविध आस्थापनांनी आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कौशल्य अभियान अधिकारी विनय काटोलकर यांनी सूत्रसंचालन केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

०००००

संध्या गरवारे/वि.सं.अ

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ‘खादी महोत्सव’ सुरू

मुंबई, दि.२१ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी सर्व भारतीयांना खादीचा कपडा खरेदी करावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने प्रधानमंत्री यांच्या आवाहनास अनुसरून मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात खादी महोत्सवाचे आयोजन केले आहे. आज २१ ऑगस्ट रोजी या महोत्सवाची सुरुवात झाली. २३ ऑगस्ट २०२४ रोजी या महोत्सवाचा समारोप होईल.

महाराष्ट्रातील खादी उत्पादकांचे एकूण १२ स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे कपडे, जॅकेट्स, साड्या, ड्रेस, मध अशा प्रकारचे अनेक स्टॉल्स आहेत.  ग्रामोद्योग मंडळाच्या “हर घर खादी घर घर खादी” अन्वये आपल्या घरामध्ये अन्य कपड्यांबरोबरच खादीचा कपडा असावा, अशी घोषणा केली आहे. याची प्रत्येक भारतीयांनी दखल घेऊन खादीचा कपडा खरेदी करावा. रुमालापासून ते साडी पर्यंत काहीही खरेदी करावयाचे असल्यास ते खादीचे करावे, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी केले आहे.

या प्रदर्शनाला उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी भेट देऊन खादीच्या विविध स्टॉल्सची पाहणी केली. मंत्रालयीन अधिकारी तसेच कर्मचारी, नागरिकांनी खादी खरेदी करण्याचे आवाहन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याच्या खादी मंडळाची ओळख  मधुबन मधाने होते. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणामध्ये  हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “हर घर खादी घर घर खादी. खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन अॅण्ड खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन” असा मंत्र दिलाय. यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकल्यास हे शक्य होऊ शकते. या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आलेल्या इको फ्रेंडली गणपती मूर्ती यंदा आपल्या घरात विराजमान करावी. या महोत्सवासाठी ८०० मुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हाताने बनवलेले रुमाल आणि पंचे या स्टॉल्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उत्तरप्रदेश आणि आसाममधून काही लोक आले आहेत. विनोबा भावे यांची संस्था विनोबा ग्राम संघ, सेवाग्राम संस्थाकडून खादीच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या महोत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहनही आर. विमला यांनी केले आहे.

००००

संजय ओरके/वि.सं.अ

रास्त भाव दुकानदारांना कमिशन मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 21 : राज्यात 2017 नंतर रास्त भाव दुकानदारांचा मोबदला वाढवला नाही. वाढती महागाई आणि वाढता खर्च याचा विचार करता या दुकानदारांचा मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घ्यावा, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

मंत्रालयातील परिषद सभागृहात या विषयावर मंत्री श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतखाली बैठक झाली. या बैठकीस वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह रास्त भाव दुकानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रास्त भाव दुकानदारांना फक्त कमिशनवर अवलंबून राहून दुकान चालवणे कठीण होत आहे हे लक्षात घेता काही दिवसांपूर्वी रास्त भाव दुकानात स्टेशनरी आणि भाजीपाला विकण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील ५६ हजार रास्त भाव दुकानदारांना यांचा फायदा होईल.

तसेच सध्या केंद्रीय एन.आय.सी. संस्थेच्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑफलाईन वितरण करण्यास परवानगी दिली आहे. जोपर्यंत अडचण दूर होत नाही तोपर्यंत ऑफलाईन वितरण सुरू राहील. तसेच ई-पॉस मशीनची समस्या तातडीने दूर करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, रास्त भाव दुकानदारांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी शासकीय जाहिराती या दुकानात लावाव्यात आणि त्याचे कमिशन द्यावे अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेवावा. यामुळे राज्यात सध्या असलेली ५६ हजार रास्त भाव दुकानदारांना त्याचा फायदा होईल. तसेच किमान महिन्याला १ कोटी ६० लाख पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे.

००००

हेमंतकुमार चव्हाण/स.सं

यशदामध्ये फळे, भाजीपाला, फुले निर्यात परिषदेचे उद्या आयोजन

मुंबई, दि. 21: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने फळे, भाजीपाला व फुले निर्यात परिषदेचे आयोजन गुरुवार दि. 22 ऑगस्ट रोजी यशदा, पुणे येथे करण्यात आले आहे. कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांनी ही माहिती दिली.

पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, अपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, परकीय व्यापार महासंचालनालयाचे उपमहासंचालक दिलीराज दाभोळे, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे क्षेत्रीय प्रमुख ऋषीकांत तिवारी, आरपीक्यूएस मुंबईचे सहसंचालक डॉ. ब्रिजेश मिश्रा आदी उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेत अपेडा, डीजीएफटी, एनपीपीओ, जेएनपीटी, कॉनकोर, फेडरेशन ऑफ इंडियन एस्पोर्ट ऑर्गनायझेशन तसेच राज्यातील विविध फळे, भाजीपाला व फुलाचे यशस्वी निर्यातदार मार्गदर्शन आयोजित करणार आहेत. पॅकेजिंग, वाहतूक आणि लॉजिस्टिक सुधारण्यासाठी धोरणे याबाबतदेखील चर्चा होणार आहे.

