शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025
Home Blog Page 469

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले 

रायगड जिमाका दि. 12- स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड परिसर हा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येत असून त्यांच्या नियमाखाली सर्व प्रशासन काम करीत आहे. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने रायगडची विकासात्मक कामे चालू आहेत त्याच धर्तीवर राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा हा जुन्या पद्धतीने बांधून त्याचे संवर्धन करण्याचा विचार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रl राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या ४२६ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पाचाड येथील समाधीस्थळी करण्यात आले होते. यावेळी श्री. गोगावले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन,अभिषेक व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती महाड गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, पाचाड सरपंच सीमा बेंदुगडे,यांसह विविध अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
या जन्मोत्सव सोहळ्याला विविध शिवभक्त संघटनेचे सदस्य, शेकडो शिवभक्त आणि पाचाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी, दि.१२ – केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थान मंदिराचेही दर्शन घेतले.

श्री साईबाबा संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीचे अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी, दि.१२ –  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतले.

त्यांच्यासमवेत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील होते.

श्री साईबाबा संस्थानच्यावतीने श्री.शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

तत्पूर्वी श्री.शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे, दि. १२: राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल, असेही ते म्हणाले.

‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महाराष्ट्र सायबरचे उप महानिरीक्षक संजय शिंत्रे, क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, क्विक हील टेक्नॉलॉजीस लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास काटकर, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

स्वामी विवेकानंदांना जयंतीनिमित्त अभिवादन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, स्वामी विवेकानंदांची शिकवण लाखो लोकांना, विशेषतः तरुणांना, धैर्याने, शहाणपणाने आणि उद्देशाने नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा देत आहे. त्यामुळे क्विक हील फाउंडेशनने आयोजित केलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा पुरस्कारांमध्ये युवकांसोबत सामील होताना आनंद होत आहे.

२०१६ पासून हा कार्यक्रम सुरू करून आतापर्यंत ५४ लाख लोकांपर्यंत सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता केल्याबद्दल फाउंडेशन आणि क्विक हील टेक्नॉलॉजीसचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, फाउंडेशनने समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यावर आणि सायबर-सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या फाउंडेशन बरोबर जोडले जाऊन तळागाळापर्यंत काम केलेले सर्व ‘सायबर वॉरियर्स’ कौतुकास पात्र आहेत.

ते पुढे म्हणाले, सायबर सुरक्षा ही भारतासह जगभरातील सर्वात गंभीर चिंतांपैकी एक म्हणून उदयास आली आहे, आज आपण पेमेंट स्वीकारण्यासाठी आणि करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून आहोत. अगदी अशिक्षित छोटा विक्रेता देखील डिजिटल पेमेंट स्वीकारतो. हे प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तंत्रज्ञानाचे यश आहे.

तंत्रज्ञान पुढे जात असताना चुकीचे काम करणारे लोकदेखील वाढत आहेत. तथापि, त्यांची साखळी तोडणे आणि त्यांना पकडण्याचे कामदेखील आपल्याला करावे लागणार आहे. आज सायबर गुन्हेगारीत स्थिर गतीने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाला सायबर गुन्हेगारीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक त्याचा पैसा गमावणार नाही अशी यंत्रणा आपल्याला विकसित करावी लागेल. नुकसानीनंतर उपाययोजना करण्यापेक्षा नुकसानीला प्रतिबंध करण्याच्या आवश्यकतेवर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी भर दिला.

