शनिवार, ऑगस्ट 2, 2025
Home Blog Page 468

भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई, दि. १५ : निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले की, संपूर्ण विश्व हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करतोय. तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा नौदलामध्ये समावेश एक मजबूत आणि स्वावलंबी संरक्षण दल निर्माण करण्यासाठी भारताची अटल वचनबद्धता अधोरेखित करते. भारतीय समुद्र क्षेत्रात भारत प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून उदयास आला आहे. नौदलाने अनेकांचे जीव वाचवले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरक्षित केली आहे. यामुळे जगभरातून भारतावर विश्वास वाढला असून आज जागतिक स्तरावर, विशेषत: ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो. तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण सैन्याबरोबरच आर्थिक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जमीन, पाणी, हवा, खोल समुद्र किंवा अनंत अवकाश अशा सर्वच क्षेत्रात भारताने आपले हित जपून तिनही सेनादलांच्या माध्यमातून मागील काही वर्षात आत्मनिर्भर बनण्याची प्रशंसनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. एकाच वेळी विनाशिका, युद्धनौका आणि पाणबुडी कार्यान्वित होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर भारतीय नौदलाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी नमूद केले. भारतीय सैनिकांना आता भारतीय युद्ध सामग्री उपलब्ध होत असून १०० हून अधिक देशांना संरक्षण सामग्री निर्यात केली जात आहे. या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ योजनेचा विस्तार होत असून आर्थिक प्रगतीचे दार उघडून भारताच्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेत मोठा हातभार लागत असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी काढले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, एकाच वेळी तीन युद्धनौका राष्ट्राला अर्पण होत असल्याने भारतीय समुद्री क्षेत्रात देशाची ताकद आणि महत्व वाढले आहे. या क्षेत्रातून मोठे व्यापार होत असून संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत आहे. आधुनिकीकरणावर भर देण्यात येत असून या तिनही नौका त्यादृष्टीने सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नौदल प्रमुख ॲडमिरल श्री. त्रिपाठी यांनी नौदलासाठी गौरव आणि प्रतिष्ठेचा दिवस असल्याचे सांगून या निमित्ताने शक्ती, क्षमता आणि आत्मनिर्भरता साजरी केली जात असल्याचा उल्लेख केला.

युद्धनौकांविषयी थोडक्यात

आयएनएस सूरत – हे प्रकल्पातील चौथे आणि अंतिम जहाज आहे असून जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशिकांपैकी एक आहे. या जहाजामध्ये ७५ टक्के स्वदेशी घटक असून यात अत्याधुनिक शस्त्र-संवेदक प्रणाली आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमता आहेत.

आयएनएस वाघशीर – स्कॉर्पीन प्रकल्पातील ही सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. ही भारताच्या पाणबुडी बांधणीतील वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने ही तयार करण्यात आली आहे.

आयएनएस निलगिरी – स्टेल्थ युद्धनौका प्रकल्पातील ही पहिली नौका आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने याचे डिझाइन केले आहे. यात टिकाऊपणा, समुद्रात स्थिरता आणि स्टेल्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये आहेत, जी स्वदेशी युद्धनौकांच्या पुढील पिढीचे प्रतिबिंब आहे.

0000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 15 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विविध कार्यक्रमांसाठी सकाळी मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ येथे प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी स्वागत केले.

 यावेळी तिन्ही दलाचे अधिकारी व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि.१४: अनेक परदेशी पर्यटक वैद्यकीय सोयी सुविधांसाठी भारतात येत असतात त्या दृष्टीने महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन सुरू करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात पर्यटन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाची १७३वी बैठक झाली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी टुरिस्ट गाईड प्रोग्राम, वैद्यकीय पर्यटन पुन्हा सुरू करणे, जंगल सफारी येथे कॅरॅव्हॅन सुरू करणे, इत्यादींविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. महाबळेश्वर येथे ११ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हेलिकॉप्टर सुविधा सुरू करणे तसेच तापोळा, वासोटा, प्रतापगड येथे पर्यटकांच्या सोयीसाठी हेलिपॅड उभारण्यास परवानगी मिळवणे, महाबळेश्वर येथे टुरिस्ट गाईड, पर्यटकांकडून अतिरिक्त शुल्क आकारू नयेत यासाठी गाईड प्रोग्रामची अंमलबजावणी करावी. या प्रोग्राममध्ये अधिक सक्षम प्रमाणीकरण करावे, अशा सूचना पर्यटनमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

000

संध्या गरवारे/विसंअ/

महिला व बालविकास विभागातील योजना, उपक्रमांना गती द्यावी – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 14 : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित होते.

यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणारा ‘सक्षम अंगणवाडी आणि पोषण’ उपक्रम, ‘ मिशन वात्सल्य ‘, ‘ मातृवंदना योजना ‘, ‘वन स्टॉप सेंटर (सखी)’ या योजना आणि उपक्रमांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधी आणि विना खर्चित निधी याबाबत माहिती घेतली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. 14 :- वन्य प्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत दिली.

वाघ तसेच बिबट्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री श्री.नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जंगलांच्या कोर क्षेत्रात विविध प्रकारची फळ झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होऊन मांसाहारी प्राण्यांची देखील खाद्याची सोय होईल, असे मंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.

नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात 20 डिसेंबर तसेच 23 डिसेंबर 2024 रोजी 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू हा कोंबडीचे मांस खायला दिल्यामुळे झाले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कोंबडीच्या मांसामध्ये बुरशीजन्य विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार निलंबीत किंवा बडतर्फ करण्यात येईल, असे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

मंत्री श्री.नाईक म्हणाले की, ब्रम्हपुरी वन विभागाच्या शिंदेवाडी वनपरिक्षेत्रात 2 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला असून या वाघाच्या शरिराचे सर्व अवयव सुस्थितीत होते. पांढरकवडा वन विभागाच्या वणी वनपरिक्षेत्रात दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा शिकारीमुळे मृत्यू झाला. या वाघाचे शरीर पूर्णत: कुजलेले असल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजले नाही. तथापि, वाघाच्या शरीरातील दात तसेच नखे गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकरणावर वन विभाग नजर ठेऊन तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जंगलामध्ये लागणारी आग विझविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या विषयासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यांचा अभ्यासही करण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीसंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच योग्य ती नुकसान भरपाई देण्याचा शासन विचार करत आहे. तथापि, बफरझोनमध्ये कोणत्याही व्यक्तीने जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, वनसफारी करतांना काही पर्यटक वन्य प्राण्यांची वाट रोखून त्यांना पाहत असल्याने दिसून आले. यावरही वन अधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वनमंत्री श्री.नाईक यांनी यावेळी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार

पुतळा उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

नवी दिल्ली, दि. 14 : मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युद्धात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पानिपत येथे दिली.

पानिपत युद्धाला २६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील कालाआम परिसरात आज मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत १९ वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार राजाभाऊ वाझे आणि हरियाणा शासनाचे अधिकारी, स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या युद्ध मोहिमेतून त्याकाळी बरेच काही शिकता आले.  छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडे देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळ्यांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे तख्त मराठ्यांनी एकेकाळी राखले. ही एकीची  शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया ,असेही ते म्हणाले.

या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्याने त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे नमूद करुन या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी. समितीच्यावतीने अमरावतीचे नितीन धांडे यांना शौर्यस्मारक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवार, मराठा सेवा संघ, हरियाणा समस्त धानक मराठा समाज, धनुष्यधारी धानक समाज, मराठा उत्थान समिती, मुदगल चेतना परिवार चेरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेयर संघ, पानिपत सार्वजानिक मराठा गणेश मंडळ, यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाची क्षणचित्रे

  • कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने झाली.
  • शिंदेशाही पगडी, शौर्य स्मारकाची प्रतिमा आणि शाल देऊन मुख्यमंत्री यांचे स्वागत.
  • विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध पथकाकडून, मर्दानी खेळांचे प्रदर्शन
  • महाराष्ट्र, दिल्ली, आणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित. खासकरून ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक आवर्जून उपस्थित.

000

अंजु निमसरकर/ मपकेनदि/ १४.०१.२०२५

‘टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १४ : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव आहे. आपण सर्वजण मिळून १९ जानेवारी रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करुया, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील व्हिविंग गॅलरी येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या  रिंगिंग बेल कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह या स्पर्धेचे आयोजक विवेक सिंग, उज्ज्वल माथूर, टी नारायण, प्रायोजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले, ही स्पर्धा होण्यासाठी रिगिंग बेल वाजल्यापासून ४ दिवस १० तास ५० मिनिटे राहीले आहे. म्हणजे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. जगातील प्रमुख दहा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धापैकी टाटा मुंबई मॅरेथॉन ही एक प्रमुख स्पर्धा आहे. देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वाधिक बक्षीस रक्कम असणारी आणि सर्वाधिक स्पर्धक असणारी ही मॅरेथॉन स्पर्धा असून या स्पेर्धेचा नावलौकीक आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉन ही मुंबई आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि देश विदेशातून ६०,००० हून अधिक धावपटूंचा सहभाग हे प्रेरणादायी आहे. टाटा, आयडीएफसी फर्स्ट बैंक, आणि टीसीएस यांसारख्या प्रायोजकांच्या समर्पण, दृढनिश्चय, आणि उत्साहाने भारताला धावण्याच्या जागतिक नकाशावर स्थान दिले आहे. ब्रिटनचे मो फराह, सर्वात यशस्वी ट्रॅक अॅथलीट्सपैकी एक, यंदा आंतरराष्ट्रीय इव्हेंट अॅम्बेसेडर आहेत, त्यांची उपस्थिती हा नामवंत धावपटू आणि हौशी धावपटूंना प्रेरणा देणारा ठरेल असे मंत्री श्री. भरणे सांगितले.