या परिषदेतून शासनाच्या कृषीमालविषयक विविध विभागांच्या योजना, त्यांचे निकष, जागतिक बाजारातील ट्रेंड, गुणवत्ता मानके आणि निर्यातविषयक नियमांची माहिती उपस्थितांना होणार आहे. निर्यातदार व निर्यात बाजारातील इतर प्रमुख घटकांचादेखील यावेळी एकमेकांशी संवाद होणार  असल्यामुळे ही परिषद राज्यातून फळे, भाजीपाला व फुलांच्या निर्यात वृद्धीसाठी उपयुक्त ठरणार आहे,

0000

राज्यातील सर्व आयटीआयसह मुंबई उपनगरमधील महाविद्यालयांमध्ये महिलांना स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई दि. 21 : महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी  मुंबई उपनगरातील विविध शाळा महाविद्यालय आणि  शासकीय वसतिगृह  येथे महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संस्थानी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व  मुंबई उपनगरमधील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सप्टेंबर पासून स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र ‘राज्यगीत’ कोनशीले अनावरण मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ, जिल्हा नियोजन अधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यात महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी  शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ त्याचप्रमाणे शासकीय व खासगी आस्थापना यांनी  सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काटेकोरपणे उपाययोजना कराव्यात. शाळा व महाविद्यालयाने आणि विविध संस्थांनी आपल्याकडे नियुक्त केलेल्या कर्मचारी वर्गाची देखील खात्रीपूर्वक तपासणी करावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच शाळा व महाविद्यालयामधील शौचालयांच्या ठिकाणी जिथे महिला शौचालय आहेत तिथे महिलाच कर्मचारी नियुक्त करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

संध्या गरवारे/वि.सं.अ

महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद

रत्नागिरी, दि. 21 (जिमाका) : महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास, देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना कायमस्वरुपी सुरु राहील. भगिनिंना लखपती झालेले पहायचे आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

येथील चंपक मैदानावर झालेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला महिला भगिनींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे,  पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा जास्त आनंद आज तुमच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद पाहून झाला. रक्षाबंधनाचा सण एक दिवसाचा असला तरी, भावा-बहिणींमधील ऋणानुबंध कायमचे असतात. तुमचा हा भाऊ आयुष्यभार बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. ज्यांना अजून लाभ मिळाला नाही, त्यांच्याही खात्यात पैसे लवकरच जमा होतील. कुटुंब चालवताना बहिणींना कसरत करावी लागते. त्यांना  मोठे कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. कोणी माईचा लाल आला तरीही, योजना बंद पडणार नाही.

तुमचा भाऊ माहेरचा आहेर वाढवत जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अनेक योजनांच्या माध्यमातून माझ्या बहिणींना लखपती होताना बघायचं आहे. ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे.  हे घेणारे सरकार नसून, हे देणारे सरकार आहे. जे करु शकतो तेच बोलणार आहे. या योजनेत सगळीच यंत्रणा कामाला लागली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

बदलापूर येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. या महाराष्ट्रात मुलींच्या भावनेशी खेळणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. फास्टट्रॅकवर ही केस चालणार आहे. संस्था चालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत. चार वर्षाच्या मुलीच्या जीवाशी खेळू नका. हे सरकार त्या आरोपींना फाशी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. या चिमुरडीच्या जिवावर राजकारण करू नका. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हात कलम करण्याचा, छाटून टाकण्याचा इतिहास आहे. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सगळ्या जातीधर्माच्या बहिणींचा समावेश आहे. ही एक दिवसाची ओवाळणी नाही तर, कायमस्वरूपी माहेरचा आहेर आहे. यामध्ये वाढच होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, सर्व भगिनिंना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला ओवाळणी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या योजनेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण सर्वत्र पोहोचली आणि सर्वांना भावली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनीही मेहनत घेऊन घराघरात जाऊन या योजनेचे अर्ज भरले. या योजनेचा त्यांनादेखील लाभ मिळाला आहे. याशिवाय अर्ज भरल्यानंतर 50 रुपयांचा लाभही मिळाला आहे. सिंधुरत्न योजनेमधून टुरिस्ट बस महिलांना देण्यात आल्या. ती चालविण्याची जबाबदारीही त्यांना दिली आहे. हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा राज्यातला पहिला जिल्हा आहे. पंधराशे रुपयांचा सन्मान निधी तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे, असेही त्या म्हणाल्या.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, ही योजना जाहीर झाल्यावर अनेकांनी टीका-टिपणी केली.  शासन निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून काही जणांनी, काही जणांना कोर्टात पाठविले. पण, कोर्टाने त्यांना फटकारले. महिला भगिणींच्या खात्यात आम्ही पैसे जमा करु शकलो, हा आनंद आम्हा सर्वांना आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणाचीही बिशाद नाही, ही योजना थाबविण्याची. हा निधी आपल्या आरोग्यासाठी वापरला पाहिजे. महिला भगिनिंना त्रास देणाऱ्या बँकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

यावेळी रिमोटद्वारे सर्व जिल्हास्तरीय योजनांचे अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे पत्र जिल्ह्यातील भगिनिंच्यावतीने पालकमंत्री श्री. सामंत आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महिला भगिनिंशी संवाद साधला. यावेळी अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.

000

ताज्या बातम्या

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

0
पुणे, दि. १४: हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा...

येत्या वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

0
पुणे, दि. १४ : येत्या ३६५ दिवसात महाराष्ट्राची कला संस्कृती, नाट्य संस्कृती लोककला, लोकसंगीत, महान विभूतींना अभिवादन आदींचे १ हजार २०० कार्यक्रम आयोजित करण्याचा...

राजधानीत छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १४ :  छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी...

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे ‘भूषण’…

0
मुंबई, दि. १४: भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडणीची कामे तातडीने पूर्ण करावीत – पाणीपुरवठा व स्वच्छता...

0
मुंबई, दि 14 : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावांसाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांकरिता मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), जिल्हा...