शासनाच्या सायबर शाखेतील पोलीसांनाही अशा फाउंडेशनद्वारे सायबर गुन्हेगारीच्या विरोधात कसे काम करता येईल यासाठी संगणक यंत्रणेचे पुरेसे ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगार अनेकदा इतर देशातून काम करत असल्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. त्यामध्ये नवीन कायदे करण्यासह असलेली धोरणे अधिक मजबूत करणे, सायबरसुरक्षेत अधिक गुंतवणूक करणे, यासह जागरूकता पसरवण्यावर अर्थात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेषत: विद्यार्थ्यांना सुरक्षित ऑनलाइन पद्धतींबद्दल शिक्षित करणे यावर भर द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

अनुपमा काटकर म्हणाल्या, सायबर शिक्षा हा उपक्रम विद्यार्थ्यांना सक्षम करणे, आणि सर्वांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी त्यांना पुढे आणण्यासाठी राबविला आहे. हा उपक्रम केवळ सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठीच नसून छोट्या शहरातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना एक आवाज देण्याचा, तेथील समाजघटकामध्ये या क्षेत्रात त्यांचे नेतृत्व तयार करण्याचा उपक्रम आहे.

यावेळी सायबर शिक्षा फॉर सायबर सेक्युरिटी उपक्रमात उत्कृष्ट काम केलेले प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यांना सायबर वॉरियर्स पुरस्कार वितरीत करण्यात आले.

0000

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन

अहिल्यानगर, दि.१२- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते श्री शनैश्वर मूर्तीस व उदासी महाराज मठात अभिषेकही करण्यात आला.

यावेळी जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित होते.

श्री शनिशिंगणापूर संस्थांनचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांनी गृहमंत्री अमित शाह यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

तत्पूर्वी श्री. शाह यांचे हेलिपॅडवर आगमन झाले. अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राज्याच्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक

मुंबई,दि.11 : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे कौतुक केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिथल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आमंत्रण दिले होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी 9 जानेवारी रोजी नवी दिल्लीत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुंबईचे महापालिका आयुक्त आणि मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मतदान केंद्र व्यवस्थापन, तेथील पायाभूत सुविधा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी समाज माध्यमांचा उपयोग आणि माध्यम देखरेख आणि नियंत्रण समितीच्या कामकाजाविषयी राज्याच्या कामकाजाची माहिती दिल्लीतील अधिकाऱ्यांना दिली. या कार्यशाळेला दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. एलिस वाझ, विविध जिल्हा निवडणूक अधिकारी, रिटर्निंग ऑफिसर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पीआयबीच्या मुंबई च्या उपसंचालक जयदेव पुजारी, आकाशवाणीचे वृत्त संपादक जीवन भावसार, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाज माध्यम तज्ञ पल्लवी जाधव यावेळी उपस्थित होते.

00000

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे अभिवादन

मुंबई, दि. 12 : जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त  मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्यासह उपस्थित मंत्रालयातील अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

वाहतुकीच्या नियमांचे पालन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे, दि.11 (जिमाका) :- दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे मोटार वाहन विभाग आयोजित रस्ता सुरक्षित अभियान अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन संपन्न झाले. यानिमित्ताने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी आवाहन केले.

या कार्यक्रमास अप्पर परिवहन आयुक्त मुंबई श्री.भरत कळसकर,  जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार, सहायक आयुक्त शैलेश कामत, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, ठाणे जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे व नितीन डोसा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर व आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात हा कार्यक्रम होत असतो. आज राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्ह्यात होत आहे, यानिमित्त उपस्थित सर्वांचे स्वागत आणि अभिनंदनही. वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. परदेशात अपघाताचे प्रमाण का कमी आहे, याचा आपण अभ्यास करणे आवश्यक आहे. परदेशात ठिकठिकाणी रिफ्लेक्टर्स लावले जातात, जागोजागी सूचना फलक लावले जातात. जेणेकरुन वाहन चालवित असताना वाहनचालकांना नेमके कुठे जायचे, याचा बोध होतो. या विभागाकडून वाहतूकीच्या निकषात अधिक सुधारणा केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. वाहतुकीची शिस्त पाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अपघात आणि मृत्यू प्रमाण कमी किंवा शून्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. यापुढे पार्किंग व्यवस्था नसेल तर नवीन वाहन नोंदणी केली जाणार नाही. यासाठी महापालिकेकडून भाडेतत्वावर नवीन वाहन पार्किंगसाठी मंजुरी मिळाली तर वाहन नोंदणी करणे शक्य होईल. यासाठी निकष व नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागानेही वाहनचालकांकडून  नियमांचे उल्लघंन होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते दोन माहिती पुस्तिकांचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी रस्ता सुरक्षा कार्यक्रम तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती दिली.

प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध –  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे, दि.11 (जिमाका) :- आज ठाण्यातील खोपट बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना 2025 चे व नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ, राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नितीन मैंद, प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, उपमहाव्यवस्थापक श्री.मांडके, ठाणे जिल्हा शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, लवकरच एस.टी च्या ताफ्यामध्ये 2 हजार 640 लालपरी नव्याने दाखल होत आहेत. या नव्या वर्षामध्ये राज्याच्या प्रत्येक कानाकोपाऱ्यात नव्या लालपरी दिमाखात धावताना दिसतील. याबरोबरच भाडेतत्वावरील 5 हजार इलेक्ट्रिक बसेस आपण घेत आहोत. एवढेच नव्हे तर 2 हजार 500 नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव एस.टी. ने शासनाकडे पाठविला असून त्याचा देखील पाठपुरावा करुन पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत या बसेस एस.टी.च्या ताफ्यात दाखल होतील असे प्रयत्न केले जातील.

ते म्हणाले, आज 17 बसेसच्या सेवेचे उद्घाटन झाले आहेत. परंतु ज्या 150 बसेस येणार त्यातील मी सांगितले की, ठाणे शहरांमध्ये 40 आणि मीरा भाईंदरमध्ये 10 अशा एकूण 50 बसेस सुरुवातीच्या काळात मंजूर करुन घेतल्या आहेत. आणि उर्वरित बसेस या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येणार आहेत.

जे मार्ग बंद पडलेले आहे ते मार्ग आधी सुरु करावेत. बसेस वेळेवर कशा धावतील याची तांत्रिक गोष्टी सांभाळून काळजी घ्यावी, असे आवाहन करून परिवहन मंत्री पुढे म्हणाले की, प्रवाशांना सुखसुविधा देत असताना चालक व वाहकाच्याही सुखसुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा देणे आपले परम कर्तव्य आहे. रस्ते वाहतुकीची समस्या आपल्यापुढे एक आव्हान आहे. त्यातून काही प्रमाणात रस्ते अपघात होतात. ते होवू नयेत यासाठी मात्र रस्ता सुरक्षाविषयक निकष व नियम तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

श्री.सरनाईक म्हणाले की, वेगमर्यादा केवळ सीसीटीव्हीत न पाहता किमान दोन किलोमीटर अंतर पाहून हा मर्यादित वेग प्रति तास 80 किमी पेक्षा जास्त असू नये, याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. रस्त्यावरील वळणे व तत्सम बाबींविषयी ठिकठिकाणी सूचनाफलक लावावेत. वाहतूकीचे नियम लोकांकडून योग्य प्रकारे पाळले गेले तर अपघातांची संख्या फार कमी होईल, असा विश्वास मला वाटतो.

यावेळी त्यांनी बसस्थानकावरील शौचालय व प्रतिक्षागृहाची पाहणी केली असता वाहक व चालक यांना आराम करण्याची, गरम व थंड पाण्याची व्यवस्था, प्रतिक्षागृह चांगले असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सर्वांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, मला भरपूर काही निर्णय घ्यायचे आहेत. चालक व वाहक यांच्यासंदर्भात माध्यमांतून काही प्रतिक्रिया दिसून येतात, तेव्हा अतिशय वाईटही वाटते. आपण लोकप्रतिनिधी म्हणून चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांनाही सुविधा द्यायला हव्यात, या मताचा मी आहे.  माझ्यावर ही जबाबदारी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली असून या जबाबदारीचे भान ठेवून या राज्य परिवहन महामंडळाच्या परिवाराचे अजून चांगले करण्यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न करीन. माझ्या एस.टी कर्मंचाऱ्याला सुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे आणि त्यातले पहिले पाऊल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागासाठीही शंभर दिवसाचा कार्यक्रम आखून दिला आहे. या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच काही चांगले निर्णय घेतले जाणार आहेत.   आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महात्मा फुले जनआरोग्य सुविधेअंतर्गत मोफत आरोग्य उपचारांसाठी प्रयत्न करु या. प्रवाशांना चांगल्या प्रकारची सेवा, कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार, बोनस, एस.टी. सेवा तोटयातून बाहेर काढणे, ही परिवहन मंत्री या नात्याने माझी जबाबदारी आहे.

भविष्यात “प्रवाशांची सुरक्षितता” हे आपले कर्तव्य करताना त्यांना सांभाळणे, प्रवासी हे आपले देव, हाच आपला विठ्ठल, असे मानून प्रवाशांना उत्तम सेवा देत आपण पुढे वाटचाल करु या, असेही ते शेवटी म्हणाले.

लुईसवाडी येथील एक महिला तिची पर्स बसमध्ये विसरली होती. परंतु त्या बसचे चालक विक्रम जाधव यांनी त्या महिलेचा शोध घेतला आणि त्यांना त्यांची पर्स परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसेच संबधित पर्स सापडलेली महिला अंजली गांगल यांनीही वैयक्तिक पाच हजार रुपयांचे बक्षीस संबंधित बसचालक विक्रम जाधव यांना दिले.

या कार्यक्रमाप्रसंगी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर म्हणाले की, चालक व वाहक यांनी स्वतःची तसेच प्रवाशांची सुर‍क्षा महत्वाची आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आपली बस अन् बसस्थानक स्वच्छ ठेवणे. आपली सेवा अपघातमुक्त असणे आवश्यक आहे. यासाठी यांत्रिक अडचणीची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी चालक व वाहक यांच्यासाठी  पालकदिन सुरु केला आहे. चालक व वाहक यांना त्यांच्या  मानसिक अडीअडचणी दूर करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील.

वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले की, वाहतूकीचे सर्व  नियम  पाळले पाहिजे.आपण सर्वांनी सिट बेल्ट लावणे, हेल्मेट वापरणे, मद्यपान न करणे, अपघात होवू न देणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

यावेळी नितीन मैद यांनी 01 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा-2025 बाबत माहिती विषद करुन कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बळकटीकरणासाठी प्रयत्न – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

लातूर, दि. ११ : सहकार विभागाच्या माध्यमातून गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या संस्थांना आर्थिक सहाय्य देवून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी गोडावून उभारणी, विविध सेवांचा पुरवठा, कामकाजाचे संगणकीकरण आदी कामांसाठी मदत करण्यात येत असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे अंतर्गत रस्ते विकास कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी त्यांनी कुदळ मारून सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन केले. उपसरपंच विठ्ठल बोडके, ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, धनराज बोडके, चंद्रप्रकाश हंगे, श्रीहरी चाटे यांच्यासह सुनील वावळे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र कांबळे, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

आपल्या राज्याच्या विकासात सहकारी संस्थांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पुढील काळात सहकार चळवळ अधिक बळकट करून तळागळातील व्यक्तीला या चळवळीसोबत जोडण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच अडचणीतील सहकारी संस्थांना मदत करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार नवीन संस्थांची उभारणी देखील करण्यात येईल. सहकार चळवळीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती ना. पाटील यांनी यावेळी दिली. तसेच किनगाव मधील अंतर्गत रस्त्यांच्या कामासोबतच गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळातील श्री. दत्तात्रय भरणे व श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल

0
राज्य मंत्रिमंडळातील श्री. दत्तात्रय भरणे व श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार कृषी खाते श्री. दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व...

शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व स्वावलंबनासाठी ‘स्मार्ट’ प्रकल्प क्रांतीकारी-कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
पुणे, दि. ३१: जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणारा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना...

गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडू – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. ३१ : सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठरावीक मर्यादेची शिथिलता...

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत

0
मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत प्रसारित...

स्वमग्न प्रकारातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळांकडून विविध सवलती – मंडळाच्या सचिवांचे स्पष्टीकरण

0
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र...