यावेळी माजी मंत्री आणि आमदार श्री. भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले.

जगभरामध्ये बेल वाजवून कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याची पद्धत आहे. टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या उत्सवाला आज प्रारंभ झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. 14 : विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा व त्याचे नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीला देशातील सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र व ओपन ऍक्सेस (एसएलडीसी) या दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी अभिनंदन केले आहे.

इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीएआय) या राष्ट्रीय संस्थेने बेळगावमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. देशभरातील विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले.

याप्रसंगी केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. राजा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे माजी अध्यक्ष राकेशनाथ, ग्रीड इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एस के. सोनी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीचे अधीक्षक अभियंता मिलिंद देवळे, उमेश भगत, उपमहाव्यवस्थापक नितीन पौनीकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) आनंद दळवी, कार्यकारी अभियंता दिनेश पाटील, व्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश अघोर, सहाय्यक अभियंता विजय कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर, मुख्य अभियंता गिरीश पंतोजी यांचे मार्गदर्शन लाभले.

००००

संजय ओरके/विसंअ/

आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ३ कोटी ८ लाखांचा निधी

मुंबई, दि. 14 :- चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी  1 कोटी 22 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले असून उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निधी वितरीत करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दखल घेऊन केलेल्या या कार्यवाहीमुळे थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी 75 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी 75 वर्षांपूर्वी 1949 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीची स्थापना केली आहे. संस्थेचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून संस्था आर्थिक अडचणीत असल्याची बाब संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली. डॉ. विकास आमटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेस 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार तातडीने कार्यवाही करीत हा निधी संस्थेस वितरीत करण्यात आला.

थोर समाजसेवक बाबा आमटे आणि  साधनाताई यांनी स्थापन केलेली ही संस्था गेली 75 वर्षे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कुष्ठरुग्णांचे उपचार, पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांची सेवा करत आहे. संस्थेतर्फे ग्रामीण भागांतील प्रकल्पांत पुनर्वसित दीड हजार कुष्ठरोग मुक्त दिव्यांग-निराधार ,वृद्ध, अनाथ, परित्यक्ता, मानसिकदृष्ट्या अपंग बांधवांची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेतली जाते. विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात निवासी तीनशे दिव्यांग विद्यार्थी-प्रशिक्षणार्थींना शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते.  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनिवासी विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या साडेतीन हजार  विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणाची सोयही संस्थेमार्फत केली जात आहे. संस्थेच्या या सामाजिक बांधलकी आणि सेवाकार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्य शासनाकडून देय  3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी संस्थेस तत्काळ वितरीत केला आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ‘नाताळ भव्यतम सोडती’चा निकाल जाहीर

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र नाताळ भव्यतम सोडत दि. ३ जानेवारी २०२५ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालय सभागृह या ठिकाणी काढण्यात आली. पहिले सामायिक २५ लाख रुपयांचे एक बक्षीस चिराग एन्टरप्रायजेस, नाशिक येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.

या सोडतीमधून जनतेच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी या ब्रीद वाक्याचा पुरेपूर अवलंब करण्यात आला. रक्कम १० हजारच्या आतील रकमेची ७० बक्षिसे व रु. १० हजार वरील रकमेची २ हजार ५८२ बक्षिसे लागली आहेत. एकूण सर्व बक्षिसांची रक्कम ४९ लाख ४ हजार इतकी होती.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम 10 हजार रुपयांवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. 10 हजार रुपयांच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

महसूल दिनानिमित्त बेळी येथे २३ घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश

0
जळगाव, दि. १ (जिमाका ): महसूल सप्ताहाचे औचित्य साधून बेळी (ता. जळगाव) गावात घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश  पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक – मंत्री आदिती तटकरे

0
रायगड दि. ०१ (जिमाका): महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री...

महसूल विभाग शासनाचा आधारस्तंभ – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

0
महसूल दिनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व अनुदानाचे वाटप बुलढाणा, दि. १ (जिमाका): महसूल विभागाच्या...

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या – मंत्री मकरंद जाधव पाटील

0
बुलढाणा,दि. ०१ (जिमाका) : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि मेहकरसह इतर तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे,...

नैसर्गिक आपत्तीसंदर्भात तत्काळ मदत करा – मंत्री मकरंद जाधव पाटील

0
बुलढाणा, दि. १ (जिमाका): जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज...